कोरोनामध्ये परिचारिकांची स्थिती

*प्रतिनिधी

सामान्यतः, लोकांचा परिचारकांवर खूप विश्वास असतो कारण गरीब, मग ते मूल असो किंवा वडील, पुरुष असो वा स्त्री, स्वतःला परिचारिकांच्या हातात सुरक्षित समजतात. अगदी जिद्दी रुग्णांसाठी, परिचारिकांच्या मऊ हातात असलेले तंत्र आश्चर्यकारक आहे. ही एक अशी नोकरी आहे ज्याकडे सामान्यतः मोठ्या आदराने पाहिले जाते.

नर्सिंग अधिक तांत्रिक बनले आहे, रुग्णांची संख्या वाढत आहे, रुग्ण आणि परिचारिका यांचे वैयक्तिक नाते परिचारिका आणि रुग्णांच्या गर्दीत हरवले आहे, थकवा, कंटाळवाणेपणा, तणाव, परिचारिकांमधील दबाव यामुळे सेवा कमी होऊ लागली आहे. दिल्लीच्या एका रुग्णालयात 2 महिन्यांच्या बाळाला मारहाण केल्याप्रकरणी एका नर्सला अटक करण्यात आली. मुलालाही दुखापत झाली असून त्याच्या हाडांनाही भेगा पडल्या आहेत.

कोविडच्या दिवसांमध्ये, परिचारिकांनी त्यांच्या जीवावर खेळून लोकांना वाचवले किंवा त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची काळजी घेतली. तरीही भीती आणि कामाच्या ताणामुळे परिचारिका तासन्तास रुग्णांना त्रास देत असल्याच्या तक्रारींची संख्याही जास्त आहे. दुसरीकडे, काही भागात, परिचारिकांना घरात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती की त्यांनी कोरोना विषाणू आणला नसेल. कुठेतरी त्यांच्यावर फुलांचा वर्षावही करण्यात आला आहे, पण हे काम जोखमीचे आहे.

संपूर्ण जगात परिचारिकांची कमतरता आता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे कारण श्रीमंत देशांतील लोक दीर्घकाळ जगतात आणि त्यांचे स्वतःचे नातेवाईक कमी होत आहेत, लोक जाणीवपूर्वक विमा खरेदी करत आहेत जेणेकरून रुग्णालयातील परिचारिका त्यांच्याकडे राहतील किंवा वृद्धावस्थेचे बुकिंग केले जात आहे ज्या घरांमध्ये तुम्ही परिचारिकांवर अवलंबून राहून शेवटचे दिवस घालवू शकता.

पैशाच्या फायद्यासाठी, गरीब देशांतील मुली दूरच्या देशांमध्ये जात आहेत जिथे त्यांना चांगले पैसे मिळत आहेत पण त्यांना स्वतःचे काही सापडत नाही. या कामात, एखाद्याला 8-10 तास आपल्या पायावर उभे राहावे लागते. आपल्या देशात या व्यवसायात येणाऱ्या मुली सर्व खालच्या जातीच्या आहेत आणि वाढत्या जातीवादी धार्मिक कट्टरतादेखील परिचारिकांना पूर्ण आणि योग्य आदर देण्याच्या मार्गात येतात.

धार्मिक उपवास एक जीवघेणं कर्मकांड

* हरि विश्नोई

धर्माच्या नावावर आपल्या समाजात वर्षांनुवर्षं विविध प्रकारे कर्मकांड होत आली आहेत. उपवास हा त्याचाच एक भाग आहे. पुण्य कमवण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी, नवस करण्यासाठी किंवा अगदी दुसऱ्यांचं अनुकरण करून खाणंपिणं सोडून दिलं जातं. पण हे बरेच दिवस उपाशी राहणं जीवावर बेतू शकतं.

काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये अशीच एक घटना घडली. आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय आराधनाने सलग ६८ दिवस उपवास केला. यात ती संपूर्ण अन्नत्याग करून फक्त पाणी पित होती. यामुळे ती अशक्त बनली. पण तरीही तिला नववधूप्रमाणे सजवून-नटवून, रथात बसवून तिची मिरवणूक काढण्यात आली.

