* ललिता गोयल

पालकांची जागा इतर कुणी घेऊ शकत नाही. कोणत्याही पालकांसाठी त्यांची मुलेच त्यांचे जग असते. मुलांची केवळ उपस्थितीच त्यांचे जीवन अर्थपूर्ण बनवते. पालक मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि या प्रयत्नात त्यांना नको असतानाही मुलांना घरी एकटे सोडण्याचा कठोर निर्णयसुद्धा घ्यावा लागतो. कबूल आहे की मुलांना घरात एकटे सोडणे ही २१ व्या शतकातील एक गरज आणि आई-वडिलांसाठी एक विवशता बनली आहे, परंतु ही विवशता आपल्या लहान मुलांच्या व्यक्तिमत्त्वात आणि वागणुकीत कसा बदल घडवून आणू शकते हे जाणून घेणे कोणत्याही पालकांसाठी आवश्यक आहे.

शेमरॉक अँड शेमफोर्ड ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका मिनल अरोराच्या म्हणण्यानुसार पालकांच्या अनुपस्थितीत एकटेच राहणाऱ्या मुलांच्या वागण्यात खालील समस्या दिसून येतात :

भीतीची प्रवृत्ती

मुलांमध्ये घरी एकटे राहण्यामुळे रिकाम्या घरात सामान्यशा आवाजानेही भीती बाळगण्याची प्रवृत्ती निर्माण होते कारण त्यांना बाह्य जगाचा फार कमी अनुभव असतो. याव्यतिरिक्त जी मुले एकटेच राहतात ती त्यांची भीती पालकांकडे सामायिक करीत नाहीत कारण त्यांची इच्छा नसते की त्यांना अजूनही मुल समझले जावे. बऱ्याच वेळा मुले त्यांच्या पालकांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंतीत करू इच्छित नाहीत, म्हणूनच ते आपल्या मनातील गोष्टी लपवतात.

एकटेपणा

घरात एकटया राहणाऱ्या मुलांना त्यांच्या मित्रांना भेटण्याची, कुठल्याही अवांतर कामात भाग घेण्याची किंवा कोणतीही सामाजिक कौशल्ये विकसित करण्याची परवानगी नसते. याचा त्यांच्या सामाजिक जीवनावर परिणाम होतो आणि ते एकाकीपणाला बळी पडतात. अशी मुले आपल्या वस्तू सामायिक करायलासुद्धा शिकत नाहीत. ते स्वकेंद्रित होतात. बाह्य जगापासून दूर राहिल्याने ते स्वार्थी, नेभळट आणि चिडचिडे होतात.

आरोग्यास धोका

घरी राहणारी मुले कोणतीही बाह्य क्रिया करीत नाहीत ज्यामुळे त्यांचे शरीर सक्रिय राहील. परिणामी आळशीपणा वाढतो आणि बहुतेक मुले लठ्ठ होतात. अशा मुलांमध्ये खाणे-पिणे, आरोग्य आणि विकासाशी संबंधित समस्यादेखील दिसून येतात. एकटे राहिल्यामुळे अशी मुले औदासिन्यासदेखील बळी पडतात. त्यांचे रोजचे जीवन विस्कळीत होते. बऱ्याच वेळा वेळेअभावी पालक मुलांचा प्रत्येक आग्रह पूर्ण करतात, ही सवय त्यांना स्वार्थी बनवते आणि ते त्यांचा प्रत्येक आवश्यक, अनावश्यक आग्रह व मागणी पूर्ण करून घेऊ लागतात.

हट्टी आणि स्वार्थी

पालक घरी एकटे राहणाऱ्या मुलांसाठी काही नियम ठरवतात. जसे की टीव्ही पाहण्यापूर्वी आपला गृहपाठ पूर्ण करणे, अनोळखी लोकांशी न बोलणे, इतर कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या अनुपस्थितीत घरात प्रवेश न करू देणे इ. परंतु अशा परिस्थितीत जर त्यांच्यावर लक्ष ठेवणारा कोणी नसेल तर त्यांना हवे ते करण्याचे स्वातंत्र मिळू शकते. याचे धोकादायक परिणाम होऊ शकतात.

तथापि कोणतीही २ मुले एकसारखी नसतात. वेगवेगळया परिस्थितीत वेगवेगळया पद्धतीने वर्तणूक करतात. म्हणूनच त्यांची मुले खरोखरच एकटे राहण्यास तयार आहेत की नाहीत हे जाणून घेण्याची जबाबदारी केवळ पालकांचीच असते. जर तयार असतील तर मग मुलांना घरी एकटे सोडण्याआधी काही विशिष्ट गोष्टी लक्षात घ्याव्यात जसे की मुलाचे वय आणि परिपक्वता.

जर आपण वरील गोष्टी लक्षात ठेवून आपल्या मुलांना घरी सोडण्याचा विचार केला असेल तर त्यांच्या सुरक्षेसाठी पुढील उपाय नक्कीच अवलंबावेत :

* मुलाशी संपर्क साधण्यासाठी एक वेळ निश्चित करा. याद्वारे आपणास समजेल की मुले सुरक्षित आहेत की नाहीत. आपण घरापासून दूर असताना देखील त्यांच्यावर लक्ष ठेवा. दिवसा मुलांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत रहा. त्यांनी दुपारचे जेवण घेतले की नाही, शाळेत त्यांचा दिवस कसा गेला, शाळा किंवा अभ्यासाशी संबंधित त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्यावर उपाय सुचवा. आपले असे करणे आपणास मुलांशी जोडून ठेवेल.

* मुलांना याबद्दलही माहिती द्या की कुटुंबाबद्दल कोणत्या गोष्टी आणि किती गोष्टी कोणाला सांगाव्यात. एवढेच नव्हे तर मोठयांच्या अनुपस्थितीत त्यांना गॅस पेटविण्याची किंवा कोणत्याही तीक्ष्ण वस्तूसह काम करण्याची अजिबात परवानगी देऊ नका.

* घरात दारू किंवा इतर कोणतेही मादक पदार्थ ठेवू नका. कार किंवा दुचाकीच्या चाव्या लपवून ठेवा.

* आपल्या परवानगीशिवाय कुणा शेजारच्या घरात एकटे न जाण्याची सूचना द्या. परंतु त्याच वेळी आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या शेजाऱ्याबद्दल नक्कीच सांगा जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तो त्यांच्याशी संपर्कात राहू शकेल.

* आपत्कालीन परिस्थितीसाठी त्यांना स्थानिक किंवा दूरच्या नातेवाईकांचे फोन नंबर द्या. आपल्या अनुपस्थितीबद्दल आपल्या खास शेजाऱ्यास सूचित करा. त्यांना मुलांची देखरेख करायला सांगा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...