कथा * कुसुम आगरकर

पूजा दिल्लीच्या या नव्या कॉलनीत राहायला आल्यापासून तिचं लक्ष सतत समोरच्या फ्लॅटकडे असायचं. तो फ्लॅट तिच्या स्वयंपाकघराच्या खिडकीच्या अगदी समोर पडायचा. काहीसं गूढ पण मनाला ओढ लावणारं घर असं तिनं त्याचं नाव ठेवलं होतं. सुमारे ३०-३५ वर्षांचा एक पुरूष सतत आतबाहेर करताना दिसायचा. त्याची धावपळ कळायची. एक वयस्कर जोडपंही अधूनमधून दिसे. ५-६ वर्षांचा एक गोजिरवाणा मुलगाही दिसायचा.

त्या घराविषयीची पूजाची उत्सुकता अधिकच चाळवली जेव्हा त्या घरात तिला एक तरूण सुंदर मुलगीही दिसली. क्वचितच ती बाहेर पडत असावी. तिचा सुंदर निरागस चेहरा आणि उन्हाळ्यातही तिनं डोक्याला बांधलेला स्कार्फ बघून पूजाचं कुतुहुल आणखी वाढलं.

शेवटी एकदा पूजानं तिच्या दूधवाल्या गवळ्याला विचारलंच, ‘‘भाऊ, तुम्ही समोरच्या घरातही रतीब घालता ना? कोण कोण राहतं तिथं?’’

हे ऐकून दूधवाल्यानं सांगितलं, ‘‘ताई, गेली वीस वर्षं मी त्यांच्याकडे रतीब घालतोय. पण हे वर्ष मात्र त्यांच्यासाठी फारच वाईट ठरलं आहे.’’ बोलता बोलता त्याचे डोळे भरून आले, कंठ दाटून आला. कसाबसा तो बोलला, ‘‘कधी शत्रूवरही अशी वेळ येऊ नये.’’

‘‘भाऊ शांत व्हा…मी सहजच बोलले…’’

पूजाला थोडं अपराधी वाटलं. तरीही नेमकं काय घडलं ते जाणून घेण्याची उत्सुकताही वाढली.

दूधवाल्यालाही कुठं तरी मन मोकळं करावं असं वाटलं असावं. तो स्वत:ला सावरून बोलायला लागला, ‘‘काय सांगू ताई. लहानशी, भाहुलीसारखी होती सलोनी, तेव्हापासून दूध घालतोय मी. बघता बघता ती मोठी झाली. अशी गुणी, हुशार अन् सुंदर पोर की तिला कुणीही पसंत करावी. पण तिच्यासारख्या रत्नासाठी तेवढंच तोलामोलाचं स्थळ हवं होतं.

‘‘एक दिवस आकाशसाहेब त्यांच्या घरी आले. स्वत:ची ओळख करून देऊन म्हणाले की कदाचित सलोनीनं तुम्हांला सांगितलं नसेल पण आमचं एकमेकांवर प्रेम आहे अन् आम्हाला लग्न करायचं आहे.

‘‘आकाशसाहेब स्वत: दिसायला चांगले, उच्चशिक्षित, उत्तम नोकरी, चांगलं घराणं, एकुलता एक मुलगा…अजून काय हवं? सलोनीच्या आईवडिलांना एकदम पसंत पडले. त्यांनी म्हटलं, ‘‘आम्हाला जावई म्हणून तुम्ही पसंत आहात, पण तुमच्या आईवडिलांना हे नातं पसंत आहे का?’’

‘‘हे ऐकून आकाशसाहेब उदास मनाने मग बोलले की त्यांचे आईवडिल कार अपघातात दोन वर्षांपूर्वी वारले. काका, काकू, मामामामी, मावशी आत्या वगैरे सर्व नातलग आहेत. त्यांना हे लग्न पसंत आहे.’’

‘‘आमच्याकडून लग्नाला होकार आहेच पण तुम्हाला एक विनंती आहे की लग्नानंतरही तुम्ही सलोनीसह इथं वरचेवर यावं. ती आमची एकुलती एक मुलगी आहे. तुम्ही दोघं इथं येत राहिलात की आम्हालाही एकटं वाटणार नाही. शिवाय तुमच्या रूपानं आम्हाला मुलगा मिळेल.’’

आकाशला त्यात काहीच अडचण नव्हती. थाटामाटात लग्न झालं. वर्ष दीड वर्षात बाळही झालं.

‘‘मग हे तर सर्व फारच छान आहे…तुम्हाला वाईट कशाचं वाटतंय?’’ पूजानं आश्चर्यानं विचारलं.

‘‘सांगतो ना,’’ दूधवाल्यानं म्हटलं. एकदा दूध घालायला गेलो तर घरात आकाशसाहेब, सलोनी अन् शौर्य बाळ सगळेच बसलेले दिसले. सलोनी तर खूपच दिवसांनी भेटली म्हणताना मी म्हटलं, ‘‘कशी आहेस सलोबेबी? किती दिवसांनी दिसते आहेस? येत जा गं लवकर…आम्हालाही फार आठवण येते तुझी.’’ पण मला नवल वाटलं, काका,काकी वरून माझ्याशी अत्यंत प्रेमानं आदरानं बोलणारी माझी सलोबेबी काहीही उत्तर न देता आत निघून गेली. मला वाटलं, लग्न झाल्यावर मुली परक्या होतात, दुरावतात, कधीकधी त्यांना सासरच्या श्रीमंतीचा गर्व होतो. मी मुकाट्यानं तिथून निघालो. पण मला नंतर समजलं की सलोनीला तिचा आजारानं थकलेला, उदास चेहरा मला दाखवायचा नव्हता. एरवी सतत आनंदी असणारी, उत्सहानं सळसळणारी…तिला ब्लड कॅन्सर झाला होता.

यावेळी ती इथं उपचारासाठी आली होती. तिचा ब्लड कॅन्सर थर्ड स्टेजमध्ये होता. औषधा पाणी, प्रयत्नांची पराकाष्ठा चालली होती पण गुण येत नव्हता.

सगळ्यात नामवंत हुषार डॉक्टरांनाही दाखवलं. सलोबेबीची तब्येत दिवसेदिवस खालावते आहे. वारंवार किमो थेरेपीमुळे लांबसडक केस गळून टक्कल पडलंय, म्हणूनच तिला सतत स्कार्फ बांधावा लागतो. कितीवेळा रक्त बदललं…कुठं काही कमी नाहीए उपचारांत. आकाशासाहेब तर सर्व कामं सोडून तिच्या उशाशी बसून राहतात. खूप प्रेम आहे त्यांचं तिच्यावर.

दूधवाला निघून गेला. सायंकाळी विवेक ऑफिसमधून घरी परतल्यावर पूजानं त्याला सकाळची सगळी कहाणी ऐकवली. ‘‘या दुखद कथेतला चांगला भाव म्हणजे आकाश एक अत्यंत चांगला नवरा आहे. सलोनीची इतकी सेवा करतोय. लग्न संसार पूर्णपणे भिनलेत त्याच्या वृत्तीत. नाही तर हल्लीची ही तरूण मुलं, लिव्ह इन रिलेशनशिप काय अन् सतत भांडणं, सेपरेशन आणि घटस्फोट काय…’’

एकदम तिच्याच लक्षात आलं, ऑफिसातून थकून आलेल्या नवऱ्याला चहा तरी विचारायला हवा. आल्या आल्या हे काय पुराण सुरू केलं. ती स्वयंपाकघराकडे वळली. तिचं लक्ष समोरच्या घराकडे गेलं.

आज तिथं बरीच गडबड सुरू होती. घरात माणसांची संख्याही वाढली होती. काही तरी बोलणं वगैरे सुरू होतं. तेवढ्यात एम्बुलन्सचाही आवाज आला…पूजा एकदम स्तब्ध झाली…सलोनीला काही…?

पूजाची शंका खरी ठरली. सालोनीची तब्येत फारच बिघडल्यामुळे तिला हॉस्पिटलला हलवलं होतं. त्यांच्याशी फारशी ओळख नव्हती तरी पूजा अन् विवेक दुसऱ्यादिवशी तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले…आकाशची तडफड बघवत नव्हती. डॉक्टरांनी हात टेकले होते. शेवटी तेच घडलं. त्याच रात्री सलोनीची प्राणज्योत मावळली.

त्यानंतर सुमारे दोन अडीच महिन्यांचा काळ उलटला. त्या घराकडे लक्ष गेलं की पूजाला सलोनीचा तो सुंदर निरागस चेहरा आठवायचा. आकाशची तडफड आठवायची. ‘‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’’ हे पटायचं अन् कर्तव्यदक्ष, प्रेमळ नवरा म्हणून आकाशचं कौतुक वाटायचं.

त्यादिवशी दुपारी दोनचा सुमार असेल. सर्व कामं आटोपून पूजा दुपारी आडवी होणार, तेवढ्यात दाराची घंटी वाजली. दारात एक स्त्री उभी होती. तिला हल्लीच समोरच्या घरात पूजानं बघितलं होतं.

‘‘आमंत्रण द्यायला आलेय. मोठ्या मालकीणबाईंनं पाठवलंय मला.’’

‘‘काय आहे?’’

‘‘उद्या लग्न आहे. नक्की या.’’

पूजा काही बोलेल, विचारेल इतकाही वेळ न देता ती तडक निघून गेली. बहुधा ती फार घाईत असावी.

ती निघून गेली…जाता जाता पूजाची झोप उडवून गेली. पूजा विचार करत होती. कुणाचं लग्न असावं? कारण लग्नाच्या वयाचा कुणीच तरूण किंवा तरूणी त्या घरात नव्हते.

सायंकाळी विवेक येताच पूजानं मनातली खळबळ त्याच्यासमोर मांडली. तिला वाटत होतं की तिच्याप्रमाणेच विवेकही चकित होईल, विचार करेल, कुणाचं लग्न? पण तसं काहीच झालं नाही. तो नेहमीप्रमाणे शांतच उभा होता. सहज म्हणाला, ‘‘शेजारी आहेत आपले. जायला हवं.’’

‘‘पण तुम्हाला माहीत आहे का लग्न कुणाचं आहे ते? कुणाच्या लग्नाला आपण जाणार आहोत?’’ पूजानं जरा नाराजीनंच विचारलं. तिला वाटलं विवेक तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय.

‘‘अगं, लग्न आकाशचंच आहे, शौर्यचं तर लग्न करता येणार नाही ना? किती लहान आहे तो? सलोनीच्या आईवडिलांचीच इच्छा आहे की लग्न लवकर व्हावं. कारण आकाशला याच महिन्यांत ऑफिसच्या कामानं परदेशी जायचं आहे. गेले कित्येक महिने सलोनीच्या आजारपणामुळे तो हा प्रवास टाळत होता. सलोनीच्या चुलत बहिणीशीच त्याचं लग्न होतंय.’’

हे ऐकून पूजाच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं तिला. ज्या आकाशबद्दल आदर्श नवरा म्हणून तिला प्रचंड आदर आणि कौतुक वाटत होतं. तो आकाश बायकोच्या मृत्युला दोन महिने होताहेत तोवरच पुन्हा बोहल्यावर चढतोय? मग ते प्रेम, ती सेवा, ती तडफड सगळा देखावाच होता का?

नवऱ्याच्या आयुष्यातलं बायकोचं स्थान फक्त ती जिवंत असेपर्यंतच असतं का? बायको मेली की तिचं नावही पुसून टाकायचं आयुष्यातून?…मला काही झालं तर विवेकही असंच करेल का? पूजा या विचारांनी इतकी दु:खी झाली, भांबावली की पटकन सोफ्यावर बसली. दोन्ही हातांनी तिनं डोकं दाबून धरलं. सगळं घर फिरतंय असं तिला वाटलं.

विवेकनं तिला आधार दिला. ‘‘काय झालं पूजा? काय होतंय?’’ त्यांने तिला प्रेमळ शब्दात विचारलं.

पूजानं उत्तर दिलं नाही…‘‘तुला धक्का बसलाय का? शांत हो बरं! अगं, तुला काही झालं तर माझ्याकडे कोण बघणार?’’ त्यांनी तिला जवळ घेत, समजूत घालत म्हटलं.

एरवी विवेकच्या या शब्दांनी सुखावणारी पूजा एकदम तडकून ओरडली, ‘‘तर मग तुम्हीही या आकाशसारखी दुसरी बायको घेऊन या. सगळे पुरूष मेले असेच दुटप्पी अन् स्वार्थी असतात.’’

तिला थोपटून शांत करत अत्यंत संयमानं विवेकनं म्हटलं, ‘‘तू उगीच डोक्यात राख घालून स्वत:चं बी.पी. वाढवू नकोस. आकाशला सलोनीच्या आईवडिलांनीच आग्रह केला आहे, कारण आकाशला ते आपला मुलगाच मानतात ना? त्याचं एकटेपणाचं दु:ख बघवत नाहीए त्यांना. शिवाय लहानग्या शौर्यलाही आईची माया हवीय ना? त्यांनीच समजावून सांगितलं की तू लग्न कर. तुझ्या पत्नीच्या रूपात आम्हाला आमची मुलगी मिळेल. त्यांनीच पुढाकार घेऊन आपल्या पुतणीशी त्याचं लग्न जुळवलं आहे.’’

एव्हाना पूजा थोडी सावरली होती. विवेकनं तिला पाणी प्यायला दिलं. पुन्हा त्याच स्निग्ध, शांत आवाजात तो बोलू लागला, ‘‘पूजा आयुष्य म्हणजे केवळ आठवणी आणि भावना नसतात. वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. प्रसंगी भावनांना मुरड घालावी लागते. वास्तवाला सामोरं जावं लागतं. दु:ख विसरून भविष्याकडे वाटचाल करणं याला ‘जीवन ऐसे नाव.’’’

‘‘पण त्याचं सलोनीवर…’’

‘‘प्रेम होतंच. अजूनही आहेच. ते कायमच असेल. दुसरं लग्न करतोय म्हणजे सलोनीला विसरला असं नाहीए. पण सलोनी आता परत येणार नाही, पण या पत्नीत तो आता सलोनीला बघेल. ही त्याची सलोनीला अत्यंत सार्थ आणि व्यावहारिक श्रद्धांजली आहे.’’

‘‘हे लग्न म्हणजे स्त्री आणि पुरूष एकमेकांचे पूरक असल्याचा पुरावा आहे. संसार रथासाठी दोन्ही चाकं लागतात. आकाशच्या संसाराचा रथ जेवढ्या लवकर मार्गावर येईल तेवढं चांगलं ना?’’

आता मात्र पूजाला आपल्या खोट्या विचारांची लाज वाटली. विवेकनं किती  शांतपणे अन् डोळसपणे विचार केला होता. खरोखर आकाश पुन्हा लग्न डोळसपणे विचार केला होता. खरोखर आकाश पुन्हा लग्न करतोय यात अयोग्य, अनुचित काय आहे? त्याच्या प्रेमाला बेगडी ठरवण्याचा अधिकार तिला कुणी दिला?

पूजानं विवेकचा चहा आटोपला…रात्रीचा स्वयंपाक व जेवण झाल्यावर ती म्हणाली, ‘‘उद्या लग्नाला जाताना काय कपडे घालायचे ते आत्ताच ठरवूयात. म्हणजे सकाळी घाई होणार नाही. लग्नाला जायचं म्हणजे व्यवस्थित जायला हवं ना?’’

विवेकनं हसून मान डोलावली.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...