*  भैल चंदू

नेहाच्या लग्नाच्या ४ वर्षानंतरच तिच्या पतीचे निधन झाले. आपल्या मुलाच्या संगोपनात तिने काही वर्षे घालवली. त्यानंतर मुलगा वसतिगृहात शिकण्यासाठी गेला. नेहा नोकरीसोबतच घर सांभाळायची. तिला जीवनात खूप एकाकीपणा जाणवत होता. तिला जवळची वाटणारी फक्त तिची वृद्ध आई होती. तीही तिच्या मुलांसोबत राहात होती. नेहा आईकडे जायची, पण भाऊ, वहिनी यांना तिच्याबद्दल आपुलकी नव्हती. त्यांच्या वागण्यावरून असे वाटायचे की, नेहा त्यांना फारशी आवडत नव्हती.

नेहा दिसायला सुंदर आणि सुस्वभावी होती. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्या जवळ जाऊ पाहणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. यातील अनेक जण तिच्या मैत्रिणींचे पतीही होते. अशा लोकांच्या वागण्यातून नेहाला कळायचे की, कोणाला काय हवे आहे?

नेहा जितकी सुंदर होती तितकीच ती फॅशनेबल होती. तिची स्टाईल पाहून लोकांना वाटत असे की, नेहाला आपलेसे करणे खूप सोपे आहे. अनेकदा लोक तिला चंचल समजण्याची चूक करत असत.

जोडीदाराची गरज

नेहा या गोष्टींपासून अनभिज्ञ नव्हती, पण तिने अशा लोकांकडे आणि त्यांच्या वागण्याकडे लक्ष दिले नाही. नेहालाही एका सोबतीची गरज भासत होती, ज्याच्यासोबत ती बसून बोलू शकेल, ज्याला ती सर्वसामान्य मित्रापेक्षा वेगळी समजू शकेल.

अशा वेळी शारीरिक संबंधांचीही गरज भासते हेही खरे. कधी कधी सेक्स आवश्यकही असतो. एकाकीपणा तुम्हाला नैराश्यात टाकू नये यासाठी जोडीदाराची गरज असते.

नेहाने तिच्या मैत्रिणींच्या पतींच्या वासनांध नजरांपासून स्वत:ला दूर ठेवत डॉ. दिनेशसोबत घट्ट मैत्रीची सुरुवात केली. डॉ. दिनेशचे स्वत:चे कुटुंब असले तरी तो क्वचितच कुटुंबासोबत राहात असे. कुटुंबाची काळजी घेत असतानाच नेहाशी नाते निर्माण करण्यातही तो यशस्वी झाला. तो नेहाची सर्वतोपरी काळजी घेत असे.

शारीरिक संबंधातूनही नेहा आणि डॉक्टर दिनेश एकमेकांची पूर्ण काळजी घेत असत, पण दोघेही आपापली जबाबदारी स्वतंत्रपणे पार पाडत होते. दोघेही एकमेकांवर खुश होते. बाकीच्या लोकांनाही काही त्रास नव्हता.

मैत्रिणीचा नवरा झाला डोईजड

नेहा जितकी समंजस होती तितकीच सुप्रिया असमंजस होती. सुप्रियाही अविवाहित होती. तिचा घटस्फोट झाला होता. ती स्वत:चा व्यवसाय करण्यात आनंदी होती. एमबीए झालेली तिची मुलगी नोकरी करत होती. सुप्रियाची मैत्रीण रजनीचा पती अशोक तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. रजनीला हे माहीत नव्हते. सुप्रिया आणि अशोकची मैत्री झाली होती. सुरुवातीला ते दोघे गुपचूप भेटत. त्यानंतर ते कुठेही बिनधास्तपणे भेटू लागले.

पत्नीपेक्षा अशोक सुप्रियासोबत जास्त खुश होता. काही दिवसांतच रजनी आणि तिच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली. अशोकशी बोलण्याऐवजी तिने सुप्रियाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. दोन्ही कुटुंबात वाद वाढत गेला. सुप्रिया रजनीच्या पतीसोबत फिरते, हे सर्वांना समजले. सुप्रिया बदनाम होत असतानाच तिचे रजनीसोबतचे नातेही संपुष्टात आले. ज्या आनंदासाठी सुप्रियाने अशोकशी संबंध ठेवले होते त्याच आनंदाचे रूपांतर बदनामीत झाले. सुप्रियाने तिच्या मैत्रिणीच्या पतीशी संबंध ठेवले नसते तर परिस्थिती इतकी बिघडली नसती.

अशा परिस्थितीत, हे स्पष्टपणे समजू शकते की, चाळीशीनंतर अविवाहित महिलांनी पुरुष मित्र बनवायला हरकत नाही, पण ते त्यांच्या मैत्रिणींचे पती असू नयेत. असे झाल्यास नाती घडण्याऐवजी बिघडतात.

वाढतेय एकल महिलांची संख्या

जगभरात अविवाहित राहणाऱ्या महिलांची संख्या झपाटयाने वाढत आहे. भारतासारख्या देशात ही संख्या काही वर्षांत झपाटयाने वाढली आहे. ‘नॅशनल फोरम फॉर सिंगल वुमन’च्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात सुमारे ७ कोटी ११ लाख महिला अविवाहित आहेत. हे प्रमाण देशाच्या एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के आहे. २००१ मध्ये हा आकडा ५ कोटी १२ लाख एवढा होता. १० वर्षांत त्यात ३९ टक्के वाढ झाली आहे.

पूर्वी जिथे ४० पेक्षा जास्त वयाच्या महिला एकल महिला म्हणून जीवन जगत होत्या, आता यापेक्षा लहान वयाच्या महिलाही एकल महिला म्हणून जगत आहेत. २५ ते ३० वयोगटातील बहुतांश महिला एकल महिला म्हणून जगत आहेत. एवढेच नाही तर २२ ते २४ वयोगटातील १ कोटी ७० लाख महिला अविवाहित आहेत. ६० ते ६४ वयोगटातील सुमारे ७० लाख महिला अविवाहित आहेत.

विचारसरणीतील बदलांचा परिणाम

एवढेच नाही तर देशातील मुलींचे लग्नाचे सरासरी वयही झपाटयाने वाढत आहे. १९९० मध्ये मुलींचे लग्नाचे सरासरी वय १९ वर्षे होते, ते २०११ मध्ये वाढून २१ वर्षे झाले. आकडेवारी दर्शवते की २००१ ते २०११ दरम्यान सर्वाधिक बदल झाले आहेत. या कालावधीत ६८ टक्के वाढ झाली आहे.

देशात एकटया राहणाऱ्या महिलांची संख्या पाहिली तर त्यात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. १ कोटी २० लाख एकल महिला एकटया उत्तर प्रदेशात आहेत. ६२ लाख एकल महिलांसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून ४७ लाख एकल महिलांसह आंध्र प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्येही ही संख्या झपाटयाने वाढत आहे.

जेव्हा २०२१ चे आकडे समोर येतील तेव्हा ते अधिक धक्कादायक असतील, कारण घरून काम, कोरोना, अकाली मृत्यू आणि बदलत्या विचारसरणीमुळे बरेच बदल झाले आहेत. विवाह पुढे ढकलले गेले आहेत.

लग्नाव्यतिरिक्त इतर जबाबदाऱ्या

पूर्वी चाळिशीनंतर अविवाहित राहण्यामागे एकतर महिलेने लग्न केले नाही किंवा लग्नानंतर घटस्फोट घेतला किंवा पती जिवंत नाही अशी कारणे असायची. आता तसे नाही. अनेक महिला आपले करिअर घडवण्यासाठी किंवा कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यासाठी लग्न न करता अविवाहित राहण्याचा निर्णय घेतात. काही एकल महिला मूल दत्तक घेतात, त्यामुळे त्यांनाही एक कुटुंब मिळते.

अशा महिलांचे मत असते की, फक्त लग्न करणे हाच जीवनाचा उद्देश नाही. संपूर्ण देश आणि समाजाने प्रगती करावी, आनंदी असावे, हेही गरजेचे आहे. आता फक्त सेलिब्रेटीज नाहीत तर सर्वसामान्य महिलाही एकटया राहून आपल्या जबाबदाऱ्या समजून घेत आहेत.

अशा महिलांनी स्वावलंबी होऊन योग्य दिशेने विचार करणे गरजेचे आहे. एकल महिलांबाबत समाजाची विचारसरणी बदलत आहे. अशा परिस्थितीत त्यांनी आत्मविश्वासही बाळगला पाहिजे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...