कथा * ऋतु गुप्ते

फरहा पाच वर्षांनंतर आपल्या गावी परतून आली होती. विमानातून उतरताना तिने एक दीर्घ श्वास घेतला. जणू गेल्या पाच वर्षांतलं सगळं आयुष्य ती एकाच श्वासात जगून घेणार होती. पाच वर्षांत विमानतळाचा पूर्णपणे कायाकल्प झाला होता. बाहेर येताच तिने टॅक्सी केली अन् ड्रायव्हरला घराचा पत्ता सांगितला. तिच्या वडिलांचं घर हिंदपीढी भागात होतं.

पाच वर्षांत शहरात बराच बदल झाला होता. ते बघून फरहाला बरं वाटलं. वाटेत मल्टिफ्लेक्स अन् मॉलही दिसले. रस्ते पूर्वीपेक्षा रुंद अन् स्वच्छ वाटत होते. जीन्स टीशर्ट, स्कर्ट अन् टॉप घातलेल्या मुली बघून तिला सुखद आश्चर्य वाटलं. किती बदललंय हे शहर?

तिचा मुलगा रेहान टॅक्सीत बसताच झोपी गेला होता. फरहाने पण पाय थोडे पसरून सीटवरच स्वत:ला थोडं आरामशीर केलं. ऑस्ट्रेलियातून विमानं बदलत दिल्ली अन् आता तिथून टॅक्सीने आपल्या घरी. एवढ्या लांबलचक विमानप्रवासाने अंग आंबून गेलं होतं. आठवड्यापूर्वीच तिचे अब्बू रिटायर झाले होते. आता परत मूळ शहरात येऊन त्यांना इथे सेटल व्हायचं होतं. त्याच्या मदतीसाठीच फरहा काही दिवस त्यांच्याजवळ राहाणार होती. नव्या ठिकाणी, मग ते आपलं मूळ गाव का असेना, स्थायी होताना अनेक गोष्टींना सामोरं जावंच लागतं.

अचानक टॅक्सीवाल्याने ब्रेक दाबला. दचकून फरहा भानावर आली. तिची टॅक्सी हिंदपीढी भागात प्रवेश करत होती. रस्ते अत्यंत दयनीय परिस्थितीत होते. टॅक्सी डोलबाईडोल करत होती. सहज तिने खिडकीची काच खाली केली अन् भस्सकन् घाणीचा झोत अंगावर आला. पटकन् तिने काच बंद केली. शहराची प्रगती अजून या भागात पोहोचलीच नव्हती. रस्ते अजूनच अरुंद अन् गलिच्छ वाटत होते. अधूनमधून तयार झालेली घरं कुत्र्याच्या छत्र्या उगाव्यात तशी दिसत होती. तिच्या अब्बांचं दोन मजली घर मात्र तसंच दिमाखात उभं होतं.

अम्मी अन् अब्बू घराच्या बाहेरच तिची वाट बघत उभे होते.

‘‘अगं, अजूनही तुझा फोन बंद आहे…राकेश कधीचा काळजी करतोए, तू पोहोचलीस की नाहीस म्हणून?’’ अब्बूंनी तिला म्हटलं. त्यांना त्यांच्या जावयाचा प्रचंड अभिमान होता.

फरहाला जाणवलं बंद दारंखिडक्यांच्या फटीतून किती तरी डोळे तिच्याकडे बघाताहेत.

फ्रेश होऊन आरामत बसत फरहाने चहाचा कप हातात घेतला अन् ती अब्बूचं घर, त्यांची आळी व इतर गोष्टींचं निरीक्षण करू लागली.

सलमा नावाची विशीतली एक मुलगी भराभर घरकाम आवरत होती.

‘‘अब्बू कसं वाटतंय आपल्या घरात आल्यावर? अम्मी मात्र मला खूपच थकल्यासारखं वाटतेय. मागच्या वर्षी आमच्याकडे सिडनीला आली होती तेव्हा छान दिसत होती.’’

एक दीर्घ श्वास घेऊन अब्बू विषण्णपणे म्हणाले, ‘‘इथलं काहीही बदललेलं नाही. फक्त प्रत्येक घरात मुलं खूप वाढलीत. गल्लीत टवाळ पोरं जास्त दिसतात, मुली अजूनही जुन्या विचारांच्या बेड्यांमध्ये जखडलेल्या आहेत. मात्र तुझ्या लग्नाची गोष्ट आता लोक विसरले आहेत.’’

फरहाने आतल्या खोलीत डोकावून बघितलं. तिची अम्मी अन् अम्मीचा नातू मजेत खेळत होते.

‘‘अब्बू, मला ना, फार भीती वाटत होती मोहल्ल्यातली, जवळपासची माणसं तुमच्याशी नीट वागतील ना? त्रास देऊन, अपमान करून छळणार तर नाहीत ना? त्या काळजीपोटीच मी आत्ता आलेय. आठ-दहा दिवसांत राकेशही येणार आहेत.’’

काही क्षण शांततेत गेले. मग ती अब्बूंजवळ येऊन बसली. ‘‘फूफी (आत्या) कशी आहे?’’

‘‘सोड गं, जे झालं ते झालं. तू आता विश्रांती घे. प्रवासाने दमली असशील.’’ अब्बू तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाले.

आतल्या खोलीत अम्मी रेहानला जवळ घेऊन पडली होती. तीही अम्मी शेजारी जाऊन आडवी झाली. दमली होती ती पण झोप लागेना. खोलीत चारी बाजूंनी जणू आठवणीचं पेव फुटलं होतं. चांगल्या आठवणी मनाला दिलासा देत होत्या, तर वाईट आठवणींनी मन रक्तबंबाळ होत होतं.

अब्बा सरकारी नोकरीत उच्च पदावर होते. काही वर्षांत त्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली व्हायची. फरहाला त्यामुळे लहान वयातच हॉस्टेलला राहावं लागलं. अब्बू तिच्या शिक्षणाच्या बाबतीत फार दक्ष होते. अम्मी मुळातच नाजूक प्रवृत्तीची होती. तिला फार श्रम झेपत नव्हते. पण अम्मी अब्बूंचं एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं. अब्बा जेव्हा पाटण्याला होते तेव्हा फूफी त्यांच्याकडे राहायला आली होती. तो प्रशस्त बंगला, सुंदर बाग, दिमतीला असणारी खानसामा, माळी, धोबी व इतर गडी माणसं, सरकारी गाड्या, अब्बांचा आदरयुक्त दरारा हे सगळं बघून ती भारावली. तिनं अब्बांचा दुसरा निकाह करण्याचा घाट घातला. ‘‘तुला मुलगा नाही. ही आजारी बायको तुला मुलगा देऊ शकणार नाही. तू दुसरं लग्न कर.’’ तिने अम्मीच्या समोरच अब्बांना सांगितलं तिच्या नात्यातली कोणी नणंद होती. इतर नातलगही फूफीच्याच बाजूचे होते. फार हिमतीनं अब्बूंनी हा प्रसंग निभावून नेला होता. फरहा मोठी झाल्यानंतर केव्हा तरी अम्मीनं हे सगळं तिला सांगितलं होतं. शिकलेल्या अब्बांना जुन्या रूढी आवडत नव्हत्या.

त्यामुळेच फरहाच्या घरातलं वातावरण इतर नातलगांच्या घरापेक्षा वेगळं होतं. अब्बू प्रगतिशील विचारांचे होते. ती एकटीच मुलगी होती तरी त्यांनी तिला उत्तम शिक्षण मिळेल याची व्यवस्था केली होती. तिच्या चुलत, मामे, आते, मावस बहिणीची लग्नं खूपच लवकर झाली. तिच्यापेक्षा धाकट्या बहिणींची लग्न झाली तरी फरहा शिकत होती. ती इंजिनीअर झाल्यावर तिला अब्बूंनी मॅनेजमेंटच्या पदवीला घातलं होतं.

ती इंजिनीअरिंगच्या फायनलला असतानाच एकदा फूफी घरी आली होती. आल्या आल्या तिने अम्मीला फैलावर घेतलं. लेकीचं वय वाढतंय अन् अजून तुम्ही तिच्या लग्नाचं बघत नाहीए. ‘‘भाभीजान मी सांगते तुम्हाला, फरहाला इतकं वय वाढेतो कुवार ठेवलीत, आता तिला मुलगा मिळणारच नाही. आता ओळखीत, नात्यात कुणी मुलगा लग्नाचा उरला नाहीए. भाईजाननाही काही कळत नाही. मुलींना एवढं शिकवायची गरजच काय मी म्हणते? मुलींची लग्न करायला हवीत. माझाच मुलगा आहे लग्नाचा. तुम्ही बघितलात ना? कसा गोरापान आहे. दुबईत पैसा मिळवतोए. फरहानची अन् त्याची जोडी चांगली दिसेल.’’

अम्मी बिचारी नातलगांच्या गराड्यात तशीच भरडून निघायची अन् फूफीच्या ओरडण्यामुळे तिचं बी.पी. अजूनच वाढलं. पण अब्बूंनी हे सगळं ऐकलं आणि फूफीला चांगलंच झापलं.

‘‘रझिया, तू काय विवाह मंडळ चालवतेस की काय? आधी माझ्या लग्नासाठी. आता माझ्या मुलीच्या लग्नासाठी सतत स्थळं आणतेस ती? अगं आपल्या लाडक्या पोरांची काळजी घेतली असतीस तर तुझ्या पोराला दुबईत पेट्रोलपंपावर नोकरी नसती करावी लागली. फरहाचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय तिचं लग्न होणार नाही.’’

बरेच दिवस मुक्काम?ठोकण्याच्या बेताने आलेली फूफी त्याच दिवशी गाशा गुंडाळून निघून गेली.

अशीच विचारात असताना फरहाला केव्हातरी झोप लागली. सकाळी जाग आली. सकाळी सलमाने विचारलं, ‘‘फरहा बाजी. झोप झाली का? चहा आणू?’’ सलमाने चहा आणला अन् तिच्याजवळच बसली. ती खूप लक्षपूर्वक फरहाकडे बघत होती.

‘‘बाजी, तुम्ही आता कुंकू लावता? रोजे ठेवता की नाही? तुमचं नावंही बदललंय का?’’ निरागसपणे सलमाने विचारलं.

‘‘नाही…काल मी काम करून जात होते ना तेव्हा आपल्या मोहोल्ल्यातली माणसं मला विचारत होती. तुम्ही काफिरशी लग्नं केलंत ना?’’

अब्बूने फूफीला परत पाठवलं तरी प्रश्न सुटला नव्हताच. रोजच तिचं शिक्षण आणि वाढतं वय यावर चर्चा व्हायच्या. अब्बूंनी तर हल्ली या घरी येणंही कमीच केलं होतं. भारतातल्या बेस्ट कॉलेजमध्ये ती मॅनेजमेण्टचा अभ्यास करत होती. मुळात या अभ्यासक्रमाला मुली कमीच होत्या. मुस्लिम मुलगी तर ती एकटीच होती. कॉलेजच्या सगळ्याच कार्यक्रमात ती भाग घ्यायची. बक्षिसं मिळवायची. अभ्यासातही ती चांगली असल्याने शिक्षकांचीही लाडकी होती. याच काळात राकेश भेटला. अनेक प्रोजक्ट दोघांनी मिळून पूर्ण केले. त्याची हुशारी, समजूतदारपणा अन् मदत करण्याची वृत्ती यामुळे फरहाला तो आवडू लागला.

इंटर्नशिपनंतर आठ दिवसांनी फरहा घरी आली होती. त्यावेळी अब्बूंचं पोस्टिंग दिल्लीला होतं. अब्बू अम्मी दोघंही आनंदात होती.

‘‘फरहा, आता काही दिवसांत तुझी इंटर्नशिप संपेल. माझे मित्र रहमान यांनी त्यांच्या मुलासाठी तुला मागणी घातली आहे. आम्हाला तो मुलगा व सगळं कुटुंब पसंत आहे. अर्थात्च निर्णय तू घेणार आहेस.’’

त्या एका क्षणात जणू वादळ घोंघावलं. पण स्वत:ला कसंबसं सावरून ती म्हणाली, ‘‘तुमचा निर्णय मला मान्य असेल, अब्बू.’’

‘‘शाब्बास पोरी, माझी लाज राखली. लोक म्हणतात मुली आईबाबांचं ऐकत नाही, पण तू माझं ऐकशील याची मला खात्री होती. मी उद्याच रहमान अन् त्याच्या कुटुंबाला जेवायला बोलावलंय.’’

स्वप्न पडायला सुरुवात झाली नाही तोच झोप मोडली. फरहा रात्रभर रडत होती. तिला जाणवलं की ती अन् राकेश एकत्र येऊ शकणार नाही. दोन समांतर रेषा आहेत. त्या तशाच राहाणार. अब्बूंनी सगळ्या समाजाशी भांडून तिला एवढी शिकवली. आता जर तिने हिंदू मुलाशी लग्न केलं तर लोक कधीच मुलींना शिकू देणार नाहीत. तिला फक्त तिच्यापुरता विचार करून भागणार नाही. हे तिला राकेशला समजावून सांगावं लागेल.

दुसऱ्याच दिवशी रहमान आणि त्यांचे कुटुंबीय घरी आले. फक्त बघण्याचा औपचारिक कार्यक्रम होता तो. बाकी सर्व गोष्टी आधीच ठरवून झाल्या होत्या बहुतेक.

अब्बू अम्मीला सांगत होते. ‘‘समीना, आज मी फरहाच्या बाबतीतलं शेवटचं कर्तव्य पूर्ण केल्याचं समाधान अनुभवतो आहे. खूप आनंद झालाय मला. फरहाची इंटर्नशिप पूर्ण झाल्यावरच आपण तिचा निकाह लावू. त्याचवेळी सगळ्या नातेवाईक व परिचितांनाही सांगू. सध्या कुणाला काहीच सांगायला नकोय.’’

दोन दिवसांनी फरहा आपल्या कॉलेजात आली. तिला राकेशला भेटून खूप रडून घ्यायचं होतं. पण राकेश समोर आला तोच त्रस्त, उदास अन् खूप थकलेला असा दिसला. आपलं दु:ख विसरून फरहा त्याच्या दु:खाबद्दल विचारू लागली.

‘‘फरहा, मी घरी तुझ्याबद्दल बोललो. पण तुझं नाव ऐकताच माझ्या घरात वादळ उठलं. मुस्लिम मुलगी घरात सून म्हणून येणार ही कल्पनाच त्यांच्या पचनी पडत नाहीए. मी सगळ्यांशी खूप भांडून आलोय. फरहाशिवाय मी इतर कोणत्याच मुलीशी लग्न करणार नाही असं सांगून आलोय.’’ राकेशने आपल्या मनातला संताप व्यक्त केल्यावर फरहानेदेखील तिच्या मनातली खळबळ त्याला सांगितलं.

दिवस उलटत होते. राकेश व फरहाला नोकरी दिल्लीतच मिळाली. एक हिंदू मुलगा व एक मुस्लिम मुलगी यांचं लग्न होऊ शकत नाही हे दोघांनीही मान्य केलं होतं.

फरहाच्या निकाहची तारीख नक्की करून गुडगावहून दिल्लीला येत असताना फरहाच्या गाडीला समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिली. फरहा, अब्बा, अम्मी तिघेही जखमी झाले. बेशुद्ध पडण्यापूर्वी फरहाने राकेशला फोन केला.

अम्मी अब्बूच्या जखमा बेतात होत्या. पण फरहाच्या चेहऱ्यात काचा घुसल्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली होती. नाकाचं अन् हनुवटीचं हाड मोडलं होतं. सुर्दैवाने डोळे शाबूत होते. पण सगळा चेहरा बँडेजने झाकला गेला होता.

अपघाताची बातमी कळताच रहमान अन् त्यांचा मुलगा व पत्नीही भेटायला आले. हात व पाय प्लास्टरमध्ये, चेहऱ्यावर भयानक दिसणारं बँडेज बघून रहमानच्या मुलाने डॉक्टरांना तिच्या समोरच विचारलं, ‘‘ही पूर्वीसारखी सुंदर दिसेल ना?’’ डॉक्टर म्हणाले, ‘‘हातपाय तर लवकरच पूर्वीसारखे होतील पण चेहऱ्याचं सांगता येतत नाही. प्लॅस्टिक सर्जरीचा पर्याय अर्थात्च आहे. पण त्याला वेळ लागेल.’’

तो दिवस की आजचा दिवस रहमानकडून कुणीही पुन्हा फिरकलंच नाही. फक्त निकाह होऊ शकत नाही एवढा निरोप फोनवर दिला.

ठरलेलं लग्न मोडलं याचा अम्मी अब्बूला खूपच धक्का बसला. त्यातल्या त्यात एवढंच समाधान होतं की लग्न ठरण्याची बातमी अजून कुणाला कळवली नव्हती. नाही तर लोकांना बोलायला आणखी एक विषय मिळाला असता. तरीही सध्या सगळ्यात महत्त्वाचं होतं फरहाचं पूर्णपणे बरं होणं. या सगळ्या कठीण परिस्थितीत राकेश मात्र पहाडासारखा त्यांच्या पाठीशी होता. हॉस्पिटलमध्ये तिघांना डबे नेऊन देणं, स्वत:चं ऑफिस, अम्मी अब्बूंना सतत धीर देणं, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी चर्चा करणं, सगळ्या जबाबदाऱ्या तो व्यवस्थितपणे पार पाडत होता. घरातलाच एक सदस्य झाला होता.

अम्मी अब्बू पूर्ण बरे झाले होते. खोलीत राकेश अन् फरहा दोघंच होती. सलमा रडत होती. राकेश तिला समजवत होते. ‘‘प्लीज फरहा रडू नकोस…उद्या तुझं बँडेज काढतील. तू धीराने या गोष्टीला सामोरी जा. मी आहे ना तुझ्याबरोबर, तुझ्यासाठी काय वाट्टेल ते करीन मी. ऑफिसातही सगळे तुझी वाट बघताहेत.’’

‘‘पण आता माझ्याशी लग्न कोण करणार? अम्मी अब्बूंना माझ्या लग्नाची काळजी लागलीए.’’ सलमा म्हणाली.

‘‘मी तर कधीचा वाट बघतोय तुझ्याकडून होकाराची. अगं माझ्या आईनेही संमती दिलीए, कुणीशीही कर पण लग्न कर. तुझं बँडेज एकदा निघू दे. मी आईला तुझ्या अम्मीला अब्बूंना भेटायला घेऊन येतो.’’

हळूहळू परिस्थिती निवळत गेली. मोडलेलं नाकाचं हाड व हनुवटीचं हाड शस्त्रक्रियेने पूर्ववत् जुळून आलं. खोल जखमांचे व्रणही हळूहळू जातील, असं डॉक्टर म्हणाले. पण मुख्य म्हणजे फरहा शारीरिक व मानसिकदृष्ट्या सावरली होती. राकेशच्या घरच्यांनी तिचं मनापासून स्वागत केलं. निकाहची जी तारीख ठरवून फरहा गुडगावहून आली होती त्याच दिवशी रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये नोंदणी पद्धतीने राकेश व फरहाचं लग्न झालं. सुरेख रिसेप्शन झालं. दोन्हीकडची फारच कमी माणसं आली पण मित्र, कलीज अशी खूप मंडळी अभिनंदनासाठी आली होती. लग्नांनतर काही दिवसातच राकेशला कंपनीने सिडनीला पाठवलं. फरहाही गेली. तिथे त्यांचं छान बस्तान झालं.

फरहाच्या लग्नानंतर अब्बू अम्मी एकदा आपल्या घरी गेले होते. त्यावेळी लोकांनी त्यांना खूपच टोचून बोलून घेतलं. मोहल्ल्यातल्या वयस्कर माणसांनी भरपूर दम दिला. रात्री तर घरावर दगडफेकही झाली. पोलीस बोलावून त्यांच्या संरक्षणात अम्मी अब्बू स्टेशनवर पोहोचले.

अब्बूंची फोनवर कुणाशी तरी बातचीत सुरू होती. त्यांनी फोन ठेवल्यावर फरहाने विचारलं, ‘‘अब्बू, कुणाशी बोलत होता?’’

‘‘अगं, तुझी फूफी होती. बिचारी मदत मागायला येते माझ्याकडे. मुलं तर नालायक निघाली. कुणी तुरुंगात तर कुणी बेपत्ता आहे. बिच्चारी! उपासमारीने मरायची पाळी आलीय तिच्यावर’’ अब्बा म्हणाले.

‘‘फरहा, त्या रात्री हिनेच हिच्या त्या दिवट्या मुलांकरवी अन् त्यांच्या भाडोत्री गुंडाकरवी आपल्या घरावर दगडफेक केली होती. तिच्या मुलाशी आम्ही तुझं लग्न करून दिलं नाही ना? त्या रागाने तिने सगळ्या गावातल्या लोकांनाही आमच्याविरूद्ध भडकवलं होतं. तू राकेशशी लग्न केलं. एका हिंदू मुलाशी लग्न केलं याचाही खूप अपप्रचार केला होता तिने.’’ अम्मा म्हणाली, मग तिने हसत म्हटलं, ‘‘बर का, ही सलमा यंदा दहावीची परीक्षा देतेय. तिची इच्छा आहे तुझ्यासारखी इंजिनीअर अन् एम.बी.ए करण्याची.’’

फरहाने सलमाकडे बघितलं. सलमा म्हणाली, ‘‘मीच फक्त नाही हं फरहाबाजी, आता तर या शहरातल्या सगळ्याच मुलींना तुमच्यासारखं व्हायचंय.’’

‘‘खरंच?’’

‘‘हो ना, पण सगळ्यांचे अब्बू तुमच्या अब्बूसारखे अन् अम्मी तुमच्या अम्मीसारख्या असायला हव्या ना? मला तर आहे आधार या अम्मी अब्बूंचा,’’ म्हणत सलमाने फरहाला मिठी मारली.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...