कथा * कुसुम अंतरकर

एकदाच, फक्त एकदाच प्राची होकार दे गं, अगदी थोडक्या वेळाचा प्रश्न आहे. नंतर तर सर्वांचं आयुष्य पुन्हा जसं होतं तसंच सुरू राहील. या गोष्टीचा कोणताही दुष्परिणाम तुझ्या आयुष्यावर होणार नाही ही माझी जबाबदारी.’’

शुभाचं बोलणं प्राचीच्या कानावर पडलं तरी ते मेंदूत शिरलं नाही. कदाचित ती समजून घ्यायला बघत नव्हती. हे असं नाटक करता येईल, ती करू शकेल याची तिला खात्री वाटत नव्हती.

‘‘सॉरी शुभा, हे मला नाही झेपणार, तुला नाही म्हणताना मलाही खूप यातना होताहेत पण, नाही गं! नाही…नाहीच झेपणार मला.’’

‘‘एकदाच गं! दिव्यचा थोडा विचार कर, तुझ्या या निर्णयामुळे त्याला केवढा आनंद मिळणार आहे.’’

या गोष्टी शुभानं प्राचीला सांगायची गरज नव्हती. ती तर सदैव दिव्यच्याच विचारात गुंतलेली असायची. दिवस रात्र तिच्या मनात दुसरा विचारच नव्हता.

प्राची बोलत नाहीए हे बघून शुभा तिथून उठली अन् प्राचीला पुन्हा जुन्या आठवणींचे कढ आवरेनात.

दिव्य आणि प्राचीची भेट एका मॉलमधल्या लिफ्टमध्ये झाली होती. लिफ्ट अचानक बंद पडल्यामुळे प्राचीचा जीव घाबरा झाला आणि ती जोरजोरात ओरडू लागली. पटकन् दिव्यनं तिला मदत केली. काही क्षणांतच लिफ्टही सुरू झाली. दिव्यनं तिला घरापर्यंत सोबत केली.

त्यानंतर त्याच्या भेटीगाठी वाढल्या. ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली. दोघांचं एकमेकांच्या घरी जाणंयेणं होतं अन् घरातून लग्नाला विरोधही नव्हता.

दिव्यला एक धाकटी बहीण होती. प्राची तर एकुलती एकच होती. दोन्ही घरांमध्ये या लग्नामुळे आनंदच झाला होता. सगळं कसं छान चाललेलं अन् अचानक या आनंदाला ग्रहण लागलं.

दिव्यच्या पोटात अधूनमधून दुखायचं. प्रथम त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं. पण एक दिवस दुखणं असह्य झाल्यावर त्यानं डॉक्टरला दाखवलं. त्याला तपासताना डॉक्टर गंभीर झाले. त्यांनी केस तज्ज्ञ डॉक्टरकडे रेफर केली. अनेक तपासण्या, सोनोग्राफी व इतर सोपस्कार झाले अन् निदान झालं कॅन्सरचं. अमांशयाचा कॅन्सर तोही लास्ट स्टेजमधला. दीव्य अन् त्याच्या घरच्यांच्या अंगावर तर जणू वीज कोसळली. जेमतेम चार ते सहा महिनेच आयुष्य उरलं होतं दिव्यचं.

घरात आता काळजी आणि अश्रू होते. या बातमीनं दोन्ही घरातला आनंद हिरावून घेतला होता. केवढी स्वप्नं बघितली होती दोघांनी…प्राची आणि दिव्यनी. पण आता तर सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली होती. कुणाच्याच डोळ्यातळे अश्रू थांबत नव्हते.

एक दिवस दिव्यजवळ बसलेल्या प्राचीला त्यानं म्हटलं, ‘‘प्राची, सगळं संपलंय गं आता…तू इथं येत जाऊ नकोस,’’ वेदनेनं त्याचा चेहरा पिळवटून निघाला होता.

‘‘नाही दिव्य, असं म्हणू नकोस. तिला जर इथं येऊन तुझ्याजवळ बसून बरं वाटत असेल तर तिला येऊ देत ना.’’ शुभानं त्याला म्हटलं, ‘‘जेवढं आयुष्य आहे ते अगदी आनंदानं, पूर्णपणे उपभोगून घे, या उरलेल्या दिवसात तुला जे करायचं आहे ते करून टाक. मृत्यूपूर्वी सगळ्या इच्छा पूर्ण व्हायलाच हव्यात. त्यामुळे तुला मृत्यूची भीती वाटणार नाही.’’

‘‘या दु:खाच्या, वेदनेच्या सावटातही तू तुझं आयुष्य असं जगून घे की मृत्यूलाही वाटलं पाहिजे की चुकीच्या जागी आलोय की काय? क्षण अन् क्षण आनंद साजरा करूयात. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. यापुढे आजारपण वगैरे काहीच बोलायचं नाही.’’

शुभाच्या म्हणण्यानंतर दोन्ही घरातलं वातावरण एकदमच बदललं. काळजी अन् दु:खाची जागा, आनंदानं, आशेनं अन् हास्यविनोदानं घेतली. छोट्यातला छोटा आनंदही थाटात साजरा केला जात होता. घरात कायम उत्सवाचं वातावरण असायचं. दिव्यला कुठलाही त्रास होणार नाही. याकडे शुभा जातीनं लक्ष देत होती.

एक दिवस शुभानं आईला म्हटलं, ‘‘आई तुझी इच्छा होती ना दिव्यचं लग्न खूप थाटात करायचं म्हणून? दिव्य तुझा एकुलता एक मुलगा आहे, मला वाटतं तुझी ही इच्छा पूर्ण व्हायला हवी.’’

आईनं तिला थांबवत म्हटलं, ‘‘शुभे, अगं बाकी सगळं जे काही तू करते आहेस ते ठिक आहे, पण लग्न? अगं, दिव्यही या गोष्टीला तयार होणार नाही. अन् थाटात लग्न करायचं तर पैसा हवा ना? आपले सगळे पैसे दिव्यच्या उपचारांवरच खर्च होताहेत…’’ आईला पुढे बोलवेना. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले.

आईचे डोळे पुसत शुभानं म्हटलं, ‘‘तुझ्या भावना कळताहेत मला. पण अगं, प्राची अन् दादाला कित्येकदा मी त्यांच्या लग्नाच्या संदर्भात बोलताना ऐकलंय. नवरदेवाचा वेष घालून लग्नाला उभं राहण्याची त्याची इच्छा अपूर्ण राहायला नको. मी लग्नासाठी त्याचं मन वळवेन. अन् हे लग्न म्हणजे खरं लग्न नाहीए गं! फक्त जाणाऱ्या जिवाच्या समाधानासाठी, त्याची अखरेची इच्छा पूर्ण करणं आहे. लग्नाचं नाटकच समज गं! फक्त तू मानसिक तयारी ठेव. मी बाबांनाही सगळं समजावून सांगते.

उद्याच मी प्राचीच्या घरी जाते. आपल्याकडे वेळ फारच कमी आहे. दादाच्या मृत्यूची घटका कधीही येऊ शकते. आपल्याला घाई केली पाहिजे. राहिला प्रश्न पैशांचा, तर ती ही व्यवस्था मी करते. नातलग, मित्र, परिचित सगळ्यांची मदत घेईन.’’

त्याप्रमाणेच शुभा प्राचीला भेटायला गेली होती, पण प्राचीनं तिला नकार दिला. तरीही शुभा निराश झाली नाही.

‘‘मी माझ्या दिव्य दादाचं लग्न थाटात करेन. त्याला सर्व आनंद मिळवून देईन. करवली म्हणून त्याच्या लग्नात मिरवून घेईन. काहीही झालं तरी मी आता मागे हटणार नाही.’’

ती घरी येताच दिव्यनं विचारलं, ‘‘प्राची तयार झाली?’’

‘‘हो झाली ना. तिचं खरोखरंच प्रेम आहे तुझ्यावर.’’ शुभाचं बोलणं ऐकून दिव्यच्या चेहऱ्यावर पसरलेलं तेज बघून तिचा निर्णय अजूनच पक्का झाला.

शुभानं दिव्यच्या लग्नाची कल्पना अन् त्यासाठी लागणारी आर्थिक मदत या बाबतीत सगळ्या सोशल साइट्सवर पोस्ट टाकली आणि सर्वच संवेदनशील मित्र, परिचित, नातलगांनी आपापल्या परीनं मदत केली. पुरेसा पैसा मिळाला अन् लग्नाची तयारी सुरू झीली.

कुठल्याही लग्न घरात जसं वातावरण असतं तसंच वातावरण दिव्यच्या घरात होतं. नवरी व नवरदेवाचे पोशाख, घराची साधी व कलात्मक सजावट, फराळाचे पदार्थ, शिंपी, कासार, सोनार वगैरेंची वर्दळ यामुळे लग्नघर गजबजलं होतं.

लग्न चार दिवसांवर आलेलं अन् शुभाला खूपच काळजी पडली होती की नवरी आणायची कुठून? तिनं सर्वांना खोटंच सांगितलं होतं की प्राची आणि तिच्या घरची मंडळी लग्नाला तयार आहेत म्हणून. आता काय करायचं?

‘एकदा पुन्हा प्राचीला विनंती करून बघूयात,’ असं ठरवून शुभानं पुन्हा एकदा प्राचीचं घर गाठलं.

प्राचीनं खोलीचं दार उघडलं नाही. पण प्राचीची आई शुभाशी अत्यंत प्रेमानं वागली. ‘‘शुभा, पोरी तुझ्या भावना आम्हाला समजतात गं! आम्ही तुला पूर्णपणे सहकार्य करू, पण प्राचीला समजावणं किंवा राजी करणं आम्हाला जमणार नाही. दिव्यचा अंतिम क्षण ती बघू शकणार नाही. कदाचित त्यामुळेच ती तयार होत नाहीए. तशीही ती खूप भावनाप्रधान आहे आणि दिव्यच्या या जीवघेण्या आजारानं अधिकच हळवी झाली आहे.’’ प्राचीच्या आईनं शुभाला सांगितलं.

‘‘पण मावशी, दिव्यचं काय? त्याचा काय दोष आहे म्हणून नियतीनं त्याला अशी शिक्षा द्यावी? तो जर इतकं भोगतोय, सोसतोय तर प्राचीला थोडं नाटक करायला काय हरकत आहे?’’ शुभा संतापून म्हणाली.

‘‘तू चुकतेस, शुभा, दिव्य इतकंच प्राचीही भोगतेय, सोसतेय. तिचं मनापासून प्रेम आहे त्याच्यावर, म्हणूनच तिचा जीव तुटतोय. तू एक लक्षात घे. काही दिवसांतच दिव्य हे जग सोडून जाईल. त्याच्याबरोबर त्याच्या यातना, वेदना, सोसणं, भोगणं सगळं सगळं संपेल. पण प्राचीला तर सगळा जन्म हे दु:ख घेऊनच जगावं लागणार आहे. तिची स्थिती तर दिव्यपेक्षाही दयनीय आहे. म्हणूनच आम्ही तिच्यावर दबाव आणू शकत नाहीए.

‘‘शिवाय समाजाचा अन् प्राचीच्या भविष्याचाही विचार करायला हवा. लग्न झाल्याझाल्या पतिचा मृत्यू अन् तिच्यावर वैधव्याचा शिक्का बसणार…कुणा कुणाला सांगणार की हे फक्त नाटक होतं. तुला वाटतं तेवढं ते सोपं नाहीए,’’ प्राचीच्या आईनं शुभाला नीट समजावून सांगितलं.

त्यादिवशी शुभाला प्रथमच दिव्यपेक्षाही प्राचीची दया आली. पण तिनं हुशारीनं या परिस्थितीवरही तोडगा काढला.

‘‘मावशी, आपण एक युक्ती करूयात. हल्ली दिव्यला थोडं कमी दिसायला लागलं आहे. आपण प्राचीच्या जागी तिच्याशी बऱ्यापैकी साम्य असलेली मुलगी नवरी म्हणून उभी केली तर? दिव्यला कळायचंही नाही…’’

‘‘अगं हो, प्राचीची एक मैत्रीण आहे. खूप साम्य आहे दोघींमध्ये. एकदा एका नाटकात दोघींनी जुळ्या बहिणीची भूमिका केली होती. लोकांनाही खूप कौतुक वाटलं होतं. शिवाय ती खूप गरीब कुटुंबातली आहे. पैसा मिळतोय, त्यातून पुन्हा हे माणुसकीचं काम आहे म्हणून ती तयार होईल…पण एक मात्र खरं की सप्तपदी, होमकुंडाभोवतीचे फेरे वगैरे खूप सगळं खोलात जाऊन नको करायला. कारण अजून तिचंही लग्न व्हायचंय.’’

‘‘मावशी, अगदी निर्धास्त असा तुम्ही. आपण अगदी नाटकच करतो आहोत. पुन्हा सर्व विधी करण्याइतकी दिव्यची तब्येत बरोबर नाही, तो फार वेळ बसूही शकणार नाही.’’

लग्नाचा दिवस उजाडला. घराजवळच्या एका बागेत छोटासा मांडव घातला होता. दिव्य नवरदेवाच्या वेशात नटला होता. जवळचे आप्त, मित्र जमले होते. सजवलेल्या एका कारमधून वधू अन् तिचे नातलगही येऊन पोहोचले.

लग्नाचे औपचारिक विधी झाले. दिव्य तर इतका आनंदात होता की हा काही दिवसांत मरणार आहे हे खरंच वाटत नव्हतं. शुभाला तेच हवं होतं.

नवरी लेहेंगा चुनरी या पोशाखात होती. तिनं चक्क घुंगटही घेतला होता.

‘‘चला आता सप्तपदी, मंगळसूत्र वगैरे विधी सुरू करू.’’

लगेच प्राचीचे आईवडिल व शुभा सावध झाली. आता नवरीला इथून बाजूला करायला हवं, नाही तर खरोखरीचं लग्न लागेल अन् अनर्थ होईल. प्राचीच्या आईनं म्हटलं, ‘‘गुरूजी, नवरीला जरा बरं नाहीए, जीव घाबरतोय तिचा, तिला थोडी विश्रांती घेऊ द्या. मग पुढले विधी करूयात. तोपर्यंत नवरदेवही थोडी विश्रांती घेतील.’’

तेवढ्यात आपला घुंगट बाजूला करून नवरीनं म्हटलं, ‘‘नाही गुरूजी. माझी तब्येत इतकीही बिघडलेली नाहीए की मला विश्रांती घ्यावी लागेल.’’ नवरीकडे बघताच शुभासकट सगळ्यांनाच धक्का बसला. कारण नवरी स्वत: प्राचीच होती.

झालं असं की जेव्हा प्राचीला कळलं की शुभानं दिव्यच्या नवरीसाठी ईशाची, तिच्या मैत्रिणीची निवड केली आहे, तेव्हा त्या लग्नात दिव्यची नवरी दुसरी कुणी असणं प्राचीला पटलं नाही. दिव्यची नवरी फक्त प्राचीच असणार म्हणून प्राची स्वत:च नवरीच्या वेशात तयार होऊन आली होती.

तिच्या डोळ्यात आज अश्रू नव्हते. चेहऱ्यावर आनंद आणि ओठांवर हसू होतं. आपलं सर्व दु:ख पोटात दडवून ती दिव्यच्या आनंदोत्सवात सहभागी झाली होती. हाच दिव्यला मिळणारा शेवटचा आनंद होता. तो प्राचीनंच त्याला द्यायला नको का?

शुभानं तर आनंदातिशयानं प्राचीला मिठीच मारली. प्राचीनं तबकातला हार दिव्यच्या गळ्यात घातला. त्याचे हात हातात घेऊन त्या हाताचं चुंबन घेतले. दिव्यच्या चेहऱ्यावर, ओठांवर इतकं लोभस हास्य विलसत होतं की लोक बघत राहिले. पण एवढे काही त्याच्या अशक्त शरीराला झोपले नाहीत. तो खाली कोसळला अन् बेशुद्ध झाला. त्याचे प्राण अनंतात विलीन झाले पण हासुद्धा चेहऱ्यावरचं ते दिव्य स्थित तसंच होतं.

प्राचीच्या या अप्रत्याशित निर्णयानं दिव्यचे कुटुंबीय भारावले. जन्मभर ते तिच्या ऋणातून मुक्त होणार नव्हते. यापुढे प्राचीची संपूर्ण जबाबदारी आता त्यांची होती.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...