कथा * रेखा नाबर

चल उतर लवकर स्टेशन आलं.’’

‘‘मानसी, स्टेशन आलय. पण चर्नीरोड, चर्चगेट यायला अजून दोन स्टेशन्स आहेत झोपली होतीस का?’’

‘‘चांगली जागी आहे मी. चर्नीरोडलाच उतरायचय. चल लवकर.’’

मानसीने सुरभीला खाली उतरण्यास भाग पाडले. एरवी बडबड करणारी मानसी आज दादरला चढल्यापासून डोळे मिटून गप्प बसली होती.

‘‘मानसी, बरं वाटत नाहीए का? आज अगदी गुमसुम आहेस.’’

‘‘तेच सांगायचंय तुला. चल, समोरच्या हॉटेलात बसू या.’’

‘‘काय बिघडलं असेल हिचं? सुरभीच्या मनात तर्क विर्तकाची चक्रे फिरू लागली.’’

‘‘सुरभी, आईबाबांनी माझं लग्न ठरवलंय.’’

‘‘काय? तुला न विचारताच?’’

‘‘बाबांनी म्हणे त्यांच्या मित्राला श्यामकाकांना वचन दिलं होतं, त्यांच्या महेशशी माझं लग्न होईल असं.’’

‘‘इतकी वर्षं कधी उल्लेख केला नाही तो!’’

‘‘बोलू नये, पण बोलतेच. संसाराचा गाडा ओढायला माझा पगार हवा होता ना?’’

खरेच होते ते. तिच्या बाबांचा तुटपुंजा पगार. घर चालवायला अपुरा पडत होता. मानसी शिकवण्यासुद्धा करीत असे. ती बी.ए. झाली. तिला एम्. ए. करायचे होते.

‘‘मानु, एका डिग्रीपर्यंत शिक्षण पुरे झालं. आता नोकरी शोधायला लाग. माधवचं शिक्षण व्हायचंय. त्याला इंजीनिअरींग करायचं आहे. माझ्या एकटच्या मिळकतीत ते शक्य नाही.’’

नशिबाने तिला लवकरच नोकरी मिळाली. नोकरी करताना तिने एम्.ए. (अर्थशास्त्र) केले. तिला बढती मिळाली. तरीही तिच्या लग्नाचा विचार वडिलांच्या मनाला शिवला नाही. ऑफिसांतील रमेश दिघेबरोबर तिचे सुर जुळले होते. कितीतरी दिवस त्यांच्या भेटीगाठी चालू होत्या. ‘मेड फॉर इच अदर’ जोडी होती. त्या अवधीत तिने दुसऱ्यांदा एम्.ए. (राज्यशास्त्र) केले. ती ऑफिसर झाली व आता वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला कारण माधवचं इंजीनिअरींगचं शिक्षण पूर्ण होत आलं होतं. सुरभी तिची अगदी सख्खी मैत्रिण असल्यामुळे तिला मानसीच्या जीवनपथाची समग्र माहिती होती.

‘‘मानसी, रमेशचा विचार केलायस का? तू सांगितलंस का आईबाबांना?’’

‘‘ते काही ऐकून घ्यायला तयारच नाहीत. मला शपथ घातली त्यांनी, शिवाय धमकीसुद्धा दिली की महेशशिवाय दुसऱ्या कोणाशीही मी लग्न केलं तर ते जीव देतील.’’

तसा महेश सर्वच बाबतीत रमेशपेक्षा उजवा होता. पण प्रेमात गुंतलेले मन कधी असला विचार करत नाही.

‘‘मग आता तू काय ठरवलंस?’’

‘‘महेशशी लग्न करण्याखेरीज काही पर्याय ठेवलाच नाहीए आईबाबांनी नाहीतर आत्महत्त्या.’’

‘‘खुळी की काय तू? जीव कस्पटासमान आहे का फेकून द्यायला?’’

‘‘पण रमेशचं वाईट वाटतं गं.’’

‘‘हो ना. त्याला हे सांगायला हवं. जीवावर येतंय अगदी. सुरभी तू सांगशील का गं प्लीज?’’

‘‘छे छे ही तुमच्यातली वैयक्तिक बाब आहे. मी कशी लुडबूड करणार त्यात?’’

‘‘पण तू आम्हा दोघांची जवळची मैत्रीण आहेस ना?’’

मी माझ्या नकारावर ठाम नाही राहू शकले. शेवटी मलाच ते काम करावे लागले. डोके दुखत होते म्हणून कँटीनमध्ये कॉफी प्यायला चालले होते. रमेश कँटीनमधून बाहेर येताना दिसला. परतण्याचा विचार करीत होते.

‘‘सुरभी, बरं झालं भेटलीस. चल, मी परत येतो कँटीनमध्ये. मला तुझ्याशी थोडं बोलायचंय.’’

‘‘रमेश, मी घाईत आहे रे. खूपच डोकं दुखत होतं. म्हणून क्रोसिन घेतली. वर गरम कॉफी घेते म्हणजे बरं वाटेल.’’

‘‘मी तुझा जास्त वेळ घेणार नाही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे.’’

या धर्मसंकटातून सुटका नसल्याची सुरभीची खात्री पटली.

‘‘कोणता प्रश्न पडलाय तुला?’’

वेड पांघरून पेडगावला गेले.

‘‘सुरभी, हल्ली मानसीला काय झालंय? फोन केला तर कट करते आणि माझ्या वाऱ्यालासुद्धा उभी राहत नाही. माझं काही चुकलंय का?’’

तो इतका काकुळतीला येऊन बोलत होता की तिला सांगणे भाग पडले, ‘‘हे बघ रमेश, तू सुरभीविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवलंय.’’

रमेश जवळजवळ किंचाळलाच.

‘‘ठरवलंसुद्धा? हिला न विचारता? कसं शक्य आहे?’’

‘‘तसंच आहे. तिच्या वडिलांनी त्यांच्या मित्राला वचन दिलं होतं.’’

‘‘ते वचन मानसीने का पाळायचं? मी कोर्ट मॅरेज करायला तयार आहे. आमच्या घरातले तिला आनंदाने स्विकारतील.’’

सुशिक्षित, सुंदर, सुस्वभावी मानसी कोणालाही आवडेल अशीच होती.

‘‘ते सगळं खरं असलं, तरी तिच्या आईवडिलांनी तिला शपथ घातली आहे. ठरवलेल्या मुलाशी लग्न केलं नाहीस तर जीव देऊ अशी धमकीसुद्धा दिलीय, हे सगळं सांगायचा धीरच होत नाहीए तिचा. नाईलाज आहे रे.’’

‘‘मग काय बोलणंच खुटलं,’’ असे म्हणून लांब उसासा सोडून, निराश मनाने तो निघून गेला. मानसीला सांगितल्यावर ती रडरड रडली. पुढच्याच आठवड्यांत रमेशची अहमदाबादला बदली झाली. म्हणजे त्याने करवूनच घेतली. तो गेल्यावरच आम्हाला ते कळले.

‘‘सुरभी, माझ्या जगण्यातला रसच संपलाय. रस काढल्यावर उरलेल्या चिपाडासारखं आयुष्य माझं. काय ही माझ्या प्रेमाची परवड? मरत नाही म्हणून जगायचं.’’

‘‘अशी निराश नको होऊस मानसी. तुझ्या जीवनातल्या नवीन पर्वाला आरंभ होतोय. काहीही कारणाने का असेना, तू महेशला जीवनसाथी म्हणून स्विकारलं ना, मग त्याच्याशी प्रामाणिक राहा. रमेशने बदली करून घेतली. ते एका अर्थी बरंच झालं.’’

‘‘मला तर त्याची फसवणूक केल्यासारखं वाटतंय. माहिती नाही मी महेशला साथ देऊ शकेन का?’’

‘‘मानसी, तुला खंबीर झालंच पाहिजे. मनाच्या पाटीवरून भूतकाळ पुसून टाक. मला माहिती आहे. सांगणं सोपं आहे. वागणं कठीण आहे. पण मनाचा निर्धार कर आणि पुढे हो.’’

सतत मनावर बिंबवून तिला लग्नाला तयार केली. ऑफिसमध्ये सर्वांनाच तिच्या व रमेशच्या संबंधांबद्दल माहिती होते. त्यामुळे या विवाहाबाबत तिच्यावरच टपका ठेवला गेला.

‘‘आजकालच्या मुली बिनदिक्कत दुसऱ्याच्या भावनांशी खेळतात.’’

‘‘पैसेवाला मिळाल्यावर कसलं प्रेम आणि कसलं काय?’’

‘‘बरं द्ब्राझालं. रमेशनं बदली करून घेतली. नाहीतर झुरून वाट लागली असती त्याची.’’

वस्तुस्थिती फक्त सुरभीलाच माहिती होती. पण कोणाकोणाचं तोंड बंद करणार म्हणून तिने गप्प राहणंच पसंत कले. लग्नाला ऑफिसातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके सदस्य हजर होते. एका महिन्याच्या रजेनंतर ती हजर झाली, तेव्हा बरीच फ्रेश वाटत होती. सिल्कची भारी साडी, ठसठशीत मंगळसूत्र, हिरवा चुडा यामुळे तिचं मुळचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. सुरभीला राहावलं नाही.

‘‘आज खुशीत दिसतोय एक माणूस. मस्त झाला ना हनिमून?’’

‘‘झाला एवढंच खरं. मला महेशच्या ठिकाणी रमेशच दिसतो गं. मग मी बेचैन होते. त्याला साथ नाही देऊ शकत. अपेक्षाभंग होत असणार त्याचा. पण मी तरी काय करू? एक मात्र खरं. महेश खूप चांगला आहे. माझा मूड सांभाळून वागत होता. माझा शब्द पडू देत नव्हता. त्याला माझा भूतकाळ माहीत असेल का गं? सांगायला अवसरच मिळाला नाही.’’

‘‘खरोखरच चांगला जोडीदार मिळालाय तुला. आता मन लावून संसार कर.’’

‘‘माझ्या प्रेमाच्या थडग्यावर संसाराची इमारत कशी उभी करू? हतबल आहे मी.’’

त्यांच्या घरी जणू लक्ष्मी पाणी भरत होती. महेशसुद्धा हौशी होता. नेहमी मानसी भारी भारी साड्या नेसून येत होती. परफेक्ट मॅचिंग ही तर तिची खासियतच होती. लग्नाला दोन वर्षं झाली, तरी काहीच प्रगती न झाल्यामुळे तिची सासू कुरकुर करू लागली.

‘‘सुरभी, हल्ली आई खूपच चिडचिड करतात. मला मूल न होण्याबद्दल टोचून बोलतात. सारखी व्रतवैकल्य आणि पूजाअर्चा करायला लावतात. महेशलासुद्धा सांगता येत नाही. माझं आयुष्य म्हणजे समस्या आणि दु:खाचा सागरच आहे.’’

‘‘असं नसतं मानसी. आयुष्य हे सुखदुखाच्या धाग्यांनी विणलेलं वस्त्र असतं. पण ‘सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वता एवढे’ असं प्रत्येकालाच वाटतं. मला सांग तुला मुल हवंय ना?’’

‘‘आता लग्न केलंय तर मूल व्हायला हवं. निदान सासूबाईंसाठी.’’

‘‘मग तुम्ही डॉक्टरकडे जा आणि त्यांचा सल्ला घ्या.’’

ती दोघंही डॉक्टरकडे गेली. रिपोर्ट्सवरून दोघांमध्ये काहीही दोष नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. मानसीचा जीव भांड्यात पडला.

‘‘मानसी, तू महेशच्या सहवासांत सुखी आहेस ना?’’

‘‘आहे, कारण मी त्यांच्यात रमेशला बघते.’’

‘‘तसं करू नको मानसी. रमेश हा तुझा भूतकाळ आहे. तो मागे पडला आहे. पण महेश तुझा वर्तमान आणि भविष्य आहे. तुझं सुख त्याच्यावरच अवलबूंन आहे, हे मनावर बिंबव आणि तू त्याच्याशी समरस हो.’’

‘‘प्रयत्न करीन. पण प्रेम जबरदस्तीने केलं जात नाही ते आपोआप होतं.’’

ऑफिसमधील नवरात्रीच्या कार्यक्रमाला ती सुरेख दिसत होती. हिरवी जरीची साडी, हिरवा मॅचिंग साज, भरघोस गजरे. एकच गोष्ट खटकत होती. तिने अंगभर पदर घेतला होता. एरवी ती एका खांद्यावर पिन करीत असे.

‘‘मानसी, इतका छान साज केला आहेस. काकूबाईसारखा अंगभर पदर कशाला घेतलास? नेहमीसारखा पिन कर ना!’’

‘‘अगं, लो नेकचा ब्लाऊज आहे ना, म्हणून अंगभर पदर.’’

‘‘मानसी, हल्ली सगळ्यांचेच लो नेक ब्लाऊज असतात. तुझी गोरीपान पाठ छान दिसेल, हिरव्या बॅकग्राऊंडवर.’’

‘‘काहीतरी काय? आहे तसंच छान दिसतं.’’

‘‘ते काही नाही, मीच करते,’’ असे म्हणत सुरभी तिचा पदर बाजूला करायला लागली.

‘‘एकदा सांगितलं ना, मला असाच पदर हवाय म्हणून,’’ ती एवढ्या जोरात ओरडली की सुरभी तिच्यापासून लाबंच गेली. नंतर ती धावतच वॉशरूममध्ये गेली. काहीतरी गडबड असल्याचे जाणवून सुरभीसुद्धा तिच्यामागे धावली. ओक्साबोक्शी रडत असलेल्या मानसीने पदर बाजूला केला व सुरभीकडे पाठ केली.

‘‘सुरभी, नीट बघ.’’

‘‘अरे बाप रे, हे कधी झालं?’’

‘‘कधी आलाय माहिती नाही. कालच माझ्या लक्षात आलं. खरं तर आज मी हेअरस्टाइल करणार होते. काल संध्याकाळी ट्राय केली आणि पुढे मागे आरसा ठेवून बघत होते तर या पांढऱ्या डागाने डोळ्यापुढे काळोखी आणली.’’

‘‘महेशला सांगितलं का?’’

‘‘नाही. मी आपणहून सांगणारच नाही, कळेल तेव्हा कळेल.’’

‘‘आपण ताबडतोब डॉक्टरकडे जाऊ या.’’

डॉक्टरांनी औषधे दिली, परंतु बरे होण्याची खात्री दिली नाही. जवळजवळ एका महिन्याने तिने सुरभीला परत चर्नीरोडला गाडीतून खाली खेचले.

‘‘सुरभी, त्याला कळलं गं. त्याने सासूबाईला सांगितलं. दोघांनीही माझ्यावर आग पाखडली.’’

‘‘औषधे घेतेस ते सांगितलं का?’’

‘‘सांगितलं गं. पण त्याना वाटतंय लग्नाआधीपासूनच हे डाग आहेत आणि आम्ही त्यांना फसवलय. त्यांनी मला ताबडतोब घर सोडायला सांगितलंय. घटस्फोट देणार आहे तो. सुरभी, माझ्या नशिबात संसार सुख नाहीच आहे. दोन वेळा डाव अर्ध्यावर सोडलाय. काय करू मी आता? जीव देण्यावाचून पर्यायच नाही. असं विद्रुप घेऊन कशाला जगायचं?’’

ती धाय मोकलून रडू लागली. कॉफीशॉपमधील सगळी त्यांच्याकडे पाहू लागली. सुरभीला काही सुचेना.

‘‘मानसी, कूल डाऊन. शांत हो, सगळे आपल्याकडेच पाहतायत. त्याने घराबाहेर काढलं तर माहेरी राहा. तिथेही राहायचं नसेल तर वर्किंग वुमेन्स होस्टेल्स आहेत की भरपूर. तुझी नोकरी अबाधित आहेच. न जाणो वैद्यकिय उपचारांनी तुला बरंही वाटेल. त्याच दिवशी संध्याकाळी ती माहेरी राहायला गेली.

घटस्फोटाची कार्यवाहीसुद्धा सुरू झाली. कुठलीही वाईट गोष्ट लवकर पसरते. या रिवाजानुसार तिच्या शरीरावरील पांढरे डागसुद्धा पसरू लागले.’’

दादावहिनी कुरकुर करू लागले.

‘‘मानु, तुझ्यावर वाईट परिस्थिती आलीय हे खरंय. पण आमच्या पदरी मुलगी आहे. तिच्या भवितव्याचा प्रश्न आहे, तेव्हा तू योग्य दिशेने विचार करावास असं मला वाटतं.’’

ज्या भावाच्या भल्यासाठी तिने आपल्या भवितव्याचा विचार बाजूला सारला होता, त्याच भावाने तिला असहाय्य केले. तिच्या मनाला यातना झाल्या. आधार होता फक्त सुरभीचा. वकिलांकडे, कुटुंबन्यायालयांत खेटा घालताना तिचीच साथ होती. घटस्फोट तर होणारच होता. तोपर्यंत दादाकडे राहायचे व नंतर वर्किंग वुमेन्स होस्टेलमध्येच राहण्याचा निर्णय घेऊन त्या दृष्टीने तिने हालचालसुद्धा सुरू केली. अखेर निर्णयाचा दिवस आला. महेशला समोर बघून तिला भडभडून आले. तिने सुरभीचा हात घट्ट पकडून ठेवला होता. अखेर अपेक्षेप्रमाणे निकाल लागलाच.

‘‘सुरभी, मी लगेच होस्टेलवर जाणार आहे.’’

‘‘मानसी, तुझं सामान?’’

‘‘आणलीय ना बॅग. दादावहिनी कुठे आहे. तू येतेस ना बरोबर?’’

दादा वहिनी कोर्टात हजर होती.

‘‘हो तर. आज पूर्ण दिवस मी तुझ्याबरोबर असणार आहे.’’

मानसीला कडक उन्हात थंडांव्याचा भास झाला. तेवढ्यात महेश तिच्याजवळ आला. बॅग तिच्याजवळ ठेवली.

‘‘हे तुझे कपडे आणि दागिने, ऑल द बेस्ट.’’

तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सुरभीने समजूत घातली.

‘‘मानसी, शांत हो. आपण परिस्थितीला तोंड द्यायचं ठरवलंय ना? मग कच नाही खायची.’’

शांतपणे तिने दादाकडची बॅग घेतली व दोघीही बाहेर आल्या. त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. समोर रमेश उभा होता. संमिश्र भावनांचा कल्लोळ मानसीच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. ती अवाक् झाली, सुरभीनेच आश्चर्य व्यक्त केले.

‘‘रमेश, तू आणि इथे? कशासाठी आलास?’’

‘‘सुरभी, माझा घटस्फोट वगैरे काही नाही. मी माझ्या प्रेमाची पूर्तता करण्यासाठी आलोय.’’

त्याने लाल गुलाबाचे फूल मानसीच्या हातात दिले, तेव्हा ती भानावर आली.

‘‘मला आजच घटस्फोट मिळणार ते तुला कसं कळलं?’’

‘‘आमच्या सेक्शनचा संतोष जाधव आहे ना, तो तुझा सगळा वृत्तांत मला देत होता. मी कायम त्याच्या संपर्कात होतोच. मला सगळी इथ्थंभूत माहिती आहे.’’

‘‘छुपा रूस्तम निघाला हा संतोष.’’

‘‘पण बरंच झालं ना?’’

‘‘रमेश, हे बघ तू जर दयेपोटी माझा स्विकार करत असशील तर ते मला मान्य नाही. एकटं राहण्याचं मानसिक धैर्य आलंय मला.’’

‘‘मानसी, मी तुद्ब्रझ्या स्वभावावर आणि गुणवत्तेवर प्रेम केलं. शरीरावर नाही. दोघांचंही पहिलं प्रेम आहे हे. मर्मबंधांतल्या ठेवीसारखं जपू या. डागाळलेला चंद्र सर्वांना शीतलता देतोच ना? तशीत तू माझ्या जीवनांत ये आणि चांदण्यांची बरसात कर.’’

‘‘अखेर हरवलेलं गवसलं माझं प्रेम’’ असं म्हणून मानसीने आवेगाने रमेशला मिठी मारली. सुरभीने सावध केले.

‘‘हे फॅमिली कोर्ट आहे. भानावर या. एक मात्र खरं इथे लग्न मोडतातच असं नाही. पुनर्मिलनसुद्धा होऊ शकतं.’’

रमेशनं काव्यातून भावना व्यक्त केल्या.

‘‘प्रेम म्हणजे प्रेम असतं. सर्वांचं सेम नसतं.’’

‘‘अहो कवीराज, बहोत खूब. आता या दोन बॅगा आणि त्याची मालकीण सांभाळा. तुम्ही हाकलून देण्याआधीच निघते. शेवटचा दिस गोड जाहला.’’ खद्खदून हसत तिघेही मार्गस्थ होतात. वातावरणांत धून लहरते.

‘‘हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे.’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...