कथा *प्राची भारद्वाज

संध्याकाळ व्हायला आली तशी दीपिकानं पलंगावरच्या चादरी, उशा वगैरे आवरायला सुरूवात केली. तिचे रेशमी सोनेरी केस वारंवार तिच्या गुलाबी गालावर रूळायला बघत होते अन् आपल्या नाजूक लांबसडक बोटांनी ती पुन:पुन्हा त्यांना मागे सारत होती.

‘‘आता ऊठ ना, मला चादर बदलायची आहे.’’ दीपिकानं संतोषला हलवत म्हटलं. तो अजूनही आरामात बेडवर लोळत होता.

‘‘का पुन:पुन्हा त्या बटा मागे ढकलते आहेस? छान दिसताहेत तुझ्या सुंदर चेहऱ्यावर…जणू ढगात लपलेला चंद्र…’’ संतोषने म्हटलं.

‘‘सायंकाळ व्हायला आलीय. आता या ढगांना घरी हाकललं नाही तर तुझ्या चंद्रालाच घराबाहेरचा रस्ता धरावा लागेल. कळलं का?’’

‘‘तू घाबरतेस कशाला? तुला घरंही आहेत अन् घरी घेऊन जायला तत्पर असणारेही आहेत. ज्या दिवशी तू होकार देशील त्याच दिवशी मी…’’

‘‘पुरे पुरे…मी होकार दिलाच आहे ना? आता निघ तू…उद्या येतीलच थोड्या वेळात, तोवर मला हे सर्व आवरायला हवं.’’ दीपिका भराभर आवरत म्हणाली. चादरी, उशा सर्व व्यवस्थित ठेवून, इतर सर्व गोष्टी नीटनेटक्या केल्यावर तिनं विचारलं, ‘‘उद्या कधी येणार गुरूदेव?’’

‘‘असाच बाराच्या सुमाराला.’’ संतोषनं म्हटलं.

तो जरा तक्रारीच्या सुरात पुढे म्हणाला, ‘‘हे असं चोरून भेटणं मला अजिबात आवडत नाहीए. असं वाटतं आपण प्रेम नाही, गुन्हा करतोय…अपराध केल्यासारखं वाटतं.’’

‘‘गुन्हा तर करतोच आहोत संतोष…आपलं लग्न झालेलं असतं तर गोष्ट वेगळी होती…पण मी आता उदयची पत्नी आहे. तू माझ्या घरी मला संगीत शिकवायला म्युझिक टीचर म्हणून येतो आहेस. अशा परिस्थितीत आपल हे नातं म्हणजे गुन्हाच ठरतो ना?’’

‘‘का बरं? आधी आपलं दोघांचं प्रेम होतंच ना? उदय तर तुझ्या आयुष्यात नंतर आलाय. तुझ्या अन् माझ्या घरच्यांनी हे जाती पर जातीचं प्रस्थ माजवलं नसतं, आपल्या लग्नाला विरोध न करता लग्न लावून दिलं असतं तर? पण त्यांनी अगदी घाई घाईनं तुझं लग्न दुसरीकडे लावून टाकलं.’’

‘‘सोड त्या जुन्या गोष्टी. या दुसऱ्या शहरात येऊनही आपण दोघं पुन्हा भेटलो. माझ्या मनांतलं तुझ्या विषयीचं प्रेम बहुधा नियतीलाही हवं असावं. म्हणूनच आपली पुन्हा गाठ पडली.’’ दीपिकानं विषय संपवला.

उदय व दिपिकाच्या लग्नाला आता दोन वर्षं होऊन गेली होती. सुरूवातीला दीपिका खूपच कष्टी अन् उदास असायची. उदयला वाटे नवं लग्न, नवी माणसं, नवं शहर यामुळे ती अजून स्वत:ला अॅडजेस्ट करू शकली नाहीए…हळूहळू रूळेल. पण खरं कारण वेगळंच होतं. संतोष, तिचं पहिलं प्रेम तिच्यापासून दुरावल्यामुळे ती दु:खी होती. एकदा ती व संतोष सिनेमा बघून हातात हात घालून घरी परतत असताना तिच्या थोरल्या भावानं बघितलं. दीपिकावर जणू वीज कोसळली. त्यानं तिथूनच तिला धरून ओढत घरी आणून तिच्या खोलीत कोंडून घातलं. कुणी तिला भेटणार नाही, ती कुणाला भेटू शकणार नाही…त्या खोलीतच तिनं रहायचं. दीपिकानं अन्न सत्याग्रह पुकारला. पण कोणीही दखल घेतली नाही. शेवटी तीन दिवसांनी भूक असह्य झाल्यावर तिनं मुकाट्यानं शरणागती पत्करली. संतोषला भेटावं कसं ते कळत नव्हतं. घरातलं वातावरण फार जुनाट विचारांचं. त्यातून संतोषची जातही वेगळी होती.

‘‘त्या मुलाचा जीव वाचावा असं वाटंत असेल तर त्याचा नाद सोड.’’ भावानं तिला बजावलं होतं. ‘‘बाबा, तुम्ही फक्त आदेश द्या, त्या हलकटाच्या देहाचा तुकडासुद्धा कुणाला सापडणार नाही असा धडा शिकवतो.’’

‘‘मला तर वाटतंय या निर्लज्ज पोरीलाच विष देऊन ठार करावं,’’ ही अन् अशीच वाक्यं तिला सतत ऐकवली जात होती. ती खूप घाबरली नर्व्हस झाली. अन् पंधरा दिवसात घरच्यांनी दूरच्या शहरात राहणाऱ्या उदयशी तिचं लग्न लावूनही टाकलं. दीपिका जणू बधीर झाली होती. होणारा नवरा, पुढलं आयुष्य कशा विषयीच तिला जाणून घ्यावंसं वाटलं नाही. लग्नातही ती मुकाटपणे सांगितलेले विधी करत होती. सासरी सासू, सासरे, दीर, नणंद वगैरे सर्व होते, पण ती वेगळ्या ठिकाणी राहत होती. इथं फक्त उदय अन् तीच राहणार होते.

खरं तर उदय खूपच सज्जन आणि प्रेमळ तरूण होता. निरोगी, निर्व्यसनी, शिकलेला, उत्तम पगार मिळवणारा…सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायकोला समजून घेणारा होता. कुणाही मुलीला अभिमान वाटेल असा नवरा होता तो. पहिल्या रात्री दीपिकेचा उदास चेहरा बघून त्यानं तिला अजिबात त्रास दिला नाही. नव्या ठिकाणी नव्या नवरीला रूळायला थोडा वेळ हवाच असतो. हळू हळू ती मोकळी होईल हे त्यानं समजून घेतलं.

काही दिवसानंतर दीपिकेनंही तडजोड करायची असं ठरवलं. नव्या जागी, नव्या संसारात, नव्या नात्यात रमायला तिला जमू लागलं. तशी ती गृहकृत्य दक्ष होतीच.

एकदा सायंकाळी घरात एक पार्टी होती. उदयचे काही मित्र त्यांच्या बायकोसह आले होते. घरात काम करताना उदयनं दीपिकेला गाणं गुणगुणताना ऐकलं होतं. एक दोघांनी गाणं म्हटल्यावर कुणीतरी दीपिकेलाही गाणं म्हणायचा आग्रह केला. दीपिकेनं गाणं म्हटलं अन् टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळेच तिच्या सुरेल आवाजावर अन् तिच्या गाण्याच्या पद्धतीवर खुश द्ब्राले. उदयनं म्हटलंही, ‘‘माझी बायको इतकं छान गाते हे मला कुणी सांगितलंच नव्हतं. आज कळतंय मला.’’ उदयला तर बायकोचं किती अन् कसं कौतुक करू तेच समजेना.

सगळी मंडळी निघून गेल्यावर उदयनं दीपिकेला म्हटलं, ‘‘तू खरं म्हणजे गाणं शिकायला हवं. तुझी कला वाढीस लागेल. तुला जीव रमवायला एक साधनही मिळेल…’’

दीपिका गप्प बसली तरी उदयनं एका चांगल्या नवऱ्याचं कर्तव्य पूर्ण करत इकडे तिकडे चौकशी करून तिच्यासाठी एक संगीत शिक्षक शोधून काढला. ‘‘आजपासून हे तुला गाणं शिकवायला येतील.’’ त्यानं सांगितलं.

संतोषला संगीत शिक्षक म्हणून समोर बघून दीपिका चकितच झाली. उदयनं दोघांची ओळख करून दिली. अन् ‘ऑल द बेस्ट’ म्हणून तो ऑफिसला निघून गेला.

उदय गेल्यावर दीपिका पहिलं वाक्यं बोलली, ‘‘तू इथं कसा? माझा पाठलाग करत इथवर आलास?’’

‘‘नाही दीपू, मी तुझ्या मागावर नव्हतो, मी तर या शहरात नोकरी शोधत आलोय. कुणीतरी मला या घराचा पत्ता दिला. इथं संगीत शिक्षक हवाय म्हणून मी इथं आलो.’’

‘‘मला दीपू म्हणू नकोस. माझं लग्न झालंय आता संतोष, तुझ्या दृष्टीनं मी दुसऱ्या कुणाची पत्नी आहे.’’

नियतीचा खेळच म्हणायचा, पुन्हा दीपिका व संतोष समोरासमार आले होते. दोघंही एकमेकांना विसरून नव्यानं आयुष्य सुरू करत होते अन् पुन्हा ही भेट झाली.

‘‘दीपू, सॉरी, दीपिका, मला इथं शिकवणीसाठी येऊ दे. मला पैशांची, नोकरीची गरज आहे. या ट्यूशनमुळे अजूनही एक दोन लोकांकडून बोलावणं येईल असं मला त्यांनी सांगितलंय…त्यांनी म्हणजे ज्यांनी तुझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल सांगितलं…त्यांनी. उदयसमोर मी आपलं गत काळातलं नातं कधीही उघड करणार नाही असं वचन देतो मी तुला.’’ यावर दीपिकाला काही बोलता आलं नाही. काही काळातच दोघांमधला दुरावा नाहीसा झाला. हसणं, बोलणं, चेष्टा मस्करी, गाण्याचा रियाज सर्व सुरू झालं.

दुसऱ्या दिवशी रियाज आटोपल्यावर दीपिकेनं संतोषला म्हटलं, ‘‘आपल्या भूतकाळाचा विचार करून दु:खी होण्यात काय अर्थ आहे. यापुढील आयुष्याचा विचार केला पाहिजे. त्यातच शहाणपणा आहे.’’ संतोषचा दुर्मुखलेला चेहरा बघून तिला वाईट वाटत होतं.

‘‘तुला कळायचं नाही दीपिका…दुसऱ्या कुणाची पत्नी म्हणून तुझ्याकडे बघताना मला काय वाटतं ते कसं सांगू. तू माझी होतीस अन् आता…’’ बोलता बोलता संतोषनं दीपिकाचे दंड दोन्ही हातांनी घट्ट धरले.

त्यानंतर दीपिका एकदम आनंदात असायची. घर आता अधिक टापटीप असायचं, जेवायला नवीन चविष्ट पदार्थ बनवले जायचे. एकूणच तिची पूर्वीची उदासीनता, गप्प असणं…सगळंच बदललं होतं. उदयला वाटे, तिला तिच्या आवडीचे संगीत शिक्षण घेता येतंय, यामुळेच ती आनंदात आहे.

दीपिका आकाशी निळ्या रंगाचं स्वेटर विणत होती. तो प्रसन्न रंग अन् त्यावर घातलेली ती सुंदर आकर्षक नक्षी बघून उदयनं म्हटलं, ‘‘माझ्यासाठीही असं सुंदर, याच रंगाचं, याच डिझाइनचं स्वेटर करून दे ना.’’

‘‘पुढचं स्वेटर तुमच्यासाठीच विणेन. हे मी माझ्या चुलत भावासाठी विणतेय. पुढल्याच महिन्यांत त्याचा वाढदिवस आहे ना?’’

‘‘तर मग तू माहेरी जाऊन ये ना, गेलीच नाहीएस तू खूप दिवसांत.’’

‘‘नाही हो, मला नाही जायचंय…तुमच्या जेवणाची आबाळ होते ना मग?’’

‘‘अगं, मी काही कुक्कुळं बाळ नाहीए, इतकी काळजी का करतेस? अन् माहेरी जायला तर सगळ्याच मुलींना आवडतं. तू बिनधास्त जा…सगळ्यांना भेट. त्यांनाही बरं वाटेल. मी माझी काळजी घेईन. तू अगदी निशिचंत रहा.’’ उदयनं तिला आश्वस्त केलं. दीपिकेला त्यानंतर नाही म्हणता आलं नाही.

‘‘आता कसं करायचं? चार दिवस मी माहेरी गेले तर आपली भेट कशी होणार? त्या शहरात भेटणं तर केवळ अशक्य आहे. तिथं सगळेच आपल्याला ओळखतात.’’ दीपिकेनं संतोषला अडचण सांगितली. तिचं आज गाण्यातही लक्ष लागत नव्हतं.

‘‘तू काळजी करू नकोस. तुला भेटल्याशिवाय मी तरी कुठं राहू शकतो? काहीतरी युक्ती करावी लागेल. बघूयात काय करता येतंय…’’ संतोषनं थोडा विचार करून एक योजना सांगितली, ‘‘तू इथून ट्रेननं निघ. पुढल्याच स्टेशनवर मी तुला भेटतो. आपण त्याच शहरात हॉटेलात चार दिवस राहू. तूच उदयला फोन करत राहा. खोलीच्या बाहेर पडलोच नाही तर आपल्याला कुणी बघणारही नाही.’’ बोलता बोलता संतोषचे हात दीपिकेच्या शरीरावर खेळू लागले होते.

उदयनं दीपिकेला ट्रेनमध्ये बसवलं. त्याला बाय करून तिनं निरोप दिला. पुढल्याच स्टेशनवर संतोषनं तिला उतरवून घेतलं. दोघं एका चांगल्या हॉटेलात गेली. रिसेप्शन डेस्कवर खोटी नावं सांगायची असं मनांत होतं पण हल्ली आयकार्ड, घरचा पत्ता, पॅनकार्ड वगैरे सगळंच सांगावं लागतं. दोघांची वेगवेगळी नावं सांगताना दोघंही मनांतून घाबरलेले होते. हॉटेलात जागोजागी सीसी टीव्ही कॅमेरे लागलेले होते. तोंड लपवता लपवता दीपिकेची वाट लागली. आपण कॉलगर्ल आहोत असं घाणेरडं फीलिंग तिला यायला लागलं.

खोलीत आल्यावर ती वैतागून म्हणाली, ‘‘असं काही असतं याची थोडीही कल्पना असती तरी मी इथं आले नसते.’’

‘‘आता तर खोलीत आपण सुरक्षित आहोत ना? आता विसर सगळं आणि ये माझ्या मिठीत.’’ संतोष तर असा अधीर झाला होता जणू आज त्याची लग्नाची पहिली रात्र आहे.

‘‘थांबरे, आधी उदयला फोन तर करू देत. मी पोहोचले म्हणून सांगायला हवं ना?’’

‘‘अगं…अगं…हे काय करतेस? तू उद्या सकाळी पोहोचते आहेस. तू अजून ट्रेनमध्येच आहेस. विसरू नकोस.’’ संतोषनं तिला मिठीत घेत खिदळंत म्हटले. त्याचं ते खिदळणं दीपिकेला अजिबात रूचलं नाही.

हॉटेलच्या त्या बंद खोलीत कुणाचीही भीती नसतानादेखील दीपिकेला संतोषचा स्पर्श सुखाचा वाटत नव्हता. काय होतंय ते तिला समजत नव्हतं. ‘डोकं फार दुखतंय’ म्हणून ती रात्री न जेवताच लवकर झोपली.

दुसऱ्या दिवशी सकाळी दीपिकेनं चहाची ऑर्डर दिली. चहा घेऊन येणारा वेटर आपल्याकडे रोखून बघतोय, संशयानं बघतोय असं तिला वाटलं. चोराच्या मनांत चांदणं म्हणतात ते खोटं नाही. दीपिकेला स्वत:चीच चिड आली…शी: काय म्हणत असेल तो आपल्याला.

‘‘आता फोन करू का उदयला? एव्हांना गाडी आपल्या शहरात पोहोचत असेल ना?’’ दहा मिनिटांत तिनं इतक्यांदा हा प्रश्न संतोषला विचारला की संतोषही संतापून म्हणाला, ‘‘कर गं बाई! एकदाचा फोन कर.’’

उदयच्या सुरात काळजी होती. ‘‘तू नीट पोहोचलीस ना? ट्रेन लेट का बरं झाली?’’ तिनं म्हटलं, ‘‘नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. नंतर फोन करते.’’ ती प्रचंड घाबरली होती. असं अन् इतकं खोटं कधी बोलली नव्हती. घरात आपण किती सुरक्षित असतो हे तिला पदोपदी जाणवत होतं. ‘‘मी वेळेवर पोहोचले असं नाही सांगितलं हे किती बरं झालं? बापरे! मला खूप भीती वाटतेय संतोष…’’

‘‘चल, आज खाली रेस्टॉरंटमध्ये जाऊन ब्रेकफास्ट घेऊयात. तुलाही थोडं बरं वाटेल. कालपासून तू टेन्शनमध्येच आहेस.’’ सतोषनं म्हटलं.

उदयबरोबर राहून दीपिका दूध ओट्स, दूध कॉर्नफ्लेक्स, ऑमलेट-ब्रेड वगैरे सारखे पदार्थ नाश्त्याला घ्यायला लागली होती. आत्ताही तिनं ओट्स आणि ऑमलेट मागवलं. संतोषनं आलूपराठे आणि कचोरी मागवली.

‘‘का गं? इतका साधा आणि कमी ब्रेकफास्ट? पोट बरं आहे ना तुझं?’’ संतोषनं विचारलं.

‘‘आता आपण कॉलेजमधील नाही आहोत संतोष, वयानुरूप खाण्याच्या सवयीही बदलायला हव्यात. उदय तर म्हणतात…’’ दीपिकानं पटकन् जीभ चावली. एकदम गप्प झाली ती.

‘‘मी खूप बोअर होतेय…थोडं बाहेर भटकून येऊयात का?’’ दीपिकानं असं म्हणताच संतोष पटकन् तयार झाला. सतत खोलीत बसून टीव्ही बघून तोही कंटाळला होता.

सायंकाळी उशीरापर्यंत दोघं तिथल्या बाजारात मनसोक्त भटकले. संतोषने दीपिकेला अगदी लगटून घेतलं होतं. बाजारात तमाशा नको म्हणून तिनं तो नको असलेला स्पर्श सहन केला. बाहेरच काही तरी खाऊन रात्री दोघं हॉटेलच्या खोलीत परत आले. तिने कपडे बदलले अन् ती बेडवर आडवी झाली. पण या क्षणी तिला संतोषचा स्पर्श नको नको वाटत होता. मनांतून खूप अपराधी वाटत होतं. उदयशी खोटं बोलल्याचा पश्चात्ताप होत होता.

दीपिकानं काहीच उत्तर दिलं नाही. तिला स्वत:लाच समजत नव्हतं की स्वत:च्या घरात असताना संतोषच्या जवळीकीसाठी ती इतकी अधीर, आतुर असायची. आता तिला ती जवळीक नको का झालीय?

दुसऱ्या दिवशी दीपिकानं दोन वेळा उदयला फोन लावला. दोन्ही वेळा तो अगदी कोरडेपणांनं मोजकंच बोलला.

‘‘उदय का बरं असं वागला? इतका कोरडेपणा गेल्या दोन वर्षांत कधी जाणवला नव्हता. त्याचा मूड कशानं बिघडला असावा?’’ दीपिकानं म्हटलं.

‘‘ऑफिसच्या कामात गढलेला असेल, कामाचं टेन्शन असेल, तू काय त्याच्या मूडबद्दल बोलायला इथे आली आहेस का?’’ चिडून संतोष म्हणाला. ज्या विचारानं त्यानं हॉटेल बुक केलं होते, तसं काहीच घडत नव्हतं. संतोषला दीपिकेचं रसरशीत तारूण्य, तिचं सौंदर्य उपभोगायचं होतं पण ती तर अजिबात प्रतिसाद देत नव्हती. लोकांच्या नजरांची (खरं तर सगळे अपरिचित होते, तरीही) तिला भीती वाटत होती. त्यामुळे खोलीबाहेर जाता येत नव्हतं. विनाकारण हॉटेलचं बिल वाढत होतं. हा दिवसही असाच कंटाळवाणा गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी परत जायचं असं शेवटी दोघांनी ठरवलं.

‘‘मला लवकर आलेली बघून उदयला नवल वाटेल, पण मी त्यांना सांगेन की तुमची फार आठवण येत होती म्हणून मी परत आले.’’ दीपिका म्हणाली.

‘‘उदय, उदय, उदय! खरोखरंच त्याची फार आठवण येतेय का?’’ संतोषनं संतापून विचारलं. दीपिकेनं उत्तर दिलं नाही. पण न बोलताही सत्य काय ते संतोषला समजलं. दीपिकेला तिच्या घरी सोडून संतोष आपल्या खोलीवर निघून गेला.

सकाळीच दीपिकेला घरात बघून उदयला जरा नवल तर वाटलं.

‘‘सरप्राइज!’’ दीपिकेनं उदयच्या गळ्यात हात टाकत म्हटलं.

‘‘इतक्या लवकर कशी आलीस तू? दोन दिवस अजून राहणार होतीस ना?’’ अगदी संथ सुरात त्यानं विचारलं. ती लवकर आल्याचा जणू त्याला आनंद झालाच नव्हता.

‘‘का? तुम्हाला आनंद नाही झाला का? मला तुमची फारच आठवण यायला लागली म्हणताना मी लगेचच निघाले.’’ दीपिकानं म्हटलं.

ब्रेकफास्ट घेऊन झालेला होता. दुपारचं जेवण ऑफिसच्या कॅन्टीनमध्येच घेईन एवढं बोलून उदय ऑफिसला निघून गेला.

सायंकाळी उदय घरी परतला तोवर दीपिकेनं घर साफसूफ करून, फर्निचरची रचना बदलून नव्यानं मांडामांड केलेली होती. स्वयंपाक ओट्यावर तयार होता. उदय गप्पच होता. त्यानं चहाही नको म्हणून सांगितलं.

‘‘तुम्ही असे थकलेले अन् गप्प का आहात? बरं नाही वाटत का?’’

‘‘जरा थकवा आलाय. लवकर झोपतो. विश्रांती मिळाल्यावर बरं वाटेल.’’ एवढं बोलून उदय खोलीत निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिससाठी उदय आवरत असतानाच संतोष घरात शिरला. ‘‘आज इतक्या लवकर कसे आलात संतोष? दीपिकेशिवाय करमत नाही वाटतं? अजून किती दिवस ट्यूशन चालू राहील तुमची?’’

उदयचं बोलणं, एकूणच त्याचे हावभाल बघून दीपिका अन् संतोष दोघंही भांबावले. चकितही झाले.

