कथा * संजीव जाधव

भक्तांनो, हे शरीर नश्वर आहे. यात असलेला आत्मा तेवढा शाश्वत आहे. त्याचं परमात्म्याशी मिलन होणं हाच परमानंद आहे. पण यांच्या मिलनात काम, क्रोध, लोभ, मोह असे अनेक अडसर आहेत. हे अडसर जेव्हा तुम्ही ओलांडू शकाल त्याच क्षणी तुम्ही मोक्षाच्या मार्गावर चालू लागाल…’’ स्वामी दिव्यानंदांची ओजस्वी वाणी श्रोत्यांना खिळवून ठेवत होती.

महानगरातल्या सर्वात महागड्या, सर्व सोयींनी युक्त वातानुकूलित हॉलमध्ये उंच व्यासपीठावर स्वामी विराजमान होते. भगव्या रेशमी वस्त्रांनी ते अधिकच भव्य दिसत होते. माथ्यावर केशर चंदनाचा टिळा, गळ्यात रूद्राक्षाच्या माळा, बोटात झगमगणाऱ्या सोन्याच्या अंगठ्या यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व भारदस्त वाटत होतं.

लोकांमध्ये चर्चा असायची की स्वामीजींना सिद्धी प्राप्त आहेत. ज्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी होते, त्यांची सर्व दु:ख दूर होतात. संपूर्ण शहरात स्वामीजींची मोठमोठी पोस्टर्स लावलेली होती. दूरदूरच्या गावांमधून लोक स्वामींच्या दर्शनाला अन् प्रवचनं ऐकायला येत असत. प्रवचनांना प्रचंड गर्दी व्हायची. गर्दीतही स्वामींच्या सिद्धींची अन् चमत्कारांचीच चर्चा असे.

दिवसातून तीनदा स्वामींचं दर्शन आणि प्रवचन असायचं. आत्ताचं हे त्यांचं दिवसातलं शेवटचं प्रवचन होतं. संपूर्ण हॉलमध्ये रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा सोडलेल्या होत्या. व्यासपीठ गुलाबाच्या फुलांनी सजवलेलं होतं. सुंदर सुवास दरवळत होता.

स्वामींच्या पायांवर डोकं टेकवून आशिर्वाद घेणाऱ्यांची रांग लागली होती. आश्रमातले स्वामींचे स्वयंसेवक भक्तांना अधिकाधिक देणगी अर्पण करण्यासाठी प्रोत्साहित करत होते.

रात्रीचे नऊ वाजून गेलेले. स्वामींनी हात उंचावून सर्व भक्तांना आशिर्वाद दिला. त्यांच्या जयजयकारानं संपूर्ण हॉल दुमदुमला. चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून स्वामीजी उठले अन् आपल्या निवासाकडे निघाले. हळूहळू सर्व भक्त पांगले. स्वामींचे दोन विश्वासपात्र शिष्य श्रद्धानंद महाराज आणि सत्यानंद महाराज यांनी सर्व स्वयंसेवकांनाही निरोप दिला आणि हॉलचा मुख्य दरवाजा बंद केला.

‘‘चला, आता आजची मजूरी एकत्र करूयात.’’ आपल्या भगव्या कफनीच्या बाह्या वर सारत श्रद्धानंद महाराज म्हणाले.

‘‘दिवसभर या मूर्ख भक्तांच्या स्वागत सत्कारात इतकं दमायला होतं ना की आता अगदी पूर्ण विश्रांती घ्यावी असं वाटायला लागतं…आता पटापट हे काम आटोपून घेऊयात,’’ हात ताणून आळस देत सत्यानंद महाराज बोलले.

‘‘जशी आपली आज्ञा,’’ हसून श्रद्धानंदांनी म्हटलं अन् व्यासपीठावरील फुलांचा ढीग विखरून ते त्यात शोधाशोध करू लागले. कारण देणगी, दक्षिणा भक्त फुलांच्या बरोबरच अर्पण करायचे. दोघांचे हात भराभर नोटा, नाणी अन् फुलं वेगळी करत होते, पण त्यांना अजून काहीतरी हवं होतं.

पुन्हा एकदा तो फुलांचा ढीग उलटापालटा केला अन् त्यांचे डोळे आनंदानं चमकले. ‘‘ते बघा,’’ दोघं एकदमच बोलले.

