कथा * कुमुद भटनागर

नितीनच्या आयुष्यात सुख कधी आलंच नाही असं तर म्हणता येणार नाही. पण ते सुख श्रावणातल्या उल्हासासारखं अल्प काळासाठी यायचं. सुख आलंय म्हणेपर्यंत दु:खाचे काळे ढग त्याला झाकून टाकायचे. स्मित हास्याचं रूपांतर मोकळेपणाने हसण्यात होतंय, तोवर डोळ्यांतून दु:खाश्रू गळायला लागायचे.

तसे तर नितीनचे बाबा एक प्रसिद्ध डॉक्टर होते. पैसाही भरपूर कमवत होते. पण घरात मुलंही भरपूर होती. एवढ्या सगळ्यांच्या सगळ्या हौशी पूर्ण करणं किंवा जो जे मागेल ते त्याला देणं शक्यच नव्हतं. नितीन तसा खूपच हौशी अन् रसिक होता. आपल्या हौशी पूर्ण करण्याचा एकच मार्ग त्याच्या लक्षात आला होता की या क्षणी सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित करायचं, उत्तम मार्क मिळवून चांगली नोकरी मिळवायची. मग तो आणि त्याचा पैसा अन् त्याच्या हौशी अन् आवडी.

काही वर्षांतच त्याची इच्छा पूर्ण झाली. भरपूर पगाराची उत्तम नोकरी मिळाली. त्या आनंदाप्रीत्यर्थ दिलेल्या पार्टीतच बाबांना जबरदस्त हार्ट अटॅक आला अन् ते हे जग सोडून गेले. सगळंच वातावरण दु:खाने व्यापलं. सात बहीणभावांत नितीन तिसऱ्या क्रमांकावर होता. बाबांच्या हयातीत सर्वात थोरला लेक व त्याच्यापाठची बहीण एवढ्यांचीच लग्न झाली होती. बाकीची सर्व मुलं अजून शिकत होती.

नितीनने दु:खात बुडालेल्या आईला धीर दिला. तिला वचन दिलं की तो सर्व धाकट्या बहीणभावंडांची जबाबदारी घेईल. त्यांची आयुष्य मार्गी लागल्याखेरीज तो स्वत: लग्न करणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने ही जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. आपल्या हौशी, आपल्या आवडी एवढंच काय, स्वत:च्या करियरचीही आहुती दिली.

खरं तर दुसऱ्या शहरात त्याला अधिक पगाराची नोकरी मिळत होती. पण नितीनने आपलं शहर सोडलं नाही; कारण एक तर इथे रहायला स्वत:चं घर होतं. दुसरं म्हणजे त्याच्या असण्यामुळेच आई अन् इतर भावंडं स्वत:ला सुरक्षित समजत होती. त्याच्याशिवाय राहाण्याची कल्पनाही आईला असह्य वाटायची.

इथेच राहून तो कष्ट करत वरची प्रमोशन्स घेत गेला. दुसऱ्या शहरात राहाणाऱ्या विवाहित भावानेही आपल्या परीने मदत केली. धाकटी भावंडं शिकत गेली, नोकरीधंदा बघून घरातले काही खर्च स्वत:कडे घेतले.

काही वर्षांत सगळं स्थिरस्थावर झालं. मध्यंतरी आईची प्राणज्योतही मावळली. फक्त धाकटी विभा व तिच्याहून लहान निखिल यांचं लग्न व निखिलचं शिक्षण व्हायचं होतं. इतरांचे संसार सुरू झाले होते, त्यांचे त्यांना खर्च होतेच म्हणून नितीनने या दोघांची जबाबदारी एकट्यानेच घ्यायची ठरवलं. प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज घेऊन विभाने पसंत केलेल्या मुलाशी तिचं लग्न थाटात करून दिलं. निखिलला मेडिकलला अॅडमिशन मिळाली.

निखिल डॉक्टर झाला. त्याला नोकरीही लागली अन् रहायला क्वार्टरही मिळालं. आता त्या घरात नितीन एकटाच उरला. एकेकाळी अपुरं वाटणारं ते घर आता खूपच मोकळं अन् मोठं वाटत होतं. गावातल्या दोघी बहिणी त्याची काळजी घ्यायच्या. इतर भाऊबहिणीही संबंध ठेवून होते. फक्त कन्याकुमारीला असणारा निखिल तेवढा त्याच्याशी बोलत नव्हता. त्याने नितीनबरोबरचे संबंध पूर्णपणे तोडले होते. इतरांशी तो पत्राने, फोनने संबंध ठेवून होता. इतरांकडून त्याची ख्यालीखुशाली कळत होती म्हणून मग नितीननेही त्याचं वागणं मनावर घेतलं नव्हतं.

गावातल्या एका बहिणीच्या, शोभाच्या मुलीचं लग्न ठरलं. तारीख, तिथी नक्की झाली अन् तिच्या नवऱ्याला कंपनीच्या कामाने परदेशी जावं लागलं. ही संधी त्याला नाकारता येत नव्हती; कारण पुढलं बरंच काही या कामावर अवलंबून होतं. लग्नतिथीच्या दोन दिवस आधी फक्त तो आपल्या घरी पोहोचणार होता. मुलाकडची मंडळी लग्नाची तारीख बदलायला तयार नव्हती. शोभाला खूपच टेन्शन आलं. लग्नाची एवढी व्यवस्था, सर्व तयारी ती एकटी कशी करणार?

‘‘तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना तुझ्या मदतीला? तुझ्या नवऱ्यापेक्षा अधिक एफिशियन्ट आहे अन् मला तुम्हा सगळ्यांच्या लग्नाचा अनुभवही आहेच! तू अजिबात काळजी करू नकोस.’’ नितीनने तिला दिलासा दिला.

आणि खरंच नितीन तिच्या मदतीला आला. एक दिवस बाहेरून येणाऱ्या मंडळींची यादी करत असताना त्याने म्हटलं, ‘‘निखिलला आग्रहाने बोलाव गं! त्या निमित्ताने तरी त्याची भेट होईल. किती दिवसांत बघितलंही नाहीए त्याला.’’

‘‘होय दादा, आम्हालाही तसंच वाटतंय, तो यायला तयारही आहे, पण त्याने घातलेली अट आम्हापैकी कुणालाही मान्य नाहीए,’’ शोभा सांगताना खूपच संकोचली.

‘‘अरेच्चा? अशी कोणती अट घातलीए त्याने?’’

‘‘त्याची अट आहे की तू लग्नात नसावंस. तो तुला भेटू इच्छित नाही.’’

‘‘अगं पण का?’’ नितीन दचकलाच! ज्या निखिलच्या शिक्षणाच्या कर्जाचे हप्ते तो आजतागायत फेडतोय, लिझ्शी ओळख करून देताना ज्याने म्हटलं होतं की हा माझा दादा नसता तर ती डॉक्टरच काय, पण साधा माणूसही होऊ शकलो  नसतो तोच निखिल, त्याच दादाला भेटू इच्छित नाही? हे कसं शक्य आहे? अन् का?’’

शोभा गप्पच होती. नितीनने पुन्हा विचारलं, ‘‘निखिल मला भेटायला नाही का म्हणतोय?’’

‘‘कारण लिझाच्या मृत्युला तू जबाबदार आहेस असं त्याचं म्हणणं आहे.’’

‘‘काय बोलतेस तू?’’ चकित होऊन नितीन किंचाळला. ‘‘तुला ठाऊक तरी आहे लिझा कशी मेली ते? पण तुला कुठून ठाऊक असणार? त्यावेळी तू जर्मनीला गेलेली होतीस. ऐकायचीय ती सगळी घटना?’’

‘‘हं! सांग तू.’’

नितीन अस्वस्थपणे खोलीत फेऱ्या मारत होता. कुठून, कशी सुरुवात करावी तेच त्याला समजत नव्हतं. शेवटी त्याने सांगायला सुरुवात केली.

‘‘त्यावेळी मी आपल्या घरात एकटाच राहात होतो. निखिलला शहराबाहेरच्या एका हॉस्पिटलमध्ये रेसिडेंट डॉक्टर म्हणून जॉब मिळाला. त्याला तिथेच राहण्याचीही सोय होती. एक दिवस अचानक मला फोन केला की मी सायंकाळी लवकर घरी यावं, तो मला कुणाला तरी भेटवणार आहे. त्या दिवशी जरा जास्तच उकाडा होता म्हणून मी गच्चीवरच चहाफराळाची व्यवस्था केली. थोड्याच वेळात लिझाला घेऊन निखिल घरी आला. ती दोघं हायस्कूलात असल्यापासून एकमेकांवर प्रेम करत होती, अन् आता दोघंही डॉक्टर ?झाल्यावर त्यांना लग्न करण्याची इच्छा होती, पण मी परवानगी दिली तरच!

‘‘लिझा मला एकदम आवडली. खूपच गोड अन् नम्र स्वभावाची होती. तिच्या येण्याने आपल्या त्या घरात जणू एकदम चैतन्य आलं. मी म्हटलं, ‘‘तुम्हा दोघांचं लग्न मी आनंदाने लावून देईन. पण लिझाच्या घरातून एका हिंदू कुटुंबातल्या मुलाशी लग्न करण्याला परवानगी आहे का?’’

‘‘त्यावर लिझा म्हणाली, ‘‘निखिलच्या कुटुंबाने जर मला प्रेमाने स्वीकारलं तर माझ्या आईलाही हे लग्न पूर्णपणे मंजूर आहे.’’

‘‘मी लिझाला म्हटलं, ‘‘निखिल आमच्या घरातला सगळ्यात धाकटा भाऊ असल्याने सगळ्यांचाच लाडका आहे. त्याचा आनंद तो आमचा सर्वांचा आनंद. आमच्या घरात अजून परधर्माची कुणी मुलगी सून म्हणून आली नाहीए, पण मीही लवकरच एका ख्रिश्चन स्त्रीशी लग्न करणार आहे. तीही माझ्याप्रमाणेच एकटी आहे. मी तर निखिलचं लग्न कधी होतंय याचीच वाट बघत होतो. तो एकदा चतुर्भुज झाला की मी आईला दिलेल्या वचनातून मुक्त होईन व माझं आयुष्य जगायला मोकळा होईन.’’

‘‘हे ऐकून निखिललाही खूप आनंद झाला. त्याने विचारल्यावर मी सांगितलं की मी जिच्याशी लग्न करणार आहे ती स्त्री एका मल्टिनॅशनल कंपनीतल्या चेयरमनची सेक्रेटरी आहे. ऑफिसच्या कामासंदर्भातच आमच्या भेटी व्हायच्या. त्यातून मैत्री झाली. तिने मला आधीच सांगितलं की मी तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही विचारू नये. मीही त्याबाबतीत काही विचारलं नाही, ती विधवा आहे की परित्यक्ता तेही मला ठाऊक नाही. तिने सांगितलं की, मैत्रीसाठीसुद्धा ती थोडाच वेळ देऊ शकते; कारण नोकरी अन् तिच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या यामुळे तिच्याजवळ वेळ कमी असतो. मीही तिला सांगितलं की जबाबदारी मलाही आहे. वेळ अन् पैसा दोन्हींचा अभाव मलाही जाणवतो, त्यामुळेच लग्नाबद्दल सध्या विचारही करता येणार नाही.

निखिल अन् लिझाने अधिक उत्सुकता दाखवत आमच्या या प्रेमप्रकरणाबद्दल विचारल्यावर मी सांगितलं की माझ्या बोलण्यामुळे तीही आश्वस्त झाली अन् मैत्रीचा हात तिने पुढे केला. अधुनमधून मिळणारा रिकामा वेळ आम्ही एकत्र घालवू लागलो. त्यामुळे आमच्या वैराण आयुष्यात खरोखरच थोडी गंमत आली.

‘‘आम्ही दोघांनीही इतकी वर्षं स्वत:चा कधी विचारच केला नव्हता; म्हणजे तशी उसंतच मिळाली नव्हती. आता आम्ही स्वत:विषयीही विचार करू लागलो. आम्ही दोघं नेहमीच बोलून दाखवायचो की जेव्हा आमच्या जबाबदाऱ्या संपतील तेव्हा सगळा वेळ आम्ही एकत्र राहू व एकमेकांसाठी वेळ देऊ. काय काय करायचं, कुठे कुठे जायचं याची खूप स्वप्नं आम्ही रंगवली आहेत.’’

‘‘हे ऐकून निखिल एकदम भावनाविवश झाला. म्हणाला, ‘‘दादा, किती सोसलंस रे आमच्यासाठी, अरे, जोवर आपण एकटे असतो तोपर्यंत ठीक आहे, पण एकदा कुणाच्या प्रेमात पडलो की मग त्या व्यक्तीपासून दूर राहाणं खूपच अवघड होतं.

‘‘मी त्याला गमतीने विचारलं की तो माझ्यापासून इतकी वर्षं दूर राहिला? तेव्हा तो म्हणाला की एक तर आर्थिकदृष्ट्या त्याला स्वावलंबी व्हायचं होतं व पैसा साठवायचा होता. दुसरीकडे लिझाचंही शिक्षण सुरू होतं. पण आता तीही डॉक्टर झाली आहे. मग त्याने मला म्हटलं, दादा आता मी वेगळा राहातोय अन् कमवायलाही लागलोय तर तू आता लग्न का करत नाहीस?

‘‘कारण तुझ्या होणाऱ्या वहिनीला अजून काही दिवसांचा अवधी हवा आहे,’’ मी म्हटलं.

‘‘यावर तो म्हणाला, ‘म्हणजे अजून तुझं ब्रह्मचर्य संपायचं नाहीए?’

‘‘मी हसून म्हटलं, ‘तू हे घर सोडून गेलास त्या दिवसापासून माझं ब्रह्मचर्य संपलं. एकटाच असतो त्यामुळे कुणाचा धाक नाही, वेळही भरपूर असतो. तिला वाटतं, तेव्हा ती इथे येते अन् आम्ही मुक्त पाखरांप्रमाणे इथे मजेत वेळ घालवतो.’

‘‘लिझा अन् निखिल थोडे आश्चर्याने माझ्याकडे बघत होते. मी काही क्षण गप्प बसलो. मग काय वाटलं कुणास ठाऊक, मी म्हणालो, तुम्ही दोघं डॉक्टर आहात. शरीरशास्त्र जाणता, तरीही जीवनातील शाश्वत सत्य व शरीरसुखाबद्दल बोलतोय तर असे संकोच का करता? लवकर लग्न करा आणि वैवाहिक सुखाचा आनंद घ्या. तुम्हाला तर सर्व ठाऊकच असेल. मी तर बालब्रह्मचारी. तिला खेटून बसायला मिळालं तरी सुखावत होतो. पण तिचं लग्न झालेलं, वैवाहिक सुखाचा तिला अनुभव. त्यामुळे तिनेच मला यापुढे एक एक कसं घडतं ते सांगितलं. अजूनही म्हणते यापुढेही बरंच काही आहे, पण ते आपल्या नात्यावर, समाजाच्या अन् कायद्याच्या मान्यतेचा शिक्का लागल्यावर. मीही त्याचीच वाट बघतोय.

‘‘तेवढ्यात माझ्या मोबाइलची घंटी वाजली. फोन तिचाच, सिल्व्हियाचाच होता. ती थोड्याच वेळात इथे पोहोचतेय असं तिने सांगितलं. मी उत्साहाने निखिलला म्हटलं की योगायोग बघ, तुझ्या वहिनी आताच इथे येतेय, तिला भेटूनच तुम्ही निघा. अन् मग त्याला डोळा मारून गंमत करण्यासाठी पुढे म्हटलं, पण भेटून लगेच निघा हं! आमचा फार वेळ घेऊ नका.

‘‘निखिल म्हणाला, आम्हालाही घाई आहे दादा, तू लग्नाला परवानगी दिल्याची बातमी आम्हाला लिझाच्या आईला सांगायचीय.

‘‘मी म्हणालो, तुझ्या वहिनीला विचारूया. तिची तयारी असली तर दोघा भावांची लग्नं एकदमच होऊ देत.

‘‘निखिलला ही कल्पना फारच आवडली. तो म्हणाला, मी लिझाच्या आईशी बोलतो अन् त्यांना ही कल्पना आवडली तर खरंच, दोन्ही लग्न एकदमच होतील.

‘‘तेवढ्यात खाली गाडीचा हॉर्न वाजला. हा तिच्याच गाडीचा हॉर्न होता. मी उत्साहाने म्हणालो, घ्या ती आलीच. लिझाने पटकन उठून गच्चीच्या कठड्यावरून वाकून बघितलं आणि, आणि कुणाच्या काही लक्षात येण्यापूर्वीच तिने कठड्यावर चढून खाली उडी मारली.

‘‘धावत धडपडत मी व निखिल खाली पोहोचलो तेव्हा लिझा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती अन् सिल्व्हिया तिची नाडी व श्वास बघत होती. ‘तुम्ही पटकन एक मोठी चादर आणा,’ तिने मला म्हटलं. मी खूप घाबरलो होतो. कसाबसा घरात गेलो व चादर आणली. त्यावेळी सिल्व्हिया निखिलशी बोलत होती. निखिल रडत होता, घाबरलेला होताच.

‘‘पोलीस केस होऊ नये म्हणून तुम्ही इथलं सगळं रक्त स्वच्छ करा. लवकर… प्लीज, मी हिला तिच्या घरी पोहोचवते. सिल्व्हियाने खूपच घाईने निर्णय घेतला.

‘‘चादरीत लिझाला गुंडाळून गाडीत घालून ती दोघं निघून गेली. मीही असा गडबडलो होतो की मलाही धड सुचत नव्हतं. फक्त सिल्व्हियाने सांगितल्याप्रमाणे मी तिथलं सगळं रक्त तेवढं धुऊनपुसून स्वच्छ केलं.

‘‘त्या रात्री सिल्व्हियाचा मोबाइल बंद होता. तिचा घरचा पत्ता अन् फोननंबर तिने मला दिला नव्हता. निखिलचा मोबाइलही बंद होता.

‘‘दुसऱ्या दिवशी सिल्व्हिया ऑफिसला आली नव्हती आणि हॉस्पिटलला फोन केला तेव्हा निखिलही तिथे नाही असं कळलं. त्या दोघांची मन:स्थिती बरोबर नसावी असं मला वाटलं. मलाही वारंवार रक्ताच्या थारोळ्यात पडलेली लिझा आठवत होती. त्यामुळे मीही फोन बंदच ठेवला. दुसऱ्या दिवशीही दोघांचे मोबाइल बंद होते. मी निखिलच्या हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा एक धक्कादायक बातमी समजली. निखिलने तिथली नोकरी सोडली होती, तो कुठे गेलाय कुणालाच ठाऊक नव्हतं.

‘‘निखिलच्या वागण्याने मी वैतागलो. इतर भावाबहिणींकडे त्याची तक्रार करायची असं ठरवलं, पण घरी गेल्यावर आणखी एक जबरदस्त धक्का मला बसला. कुरियरने सिल्व्हियाचं पत्र आलं की, हे पत्र मला मिळेपर्यंत ती या जगातून निघून गेलेली असेल.

‘‘मी सिल्व्हियाला विसरणं इतकं सोपं होतं का? मी दीर्घ सुट्टी घेऊन हिमालयात निघून गेलो. पण लहान वयापासून मला घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे काम करायची सवय! मी फार काळ बाहेर राहू शकलो नाही. माझ्याजवळ शिल्लक काही नाही अन् अजून कर्ज फिटायचं आहे; म्हणनू पुन्हा कामावर रुजू झालो. कामाखेरीज इतर कशात मन रमतही नाही. पण रक्ताची नाती सहसा तुटत नाहीत. तुला तुझ्या लेकीच्या लग्नाचं टेन्शन आलेलं बघून तुझ्या मदतीला आलोच ना? आता तूच सांग, लिझाच्या मृत्युला मी जबाबदार कसा?’’

‘‘दादा, तू ना, त्या दिवशी तुझ्या अन् सिल्व्हियाच्या नात्यातल्या जवळकीचा जरा उघडच उल्लेख केलास,’’ शोभा हळू आवाजात बोलली. तिला संकोच वाटत होता.

नितीन एकदम संतापला. तो म्हणाला, ‘‘ठीक आहे, तसंही घडलं समजा, पण त्यासाठी लिझाने गच्चीवरून उडी मारण्याची काय गरज? काय संबंध या दोन गोष्टींमध्ये?’’

‘‘दादा, लज्जास्पद वाटलं ते लिझाला; कारण सिल्व्हिया तिची आई होती.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...