गृहशोभिका टीम

‘‘ओह! इट्स टू टायरिंग, सो लाँग ट्रिप…’’ घाम पुसत पुनीतनं आपली सूटकेस दारासमोर लावली. डोअरबेल वाजवली अन् दार उघडण्याची वाट बघू लागला. घरात सर्वत्र शांतता होती. कुठं गेली सगळी? त्यात पुन्हा एकदा घंटीचं बटन दाबलं. दाराला कान लावून तो आतली चाहूल घेऊ लागला. तेवढ्यात त्याचं लक्ष दारावर लटकलेल्या कुलुपाकडे गेलं. खिशातून रूमाल काढून पुन्हा एकदा घाम पुसला. खांद्यावरची एयरबॅग सूटकेसवर ठेवली अन् त्यानं इकडेतिकडे बघितलं.

त्याचं घर दोन मजली होतं. त्यानं वरच्या मजल्याकडे नजर टाकली. त्या लेनमधील सगळी घरं एक सारखीच होती. घराचं छप्पर दोन्ही बाजूंनी उतरतं होतं. त्याच्या मधोमध पांढरी भिंत अन् भिंतीवर काळ्या अक्षरात पेंट केलेला घरनंबर वरच्या खिडक्याही बंद होत्या. पडदे ओढलेले होते. ‘कुठं बरं गेले असावेत हे लोक?’ मनाशीच पुटपुटत तो घराच्या मागच्या बाजूला गेला. तेच कुंपण, तेच लॉन अन् तिच झाडं…तीन वर्षांपूर्वी जसं होतं तसंच अजूनही आहे. गॅरेज उघडं होतं, गाडी नव्हती…म्हणजे गाडी घेऊन कुठं गेलेत का? कदाचित ते सकाळपासून वाट बघत असतील अन् आत्ताच त्यांना बाहेर जावं लागलं असेल…पण निदान जाताना दारावर एक चिठ्ठी अडकवायला काय हरकत होती? कधीपर्यंत परत येणार हे तरी समजलं असतं.

पुनीत तिथंच पायऱ्यांवर बसला. संध्याकाळचे सात वाजायला आले होते. अंधार दाटून आला होता. आता पुनीतला काळजी वाटायला लागली. हे लोक कुठं गेले असतील? आईला गाडी चालवता येत नाही अन् बाबांना संध्याकाळचं कमी दिसतं. ड्रायव्हर बोलावला असेल का? एव्हाना त्याच्या पोटात भुकेनं कावळे कोकलू लागले होते. त्यांनं सॅकमधून पाण्याची बाटली काढली अन् थोडं पाणी प्यायला. शेजारी पाजारीही तो कुणाला ओळखंत नव्हता. एक शिखा होती जिला विचारता आलं असतं, पण त्यानं तिला जी वागणूक दिली होती, त्यानंतर तर तिच्यासमोर जाणंही त्याला जमणार नव्हतं.

त्याची फ्लाइट बरीच लेट झाल्यामुळे त्याला घरी पोहोचायला एवढा उशीर झाला होता. पण आईबाबांनी वाट बघायला हवी होती. त्याला थोडा रागही आला. पण तो रागावूही शकत नाही. ज्या परिस्थितीत तो पुन्हा परत आला आहे त्या परिस्थितीत त्याला रागवायचा तर काय त्यांच्याकडे मान वर करून बघण्याचाही हक्क उरलेला नाही. त्यावेळी शिखा आणि आईबाबांना तो ज्या परिस्थितीत सोडून गेला होता, त्यानंतर कोण त्याची वाट बघणार होतं? वाट बघता बघता त्याला तीन वर्षांपूर्वीच्या त्या सगळ्या घटना आठवू लागल्या. आई त्यावेळी किती रडत होती. बाबा खाली मान घालून खुर्चीला खिळून बसले होते.

खरं तर ऑस्ट्रेलियाला जाणं पुनीतसाठी नवं नव्हतं. कारण पूर्वीही तो तिथं जाऊन आला होता. तिथं त्याला एका उत्तम कंपनीत भरगच्च पगाराची नोकरी होती. पण यावेळी त्यानं जे काही सांगितलं होतं, त्यासाठी मात्र कुणाचीच तयारी नव्हती. त्याला क्रिस्टिन नावाच्या एका ऑस्ट्रेलियन मुलीशी लग्न करायचं होतं. त्याला लवकरात लवकर तिथलं नागरिकत्व मिळवायचं होतं. तिथंच सेटल व्हायचं होतं. त्याच्या आईबाबांनाही कळत नव्हतं की आपला आज्ञाकारी, लाजराबुजरा मुलगा एकदम इतकी मोठी उडी कशी काय घेतोय? आत्ता आत्तापर्यंत त्याला कपडे खरेदी करतानाही आईबाबा बरोबर लागायचे, तो ऑस्ट्रेलियाला गेल्यावर इतका बदलला? आईबाबा जुनाट विचारांचे नक्कीच नव्हते. पण काही गोष्टी त्यांना पचवणं जड जात होतं. मुख्य म्हणजे शिखाशी इथं लग्न ठरलेलं असताना तिथं दुसऱ्या परदेशी मुलीशी लग्न करायचं? त्यांना पटतंच नव्हतं. शेवटी त्यांनी स्वत:ला मुलाच्या मोहातून मुक्त करून घेतलं.

