कथा * रूपा श्रोत्री

‘‘राजा, एकदा तरी म्हण ना, माझं तुझ्यावर प्रेम आहे.’’ ईशानं राजाच्या गळ्यात हात टाकत म्हटलं.

‘‘होय, माझं फक्त तुझ्यावर अन् तुझ्यावरच प्रेम आहे. तुझ्यावाचून मी जगू शकत नाही. तू परी आहेस, अप्सरा आहेस..अजूनही काय काय आहेस…अजूनही काही डायलॉग ऐकायचे आहेत?’’ राजानं हसतच म्हटलं.

ईशानंही हसतच कबूल केलं, ‘‘झालं…झालं, आता मला बरं वाटलं.’’

गेली आठ वर्ष राजा आणि ईशा एकमेकांना ओळखताहेत. एकाच कॉलेजात शिकायची दोघं. सुरूवातील मैत्री होती. अभ्यास सांभाळून दोघं एकत्र फिरायची, कॉलेजच्या कार्यक्रमात भाग घ्यायची. मैत्री पुढे प्रेमात बदलली. ईशा एका संपन्न कुटुंबातली एकुलती एक मुलगी होती. तिला पैसेवाला नाही, तर प्रेम करणारा, समजून घेणारा नवरा हवा होता. राजाच्या रूपात तिला तो मिळाला होता. ती वाट बघत होती, राजाचं प्रमोशन झालं की ती आईवडिलांकडे राजाबद्दल बोलणार होती.

तसाही राजा एका नामांकित कंपनीत चांगल्या हुद्यावर कामाला होता पण ईशाला वाटत होतं अजून एक प्रमोशन मिळालं की ती अभिमानानं राजाची तिच्या आईवडिलांशी भेट घालून देईल.

राजाचं प्रमोशन झालं अन् ईशानं त्याचं अभिनंदन करत म्हटलं, ‘‘आजच मी आईबाबांशी आपल्या लग्नाबद्दल बोलते. मला खात्री आहे, त्यांना तू नक्कीच आवडशील.’’

रात्री जेवताना ईशानं सांगितलं, ‘‘आईबाबा मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देते आहे. मी माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडला आहे.’’

आश्चर्यानं त्यांनी विचारलं, ‘‘अस्सं? अरे व्वा!! कोण आहे तो?’’

‘‘मी उद्या रात्री त्याला जेवायला बोलावते, म्हणजे तुम्ही त्याच्याशी नीट बोलू शकाल. त्याचं नाव राजा आहे.’’

दुसऱ्यादिवशी राजा ईशाच्या घरी गेला. त्याचं शिक्षण, नोकरीतला हुद्दा, त्याच्या इतर आवडी निवडी सगळंच इतकं छान होतं की ईशाचे आईवडिल एकदम खूश झाले.

‘‘ईशा, तुझी निवड एकदम परफेक्ट आहे. आम्हाला असाच जावई हवा होता.’’ त्यांनी म्हटलं.

पुढल्याच रविवारी ईशाचे आईवडिल राजाच्या घरी त्याच्या आईवडिलांना भेटायला गेले.

दोन्ही घराणी सुसंस्कृत, श्रीमंत होती. बोलताना राजाच्या वडिलांनी सांगितलं, ‘‘ईशा आम्हाला पसंत आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट आधीच स्पष्ट सांगतो की राजाला आम्ही दत्तक घेतलाय. तो आमचा मुलगा नाही. आम्हाला मुलबाळ नव्हतं. तोही आमच्यावर तेवढंच प्रेम करतो. ईशालाही आमच्या घरात प्रेम अन् सन्मान मिळेल याबद्दल तुम्ही नि:शंक असा.’’

राजाच्या वडिलांचा व्यवसाय जोरात होता. समाजात त्यांना खूप आदर व सन्मान होता. ईशाच्या आईवडिलांना या नात्यात काहीच अडचण नव्हती. मोठ्या थाटात आधी साखरपुडा अन् मग लग्नही झालं. नववधू ईशा इतकी सुंदर दिसत होती. त्यांच्या कॉलेजमधले मित्र व मैत्रिणीही लग्नाला आले होते. काहींची लग्नं झाली होती. काहींची होऊ घातली होती. सगळ्यांनी मिळून लग्नाची शोभा अधिकच वाढवली. सोहळा संपला. वधूची पाठवणी झाली. लक्ष्मीच्या पावलांनी ईशा राजाच्या घरात आली.

राजा आणि ईशाची पहिली रात्र. त्यांची खोली फुलांच्या माळांनी सजवली होती. पलंगावर फुलांच्या पाकळ्या अंथरल्या होत्या. ईशाचं मुळचं देखणं रूप अलंकार घातल्यामुळे अधिकच खुललं होतं. तिला बघून राजाला प्रेमाचं भरतं आलं. तो टक लावून तिच्याकडे बघत होता. त्यानं हात पुढे करताच ईशा त्याच्या मिठीच विसावली.

दुसऱ्या सकाळी ईशानं स्नान करून सुंदर निळी साडी परिधान केली.

सकाळपासूनच मैत्रिणींचे फोन येऊ लागले. ‘‘ईशा, पहिली रात्र कशी गेली?’’

ती सर्वांना हसून सांगत होती, ‘‘छान गेली. वंडरफुल!’’

राजालाही मित्रांचे फोन येत होते. सगळा दिवस असाच आनंदात, चेष्टा मस्करीत संपला. दोघंही मजेत होती.

बघता बघता एक महिना झाला. राजाला कामावर हजर व्हायला हवं होतं. ऑफिसमधल्या मित्रांनीही त्याचं प्रेमानं स्वागत केलं. थोडी फार चेष्टामस्करी झाली.

भराभर दिवस उलटत होते. सकाळी ईशा राजा जाईपर्यंत त्याच्या भोवती असे. मग सासूसासऱ्यांना काय हवं नको बघे. स्वयंपाक करायला आचारी होता. पण वाढायला ईशा स्वत: तत्पर असायची. सासरे जेवून त्यांच्या कामावर गेले की सासूचं व स्वत:चं जेवण वाढून घेई.

लग्नाला वर्ष झालं. सासू ईशावर प्रसन्न होती. पण तिला नातवंड बघायचे वेध लागले होते. ती ईशाला म्हणायची, ‘‘आता तुम्ही मूल होऊ द्या…’’

ईशाही नम्रपणे म्हणायची, ‘‘होय आई, बरोबर म्हणताय तुम्ही.’’

आई राजालाही म्हणायची, तेव्हा तो हसून म्हणायचा, ‘‘होईल आई, बाळ होईल, घाई काय आहे?’’

बघता बघता लग्नाला दोन वर्षं उलटली. एकदा एकांतात ईशानं राजाला म्हटलं, ‘‘राजा, तू माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नकोस, कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस, पण मला एक गोष्ट कळत नाहीए की तू माझ्यावर इतकं प्रेम करतोस, चुंबन, आलिंगन, प्रत्येक इच्छा पूर्ण करतोस, पण मूल होण्यासाठी आवश्यक असलेला संभोग आपल्यात घडत नाहीए, असं का? लग्नाला दोन वर्षं झाल्यावरही आपण अजून अविवाहितांचं आयुष्य जगतो आहोत…’’

‘‘तू म्हणतेस ते खरंय…’’ राजानं कबूली दिली.

त्या रात्री ईशानं खोलीत गुलाबाच्या सुगंधाचा स्प्रे शिंपडला…स्वत: सुंदर गुलाबी नाइटी घालून राजाच्या जवळ आली. राजा तिला बघून प्रसन्न हसला. म्हणाला, ‘‘नुकत्याच उमललेल्या कमळासारखी दिसते आहेस.’’ ईशानं त्याला मिठी मारली. चुंबन आलिंगनानं ईशा उत्तेजित झाली होती. पण तिला स्वत:पासून दूर करत राजानं म्हटलं, ‘‘ईशा, आता नको, चल, झोपूयात…’’

राजाच्या या वागण्यानं ईशा पार कोमेजली…ढग बघून मोरानं पिसारा फुलवावा अन् वाऱ्याच्या झोतानं पाऊस न पडताच ढग निघून जावेत तसं तिचं झालं. तिच्या मनमोराचा पिसाराही मिटून गेला.

ईशा चिकाटीनं, शांतपणे राजाला शारीरिक संबंध घडून येण्यासाठी उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला यश येत नव्हतं.

रोज सायंकाळी नटूनथटून ईशा राजाची वाट बघायची. रात्रीची जेवणं झाली की दोघं गच्चीवरच्या झोपाळ्यावर बसून गप्पा मारायची, कधी चंद्राच्या प्रकाशात तर कधी ताऱ्यांनी खच्चून भरलेल्या आभाळाखाली. गप्पा मारताना वेळ कसा सरायचा कळायचंच नाही.

अशाच एका रात्री ईशानं राजाला म्हटलं, ‘‘राजा, आपण कुठंतरी बाहेर फिरून येऊयात ना? खूप दिवस झाले आपण बाहेर गेलो नाही.’’

राजा तिची कुठलीच गोष्ट टाळत नसे. त्यानं लगेचच काठमांडूची विमानाची तिकिटं बुक केली. दोघं काठमांडूला गेले. ईशानं तिथं नेपाळी पोषाखात फोटो काढून घेतले. ईशा अजूनही नववधूसारखीच दिसत होती. सात दिवस त्यांनी तिथले सगळे सुंदर स्पॉट्स बघण्यात घालवले.

राजा ईशाचं कुठलंही म्हणणं टाळत नव्हता. त्याचं तिच्यावर जिवापाड प्रेम होतं. ईशलाही ते कळत होतं, जाणवत होतं. तिची कोणतीही इच्छा त्यानं अपूर्ण ठेवली नव्हती. पण…पण रात्रीच्या वेळी तो ईशाला जे हवंय ते देऊ शकत नव्हता.

पहिल्या रात्रीपासून आज लग्नाला चार वर्ष होऊन गेली तरीही…तो तिची क्षमा मागायचा. खूपदा म्हणायचा, ‘‘मला घटस्फोट देऊन तू दुसरं लग्न करून घे. मला इच्छा असूनही तुला जे हवंय ते मी देऊ शकत नाही.’’ बोलता बोलता त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले.

ईशानं त्याला जवळ घेतलं. ‘‘राजा, असं बोलू नकोस. आपण सप्तपदी चाललोय. एकमेकांच्या बरोबर राहण्याचं वचन दिलंय. कुठल्याही परिस्थितीत आपण एकमेकांना सोडणार नाही. राजा माझंही तुझ्यावर प्रेम आहे. मी तुला कधीच सोडून जाणार नाही…पण आपल्याला एक तरी मूल हवं ना? त्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत.’’

लग्नाला पाच वर्षं झाली. सासू, सासरे, आई, वडिल, नातलग, मैत्रिणी सगळेच ईशाला म्हणायचे, ‘‘पुरे झालं प्लानिंग, लवकर एक बाळ होऊ दे. घरात बाळाच्या येण्यानं चैतन्य येतं…’’

हसून ईशा म्हणायची, ‘‘बरोबर आहे, आता मी विचार करते.’’

पण नुसतं म्हणून काय होणार? मूल होण्यासाठी पतीपत्नीत लैंगिक संबंध घडायला हवा. तिला कळंत नव्हतं. राजाला काय प्रॉब्लेम आहे. तो लैंगिक संबंध टाळायला का बघतो…इतर कशाबद्दलंच तिची तक्रार नव्हती. तो तिला सुखवत होता, सुखात ठेवत होता…एखादं मूल दत्तक घेतलं तर? निदान लोकांचे प्रश्न तरी बंद होतील. तिनं डॉक्टरांचा सल्ला घेतला.

डॉक्टर म्हणाली, ‘‘मला तुझ्या नवऱ्याला भेटावं लागेल. पुरूषाच्या अशा वागणुकीची अनेक कारणं असतात.’’

राजाला तिनं सांगितलं, ‘‘मी डॉक्टरांना भेटून आले आहे. त्यांना तुलाही भेटायचं आहे. उद्या सकाळी अकरा वाजताची वेळ ठरवली आहे.’’

‘‘ठीक आहे. जाऊयात.’’

दुसऱ्यादिवशी डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरांनी ईशा व राजाला अनेक गोष्टी खोदून खोदून विचारल्या. तसं तर सगळंच नॉर्मल होतं. त्यामुळे डॉक्टरही काही क्षण चक्रावल्या. त्यांनी सांगितलं, ‘‘पुरूषांमध्ये लैंगिक संबंधांविषयी उदासीनतेची काही कारणं असतात. अती प्रमाणात धूम्रपान करण्यामुळे पुरूष नपुसंक होतात. इरेक्टाइल डिसफंक्शनचा प्रॉब्लेम येतो, शुक्रजंतूंची संख्या पुरेशी नसते. त्यामुळे कामवासना थंडावते.’’

