* जयलक्ष्मी राजगोपाळ

दिवाळीला फक्त एक दिवस उरला होता. सोसायटीच्या बहुतेक घरांमध्ये रंगरंगोटी आणि लाइटिंगचं काम पूर्ण झालं होतं आणि लोक दिवाळीच्या तयारीसाठी इथे-तिथे फेऱ्या मारत होते. मिठायांचा गंध सोसायटीभर दरवळत होता. अधूनमधून फटाक्यांचे आवाजही ऐकू येत होते. सर्वत्र लगभग सुरू होती. सगळीकडे आनंदाचे वातावरण होतं.

या सर्व गोंधळात कॉलनीतील एक घर शांत होतं. ते होतं मिनी, रिनी आणि बबलूचं घर. तिन्ही मुलं पुन्हापुन्हा गॅलरीत जाऊन उभी राहत आणि आस लावून विचार करत होते, ‘आईबाबा आले असते तर आपणसुद्धा दिवाळी साजरी केली असती.’

त्यांचे वडिल ५ दिवस आधी कार अपघातात जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल झाले होते आणि अजूनही रुग्णालयातच होते. त्यांची काळजी घेण्यासाठी आईसुद्धा तिथेच होती.

इतके दिवस तीन मुलांनी कसंकसं घर सांभाळलं होतं. जेवण करून खाणं, ते शाळेत घेऊन जाणं इ. ते स्वत: करत होते. पण आता आईबाबांशिवाय सण कसा साजरा करणार?

‘‘आता आईबाबा कदाचित दिवाळीनंतरच घरी येतील.’’ रात्री जेवताना रिनी आणि बबलू मिनीला म्हणाले.

‘‘हं…कदाचित डॉक्टरांनी बाबांना घरी जाण्याची परवानगी दिली नसेल,’’ मिनी उदास होऊन म्हणाली.

रिनी आणि बबलूने एकमेकांकडे पाहिलं आणि गप्प बसले. हॉस्पिटल जवळ असतं तर ते केव्हाच जाऊन बाबांना भेटून आले असते. पण हॉस्पिटल दूर होतं आणि ते कोणाला सोबत घेतल्याशिवाय जाऊ शकत नव्हते. या ५ दिवसांत ते फक्त एकदा आईबाबांना भेटले होते.

मान खाली घालून जेवणाऱ्या रिनी आणि बबलूला पाहून मिनी विचारात पडली. आईबाबा नसल्याने गेल्या काही दिवसांत त्यांच्यात किती बदल झाला  होता. आधी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणारे आता एकजूट झाले होते. या पाच दिवसांत एकदाही त्यांच्यात भांडण झालं नव्हतं.

आईबाबा असते तर आज घरात किती आनंदी वातावरण झालं असतं, किती फटाके आले असते, किती मिठाया आणल्या असत्या आणि असं शांतशांत बसलेल्या रिनी आणि बबलूने धमाल केली असती. आपल्या लहान भावंडांकडे पाहून मिनीने एक निर्णय घेतला.

‘‘उद्या आपण दिवाळी साजरी करायची.’’ तिने घरातली शांतता भंग करत म्हटलं.

‘‘खरंच.’’ रिनी आणि बबलूचा चेहरा फुलला. ‘‘पण कशी?’’

‘‘आपल्या पद्धतीने,’’ मिनी हसून म्हणाली.

‘‘खीर बनवू, नवीन आणलेले कपडे घालू आणि थोडेसे फटाके आणि भेटवस्तूही खरेदी करू.’’

‘‘ठीक आहे…ठीक आहे…’’ रिनी आणि बबलू उत्साहाने म्हणाले, ‘‘पण यावेळी भेटवस्तू आईबाबांसाठीसुद्धा घेऊया.’’

हे ऐकून मिनी अचंबित झाली. रिनी आणि बबलूने तर तिच्या मनातलं ओळखलं होतं.

‘‘हो, सगळ्यांसाठी खरेदी करायची,’’ ती आनंदाने म्हणाली, ‘‘आणि संध्याकाळी आईबाबांना दिवाळीच्या शुभेच्छाही देऊन येऊ.’’

रिनी आणि बबलू आनंदाने झोपी गेले.

मिनीने उद्याचं बजेट बनवलं. तिच्याकडे आईने दिलेले ५००० रूपये होते आणि तेवढ्याच पैशात त्यांना दिवाळी साजरी करायची होती.

दिवाळीची पहाट झाली. तिन्ही मुलं लवकर उठली. घराची साफसफाई करून झाल्यावर अंघोळ करून, नवीन कपडे घालून ते तयार झाले. बबलूने    दरवाज्याला छानसं तोरण बांधलं. रिनीने अंगणात छोटीशी रांगोळी काढली. मिनीने नाश्ता करताना थोडीशी खीरसुद्धा बनवली.

नाश्ता करून मिनी घराजवळच्या बाजारात गेली. बाबांसाठी एक शर्ट, आईसाठी परफ्युम, बबलूसाठी व्हिडिओ गेम सीडी, रिनीसाठी बार्बी डॉल, स्वत:साठी एक क्लच पर्स आणि फटाके, मिठाई घेऊन ती लवकर घरी पोहोचली.

रिनी आणि बबलू आपापल्या भेटवस्तू घेऊन खूश झाले. मिनीने दिलेला फुलबाजाही त्यांनी आनंदाने घेतला. खरंतर दरवर्षी फटाके वाटून घेताना त्यांच्यात लुटूपुटूची लढाई व्हायची. अशावेळी मिनीसुद्धा त्या भांडणात सामील व्हायची. आज मिनीने स्वत:साठी काहीच घेतलं नाही. सगळे फटाके आपल्या लहान भावंडांमध्ये वाटून टाकले.

‘‘शाब्बास, माझ्या लेकरांनो शाब्बास…’’

घरात अचानक कुणाचातरी आवाज ऐकून मुलांनी मान वर केली आणि पाहातच राहिले. आईबाबा कधी आले कळलंच नाही. दोघंही प्रेमाने मुलांकडे पाहात होते. बाबांच्या हातपायाला बँडेजसुद्धा लावलेलं होतं. पण ते आता बरे वाटत होते.

‘‘आई, बाबा…’’ तिन्ही मुलं एकसाथ ओरडत आईबाबांच्या कुशीत शिरली. ‘‘आज खरोखरंच आनंदाची दिवाळी आहे.’’

आईने तिघांनाही मिठीत घेतलं आणि म्हणाली, ‘‘खरंय मुलांनो, तुमच्यासारखी शहाणी बाळं ज्या घरात असतात तिथे दिवाळी एक दिवस नाही तर रोज असते.’’

बाबा काहीच म्हणाले नाहीत. पण मुलांनी आणलेल्या भेटवस्तू पाहून त्यांचे डोळे आनंदाने भरून आले. दिवाळीच्या रोषणाईने त्यांचं घरही उजळून निघालं  होतं.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...