* शोभा कटारे
उपवास म्हणजे काही काळ काही गोष्टीपासून दूर राहाणे, जेणेकरून तुम्ही निरोगी राहू शकाल. अशाच प्रकारे तुम्हाला तुमची त्वचा निरोगी ठेवायची असेल तर तुम्ही स्किन फास्टिंग म्हणजे त्वचेसाठीचा उपवास करू शकता. तो त्वचेला आराम देऊन त्वचा नव्याने पूर्ववत करण्यास मदत करतो. या काळात, त्वचा सौंदर्यप्रसाधनांपासून काही काळ दूर राहाते आणि मोकळा श्वास घेण्यास सक्षम होते. असे करणे तुमच्या त्वचेसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
त्वचेमध्ये नैसर्गिक तेल असते. तज्ज्ञांच्या मते जेव्हा तुम्ही सतत त्वचेसाठी काही करत असता तेव्हा तुमच्या त्वचेला नैसर्गिक राहण्याची संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत त्वचेसाठीच्या उपवासामुळे त्वचेची नैसर्गिक देखभाल व्यवस्था सुधारण्यास मदत होते आणि ती डिटॉक्सिफाय होते.
वास्तविक, त्वचा डिटॉक्स करणे म्हणजेच त्वचेसाठीचा उपवास होय. यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर १ दिवस, १ आठवडा, १ महिना टोनर, क्लिंजर, स्क्रब, सीरम, फेस मास्क, मॉइश्चरायझर न वापरता किती वेळ राहाल, हे नक्की ठरवा.
त्वचेचा उपवास म्हणजे काय?
त्वचेचा उपवास म्हणजे तुमची त्वचा काही काळ त्वचेची निगा ठेवणाऱ्या उत्पादनांपासून दूर ठेवणे किंवा काही काळ त्यांचा वापर थांबवणे. म्हणजे तुमची त्वचा श्वास घेऊ शकेल आणि विश्रांती घेईल तसेच पूर्ववत होईल. असे केल्याने तुम्ही कोणत्याही उत्पादनाच्या मदतीशिवाय नैसर्गिक पद्धतीने तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता.
त्वचेचा उपवास का महत्त्वाचा आहे?
त्वचेत सिबम नावाचा तेलकट पदार्थ तयार होतो, ज्यामुळे ओलावा कमी होण्यास मदत होते. त्वचेच्या उपवासामुळे क्रीम इत्यादी कमी लावले जाते किंवा अजिबात लावले जात नाही, ज्यामुळे सिबम नैसर्गिकरित्या त्वचेला मॉइश्चरायझ करते.
सिबम काय आहे?
सिबम हे शरीरातील नैसर्गिक तेल आहे जे शरीरातील सिबेशियस ग्रंथी नावाच्या विशेष ग्रंथीमध्ये तयार होते, जे सहसा छिद्रातून वरच्या बाजूस वाहाते आणि केस तसेच त्वचेला वंगण देते.
सिबम हे एक असे मिश्रण आहे जे शक्यतो तेलकट आणि मेणासारखे असते, ज्याचे कार्य त्वचेला आर्द्रता देणे आणि संरक्षित करणे आहे. त्यात फॅटी अॅसिड, साखर, मेण आणि इतर नैसर्गिक रसायने असतात. त्याची वाढ किंवा घट याचा थेट परिणाम त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर होतो.
त्वचेच्या उपवासाचे फायदे
* त्वचेच्या उपवासामुळे त्वचेला चमक आणि ताजेपणा मिळतो.
* त्वचेची संवेदनशीलता कमी होऊ लागते.
* त्वचा स्वत:ला संतुलित आणि पूर्ववत करते.
* त्वचेचे आरोग्य नैसर्गिकरित्या सुधारू लागते.
* त्वचेचे नैसर्गिक संरक्षणात्मक आवरण मजबूत होते.
* त्वचेची छिद्रे उघडतात.
* त्वचेला श्वास घेण्यास आणि टवटवीत होण्यास मदत होते.
* त्वचा उत्पादनांचा अतिवापर टाळता येतो.
तोटा
* कधीकधी त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेसाठीचा उपवास करताना भरपूर पाणी आणि ताजा रस प्या.
* त्वचेचा उपवास सुधारित रुपात करा. त्यासाठी खोबरेल तेल, मुलतानी माती, मध, पाणी यासारख्या नैसर्गिक गोष्टी त्वचेवर वापरा.
* पुरळ, पुटकुळ्या येऊनही त्वचेची काळजी घेणारी उत्पादने न वापरणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लक्षात ठेवा
* एकाच वेळी सर्व उत्पादनांचा वापर थांबवण्याऐवजी, हळूहळू एक-एक करून उत्पादनांचा वापर कमी करणे चांगले ठरेल.
* ज्यांची त्वचा नाजूक आहे आणि ज्यांना काही समस्या असतील, सोबतच काही उत्पादनांचा वापर आवश्यक असेल तर त्वचेचा उपवास करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
* तुमची त्वचा अंतर्गत हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या.
* जर त्वचेचा उपवास तुमच्या त्वचेला लागू पडत नसेल तर तो जास्त काळ करू नका.
* त्वचा आणि हवामानाचा अंदाज घेऊनच त्वचेचा उपवास करा.
त्वचेचा उपवास हा खूप उपयुक्त उपचार आहे. त्वचेला डिटॉक्सिफाय करण्याचा आणि तिला चांगली चमक देण्याचा हा जपानी मार्ग आहे. सौंदर्यप्रसाधनांच्या वापरामुळे तसेच अशुद्धता आणि प्रदूषणामुळे त्वचा निर्जीव होऊ शकते, ज्यामुळे तिच्या समस्या वाढतात आणि चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व दिसू लागते. ज्याप्रमाणे आपल्याला विश्रांतीची गरज असते, त्याचप्रमाणे त्वचेलाही विश्रांतीची गरज असते, जेणेकरून ती देखील निरोगी राहील.