जेवणाचा डबा घेऊन उदय निघून गेल्यावर चहाचा कप घेऊन तिनं संतोषला सोफ्यावर बसवलं. स्वत:ही चहाचा कप घेऊन त्याच्यासमोर बसली आणि अत्यंत स्थिर आवाजात बोलायला लागली,

‘‘संतोष, तू आयुष्यात आलास अन् मी आता विवाहित आहे उदयची पत्नी अन् त्याच्या कुटुंबातली सून आहे, हे मी अगदी विसरले…अल्लड किशोरीसारखी तुझ्या प्रेमात वेडी झाले. प्रियकराच्या बाहुच्या विळख्यात सुख शोधू लागले…जर तू या घरापासून दूर, त्या हॉटेलच्या खोलीत नेलं नसतं तर मी, माझ्या संसारात किती रमले आहे. उदयवर प्रेम करू लागले आहे. त्याच्या प्रेमाची किंमत मला कळली आहे, हे काहीच मला जाणवलं नसतं. तू इथं माझ्या घरात येतो, तेव्हा या माझ्या घराच्या चार भिंतीत मी सुरक्षित असते पण घराबहेर पाऊल टाकल्यानंतर मला कळलं की या घरामुळे मला पूर्णत्त्व आलंय. या घराची मालकीण, उदयची पत्नी म्हणून माझी ओळख आहे.

‘‘उदयनं तर माझ्यावर मनांपासून प्रेम केलं. मला हवं ते सर्व माझ्यासमोर ठेवलं. माझी काळजी घेतात ते, मला काय हक्क आहे त्यांचा अपमान करण्याचा? माझ्या अनैतिक वागण्यानं समाजात त्यांची मानहानी होईल, याचं भान मीच ठेवायला हवं. माझ्या या निर्लज्ज वागण्यानं त्यांचा प्रेमावरचा, निष्ठेवरचा विश्वासच उडेल. माझ्या आयुष्यात तुझ्या प्रेमाचा रंग भरण्यासाठी त्यांच्या आयुष्यावर काजळी फासण्याचा मला खरंच हक्क नाहीए.

दीपिका विचार करत होती, विवाहित असून ती अशी चुकीच्या मार्गावर कशी भरकटली? मनाच्या सैरभैर अवस्थेत ती घरातल्या प्रत्येक खोलीतून फिरत होती. सर्व तऱ्हेनं विचार करून ती या निष्कर्षावर पोहोचली की खरं काय ते उदयला सांगून टाकायचं. मनावर हे पापाचं ओझं घेऊन सगळं आयुष्य काढणं अवघडच नाही तर अशक्य आहे.

सायंकाळी उदय घरी परतल्यावर दीपिकेनं त्याला चहा करून दिला आणि शांत आवाजात सगळी हकीगत त्याला सांगितली. ती खाली मान घालून बोलत होती. तो खाली मान घालून ऐकत होता. शेवटी ती म्हणाली, ‘‘उदय, मला क्षमा करा. माझ्या हातून फार मोठा गुन्हा घडलाय. माझं पुढलं आयुष्य तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे.’’

ऑफिसच्या कामासाठी उदय शेजारच्या शहरात गेला होता. दिवसभर काम करून सायंकाळी तो तिथल्या मार्केटमध्ये पाय मोकळे करायला म्हणून गेला. तिथल्या एका मिठाईच्या दुकानातली मैसूरपाकाची वडी दीपिकेला फार आवडायची. आलोच आहोत तर तो मैसूरपाक घेऊन जाऊ अशा विचारानं मार्केटमध्ये फिरत असताना त्याला दीपिकेनं विणलेला निळ्या स्वेटरसारखा स्वेटर कुणाच्या तरी अंगात दिसला. तोच रंग, तेच डिझाइन. उदयनं उत्सुतकेनं त्या माणसाच्या न कळत त्याचा माग घेतला. उदय चकित झाला. तो माणूस म्हणजे संतोष होता. अन् दीपिका त्याला लगटून होती. संताप, अपमान, तिरस्कार, सुडाची भावना अशा अनेक संमिश्र भावना त्याच्या मनांत दाटून आल्या. त्यानं दीपिकेच्या माहेरी फोन केला. दीपिकेबद्दल चकार शब्दही काढला नाही. जनरल बोलणं झालं पण त्यावरून एक गोष्ट नक्की झाली की दीपिका माहेरी गेली नाहीए, हे सिद्ध झालं. कसा बसा तो टॅक्सी करून आपल्या घरी परत आला. दीपिकानं असा विश्वासघात करावा? ज्या पत्नीची तो इतकी काळजी घेतो, तिच्यावर जिवापाड प्रेम करतो तिनंच असा दगा द्यावा? त्याला काहीच सुचेनासं झालं होते. तिला जबरदस्त शिक्षा द्यावी का? पण तिच्याकडून काही कळतंय का याचीही वाट बघायला हवी. संताप, विश्वासघाताच्या आगीत तो होरपळत होता. पण स्वत: दीपिकानंच आपली चूक कबूल केली. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पश्चात्तापाच्या अश्रूंनी त्याच्या हृदयातील आग शांत झाली होती.

सगळी रात्र याच मानसिक द्वंद्वात संपली. दीपिकेला घराबाहेर काढायचं? की तिचा पश्चात्ताप अन् स्वत:च आपल्या गैरवर्तनाची कबुली देण्याचा प्रामाणिकपणा बघून तिला क्षमा करायची? दीपिकेला शिक्षा देताना तो ही त्यात होरपळून निघणारंच ना? स्वत:चा संसार मोडून तो लोकांना कोणत्या तोंडानं सामोरा जाणार आहे? पण आता तो दीपिकेवर पूर्वीप्रमाणे विश्वास ठेवू शकेल का?

सकाळी लवकर उठून दीपिका घरकामाला लागली. चहा तयार करून ती चहाचा ट्रे घेऊन उदयजवळ आली. चहाचा कप त्याला देऊन तिनं म्हटलं, ‘‘तुम्ही काय निर्णय घेतलाय? तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे.’’

‘‘आपण आधी चहा घेऊयात.’’ तो शांतपणे म्हणाला. दोघांनी न बोलता चहा घेतला. मग उदयनं म्हटलं, ‘‘दीपिका, तू काही सांगण्याआधीच मला हे कळलं होतं. परवा मला माझ्या ऑफिसच्या कामानं करीमगंजला जावं लागलं. काम संपवून मी बाजारात भटकत असताना तुम्हा दोघांना लगटून चालताना मी बघितलं. तू विणलेला निळा स्वेटर संतोषच्या अंगात होता. मी तुझ्या माहेरी फोन केला तेव्हा त्यांनीच मला दीपिका कशी आहे, केव्हा माहेरी येणार असं विचारल्यावर तू माहेरी गेली नाहीएस हे तर मला कळलंच. तू काय म्हणते आहेस हेच मला ऐकायचं होतं. तू बोलली नसतीस तर मीच विषय काढणार होतो.’’ उदयच्या या बोलण्यामुळे पुन्हा दीपिकेच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले.

‘‘जर मी तुला क्षमा केली नाही तर या आगीत मीही आयुष्यभर जळेन. पण क्षमा करणंही इतकं सोपं नाहीए. मी तुझ्यावर पुन्हा तेवढाच विश्वास ठेवू शकेन की नाही, मलाच ठाऊक नाहीए…पण मला आपला संसार मोडायचा नाहीए. सारी रात्र मी विचार करतोय. तुझ्या डोळ्यातील पश्चात्तापाचे अश्रू आणि गेल्या दोन वर्षात आपण घालवलेले सुखाचे क्षण यांच्या तुलनेत तू केलेला विश्वासघात नक्कीच क्षमा करण्यासारखा आहे.’’

खरंय ना? पावसाळ्यात आपल्या अंगणात शेवाळं साठतं म्हणून आपण अंगण फोडून टाकतो का? आपण तिथलं पाणी काढून शेवाळं खरवडून स्वच्छ करतो. पुन्हा शेवाळं वाढू नये म्हणून सजग राहतो. आपल्या अंगणात दोष आहे म्हणून पावसाळी शेवाळं वाढतं असं नाही तर आपल्या अंगणात थोडी अधिक लक्ष देण्याची, निगा ठेवण्याची गरज आहे असाच त्याचा अर्थ असतो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...