फक्त एक साजन हवा

‘‘सांसों की जरूरत है जैसे जिंदगी के लिए, बस एक सनम चाहिए आशिकी के लिए…’’ एफएमवर वाजत असलेल्या ‘आशिकी’ चित्रपटाच्या या गाण्याने मला अचानक तनूची आठवण आली.

ती जेव्हा कधी एका नव्या प्रेमळ नात्यात अडकायची तेव्हा हेच गाणे गुणगुणायची. मनमौजी… फुलपाखरू… फटाकडी… अशी कितीतरी नावे लोकांनी तिला ठेवली होती. पण ती मात्र ‘पालथ्या घडयावर पाणी’ अशाच अविर्भावात वावरत असे. लोकांनी काहीही म्हटले तरी त्याचा तिच्यावर परिणाम होत नसे. स्वत:च्या अटी-शर्थींनुसार, स्वत:च्या मनाला वाटेल तसे वागणारी तनू लोकांसाठी मात्र एक कोडे होती. पण मला माहिती होते की, ती खुल्या पुस्तकासारखी आहे. फक्त ते वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी थोडया संयमाची गरज होती.

असे म्हणतात की, चांगली पुस्तके आणि चांगली माणसे समजून घ्यायला थोडा जास्त वेळ लागतोच… तनूच्या बाबतही असे म्हणता येईल की, ती नेमकी कशी आहे, हे जरा उशिरानेच समजते.

तनू माझ्या बालपणीची मैत्रीण होती. शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत आणि त्यानंतर नोकरीला लागल्यावरही… ती तिचे प्रत्येक गुपित मला सांगत असे. तिच्या हृदयाच्या छोटयाशा नभांगणात कितीतरी इच्छा, अपेक्षांचे पाखरू स्वत:च्या पंखात असलेल्या बळापेक्षाही कितीतरी मोठी झेप घेण्यासाठी आतूर झाले होते. एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचे तिचे अश्रू क्षणार्धात संपत असे. या मुलीला नेमके काय हवे आहे, हे कधीकधी माझ्याही आकलनापलीकडचे होते.

८ वीत असताना पहिल्यांदा जेव्हा तिने मला सांगितले होते की, ती आमचा वर्गमित्र असलेल्या रवीच्या प्रेमात पडली आहे तेव्हा तिच्या या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हेच मला समजेनासे झाले. रवीसोबत गप्पा मारणे, खेळणे, मौजमजा करणे तिला मनापासून आवडते, असे तनूने मला सांगितले. तेव्हा तर कदाचित प्रेमाचा नेमका अर्थ काय, हेही आम्हाला नीटसे समजत नव्हते. तरीही न जाणो कशाच्या शोधात ही वेडी मुलगी त्या अनोळख्या मार्गावरून पुढे चालली होती.

एके दिवशी रवीने लिहिलेले प्रेमपत्र तिने मला दाखवले आणि ते पाहून मी घाबरले. मी म्हटले, ‘‘फाडून फेकून दे हे पत्र… चुकून जरी सरांच्या हाती लागले तर तुमच्या दोघांची खैर नाही,’’ असे तिला समजावून सांगत मी तिची मैत्रीण असल्याचे कर्तव्य पार पाडले.

‘‘अगं यात घाबरण्यासारखे काहीच नाही… आयुष्यात एक जिवाभावाचा मित्र असायलाच हवा ना? बस एक सनम चाहीए, आशिकी के लिए…’’ असे हिंदी गाणे गुणगुणत तिने सांगितले.

‘‘तर मग मी तुझी जिवाभावाची नाही का?’’ मी लटक्या रागात विचारले.

‘‘तुला समजले नाही. जिवाभावाचा मित्र म्हणजे जो माझ्यावर खूप प्रेम करेल. फक्त प्रेम आणि प्रेम… तू मैत्रीण आहेस, मित्र नाहीस…’’ तनूने मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर एके दिवशी प्रचंड रागाने म्हणाली, ‘‘मी रवीचा तिरस्कार करते.’’

मी कारण विचारले असता तिने सांगितले की, आज सकाळी खेळाच्या तासात बॅडमिंटन खेळताना त्याने माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

मी म्हटले, ‘‘तुला खूप प्रेम करणारा जिवाभावाचा मित्र हवा होता ना?’’

‘‘माझा प्रश्न ऐकून तनू काहीशी गोंधळली. नंतर म्हणाली, ‘‘हो, हवा होता मला माझ्यावर खूप प्रेम करणारा जिवाभावाचा मित्र, पण हे सर्व तेव्हाच जेव्हा प्रेम करताना त्याच्यासोबत माझी मर्जीही असेल. माझ्या परवानगीशिवाय मला कोणीही स्पर्श करू शकणार नाही.’’ असे म्हणत तिने रवीने लिहिलेली सर्व प्रेमपत्रे फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकली आणि स्वत:चे हात झटकले.

‘‘वय केवळ १४ वर्षे आणि वागण्याची ही अशी तऱ्हा?’’ मी घाबरून गेले.

९ वीत असताना आम्ही दोघींनी आमची शाळा सोडून मुलींच्या शाळेत प्रवेश घेतला. शाळा घरापासून फार लांब नसल्याने आम्ही सर्व मैत्रिणी सायकलवर बसून शाळेत जायचो. १० वीचे आमचे वर्ष सुरू होण्यापूर्वी एके दिवशी तिने मला सांगितले की, ‘‘आपण सायकलवरून शाळेत येताना नेहमी एक मुलगा आपल्या मागून येऊन पुढे निघून जातो. तो मला खूप आवडतो. असे वाटतेय की, मी पुन्हा प्रेमात पडलेय…’’

मी तिला पुन्हा एकदा आगीशी न खेळण्याचा सल्ला दिला. मात्र ती स्वत:च्या मनाशिवाय इतर कुणाचे कधीच ऐकत नसे, त्यामुळे तिने माझे ऐकण्याचा प्रश्नच येत नव्हता. आता तर शाळेतून येता-जाताना माझी नजरही त्या मुलावर पडू लागली होती.

शाळेत येताना आणि जाताना तनू त्या मुलाकडे तिरप्या कटाक्षाने एकटक पाहात असे आणि तो मुलगाही तिच्याकडे प्रेमळ कटाक्ष टाकत असल्याचे माझ्या लक्षात आले होते. शाळेच्या प्रवेशद्वारापाशी आल्यानंतर तनू शेवटचे त्याच्याकडे पाहत असे आणि त्यानंतर तो तिथून निघून जात असे.

वर्षभर त्यांची अशी नजरानजर सुरू होती. त्यानंतर दोघे एकमेकांना प्रेमपत्र देऊ लागले. १-२ वेळा त्यांनी एकमेकांना छोटयामोठया भेटवस्तूही दिल्या होत्या. अनेकदा शाळा सुटल्यावर दोघे गप्पा मारत. पूर्वीप्रमाणेच घडलेली प्रत्येक गोष्ट तनू मला सांगत असे. आता आम्ही दोघी १२ वीत गेलो होतो. मी एके दिवशी तनूला विचारले, ‘‘तुझे हे प्रेम असे किती दिवस चालणार?’’

तनू हसत म्हणाली, ‘‘जोपर्यंत हे प्रेम फक्त प्रेम असेल. ज्या दिवशी माझ्या शरीराकडे तो वाईट नजरेने बघेल तो दिवस आमच्या नात्यातला शेवटचा दिवस असेल.’’

‘‘अगं, अशी मुले रिक्षासारखी असतात. एकाला बोलावले तर कितीतरी समोर येऊन उभ्या राहतात,’’ तनू खटयाळपणे हसत म्हणाली.

तिचा बिनधास्तपणा पाहून मी आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिले. मी विचारले, ‘‘तनू तुला असे वागताना भीती वाटत नाही का?’’