लाल रंगांच्या रेशमी रूमालात बांधलेलं काहीतरी तिथं होतं. घाईघाईनं त्यांनी रूमाल उघडला. आत एक लाख रुपयांची गड्डी होती.

‘‘स्वामीजी, आज तो पुन्हा एक लाख रुपये देवून गेला आहे.’’ गड्डी घेऊन सत्यानंद स्वामींकडे धावले. श्रद्धानंदही त्यांच्या मागे मागे होते.

स्वामी दिव्यानंद महाराज सुंदरशा मंचकावर लोळत पडले होते. ते पटकन् उठून बसले. हातात घेऊन त्या गड्डीचं नीट निरीक्षण केलं. नोटा खऱ्या आहेत याची खात्री करून घेतली. त्यानंतर त्यांनी विचारलं, ‘‘कोण आहे हा माणूस. काही कळलं का?’’

‘‘स्वामी, आम्ही खूप प्रयत्न केला पण कोण, केव्हा ती गड्डी ठेवून जातो ते कळलंच नाही.’’ सत्यानंद म्हणाले.

‘‘तुम्ही दोघं फुकटचं खाऊन माजला आहात. एक माणूस गेले पाच दिवस एक लाख रुपये देऊन जातो आहे आणि तुम्हाला त्याचा ठावठिकाणा कळत नाही?’’ स्वामींचे डोळे संतापानं लाल झाले होते.

‘‘क्षमा करा स्वामी, आम्ही खूप लक्ष ठेवून असतो…’’

‘‘कसलं कर्माचं लक्ष ठेवता तुम्ही?’’ स्वामीजी त्यांना पुढे बोलू न देता ओरडले.

‘‘मूर्ख आहात तुम्ही दोघं, कुचकामी!! आता आम्हालाच काही तरी केलं पाहिजे.’’ त्यांनी आपला मोबाइल काढला आणि एक नंबर फिरवून ते म्हणाले, ‘‘हॅलो, अरे निर्मल, मी स्टेजवर बसतो त्याच्या बरोबर वर सी.सी.टीव्ही कॅमेरा लावून जा बरं!’’

‘‘पण स्वामीजी, तुम्हीच तिथं कॅमेरा लावायला नको म्हणाला होतात? बाकी सगळीकडे कॅमेरे लावलेले आहेत अन् तिथं व्यवस्थित रेकॉर्डिंगही होतंय.’’ निर्मल म्हणाला.

‘‘वत्स, ही सृष्टी परिवर्तनशील आहे. इथं काही स्थिर किंवा स्थायी नसतं.’’ स्वामीजी हसून म्हणाले.

‘‘तुला ठाऊक आहे ना माझे निर्णय काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदलतात. त्यामुळेच मी इतका यशस्वी झालो आहे…तेव्हा तू फक्त एवढंच सांग की हे काम किती वेळात करशील? काम तुझं, पैसा आमचा.’’

‘‘स्वामी, सुर्योदयापूर्वी तुमचं काम पूर्ण झालेलं असेल.’’ निर्मलनं त्यांना खात्री दिली…त्यानंतर त्यानं जरा दबकत म्हटलं, ‘‘स्वामी, जरा पैशांची अडचण आहे. तुम्ही थोडी कृपा केलीत तर…’’

खोट्या रागानं स्वामी म्हणाले, ‘‘अरे हरामखोर, तुझा विश्वास नाहीए का माझ्यावर?’’ मग श्रद्धानंदकडे बघत त्यांनी सांगितलं, ‘‘निर्मलला आत्ताच पैसे पोचते करा. काम ताबडतोब व्हायलाच हवं.’’

‘‘आज्ञा शिरसावंद्य, स्वामी!’’ श्रद्धानंद म्हणाले अन् लगेच आत निघून गेले.

निर्मलनं म्हटल्याप्रमाणे काम चोख केलं. सूर्योदय होण्यापूर्वी स्वामींना हवा होता तिथं सी.सी. कॅमेरा बेमालूम बसवला गेला. इकडे त्या भक्तानंही आपली सेवा चोख बजावली. लाल रेशमी रूमालात बांधलेली एक लाख रुपयांची नोटांची गड्डी स्वामींच्या चरणी अर्पण झाली होती. श्रद्धानंद आणि दिव्यानंद आजही त्या माणसाला शोधू शकले नाही.

