तडा गेला विश्वासाला

कथा * सुमन बाजपेयी

सकाळपासून भेटायला येणाऱ्या लोकांची वर्दळ घरात सुरू झाली होती. फोनही सतत वाजत होता. लॅन्डलाईन नंबर आणि मोबाइल अटेंड करण्यासाठीही एका चपराश्याची ड्यूटी लावलेली होती. तोच फोनवर सर्वांना सांगत होता, ‘‘साहेब आता व्यस्त आहेत. थोड्या वेळानं बोलतील,’’ तो सर्वांची नावं अन् नंबरही टिपून ठेवत होता. कुणी एखादा फारच अडून बसला तर तो चपरासी साहेबांकडे बघायचा, त्यांनी नाही म्हणून मान हलवली की तो क्षमा मागून फोन बंद करायचा.

साहेबांना इतक्या लोकांनी गराडा घातला होता की त्यांच्यापर्यंत पोहोचणंच मुळात अवघड होतं. त्यातला प्रत्येकजण अगदी हिरिरीनं सिद्ध करू बघत होता. जणू तोच रमणसाहेबांचा एकमेव जवळचा आहे. तोच त्यांचा आधार आहे. त्यांच्यावर आलेल्या संकटातून तोच एकटा त्यांना सांभाळू शकतो. धीर देणारी सांत्वन करणारी एकाहून एक सरस वाक्य त्या माणसांच्या मुखातून निघत होती.

‘‘ऐकून धक्काच बसला हो.’’

‘‘घडलं हे फारच वाईट झालंय…’’

‘‘सर, आम्ही इतकी वर्षं ओळखतोय तुम्हाला, तुम्ही कसे आहात ते आम्हाला ठाऊक आहे. तुमच्यासारखा सज्जन आणि प्रामाणिक माणूस असं करणारच नाही. तिनं मुद्दाम घडवून आणलंय हे सगळं.’’

‘‘होय ना? रमण सरांना कोण ओळखत नाही? ज्या डिपार्टमेन्टमध्ये लाच घेतल्याशिवाय एक कागद पुढे सरकत नाही, त्या डिपार्टमेंटमध्ये ते इतकी वर्ष स्वच्छ चारित्र्यानं वावरले. कधी एक पैसा कुणाकडून घेतला नाही अन् एका स्त्रीवर बळजबरी केल्याचा आरोप लावला जातोय त्यांच्यावर!’’

‘‘सर, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्यावर हा आरोप लावू देणार नाही.’’

‘‘एमसीडी इतकं मोठं व्यवस्थापन आहे…इथं तर असं काही तरी नेहमीच चालू असतं.’’

‘‘सर तुम्ही हे मनाला लावून घेऊ नका. सीमा तशीही चवचाळ स्त्री आहे. तिला सगळेच ओळखतात.’’

गर्दी वाढत होती तशा चर्चाही वाढत होत्या. सहानुभूती दाखवणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत होता.

कारण रमण अत्यंत शुद्ध, स्वच्छ चारित्र्याचा होता. इतरांना त्याचा हेवा वाटे, धाकही वाटे. ज्यांना त्यानं लाच घेऊ नका असा सज्जड दम दिला होता. त्यांना तर आज त्याच्यावर एका स्त्रीनं तिच्या अब्रूवर रमण उठलाय असा डांगोरा पिटलाय म्हटल्यावर मनांतून त्यांना सुप्त समाधान वाटत होतं. आता जर सस्पेंड झाला तर काय होईल? कोर्टात केस होईल. अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली जातील. घरीदारी कोणी मान तरी देईल का?

रमणची बायको अनुराधा सकाळपासून स्वत:च्या खोलीतून बाहेरही आली नव्हती. जेव्हापासून तिला तिच्या नवऱ्यावर आलेला आळ आणि त्याला कदाचित सस्पेंड करतील ही बातमी कळली होती. तिच्या डोळ्यातले अश्रू थांबलेच नव्हते. रमण असं करणार नाही याबद्दल तिला खात्री होती, पण इतका उघड आरोप झालाय म्हणजे…काहीतरी असेलही ही शंका जीव कुरतडत होती. एमसीडीमधला इतका मोठा अधिकारी इतकी खालची पातळी गाठू शकतो या कल्पनेनंच ती अर्धमेली झाली होती.

दुपारपर्यंत घरी आलेले सगळे लोक रमणचा निरोप घेऊन, त्यांच्याशी हात मिळवून निघून गेले होते. रविवार होता म्हणून इतकी मंडळी येऊही शकली होती. बरेच लोक सुट्टी घ्यावी लागली नाही म्हणून, अनेकजण न येण्याबद्दल काही कारण द्यावं लागलं नाही, म्हणून आनंदातच होते. त्यांच्यावर जळणारे, त्यांचा हेवा करणारेदेखील, दिलाशाचे बोल बोलून निघून गेले. थकलेले, त्रासलेले आणि इभ्रतीवर डाग लागल्यामुळे दुखावलेले रमण पार गोंधळून गेले होते.

इतकी वर्ष चारित्र्य निष्कलंक ठेवलं अन् आता मान खाली घालायची वेळ आली. एवढीशीही चूक नसताना इतका अपमान सहन करावा लागतोय…घरच्यांना, नातलग, परिचितांना काय उत्तर द्यायचं? पाय ओढत कसेबसे रमण आपल्या खोलीत आले.

त्यांना बघताच पत्नी अनुराधा तिथून उठून बाहेर जाऊ लागली. तिच्या सगळ्या नातलगांनी त्याच खोलीत ठिय्या दिला होता. रमणनं तिचा हात धरला. ते इतर लोकांना म्हणाले,

‘‘मला अनुराधेशी थोडं बोलायचं आहे. तुम्ही सर्व काही वेळासाठी बाहेर गेलात तर बरं होईल.’’

‘‘मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीए.’’ त्यांचा हात झटकून टाकत अनुराधा रागानं म्हणाली, ‘‘काय उरलंय आता सांगायला अन् ऐकायला? कुठं तोंड दाखवायला जागा नाही उरली मला. अहो, निदान मुलांचा तरी विचार करायचा होता. दोन मुलं आहेत तुम्हाला अन् बेचाळीस वर्षांचं वय आहे. या वयात असं वागताना लाज नाही वाटली?’’ बोलता बोलता तिला परत रडू कोसळलं.

‘‘राधा, तू शिकलेली आहेस. रोज पेपर वाचतेस, अगं, स्त्रियांच्या बाजूने कायदे झाल्यापासून पुरूषांना अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतंय. अगं, मला अडकवलंय यात…यातलं एकही अक्षर खरं नाहीए. आक्रस्ताळ्या अन् कष्ट न करता सर्व हवं असलेल्या स्त्रिया असं वागतात हे तर तुलाही ठाऊक आहे ना? अन् तू मला ओळखत नाहीस का? माझं किती प्रेम आहे तुझ्यावर, मुलांवर आणि संसारावर. तुला माहीत आहे ना? मी असं कसं वागेन? तू तरी निदान मला समजून घेशील ना?’’

‘‘इतकं सगळं झाल्यावर आता आणखी काय समजून घ्यायचं शिल्लक राहिलं आहे? तुम्हीच विचार करा. कुणीही स्त्री असं कशाला करेल? त्यात तिचीही बेअब्रू आहेच ना? ती ही विवाहित आहे. विनाकारण इतका मोठा आरोप तुमच्यावर का करेल ती? तिनं खोटेपणा केला हे सिद्ध झालं तर तिची नोकरी जाईल, ती सस्पेंड होईल एवढंच नाही तर तिचाही संसार उद्ध्वस्त होईल ना? मला उगीच काही तरी सांगू नका. पुढे काय होईल कुणास ठाऊक पण आता तरी मी तुमच्याबरोबर राहू शकणार नाही. मी मुलांना घेऊन आजच माहेरी जाते आहे. इतक्या वर्षांच्या वैवाहिक जीवनात तुमच्यावर कायम विश्वास ठेवला मी, तुम्ही मात्र विश्वासघात केलात माझा,’’ राधा फुत्कारली.

‘‘उगीच भलते आरोप करू नकोस. मी कोणतीही चूक केली नाहीए. न केलेल्या गोष्टींची शिक्षाही मी भोगणार नाही. इनव्हेस्टिगेशनमध्ये खरं काय ते समोर येईलच. मागे ही मी तुला सांगितलं होतं की माझ्या हाताखाली काम करणारी सीमा फार आळशी अन् कामचोर आहे. ती माझ्या नावावर लोकांकडून पैसे घेते. साहेबांनीच मागितले आहेत म्हणून खोटं बोलते. त्यामुळे तिचं प्रमोशन होत नाहीए. एमसीडी असा विभाग आहे जो सर्वात वाईट अन् भ्रष्ट म्हणून ओळखला जातो. तिथंही मी माझं नाव निष्कलंक ठेवलंय. आमच्या विभागात तर एकापेक्षा एक निकम्मी बिनकामाची माणसं पैसेवाली होऊन बसली आहेत.’’

‘‘मी लाच घेत नाही, अन् कुणाला घाबरतही नाही. काम स्वच्छ अन् प्रामाणिकपणे करतो म्हणून मला पुढे शत्रूही खूप आहेत. बरेच दिवसांपासून सीमा प्रमोशनसाठी मागे लागली आहे. खूप त्रास देते आहे. मी तिला मध्यंतरी रागावलो, जरा समज दिली, तेव्हाच तिनं मला धमकी दिली की ती मला बघून घेईल. गुरूवारी पुन्हा ती माझ्या केबिनमध्ये आली आणि प्रमोशन देताय की नाही असं विचारलं.

‘‘मी जेव्हा ‘नाही’ म्हटलं तेव्हा तिनं स्वत:च आपला ब्लाऊज फाडला. साडी फाडली अन् मोठमोठ्यानं रडून ओरडून मी तिच्यावर बळजबरी करतोय असा कांगावा केला. लोक लगेच गोळा झाले. मी तिला मॉलेस्ट करतोय. असं ती रडून रडून सांगू लागली. स्टाफमधल्या स्त्रियांनी तिला बाहेर नेलं. काही लोक माझ्या बाजूनं बोलू लागले. काहींनी सीमाची बाजू घेतली. आता इनव्हेस्टिगेशनमध्ये खरं काय ते कळेलच. माझ्या शिपायानं सांगितलंय की त्यावेळी माझ्या केबिनमधला सी.सी. कॅमेरा चालू होता. त्यात सगळं रेकॉर्ड झालंच असेल. मी निर्दोष आहे.’’ उत्तजेना अन् अशक्तपणामुळे रमण थरथरत होता.

याचवेळी त्याला पत्नीची अन् मुलांच्या आधाराची गरज होती. पण पत्नीच त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. त्यामुळे त्याला फारच मोठा मानसिक धक्का बसला होता. अंगातली शक्ती संपल्यासारख वाटत होतं. विश्वासाच्या मुळांनांच हादरा बसला होता, त्यामुळे नातीही दुभंगली होती. त्याला कळेना, कुठं चुकलं त्याचं? बायकोमुलांवर आयुष्य उधळलं, तरी असं का व्हावं?

‘‘उगीच काही तरी रचून कहाणी सांगू नका, इतके मोठे ऑफिसर आहात अन् एका सामान्य स्त्रीला बदनाम करताय? तुम्हाला बदनाम करून तिला काय मिळणार आहे? अन् ती जर खरीच चवचाल असती तर तिनं इतरांबरोबरही असाच प्रयोग केला असता ना? अजून कुणी काही तक्रार नाही केलीये तिच्याबद्दल…’’ राधा काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हती.

‘‘तुझं म्हणणं खरं आहे. तिनं हे असं प्रथमच केलंय. पण तिच्याबद्दल सगळे लोक वाईटच बोलतात. तिची राहणी हा तर सर्व पुरूषांच्या मनोरंजनाचा विषय आहे. पुरूषांना जाळ्यात ओढायलाच जणू ती अशी वागते.’’

‘‘शी:शी, रमण, असे विचार आहेत तुमचे?’’ राधा पुढे काही बोलणार तेवढ्यात तिच्या माहेरची मंडळी आत आली.

‘‘अनु, कसला विचार करते आहेस? अजूनही या माणसाबरोबरच रहायचंय तुला? सगळीकडे छी थू, चाललीय त्याच्या नावानं, मुलांवर किती वाईट परिणाम होईल या गोष्टीचा. शाळेतली इतर मुलं किती त्रास देतील तुझ्या मुलांना…चल, तू आमच्याबरोबर चल.’’ अनुराधेच्या भावानं म्हटलं.

‘‘नाही तर काय? तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहोत तुला आधार द्यायला. शिवाय तू नोकरीही करते आहेस, राधाच्या आईनं अत्यंत तिरस्कारानं जावयाकडे बघत म्हटलं. जणू त्यांचा अपराध सिद्ध झाला होता.

आजपर्यंत सासरची जी माणसं रमणच्या चांगुलपणाचे गोडवे गातावा थकत नव्हती ती आता त्यांचा तिरस्कार करत होती. रमणला खूप वाईट वाटलं, तो स्वत: निर्दोष होता हे त्रिवार सत्य होतं. पण अजून ते लोकांच्या पचनी पडत नव्हतं. त्यांनी रमणला आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलं होतं.

‘‘बाबा, तुम्ही तरी समजवा ना यांना,’’ रमणनं सासऱ्याकंडे बघत विनवणी केली. अनुराधेचे बाबा अत्यंत शांत व समंजस होते. विचार केल्याशिवाय ते कोणतीही कृती करत नसत.

‘‘हो गं अनु. तू नवऱ्यावर विश्वास ठेवायलाच हवा. माझा रमणवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही इतकी वर्ष एकत्र राहताय…तुला ठाऊक आहे रमण किती सज्जन अन् स्वच्छ चारित्र्याचा आहे. तो असं वागणारच नाही. तू आपला संसार मोडू नकोस?’’ बाबा म्हणाले.

सासूबाई एकदम भडकल्या, ‘‘आपल्या मुलीची कड घेण्याऐवजी तुम्ही या माणसाची बाजू घेता आहात ज्यानं एका स्त्रीच्या अब्रूला हात घातला? आत्तापर्यंत कुणास ठाऊक किती जणींशी त्याचे संबंध आले असतील. आमची पोर गरीब…तिला कळलंच नसेल काही, भलेपणाच्या आड माणूस काय वाट्टेल ते करू शकतो.’’

‘‘आई, काय बोलताय? मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. संकटाच्या वेळीच आपल्या माणसांचा आधार हवा असतो. पण तुम्ही आणि राधाही माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहात. इतक्या वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतरही जर नवरा बायकोतला विश्वास भक्कम नसेल तर नात्याला अन् एकत्र राहण्याला तरी काय अर्थ आहे?’’

‘‘राधा, आता मी तुला अडवणार नाही, माझ्याकडून तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण एकच सांगतो, हे घर तुझंच होतं, तुझंच आहे, पुढेही तुझंच राहील.’’

क्षणभर राधाचं मन डगमगलं. ती चूक करतेय का? रमणसारखा पती अन् पिता दुसरा नसेल. इतक्या वर्षांत त्यानं कधी तिला दुखावलं नव्हतं. कधी अपमान केला नव्हता. कुठली बंधनं घातली नव्हती. कधी काही कमी पडू दिलं नव्हतं. तर मग आज तिचा विश्वास का डळमळतोय? दुसऱ्या कुणी काही सांगितलं तर तीही लगेच दोष का काढते आहे? ती क्षणभर थबकली. रमणशी काही बोलणार तेवढ्यात आईनं हात धरून ओढत तिला खोली बाहेर काढलं. मुलं बावरून कोमेजून उभी होती.

‘‘आई, बाबा काय म्हणताहेत ते नीट समजून घे ना.’’ अठरा वर्षांची मोठी मुलगी पुढंही काही बोलणार तोच तिची आजी कडाडली, ‘‘गप्प राहा तू, लहान आहेस, तुला काय कळतंय?’’

आजीचा ओरडा ऐकून ती गप्प बसली. पण तिचा बाबांवर पूर्ण विश्वास होता अन् आईनंही बाबांचं म्हणणं समजून घ्यावं असं तिला वाटत होतं. चौदा वर्षांचा धाकटा भाऊ रडायला लागला होता. तिनं त्याला जवळ घेऊन धीर दिला. ती त्याला घेऊन दुसऱ्या खोलीत निघून गेली. तिला स्वत:लाही रडायला येत होतं. आजीसकट सगळ्यांचा खूप खूप राग आला होता. तिच्या बाबांना कुणी नावं ठेवलेली तिला अजिबात आवडत नव्हती.

राधा आणि मुलं निघून गेल्यावर ते घर रमणला खायला उठलं. त्यांना आता सीमाची भीती वाटू लागली. ती कोर्टातही सांगेल की रमणनं पूर्वीही तिच्याबरोबर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. एवंढच नव्हे तर सेक्स संबंधासाठीही विचारलं होतं. रमणची बाजू कितीही भक्कम असली तरी त्याच्याकडे पुरावा कुठं होता. एकमेव भिस्त होती ती खोलीतल्या सीसी कॅमेऱ्याच्या फुटेजवर, पण ती फिल्म त्यांनी डोळ्यांनी बघितलीच नव्हती. कारण ती आता कोर्टातच दाखवली जाणार. पण कायदे अशा बाबतीत स्त्रियांच्या बाजूचे असतात. त्यातून हे सर्व प्रतिष्ठित ऑफिसच्या प्रतिष्ठित ऑफिसरसोबत घडलं होतं. जो अत्यंत भीरू होता. कायदा विकत घेणं त्याला जमणार नव्हतं. जे एरवी गुंडपुंड सहज करतात.

बायकोमुलं सोडून गेली. बरेचसे नातलगही दूर झाले. मित्रही थोडेच उरले…रमणला एकाएकी खूप भीती वाटली. घशाला कोरड पडली. घरात अंधारात एकटेच बसून होते. पाणी हवं होतं प्यायला पण उठवंसं वाटेना. सवयीप्रमाणे ‘राधा…’ म्हणून हाक मारणार तेवढ्यात आठवलं की ती इथं नाहीए.

अन् अचानक समोर अनुराधा दिसली. हा भास की वस्तुस्थिती? तो दचकून सावरून बसला. खोलीतला दिवा लावत राधा म्हणाली, ‘‘मला क्षमा करा रमण. मी तुमच्यावर रागावले, तुमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. विश्वास ठेवला नाही. या गुन्ह्यांसाठी द्याल ती शिक्षा मी भोगेन. फक्त मला क्षमा करा. मला खरं काय ते कळलं आहे, तुमची बाजू कळली आहे.’’ तिनं त्यांना मिठी मारली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. पश्चात्ताप झाला होता तिला.

‘‘अगं, पण अजून केस, इनव्हिगेशन पूर्ण कुठं झालंय?’’ रमणच्या मनातली भीती आता पूर्णपणे गेली होती. खोलीतल्या उजेडात, राधाच्या मिठीत त्यांना खूप सुरक्षित वाटत होतं.

राधानं त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवलं. ती बोलू लागली.

‘‘सीमाचा नवरा मला भेटायला आला होता. त्यांनी मला सांगितलं की ते सार्वजनिकरित्या हे बोलू शकणार नाही. कारण ते स्वत: आजारी आहेत. घर सीमाच चालवते. पण त्यांनी तुमची क्षमा मागितली आहे. कारण सीमानं हा सगळा बनाव मुद्दाम घडवून आणला आहे. एरवी तुमच्या प्रामाणिकपणाची अन् शुद्ध चारित्र्याची तिलाही भीती वाटते पण ती फार महत्त्वाकांक्षी आहे. कष्ट न करता सगळं मिळावं हा एक अजून दुर्गण तिच्यात आहे. तिच्यामुळे आपण विभक्त झालो हे त्यांच्या मनाला फार लागलंय. त्यांनीच मला सांगितलयकी मी तुमच्याजवळच रहावं. केसचा निकाल लागला की कलंकही धुतला जाईल.’’

‘‘तुम्ही तिला पैसे खाऊ देत नव्हता. प्रमोशन देत नव्हता, तिच्या विरूद्ध अॅक्शन घेण्याची वॉर्निंगही दिली होती. म्हणूनच तिनं हा डाव रचला.’’

‘‘या संकटातून आपण सहीसलामत बाहेर पडू. मला खात्री आहे तुमचं प्रेम, तुमचं चारित्र्य, सगळ्याचाच मला अभिमान वाटतोय यापुढे मी असा वेडेपणा करणार नाही.’’

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें