* रीता गुप्ता

मी माझ्या शेजारी राहणाऱ्या कविताला काही दिवसांपासून खूप व्यस्त पहात होते. ती मार्केटमध्येही खूप फिरत होती. दररोज आम्ही संध्याकाळी एकत्र फिरायचो, पण तिच्या व्यस्ततेमुळे ती आजकाल येत नव्हती, म्हणून पार्कमध्ये खेळत असलेली तिच्या मुलीला काव्याला, मी बोलावून विचारलेच, ‘‘काव्या, खूप दिवसांपासून तुझी आई दिसत नाही. सर्व काही ठीक तर आहे ना? ’’

‘‘काकू, आजी-आजोबा माझ्या घरी येत आहेत. आई त्यांच्या येण्याची तयारी करत आहे,’’ काव्याने सांगितले.

‘‘का कुणास ठाऊक पण माझ्या घरी’’ हे शब्द बऱ्याच वेळेपर्यंत मनात हातोडीसारखे वाजत राहिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कविताचा नवरा कामेश दिसला. कदाचित तो स्टेशनवरून त्याच्या आईवडिलांना घेऊन येत होता. त्यानंतर सुमारे १० दिवस कविता अजिबात दिसली नाही. तिने कार्यालयातूनही सुट्टी घेतली होती. संध्याकाळचा वॉकही बंदच होता तिचा.

एक दिवस मी तिच्या सासू-सासऱ्यांना आणि तिला भेटायला तिच्या घरी पोहोचले. सासू-सासरे ड्रॉईंग रूममध्ये बसले होते. गोंधळलेल्या अवस्थेत स्वयंपाकघर आणि इतर खोल्यांमध्ये कविता धावत होती. मी तिच्या सासू-सासऱ्यांशी बोलू लागले.

भेदभाव का

‘‘आमच्या येण्याने कविताचे काम वाढते. मला वाईट वाटते,’’ तिचे सासरे म्हणाले.

‘‘खरंच, मलाही काही काम करू देत नाही, नुसतेच पाहुणे बनवून ठेवले आहे,’’ तिची सासू म्हणाली.

त्या लोकांच्या संभाषणातून असे वाटले की ते लवकरच परतणार आहेत, जेणेकरून कविता तिच्या कार्यालयात जाऊ शकेल. मी तेथून निघाले तेव्हा कविता मला गेटपर्यंत सोडायला आली. मग मी विचारले, ‘‘त्यांच्याबरोबर पाहुण्यांसारखे का वागते, दोघे अद्याप इतकेही म्हातारे किंवा असहाय नाहीत?’’

‘‘नाही बाबा, मला माझ्या सासू-सासऱ्यांकडून काहीही करून घ्यायचं नाही. माझ्या बहिणीने तिच्या सासूला तिच्याकडे राहायला आल्यावर काहीतरी करायला सांगितले. तेव्हा राईचा पर्वत झाला होता आणि माझ्या पतीचीही हीच इच्छा आहे की मी त्यांची सेवा करावी. पण ही वेगळी गोष्ट आहे की मी आता त्यांच्या परत जाण्याची वाट पाहत आहे,’’ कविता तिच्या कपाळावर आलेला घाम पुसत म्हणाली.

कविताने तिच्या सासरच्या माणसांच्या भेटीचे ओझे का घेतले, असा विचार करण्यास मला भाग पाडले. ते आपल्या मुलगा-सूनेसह राहण्यास आले आहेत आपले घर समान, पण त्यांच्याबरोबर पाहुण्यांसारखी वागणूक केली जाते. मला तिची मुलगी काव्याचे ‘‘माझ्या घरी’’ आजी-आजोबा येत आहेत हे विधान आठवले, प्रत्यक्षात घर तर त्यांचेच आहे अर्थात सर्वांचे.

एक वेगळी रचना

चित्राचा आणखी एक पैलू असतो, जेव्हा सून सासू-सासऱ्यांच्या आगमनाला तिच्या विसंगती आणि कटुतेने नात्यात अप्रियता भरते. माझ्या मावशीला सांधेदुखीचा त्रास असायचा. जेव्हा तिला तिचे दैनंदिन काम करण्यातही अडचण येऊ लागली, तेव्हा ती काकांसमवेत आपल्या मुलाकडे गेली. पण महिन्याच्या अखेरीस ती परत आपल्या घराचे कुलूप उघडताना दिसली. तिथे मुलाच्या तिसऱ्या मजल्यावरील घराच्या पायऱ्या चढणे-उतरणे वेदनादायक होते आणि तेथे ती अपेक्षेनुसार घरगुती कामे करण्यासही असमर्थ होती.

