कथा * डॉ. लता अग्निहोत्री

आमच्या लहानपणी आई नेहमी म्हणायची, ‘‘मुलींची काळजी नाही वाटत, पण त्यांच्याबाबतीत काय घडेल याचीच भीती आणि काळजी वाटते.’’ खरंच किती सार्थ होते तिचे शब्द. आज मला त्या शब्दांचा अर्थ पुरेपूर कळतोय…प्रचिती येतेय. आईला माझ्या भविष्यातल्या परिस्थितीची कल्पना होती का? एक नाही तीन मुली होत्या तिला. म्हणूनच काळजी करायची ती. आधी शिक्षण, मग लग्न…वृंदा म्हणजे मी सर्वात लहान होते.

आईला काळजीत बघितली की बाबा म्हणायचे, ‘‘कशाला विनाकारण स्वत:ला त्रास करून घेतेस? अगं प्रत्येक जण आपलं नशीब घेऊन येतो.’’

‘‘पुरे पुरे, तुम्हाला काय माहीत मला काय ऐकावं लागतं ते? बायकांमध्ये बसलं की पहिला प्रश्न किती मुलं आहेत तुम्हाला? जेव्हा मी सांगते तीन मुली, एक मुलगा, तेव्हा त्यांचे चेहरे असे होतात की काय सांगू? मग एकेकीचे कमेंट सुरू होतात.’’

‘‘हल्लीच्या काळात एक मूल वाढवायचं म्हणजे किती सायास पडतात, तुम्हाला तर चार मुलं आहेत.’’

दुसरी म्हणते, ‘‘तीन मुली म्हणजे खूप टेंशन असेल ना हो तुम्हाला?’’

बाबा मध्येच तिला अडवायचे. ‘‘अगं, हे टेंशन त्या बायकांना येतंय…तू असल्या बायकांच्यात बसतच जाऊ नकोस. आता पुन्हा कुणी म्हटलं काही, तर सरळ त्यांना म्हणायचं, आमच्या मुली आहेत. आम्ही त्यांना सांभाळतोय…तुम्ही अजिबात टेंशन घेऊ नका.’’

बाबा गंमतीदार गोष्टी करून आईला शांत करायचे. पण आईची काळजीही खरीच होती. कारण वंश चालवणारा कुळाचा दीपक तर पहिलाच होता. त्यानंतर आम्ही तिघी बहिणी कृष्णा, मृदुला अन् वृंदा पाठोपाठ घरात आलो. बाबा विद्युत विभागात मोठ्या हुद्दयावर होते, त्यामुळे आर्थिक अडचणी नव्हत्या. घरात मी सर्वात लहान असल्यामुळे सर्वांची लाडकी होते. त्या लाडाकोडानंच माझा स्वभाव थोडा हट्टीही झाला होता. कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करणं हा मला माझा अधिकार वाटायचा. माझा हट्ट पूर्णही केला जायचा. म्हणजे ताई किंवा दादाची एखादी गोष्ट मला आवडली, तर मी रडत रडत आई किंवा बाबांकडे जाऊन हट्ट धरायची की त्या वस्तू मला हव्यात.

मग आई पटकन् दादाला किंवा ताईला म्हणायची, ‘‘अरे, ती लहान आहे, का तिला रडवता? घेऊ देत ना तिला काय हवंय ते? अशी कशी तुम्ही थोरली भावंडं?’’

बाबांनी आम्हा सर्वांना कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं. अमृत दादाला बिझनेसमध्ये रूची होती अन् गतीही होती. त्यामुळे त्यानं एमबीए करून व्यवसायात जम बसवला. कृष्णा अन् मृदुलाची लग्न चांगली स्थळं बघून करून दिली. अमृतदादाचंही लग्न झालं. शहराच्या भरवस्तीत भलं मोठं बंगलेवजा घर बांधलं गेलं. आता घरात दादा, वहिनी, आई अन् बाबा, मी एवढीच माणसं होतो. आम्हा बहिणींवर बाबांचा फार जीव होता. दोघी बहिणी लग्न होऊन गेल्यामुळे बाबांना त्यांची फार आठवण यायची. ते म्हणायचे, ‘‘वृंदाचं लग्न मी घाईनं नाही करणार…अमृतची मुळंबाळं घरात आल्यावर मग हिला सासरी पाठवेन.’’

सगळं कसं छान चाललेलं अन् एका अपघातात बाबांचा आकस्मिक मृत्यू झाला. आई अन् मी, आमचं तर फारच मोठं नुकसान झालं होतं. बाकी सर्वांची लग्नं झाली होती, पण माझं स्वप्नं अजून कोवळीच होती. बाबा माझं लग्नं थाटात करणार होते. पण आता बाबा नाहीत म्हटल्यावर काय होणार? लाडाकोडात वाढलेली मी एकाएकी घरातल्यांवरचं ओझं बनून गेले.

बाबांनी आर्थिक नियोजन अत्यंत काटेकोरपणे केलं होतं. त्यामुळे आर्थिक काळजी तशी नव्हती. पण वडील असणं अन् वडील नसणं या दोन स्थितींमध्ये आकाशपातळा एवढं अंतर असतं. घरातलं वातावरण आता मोकळं वाटत नसे. एक प्रकारचा कोंदटपणा वाटायचा.

बिझनेसच्या निमित्तानं दादाला खूपदा इकडे तिकडे जावं लागे. अशाच एका भेटीत त्याला वरूण भेटला. उमदा, होतकरू, सज्जन मुलगा म्हणून तो त्याच्या मनांत भरला. वरूणला वडील नव्हते. आई व तो एवढंच कुटुंब होतं. आईला तर अगदी गंगेत घोडं न्हालं असं वाटलं.

वरूणचा स्वत:चा व्यवसाय होता. घरात आम्ही तीनच माणसं होतो. सचोटीनं वागून, खूप कष्ट करून वरूणनं धंदा छान वाढवला होता. मी जणू फुलांच्या राशीवरून चालत होते. लग्नाला दोन वर्ष होऊन गेली होती. लहानगा प्रियांश आल्यावर तर सुखाचा पेला काठोकाठ भरला होता.

काळ भराभर सरकत होता. बाबांच्या मृत्यूचं दु:ख आता पुसट व्हायला लागलं होतं. पण हल्ली वरूण रोज पाय दुखत असल्याची तक्रार करायचे.

सुरूवातीला वाटलं, दगदग फार होतेय. विश्रांती कमी पडते, त्यामुळे पाय दुखत असतील. स्वत:चं घर बांधायचं म्हणून वरूणनं बँकेतून लोन घेतलं होतं. ते लवकरात लवकर फिटावं म्हणून ते जिवाचा आटापिटा करत होते. मिठाच्या गरम पाण्यात पाय बुडवून ठेव, मोहरीचं तेल गरम करून पायांना मालिश कर, झोपताना पायाखाली उशा ठेवून बघ असे अनेक घरगुती उपचार मी अन् आई करत होतो. त्यांचं वजन खूप कमी झालं होतं. रात्र रात्र झोपेविना जायची. त्यानं चिडचिडेपणा वाढला होता. केस पांढरे झाले. चार महिन्यांत ते चाळीस वर्षांचे वाटू लागले होतेजवळपासच्या सर्व शहरातल्या डॉक्टरांना दाखवून झालं होतं. नेमकी व्याधी कुणालाच कळली नव्हती. मी रात्ररात्र त्यांचे पाय दाबत बसायची. कधी तरी मला डुलकी लागली की मी दमले आहे हे त्यांना कळायचं, मग म्हणायचे, ‘‘झोप तू आता.मला थोडं बरं वाटतंय.’’properti vata inside photo

शेवटी मुंबईला न्यायचं ठरलं. प्रियांश सातआठ महिन्यांचाच होता. आई आणि एक मित्र अखिलेश त्यांना मुंबईला घेऊन गेले. ‘‘तू काळजी करू नकोस. आम्ही तुला सगळं कळवू. तू फक्त तुझ्या अन् बाळाची काळजी घे,’’ वरूणनं अन् आईंनी मला वारंवार बजावलं.

ते गेल्यापासून मी त्यांच्या फोनची वाट बघत होते. त्यांचा फोन येत नाही म्हटल्यावर मीच फोन करत होते. ‘अजून तपासण्या चालू आहेत,’ एवढंच उत्तर मिळत होतं. आई म्हणायच्या, ‘‘रिपोर्ट अजून आले नाहीत. आम्हीही वाट बघतोय.’’

गेल्याच्या पाचव्या दिवशी अखिलेश, वरूण आणि आई परत आले. मला कळवलं नव्हतं, अवचितच आले अन् मी चकित झाले.

‘‘आई, अचानक आलात? निदान झालं का? आता उपचार व्यवस्थित करता येतील…डॉक्टर काय म्हणाले?’’

‘‘कुणी तरी बोला ना?’’ मी रडकुंडीला आले. वरूणचा चेहरा उतरला होता. आईंची स्थिती तर चरकातून पिळून काढलेल्या उसासारखी होती. त्यांनी मला मिठी मारली अन् आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. वरूणचे बाबा गेल्यानंतर अत्यंत प्रतिकूल स्थितीत त्यांनी खूप कष्ट करून वरूणला वाढवलं, शिकवलं. मुलाचा बहरलेला व्यवसाय अन् संसार बघून ती आपलं दु:ख विसरली. सगळं छान चालू असतानाच मुलाला कॅन्सर झाला असून आता तो केवळ चार पाच महिनेच काढेल हे ऐकल्यावर त्या बाईची स्थिती कशी होणार होती? आपल्या अंतिम क्षणी आपल्या प्रेताला खांदा द्यायला, अग्नी द्यायला वरूण मुलगा आहे हे समाधान त्यांना आयुष्य जगायला उभारी देत होतं, तोच मुलगा आता मरणार म्हटल्यावर त्या बाईनं काय करायचं?

डॉक्टरांनी निदान केलं की फुफ्फुसांचा कॅन्सर आता शेवटच्या स्टेजला पोहोचला होता. जे काही दिवस हातात आहेत तेवढाच वरूणचा सहवास आम्हाला मिळणार.

ज्या घरात प्रियांशच्या दुडदुडण्याचा, त्याच्या हसण्याचा आवाज घुमत होता, तिथं आज वरूणच्या वेदनेचा हुंकार अन् आईचे उसासेच फक्त ऐकायला येत होते. त्या दोघांना धीर देताना, सांभाळून घेताना मला रडायलादेखील फुरसत मिळत नव्हती. काहीतरी चमत्कार होईल, वरूण बरे होतील, या भाबड्या आशेवर मी मनापासून त्यांची सेवा करत होते.

खरं तर कुठल्याही कामात लक्ष लागत नव्हतं. डॉक्टरांनी त्यांचे उपाय संपल्याचं जाहीर केलं होतं. पण आईची वेडी माया, अन् पत्नीचा सप्तपदीतल्या वचनांवरचा भाबडा विश्वास आशा दाखवत होता. वरूण बरे होतील अशी आशा आम्हाला वाटत होती.

पण धर्म आणि आस्था नावाची काही गोष्टच नाहीए या जगात, तरीसुद्धा व्यक्ति जेव्हा समस्यांनी नाडला जातो तेव्हा शेवटचा उपाय म्हणून भोंदुगिरीच्या मागेच धावायला लगातो. मेडिकलचे उपचार नाहीत म्हटल्यावर जो जे सांगेल ते उपाय आम्ही करत होतो. पेशंट अन् नातलग दोघंही हाय खातात.

आईची वेडी माया अन् पत्नीची भाबडी आशा, विश्वास, श्वास वगैरे काहीच समजून घेत नाही. कसंही करून आपला रूग्ण बरा व्हावा एवढीच अपेक्षा असते.

पाण्यासारखा पैसा खर्च होत होता. धंदा पूर्ण बंद पडला होता. वरूणसाठी मी इतकी धावाधाव करत होते की त्यात प्रियांशकडेही माझं दुर्लक्ष झालं होतं. तो आजारी पडला. खरंच नियती सगळ्या बाजूंनी परीक्षा घेत होती. जेमतेम पाच महिने वरूण काढू शकले.

आईंची स्थिती तर बघवत नव्हती. प्रियांश नसता तर आम्ही दोघींनीही त्याच दिवशी जीव दिला असता. पण जिवंत होतो म्हणूनच पुढले अनेक प्रश्नही आ वासून समोर उभे होते. धंदा बंद पडलेला. बँकेचं लोन घरासाठी घेतलं होतं. यामुळे लोनचे हफ्ते फेडणे अशक्य होतं. ते घर हातचं गेलं.

अवघड परिस्थितीतच आपलं कोण, परकं कोण हे समजतं असं म्हणतात ते खोटं नाही. माझ्या या वाईट काळात माझ्या दोघी बहिणींनी त्यांच्या परीनं शक्य ती सर्व मदत मला केली. मात्र अमृत दादा मोकळेपणानं वागत नाहीए खरं तर टाळतोय असं मला जाणवलं…पण अचानक आलेल्या या चौफेर संकटांनी मी इतकी भांबावले होते, इतकी हतबल द्ब्रा झाले होते की यावर फारसा विचार करण्याचीही शक्ती नव्हती माझ्यात. खरं तर आई अजून हयात होती. पण आता घरात आईची सत्ता नव्हती.

आता मला लक्षात येत होतं की आजही आपल्या समाजात विधवा स्त्रीला अजिबात किंमत नसते. आई विधवा, तिची लेक मी ही विधवा…बाबा असतानाची आई मला आठवते. माझा गैरवाजवी हट्ट पुरवण्यासाठी ती दोघा ताई व अमृतदादाला रागे भरून मला ती वस्तु मिळवून देत असे.

मनात सतत रूखरूख असायची की वरूणच्या मृत्यूमुळे मी प्रियांशला त्याचं हक्काचं बालपण पुरेपूर उपभोगू देऊ शकत नाहीए. दोघी ताई त्यांचं खाणंपिणं, खेळणी कपडे सगळं बघत होत्या. ती त्यांची माया होती. प्रियांशचा हक्क थोडीच होता. भाड्याच्या एका खोलीत मी प्रियांश अन् आईंना घेऊन राहत होते.

मुलाच्या मृत्यूनं उन्मळून पडलेला तो दुर्बळ जीव एका रात्री अनंतात विलिन झाला. नोकरी करणंही मला शक्य नव्हतं. लहानग्या प्रियांशला सांभाळायला कुणी नव्हतं.

समोर एक निरूद्देश आयुष्य होतं. दुसरीकडे बाळाचा अंधकारमय भविष्यकाळ. काय करू? कुठं जाऊ? कुणाला विचारू अशा काळजीत पायरीवर बसून होते.

तेवढ्यात कृष्णाताई माझ्याजवळ येऊन बसली. मी एकदम दचकले…‘‘ताई! कधी आलीस? मला कळलंही नाही.’’

‘‘हो गं! ही वेल बघ, किती हौसेनं लावली होती. आठवणीनं रोज पाणी घालायची, केवढी बहरली आहे, पण कालच्या वादळानं ज्या झाडाच्या आधारानं ती वर चढली होती ते झाडंच उन्मळून पडलं…आता ही वेल नाही जगायची.

माझ्यासारखीच ती ही आधारहीन झालीय. माझ्या आयुष्याचं काय होणार कुणास ठाऊक?’’

‘‘फार विचार करतेस…चल उठ, असाच विचार करत बसशील तर प्रियांशला कशी सांभाळशील?’’

ताईनं तिथं पडलेला एक बांबू झाड उन्मळून पडल्यामुळे झालेल्या खडड्यात रोवला अन् ती वेल त्यावर चढवली.

‘‘बघ, मिळाला ना आधार तुझ्या वेलीला? आत वेल मरत नाही नक्की…’’ ताईनं हसून म्हटलं.

‘‘खरंच ताई, मानवी आयुष्यही इतकं सोपं असतं तर किती बरं झालं असतं?’’

‘‘प्रयत्न केला तर काही अडचणींवर उपाय निघू शकतो, वृंदा.’’ ताई गंभीरपणे म्हणाली.

‘‘म्हणजे? तुला काय म्हणायचंय?’’

‘‘वृंदा, अमृतदादाची कोरडी वागणूक सर्वांनाच खटकतेय. या संकटात ज्यानं सर्वात पुढे राहून मदत करायची तो समोरही येत नाहीए. मला नवल वाटतंय, आईही काही बोलत नाहीए. काय प्रॉब्लेम आहे तिला, मला समजंत नाहीए.’’

‘‘ताई, एक तर आता वय झालंय, दुसरं म्हणजे बाबांचं नसणं…तीही असहाय आहे गं! हे म्हातारपण ती दादाच्याच जिवावर जगणार ना?’’

‘‘पण याचा अर्थ मुलीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करायचं का? तुझ्या बाबतीतही तिचं काही कर्तव्य आहे ना. घर बाबांनी बांधलेलं म्हणजे तिचंच आहे. तिला बाबांची पेन्शन मिळतेय. ती काही दादावर अवलंबून नाहीए.’’ ताई जरा रागातच बोलली.

‘‘ताई, अगं, आई समाजाला बदलू शकत नाही ना? आजही म्हातारे आईवडिल मुलीपेक्षा मुलांकडेच राहण्याला प्राधान्य देतात गं!’’

‘‘खरंच गं बाई, माझी ही छोटीशी बहीण किती किती समजूतदार झालीय.’’ ताई कौतुकानं म्हणाली. मग बोलली, ‘‘ते सोड वृंदा, मी, मृदुला अन् तुझ्या दोन्ही भावोजींनी असं ठरवलंय की आम्ही दादाशी बोलू. आज काळ बदलला आहे, वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीलाही वाटा मिळायला हवा. तसा कायदाही झाला आहे.’’

मी थोडं घाबरून चकित मुद्रेनं तिच्याकडे बघितलं, तेव्हा ती म्हणाली, ‘‘अगं वेडे, ही नातीगोती, हे संबंध आपल्याला अडीअडचणीला मदत मिळावी म्हणूनच असतात ना? अशावेळी मदत नाही घ्यायची तर कधी घ्यायची?’’

शेवटी सर्वांनी मिळून दादाला समजावलं की बाबांच्या प्रापर्टीतला काही हिस्सा तू वृंदाला दे. कृष्णा आणि मृदुलाताईनं तर म्हटलं की आम्ही लिहून देतो, ‘‘आम्हाला काही नको, पण वृंदाला मात्र वाटा मिळू दे. तिच्या संकटाच्या काळात खरं तर स्वत:हून तू पुढाकार घ्यायला हवा होतास.’’

पण अमृतदादाची संपत्तीतला वाटा द्यायची इच्छा नव्हती. शेवटी कुणा नातलगानंच त्याला समजावलं ‘‘बाकी बहिणी मागत नाहीएत, एकीलाच द्यावं लागतंय, तेवढं देऊन मोकळा हो, उद्या कोर्टात केस गेली तर सरळ चार वाटे होतील, तुला फक्त एक हिस्सा मिळेल.’’ शेवटी अगदी नाइलाजानं दादानं निर्णय घेतला. वहिनीला हा निर्णय अजिबातच आवडला नाही.

शेवटी बाबांच्या घरातला एक भाग माझ्या नावावर केला गेला. मीही लाचार होते. सगळा स्वाभिमान गहाण ठेवून माहेरी आले…हळूहळू सगळं मार्गी लागेल अशी भाबडी आशा मनात होती.

शेवटी रक्ताचं नातं आहे. पाण्यात काठी मारली म्हणून पाणी दुभंगतं का? काही नाही तर निदान मी माझ्या माणसांत होते…पण माझी समजूत चुकीची होती. इथं तर नात्यांची व्याखाच बदलली होती. कुणीच माझं नव्हतं.

घराच्या वाटणीबरोबरच मनावरही ओरखडे आले होते. नात्यांमध्येही अदृश्य भिंती उभ्या राहिल्या होत्या. मलाही हे सगळं नको होतं, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी घरबसल्या मुलांच्या टयूशन्स घ्यायला लागले. शेजारी पाजारी सहानुभूतीनं वागत होते. मला ट्यूशन्स मिळवून द्यायला त्यांनी मदत केली. अशा सगळ्यांच्या सहकार्याने आयुष्याची गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न करत होते.

वहिनी तर स्वत:हून एक शब्दही माझ्याशी बोलत नव्हती. मी काही बोलेन तेवढ्याचं उत्तर ती द्यायची. दादाच्या चेहऱ्यावर कायम राग दिसायचा. आई पूर्वी बागेत खुर्ची टाकून बसायची. तिनंही आता तिथं बसणं बंद केलं.

तिला कदाचित सूनेच्या मुलीच्या भांडणातून मुक्त रहायचं असेल. मला आईचा राग येत नव्हता, उलट कीव यायची तिचीच. माझ्यामुळे उगीचच तिच्या जिवाचे हाल होताहेत असं वाटायचं. दादाची मुलं पारूल आणि मनीष मोठी होती. माझ्या घरात यायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही हे वहिनीनं सांगितलेलं त्यांना समजत होते. पण प्रियांश लहान होता. त्याला काहीच कळत नव्हतं. तो त्यांच्यात खेळायला बघायचा.

एक दिवस प्रियांश दादाच्या घरातून एक खेळणं घेऊन आला. शेवटी मुलंच ते…मी मुलांना शिकवत होते, तेवढ्यात वहिनीचा कर्कश्य आवाज कानी आला. ‘‘घरावर हक्क दाखवताच आहात आता काय घरातल्या सर्व वस्तूही आपल्या घरात नेऊन ठेवणार का?’’

मी गप्प बसले. लहान असला तरी चूक प्रियांशचीच होती. मी मुकाट्यानं खेळणं परत करून आले. पण नंतर अशा घटना सातत्यानं व्हायला लागल्या. बरेचदा वहिनी मुद्दाम खुसपट काढून आरडाओरडा करायची.

एक दिवस सायंकाळी मी मुलांना शिकवत बसले होते, तेवढ्यात वहिनी आरडा ओरडा करत आली, ‘‘तुम्ही इथं कमाई करत बसा, तिथं तुमचा मुलगा आमचं केवढं नुकसान करतोय…हा एवढा महागाचा फ्लॉवर पॉट फोडला. मला हे सगळं नाही हं चालणार…’’

तेवढ्यात मनीष म्हणाला, ‘‘मम्मी, अगं तो पारूलच्या हातून फुटलाय, प्रियांशच्या नाही.’’

वहिनी त्याच्यावर ओरडली, ‘‘गप्प बैस मूर्खा, तुला काय कळतंय?’’

मुलं निरागस असतात. खरं ते बोलतात पण मोठ्यांना ते मानवत नाही. मी अजिबात वाद घातला नाही. वहिनीला सॉरी म्हटलं. माझ्यावर उपकार होते तिचे.

वहिनीला माझं इथं राहणं खूपच खटकत होतं. खरं तर मलाही तिथं राहणं नकोच होतं. पण तरूण एकटी विधवा, पदरात लहान मूल…कुठं जाणार? कशी राहणार? शिवाय ताई व भावजींनी माझ्यासाठी वाईटपणा घेतला होता. निदान प्रियांश मोठा होई तो मला इथंच राहायला हवं.

आता मी प्रियांशला माझ्याजवळ ठेवायची. त्याला कुठं जाऊ द्यायची नाही. उगीच एखाद्या नव्या भांडणाची सुरूवात व्हायला नको होती मला.

पण लहान मूल ते. किती त्याला बांधून ठेवणार? सतत लक्ष ठेवणंही अवघडच होतं. दोन दिवसांपासून आईची तब्येत बरी नव्हती. मी ट्यूशनच्या मुलांनाही सुट्टी दिली होती. आईची सेवा करत होते, तेवढ्यात प्रियांशच्या रडण्याचा आवाज आला. तो खूप जोरात कळवळून रडत होता. पाठीवर, पायांवर पट्टीनं मारल्याचे वळ होते. कुठला अपराध घडला होता त्याच्याकडून कुणास ठाऊक.

बापाविना पोरकं लेकरू, त्या कोवळ्या बाळाचा इतका दुस्वास का करतेय वहिनी? माझ्यावरचा राग त्या अश्राप बाळावर काढतेय? त्याला जवळ घेऊन शांत केलं. वळांवर खोबऱ्यांचं तेल लावलं. त्याला खायला घालून मांडीवर घेऊन थोपटत होते. शेवटी त्याला झोप लागली.

 

माझ्या मेंदूत वादळ थैमान घालत होतं. कितीही कायदे करा, कानून करा…पण माणसांचे विचार बदलत नाही. मुलींना वडिलांच्या संपत्तीतला हिस्सा मिळायला हवा हा कायदा कागदावरच राहतो. प्रत्यक्षातली परिस्थिती मी अनुभवते आहे.

आम्ही मुली आहोत, पण दादाला अजून एक भाऊ असता तर त्यानं बाबांच्या संपत्तीत वाटा मागितला असता ना? त्यावेळी दादानं काय केलं असतं? बहिणीला तिच्या पडत्या काळात, मदत म्हणून जी थोडी फार जागा त्यानं दिली, त्यावर इतका राग धरण्याचं कारणच काय? वडिलांच्या इस्टेटीतला वाटा घ्यायचा तर नात्यांवर प्रेम, भाषा, जबाबदारी या सगळ्या गोष्टींवर पाणी सोडायला हवं.

समाज आणि कायद्याच्या धाकानं एखादीनं वडिलांच्या प्रॉपर्टीतला आपला हिस्सा मिळवला तरी त्याचा उपयोग काय? तिला तर आपलेपणाची आहुती द्यावी लागेल. लहानपणी लाडक्या असणाऱ्या मुली मोठेपणी इतक्या परक्या आणि दोडक्या होतात? आईलासुद्धा मुलीची माया वाटू नये इतकी परिस्थिती बिथरते? खरंतर माहेराच्या सुखसमृद्धासाठी प्रत्येक मुलगी गरज पडते तेव्हा मदतीसाठी धावून येते, पण तिच्या अडचणीत तिनं माहेराकडून आधाराची अपेक्षा केली तर माहेरचे असे का वागतात? का? का?…

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...