रात्री अकरा वाजता स्वामी अत्यंत चौकसपणे सी. सी. कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग तपासत असताना अचानक बोलले, ‘‘हे, इथं रिवाइंड करा…’’

श्रद्धानंदानं रेकॉर्डिंग रिवाइंड केलं. स्वामींनी अजून दोन वेळा तेवढाच भाग रिवाइंड करून लक्षपूर्वक तपासला. श्रद्धानंदला त्यात काहीच विशेष जाणवत नव्हतं. पण स्वामींची आज्ञा पाळणं गरजेचं होतं.

‘‘थांबा थांबा, इथंच थांबा…’’ स्वामीजी ओरडलेच. श्रद्धानंदानं ताबडतोब तिथंच थांबवलं.

‘‘क्षमा करा…’’ स्वामींनी आज्ञा केली. लगेच तेवढं रेकॉर्डिंग झुम केलं गेलं.

‘‘हा बघा सापडला…’’ सोफ्यावरून उठत स्वामी म्हणाले. ‘‘हे इथं थोडंसं रिवाइंड करून स्लो मोशनमध्ये दाखवा.’’

श्रद्धानंदनं तसंच केलं. रेकॉर्डिंगमध्ये सुमारे ४५ वर्षं वयाचा एक माणूस हातात फुलांचा द्रोण घेऊन स्वामींजवळ येताना दिसला. जवळ येऊन त्यानं फुलं स्वामींच्या पायांवर वाहिली. डोकं त्यांच्या पायांवर टेकवलं अन् अत्यंत सावधपणे पण चपळाईनं खिशातून लाल रूमालाची पुरचंडी काढून फुलांच्या खाली ठेवली. पुन्हा एकदा चरणांवर माथा टेकवून तो शांतपणे उठून निघून गेला.

‘‘हा कुणीतरी फार पैसेवाला असामी दिसतोय. त्याचा चेहरा नीट बघून ठेवा. मला हा माणूस हवाय…काय वाट्टेल ते करून हवाच आहे.’’ स्वामींच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती.

‘‘निश्चिंत असा स्वामी! उद्या त्याला धरून आणतोच!’’ सत्यानंद म्हणाला.

‘‘नाही वत्सा,’’ आपला उजवा हात उचलून शांतपणे स्वामी म्हणाले, ‘‘तो आमचा अनन्य भक्त आहे. त्याला धरून नाही, तर सन्मानानं माझ्यापाशी आणा. त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नका.’’

‘‘आज्ञा शिरसावंद्य स्वामी,’’ सत्यानंद आणि श्रद्धानंद स्वामींना नमस्कार करून निघून गेले.

दुसऱ्या दिवशी दोघेही सर्व भक्तांकडे अत्यंत निरखून बघत होते. रात्री आठच्या सुमाराला दोघंही पार दमले असतानाच तो माणूस त्यांना येताना दिसला.

‘‘तो बघ,’’ सत्यानंदने श्रद्धानंदाला कोपरानं ढोसलं.

‘‘हो…तोच दिसतोय. त्याला स्वामींकडे नेऊयात?’’ श्रद्धानंदनं विचारलं.

‘‘नाही, आत्ता नाही. आधी त्याला स्वामींना फुलं व पैसे अर्पण करू देत म्हणजे आपली खात्री पटेल, हा तोच आहे म्हणून.’’ सत्यानंदनं हळूच म्हटलं.

रोजच्याप्रमाणे तो माणूस स्वामीपाशी आला. फुलं वाहिली. पायांवर डोकं टेकवलं. लाल रूमालातली गड्डी हळूच फुलांच्या खाली सरकवली. पुन्हा डोकं पायांवर ठेवलं अन् पटकन् उठून बाहेर निघाला.

श्रद्धानंद त्याच्या मागे गेला आणि आदरानं त्याला म्हणाला, ‘‘महाशय, जरा इकडे येता का?’’

‘‘का बरं?’’

‘‘स्वामींना भेटायचंय तुम्हाला,’’?श्रद्धानंद म्हणाला.

‘‘मला? का? काय केलंय मी?’’ घाबरून त्यानं विचारलं.

‘‘तुमच्या भक्तीनं स्वामी प्रसन्न झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला विशेष दर्शन देऊन आशिर्वाद देणार आहेत.’’ सत्यानंदनं सांगितलं. ‘‘अहो, मोठेमोठे मंत्री, ऑफिसर, उद्योगपती रांगेत ताटकळत असतात. तुम्ही भाग्यवान आहात की स्वामींनी स्वत: तुम्हाला बोलावून घेतलंय. तुमचा भागोदय निश्चित समजा.’’

हे ऐकून तो माणूस आश्वस्त झाला. स्वामींच्या दोन्ही शिष्यांनी त्याला एका छानशा खोलीत सोफ्यावर बसवलं. चहा, पाणी विचारलं.

सुमारे अर्ध्या तासातच स्वामी आले. हसून त्याच्याकडे बघून शांत व आश्वासक सुरात म्हणाले, ‘‘वत्सा, तुझ्या ललाट रेषा मला सांगताहेत की तू आयुष्यात फार मोठं यश मिळवणार आहेस.’’

एवढं ऐकताच त्या माणसानं स्वामींच्या पायावर लोळण घेतली. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. स्वामींनी त्याला धरून उठवलं अन् सोफ्यावर बसवत म्हटलं, ‘‘रडू नकोस…एक नवी पहाट तुझ्या प्रतिक्षेत उभी आहे.’’

दोन्ही हात जोडून तो दाटल्या कंठानं म्हणाला, ‘‘स्वामी, तुम्ही दर्शन दिलंत…मी धन्य झालो.’’

त्याच्या शेजारी सोफ्यावर बसत स्वीमींनी विचारलं, ‘‘वत्सा, माझ्या प्रश्नांची खरी उत्तरं देशील?’’

‘‘स्वामी, आपण आज्ञा करा…मी तुमच्यासाठी माझे प्राणही देईन.’’

स्वामींनी आपली दिव्य दृष्टी त्याच्या चेहऱ्यावर स्थिर केली. त्याच्या डोळ्यांत बघत म्हणाले, ‘‘रोज तू एक लाख रुपयांची गड्डी माझ्या पायांवर का वाहतोस?’’

त्या माणसानं डोळे मिटून घेतले. त्याच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं की त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ चालू आहे. काही क्षणांनंतर त्याने डोळे उघडले. हात जोडून दाटलेल्या कंठानं तो बोलू लागला, ‘‘स्वामी, मी अरबपती होतो. पण व्यापारात प्रचंड नुकसान झालं…मी पार रस्त्यावर आलो. नातेवाईक, मित्र, परिचित…सगळ्यांनीच माझ्याशी संबंध तोडले. फक्त पत्नी मात्र सतत माझ्यासोबत आहे. एक दिवस मला समजलं की युरोपमध्ये एक बंद कारखाना अगदी स्वस्तात विकला जातोय…माझ्या बायकोनं सुचवलं, तो कारखाना आपण विकत घेऊयात. ती तुमची भक्त आहे. फार श्रद्धा आहे तिची. राहतं घर आणि बायकोचे दागिने विकून मी तो कारखाना विकत घेतला. वीस टक्के भागीदारी तुमच्या नावानं ठेवली होती. मी तो कारखाना सुरू केला. सुरूवातीला बराच त्रास झाला, पण मागच्या आठवड्यात मला त्या कारखान्यातून फायदा मिळू लागला होता. रोज पाच लाख मिळताहेत. त्यातून वीस टक्केप्रमाणे एक लाख मी तुम्हाला अर्पण करतोय.’’

‘‘पण ही गोष्ट तू लपवून का ठेवलीस? मला तरी सांगू शकला असतास?’’

बायको म्हणाली, ‘‘स्वामींना लोभ मोह नाहीए, त्यांना सांगून त्यांच्या साधनेत व्यत्यय आणायचा नाही…स्वामी अंतर्ज्ञानी आहेत. ते समजून घेतील.’’ अत्यंत भाबडेपणानं तो बोलत होता.

‘‘वत्सा, धन्य आहेस तू. तुझ्यासारख्या प्रामाणिक व्यक्तींमुळेच हे जग टिकून आहे, नाही तर कधीच रसातळाला गेलं असतं.’’ गंभीरपणे स्वामी म्हणाले. मग एक दीर्घ श्वास घेऊन, हात उंचावून आशिर्वाद देत म्हणाले, ‘‘परमेश्वरानं तुझी हाक ऐकली आहे. लवकरच तुला पाच कोटींचा, रोजचा पाच कोटींचा फायदा होणार आहे.’’

‘‘आपली कृपा स्वामी!’’ मान झुकवून प्रणाम करत तो माणूस म्हणाला,

‘‘युरोपातच एक बंद पडलेली खाण आहे. ती विकताहेत…मी चौकशी केली आहे. मी ती विकत घेतली अन् काम सुरू केलं तर मला महिन्याला पाच कोटींचा फायदा नक्कीच मिळणार…’’

‘‘मग ती विकत का घेत नाही?’’

‘‘स्वामी, ती विकत घ्यायला लागणारे वीस कोटी रुपये माझ्याकडे नाहीएत. खूप धावपळ केली पण पैसा उभा करता येत नाहीए. व्यापारात इतकं मोठं नुकसान झाल्यामुळे बँका माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. फायनान्सरनाही रिस्क नको वाटतेय. काय करू समजत नाहीए,’’ तो माणूस अत्यंत निराश झाला होता. डोळे भरून आले होते.’’

‘‘वत्सा, पैशांची काळजी करू नकोस. परमेश्वराने तुला माझ्यापाशी पाठवलं आहे…सगळं काही सुरळीत होईल.’’ स्वामींनी हसून त्याला दिलासा दिला.

‘‘कसं होईल स्वामी?’’

‘‘आमच्याकडे अनेक दानी माणसे धन देऊन जातात. ते धन माझ्या कामाचं नाहीए. तू तो पैसा घे आणि खाण खरेदी कर.’’ स्वामींनी म्हटलं.

त्या माणसाचे डोळे आश्चर्यानं विस्फारले, ‘‘स्वामी, तुम्ही मला फायनान्स करणार?’’

‘‘नुसतेच नाही देणार,’’ स्वामींनी हसत म्हटलं, ‘‘मला भक्तकल्याणासाठी जी अनेक कामं करायची असतात, त्यासाठी मला पैसा लागतोच. तू जी खाण खरेदी करशील, त्यात ५० टक्के शेयर माझा असेल.’’

‘‘स्वामी तुम्ही धन्य आहेत…’’ त्या माणसानं स्वामींच्या पायांवर लोळण घेतली.

‘‘श्रद्धा आणि सत्या, तुम्ही आत्ताच यांच्यासोबत यांच्या घरी जा. भागीदारीची कागदपत्रं तयार करा. लवकरात लवकर खाण विकत घेतली गेली पाहिजे.’’ स्वामींनी आज्ञा केली.

दुसऱ्या दिवशी सर्व कागदपत्रांची पूर्तता होऊन व्यवहार पूर्ण झाला. स्वामींनी वीस कोटी रुपये त्या माणसाला दिले. तो युरोपला निघून गेला.

स्वामींची प्रवचनं रंगत होती. डोळ्यावर सोनेरी स्वप्नं चमकत होती. पण महिना उलटून गेला तरीही त्या माणसाकडून काहीच संदेश आला नाही, तेव्हा त्यांनी सत्या व श्रद्धाला पुन्हा त्या माणसाच्या घरी पाठवलं. तिथं जाऊन चौकशी केली, तेव्हा तिथला वॉचमन म्हणाला, ‘‘ते साहेब तर फक्त एक महिन्यासाठी हा बंगला भाड्यानं घेऊन राहिले होते. पण अचानक सगळं आवरून इथून निघून गेले. तुमच्यासाठी एक पाकिट देऊन गेलेत. त्यानं आपल्या रूममधून एक पाकीट आणून त्यांच्या हातात ठेवलं.’’

ते दोघं कसेबसे स्वामींपाशी आले. ते पत्र दिलं.

स्वामींनी पाकीट उघडलं. आत पत्र होतं :

‘‘आदरणीय स्वामी,

साष्टांग दंडवत…तुम्हाला खात्री पटलीच असेल की हे शरीर नश्वर आहे. यात असलेला आत्मा तेवढा शाश्वत आहे. त्याचं परमात्म्याशी मिलन होणं हाच परमानंद आहे पण काम, क्रोध, मोह हे अडसर त्यात बाधा आणतात हे अडसर तुम्ही ओलांडू शकाल त्याच क्षणी तुम्ही मोक्षाच्या मार्गावर चालू लागाल. तुम्ही भक्तांच्या मार्गातले अडसर दूर करता. मीही एक अडसर दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्याला आपण, ‘धंदा ज्याचा त्याचा’ असंही म्हणू शकतो.’’

आपलाच नम्र सेवक.

हतबद्ध होऊन स्वामी हातात पत्र घेऊन उभे होते अन् सत्या, श्रद्धा त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...