कथा * आशा सोमलवार

शाळेतून आलेल्या तारेशनं संतापानं आपलं दफ्तर फेकून आईकडे धाव घेतली, ‘‘आई, कसलं घाणेरडं नाव ठेवलं आहेस गं माझं. तारेश…वर आणखी आडनाव तारकर. मुलं मला चिडवतात. सर्व हसतात…’’ बोलता बोलता तो रडकुंडीला आला.

आईनं त्याला जवळ घेत विचारलं, ‘‘काय म्हणतात?’’

‘‘तारू तारकर कुत्र्यावर वारकर…’’

‘‘वेडी आहेत ती मुलं…अरे, तुझ्या आजीनं ठेवलंय हे नाव, तू झालास त्या दिवशी पौर्णिमा होती. तारेश म्हणजे ताऱ्यांचा राजा म्हणजे चंद्र. इतकं सुंदर नाव आहे. तुझ्या रूपाला ते शोभतंही आहे…’’

‘‘पण माझं नाव आजीनं का ठेवलं? शाळेत मला जायचंय, आजीला नव्हतं जायचं…मला नाही आवडत हे नाव…बदलून टाकूयात.’’ तारेशचा थटथयाट संपत नव्हता.

‘‘अरे, तू तारेश आहेस म्हणूनच तुला चंद्रिका भेटेल…सुंदर सून आम्हाला मिळेल,’’ आईनं समजूत घालत म्हटलं.

‘‘नकोय मला चंद्रिका…मला तर सूर्य आवडतो. झगझगीत प्रकाश अन् ऊब देणारा.’’ तारेश म्हणाला. तेव्हा त्याला कुठं समजत होतं की त्याला चंद्रिका का नको होती अन् सूर्यच का आवंडत होता?

‘‘अभिनंदन सर! मुलगी झाली आहे,’’ नर्सनं येऊन सांगितलं तसा तारेश भानावर आला.

‘‘मी तिला बघू शकतो? हात लावू शकतो?’’ त्यानं अधीरपणे विचारलं.

‘‘हो…हो…या, आत या.’’ नर्सनं हसून म्हटलं. नर्सनं हळूवारपणे ते बाळ तारेशच्या हातात दिलं. किती नाजूक, केवढीशी…गोरीपान, मिटलेले डोळे…काळं भोर जावळ…तारेशनं हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले अन् पुन्हा नर्सच्या हातात तिला सोपवलं. नर्सनं तिला तिच्या सरोगेट आईजवळ झोपवलं. तारेश मनात म्हणाला, ‘‘सोमल, तुझी आठवण आली या बाळाला बघून…अगदी तुझंच रूप आहे रे…’’

शाळकरी वयातच तारेश इतर मुलांपेक्षा वेगळा होता. अभ्यासात तो भलताच हुशार होता. पण त्याच्या मनात मुलींविषयी अजिबात आकर्षण नव्हतं. मात्र त्याला त्याचे स्पोर्ट्स सर अशोक फार आवडायचे. त्यांचा सहवास मिळावा म्हणून तो गेम्स पीरियड कधी टाळत नसे. जिमनास्टिक शिकवताना सरांचा हात अंगाला लागला की तो मोहरून जायचा. त्या स्पर्शानं तो सुखावत असे. अशोक सर फक्त तो एक मेहनती विद्यार्थी आहे म्हणून त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायचे. यापलीकडे त्यांना तारेशविषयी फार काही वाटलं नव्हतं.

कॉलेजच्या वयाला जेव्हा इतर मित्र मुलींवर इंप्रेशन मारण्यात दंग असायचे. तेव्हा तारेश स्वत:तच दंग असे. पण सोमलला बघितलं अन् तो जणू त्याच्या प्रेमातच पडला. सोमललाही तारक आवडला. त्यांची चांगलीच मैत्री झाली. ज्या दिवशी कॉलेज नसे, त्या दिवशी तारकच्या जिवाची घालमेल व्हायची. सोमल कधी एकदा दिसतो असं त्याला व्हायचं.

कॉलेजचं शिक्षण संपलं अन् बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्री घ्यायची असं दोघांनी ठरवलं. दोघं एकत्र राहतील, एकमेकांची सोबत, मदत होईल या उद्देशाने दोघांच्या घरच्यांनीही आनंदानं परवानगी दिली. दिल्लीच्या उत्तम कॉलेजात दोघांना एडनिशन मिळालं. एका जवळच्याच कॉलनीत वन रूम किचन फ्लॅट दोघांनी मिळून भाड्यानं घेतला.

कॉलेज व्यवस्थित सुरू होतं. कधी ते दोघं घरीच स्वयंपाक करायचे, कधी बाहेर जेवण घ्यायचे. दोघांची जोडी कॉलेजात ‘रामलक्ष्मण’ म्हणून ओळखली जायची. अभ्यासात दोघंही हुशार होते. प्रोफेसर्स त्यांच्यावर खुश होते.

बघता बघता शेवटचं सेमिस्टर सुरू झालं. कॉलेजात कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू झाले होते. अनेक मुलं चांगल्या चांगल्या कंपन्यांनी निवडून घेतली. सोमलला हैदराबादच्या कंपनीत नोकरी मिळाली तर तारेशला बंगलोरच्या कंपनीत. दोघांनाही उत्तम कंपनीत भरगच्च पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या. त्यामुळे त्यांना आनंद तर झाला होता. पण एकमेकांपासून दूर राहावं लागेल हा विचार मात्र अस्वस्थ करत होता. दोघंही निर्णय घेताना हवालदिल झाले होते. नोकरी घ्यायची म्हटलं तर मित्र सोडावा लागणार. मित्राजवळ रहायचं तर नोकरी सोडावी लागणार…कठिण अवस्था होती.

त्या रात्री एकमेकांना मिठी मारून दोघंही खूप रडले. जेवणही करायला सुचलं नाही. त्या रात्री त्यांना कळलं की ते एकमेकांसाठीच आहेत. का त्यांना एकमेकांशिवाय करमत नाही, का ते एकमेकांशिवय राहू शकत नाही याचा उलगडा त्यांना त्या रात्री झाला. जगाच्या दृष्टीनं त्यांचं नातं, धर्माविरूद्ध किंवा अनैसर्गिक होतं. कारण दोघंही ‘गे’ होते. पण त्यांना त्याची खंत नव्हती.

दोघांनीही आपल्या प्लेसमेंट रद्द केल्या. त्यांनी दिल्लीत राहूनच काम मिळवण्याचा प्रयत्न केला अन् योगायोग असा की दोघांनाही एकाच मल्टीनॅशनल कंपनीत भरपूर पगाराची नोकरी मिळाली. दोघांचंही आयुष्य रूळावर आलं.

शिक्षण झालं. उत्तम नोकरी मिळाली म्हणताना दोघांच्याही घरी आता त्यांच्या लग्नाचा विषय ऐरणीवर आला. दोघांच्या घरी मुली बघायला सुरूवात झाली. पण हे दोघं आपल्यातच दंग! त्यांचं जगच वेगळं होतं. बाहेर केवढं वादळ घोंगावतंय याची त्यांना कल्पनाही नव्हती.

वारंवार जेव्हा मुली नाकारल्या जायला लागल्या, तेव्हा तारेशच्या आईच्या मनात शंका आली. त्याचं कुठं प्रेमप्रकरण तर नाहीए? कुणी मुलगी त्यानं पसंत करून ठेवली आहे का?

सोमलच्याही घरी हीच परिस्थिती होती. नेमकं काय कारण आहे, सोमल न बघताच मुली का नाकारतो आहे हे जाणून घेण्यासाठी सोमलची आई दिल्लीला त्यांच्या फ्लॅटवर पोहोचली. येण्याबद्दल तिनं काहीच कळवलं नव्हतं. त्यांचे दोघांचे हावभाव बघून तिला काही तरी संशय आला. तिने फोन करून तारेशच्या आईवडिलांना व सोमलच्या घरच्यांनाही बोलावून घेतलं.

सगळेच एकत्र समोर बसलेले…दोन्ही मुलांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की ते दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत. एकमेकांसोबतच आयुष्य घालवू इच्छितात. त्यांच्यासाठी मुली बघणं बंद करा. प्रथम तर दोघांच्याही घरच्यांनी समाजात केवढी ब्रेअब्रू होईल, लोक काय म्हणतील वगैरे सांगून बघितलं. सोमलच्या आईनं तर ‘‘तुझ्या बहिणीचं लग्न अशामुळे होणार नाही,’’ असा धाक घातला. पण दोघंही आपल्या निर्णयावर ठाम होते. मुलं ऐकत नाहीत म्हणताना चिडलेल्या अन् दुखावल्या गेलेल्या दोघांच्याही घरच्यांनी एकमेकांच्या कुटुंबांना भरपूर दोष दिला. खूप भांडाभांडी झाली. बातमी सर्व अपार्टमेंटमध्ये पसरली. घरमालकांन जागा सोडा म्हणून फर्मान काढलं.

एवढ्यावरही थांबलं नाही. बातमी त्यांच्या ऑफिसमध्येही पोहोचली. प्रत्येक जण त्यांच्याकडे विचित्र नजरेनं बघत होता. जणू ते परग्रहावरून आलेले लोक आहेत. कालपर्यंत जे सहकारी एकत्र काम करत होते, एकत्र जेवत होते, पार्ट्या, पिकनिक करत होते ते आता चक्क टाळू लागले. बघताच तोंड फिरवू लागले. दोघांना अस्पृश्य असल्यासारखे वागवू लागले. त्यांना ऑफिसात काम करणं अशक्य झालं.

सोमलच्या बॉसनं तर त्याला एकट्याला बोलावून घेऊन समजावलं, ‘‘हे बघ सोमल, तुमच्यामुळे ऑफिसातलं वातावरण बिघडतंय. ऑफिसमध्ये लोक कामं कमी करताहेत, तुमच्याबद्दलच्या चर्चेत वेळ जास्त घालवताहेत. मला वाटतं, तुम्ही दोघांनी राजीनामा द्यावा. आम्ही तुम्हाला काढलं तर तुम्हाला इतरत्र नोकरी मिळवताना अडचण येईल. तुम्ही राजीनामा दिला तर तुमच्या चांगल्या सीपीमुळे तुम्ही दुसरीकडे कुठं पुन्हा जॉब मिळवू शकाल.’’

काळ तर कठिणच होता. शेवटी दोघांनी दिल्ली सोडायचा निर्णय घेतला. त्यांना मुंबईत नोकरी मिळाली. तेवढ्यात सोमलच्या एकुलत्या एका बहिणीचं राखीचं लग्नही झालं, पण घरच्यांनी त्याला कळवलंही नाही.

घरच्यांनी नाव टाकलं होतं. दिल्लीतल्या मित्रांशी संपर्क तुटला होता. ऑफिसचे सहकारीही दुरावले होते. मुंबईत त्यांना कुणीही ओळखत नव्हतं. त्यांचं जग त्या दोघांपुरतंच मर्यादित होतं. पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य सुरू झालं होतं.

सोमलच्या एका चुलत वहिनीनं लीनानं मात्र एवढं सगळं झाल्यावरही सोमलशी संपर्क ठेवला होता.

एकदा अवचितच लीना वहिनीचा फोन आला की राखीच्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. ऐकून सोमलला फारच दु:ख झालं. बहिणीवर फार माया होती त्याची.

यावेळी तिला आधाराची गरज असेल असा विचार करून तो तडक तिकिट काढून गाडीत बसला.

राखीच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याला मिठी मारून राखी रडू लागली. तेवढ्यात तिची सासू आली अन् तिला ओढत आत घेऊन गेली. सोमलला ऐकवलं, की त्यान पुन्हा या घरात पाय ठेवू नये. तिच त्याची व राखीची शेवटची भेट होती.

एका सुट्टीच्या दिवशी दोघं एक सिनेमा बघत होते. त्यात तीन पुरूष एका बाळाला वाढवतात. त्या बाळाला आई नसते.

सोमलनं विचारलं, ‘‘तारेश, आपल्याला बाळ होऊ शकतं?’’

‘‘कुणास ठाऊक! पण बाळ तर आईच्या गर्भाशयातच वाढतं ना? मग कसं होणार?’’ तारेशनं म्हटलं.

‘‘काही तरी मार्ग असेलच ना? विज्ञानानं एवढी प्रगती केली आहे…आपण सरोगसीची मदत घेतली तर?’’

‘‘तसं करता येईल. पण त्यात काही कायदेशीर अडचणी असू शकतात. कायद्यानं आपल्यासारख्यांना सरोगसीची परवानगी आहे का हे बघावं लागेल. आपल्यात सरोगेट मदर कोण देणार? आपले दोघांचेही नातलग आपल्याला दुरावले आहेत, तरीही आपण या विषयातल्या एखाद्या तज्ञाला भेटूयात. त्याच्याकडून खात्रीची माहिती मिळेल. आता हा विषय नकोच!’’ तारेशनं त्या दिवशी तो विषय तिथंच थांबवला.

एकदा काही कारणानं तारेश एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला होता. तिथं आयव्हीएफ सेंटर बघून त्याचे पाय तिथंच थबकले. त्याला एकदम सोमलचं स्वप्नं ‘आपलं बाळ असावं’ आठवलं. त्यानं आत जाऊन तिथल्या प्रमुख डॉक्टर सरोज यांची अपॉइंटमेंट मिळवली अन् ठरलेल्या दिवशी सोमलला बरोबर घेऊन तो तिथं पोहोचला.

डॉ. सरोजनं त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं अन् सांगितलं की सोमलचं पिता बनण्याचं स्वप्नं आयव्हीएफ अन् सरोगसीच्या माध्यमातून वास्तवात येऊ शकतं.

दोघांच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव बघून डॉ. पुढे म्हणाल्या, ‘‘तुम्ही ऐकलंच असेल की अभिनेता तुषार कपूर या सरोगसीच्या टेक्निकचा वापर करून सिंगल पिता झाला आहे. सरोगसी टेक्निकच्याच माध्यमातून कुणा फिल्म इंडस्ट्रीवाल्याला जुळी मुलं आहेत. आमच्याकडे बऱ्याच सिंगल पुरूषांनी आई, वडिल होण्याची इच्छा दर्शवली आहे आणि त्यासाठी रजिस्ट्रेशनही केलं आहे. तुम्हीही रजिस्ट्रेशन करू शकता.’’

‘‘पण भाड्यानं गर्भाशय कसं मिळेल?’’

‘‘त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुणा जवळच्या नातलग किंवा मित्रांची मदत घ्यावी लागेल.’’

‘‘आता कुणाची मदत घ्यायची ते तुम्हीच बघा. ठरवा त्या बाबतीत. मी मदत करू शकत नाही,’’ एवढं बोलून डॉक्टरांनी पुढल्या व्हिजिटरसाठी बेल वाजवली.

दोघं घरी परतले. सोमलला एकदम लीना वहिनीची आठवण झाली. त्यानं तिला फोन लावला. ‘‘हॅलो वहिनी, कशी आहेस?’’

‘‘सोमल भाऊजी, आज कशी काय आठवण आली?’’ तिनं प्रेमानं विचारलं. मग सोमलनं तिला सर्व परिस्थिती सांगितली अन् तिची मदत मागितली.

तिनं शांतपणे ऐकून घेतलं. मग म्हणाली, ‘‘मला क्षमा करा, सोमल भाऊजी, पण मी तुमची मदत करू शकणार नाही. मुळात तुमचे भाऊ तयार होणार नाहीत आणि माझ्यासाठी माझा नवरा आणि कुटुंब महत्त्वाचं आहे. तुम्हाला कळतंय ना? मला क्षमा करा.’’

सोमलच्या मनातली अंधुकशी आशाही संपली. पण तारेशनं ठरवलं, इंटरनेटची मदत घ्यायची. इंटरनेटवर हवी ती माहिती मिळवता येते. दोघंही आता उत्साहानं इंटरनेटवर शोध घेऊ लागले. त्यातच एका प्रेस रिपोर्टरची कव्हर स्टोरी त्यांच्या वाचण्यात आली. तिनं लिहिलं होतं की गुजरातमध्ये आणंद या गावी ‘सरोगेट मदर’ सहज उपलब्ध होतात. इथं सरोगसीच्या माध्यमातून किमान १०० बाळं जन्माला आली आहेत. हे वाचताच दोघांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी सरळ आणंद गाठलं. कारण इथंच त्यांचं स्वप्नं प्रत्यक्षात येणार होतं. तिथं एका टेस्ट ट्यूब बेबी क्लिनिकच्या बाहेरच त्यांना एक दलाल भेटला. त्यांचं नवखेपण आणि बाळाबद्दलची अतोनात ओढ अन् असोशी बघून त्यांच्याकडून भरपूर पैसे घेतले. हा दलाल सरोगसीसाठी भाड्यानं गर्भाशय मिळवून देण्याचा व्यवसाय करत होता. त्यानं आपल्या गर्भाशयात मूल वाढवण्यासाठी तयार असलेल्या स्त्रीशी त्यांची भेट घडवून आणली. दोनच दिवसात सर्व औपचारिक गोष्टींची पूर्तता करून दोघं मुंबईला परत आले

तेवढ्यात एक दुदैर्वी घटना घडली आणि तारेशच्या आयुष्यात अंधारच पसरला. दोघं मित्र पिता होण्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि पहिल्या पावसात मनसोक्त भिजण्यासाठी खंडाळ्याला जायला निघाले होते. तेवढ्यात हायवेवर भरधाव वेगानं येणाऱ्या एका ट्रकनं त्यांच्या गाडीला धडक दिली. दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत इस्पितळात दाखल केलं, पण सोमल हे जग सोडून गेला. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकूनही घरून कोणी आलं नाही.

एका महिन्याने त्या दलालाचा फोन आला. तारेशनं त्याला घडलेली घटना सांगितली आणि मृत सोमलची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचेच गोठवलेले शुक्राणू वापरून बाळ जन्माला घालण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी दलालानं अजून काही रकमेची मागणी केली. तारेशनं साठवलेला सर्व पैसा खर्च केला.

सगळ्या औपचारिक बाबींची पूर्तता झाली आणि तारेशचे स्पर्म बँकेत सुरक्षित ठेवलेले शुक्राणू अन् आईचं स्त्रीबीज यांचा संयोग घडवून सरोगेट आईच्या गर्भाशयात भ्रूण वाढेल अशी व्यवस्था केली गेली. नऊ महिने पूर्ण झाले अन् बाळाचा जन्म झाला. ती मुलगी होती…सोमलची मुलगी.

एकट्यानं तान्हं बाळ वाढवणं सोपं नाही हे तारेश जाणून होता. पण सोमलचं स्वप्नं पूर्ण करणं हाच त्याच्या आयुष्याचा एकमेव उद्देश उरला होता. त्यासाठी तो मानसिक दृष्ट्याही स्वत:ला सक्षम करत होता.

कॉन्टॅ्रक्टप्रमाणे सरोगेट आईनं दोन महिने मुलीला आपलं दूध पाजलं आणि नंतर तारेशच्या हातात ते बाळ ठेवून ती निघून गेली.

त्या एवढ्याशा मुलीला घेऊन तारेश सोमलच्या घरी गेला. ही मुलगी सोमलची आहे. त्याची इच्छा होती म्हणूनच या मुलीचा जन्म झाला आहे, हे सांगितलं. सोमलची विधवा बहिण राखी पटकन् पुढे आली. तेवढ्यात त्याच्या आईवडिलांनी तिला अडवलं.

तारेश म्हणाला, ‘‘मला ठाऊक आहे, तुम्ही माझा तिरस्कार करता. तुमचा माझ्यावर राग आहे. पण या बाळात तुमच्या मुलाचा अंश आहे. सोमल जिवंत असता तर त्यालाही बाळासाठी आजीआजोबा व आत्याचे आर्शिवाद व प्रेम मिळायला हवं हेच वाटलं असतं. मी हर प्रयत्नानं या बाळाला वाढवीन. मोठं करीन. कारण ही मुलगी सोमलची आहे. तुम्ही तिला नाकारलीत तरी मी तिला वाढवीनच.’’ तो मुलीला घेऊन माघारी वळला.

दाराबाहेर त्याचं पाऊल पडण्याआधीच मागून सोमलच्या आईची हाक ऐकू आली, ‘‘थांब…’’

तारेशनं वळून बघितलं. बाळाचे आजीआजोबा आपले अश्रू पुसत पुढे येत होते.

आजोबा म्हणाले, ‘‘आमचा मुलगा गेला तरी त्याची ही मुलगी आम्ही आमच्यापासून दूर होऊ देणार नाही. आम्ही हिला वाढवू.  उत्तम सांभाळू. आमची दुधावरची साय आहे ती. तुझे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही…’’

तो म्हणाला, ‘‘पण, ही मुलगी हे आम्हा दोघांचं स्वप्नं होतं?’’

‘‘होय…तूच या मुलीचा बाप असशील पण आता तिला आईची जास्त गरज आहे…कळतंय ना तुला? तुझी हरकत नसेल तर राखी या बाळाची आई होईल.’’ सोमलची आई म्हणाली.

‘‘पण…पण तुम्हाला खरं काय ते ठाऊक आहे. राखीला मी पत्नीसुख देऊ शकत नाही.’’ गोंधळलेल्या तारेशनं म्हटलं.

‘‘मला पत्नीचं नाही, आईचं सुख हवंय, मी आई होण्याचं सुख अनुभवू इच्छिते.’’

राखीनं पुढं होऊन बाळाला आपल्याकडे घेत म्हटलं.

राकेशला वाटलं, ‘बाळाच्या त्या निरागस चेहऱ्यात जणू सोमलचाच तृप्त, समाधानानं उजळलेला चेहरा तो बघतोय…’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...