* मिनी सिंह

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सुश्मिताने तिचा प्रियकर रोहमन शौलसोबत ब्रेकअप केले. सुश्मिताने ब्रेकअपनंतरची पहिली पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘‘शांतता सर्वात सुंदर आहे. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते.’’ यासोबत एक स्मायली इमोजी शेअर करत तिने लिहिले की, ‘‘हे नाते फार पूर्वीपासून संपले होते, पण तरीही आम्ही दोघेही मित्र बनून राहिलो.’’

माहितीनुसार, दोघांमध्ये काहीच ठीक नव्हते, त्यामुळे दोघांचे ब्रेकअप झाले.

सुश्मिता आणि रोहमनचे जवळपास ३ वर्षे प्रेमसंबंध होते. सुश्मिता आणि तिच्या मुलींना तो आपले कुटुंब मानायचा, असेही रोहमनने म्हटले होते. मग असे काय झाले की, दोघे वेगळे झाले? काहीही असो, सुश्मिता सेनच्या ब्रेकअपच्या बातमीने तिच्या चाहत्यांना दु:ख झाले.

प्रश्न असा पडतो की, प्रेम आणि विश्वासानंतर प्रेमी युगुल एकमेकांपासून वेगळे का होतात? त्यांच्यात ब्रेकअपची परिस्थिती का निर्माण होते? काही जण असा युक्तिवाद करतात की, आम्ही एकमेकांसाठी बनलेलो नाही आणि काहीजण असा युक्तिवाद करतात की, आम्ही त्याला समजून घेण्यात चूक केली.

प्रेम जितके गोड तितके ब्रेकअप अधिक दु:खद असते. २ प्रेमळ लोक नात्यात इतके जोडलेले असतात की, त्यांना वेगळे करणे कठीण होऊन जाते. प्रेमाला लग्नाच्या मुक्कामापर्यंत नेण्यासाठी अनेकदा धर्म, लिंग आणि वयाचे अडथळे येतात, त्यामुळे दोन प्रेमी वाटेतच विभक्त होतात, पण काळानुसार बदल होत गेले. या सगळया गोष्टींवर आता लोकांचा विश्वास नाही. तरीही कधीतरी असे काही घडते की, प्रेम लग्नापर्यंत पोहोचत नाही आणि ब्रेकअप होते. हे नाते केवळ काही वर्षे टिकते आणि नंतर दोघे वेगळे होतात. अशा संबंधांबद्दल तज्ज्ञ सांगतात की, ७० टक्के अविवाहित जोडप्यांचे पहिल्या वर्षीच ब्रेकअप होते. असेही आढळून आले आहे की, ५ वर्षांच्या नात्यानंतर ब्रेकअपची शक्यता फक्त २० टक्के असते.

एका अहवालानुसार, बहुतेक जणांचा ब्रेकअप शुक्रवारी होतो. ज्यामध्ये असे दिसून आले की शुक्रवारी प्रेमी एकमेकांशी सर्वाधिक भांडतात. तसेच, या दिवशी नाते तुटण्याचा धोका सर्वाधिक असतो. अहवालानुसार, शुक्रवारी ७५ टक्के प्रेमींचा ब्रेकअप झाला होता, पण प्रश्न असा आहे की, पहिल्या १-२ वर्षांत असे काय घडते की, २ प्रेमी जीव वेगळे होतात?

जोडीदाराचे सत्य समोर येणे

रिलेशनशिप एक्सपर्ट म्हणजेच नातेसंबंध तज्ज्ञ नील स्ट्रॉस सांगतात की, कोणत्याही नातेसंबंधात पहिले वर्ष आव्हानांनी भरलेले असते. सुरुवातीला प्रत्येकजण विचारांमध्ये हरवलेला असतो, म्हणजेच वास्तवापासून दूर असतो. तुम्हाला तुमच्या जोडीदारामध्ये काय पाहायचे आहे ते तुम्ही पाहाता, पण काही महिन्यांनी जेव्हा तुम्ही वास्तवाच्या जवळ येऊ लागता तेव्हा चित्र स्पष्ट होते. समोरच्या व्यक्तीच्या सवयी, वागणूक, चालीरीती, बोलण्याची पद्धत इत्यादी दिसू लागतात आणि मग तुमचा त्याच्याबद्दल भ्रमनिरास होऊ लागतो, कारण मग त्या व्यक्तीमध्ये जे काही आहे ते तुम्हाला दिसू लागते. त्यानंतर वादविवाद सुरू होतात. ते ओलांडून नाते पुढे सरकते किंवा मध्येच घुसमटून मरून जाते.

ब्रेकअपचा हंगाम

एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, व्हॅलेंटाईन डेच्या आसपास बहुतेक ब्रेकअप होतात, कारण त्या दिवशी प्रेमी एकमेकांकडून जास्त अपेक्षा ठेवतात की, ते तिच्यासाठी काय करणार आहेत, त्यांना कोणती भेटवस्तू मिळेल आणि जेव्हा अपेक्षाभंग होतो तेव्हा ब्रेकअप होतो. असे काही लोक आहेत जे विशेषत: व्हॅलेंटाइन डेसाठी त्यांच्या ब्रेकअपची योजना आखतात. प्रेमात फसवणूक झाल्यासारखे वाटणारे लोक व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी फक्त बदला घेण्याच्या उद्देशाने ब्रेकअप करतात.

प्रेम आंधळं असतं

शास्त्रज्ञांनी पुष्टी केली आहे की, प्रेम खरोखरंच आंधळं आहे. त्यांना आढळले की, प्रियकराच्या भावना गंभीर विचारांवर नियंत्रण ठेवणारे मेंदूचे भाग दाबत असतात. म्हणून जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या जवळ जातो तेव्हा आपला मेंदू ठरवतो की, त्या व्यक्तीच्या चारित्र्याचे किंवा व्यक्तिमत्त्वाचे खोलवर मूल्यांकन करणे गरजेचे नाही, पण एक वेळ अशी येते जेव्हा एखादी व्यक्ती मूल्यांकन करते.

ब्रेकअपचे कारण

लाइफ कोच म्हणजेच जीवन तज्ज्ञ केली रॉजर्स यांना त्यांच्या संशोधनात असे आढळून आले की, महिला त्यांच्या नातेसंबंधात जे देतात त्याबदल्यात त्यांना जास्त भावनिक फायदा हवा असतो. नातेसंबंधात ६ महिने बांधील राहिल्यानंतर महिलांना समजते की, त्यांनी या नात्यात त्यांचे प्रेम, लक्ष, पैसा आणि वेळ दिला आहे, म्हणून त्यांना त्या बदल्यात काहीतरी मिळाले पाहिजे. खूप अपेक्षा हेही कधी कधी ब्रेकअपचे कारण ठरते.

जेव्हा पैसा मध्ये येतो

तुमचा जोडीदार पैशांबाबत किती उदार किंवा कंजूष आहे हे तुम्हाला काही काळानंतर समजते. त्याच्यासोबत २-४ वेळा फिरायला गेल्यावर आणि वाढदिवस साजरा केल्यानंतरच समजते की, तुमचा जोडीदार पैशांच्या बाबतीत किती उदार आहे. जर तो तुमच्या अपेक्षेनुसार वागला नाही तर ब्रेकअप होण्याची शक्यता असते. काही वर्षे कोणत्याही नात्यात राहिल्यानंतर आर्थिक विसंगती मध्ये येते. नात्यात पैसा आला की, विश्वास आणि सुरक्षितता असे प्रश्न निर्माण होऊ लागतात.

आश्वासक न वाटल्यास

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बहुतेक लोक नातेसंबंधाच्या १ वर्षानंतर सर्वांना त्यांच्या नात्याबद्दल सांगतात. १ वर्षानंतर काही लोकांना आश्वासक किंवा दृढ वचनबद्धतेची आवश्यकता भासते, पण जर जोडीदाराला नात्याबद्दल कोणालाच सांगायचे नसेल किंवा लग्नाबद्दल काही बोलायचे नसेल तर जोडीदार हे नाते संपवतो. बहुतेक मुलींना मुलांकडून अशी वचनबद्धता हवी असते, कारण त्यांना त्यांचे नाते सुरक्षित करायचे असते, पण अनेकदा मुलं काही ना काही कारण सांगून यापासून दूर पळतात.

जेव्हा नात्याचे वय कळते

काही लोकांना कळून चुकते की, त्यांचे नाते फार पुढे जाणार नाही. त्यांना किती काळ नाते जपायचे आहे किंवा नाही, हे त्यांनाच माहीत असते. त्यामुळे त्यांना ब्रेकअपचा कोणताही पश्चाताप वाटत नाही. ते फक्त वेळ घालवण्यासाठी किंवा मित्रांना दाखवण्यासाठी प्रेम करतात. तुम्ही असे अनेक पाहिले असतील जे नवीन शहरात शिकायला किंवा नोकरीला गेल्यानंतर जोडीदार शोधतात आणि त्यानंतर ब्रेकअप करतात.

कमी वयातले प्रेम

प्रेमाची सुरुवात खूप चांगली होते. त्यावेळी माणूस डोक्याने नव्हे तर मनाने विचार करतो, पण ज्या दिवशी त्याला समजले की, आपण या प्रकरणात पडून आपला वेळ वाया घालवत आहोत, कारण आता आपल्याला आपले भविष्य घडवायचे आहे, करियर बनवायचे आहे, तेव्हा तो ब्रेकअप करतो. हे बहुतेक तरुणांमध्ये घडते जेथे त्यांचे वडील त्यांना हे समजावतात की, ही वेळ त्यांचे भविष्य घडवण्याची आणि प्रेमात न पडण्याची आहे.

जेव्हा जोडीदार बदलू लागतो

नात्याच्या सुरुवातीला तुम्हाला तो आवडतो हे दाखवण्यासाठी तुमचा जोडीदार जे करतो तेच तुम्ही करता. जसे आठवडयाच्या सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणे, चित्रपट पाहाणे, जेवायला जाणे, पार्टी करणे, परंतु काही काळानंतर जेव्हा तुम्हाला समजते की, तुमच्या जोडीदाराला व्हिडीओ गेम खेळणे किंवा टीव्हीला चिकटून बसणे आवडते, तेव्हा नाते पुढे जाण्याऐवजी मागे सरकते आणि मग ते ब्रेकअपमध्ये संपते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...