* आशा लागू

‘‘अगं रागिणी, २ वाजलेत. घरी जायचं नाहीए का? ५ वाजता परत स्पेशल ड्युटीसाठीही यायचं आहे,’’ सहकारी नेहाच्या आवाजाने रागिणीची तंद्री भंगली. दिवाळीत स्पेशल ड्युटी लावल्याची ऑफिस ऑर्डर हातात घेऊन रागिणी गेल्या दिवाळीच्या काळरात्रीच्या काळोखात भटकत होती. जी तिच्या मनातील काळोखाला अजून काळाकुट्ट करत होती. द्वेषाची एक काळी सावली तिच्यात पसरली होती. त्यामुळे पाहता-पाहता सणाचा सगळा आनंद, सर्व उत्साह लोप पावला. रागिणी निराश मनाने नेहासोबत चेंबरच्या बाहेर निघाली.

असं नव्हतं की तिला प्रकाशाचा त्रास होत होता. एक काळ होता, जेव्हा तिलाही दिव्यांचा सण खूप आवडत होता. घरात सर्वात लहान आणि लाडकी असलेली रागिणी नवरात्र सुरू झाल्यानंतर आईसोबत दिवाळीच्या तयारीलाही लागत असे. संपूर्ण घराची साफसफाई करणे, जुने भंगार, वर्षभर न वापरलेले सामान, छोटे झालेले कपडे आणि रद्दी इ. बाजूला काढणे व त्यानंतर घराच्या सजावटीसाठी नवीन सामान खरेदी करणे तिचा आवडता छंद होता. या सर्व कामात तुळशीबाई व पूजाही तिला मदत करत असत आणि सर्व काम हसत-खेळत पूर्ण होत असे.

दिवाळीच्या सफाई अभियानात अनेकदा स्टोरमधून जुनी खेळणी आणि कपडे निघत असत. ते रागिणी व पूजा घालून पाहत असत आणि आईला दाखवत. कधी तुटलेल्या खेळण्यांनी खेळून जुने दिवस पुन्हा जगत असत…आई कधी चिडत असे, कधी हसत असे. एकूणच हसत-खेळत दिवाळीच्या स्वागताची तयारी केली जात असे.

‘‘पूजा त्यांची घरातील नोकराणी तुळशीबाईंची एकुलती एक मुलगी होती आणि दोघी मायलेकी छतावर बनलेल्या छोट्याशा खोलीत राहत होत्या. पूजाच्या वडिलांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला होता. पतिच्या मृत्यूनंतर तरुण विधवा तुळशीबाईंवर त्यांच्या झोपडपट्टीतील प्रत्येक पुरुष वाईट नजर ठेवू लागला, तेव्हा तिने रागिणीची आई शीलाकडे त्यांच्या घरी राहण्याची परवानगी मागितली. शीलाला तशीही एका फुल टाईम मोलकरणीची गरज होती. तिने आनंदाने होकार दिला. तेव्हापासून या संपूर्ण दुनियेत रागिणीचे कुटुंबच त्यांचे कुटुंब झाले. पूजा रागिणीपेक्षा जवळपास १० वर्षांनी लहान होती. सुंदर, गुटगुटीत पूजा तिला एखाद्या बाहुलीप्रमाणे भासत असे आणि ती तिला बाहुलीप्रमाणेच नटवत असे, केस विंचरत असे आणि तिच्यासोबत खेळत असे.

काळानुसार दोन्ही मुली मोठ्या होत होत्या. रागिणीने इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीटेकची डिग्री घेतली आणि स्पर्धा परीक्षा पास होऊन वीज विभागाच्या राजकीय सेवेत आली. रागिणीला पहिली पोस्टिंग जैसलमेरजवळील एक छोटेसे खेडेगाव फलौदीमध्ये मिळाली. रागिणीचे आई-बाबा तिला आपलं शहर जोधपूरपासून दूर एकटीला पाठविण्यास कचरत होते. तेव्हा तुळशीबाईंनी तिची समस्या हे सांगत सोडवली, ‘‘ताई लहान तोंडी मोठा घास घेत एक सांगू? तुम्ही पूजाला रागिणी बेबीसोबत पाठवा. ती तिचं छोटं-मोठं काम करेल. दोघींचं मनही रमेल आणि तुम्हाला काळजी राहणार नाही.’’

अर्थात, असा विचार शीलाच्या मनातही आला होता, पण ती असा विचार करून गप्प राहिली की परक्या मुलीच्या शंभर जबाबदाऱ्या असतात. उद्या काही कमी-जास्त झालं तर तुळशीला काय उत्तर देणार?

आणि मग रागिणी जेव्हा आपलं संपूर्ण कुटुंब म्हणजेच आईबाबा, तुळशीबाई आणि पूजासोबत नोकरी जॉईन करायला आली, तेव्हा सर्वांना पाहून तिच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं हसून स्वागत केलं. ४ दिवस रेस्ट हाउसमध्ये थांबून स्टाफच्या मदतीने ऑफिसच्या जवळच २ खोल्यांचा एक छोटासा फ्लॅट भाड्याने घेऊन रागिणी व पूजाला तिथे शिफ्ट करण्यात आले. आता आईबाबा रागिणीबाबत पूर्णपणे चिंतामुक्त झाले होते.

रागिणीचा फिल्डचा जॉब होता. नेहमीच तिला साइट्सवर दूरदूरवर जावे लागत असे. काही वेळा परतायला रात्रही होत असे. परंतु तिचे अधिकारी व स्टाफ सर्वांचा स्वभाव चांगला होता. त्यामुळे तिला काहीही अडचण येत असे. घरी येताच पूजा गरमागरम जेवण बनवून तिची वाट पाहत बसलेली दिसे. दोघीही सोबत जेवत. रागिणी दिवसभराच्या गोष्टी पूजाला सांगत असे. तिला दिवसभर भेटणाऱ्या वेगवेगळ्या लोकांबाबत सांगत असे आणि दोघीही खूप हसत असत. एकूणच सर्व ठीक चालले होते.

४ महिन्यांनंतर रागिणीचा खास सण दिवाळी आला. ती सणाला आपल्या घरी जाऊ शकत नव्हती. ज्याप्रकारे पोलिसांची होळीला आणि पोस्टमनची रक्षाबंधनाला स्पेशल ड्युटी लागते, तशाप्रकारे वीज विभागाच्या इंजीनियर्सची दिवाळीला स्पेशल ड्युटी लावली जाते. जेणेकरून विजेची व्यवस्था नीट राहावी आणि लोकांना कोणत्याही अडचणीशिवाय सण साजरा करता यावा.

रागिणीची धनत्रयोदशीपासून दिवाळीपर्यंत ३ दिवस संध्याकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत स्पेशल ड्युटी लावण्यात आली. पहिल्या २ दिवसांची ड्युटी आरामात पार पडली. रागिणीची खरी परीक्षा आज म्हणजे दिवाळीच्या मुख्य सणाच्या दिवशी होती. ती निश्चित वेळी आपल्या सबस्टेशनवर पोहोचली. संध्याकाळी जवळपास ७ वाजता फीडर्सवर विजेचा लोड वाढू लागला. ८ वाजेपर्यंत लोड स्थिरावला आणि या दरम्यान कोणत्याही प्रकारची काही ट्रिपिंगही आली नाही. म्हणजे सर्वकाही सामान्य होते.

‘आता लोड वाढणार नाही. मला एरियाचा एक राउंड मारला पाहिजे,’ असा विचार करत रागिणी गाडी घेऊन राउंडला निघाली. आपल्या गल्लीजवळून जाताना अचानक पूजाची आठवण झाली, तर विचार केला की, ‘आलेच आहे, तर घरात दीवाबत्ती करून जाते. नाहीतर पूजा रात्री १२ वाजेपर्यंत काळोखात बसून राहील.’

तिला पाहताच पूजा खूश झाली. पहिल्यांदा दोघींनी घरात दिवे लावले आणि थोडेसे खाऊन रागिणी पुन्हा आपल्या ड्युटीवर निघाली.

आता बस अशा प्रकारचंच शेड्यूल बनलेलं होतं. दर दिवाळीला रागिणी ५ वाजता ड्युटीवर जात असे आणि ८ वाजता पुन्हा ड्युटीवर जात असे. मग दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आठवड्याभराची सुट्टी घेऊन दोघी बहिणी आईवडिलांजवळ जोधपूरला सण साजरा करण्यासाठी आणि थकवा उतरावायला जात असत.

गेल्या ३ वर्षांमध्ये रागिणी आणि पूजाच्या जीवनात खूप काही बदललं होतं. २ वर्षांपूर्वी अचानक तुळशीबाईंचा हार्टअटॅकने मृत्यू झाला होता. पूजा अनाथ झाली होती. रागिणीच्या आईवडिलांनी तिला विधीपूर्वक दत्तक घेऊन आपली मुलगी बनवलं. रागिणी तर कायमच तिच्यावर छोट्या बहिणीप्रमाणे प्रेम करत असे. आता या नात्यावर सामाजिक मोहोरही लागली होती.

वर्षभरापूर्वी रागिणीचं लग्न विवेकशी झालं. विवेकही तिच्याप्रमाणेच विद्युत विभागात अधिकारी होता. त्याची पोस्टिंग जैसलमेरमध्ये होती. लग्नानंतर त्यांची ही पहिली दिवाळी होती. पण नेहमीप्रमाणे दोघांचीही ड्युटी आपापल्या सबस्टेशन्सवर लागली होती. त्यामुळे दोघांनाही आपली पहिली दिवाळी सोबत साजरी न करण्याचं दु:ख होतं. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रागिणी विवेककडे जैसलमेरला आणि पूजा आईबाबांकडे जोधपूरला निघून गेली. पहिल्यांदा दोन्ही बहिणी वेगवेगळ्या बसेसमधून प्रवास करत होत्या.

रागिणी आणि तिच्या घरच्यांना वाटत होते की विवेक आणि तिची बदली एकाच ठिकाणी व्हावी. म्हणजे ते रागिणीच्या काळजीतून मुक्त होऊन पूजाच्या लग्नाबाबत विचार करतील. दोन्ही कुटुंबांनी खूप प्रयत्न केला, अनेक नेत्यांची शिफारस दिली, सरकारी नियमांचा हवाला दिला आणि जवळपास वर्षभराच्या मेहनतीनंतर शेवटी रागिणीची बदली फलौदीमधून जैसलमेरमध्ये झाली. रागिणी खूप खूश होती. आता तिला विवेकचा विरह सहन करावा लागणार नव्हता. आता तिचं कुटुंब पूर्ण होऊ शकेल आणि पूजाचंही लग्न होईल. अनेक स्वप्न पाहू लागली होती रागिणी.

बदलीनंतर पूजाही रागिणीसोबत जैसलमेरला आली. इथे विवेकला मोठेसे क्वार्टर मिळाले होते. एक नोकरही मदतीसाठी होता. पण तो केवळ बाहेरचीच कामे पाहत असे. घरातील सर्व व्यवस्था पूजाच सांभाळत असे.

आता रागिणीही हाच प्रयत्न करत असे की तिला जास्त वेळ बाहेर राहावे लागू नये. तिला ऑफिसमधून लवकर घरी येऊन जास्तीत जास्त वेळ विवेकसोबत घालवायचा होता. नेहमीच दोघंही संध्याकाळी फिरायला जात असत आणि रात्री उशिरा घरी परतत असत, पण भले कितीही रात्र होऊ दे, रात्रीचं जेवण ते पूजाबरोबरच करत असत. सुट्टीच्या दिवशी रागिणी पूजालाही आपल्यासोबत घेऊन जात असे. कधी पटवोंची हवेली, कधी सोनार किल्ला, कधी गढीसर लेक आणि कधी समच्या धोरोंवर. तिघंही खूप मस्ती करत असत. पूजाही अधिकाराने विवेकला जीजू जीजू म्हणत मस्करी करत असे. संपूर्ण घर तिघांच्या हास्याने उत्साहित राहत असे.

पाहता-पाहता पुन्हा दिवाळी आली. यावेळी रागिणी पूर्ण उत्साहाने सण साजरा करणार होती. नेहमीप्रमाणे दोघींनी मिळून साफसफाई केली. अनेक प्रकारच्या नवीन सजावटी वस्तू खरेदी करून घर सजवलं. २ दिवस आधी दोघांनी मिळून अनेक प्रकारच्या मिठाया व खमंग पदार्थ बनवले. नवीन कपडे खरेदी करण्यात आले. संपूर्ण घरावर रंगीत विजेची तोरणे लावण्यात आली. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर यावेळी पूजाने सुंदरशी रांगोळीही काढली होती.

नेहमीप्रमाणे संध्याकाळी ५ वाजता रागिणी आपल्या ड्युटीवर निघून गेली आणि विवेक त्याच्या. धनत्रयोदशी आणि छोटी दिवाळी कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडली. आज दिवाळीचा मुख्य सण होता. रागिणीला विवेकला सरप्राइज द्यायचं होतं. ती जवळपास ८ वाजता ऑफिसमधून निघाली आणि सरळ मार्केटमध्ये गेली. ज्वेलरीच्या शोरूममधून विवेकसाठी सोन्याची चेन घेतली, जी तिने धनत्रयोदशीला बुक केली होती आणि घराच्या दिशेने गाडी वळवली.

घरी पोहोचण्यापूर्वीच का कुणास ठाऊक, काहीतरी अघटित घडणार असण्याची पाल तिच्या मनात चुकचुकू लागली. आज पूजाने घराबाहेर रिवाजाचा एकही दिवा लावलेला नव्हता. घराचा दरवाजाही आतून बंद होता. दिवाळीच्या दिवशी तर पूजा घराचा दरवाजा एक मिनिटासाठीही बंद करायला देत नसे. तिला काही झालं नाही ना… घाबरलेली रागिणी जोरजोरात दरवाजा ठोकू लागली. दरवाजा काही वेळात उघडला. तो उघडताच पूजाने रडत रागिणीला मिठी मारली.

पूजाचे अश्रू आणि विवेकने घाबरून आपली पँट घालून बाहेर निघून जाणं, तिथे घडलेली घटना सांगण्यास पुरेसे होते. रागिणी दगडासारखी स्तब्ध झाली. तिने लगेच पूजाचा हात पकडला आणि घरातून बाहेर पडली. संपूर्ण रात्र दोघींनी रडत-रडत विभागाच्या गेस्टहाउसमध्ये काढली आणि सकाळ होताच, दोघी जोधपूरला रवाना झाल्या.

मागोमाग विवेकही माफी मागायला आला होता. परंतु रागिणीला अशा व्यक्तिची साथ मुळीच स्वीकार नव्हती, ज्याने आपल्या बहिणीसारख्या मेव्हणीवर वाईट नजर ठेवली. आईबाबांनीही तिचं समर्थन केलं आणि दोघांचं नातं बहरण्यापूर्वी तुटलं.

आज तिला विशालची खूप आठवण येत होती, जो कॉलेजच्या काळात तिला खूप पसंत करत होता, तिच्याशी लग्न करायची इच्छा होती. धर्माच्या ठेकेदारांच्या मते तो खालच्या जातीचा होता. त्यामुळे आईबाबांसमोर त्याचा उल्लेख करण्याची रागिणीची हिंमत झाली नव्हती. हो, पूजाला जरूर सर्वकाही माहीत होतं. विवेकशी नातं जुळल्यानंतर रागिणीने आपल्या अव्यक्त प्रेमाला मनाच्या एका कोपऱ्यात दफन करून केवळ विवेकवरच लक्ष केंद्रित केलं होतं.

एकच विभाग आणि एकच शहर असल्यामुळे रागिणीचा विवेकशी सामना होणे साहजिकच होतं. तिने पुन्हा प्रयत्न करून आपली ट्रान्सफर फलौदीला करून घेतली. पूजाने सर्व चूक आपली असल्याचं म्हणत कधीही लग्न न करण्याचा व रागिणीसोबत राहण्याचा हट्ट पकडला. पण आपल्या बहिणीचं आयुष्य असं बर्बाद व्हावं, अशी रागिणीची मुळीच इच्छा नव्हती. काही दिवसांपूर्वीच एक चांगलासा मुलगा पाहून आईबाबांनी पूजाचं लग्न लावून दिलं.

या दिवाळीला रागिणी अगदी एकटी होती. शरीरानेही आणि मनानेही… आज दिवाळीचा मुख्य सण होता. ती निराश मनाने आपली ड्युटी करत होती. नेहमीप्रमाणे ती रात्री ८ वाजता एरियाच्या राउंडवर निघाली, तेव्हा आपसूकच गाडी घराच्या दिशेने वळली. हे काय? घराबाहेर दिवे कोणी लावले? घराचा दरवाजा उघडा होता. दरवाजात उभी रागिणी संभ्रमात पडली होती. इतक्यात, कोणीतरी मागे येऊन तिला आलिंगन दिलं, ‘‘दिवाळीच्या शुभेच्या ताई.’’

‘‘अगं पूजा, तू इथे? येण्याबाबत कळवायचं तरी होतंस. मी स्टेशनला गाडी पाठवली असती.’’

‘‘मग हा आनंद कुठे पाहायला मिळाला असता आम्हाला, जो तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय, ताई,’’ पूजा तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाली. पूजाच्या पतिने वाकून रागिणीला नमस्कार केला.

‘‘आणि हो, आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की यापुढे येणारी प्रत्येक दिवाळी आपण पूर्वीप्रमाणे एकत्र मिळून साजरी करू,’’ पूजा पुन्हा आपल्या बहिणीला बिलगली.

‘‘अरे बाबांनो, अजूनही खूप सारे लोक आलेत,’’ मागून आईबाबांचा आवाज आला, तेव्हा रागिणीने वळून पाहिलं. आईच्या मागे उभा असलेला विशाल मिश्कीलपणे हसत होता. आई रागिणीचा हात विशालच्या हातात देत म्हणाली, ‘‘पूजाने आम्हाला सर्वकाही सांगितलं आहे. तुम्हा दोघांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.’’ हे ऐकताच रागिणीची नजर लाजेने झुकली.घराच्या छतावर, भिंतींवर झगमगणाऱ्या दिव्यांप्रमाणे रागिणीच्या मनातील आनंदही झगमगू लागला.

‘‘चला, चला, लवकर जेऊन घेऊ. मग आतषबाजी करू या. ताई, तुला ड्युटीवरही जायचं आहे ना,’’ पूजा म्हणाली, तर सर्व हसले. रागिणी आईच्या खांद्यावर डोकं     टेकून घरात गेली. सर्वात मागून चालणाऱ्या बाबांनी सर्वांची नजर चुकवून हळूच आपले अश्रू पुसले.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...