विकसित देशांमध्ये वृद्धांसाठी सरकारकडून बरेच काही उपलब्ध असते, जेणेकरुन ते त्यांच्या मुलांशिवायदेखील चांगले जीवन जगू शकतील, परंतु परदेशांच्या विपरीत आपल्या देशातले पालक अगदी वृद्धावस्थेपर्यंत मुलांची काळजी घेतात. मध्यमवर्गीय पालकांच्या आयुष्याचा हेतू म्हणजे मुलांना सेटल करणे असतो. जेव्हा तिच मुले स्थिरस्थावर होतात, ते स्वत:चा घर-संसार थाटतात, त्यानंतर ते पालकांना बाहेरील लोक म्हणून समजू लागतात. मुलगा-सून असो किंवा मुलगी-जावई सहजपणे पालकांचे आगमन स्वीकारू का शकत नाहीत? त्यांची जगण्याची पद्धत वेगळी असू शकते, परंतु त्यांच्या दिनक्रमानुसार त्यांना आदराने का वागवले जाऊ शकत नाही? हे तेच आहेत, जे न बोलता आपल्या गरजा समजून घेत होते.

आपली सामाजिक रचनाच अशी आहे की प्रत्येकजण आपापसात जोडलेला असतो. संयुक्त कुटुंबांची एक वेगळी रचना असते. येथे आम्ही अशा पालकांचा उल्लेख करीत आहोत, जे वर्ष ६ महिन्यांतून एकदा आपल्या मुलाला भेटायला जातात. काही दिवस किंवा महिने २ महिन्यांसाठी. अशा परिस्थितीत मुलांनी या गोष्टी लक्षात घेतल्यास आपापसांत भेटणे, एकत्र येऊन राहणे आनंददायक होईल.

स्वत:ही विचार करा

हे खरे आहे की ते त्यांच्या जागी आनंदी आहेत, परंतु तरीही ते निरोगी आहेत तोपर्यंत मुलांनी शक्य तितक्या लवकर त्यांना बोलावणे हे मुलांचे कर्तव्य आहे. ३-४ वर्षात एक वेळा बोलावण्याऐवजी ३-४ महिन्यांत बोलावत राहा, मग भलेही थोडया दिवसांसाठीच का होईना, कारण प्रेम निरंतर परस्पर संवादातून टिकते आणि ५-६ दिवसांच्या आगमनासाठी त्यांना कोणतीही विशेष तयारी करावी लागणार नाही.

ते ‘तुमच्या घरात’ नव्हे तर ‘आपल्या घरात’ येतात. त्यांना आणि तुमच्या मुलांनादेखील या कल्पनेचा आभास करून द्यावा. घरात लहान किंवा मोठे असल्याने फारसा फरक पडत नाही, जितका हृदयाच्या संकुचितपणामुळे पडतो. हे बऱ्याचदा नातवंडांना म्हणतांना ऐकले जाते की आजोबा माझ्या खोलीत झोपतात. कितीतरी वेळा रात्री उशिरापर्यंत प्रकाश चालू ठेवल्याने जेव्हा आजी हस्तक्षेप करते, तेव्हा नात म्हणते ओह, आजी तू कधी जाणार? जेव्हा आपल्या मुलांनी असे म्हटले असेल तेव्हा आपल्या पालकांच्या हृदयावर काय परिणाम होईल याचा विचार करा. ही आपलीच चूक आहे की आपण आपल्या मुलांच्या मनात असे विचार भरले आहेत की आजी-आजोबा बाहेरचे लोक आहेत आणि घर फक्त आपले आणि आपल्या मुलांचे आहे. विचार करा उद्या तुमच्या मुलांच्या आयुष्यात तुम्हीदेखील अशाचप्रकारे उपेक्षित असाल.

काळजी घ्या

जर आपण हे ऐकले असेल की मुलांनी असे म्हटले आहे तर ताबडतोब आई-वडिलांसमोर हे स्पष्ट करा की तुम्ही आपल्या आईवडिलांच्या घरात नव्हे तर आजी-आजोबांच्या घरात राहत आहात.

जेव्हा ते येतात तेव्हा आपला नित्यक्रम बदलू नका, तर आपल्या दिनचर्येनुसार त्यांना सेट करा. अन्यथा त्यांचे येणे आणि राहणे लवकरच ओझे वाटू लागेल.

तुम्ही जे काही खाल, तेच त्यांनाही खायला द्या. होय, जर आरोग्याची कोणती समस्या असल्यास आपण त्यानुसार काही बदल केले पाहिजेत. नवीन पिढीचे खाणे-पिणे आपल्या जुन्या पिढीपेक्षा पूर्णपणे बदलले आहे. रोटी-भाजी आणि डाळ-भात खाणारे पालक कधीतरीच बर्गर-पिझ्झा खाऊ शकतील. म्हणूनच त्यांच्या चवीनुसार आणि आरोग्यानुसार भोजनाची व्यवस्था अवश्य करा. हेदेखील आपले कर्तव्य आहे. वाढत्या वयासह त्यांना पुरेशा प्रमाणात पोषक आहार मिळत आहे की नाही हे पाहा.

हुशारीने वागा

फारच शांत राहणे किंवा जास्त बोलणे चांगले नाही. जेव्हा पालक एकत्र असतात तेव्हा त्यांच्यासाठी थोडा वेळ अवश्य ठेवा, कारण ते तुमच्यासाठीच येथे आले आहेत. एकत्र फेरफटका मारा किंवा सुट्टीच्या दिवशी कुठेतरी एकत्रित फिरायला जा. काही आपल्या दैनंदिन गोष्टी सामायिक करा, काही त्यांचे ऐका.

त्यांच्या बदलत्या सवयींचे निरीक्षण करा. कोणत्या आजाराची लक्षणे तर नाहीत ना? आवश्यक असल्यास डॉक्टरांना भेटा. जरा आठवा की आई कसे आपल्या चेहऱ्याकडे पाहत आपल्या समस्या समजून घेई.

जर भेटगाठ लवकर-लवकर होत राहिली तर त्यांचे आजार आपल्याला वेळेआधीच समजतील आणि त्यांच्या समस्या वाढण्यापूर्वीच आपण वेळेवर त्यांच्यावर उपचार करून घेऊ शकाल.

आपल्या मुलांना त्यांच्या आजी-आजोबांशी जोडलेले असू द्या. मुलांनी त्यांच्या वृद्ध होत असलेल्या आजी-आजोबांना समजून घेणे फार महत्वाचे आहे. त्यांनी त्यांच्याप्रति संवेदनशील असले पाहिजेत. ही गोष्ट त्यांना एक चांगली व्यक्ति होण्यास मदत करेल. उद्या आपली मुलेदेखील आपले म्हातारपण सहजपणे स्वीकारतील.

काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. जेव्हा २ भांडी एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात टक्कर होणे नैसर्गिक असते. छोटया गोष्टी छोटया समजून संपवल्या गेल्या पाहिजेत.

अंतर संपवा

सासू-सुनेच्या नात्याला सर्वात जास्त कलंकित केले जाते, परंतु सत्य हे आहे की त्या दोघीही एकाच व्यक्तिवर प्रेम करतात आणि म्हणूनच ही वर्चस्वाची लढाई बनून जाते. मुलाची हुशारी आणि समजुतदारपणामुळे येणाऱ्या दिवसाचा संघर्ष टाळता येतो. पण या कारणास्तव एकत्र येणे थांबवणे म्हणजे नात्यांची हत्या करणे आहे. सोबत आल्याने, एकत्रित राहिल्याने एकमेकांना हळूहळू समजण्यास मदत होईल. समस्या केवळ भेटून सोडविली जाईल, अंतर संपल्यानंतरच जवळीक वाढेल.

आई-वडील ती माणसे आहेत, ज्यांनी आपले पालन-पोषण करून वाढविले. जेव्हा ते आपले पालन- पोषण करू शकतात तेव्हा ते स्वत:चेदेखील करू शकतात. आता ते निरोगी आहेत, एकटे राहण्यास सक्षम आहेत, तेव्हा आपले हे कर्तव्य आहे की आपण नेहमीच एकत्र येण्याची संधी शोधत राहावी. त्यांना नेहमी आपल्याकडे बोलवा आणि त्यांना आदर व प्रेम द्या. उद्या जेव्हा ते अशक्त होतील, आपल्याबरोबर राहण्यास विवश असतील तेव्हा त्यांना ताळमेळ बसवण्यात काही अडचण येऊ नये. प्रेमळपणे घालविलेले हे छोटे-छोटे क्षण नंतर त्यांच्या मुळांसाठी खत म्हणून काम करतील.

नाती कळसूत्री बाहुल्यांसारखी असतात, ज्यांची दोरी आपल्या परस्पर विचारांत, समंजसपणात, सुसंवादांत आणि सुलभतेत असते. भारतीय सामाजिक रचनादेखील काहीशी अशीच आहे की दूर राहा किंवा जवळ, सगळे राहतात नेहमी एकमेकांच्या हृदयात आणि मनामध्येच.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...