– मोनिका गुप्ता

आपल्या देशात प्रेमात पडणे तितके कठीण नाही, जितके प्रेम निभावण्यासाठी प्रियकर-प्रेयसीचे एकमेकांना भेटणे. शहरांमध्ये तर प्रेमी युगुलांनी भेटण्यासाठी ठिकाण ठरविणे हे महासंकट असते. शाळा किंवा नोकरीच्या ठिकाणी भेटल्यास लैला-मजनूचा टॅग लागतो. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी रोमान्स करायचे ठरविले तर लफंगे, मवाली त्रास देतात.

केवळ बोलण्यापुरते अशा भेटींसाठी मॉल सुरक्षित असतात, पण तिथे कोणीतरी ओळखीचे दिसण्याची भीती असते किंवा तेथील सीसीटीव्हीत अडकण्याची शक्यता असते. अशा परिस्थितित प्रेमी जीव एखाद्या पार्कमध्ये प्रेमाच्या गुजगोष्टी करण्याचा विचार करतात, शिवाय पार्कसारख्या ठिकाणी जाणे खिशालाही परवडणारे असते. इतर ठिकाणी अनावश्यक खर्च वाढण्याची भीती आहे. पण पार्कमध्ये टपोरी, लफंग्यांपासून बचाव करणे फारच कठीण होऊन जाते.

पूर्वी प्रेमीयुगूल एकमेकांना भेटण्यासाठी आसुसलेले असत, पण आज ज्यांना आपण पाहतो ते कुठेही उघडपणे प्रेमात हरवलेले दिसतात. काहीजण पार्कमध्ये, काही किल्ल्यात लपूनछपून प्रेम करताना दिसतात. पण त्यांना लुबडण्यासाठी लुटारूही आसपासच फिरत असतात.

लुटारू कोणीही असू शकतात. कुणी पोलीस किंवा मग तृतीयपंथी. त्यांची बरीच रूपे असतात, जी ओळखणे सोपे नाही.

अशाच काही लुटारूंनी रिया आणि सुमितला लुटले. रिया आणि सुमित बऱ्याचदा रविवारी एकाच गार्डनमध्ये भेटत असत, पण त्यांना माहीत नव्हते की ते कोणाच्यातरी नजरेचे शिकार ठरत आहेत.

रिया आणि सुमित जेव्हा कधी गार्डनमध्ये येत, तेव्हा त्यांची जागा ठरलेली असायची. ते ठरलेल्याच बाकडयावर येऊन बसत. तासन्तास एकमेकांसोबत बसून रोमँटिक गप्पा मारत. त्या रविवारीही दोघे त्याच बाकावर येऊन बसले. गप्पांच्या ओघात कधी संध्याकाळ झाली ते त्यांना कळलेदेखील नाही. रिया घरी जाण्यासाठी घाई करू लागली, पण सोनेरी संध्याकाळ पाहून सुमित अधिकच रोमँटिक झाला. रिया त्याला नकार देऊ शकली नाही आणि दोघेही आणखी थोडा वेळ तेथे थांबले.

अंधार पडला होता. रिया सुमितला म्हणाली, ‘‘सुमित, आता आपण निघायला हवे. खूपच अंधार झाला आहे.’’

जाण्यापूर्वी, दोघेही एकमेकांना मिठी मारणार इतक्यात दोन पोलीस त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने सुमितची कॉलर पकडून मारू लागला. रियाचीही छेड काढण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबत नेमके काय घडतेय, हे रिया आणि सुमितला समजतच नव्हते.

पोलिसांनी रियाची सोन्याची अंगठी, गळयातील चेन आणि सुमितचे एटीएम कार्ड, रोख रक्कम सर्व हिसकावून घेतले. सोबतच पुन्हा या पार्कमध्ये दिसल्यास किंवा घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास वाईट परिणाम होतील अशी धमकीही दिली.

त्यावेळी रिया आणि सुमित घाबरले होते. त्यामुळे निमुटपणे तेथून निघून गेले. मात्र दोघांच्या मनात कितीतरी प्रश्न निर्माण झाले होते. पोलीस असे का वागतील, फार तर ते ओरडतील, समजावतील. पण इथे तर त्यांनी आपल्याला लुबाडले. मग त्यांनी पोलीस ठाण्यात जायचे ठरविले.

पोलीस ठाण्यात दोघांनी घडलेला प्रकार सांगितला. सर्व हकिकत ऐकल्यावर पोलिसांचे म्हणणे होते की ते दोघे पोलीस नव्हतेच. हे ऐकून रिया आणि सुमित एकमेकांकडे बघतच राहिले. दोघांनाही आश्चर्य वाटले. मनोमन त्यांना असा प्रश्न भेडसावत होता की जर ते पोलीस नव्हते तर मग कोण होते ?

इन्स्पेक्टरने रिया आणि सुमितला समजावत सांगितले की हे लोक वेषांतर करून वेगवेगळया ग्रुपमध्ये विभागले जातात. त्यांचे काम असते लोकांना लुबाडणे. ते जास्त करून पोलीस किंवा तृतीयपंथी बनून लुटतात. म्हणून अशा ठिकाणी जाताना काळजी घेणे गरजेचे आहे.

जर तुम्हीही प्रेमीयुगूल असाल आणि अशाच प्रकारे पार्कसारख्या ठिकाणी जात असाल तर तेथे लुबाडणुकीपासून वाचण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या :

* फिरताना वेळेची मर्यादा पाळा.

* अशा ठिकाणी दागिने किंवा गरजेपेक्षा जास्त पैसे स्वत:जवळ ठेवू नका.

* स्वत:जवळ पेपर स्प्रे ठेवा.

* सामसूम ठिकाणी रात्री उशिरापर्यंत थांबू नका.

* तुम्ही एकाच ठिकाणी परत परत जात असाल तर साधेपणानेच जा.

* महिला हेल्पलाईन क्रमांक स्वत:जवळ ठेवा.

* फोनचे लोकेशन ऑन ठेवा.

* असे वागू नका की ज्यामुळे कोणी तुमच्याकडे आकर्षित होईल.

आजच्या काळात लूटमार हा धंदा बनला आहे. आपण अनेकदा पाहतो की तृतीयपंथी अशा ठिकाणी जास्त करून दिसतात, जिथे प्रेमीयुगुलांचा वावर असतो. शिवाय यात बरेचसे तृतीयपंथी नसतातच. तृतीयपंथींच्या वेशात सामान्य लोक लूटमार करू लागले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी आपल्या पार्टनरसोबत अंतर ठेवूनच बसा, जेणेकरून कोणी तुम्हाला ब्लॅकमेल करू शकणार नाही.

वर्दीचा रुबाबच असा असतो की कुणीही त्याला घाबरतो. अशा वेळी तोतया पोलीस कसा ओळखायचा, हा मुद्दा गंभीर आहे. यासंदर्भात पोलीस कर्मचारी रविंदर सिंह यांनी काही अशा गोष्टी सांगितल्या ज्यामुळे तोतया पोलिसाला ओळखणे सोपे होईल

* तोतया पोलिसाच्या गणवेशावर त्याच्या नावाचा बॅच नसतो.

* नीट पाहिल्यास लक्षात येईल की पोलिसांचे बूट वेगळे असतात. त्याचा रंग तपकिरी असतो आणि तोतया पोलीस हे विसरतात. कुठलेही बूट घालतात. अशावेळी तुम्हाला त्यांना सहज ओळखता येईल.

* त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरूनही तुम्ही त्यांना ओळखू शकाल. कोणताच पोलीस कर्मचारी छोटया छोटया कारणांसाठी तुमच्यावर हात उगारणार नाही.

* त्यांचे केस वेगळयाप्रकारे कापलेले असतात.

* खरा पोलीस तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही. तो नम्रपणेच वागेल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...