आराधनाचं व्रत पूर्ण झाल्यानंतर साजरा करण्यात आलेल्या सोहळ्याला बरीच गर्दी जमली होती. यात काही नेतेही उपस्थित होते. पण त्यानंतर दोन दिवसांनी त्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या आईवडिलांविरूद्ध चुकीच्या उद्देशाने हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन त्यावर पडदा टाकू पाहणाऱ्या भक्तांनी मृत मुलीला बालतपस्वी म्हणून जाहीर केले.

धर्म एक व्यसन आहे आणि आपल्या देशात अशा धर्मांध आईवडिलांची कमतरता नाही, जे साधूसंतांच्या आहारी जाऊन आपल्या निष्पाप मुलांना त्यांच्या हातात सोपवतात किंवा मांत्रिकांच्या बोलण्याला भुलून आपल्या नको त्या स्वार्थासाठी मुलांचा बळी देतात. वर्तमानपत्रांमध्ये रोज अशा बातम्या छापून येत असतात.

धर्मांधांची कमतरता नाही

डोळे झाकून उपासतापास केल्याने मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी बिजनौरमध्ये एक महिला देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीचे नऊ दिवस उपाशी राहिली. या दिवसांमध्ये ती फक्त दोन लवंग पाण्यासोबत अख्ख्या गिळून खात असे,

एक दिवस तिच्या अन्ननलिकेत लवंग अडकली आणि तिथे जखम झाली. त्यानंतर ४ दिवसांनी तिचा मृत्यू झाला. ती महिला वयाने मोठी होती पण आराधना तर अल्पवयीन होती.

कमी वयाच्या मुलीला ६८ दिवस उपाशी राहण्याचा परिणाम माहीत नव्हता. तिच्या आयुष्यासाठी हा निबंध धोकादायक ठरेल याची तिला कल्पना नव्हती. अशावेळी उपाशी राहण्याचे परिणाम काय होतील हे तिच्या आईवडिलांनी तिला समजावणे हे त्यांचे कर्तव्य होते. त्यांनी तिला असं करण्यापासून रोखणं आवश्यक होतं. पण त्यांना आपल्या समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यायची होती.

पुस्तकांतून मिळतंय प्रोत्साहन

धर्माच्या पुस्तकांत व्रतवैकल्यांचा महिमा सांगण्यात आला आहे. याला त्यागतपस्या म्हटलं गेलं आहे. योग दर्शन, जैनेंद्र सिद्धांत कोश, वसुनंदी श्रावकाचार, जैन दर्शन व्रत विधान, सर्वोदय जैन तंत्र, नैसर्गिक चिकित्सेने रोगमुक्ती आणि दैवी उपचार, इत्यादी अनेक पुस्तकांमध्ये उपवासामुळे पोट बरे होणे, तब्येत चांगली होणे, चेहऱ्यावर चमक येणे आणि विविध रोगांपासून मुक्ती असे फायदे सांगण्यात आले आहेत.

याशिवाय लोकांना धार्मिक उपवासांच्या पद्धती सांगून या चुकीच्या परंपरेला प्रोत्साहन देणारी कितीतरी पुस्तके तीर्थस्थळे, मंदिर, फूटपाथवर बेधडक विकली जातात. सत्यनारायण, संतोषी माता आणि वैभव लक्ष्मी इ. देवांच्या नावावर भक्तांच्या संख्येत वाढ होतच राहते.

निरर्थक गोष्टी

कधीतरी पोटाला आराम म्हणून किंवा आजारी पडल्यावर हलकं जेवण किंवा एकवेळ उपाशी राहाणं समजून घेण्यासारखं आहे. पण मोक्ष मिळवण्यासाठी महिनाभर सातत्याने उपाशी राहाणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे.

पायी चालत तिर्थक्षेत्री जाणे किंवा लोळत लोळत मंदिरात जाणे, आपल्या शरीरावर चाबूक, चाकू, वगैरे मारून घेणे आणि उपाशी राहून कष्ट सोसणाऱ्यांचे गोडवे गायले जातात. त्यामुळे बरेचसे धर्मांध लोक जेवण-खाणं सोडून उपासतापास करत राहतात. काहीवेळा तर महिनोंमहिने उपाशी राहतात.

गुरू घंटाळ

धर्मगुरूंच्या मते उपवास हे महाकल्याणकारी, शास्त्रीय, पापनाशल, स्वर्ग आणि मोक्ष मिळवून देणारे तसेत मनातल्या इच्छा पूर्ण करणारे असतात. आपलं म्हणणं खरं ठरवण्यासाठी निरर्थक उदाहरणे देतात. माणसे अति खाल्ल्याने मरतात. भुकेने नाही असं त्यांचं म्हणणं असतं. लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी उपवास करूनही जिवंत राहिलेल्या लोकांच्या काल्पनिक गोष्टी ऐकवत राहतात.

धर्मगुरू व्रतवैकल्यांना प्रोत्साहन देतात कारण अशाच गोष्टींमुळे त्यांचा धंदा चालतो. व्रतांमध्ये दान करण्याचा सल्ला दिला जातो. दानामध्ये मिळालेला सर्व माल ते स्वत:च हडप करतात. असे उपवास करणाऱ्यांची संख्या वाढली की त्यांना हवी तशी वातवरणनिर्मिती आपोआपच मिळते.

गावांमध्ये आणि शहरांतही बऱ्याच मुली लग्न वेळेत आणि चांगल्या घरामध्ये व्हावं म्हणून १६ सोमवार, संतोषी माता आणि बृहस्पती यांसाठी दिवसभर उपाशी राहतात, गरीब महिला श्रीमंत होण्यासाठी वैभव लक्ष्मी व्रत करतात. पुरुष रोजगार आणि नोकरीतील बढती यासाठी मंगळवारचा उपवास करतात.

कर्मकांड

पुरूष असोत वा महिला उपवासाच्या नावावर आजकाल सगळे दिखावाच करत असतात. उपवास फक्त नावाला असतो. पण त्या दिवशी एरव्हीपेक्षा जास्त फळे, वडे, तिखट मीठ घालून राजगिऱ्याच्या पुऱ्या, पराठे, लाडू, मिठाई इ. गोष्टी मनसोक्त हादडल्या जातात.

एकादशी, अमावस्या, पौर्णिमा आणि इतर सर्व सण मिळून वर्षांतल्या ३६५ दिवसांपैकी साधारण २५० दिवस उपवासांचे असतात. आठवड्याला, पंधरवड्याला किंवा दर महिन्याला धान्य आणि मीठ असलेलं अन्न सोडून उपवास करणं शक्य आहे. पण भक्ती जीवावर बेतू शकते.

उपाशी पोटाचे परिणाम काय असतात?

वेळेवर न जेवल्याने तब्येतीवर वाईट परिणाम होतो. आहारतज्ज्ञ ममता यांच्या म्हणण्यानुसार बराच काळ शरीराला इंधन न मिळाल्याने ताकद देणारे ग्लायकोजन तुटू लागतात. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. खूप वेळ उपाशी राहिल्याने रक्तातील ग्लुकोज घटू लागते. पेशी कमकुवत होतात. रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. तसेच वजन कमी होते. असे सतत होत राहिल्याने मृत्यू ओढवू शकतो.

उपदेश

खरा दोष धर्मगुरू आणि धर्म प्रचारकांचा आहे. ते सतत सांगत असतात की उपवास केल्याने शरीर शुद्ध होतं. आत्म्याची ताकद वाढते, दु:ख नाहीसं होतं आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे भित्रे भक्त त्यांच्या बोलण्याला भुलतात.

सुखी राहण्यासाठी उपासतापासांच्या जंजाळातून बाहेर पडून अंधश्रद्धांपासून मुक्ती मिळवणं आणि विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे. याशिवाय हे समजून घेण्याची गरज आहे की इच्छा उपवास करून वा मरून नव्हे, बुद्धिच्या आणि मेहनतीच्या बळावर पूर्ण केल्या जातात. आयुष्यातल्या समस्या कर्मकांडाने नाही तर समजूतदारपणे सोडवल्या जातात.

डोळे द्ब्राकून केल्या जाणाऱ्या उपवासांचा फायदा भक्तांना कमी तर धर्मगुरूंनाच जास्त होतो. आजच्या विज्ञानयुगात अशाप्रकारची ढोंगं करून आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे स्वत:ला फसवण्यासारखं आहे. उपवासाने कोणाचं भलं व्हायचं असतं तर एव्हाना ते झालंही असतं. त्यामुळे उपाशी राहण्याचा काहीच फायदा नसतो.

लग्न गरजेचेही आणि निश्चिंतपणाही नाही

* मदन कोथुनियां

लग्नात प्रामाणिकपणा हा पाया आहे, पण आपण तो ढासळल्यानंतरही लग्न टिकवण्यावर विश्वास ठेवतो. आपल्या न्यायसंस्था, समाज सर्वच लग्न वाचवण्यावर विश्वास ठेवतात, कारण सर्व मतभेदांनंतरही सकाळी भांडणारे पती-पत्नी संध्याकाळी एक होतात. कितीतरी जोडपी घटस्फोटाच्या सीमारेषेला स्पर्श केल्यानंतरही असे एक होतात की त्यांनी कधी वेगळे होण्याचा विचार केला होता हे जाणवतही नाही.

महिमाचे आईवडील तिच्यासाठी मुलगा बघत होते. पण तिला मुलगी बघण्याचा पारंपरिक कार्यक्रम मान्य नव्हता. मात्र लग्न म्हटले की दोन कुटुंबांचे, दोन जीवांचे मिलन असते हे तिला माहीत होते. त्यामुळे बऱ्याच विचाराअंती एका नातेवाईकाच्या लग्नात भेटायचे ठरले. पुढे या भेटी हॉटेल्स आणि घरातही झाल्या. दोघांनी एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेतल्यानंतर रीतिरिवाजानुसार त्यांचे लग्न झाले.

आता जोडीदाराची निवड समान मानसिकता आणि विचारधारेनुसार होऊ लागली आहे. तरुणाई आपली आवड, विचार यांसह दोन्ही कुटुंबांच्या आवडीचाही विचार  करू लागली आहे. आता परिस्थिती अगदी बिकट असेल तरच पळून जाऊन लग्न करण्याचा विचार केला जातो.

जयपूरमध्ये मॅट्रिमोनियल एजन्सी चालवणाऱ्या श्वेता विश्नोई सांगतात, ‘‘आवडीचाच जोडीदार हवा यावर ठाम राहायला तरुणाई शिकली आहे. आता लग्नाची व्याख्याही आपोआप बदलत आहे. जिथे पती-पत्नी एकमेकांचे सखा, मित्र, प्रेमी आहेत. अशा बदलांमुळे विवाह संस्थेचे अस्तित्व टिकून राहील शिवाय अन्य संबंध त्यांना कधीच वेगळे करू शकणार नाही.’’

लग्नानंतर आठ वर्षांनी एका अपघातात राजेशच्या पत्नीच्या जवळपास सर्वच शरीराला लकवा मारला. त्यावेळी त्यांची दोन्ही मुले लहान होती. त्यांना आईची खूप गरज होती. राजेशने आपली जबाबदारी ओळखत उपचार आणि सेवा करून पत्नीला इतके बरे केले की ती मुलांशी बोलू शकेल. त्यांच्या लहानसहान गोष्टींवर लक्ष ठेवू शकेल. भलेही येथे राजेशची शारीरिक गरज दुय्यम होऊन गेली, पण यातून हे सिद्ध होते की पत्नी आणि मुलांप्रतीच्या या जबाबदारीची भावना लग्न संस्थेत प्रवेश करताच निर्माण होऊ लागते.

विवाहामुळे पती-पत्नीच्या शारीरिक आणि मानसिक गरजांची पूर्तता होते. जी समाजात कायदा सुव्यवस्था आणि शिस्त राखण्यासाठी गरजेची आहे. याच्या नसण्याने समाज मुक्त यौन संबंधांच्या चिखलात अडकला असता. लग्न पती-पत्नीच्या रूपात स्त्री आणि पुरुषाला यौन, आर्थिक आणि अन्य अधिकारांची सामाजिक व कायदेशीर मान्यता देते. वैवाहिक संबंधातून जन्मलेले मूल वैध आणि कायदेशीर मान्यता मिळालेले असते. यातून त्याचे अधिकार आणि कर्तव्य ठरते.

लग्न संस्थेचा दुसरा पैलू

घटस्फोटाचे अनेक खटले न्यायालयात सुरू आहेत आणि पोलीस ठाणी हुंडयाच्या सामानाने भरली आहेत. हेच कारण आहे की लग्नासोबतच पती-पत्नीला आपली संपत्ती स्पष्ट करावी लागेल. हे दस्तावेजच लग्नानंतर होणाऱ्या वादातून वाचवतील. एकनिष्ठ राहण्याच्या भावनेला कीड लागली आहे का की मग कुटुंबाचा अनावश्यक हस्तक्षेप नाते टिकू देत नाही?

रीना आणि महेशच्या लग्नाला तीन वर्षे झाली होती. महेशने व्यवसायात जम बसवल्यावर रीनाने नोकरी सोडली. अचानक महेशला व्यवसायात नुकसान झाले आणि रीना पुन्हा नोकरी शोधू लागली, पण तिला ती मिळाली नाही. आर्थिक चणचण निर्माण झाल्याने दोघांमध्ये तणाव वाढला. कटकट रोजचीच झाली. तीन वर्षे सोबत राहूनही ते एकमेकांसाठीची जबाबदारी ओळखू शकत नव्हते. रीनाला वाटत होते की तिचे खूपच शोषण झाले तर याउलट रीनाने आपला भरपूर फायदा घेत मौजमजा केली, असे महेशला वाटत होते. अखेर एक दिवस दोघांनी घटस्फोट घेऊन वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

खरंतर किती वर्षे सोबत होतो यापेक्षा ती सोबत किती सुंदर आणि गोड होती हे समजून घेणे जास्त गरजेचे आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा करणे, सामाजिक समारंभात ग्रुप फोटोत हसताना दिसणे, फेसबुकवर प्रेम व्यक्त करणारा फोटो ठेवणे वेगळी गोष्ट आहे आणि एक आनंदी, विश्वास आणि सन्मानाने परिपूर्ण असलेले एकमेकांना समजून घेणारे नाते जगणे वेगळी गोष्ट आहे.

लग्न कसे ही होऊ देत सुरुवातीच्या दिवसांत फुललेले, बहरलेले असते, दोन शरीर, भिन्न लिंगाचे आकर्षण, खूप सारे स्वातंत्र्य यामुळे जणू पंखच मिळतात. पण हळूहळू कापराप्रमाणे प्रेम उडून जाते. आरोप-प्रत्यारोप, तक्रारी, नाराजी, बेचैनी, जे केले आणि जे केले नाही त्याचा हिशोब आणि शेवटी सुकलेल्या फांद्या असलेल्या वृक्षासारखे नाते, ज्याच्या फांद्यांवर टांगलेल्या रीतीभाती, जबाबदाऱ्या, चीडचिडेपणा त्याला कुरूप बनवतात. प्रेम विवाहातही असेच घडते.

नात्यात समानाधिकार हवा, नात्याचा सुगंध कापरासारखा न उडता कायम दरवळत राहावा, असा विचार जो करतो तो लग्नाच्या नावाने घाबरतो. मग तो मुलगा असो किंवा मुलगी. कदाचित अशीच भीती, प्रश्नांमधून लिव्ह इन रिलेशनशिपचा मार्ग निघाला असेल. अर्थ स्पष्ट आहे. सोबत राहण्यात अडचण नाही, पण ती लग्न करण्यात आहे. काय आहे लग्न जे गरजेचे आहे आणि निश्चिंतपणाही नाही? का लग्नानंतर दोन व्यक्ती एकमेकांवर आगपाखड करतात, स्वत:चे अस्तित्व पणाला लावतात आणि दुसऱ्याचे अस्तित्व संपवण्यासाठी आतूर होतात?

राजस्थान विद्यापिठातील समाजशास्त्राच्या प्राध्यापक रजनी कुंतल यांनी सांगतात, ‘‘हे नाते समाज आणि रीतीरिवाजाचे बळी ठरले नसते, दोन व्यक्तींमधील एक समर्पण आणि दुसरा अधिकाराची अपेक्षा ठेवत पुढे गेला नसता आणि दोन व्यक्तींच्या नात्यात त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत दरवेळी कुणी ना कुणी नाक खुपसले नसते तर कदाचित लग्न संस्थेचे स्वरूप काही वेगळेच असते. सन्मान आणि समानतेच्या भावनिक पायावर उभे राहिलेले हे नाते आयुष्यभर दरवळत राहिले असते. समाजाने लग्न संस्थेची दोरी आपल्या हातात ठेवली आहे. तो दोन व्यक्तींच्या अतिशय खासगी क्षणातील खासगी भावनांवरही नियंत्रण ठेवतो. ही दोरी लग्न संस्था तर वाचवते, पण यातून निर्माण होणाऱ्या प्रेमाचा गळा घोटते.’’

टिकवले तरच टिकते लग्न

लग्नानंतर स्त्री-पुरुष दोघांचेही आयुष्य बदलते. पण तरीही आपल्या समाजात सर्व समज मुलींनाच देण्यात येते. मुलांना क्वचितच काही सांगितले जाते किंवा मानसिकरित्या तयार केले जाते. काही दशकांपूर्वी यामुळे काहीच फरक पडत नव्हता, कारण तेव्हा मुलीलाच नवरीच्या रूपात नवे घर, कुटुंब, नात्यांनुसार स्वत:मध्ये आमूलाग्र बदल करावे लागत होते. एकत्र कुटुंब पद्धतीत मुलांच्या जगण्याच्या पद्धतीत काहीच फरक पडत नव्हता. पण जग बदलले तसे कुटुंबाचे स्वरूप आणि नात्याचे समीकरणही बदलले. पालनपोषण, महिलांची मानसिकता आणि त्यांच्या दृष्टिकोनातही बदल झाला. या परिवर्तनात हे गरजेचे झाले की पुरुषांनीही काही गोष्टी समजून या नव्या प्रकाशात नाते टिकवायला शिकायला हवे. यावरच लग्न संस्थेचे यश अवलंबून आहे.

प्राध्यापक रजनी कुंतल सांगतात, ‘‘पती-पत्नीचे नाते प्राथमिक असते. इतर नाती यातूनच तयार होतात. त्यामुळे स्वाभाविकपणे पत्नी आपल्या जोडीदाराकडूनच सहकार्य आणि आधाराची सर्वात जास्त अपेक्षा करते. म्हणून पतीसाठी गरजेचे आहे की तिचे ऐकून घ्यावे, तिच्या भावना समजून घ्याव्यात.’’

‘‘मुलाच्या लग्नानंतर कुटुंबाची रचना बदलते. सर्व व्यवस्था नव्याने तयार होते. यामुळे खासकरून काही महिला सदस्यांमध्ये ओढाताण होण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांनी काही तक्रार केल्यास पुरुष सदस्यांनी नि:पक्ष राहणे शिकायला हवे. जर पुरुषांनी समजावण्याचा प्रयत्न केला किंवा एकीचे म्हणणे दुसरीपर्यंत पोहोचवले तर परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडेल. अनेकदा असे प्रश्न महिलाच आपापसात समजून घेतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें