* पारूल भटनागर

असे म्हणतात की, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन म्हणजेच कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही संबंधांत कुठल्याही वळणावर जो पहिला अनुभव, सुरुवातीचे वागणे असते तेच आपला प्रभाव पाडते, भविष्याला योग्य आकार देते. अशाच प्रकारे व्यावहारिक जीवनातही पहिले वर्ष आपल्या वैवाहिक जीवनात आपल्या वर्तणुकीचा पहिला प्रभाव, पहिला ठसा उमटवणारे ठरते.

आपण जर या वर्षात आपला चांगला प्रभाव पाडू शकलो तर आपल्या वैवाहिक जीवनातील आपला प्रभाव कायमच संस्मरणीय ठरेल. लग्नाचे पहिले वर्ष कशा प्रकारे जीवनाला सुखी किंवा दु:खी बनवू शकते, हे आम्ही तुम्हाला सांगतो.

सर्वात आधी नव्याने लग्न झालेले जोडपे आपल्या लग्नाला ३ भागांत विभागून  हे जाणून घेऊ शकतो की, त्यांचे वैवाहिक जीवन कशा प्रकारचे आहे. ज्यामुळे त्याला हे समजून घेणे सोपे होईल की, त्याचे भविष्यातले वैवाहिक जीवन कसे असेल.

चांगले लग्न (सुखी वैवाहिक जीवन)

या लग्नाचा संबंध त्या लग्नाशी आहे जिथे पतीपत्नी आपले वैवाहिक जीवन आनंदाने जगतात. प्रत्येक वळणावर, प्रत्येक क्षणी एकमेकांना समजून घेवून संसार करण्यासोबतच दोन्ही कुटुंबांमध्येही चांगला ताळमेळ ठेवतात. एखाद्या गोष्टीवरून दोघांमध्ये बिनसले तरी त्याकडे अशा प्रकारे डोळे झाक करतात जसे काही घडलेच नाही.

अशा वागण्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्यासह पतीपत्नी आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात इतक्या चांगल्या प्रकारे करतात की, एकमेकांना आणि कुटुंबाला समजून घेतल्यामुळे पुढे अडचणी येण्याची शक्यता फारच कमी असते, कारण नात्यामध्ये प्रेम, आदर, आपलेपणा, समजूतदारपणा हा सुरुवातीपासूनच असतो. जर तुमच्या नात्यातही हे सर्व असेल तर समजून जा की, तुम्ही सुखी वैवाहिक जीवन जगण्यासोबतच तुमच्या आयुष्यालाही योग्य वाटेवरून घेऊन जात आहात.

कंटाळवाणे लग्न (तडजोडीचे वैवाहिक जीवन)

अशा लग्नात प्रेम, समजूतदारपणाऐवजी फक्त तडजोड असते. कदाचित आवडीचा जोडीदार न मिळाल्यामुळे किंवा आपापसात सामंजस्य नसल्यामुळे अशी तडजोड करावी लागू शकते. काहीही कारण असले तरी यामुळे जोडीदारांना त्यांचे वैवाहिक जीवन तडजोड करूनच जगावे लागते. अशा प्रकारच्या वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत फिरायला जाणे तर दूरच त्यांना एकमेकांसोबत बोलायलाही आवडत नसते.

जर एकमेकांना समजून घेणेच जमत नसेल तर कुटुंबाला समजून घेणे ही फार दूरची गोष्ट असते. दोघे वैवाहिक जीवनात पहिले पाऊल टाकतात खरे पण, ते स्वत:च तयार केलेल्या या कंटाळवाण्या वैवाहिक जीवनाला क्षणोक्षणी दोष देतात. आपण लग्न केलेच का? याचा त्यांना पश्चात्ताप होत असतो.

वाईट लग्न (नापास, घटस्फोटाच्या उंबरठ्यावर)

असे लग्न म्हणजे पतीपत्नी एकमेकांना समजून घेण्याऐवजी सतत भांडतात, एकमेकांवर, एकमेकांच्या कुटुंबांवर चिखलफेक करतात. एकमेकांवर अश्लील आरोप करतात, प्रसंगी हात उगारायलाही मागेपुढे पाहात नाहीत.

हेही सत्य आहे की, अशा प्रकारची वागणूक वैवाहिक जीवनात काही काळापुरतीच सहन केली जाऊ शकते. पाणी डोक्यावरून जाताच अशी लग्नगाठ हळूहळू कमकुवत होऊन रोजच्या क्लेशांमुळे घटस्फोटापर्यंतची वेळ येते, कारण कमकुवत झालेली लग्नगाठ आयुष्यभर पकडून ठेवणे आईवडिलांना शक्य नसते आणि जोडीदाराला समजावणेही फारच अवघड झालेले असते.

अशा प्रकारचे लग्न एकतर मोडण्याच्या मार्गावर असते किंवा ते मोडते. ते इतरांसाठी लग्नाचे सर्वात वाईट उदाहरण ठरते.

काही अन्य गोष्टीही आहेत ज्यांच्याकडे डोळे झाक करता येणार नाही. जसे की,

नात्यात रोमान्सची कमतरता

लग्नाची पहिली १-२ वर्षे खूपच खास असतात, कारण दोघेही एकमेकांना समजून घेण्यासाठी, एकमेकांच्या सोबतीने वेळ मजेत घालवण्यासाठी बरेच फिरतात. भरपूर रोमान्ससोबत संभोगही केला जातो. त्यामुळे दोघांमध्ये जवळचे नाते निर्माण होण्यासह भावनात्मक रूपातही एकमेकांप्रती ओढ वाढते, पण अनेकदा संभोग तितकासा रंगत नाही जितकी जोडीदाराला अपेक्षा असते.

जिथे आपल्या जोडीदाराकडून पती किंवा पत्नी रोज संभोगाची अपेक्षा ठेवतात तिथे जबरदस्तीने लग्नाचे ओझे वाहणाऱ्या किंवा जेव्हा विवाहबाह्य संबंधांमुळे नात्यात रोमान्स, संभोगाची कमतरता समाधान मिळवून देत नाही तेव्हा एकमेकांपासून दूर राहाणे, एकमेकांना समजून घेण्यात कमी पडणे असे प्रकार घडू लागतात.

प्रगल्भतेचा अभाव हेही कारण

अनेकदा आईवडिलांच्या दबावापुढे माघार घेऊन मुलांना नाईलाजाने लग्न करावे लागते. असेही होऊ शकते की त्यावेळी त्यांचे वय कमी असेल, ते लग्नासाठी तयार नसतील, नात्यांना सांभाळण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झालेली नसेल. अशावेळी जबरदस्तीने एखादे नाते लादले गेल्यास पतीपत्नीमध्ये प्रगल्भतेचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. यामुळे त्यांची लग्नगाठ तर बांधली जाते, पण ते एकमेकांचा आणि कुटुंबाचाही आदर करू शकत नाहीत. त्यामुळे नाते फुलू शकत नाही आणि कमकुवत नाते मोडण्याच्या मार्गावर उभे राहाते.

विभक्त कुटुंब

नवीन लग्न झालेल्या जोडप्यांबाबत बोलायचे झाल्यास ते आईवडिलांपासून दूर स्वत:चा वेगळा संसार थाटू इच्छितात. त्यांना वाटते की, एकत्र राहिल्यास काम वाढेल शिवाय वादही जास्त होतील. अशावेळी वेगळे राहण्याला भलेही ते समजूतदारपणाचा निर्णय समजत असतील, पण जेव्हा पतीपत्नीमध्ये मतभेद होतात तेव्हा त्यांच्यातील वाद मिटवणारे कोणीही नसते. त्यामुळे आधी नात्यात दुरावा त्यानंतर घटस्फोटापर्यंतची वेळ येते.

नात्यात मान नसणे

कोणत्याही नात्यात जोपर्यंत मान नसतो तोपर्यंत ते नाते मजबूत होऊच शकत नाही. कदाचित तुमच्या दोघांपैकी एकाचे व्यक्तिमत्त्व फारसे बरे नसेल किंवा पत्नी पतीपेक्षा जास्त कमावत असेल तर त्यावेळी विचार न करताच किंवा कुटुंबाची प्रतिष्ठा पाहून लग्न केले जाते, पण नंतर प्रत्येकवेळी टोमणे मारणे, आपल्या मित्रमैत्रिणींना ओळख करून न देणे किंवा जास्तच खोचक शब्दांत बोलले जाते.

हे सर्व काही काळच सुरू राहू शकते, पण जेव्हा नात्यात याची सवय होऊन जाते तेव्हा आदर किंवा मान राखला जात नाही आणि नाते संपण्याच्या मार्गावर येऊन उभे ठाकते.

आईवडिलांवर अवलंबून असणे

लग्न दोन हृदयांचे मिलन असते. प्रत्येक जोडीदाराला असेच वाटते की त्याच्या जोडीदाराने त्याला समजून घ्यावे. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे, पण दोघांपैकी एक जेव्हा आपल्या जोडीदारापेक्षा आपल्या आईवडिलांना जास्त महत्त्व देतो, प्रत्येक वेळी हेच ऐकायला मिळते की, माझ्या आईवडिलांनी असे सांगितले, ते असे सांगतात, तुम्हीही त्यांच्याकडून शिकायला हवे तेव्हा सतत असे बोलणे ऐकून चीडचिड होते आणि नंतर मनात दबून राहिलेला राग हळूहळू भांडण आणि एकमेकांपासून दुराव्याच्या रूपात समोर येतो.

नातेवाईकांसोबत ताळमेळ ठेवा

हे खरे आहे की, नवीन कुटुंब बनते तेव्हा नातीही वाढतात. कुटुंबात वेगवेगळया स्वभावाचे लोक असतात. त्या सर्वांसोबत ताळमेळ ठेवणे थोडे अवघड असले तरी अशक्य नसते. अशावेळी गरजेचे आहे की, तुम्ही फक्त तुमच्यापुरतेच मर्यादित राहू नका तर सर्वांशी ताळमेळ ठेवून पुढे जा. नवीन नाती, नवीन लोकांना समजून घेण्यासाठी स्वत:ला आणि इतरांनाही थोडा वेळ द्या.

विश्वास ठेवा

लग्नाचे पहिले वर्ष खूप खास असते. जर या वर्षात एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतले, एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकले तर मग पुढील वैवाहिक जीवन खूप चांगले जाईल अशी खात्री होते. असेही होऊ शकते की, सुरुवातीला तुमचा जोडीदार तुमच्यापासून खूप काही गोष्टी लपवत असेल, पण त्याचा अर्थ असा नाही की, तो चुकीचाच असेल.

सुरुवातीपासूनच कामे वाटून घ्या

बऱ्याचदा पतीपत्नीमध्ये भांडणाचे एक कारण घरातील कामकाजही असते, खासकरून तेव्हा जेव्हा दोघेही नोकरीला जाणारे असतील. अशावेळी सुरुवातीपासूनच कामे वाटून घ्या. असे केल्यास कोणावरही भार येणार नाही, शिवाय कामांची वाटणी होण्यासह एकमेकांसोबत बोलायला आणि एकमेकांसोबत चांगला वेळ घालवायला मिळेल. अन्यथा दोघांपैकी एकावर पडलेला कामाचा जास्त ताण चिडचिडेपणाच्या रूपात समोर येऊन वाद आणि दुराव्याचे कारण ठरेल.

आरोप करणे सोडा

तू असे केलेस, तू मला असे बोललास, गमतीतही माझ्याशी असे बोलण्याची तुझी हिंमतच कशी झाली, अशा प्रकारे केलेले आरोप तुम्ही मनाला लावून घेतले आणि छोटयाशा गोष्टींवरही वाद घालू लागलात तर तुमच्या दोघांमध्ये अढी निर्माण होईल आणि भांडण होईल या भीतीने दोघेही एकमेकांना टाळू लागतील.

अशा परिस्थितीत हे गरजेचे असते की, जिथे मन किंवा मत पटत नसेल तिथे गप्प बसावे किंवा प्रेमाने समजावून वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...