– सोमा घोष

अवघ्या १६ वर्षे वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी मराठी अत्रिनेत्री सुरभी हांडे महाराष्ट्रातील जळगावची आहे. उद्यमशील वातावरणात जन्मलेल्या सुरभीने कलेचे सानिध्य अनुभवले आहे. तिची आई लेखिका आणि वडील संगीतकार आहेत. तिच्या यशाचे श्रेय ती आपल्या आईबाबांना देते. तिची बहुचर्चित मराठी मालिका ‘जय मल्हार’ आहे, ज्यामुळे ती घराघरात ओळखली जाऊ लागली. तिला नेहमीच नवीन व आव्हानात्मक कथांमध्ये काम करणे आवडते. हेच कारण आहे की तिने एक मराठी वेब मालिका ‘भुताटलेला’ केली आहे, जी आधीच प्रदर्शित झाली आहे व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. स्वभावाने नम्र अशा सुरभीशी बातचित झाली. सादर आहे त्यातील काही भाग :

ही कोणत्या प्रकारची वेब सिरीज आहे?

ही एक हॉरर व कॉमेडी वेब सिरीज आहे. मला कधीच वाटले नव्हते की मी अशाप्रकारे दोन्ही जॉनरना कव्हर करू शकेन. स्टोरी ऐकल्यावर छान वाटले, कारण याआधी ३ वर्ष मी मायथॉलॉजिकल मालिका करत होते. त्यात माझा लूक संपूर्ण वेगळा होता. या सिरिजमध्ये माझी भूमिका अतिशय वेगळी आणि छान आहे. मी काम केले आणि सर्वांना आवडले. याशिवाय वेब सिरीजमधील शूटिंगची प्रक्रियासुद्धा अतिशय वेगळी असते, ज्याचा मला अनुभव मिळाला.

अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

लहानपणापासून मी रंगमंचावर काम केले आहे. माझी आई अंजली हांडे खूप उत्तम लेखिका आहे. माझे वडिल संजय हांडे ऑल इंडिया रेडिओमध्ये संगीतकार आहेत. घरात लहानपणापासूनच कलात्मक वातावरण अनुभवले. मंचावर जाऊन सादरीकरण करायला ते मला सांगायचे, यामुळेच माझ्यात त्यादिशेने रूची वाढली आणि या क्षेत्रात येणं योग्य वाटलं. मी जळगावला होते, तिथून नागपूर मग पुणे आणि नंतर मी मुंबईला आले.

मुंबईत कशी आलीस?

१०वीत शिकत असताना माझ्या बाबांचे मित्र मराठी दिग्दर्शक संजय सूरकर यांनी मला त्यांच्या चित्रपटात काम करायची ऑफर दिली. तेव्हा दोन-तीन दिवसांच्या शूटिंगसाठी मी मुंबईत आले होते. तेव्हा प्रथमच मी मुंबईत आले आणि तेव्हा मला कॅमेरासमोरच्या शूटिंग करण्याच्या वातावरणाबाबत कळले.

कुटुंबाचे सहकार्य कितपत मिळाले?

माझ्या परिवाराचा कलेशी संबंध असल्याने त्यांना कोणतीही तक्रार नव्हती. त्यांनीच मला या क्षेत्रात काम करायची प्रेरणा दिली.

पहिला ब्रेक कसा मिळाला?

शिक्षण घेत असताना ‘स्वामी’ नावाच्या एका नाटकात मी काम केले होते, ज्याचे देशात अनेक ठिकाणी प्रयोग झाले. त्यानंतर मला एक शो ‘आंबट गोड’च्या ऑडिशनकरीता मुंबईत यावे लागले. या शोसाठी माझी निवड झाली. यात माझी भूमिका नकारात्मक होती, पण सगळयांनी माझ्या कामाची खूप प्रशंसा केली. मी अभिनयाची प्रक्रिया नेहमी एन्जॉय करते आणि कोणत्याही भूमिकेसाठी अतिशय मेहनत घेते, जेणेकरून भूमिका वास्तव वाटावी. संघर्ष फार नव्हता, कारण मी कामासह मुंबईत आले आणि स्थिरस्थावर झाले.

कोणत्या भूमिकेने तुझे आयुष्य बदलले?

‘जय मल्हार’ ही माझी लोकप्रिय भूमिका होती, ज्याद्वारे मी घराघरात पोहोचली. जेव्हा प्रथम मी ही भूमिका वाचली, तेव्हा वाटले नव्हते की या पात्राला लोक एवढे प्रेम देतील. पण यानंतरच मला ओळखू लागले.

मराठी इंडस्ट्रीसुद्धा लॉकडाऊनमुळे प्रभावित झाली आहे. ती परत रुळावर येण्यासाठी कोणती रणनीती अवलंबण्याची गरज आहे?

हे बरोबर आहे की प्रत्येकच क्षेत्राला लॉकडाऊनने प्रभावित केले आहे. सगळयांना जास्त काम करावे लागेल, पण काम सुरु होण्याआधी कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आखून दिलेल्या गाईडलाईन्स पाळण्याची गरज आहे, जेणेकरून कोणतीही व्यक्ति संक्रमित होणार नाही. आता कमी माणसं घेऊन प्रोजेक्ट पूर्ण करावे लागतील, पण काम करणाऱ्यांवर सगळयाचा भार पडणार नाही याकडेही लक्ष द्यावे लागेल.

नेपोटिज्म आणि गटबाजी मराठी इंडस्ट्रीतसुद्धा आहे का? तुला याचा सामना करावा लागला का?

हे तर प्रत्येकच इंडस्ट्रीत आहे, कारण कुटुंबातील लोकांना प्राथमिकता दिली जाते. हिंदी सिनेउद्योगातच नाही तर प्रत्येक क्षेत्रात हे आहे. हिंदी सिनेमा जास्त दिसतो याचे कारण ग्लॅमर आहे, जे मिडिया जास्त कव्हर करते आणि लोकांना हे बघणे व ऐकणे आवडते. मराठी इंडस्ट्रीत फार नेपोटिज्म आणि गटबाजी नाही आणि मला याचा सामना करावा लागला नाही. मला नकारसुद्धा जास्त मिळाले नाही, कारण मला जे काम मिळाले ते करण्यात मला खूप आनंद मिळाला.

 

 लॉकडाऊनमध्ये वेळ कसा घालवला

लॉकडाऊनचे दोन महिने मी जळगावमध्ये घालवले, कारण माझे सासर व माहेर दोन्ही जळगावमध्येच आहे. आता मी मुंबईत आहे. इथे मी पदार्थ बाहेरून आणून खायचे. आता आम्ही सगळे मिळून घरी बनवतो. याशिवाय पेंटिंग करणे, चित्रपट बघणे अशा अनेक गोष्टी केल्या आहेत. इथेसुद्धा आम्ही दोघे पतिपत्नी तशीच दिनचर्या पाळतो आहे. माझ्या कामात माझे पती दुर्गेश कुलकर्णी नेहमी सहकार्य करतात. त्याचे सहकार्य मला लहानपणापासून मिळाले आहे, कारण ते आमच्या फॅमिली फ्रेंडपैकी आहेत.

कामासोबत घराकडे कसे लक्ष देतेस?

माझ्या पतिचे काम वेगळे आहे, पण ते माझ्या कामाचे महत्व समजून घेतात. घराच्या दरवाज्याच्या आत आलोत की आमचे कौटुंबिक जीवन सुरु होते. तेव्हा कोणत्याही ऑफिसच्या गप्पा होत नाहीत आणि सगळे काम आटोपते.

फॅशन कितपत आवडते? किती फूडी आहेस?

आवड आहे, पण माझ्यासाठी फॅशन आरामदायक असणे आवश्यक आहे. मी फूडी आह, पण जंक फूड नाही खाऊ शकत. भाजी पोळी कोणत्याही अन्नासोबत मला हवे असते.

गृहशोभिकेद्वारे काय संदेश देऊ इच्छितेस?

सध्या लॉकडाऊनमुळे बराच आराम झाला आहे. लोकांनी आता बाहेर पडणे सुरु केले आहे. पण कोरोना अजून गेला नाही आहे. केसेस वाढत आहेत. म्हणून गरज असेल तरच घराबाहेर पडा. स्वत:चा नाही तर कुटुंबाचा विचार करा. वयस्कर व्यक्ति घरात असेल तर त्यांच्या सुरक्षेसाठी घरात रहा. स्वत:च आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्या.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...