शिखा पुनीतची मैत्रीण होती. त्यांचं लग्न ठरलं होतं. दोन्ही कुटुंबातून त्याला सहर्ष संमती होती अन् आता पुनीत म्हणतोय तो क्रिस्टिनशी लग्न करून तिथली सिटीझनशिप घेणार. शिखानं काहीच म्हटलं नाही. ती गप्प, गंभीर होती. शेवटी आईवडिलांचा आशिर्वाद, निरोप काहीच न घेता पुनीत निघून गेला.

पुनीतनं ऑस्ट्रेलियात क्रिस्टिनशी लग्न केलं. तिथली सिटीझनशिपही मिळवली, पण वर्षभरातच त्याची अक्कल ठिकाणावर आली. तो ट्रिपिकल भारतीय कुटुंबातला मुलगा होता. घरात कुठलंही काम न करणारा अन् क्रिस्टिना तर लहानपणापासून स्वच्छंद वातावरणात वाढलेली. तिला मुळात घरकामाचा कंटाळा होता. नाईलाजानं जे करावं लागायचं, त्यातही तिला पुनीतनं मदत करावी असं वाटायचं. पुनीतला स्वयंपाक करताना आईच्या हातच्या गरमागरम मऊसूत पोळ्या आठवायच्या, मॉलमध्ये भाजी आणायला गेला की डोळ्यापुढे भाजीच्या पिशव्या घेऊन येणारे बाबा दिसायचे. क्रिस्टिनाचं कुणाबरोबरही मोकळं-ढाकळं वागणं, त्याला खूप खटकायचं. अशावेळी हमखास शिखाची आठवण यायची. शालीन, सोज्वळ शिखा…साधी राहणी, शांत प्रेमळ स्वभाव लवकरच क्रिस्टिनालाही पुनीतचा कंटाळा आला. दोघांमध्ये सतत भांडणं, सतत वाद अगदी नको नको झालं त्याला. शेवटी घटस्फोट घेणं नक्की झालं. पण त्यात सगळ्या सोपस्कारांत तीन वर्ष गेली.

परदेशी मुलीशी लग्न करणं वाटतं तेवढं सोपं नसतं. मुळात त्यांच्या आणि आपल्या संस्कारात, संस्कृतीत खूप फरक आहे. नव्याची नवलाई संपता संपता सगळंच उघडं वागडं सत्य समोर येतं. ते पचवणं भारतीय घरातल्या मुलांना शक्यच नसतं. आईवडिल, होणारी वधू सर्वांना दुखवून तो इथं आला अन् मिळवलं काय? तर फक्त फ्रस्टे्रेशन. ज्या क्रिस्टिनसाठी त्यानं शिखाला दूर लोटलं होतं, तिच क्रिस्टिन आज त्याला डोळ्यांपुढे नको वाटत होती. तिचा उधळ्या स्वभाव म्हणजे तर डोकेदुखीच ठरला होता. स्वत:च्या कमाईचा पैसा उधळून वर पुनीतचाही पैसा तिला हवा असायचा. शिल्लक टाकायला एक डॉलरही उरत नव्हता. अशावेळी त्याला अल्पसंतुष्ट, समाधानी वृत्तीची शिखा आठवायची. खरोखर हातातलं रत्न सोडून त्यानं गारगोटी निवडली होती.

घटस्फोट झाला. तिथलं बिऱ्हाड मोडून, नोकरीचा राजीनामा देऊन पुनीत भारतात परतला. त्यानं आईला तसं कळवलंही होतं. पण मग ती आज घरी का नाहीए? काय करावं? कुणाला विचारावं. या विचारात असतानाच त्याला समोरून येणारे रमेशकाका दिसले. दोन घरं पलिकडेच त्यांचा बंगला होता. त्यांनी पुनीतला ओळखलं अन् विचारलं, ‘‘अरे पुनीत? कधी आलास?’’

काकांना नमस्कार करून पुनीतनं म्हटलं, ‘‘बराच वेळ झाला. आईबाबा कुठं आहेत?’’

‘‘अरे, बाबांना बरं नव्हतं वाटत. त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय. श्वास घ्यायला त्रास होत होता.’’

‘‘बाबांना हॉस्पिटलमध्ये तुम्ही नेलंत का?’’

‘‘नाही. शिखानंच नेलं.’’

‘‘शिखा?’’

पुनीत आश्चर्यानं त्यांच्याकडे बघत होता. ‘‘अरे, तुला ठाऊक नसेल शिखा आता इथंच राहते. सेंट्रल स्कूलमध्ये नोकरी आहे तिला.’’

पुनीत गप्प होता. रमेश काकाच पुढे म्हणाले, ‘‘दोन वर्षांपूर्वी तिचे आईवडिल एका अपघातात मृत्यूमुखी पडले, तेव्हापासून शिखा इथंच राहतेय. तुझ्या आईबाबांची सर्वतोपरी काळजी घेतेय…’’

पुनीतला स्वत:चीच लाज वाटली. त्याच्यामुळे आईबाबा, शिखा सर्वांनाच केवढा त्रास झालाय. तो स्वत:च्याच दु:खात मग्न होता…‘‘काका, बाबा कुठल्या इस्पितळात आहेत? मी जातो तिथे.’’ त्यानं म्हटलं.

काकांनी त्याला हॉस्पिटलचा पत्ता दिला. त्यानं आपलं सामान त्यांच्या घरी ठेवलं अन् तो लगेच हॉस्पिटलमध्ये निघाला.

तिथं पोहोचल्यावर त्याला आई व शिखा वेटिंगलाउंजमध्ये दिसल्या. त्यानं सरळ जाऊन आईला मिठी मारली अन् तो गदगदून रडू लागला. बाबा कसे आहेत हेदेखील त्याला विचारायचं सुचलं नाही.

आईनं त्याला थोपटून शांत केलं. मग त्याच्या डोक्यावरून हात फिरवत तिनं म्हटलं, ‘‘काळजीचं कारण नाहीए. बाबा आता बरे आहेत. शिखानं अगदी वेळेत निर्णय घेऊन त्यांना इथ आणलं, म्हणूनच त्यांचा जीव वाचला. तू गेल्यापासून शिखाच आम्हाला सांभाळते आहे.’’

पुनीतनं अत्यंत कृतज्ञतेनं तिच्याकडे बघितलं. ती संकोचून थोडी दूर जाऊन उभी होती. तिचा निरागस चेहरा बघून त्याला भरून आलं. स्वत:चा किती धिक्कार करू असं वाटलं त्याला.

‘‘शिखाचे आईबाबा एका अपघातात अचानक गेले,’’ आईपुढे सांगू लागली, ‘‘शिखा अगदीच एकटी पडली. मीच तिला आपल्या घरी घेऊन आले. आम्हीही खूप एकटे होतो. तू गेल्यावर…शिखानं स्वत:ला सावरलं अन् म्हणाली, ‘यापुढे आपणच तिघं एकमेकांचा आधार आहोत. कुणीही स्वत:ला एकटं, दुर्बळ, बिच्चारं समजायचं नाही,’ तेव्हापासून ती आमचा मुलगा बनून आम्हाला सांभाळते आहे.’’

पुनीत खाली मान घालून ऐकत होता. काही क्षण शांततेत गेले. मग आई म्हणाली, ‘‘तू ज्या मृगजळामागे धावत होतास, त्यात फक्त दमछाक झाली. आंधळेपणानं धावण्याच्या शर्यतीत हाती काहीच लागत नाही. हव्यास कधीच संपत नाही. पण आज तू, ते सर्व सोडून परत आला आहेस, मला खूप समाधान वाटलं. हे घर तुझंच आहे. आता शिखाशी लग्न करून सुखाचा संसार थाट. शिखाशी बोल…बाबांशी आता तुला भेटता बोलता येणार नाही. डॉक्टरांनी भेटायला नाही म्हटलं. त्यांना विश्रांतीची गरज आहे. उद्या निवांतपणे तू त्यांना भेट.’’

पुनीत हळूच उठला अन् शिखाजवळ गेला. ‘‘शिखा, मला क्षमा करू शकशील? आपण नवं आयुष्य सुरू करूयात,’’ त्यानं शिखाचे हात आपल्या हातात घेतले.

शिखानं फक्त मान डोलावली. त्यानं तिचे हात अधिकच घट्ट धरले. यापुढे तो कधीच तिला अंतर देणार नव्हता.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...