‘‘यात घाबरण्यासारखे काय आहे? जर हे सर्व करून मला आनंद मिळत असेल तर तो मिळविण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. आणि हो, ही मुले तरी कुठे घाबरतात? मग मी का घाबरायचे? केवळ मुलगी आहे म्हणून?’’ तनू काहीशी रागावली होती. माझ्याकडे तिच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते.

त्या दिवशी आमच्या शाळेत निरोप समारंभ होता. शाळेच्या नियमानुसार आम्हाला साडी नेसून जायचे होते. लाल काठाच्या मोत्याच्या रंगाच्या साडीमध्ये तनू फारच सुंदर दिसत होती. आम्ही सायकलवरून नव्हे तर टॅक्सी करून शाळेत गेलो. येताना तनूने माझ्या कानात सांगितले की, ‘‘मी आज माझे नाते कायमचे संपवून टाकले.’’

‘‘पण तू तर संपूर्ण वेळ माझ्यासोबतच होतीस. मग त्याला कधी, कुठे आणि कशी भेटलीस?’’ मी आश्चर्याने एका मागून एक प्रश्न विचारू लागले.

‘‘शांत रहा… जरा हळू बोल.’’ तनूने मला गप्प बसायला सांगितले आणि त्यानंतर म्हणाली, ‘‘टॅक्सीतून उतरून तुम्ही सर्व जणी जेव्हा शाळेत जात होता तेव्हा माझी साडी माझ्याच चपलेत अडकली होती, आठवले का?’’

‘‘हो… हो… तू मागेच राहिली होतीस,’’ मी तो क्षण आठवत म्हणाले.

‘‘तो तेथेच उभा होता, टॅक्सी मागे लपला होता. सुरुवातीला त्याची नजर मला न्याहाळत होती. त्यानंतर त्याने माझा हात धरला आणि माझी परवानगी न घेताच मला मिठीत घेतले. तो माझे चुंबन घेणारच होता, पण त्यापूर्वीच मी त्याच्या एक जोरदार कानाखाली लगावली. पाचही बोटे उमटली असतील गालावर…’’ रागाने लालबुंद होत तनू म्हणाली.

‘‘हे मात्र तू अतीच केलेस… अगं इतका तर हक्क आहेच ना त्याला…’’ मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला.

‘‘नाही, मुळीच नाही. माझ्या शरीरावर फक्त माझा हक्क आहे,’’ अजूनही तनू रागात होती.

त्यानंतर परीक्षा झाल्या. सुट्टी पडली आणि निकाल लागल्यावर नवीन महाविद्यालयीन जीवन सुरू झाले. तो शाळेवेळी दिसणारा मुलगा काही दिवस आमच्या महाविद्यालयाच्या वाटेवरही घुटमळताना मला दिसला, पण तनूने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यानेही त्याचा रस्ता बदलला.

समजतच नव्हते की, कशी होती तनू? तिला प्रेम तर हवे होते, पण त्यात वासनेचा लवलेशही नको होता. महाविद्यालयीन ३ वर्षांच्या जीवनात तिने ३ मित्र बदलले. प्रत्येक वर्षाला एक नवीन मित्र. मी सतत तिला समजावत होते की, कोणाकडे तरी गांभीर्याने बघ. फुलांवर फुलपाखरासारख्या घिरटया कशाला घालतेस?

‘‘फुलांवर घिरटया घालणे हे फक्त भुंग्याचेच काम आहे का? फुलातील मकरंद चाखण्याचा अधिकार फुलपाखरालाही तितकाच असतो…’’ तनू आवेशात बोलत होती.

तनूमध्ये एक खास वैशिष्टय होते की, जोपर्यंत समोरचा त्याच्या मर्यादांचे पालन करत असे तोपर्यंतच ती ते नाते जपायची. त्याने मर्यादांचे उल्लंघन करताच तो तिच्या नजरेतून उतरायचा. त्या नात्यापासून ती लगेच दूर जायची. ‘‘माझ्या मर्जीने माझे सर्वस्व मी कोणाच्याही हाती सोपवेन, पण माझ्या मर्जीविरोधात मी कोणाला माझा साधा हातही पकडू देणार नाही,’’ असे ती मला अनेकदा सांगायची.

महाविद्यालयीन शिक्षण संपवून आता आम्ही नोकरीला लागलो होतो. सध्या मी माझ्या बॉससोबत फिरते, असे तिने मला सांगितले. त्यावेळी ‘‘आतातरी या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने बघ आणि आयुष्याचा जोडीदार निवड,’’ असे मी तळमळीने म्हटले.

‘‘माझ्या साध्याभोळया मैत्रिणी, तू नाही ओळखत या मुलांना. बोट पकडायला दिले तर ते हात पकडतात. गळाभेट घेतली तर थेट बिछान्यावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मी होकार देऊनही जो स्वत:च्या वासनेवर नियंत्रण ठेवेल, असा मुलगा मला ज्या दिवशी भेटेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन,’’ तनूने सांगितले.

‘‘तर मग कुमारीच रहा, असा मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही.’’

त्यानंतर काहीच महिन्यात माझे लग्न झाले. तनूनेही जयपूरमधील नोकरी सोडली आणि मुंबईत नोकरीला लागली. त्यानंतर काही दिवस आम्ही एकमेकींच्या संपर्कात होतो, पण हळूहळू मी संसार, मुलांमध्ये एवढी व्यस्त झाली की तनू माझ्या हृदयाच्या कप्प्यात आठवण बनून राहिली.

आज आशिकी चित्रपटातील गाणे लागताच तनूची प्रकर्षाने आठवण झाली. तिच्याशी बोलावेसे वाटू लागले. ‘तिला तिच्या मनासारखा साजन मिळाला असेल का…,’ असा विचार करीत मी जुन्या डायरीतून तिचा नंबर शोधून लावला, पण तो बंद होता.

‘काय करू? एवढया मोठया जगात तनूला कुठे शोधू?’ असा विचार मनात घोळत असतानाच मला एक कल्पना सुचली आणि मी लॅपटॉपवर फेसबूक सुरू केले. सर्चमध्ये ‘तनू’ असे लिहिताच तनू नावाचे कितीतरी आयडी समोर आले. त्या फोटोंमधील एकीचा चेहरा ओळखीचा वाटला, ती माझीच तनू होती. मी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.

२ दिवस काहीच उत्तर मिळाले नाही, पण तिसऱ्या दिवशी इनबॉक्समध्ये तिचा मेसेज पाहून मला आनंद झाला. तिने तिचा मोबाईल नंबर दिला होता व रात्री ८ वाजायच्या आधी फोन करायला सांगितले होते. सुमारे ७ वाजता मी फोन केला. तीही कदाचित माझ्याच फोनची वाट पाहात होती.

फोन घेताच नेहमीच्याच बिनधास्त शैलीत तिने विचारले, ‘‘प्रिय मैत्रिणी, कशी आहेस? आज अचानक माझी आठवण कशी झाली? मुले आणि भाओजींमधून वेळ मिळाला का?’’

‘‘अगं बाई, एकत्र एवढे सर्व प्रश्न? जरासा श्वास तरी घे,’’ मी हसतच म्हणाले. त्यानंतर तिला त्या गाण्याची आठवण करून दिली जे ती अनेकदा गुणगुणत असे.

माझे बोलणे ऐकून तनू मोठयाने हसली आणि म्हणाली, ‘‘काय करू मैत्रिणी, मी अशीच आहे. प्रेमवेडया साजनाशिवाय राहू शकत नाही.’’

‘‘अजून तोच प्रकार सुरू आहे का? तुला हवा तसा साजन भेटला नाही का?’’ मी आश्चर्याने विचारले.

