कथा * दीपा पांडे

लग्न समारंभ एका देखण्या अन् प्रशस्त लॉनवर आयोजित केला होता. सजावट बघणाऱ्याचं मन मोहून घेत होती. काही पोरं डीजेच्या गाण्यावर नाचत होती. अजून रिसेप्शन सुरू व्हायला अवकाश होता. सगळी व्यवस्था उत्तम होती.

खुर्चीवर बसलेल्या एका स्त्रीकडे थोड्या अंतरावरून टक लावून सीमा बघत होती. सतत बघितल्यानंतरही जेव्हा त्या स्त्रीनं काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही तेव्हा सीमा स्वत:च उठून तिच्या जवळ गेली. ‘‘तू तू रागिणीच आहेस ना? रागिणी, मी सीमा. तू ओळखलं नाहीस मला? अंग मघापासून तुझ्याकडे बघतेय मी…पण तू ओळख दाखवली नाहीस…मग म्हटलं आपणच ओळख द्यावी…किती वर्ष झालीत गं आपल्याला दुरावून?’’ सीमानं तिला गदागदा हलवलं अन् मिठी मारली.

रागिणी जणू झोपेतून जागी झाली. तिनं आधी डोळे भरून सीमाकडे बघितलं अन् एकदम आनंदानं चित्कारली, ‘‘सीमा…मला सोडून का गं निघून गेलीस? तू नसल्यामुळे मला किती एकटं वाटत होतं.’’ रागिणीनं आता सीमाला मिठी मारली. दोघींचे डोळे पाणावले.

‘‘तू इथं कशी?’’ सीमानं विचारलं.

‘‘अगं नवरीमुलगी माझी चुलत बहीण आहे. तुला आठवतं का? ती उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्याकडे यायची. लिंबूटिंबू म्हणून आपण तिला आपल्यात खेळायला घेत नसू, कारण वयानं ती आपल्यापेक्षा बरीच लहान होती.’’ सीमा हसून म्हणाली.

‘‘हो, हो…आठवतंय मला.’’ मेंदूला ताण देत रागिणी म्हणाली.

मग वरात येईपर्यंत त्या दोघींची गप्पा खूपच रंगल्या. शिक्षण, जुन्या मैत्रिणी, शॉपिंग, सिनेमा, नाटक कित्तीतरी विषय होते. रागिणी तर किती तरी दिवसांनी इतकी बोलत होती. बालपणाची मैत्री मोठं झाल्यावरही निरागसता जपत असते. तिच्यात औपचारिकपणा अजिबात नसतो.

तेवढ्यात एकदम गडबड उडाली…चार वर्षांची एक मुलगी दिसेनाशी झाली होती. सगळेच धावपळ करत होते. व्हॉट्सअॅप करून तिचे फोटे पाठवले गेले. कुणी तरी पोलिसांना फोन केला. लग्न जिथे होतं ते एक भलं मोठं फार्म हाऊस होतं. व्यवस्था उत्तम होती पण लहान मुलगी दिसेनाशी होणं काळजी निर्माण करणारं होतं.

अर्धा तास हुडकल्यावर ती सापडली. जिथं खेड्यातला सेट लावला होता तिथं पाट्यावर चटणी वाटणाऱ्या बाईशी गप्पा मारत होती. रागिणीनीच तिला हुडकून आणली होती. सगळ्यांनी तिचं कौतुक केलं, आभार मानले. त्या मुलीची तरूण आई मैत्रिणींसोबत डीजेच्या तालावर नाचण्यात मग्न होती. कधी मुलगी तिथून निसटली ते तिला कळलंच नाही. आजीला जेव्हा नात दिसेना तेव्हा तिनं हळकल्लोळ माजवला. मुलगी तर मिळाली. सासूनं सुनेचा सगळ्यांसमोर उद्धार केला. थोड्याच वेळात सर्व स्थिर स्थावर झालं.

लोक खाण्यापिम्यात मग्न झाले. सीमा व रागिणी पुन्हा आपल्या खुर्च्यांवर येऊन बसल्या. ‘‘तुझे डोळे खूपच तीक्ष्ण आहेत हं! पोरीला बरोबर हुडकून काढलंस.’’ सीमानं म्हटलं.

रागिणी उदासपणे म्हणाली, ‘‘तिला शोधू शकले नसते तर पार वेडी झाले असते. अर्धी वेडी तर आत्ताच आहे ती.’’

‘‘उगीच काही तरी बोलू नकोस. तुला वेडी कोण म्हणेल? अंगावरचे हिऱ्याचे दागिने, एवढी महागडी साडी, असा स्टायलिश अंबाडा अन् इतका सुंदर चेहरा…अशी वेडी आजपर्यंत कुणी बघितली नसेल…’’ सीमा हसत म्हणाली.

‘‘ज्याचं जळंतं, त्यालाच कळंतं…माझी वेदना तुला नाही कळायची.’’ रागिणी रडू आवरत म्हणाली.

‘‘असं कोणतं दु:ख, व्यथा, वेदना आहेत तुझ्या ज्याच्या ओझ्यानं तू वेडी झाली आहेस? प्रतिष्ठित घराण्यातली सून, उच्चपदस्थ इंजिनियर नवरा, भरपूर पैसा-अडका…अजून काय हवंय?’’ सीमानं विचारलं.

‘‘सोड गं! तुला नाहीच समजायचं.’’ टोमणा मारत रागिणी म्हणाली.

‘‘मी? मला नाही समजायचं? अन् तुला मी किती समजले आहे गं? काय ठाऊक आहे तुला माझ्या आयुष्यातलं? आज दहा वर्षांनी भेटतोय आपण, या दहा वर्षात किती काय घडून गेलंय हे तुला ठाऊक आहे.’’

सीमा एकाएकी भडकली. ‘‘तुला काय वाटतं? माझ्या आयुष्यात काही दु:ख, ताणतणाव आलेच नाहीत? तरीही मी तुझ्या समोर अगदी खंबीरपणे उभी आहे. एकच सांगते. भूतकाळापासून धडा घ्यायचा. भविष्यकाळाची स्वप्नं रंगवायची अन् वर्तमानकाळात अगदी मजेत, आत्मविश्वासानं जगायचं हे ध्येय बाळगलंय मी. भूतकाळातल्या वेदनादायक घटना दु:स्वप्नं समजून विसरायच्या. उगीच त्यांचं ओझं घेत आपलं आयुष्य का म्हणून कुस्करायचं? सीमाचा चेहरा लाल लाल झाला होता.’’

रागिणीनं सीमाचा हात घट्ट धरला…‘‘तुझ्यावरही कधी कुणी बलात्कार केला होता?’’ तिनं विचारलं.

सीमा दचकली…‘‘तुझ्यावरहीचा काय अर्थ? तुझ्या बाबतीतही असं घडलंय का?’’ तिनं रागिणीच्या हातावर थोपटत म्हटलं.

‘‘हो ना गं! ते क्षण माझा पिच्छा सोडत नाहीएत. वर्तमानपत्रातल्या बातम्या, सिरियल्स, सिनेमा, नाटक कुठंही काही ऐकलं, वाचलं, बघितलं की मला तो प्रसंग आठवतो. प्रचंड घाम फुटतो, रडू येतं. माझी तहानभूक हरपते. असं वाटतं…असं वाटतं, त्या नराधमाचा जीव घ्यावा, नाहीतर आपण तरी मरूण जावं…अशावेळी औषधांची मदत होते, गोळ्या घेते अन् झोपून जाते. मग मला काहीही कळंत नाही. माझ्या सासूबाई, मोलकरणीच्या मदतीनं घर चालवताता. अन् सतत माझ्या नावानं शंख करतात की त्यांच्या लाख मोलाच्या हिऱ्यासारख्या मुलाची फसवणूक झाली. इतक्या छान छान मुली सांगून येत होत्या आम्ही हिच्या सौंदर्यावर भाळलो…अशी आजारी मुलगी आमच्या नशिबी आली. माझा नवरा खूप खूप चांगला आहे गं…पण मीच कमी पडले…मी तरी काय करू?’’ रागिणीला अश्रू अनावर झाले.

सीमानं तिला जवळ घेतलं. तिला शांत करत ती म्हणाली, ‘‘अशा प्रसंगातून जाणारी तू एकटीच नाहीएस रागिणी, अगं इथं या ठिकाणीसुद्धा अशा कित्येकजणी असतील ज्यांच्यावर असा प्रसंग आला असेल. पण त्या कुणीच झोपेच्या गोळ्या घेऊन जगत नाहीत. तो एक अपघात होता असं मानून आपण पुढे जायचं. असं बघ तू व्यवस्थित रस्त्याच्या डाव्या बाजूनं चालते आहेस अन् समोरून येऊन कुणी तुझ्यावर धडकला तर चूक त्याची आहे ना? राँग साइडनं तो आला, तुझी काय चूक? ज्यानं आमच्यावर बलात्कार केला, माणूसकीचा विश्वासघात केला तो दोषी आहे…आपण नाही, आपण निर्दोष आहोत. शुद्ध आणि स्वच्छ आहोत. अपराध त्यानं केलाय, त्यानं जळतकुठत आयुष्य काढायला हवं…आपण का म्हणून तोंड लपवून जगायचं? उलट त्यांनाच लाजीरवाणं वाटेल अशा तऱ्हेनं त्यांना अद्दल घडवायची. अशी चूक पुन्हा ते करणार नाहीत असा दम त्यांना द्यायचा…’’ सीमा अगदी पोटतिडकीनं अन् आत्मविश्वासानं बोलत होती.

‘‘तूं केलंस असं?’’ रागिणीनं विचारलं.

‘‘माझा तर चांगला मित्रच माझा वैरी झाला होता. दहा वर्षांपूर्वी जेव्हा बाबांची बदली दिल्लीला झाली, तेव्हाच आपली ताटातूट झाली. तुझी उणीव खूप जाणवायची पण नवं शहर, नवी शाळा. नवं वातावरण यामुळे मी खूप उत्तेजित आणि उत्साहित होते. लवकरच मी वर्गातली हुषार आणि अष्टपैलू विद्यार्थिनी म्हणून आपला ठसा उमटवला.

‘‘माझ्या वर्गातला ध्रुव जो आत्तापर्यंत पहिला येत असे, तो दुसऱ्या क्रमांकावर गेला. मनांतून तो माझ्यावर डूख धरून होता पण वरकणी मात्र मैत्री ठेवून होता. मला मात्र याची कल्पनाच नव्हती. दहावी बोर्डात मी टॉप केलं त्यामुळे तो अधिकच बिथरला अन् बारावीतही प्रिलिम्समध्ये टॉप केलं तेव्हा तर तो अपमानानं अन् संतापानं पेटून उठला. वरकरणी तोंड भरून माझं अभिनंदन केलं अन् मला स्पेशल ट्रीट म्हणून हॉटेलात लंचला नेलं. आमचा मित्रमैत्रिणींचा ग्रुप होता. आम्ही नेहमीच वाढदिवस किंवा इतर काही सेलिब्रेशन्स म्हणून एका ठराविक रेस्टॉरंटमध्ये जात होतो. यावेळी मात्र आम्ही दोघंच होतो. ध्रुववर अविश्वास करण्याचा प्रश्नच नव्हता.’’

जेवताना त्यानं म्हटलं, ‘‘आज वेळ आहे तेव्हा माझ्या घरी येतेस का? आईला तुला भेटायचं. पहिली येणारी मुलगी कशी असते ते बघायचंय.’’

मला गंमत वाटली. त्याच्या आईला भेटायला नाही कशाला म्हणायचं? जेवण करून आम्ही त्याच्या घरी गेलो. घराचं कुलुप त्यानं खिशातून किल्ली काढून उघडलं तेव्हा मला नवल वाटलं पण तो म्हणाला, ‘‘तू घरात थांब, आई शेजारी गेली असेल. मी तिला बोलावून आणतो.’’

त्यानं फ्रिजमधून ऑरेंजची बाटली काढून मला दिली व तो निघून गेला. पोटभर जेवण झालं होतं. ऑरेंज पिऊन संपवताच मला झोप आली. नकळत मी सोफ्यावर आडवी झाले.

जागी झाले तेव्हा माझ्या लक्षात आलं ध्रुवनं मला फसवलं आहे. मला लुटलं आहे. तो दारूच्या नशेत बरळंत होता, ‘‘मला हरवतेस का? बघ, आज तुला हरवलंय…आता मिरवून दाखव आपली मिजास…’’ मी खाडकन् भानावर आले. स्वत:चे कपडे नीट केले. हॉलमध्येच पडलेली हॉकी स्टिक उचलून त्याच्या नाजुक अंगावर फटका मारला. तो वेदनेनं विव्हळू लागला. आणखी एक फटका देत मी ओरडले, ‘‘आता दाखव आपली मर्दानगी.’’ सरळ घरी आले.

प्रिलिम्समध्ये टॉप केलं होतं. आता बारावी बोर्डात टॉप करायचं होतं. सगळं काही विसरून सगळं लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित केलं. बोर्डात पहिली आले.

ध्रुवनं तर शाळेत येणं बंदच केलं. बहुधा ते कुटुंब दिल्ली सोडून कुठं तरी गेलं असावं. पण त्यानंतर ध्रुवचा विषय संपला. सीमा काही क्षण थांबली. पाण्याचा ट्रे घेऊन फिरणाऱ्या बेयराकडून तिनं पाण्याचा ग्लास घेतला व घटाघटा पाणी पिऊन रिकामा ग्लास त्याला परत करून ती पुन्हा रागिणीकडे वळली.

आईला जेव्हा मी या घटनेबद्दल सांगितलं तेव्हा तिनं मला समजावलं की, ‘‘ही घटना विसर…यात तुझा काही दोष नाही. कौमार्य, स्त्रीत्त्व, पावित्र्य वगैरे सर्व पोकळ कल्पना असतात. तू आजही आधी होतीस तशीच आहेस. आईच्या त्या शब्दांनी माझ्या मनांतली अपराधीपणाची भावना नाहीशी झाली. त्या आधारावर मी पुढे जात राहिले. कधीच मागे वळून बघितलं नाही.’’ सीमा म्हणाली.

‘‘मी तर माझा भूतकाळ विसरू शकत नाही. कारण माझ्या माहेरच्या घराशेजारी राहतो तो हलकट, पाजी माणूस. मी तर माहेरी जाणंही बंद केलंय,’’ रागिणीचे डोळे पुन्हा अश्रूंनी डबडबले.

‘‘तू त्या चॉकलेट काकांबद्दल म्हणतेस का? त्यांनी केलं असं? मला आठवताहेत ते. पांढरा लेंगा झब्बा घालून असायचे. आपण बॅडमिंटन खेळत असताना मध्येच येऊन असा शॉट मारा, अशी रॅकेट धरा वगैरे शिकवायचे अन् खिशातून चॉकलेट काढून द्यायचे. मुलांनी त्यांचं नावच चॉकलेट काका ठेवलं होतं.’’

‘‘तो मुखवटा होत गं! कौतुक करण्याच्या बहाण्यानं किती जोरात गालगुच्चे घ्यायचे…अन् रॅकेट अशी धरा म्हणत हात दाबून धरायचे…मला त्यांचा राग यायचा पण सांगणार कोणाला? तू गेल्यावर तर मी एकटी पडले.’’

‘‘तू गेल्यानंतर महिन्याभरातच ते घडलं. आईनं उकडीचे मोदक केले होते ते शेजारी देऊन ये म्हणून सांगितलं. माझ्या आईला तरतऱ्हेचे पदार्थ बनवून आळीत सर्वांना वाटायला फार आवडायचं अन् मग स्वत:च्या सुग्रणपणाचं कौतुक ऐकणं हा तिचा छंद होता. तिला जणू नशा चढायची स्वत:च्या कौतुकाची.’’

‘‘त्या दिवशी काकू घरी नव्हत्या. काका खोटं बोलले, ‘ती स्वयंपाकघरात आहे’ म्हणून मी स्वयंपाक घरात जाताच त्यांनी माझ्यावर झडप घातली. आज तुला एक मजेदार खेळ सांगतो म्हणाले…मला काहीच कळेना. तोंडातून शब्द फुटत नव्हता. माझा प्रतिकार दुबळा ठरत होता. शेवटी एकदाचा तो खेळ संपला. त्यांनी कपाटातून रिवॉल्वर काढलं अन् माझ्या कपाळावर टेकवून धमकी दिली, यातलं एकही अक्षरही बाहेर काढलं तरी तुझ्या आईवडिलांना मारून टाकेन.’’

शारीरिक, मानसिक वेदना सोसत, उद्ध्वस्त होऊन मी घरी आले. हॉलमध्ये भिशीच्या मैत्रिणी मोदकांवर तुटून पडल्या होत्या. मनसोक्त चरत होत्या. आईचे गोडवे गात होत्या. अन् मी माझ्या खोलीचं दार बंद करून ओक्साबोक्शी रडत होते. मला माझ्या शरीराची किळस वाटत होती.

या सर्व प्रकाराचा प्रचंड परिणाम माझ्या मनांवर झाला होता. आईला काही सांगायचा प्रयत्न केला पण ती काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. मी अगदी एकाकी पडले. माझं हसणं, बोलणं, मैत्रिणींकडे जाणं एवढंच काय अभ्यास करणंही थांबलं…परिणाम म्हणजे मी दहावीला चक्क नापास झाले. त्यावरूनही आईनं खूप म्हणजे खूपच ऐकवलं. मी झोपले तर चोवीस तास झोपून रहायची. दोन दोन दिवस जेवत नव्हते. कुठे तरी नजर लावून बसायची. घरातल्यांना वाटलं मला नापास होण्याचा धक्का बसला आहे. ‘हिला मनोरोगतज्ज्ञ डॉक्टरांकडे नेऊन आणा.’ कुणीतरी सुचवलं. मानसिक रूग्णाचा शिक्का बसणं तर आईला अजिबातच सहन होईना. शेवटी एकदाची त्या डॉक्टरकडे गेले.

तीन चार सीटिंगनंतर मी तिच्याशी थोडं थोडं बोलू लागले. माझ्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल तिला सांगितलं. तिनं आईला बोलावून घेतलं. आईची समजूत घालायचा प्रयत्न केला पण ती ऐकूनच घेईना. थयथयाट केला. ‘‘स्वत: अभ्यास केला नाही, दुसऱ्याला दोष देतेय. आधीच नापास होऊन अन् मनोरूग्ण होऊन आमचं नाक कापलं. समाजात पत राहिली नाही, आता आणि शेजाऱ्यांशी वितुष्ट घ्यायचं का? इतकी वर्षं शेजारी राहतोय आम्ही…’’ इतक्या थयथयाटानंतर मी गप्पच झाले.

त्यानंतर मी गप्पच झाले. हे स्थळ आलं. माझ्या रूपामुळे लग्न झालं…नवरा खूप समजूतदार अन् प्रेमळ आहे पण मी त्यालाही न्याय देऊ शकले नाही. मन सतत आक्रंदन करतं, त्याला न्याय हवाय, तो ताण सहन झाला नाही की मन शांत करण्यासाठी गोळी घेते अन् त्या गुंगीत तासन् तास पडून राहते. तूच सांग काय करू मी? आहे का काही उपाय?

तिचे हात आपल्या हातात घेत सीमानं आत्मविश्वासानं म्हटंल, ‘‘उपाय आहे. शोधला की सापडतो. आता मी इथं आलेय ना, लवकरच आपण तुझ्या माहेरी जाण्याचा कार्यक्रम ठरवू. मुद्दाम त्या चॉकलेट कांकाच्या घरी जाऊ. बलात्कारावर बोलू. बलात्काऱ्यांना खूप शिव्या देऊ अन् त्या काकूंसमोरच त्या हलकटाचा मुखवटा ओढून काढू. मग बघ, त्याची काय अन् कशी दैना होते ती. काकूही लाटण्यानं बदडतील त्याला. आता म्हातारपणी ती बाई त्याची सेवा करणार नाही. तो म्हातारा तुझ्या पायावर लोटांगण घालून क्षमा मागेल, मी सांगते.’’ सीमाचा आत्मविश्वास व तिच्या हातातून जाणवणारा आधार यामुळे रागिणीही तणावमुक्त झाली. नकळंत तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. त्याचवेळी तिचा नवरा रमण तिथं आला. रागिणीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, ‘‘बालपणीची मैत्रीण भेटली अन् तू एकदम बदललीस…’’

आपल्या हातातले रागिणीचे हात रमणच्या हातात देत सीमानं म्हटलं, ‘‘भावजी, आता ही कायम अशीच आनंदी राहील, बघाल तुम्ही..आता तिची काळजी सोडा…मी आले आहे ना आता तिला आधार द्यायला, तिच्या मदतीला…खरं ना रागिणी?’’

गोड हसून रागिणीनं मान डोलावली.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...