बरेचदा पुरूषांना डिप्रेशन आलेलं असतं. डिप्रेशनमुळे एकूणच आयुष्यावर खूप परिणाम होतो, तसाच सेक्सलाइफवरही परिणाम होतो. सेक्सच्यावेळी टेंशन किंवा स्टे्रस असला तरी सेक्सवर परिणाम होतो. डिप्रेशनमुळे मेंदूतलं केमिकल कॉम्पिझिशन गडबडतं त्याचा परिणाम सेक्स लाइफवर होतो.

अर्थात् त्यावरही उपाय आहेत. फार सिगारेट पित असलात तर ते बंद करणं, पोषक आणि संतुलित आहार घेणं, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, मन शांत राहण्यासाठी प्राणायम, योगासनं करणं, या सर्वांच्या जोडीनं काही औषधं घेतली की समस्या दूर होते. मधुमेह किंवा अतिशय स्थूलता ज्याला ओबेसिटी म्हणतो, त्यामुळेही कामवासनेवर परिणाम होतो. इरेक्टाइल डिसफंक्शन मागे नर्व्हसनेस हेही कारण असू शकतं.

बरेचदा पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाच्या संप्रेरक म्हणजे हारमोनची कमतरता असते. त्यामुळे सेक्स लाइफ बाधित होते. काही पुरूषांमध्ये शीघ्रपतनाची समस्या असते. स्त्रीचं समाधान होण्यापूर्वीच पुरूष स्खलित होतो त्यामुळे तो पत्नीशी संबंध टाळतो.

पण तुम्हा दोघांशी चर्चा केल्यावर मला असा काही प्रॉब्लेम दिसत नाहीए…तरीही राजा, तुम्ही एकदा तुमचं हारमोन लेव्हल तपासून घ्या. तपासणीचे रिपोर्ट मला आणून दाखवा.

राजाच्या हारमोन रिर्पोटमध्ये काही दोष नव्हता. म्हणजे शारीरिक दृष्टया राजा पुरूष म्हणून पूर्णपणे सक्षम होता. ईशावर जिवापाड प्रेमही आहे अन् तरीही त्यांच्यात अजून लैंगिक संबंध घडून येत नाहीए.

डॉक्टरांनी विचार करून ईशा व राजाला म्हटलं, ‘‘मी तुम्हाला सेक्स काउंसिलरकडे पाठवते. माझी चिठ्ठी घेऊन जा. तुमच्या समस्येवर तोडगा नक्कीच निघेल.’’

लगेच दुसऱ्यादिवशी राजा व ईशा सेक्स काउंसलरकडे पोहोचली. त्यांनीही शांतपणे सर्व केस समजून घेतली. मग दोघांना आणखी काही प्रश्न विचारले, त्यातून त्यांना कळलं की राजाला तसा काहीच प्रॉब्लेम नाहीए. ऑफिसातदेखील सगळं आलबेल आहे. उलट गेल्या आठ वर्षांत त्याला घसघशीत तीन प्रमोशन मिळाली आहेत. घरात, समाजात, आर्थिक पातळीवरही कोणतीच समस्या किंवा टेंशन नसतानासुद्धा असं काय आहे की तो पत्नीला संभोगसुखानं तृप्त करू शकत नाही? ‘‘मी. राजा, मला जरा तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे.’’ गंभीरपणे डॉक्टरांनी म्हटलं. ईशा उठून बाहेर गेली.

आता डॉक्टरांनी राजाला अगदी लहानपणापासूनच्या त्याच्या आयुष्यातल्या घटना विचारल्या. सध्या ज्या जोडप्याबरोबर तो राहतोय ते त्याचे दत्तक आईवडिल आहेत. राजा सांगत होता, ‘‘सर, मी व माझे आईबाबा आणि माझी ताई असं आमचं कुटुंब होतं. ताई माझ्याहून बारा वर्षांनी मोठी होती. बाबांनी तिचं लग्न अठराव्या वर्षीच मित्राच्या मुलाशी लावून दिलं होतं.’’

आईबाबा एका अपघातात अवचित दगावले. त्यापूर्वी त्यांनी त्यांचं विल तयार करून ठेवलं होतं. माझ्या नावावर जरा जास्त संपत्ती होती. ताईलाही तिचा वाटा त्यात लिहिलेला होता.

आईबाबा गेले तेव्हा मी आठ वर्षांचा होतो. ताई मला आपल्याकडे घेऊन आली, कारण मला बघणारं कुणीच नव्हतं. भाओजींनाही त्यात काही अडचण नव्हती. पण ताईच्या सासूसासऱ्यांच्या मनांत कली शिरला. त्यांना संपत्तीची हाव सुटली. ते ताईकडे बाबांचं मृत्युपत्र मागू लागले. त्यात स्वत:च्या सोयीनं त्यांना बदल करून घ्यायचे होते. भाओजींनाही त्यांनी स्वत:कडे वळवून घेतलं. ते आता रोज तिला मारहाण करून मृत्यूपत्र मागू लागले.

ताईला माझी काळजी वाटू लागली. ते लोक कदाचित माझा जीवही घेतील अशी तिला भीती वाटू लागली होती.

ताईच्या एका मैत्रिणीच्या नातलगांना मूळबाल नव्हतं. ताईनं त्यांना मला दत्तक घेतील का विचारलं, त्यांनी होकार दिला. भाओजी तर दिवसेंदिवस अधिकच हिंसक होत होते. मी अजून ताईजवळच राहत होतो.

एका रात्री भाओजी खूप दारू प्यायले होते. बेभान झाले होते. आल्या आल्या त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला अन् मला व ताईला लाथा बुक्क्यांनी मारायला सुरूवात केली. मी घाबरून रडू लागलो. त्यांनी माझं डोकं भिंतीवर आपटलं अन् ताईला पायांनी तुडवत तोंडानं शिव्यांचा भडिमार करू लागले. मग त्यांनी ताईला अंथरूणावर टाकलं आणि ते सेक्स करू लागले. मी घाबरून डोळे मिटले…माझी शुद्धच हरपली.

सकाळी ताईचा प्राण गेलेला होता. मी खूप घाबरलो होतो. माझे सध्याचे आईवडिल मला त्यांच्या घरी घेऊन आले. ताईच्या मैत्रिणीनं बहुधा पोलिसात कळवलं होतं. पुढलं मला ठाऊक नाही. त्या घटनेतून सावरायला माझ्या सध्याच्या आईबाबांनी खूप कष्ट घेतले. त्यांच्या प्रेमळपणामुळेच आज मी या ठिकाणी आहे, पण वयाच्या आठव्या-नवव्या वर्षी ताईबरोबर भाओजींनी केलेला प्रकार माझ्या मनात रूतून बसला आहे. माझी ताई त्या सेक्समुळेच गेली हे माझ्या मनातून जात नाही. मी ईशाबरोबर सेक्स केल्यावर ईशा मरेल, मला सोडून जाईल, हा विचार त्या क्षणी माझ्या मनात प्रबल होतो अन् मला सेक्स नको वाटतं. ईशाच्या जागी मला ताईचं प्रेत दिसतं अन् मी तिथून बाजूला होतो. हे सगळं आपोआप होतं…माझा स्वत:वर त्यावेळी ताबा राहत नाही.

राजा एका दमात सर्व बोलून गेला. आता तो बऱ्यापैकी रिलॅक्स होता. डॉक्टरांच्या लक्षात सर्व प्रकार आला. राजाला फक्त आता थोड्या समुपदेशनाची गरज होती. त्याच्या मनातली ती भीती दूर व्हायला हवी की मग सगळं व्यवस्थित होईल.

त्यांनी राजाला पुन्हा दोन दिवसांनी यायला सांगितलं. तेवढ्यात त्यांनी राजाच्या आईवडिलांचीही भेट घेतली. राजाच्या बहिणीचे पोस्टमार्टम रिपोर्ट्स त्यांच्याकडे होते. राजाच्या बहिणीचा मृत्यू अमानुष मारहाणीमुळे झाल्याचं त्यात स्पष्ट लिहिलं होतं. राजाचा मेव्हणा पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात होता. आता ईशा व राजाच्या आईवडिलांनाही सर्व स्थिती स्पष्ट झाली होती.

राजा जेव्हा डॉक्टरकडे गेला, तेव्हा त्यांनी अत्यंत प्रेमळपणे पण सहज बोलावं अशा पद्धतीनं राजाला म्हटलं, ‘‘तुझ्या बहिणीचा मृत्यु सेक्समुळे नाही तर तिला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे झाला आहे. तुझे भाओजी ताईला खूपदा मारझोड करायचे. ते तू बघितलं होतंस, पण लहान वयात तिच्यावर झालेला लैंगिक अत्याचार तू बघितलास अन् त्यानंतर तिचं प्रेतही बघितलंस…तुझ्या कोवळ्या मनावर तो फार मोठा आघात होता. सेक्समुळेच ताई मरण पावली असं तुझ्या मेंदूत रूतून बसलं ते तुझ्या तारूण्यातही तू विसरू शकला नाहीस म्हणून तुझं वैवाहिक आयुष्य असं अयशस्वी झालं…’’

काउंसिलरनं राजाला ती फाईल दाखवली.

‘‘ताईच्या मृत्युचा सेक्सशी काहीच संबंध नाही, नव्हता. हे तू डोक्यातून काढून टाक. शारीरिक दृष्ट्या तू सेक्ससाठी पूर्णपणे सक्षम आहेस. आता शांतपणे विचार कर. आपली मानसिक स्थिती बदलण्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागतील. मन व चित्त स्थिर होण्यासाठी गोळ्यांचा एक छोटासा कोर्स डॉक्टर लिहून देतील…ऑल द बेस्ट.’’

आता एकूणच स्थिती सोपी झाली होती. ईशानं गोव्यातल्या समुद्रकिनाऱ्यावरच्या हॉटेलात बुकिंग केलं, तिला राजाला जुन्या वातावरणातून बाहेर काढायचं होतं. राजा कधीच ईशाचं म्हणणं टाळत नव्हता. तो आनंदानं कबूल झाला.

संध्याकाळी समुद्रकिनारी मनसोक्त भटकंती झाली. निसर्गसंपन्न वातावरणात दोघांच्या चित्तवृत्ती उमळून आल्या. त्याला बिलगून वाळुतून चालताना ईशा म्हणाली, ‘‘राजा, तुझे सद्गुण, तुझी हुशारी, मुख्य म्हणजे दुसऱ्याचं मन समजून घेण्याची तुझी कला यामुळेच मी तुझ्या प्रेमात पडले. आजही माझ्या इतकी भाग्यवान कुणी स्त्री नसेल. लग्नात मी तुला सतत साथ देण्याचं वचन दिलंय. आत्ताही हेच सांगते, सुख दु:ख, यश, अपयश काहीही असलं तरी मी सतत तुझ्यासोबत आहे.’’ राजानं आवेगानं तिला मिठीत घेतलं.

रात्री खोलीत आल्यावर झोपण्याच्यावेळी ईशा म्हणाली, ‘‘आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना? मग तू घाबरू नकोस. तुझ्यासोबत असताना मला काहीही होणार नाही. तू अगदी मोकळ्या मनानं होऊन मला जवळ घे. माझी इच्छा पूर्ण कर. माझ्यासाठी तू एवढं करच!’’

ती परोपरीनं त्याचा उत्साह वाढवत होती. त्याला धीर देत होती. सात रात्री निघून गेल्या. राजाला आता कसलीही धास्ती नव्हती. त्याला आत्मविश्वास वाटत होता. आता त्याला ताईचं प्रेत आठवंत नव्हतं. तो खुशीत होता. रिलॅक्स होता. ईशानं काउंसिलर व राजाच्या आईला फोन करून सांगितलं, ‘‘आम्ही यशस्वी झालो.’’

पहिल्या सेक्सच्यावेळी राजा थोडा नर्व्हस होता. पण मग तो सावरला. त्यानंतर सगळं सुरळीत पार पडलं.

राजानं ईशाला म्हटलं, ‘‘ईशा, तू केवळ देहानंच सुंदर आहेस असं नाही. तुझं हृदयदेखील फार मोठं आहे. माझ्यातला दोष, माझ्यातली कमतरता समजून घेऊन तू मला साथ दिलीस, कधीही त्याबद्दल नाराजी दाखवली नाहीस, बाहेर त्यावर चर्चा होऊ दिली नाहीस, लोकांच्या टीकेला एकटी सामोरी गेलीस. विवाहित असूनही कुमारकिचं आयुष्य तुला जगावं लागलं…मी तुझा ऋणी आहे, अपराधीही आहे.’’

‘‘तुझा दोषच नव्हता रे, नको स्वत:ला दोष देऊस,’’ ईशानं म्हटलं. दोघं गोव्याहून परतली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. राजाच्या आईलाही समाधान वाटलं. दोनच महिन्यात ईशानं बातमी दिली की ती आई होणार आहे.

राजाच्या आईनं तिला ढीगभर आशिर्वाद देत म्हटलं, ‘‘मी जगातली सर्वात भाग्यवान सासू आहे, जिला ईशासारखी सून लाभली आहे.’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...