‘‘अगं, तुला मी सांगितले नाही का? मी राजीवशी लग्न केले.’’ तनूने नवे गुपित सांगितले होते.

‘‘आपण भेटलोच नाही, मग तू मला कधी सांगणार होतीस? पण मी खूप खुश आहे. अखेर माझ्या मेनकेला विश्वामित्र मिळालाच.’’ मी आनंदाने म्हणाले.

‘‘हो, २ वर्षे आम्ही छान फिरून घेतले. मी त्याला पारखण्याचा बराच प्रयत्न केला. प्रसंगी माझ्या मर्यादांची सीमा लांघून त्याला माझ्या शरीराकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. हा नक्की पुरुष आहे ना? असा संशयही मला आला. एखादी मुलगी स्वत:हून इतका पुढाकार घेत असताना तो मात्र ब्रह्मचारी असल्यासारखा वागत होता.’’ तनूच्या बोलण्याची गाडी वेगाने धावू लागली होती. माझीही उत्सुकता वाढली होती.

‘‘हो का? पुढे काय झाले?’’ मी विचारले.

‘‘बहुतेक राजीव आला असे वाटतेय, उरलेल्या गप्पा उद्या,’’ असे म्हणत माझी उत्सुकता तशीच ताणून ठेवून तिने फोन बंद केला.

‘‘अरे वा, हा फारच छान निर्णय आहे तुमचा. माफीचे राहू दे. पुढे काय झाले ते सांग.’’ मी तिला आठवण करून दिली.

पुढे काय घडले सांगताना तनू म्हणाली, ‘‘राजीव माझ्यावर खूप प्रेम असल्याचे सतत सांगायचा, मात्र जेव्हा मी त्याच्या जवळ जात असे तेव्हा स्पष्टपणे सांगायचा की, आपली मैत्री असली तरी शारीरिक संबंध मात्र लग्नानंतरच ठेवणे योग्य आहे. असे संबंध ठेवणे म्हणजे भावी पत्नीचा विश्वासघात करण्यासारखे आहे, असे त्याचे मत होते,’’ तनूने सांगितले.

‘‘खूपच छान. तू तर असाच जोडीदार शोधत होतीस,’’ मी आनंदाने म्हटले.

‘‘हो. त्यानंतर आम्ही लग्न केले.’’

‘‘म्हणजे शेवट गोड झाला,’’ मी खूपच खुश होत म्हटले.

‘‘नाही, खरी कथा तर त्यानंतर सुरू झाली,’’ तनू काहीशी अडखळत म्हणाली.

‘‘आता काय झाले? राजीव खरंच पुरुष नाही का?’’ माझ्या मनाला उगाचच भीती वाटली.

‘‘तो पक्का पुरुष होता.’’ तनूने सांगितले.

‘‘म्हणजे काय?’’ मला काहीच समजेनासे झाले होते.

‘झाले असे की, लग्नाला वर्ष होत नाही तोच मला अस्वस्थ वाटू लागले होते. सवयीनुसार कोणाच्या तरी प्रेमासाठी माझे मन व्याकूळ झाले होते. विवेक आमच्या सोसायटीत नवीन आला होता. माझे मन त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले होते. सर्वांची काळजी घेण्याचा त्याचा स्वभाव मला आवडू लागला होता. ही गोष्ट एका पतीला आणि त्यातही राजीवसारख्या पतीला कशी काय मान्य झाली असती?’’ तनूने सांगितले.

‘‘पण का? राजीवच्या प्रेमात काही कमी होती का?’’ मी काळजीने विचारले.

‘‘अगं मैत्रिणी, समजून घे. जेव्हा आपण मित्राला पती बनवतो तेव्हा एक चांगला मित्र गमावून बसतो. खूप गोष्टी अशा असतात ज्या आपण पतीला नाही तर फक्त मित्राला सांगू शकतो. माझ्यासोबही असेच घडले. ही मुले लग्नानंतर एवढी भावूक का होतात, हेच मला समजत नाही,’’ तनू आपले मन माझ्याकडे मोकळे करत होती.

‘‘बरं, मग पुढे काय झाले?’’ मी सवयीनुसार कुतूहलाने विचारले.

‘‘काय होणार होते? आमच्या नात्यात दुरावा वाढू लागला. मी विवेकचे नाव घेताच राजीवच्या चेहऱ्यावरील रंग उडून जायचा. माझे विवेकला भेटणे, हसणे, बोलणे त्याला अजिबात आवडत नव्हते. लग्नानंतर पर पुरुषाशी मैत्री करणे म्हणजे चरित्रहीनता, असे त्याचे मत होते. पण मीही माझ्या मनाला समजावू शकत नव्हते. प्रेमाशिवाय मी राहू शकत नव्हते.’’

‘‘पुढे काय झाले?’’

‘‘काय होणार? एके दिवशी मी राजीवचा हात माझ्या हातात घेऊन त्याला विचारले की, अगदी खरं सांग. जेव्हा आपण मित्र होतो तेव्हा तुला माझ्या चारित्र्याबद्दल काय वाटायचे? त्याने सांगितले की, माझ्यासारखी ठाम मते असलेली मुलगी त्याने पाहिली नव्हती आणि माझ्या याच स्वभावाच्या तो प्रेमात पडला. मी त्याला समजावले की, जर लग्नाआधी अनेक मुलांसोबत मैत्री करूनही मी माझे कौमार्य अबाधित ठेवले तर मग तो असा विचार करूच कसा शकतो की, माझ्या मैत्रीत पवित्र भावना असणार नाही.’’

‘‘ज्या दिवशी माझ्या एखाद्या मित्राचा हात माझ्या खांद्यावरून पुढे सरकत जाईल त्याच क्षणी मी त्याचा हात झटकून टाकेन. माझ्या शरीरावर आणि मनावर फक्त तुझाच अधिकार आहे, असा विश्वास मी राजीवला दिला. जिवाभावाचा मित्र असल्याशिवाय मी आयुष्यात खुश राहूच शकत नाही, हे त्याला समजावून सांगितले.’’ तनूने सांगितले.

‘‘पुढे?’’

‘‘राजीवच्या हे लक्षात आले की, मी मित्राशिवाय आनंदी राहू शकत नाही आणि जर मी आनंदी नसेन तर त्याला आनंदात कसे ठेवू शकेन?’’ तनू म्हणाली.

‘‘बरं झालं,’’ मी आनंदाने म्हणाले.

‘‘त्यानंतर त्याने मला विवेकशी मैत्री करण्यापासून रोखले नाही. मीही त्याला वचन दिले की, जेव्हा तो माझ्या सोबत असेल तेव्हा त्या वेळेवर फक्त त्याचा हक्क असेल.’’ तनूने तिचे बोलणे पूर्ण केले.

यापुढेही संपर्कात राहू, असे ठरवून आम्ही फोनवरील संभाषण थांबवले. तनूने फोन ठेवला होता, पण मी अजूनही माझा मोबाईल कानाला तसाच लावून विचार करीत होती की, खरंच खूप धीट आहे तनू. तिच्या म्हणण्यात तथ्य आहे. आयुष्यात असा एखादा जिवाभावाचा मित्र असायलाच हवा जो आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम करेल. त्यात वासना नसेल. आपल्यातील सर्व वाईट गोष्टींसह आपला स्वीकार करेल. ज्या गोष्टी पतीला सांगणे शक्य नाही त्या सर्व बऱ्या-वाईट गोष्टी आपण त्याला सहजपणे सांगू. अगदी पतीबाबत असलेली गुपितेही.

आपण बायका आयुष्यभर आपल्या पतीमध्ये मित्र शोधत असतो, पण पती हा पतीच असतो तो मित्र बनू शकत नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें