कथा * सीमा गर्ग मंजरी

‘‘आई, मी तुला सतत सांगतेय की, मला इतक्यात लग्न करायचे नाही. मला पुढे शिकायचे आहे,’’ आईजवळ जात सुदीपाने प्रेमाने तिला समजावून सांगितले.

‘‘सुदीपा बाळा, नाव ठेवण्यासारखे मुलात काय आहे? तो चांगला अभियंता आहे, मोठया घरातला आहे… तुझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. चांगले कमावतो. त्याच्या घरात एक आवाज दिला की, नोकर सेवेला हात जोडून हजर राहातात. इतक्या सुयोग्य मुलाचे स्थळ तुझ्यासाठी स्वत:हून आले आहे,’’ नाराजीच्या सुरात सुदीपाच्या गालावर हाताने हलकेसे थोपटत आईने सांगितले.

आईच्या गळयाला बिलगून सुदीपा म्हणाली, ‘‘माझ्या लाडक्या आई, मला मोठे होण्यासाठी अजून पुढे शिकायचे आहे… मला चांगली शिक्षिका व्हायचे आहे,’’ सुदीपा आईचे मन वळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होती, कारण आईने नकार दिला तरच हे लग्न टाळता आले असते.

‘‘सुदीपा, तू एकदा त्या मुलाला भेटून तर बघ,’’ सुदीपाला विचामग्न झालेले पाहून आई म्हणाली.

सुदीपा गोरीपान, उंच, सडपातळ शरीरयष्टी असलेली देखणी तरुणी होती. संगीत विशारदमध्ये तिने दिलेल्या योगदानाबद्दल तिला सुवर्णपदक मिळाले होते. तिचे शेजारी, ओळखीचे, नातेवाईक इत्यादी सर्व तिच्या सुंदर व्यक्तिमत्त्वाचे आणि हसतमुख स्वभावाचे सतत कौतुक करत.

आईचे ऐकून सुदीपा एके दिवशी समीर नावाच्या मुलाला भेटली. तो तिला सुंदर वाटला. तो रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा तरुण होता. दोन-चार भेटीनंतर सुदीपाला समीर आवडला.

याच दरम्यान योगायोगाने सुदीपाला महाविद्यालयात प्राध्यापिकेची नोकरी मिळाली. सर्वांना हा समीरचा पायगुण वाटला.

साखरपुडा करूनच सुदीपाने नोकरीची सुरुवात करावी, असे तिच्या आई-वडिलांचे म्हणणे होते. अखेर त्यांचे मन राखण्यासाठी तिने साखरपुडयाला होकार दिला.

सुदीपा नोकरीत रुजू होण्यापूर्वीच तिचा थाटामाटात साखरपुडा झाला. सुंदर आयुष्याची अनेक रंगीबेरंगी स्वप्ने मनात घेऊन सुदीपाने नोकरीसाठी महाविद्यालय गाठले.

नोकरीत रुजू झाल्यावर ती दिल्लीत एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये राहात होती. साखरपुडा झाल्यामुळे समीर कामानिमित्त दिल्लीला आल्यावर सुदीपाला भेटायचा.

आता सुदीपा आणि समीरमध्ये जवळचे नाते निर्माण होऊ लागले होते. सुदीपाच्या लक्षात आले होते की, समीरमध्ये शिष्टाचार आणि नम्रता असे संस्कारक्षम गुण फारच कमी आहेत. तिने अनेकदा समीरला फोनवर त्याचे म्हणणे पटवून देण्यासाठी समोरच्या व्यक्तीला ओरडताना ऐकले होते.

सुदीपासोबत असतानाही समीर कसलीही तमा न बाळगता फोनवर शिवीगाळ करायचा.

सुदीपा आधुनिक आणि प्रगल्भ विचारांना मानणारी सुसंस्कृत आणि मृदुभाषी मुलगी होती. परंपरा, रितीरिवाज जपण्यास ती आपली भारतीय संस्कृती, सभ्यतेचे रूप मानायची.

एके दिवशी सुदीपा खरेदी करून सोसायटीत शिरली. तिच्या दोन्ही हातात सामान होते. उंच टाचांच्या चपलांमुळे अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली पडली.

अचानक एका हाताने आधार देत तिला उचलले, ‘‘अगं तुला खूप लागले आहे. मी तुझ्या सर्व वस्तू उचलतो.’’

समोर गोऱ्यापान, उंच, देखण्या मुलाचा आवाज ऐकून ती गोंधळली.

तिच्या कोपरांना लागले होते. पाय मुरगळला होता.

त्या मुलाने आपल्या खांद्यावर तिचा हात ठेवून तिला आधार दिला.  ‘‘चल, मी तुला तुझ्या खोलीपर्यंत सोडतो.’’

ती गुपचूप लंगडत त्याच्यासोबत गेली.

टेबलावर सर्व वस्तू ठेवत मुलगा म्हणाला, ‘‘मी प्रथमोपचार पेटी आणून तुला पट्टी बांधतो.’’

आता तो मुलगा पट्टी बांधत होता. तिने आतापर्यंत स्वत:ला खूप सांभाळले होते.

खोलीत एका अनोळखी मुलाच्या हातात आपला हात बघून सुदीपाच्या मनात भारतीय संस्कार आणि परंपरा जागृत झाल्या. तो मुलगा मात्र अगदी सहजतेने तिच्या हाताला मलम लावून पट्टी बांधत होता. त्याच्या स्पर्शामुळे ती अस्वस्थ झाली. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

‘‘आता तू आराम कर, मी चहा बनवतो.’’

थोडयाच वेळात त्याने ट्रेमध्ये चहा आणि बिस्किटे आणली.

दोघेही काही वेळ एकमेकांच्या कुटुंबाबद्दल बोलत राहिले. निघताना सुदीपाकडे रोखून पाहात त्याने आपला फ्लॅट नंबर तिला दिला आणि म्हणाला, ‘‘काही गरज असेल तर मला कळव. अजिबात संकोच करू नकोस.’’

तिचा मुरगळलेला पाय बरा होईपर्यंत तो रोज तिच्यासाठी चहा बनवायचा, कधी सँडविच आणायचा. बाहेरून जेवण मागवायचा आणि मग दोघे एकत्र जेवायचे.

सुदीपाच्या मनाला प्रेम साद घालू लागले होते. एक अनोळखी हळूवार स्पर्श हृदयात घुमू लागला होता.

तिला तिचे घर, समाजाने आखून दिलेल्या मर्यादा माहीत होत्या. संस्कारांच्या बंधनात स्वत:ला बांधून घेतलेले असतानाही अनोळखी प्रेमाचा स्पर्श तिला खुणावत होता.

समीरसोबत असताना तिला कधीच असा स्पर्श, आपलेपणा जाणवला नव्हता. सुदीपाच्या हृदयात शेखरसाठी प्रेम भावना निर्माण झाली होती. शेखर तिची खूप आपलेपणाने काळजी घेत होता.

शेखरसोबत असल्यामुळे तिला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. आता तर ती बरी होऊन महाविद्यालयातही जाऊ लागली होती.

रात्रीचे ८ वाजले होते. गुलाबी रंगाच्या कॅप्रीसोबत मॅचिंग टॉप घातलेली सुदीपा काळयाभोर ढगांमधील पांढऱ्या शुभ्र चंद्रासारखी सुंदर दिसत होती. तिने मॅचिंग कानातल्यांसोबत गळयात बारीक मोत्यांची माळ घातली होती. आज ती खूपच आनंदी होती.

ती स्वयंपाकघरात जाणार तितक्यात दरवाजावरची घंटा वाजली. तिने दार उघडले. समोर समीर होता. ‘‘अरे तू?’’ समीरला असे अचानक आलेले पाहून तिला आश्चर्य वाटले.

‘‘हो माझ्या प्रिये, तुझा समीर,’’ असे म्हणत समीरने तिला हातात उचलून ३-४ गिरक्या घेतल्या.

‘‘आज तू खूपच सुंदर दिसतेस. कोणाला घायाळ करणार आहेस,’’ समीरने प्रेमाने विचारत तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला.

मद्याच्या वासाने सुदीपाला कसेतरीच झाले. ती लगेच त्याच्यापासून दूर झाली. समीरने पुढे जात तिचा हात पकडला. तिने तो सोडवून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण समीरच्या पकडीतून तो सुटू शकला नाही. समीर तिच्यावर जबरदस्ती करू लागला.

अचानक अशा परिस्थितीला सामोरे जावे लागेल, याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. सुदीपाचे तन आणि मन सुन्न झाले. समीरच्या मिठीतून कसेबसे स्वत:ला सोडवत तिने दरवाजा उघडला आणि म्हणाली, ‘‘समीर, तू शुद्धीत नाहीस. जा, आता निघ आणि उद्या ये.’’

‘‘का, उद्या का? जे काही व्हायचे आहे, ते आजच होऊ दे. लवकरच आपले लग्न होणार आहे. तू माझीच आहेस.’’

लग्न होणार आहे, झाले तर नाही ना… या क्षणी मला तुझ्याशी काहीच बोलायचे नाही. कृपा करून इथून निघून जा,’’ सुदीपाने शांत स्वरात त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.

पण समीरने तिचे ऐकले नाही. पुरुषत्व जागे झालेला आणि मद्याच्या नशेत धुंद असलेल्या समीरच्या आतील जनावर हिंसक झाले होते. आपली इच्छा पूर्ण होत नसल्याचे पाहून समीर बेभान झाला होता. त्याच्या हाताला सुदीपाचा टॉप लागला. समीर बळजबरीने तो खेचू लागल्यामुळे तो फाटत गेला.

‘‘मुर्ख मुली, तुझी इतकी हिंमत झालीच कशी? तू मला नाही म्हणतेस… अगं तुझ्यासारख्या पन्नास मुली माझ्या मागे फिरतात. तू स्वत:ला काय समजतेस… मी ज्या वस्तूवर हात ठेवतो ती माझी होते.’’

नशेत धुंद असलेल्या समीरची जीभ घसरली होती. तो सुदीपाला पकडण्यासाठी गेला, मात्र मद्यधुंद असल्याने पडला.

आपल्या चारित्र्यावर हल्ला होत असल्याचे पाहून सुदीपा जणू रणचंडी झाली. न जाणो तिच्यात एवढी ताकद कुठून आली की, पटकन टेबलावर ठेवलेला चाकू हातात घेऊन लटपटणाऱ्या समीरला तिने पूर्ण ताकदीननिशी बाहेर ढकलले आणि लगेच दरवाजा बंद केला.

समीर बराच वेळ दाराबाहेरून आवाज देत राहिला, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. तिचे अश्रू थांबत नव्हते. स्वत:ला सावरत ती हताशपणे पलंगावर पडली. तिला वाटले समीरचे हात तिला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्याचवेळी शेखरचा चेहरा तिच्या डोळयासमोर तरळला. त्या दोघांमध्ये जमीन-आसमंताचा फरक तिला दिसत होता. मोबाईलची रिंग वाजली, बघायची इच्छा नसतानाही तिने बघितले तर आईचा फोन होता.

आई आनंदाने म्हणाली, ‘‘बाळा, सकाळी तुझ्या वडिलांना समीरच्या वडिलांचा फोन आला होता. त्यांना याच महिन्यात तुमचे लग्न लावून द्यायचे आहे. पुढच्या महिन्यात समीर परदेशात जाणार आहे. त्यामुळे त्यांना लग्नाची घाई आहे.’’

‘‘नाही, नाही आई… मी समीरशी लग्न करणार नाही… मला त्याचे तोंडही पाहायचे नाही. समीरसोबत लग्नाच्या बेडीत मला अडकवू नकोस. मी जगू शकणार नाही,’’ असे सांगत ती रडू लागली.

आईने काळजीच्या स्वरात विचारले.

‘‘आई… इकडे खूप काही घडून गेलेय,’’ असे म्हणत तिने आईला रात्रीचा संपूर्ण प्रसंग सांगितला, ‘‘आई, पत्नीचे मन जिंकण्यासाठी पती तिच्या भावनांना महत्त्व देतो, पण समीरमध्ये मला फक्त वासना दिसली. त्याला फक्त माझे शरीर हवे होते, जे त्याला बळजबरीने मिळवून त्याच्या पुरुषत्वावर शिक्कामोर्तब करायचे होते. त्याला माझ्या भावनांशी काही देणेघेणे नाही…’’ समीर माझ्या जीवनरुपी नौकेचा किनारा, माझे सर्वस्व कधीच होऊ शकत नाही,’’ असे म्हणत ती लहान मुलासारखी रडू लागली.

सत्य ऐकल्यानंतर आईच्या डोळयावरील समीर सदगुणी आणि सुयोग्य जावई असल्याचा खोटा पडदा फाटला होता. ती म्हणाली, ‘‘सुदीपा बाळा, तू रडणे थांबव आणि अजिबात काळजी करू नकोस. त्याचा खरा चेहरा लग्नाआधीच आपल्याला दिसला, हे बरे झाले,’’ आईने सुदीपाला धीर दिला. ‘‘आजच मी आणि तुझे वडील तुझ्याकडे येतो. आम्ही सर्व सांभाळून घेऊ.’’

सुदीपाने सुटकेचा नि:श्वास टाकत फोन ठेवला.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...