कोरोना काळात वाढतोय मुलांमध्ये तणाव

* सुनील शर्मा

एके दिवशी, दहा वर्षीय नीरज अचानक आईला म्हणाला, ‘‘मम्मी, मामाच्या घरी जाऊया.’’

हे ऐकून त्याच्या आईने समजावले की, ‘‘बाळा, सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग आहे, म्हणून आपण कुठेही जाऊ शकत नाही.’’

हे ऐकून नीरज निराश झाला आणि पाय आपटत रागाने म्हणाल, ‘‘हे काय आहे… किती दिवस झाले, आपण कुठेच गेलोलो नाही.’’ फक्त घरातच राहायचे. उद्यानात किंवा मित्रांना भेटण्यासाठीही जाता येत नाही. सतत थोडया-थोडया अंतराने सॅनिटायझरने हात धुवावे लागतात आणि जरा जरी घराबाहेर गेल्यास तोंडावर मास्क लावावा लागतो. खेळण्यासाठी फक्त टेरेसवरच जाता येते…

‘‘मी आता कंटाळलो आहे. जेव्हा तुझ्याकडे मोबाइल मागतो, तेव्हा बाबा ओरडतात आणि तू मात्र दिवसभर इअरफोन लावून मोबाइलवर वेब सीरीज पाहत बसतेस.’’

मार्च २०२१ च्या अखेरच्या आठवडयापासून संपूर्ण देश कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाशी झुंज देत आहे. कितीतरी लोक घरात बंद आहेत, विशेषत: मुले घरात कैद झाली आहेत. ती शाळेत जाऊ शकत नाहीत. पार्क सामसूम झाले आहेत.

सुरुवातीला मुलांना असे वाटले होते की, शाळा बंद झाल्या म्हणजे आता दिवसभर मजा करायची. परंतु हळूहळू त्यांना समजले की, हे सुट्टीचे दिवस नाहीत, तर त्यांच्या निरागस बागडण्यावर जणू कर्फ्यू लावण्यात आला आहे.

याचा परिणाम असा झाला की, नीरजसारख्या लहान मुलांच्या मनात अनेक नकारात्मक विचार येऊ लागले आहेत. ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्याचे नुकसान करू शकतो.

सध्या तरी ही समस्या प्राथमिक टप्प्यात आहे, म्हणूनच मुले वैतागत असल्यास मोठयांनी रागावू नये. उलट त्यांनी मुलांना या मोकळया वेळेत एखादे चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे.

गॅझेट बनले आधार

केमिकल लोच्याबाबत बोलायचे झाल्यास, लहान मुले असोत किंवा मोठी माणसे, तणावामुळे त्यांच्या हार्मोन्समध्ये बदल होतात. लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचा दिनक्रम बदलला आहे. मोठी माणसे कुठल्या ना कुठल्या कारणाने घराबाहेर पडतात, पण मुले मात्र ‘बिग बॉस’ या रिएलिटी शोच्या स्पर्धकांप्रमाणे घरातच बंदिस्त झाली आहेत.

दुसरीकडे मुलांच्या शाळा सध्या बंद असल्या तरी ऑनलाइन अभ्यास मात्र सुरू आहे. त्यामुळे अभ्यासाशिवाय ते मनोरंजनसाठीही मोबाइल, संगणक, लॅपटॉप किंवा टीव्हीचाच आधार घेतात. यामुळे केवळ त्यांच्या डोळयांवरच वाईट परिणाम होत नाही तर मानसिकदृष्टयाही ते थकून जातात.

सध्या आपल्या ही गोष्ट लक्षात आलेली नाही, पण हे कटू सत्य आहे की, टीव्हीवरील कोरोनाशी संबंधित नकारात्मक बातम्या सातत्याने ऐकल्यामुळे मोठया माणसांसोबतच मुलांमध्येही तणाव वाढत आहे.

या तणावातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? तर अशा परिस्थितीत मुलांना काहीही करून नकारात्मक वातावरणातून बाहेर काढणे खूपच गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना मोबाइलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यांना घरी किंवा छतावर असे खेळ खेळायला प्रोत्साहित करायला हवे, ज्यामुळे त्यांचा व्यायाम होईल, त्यांना भरपूर घाम येईल. याशिवाय त्यांना चित्रकला, पुस्तके वाचणे किंवा इतर कोणत्यातरी कलेत गुंतवून ठेवा.

यांनी असे केले

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार असलेल्या सोना चौधरी यांना २ मुलगे आहेत. कोरोना काळात ही दोन्ही मुले घरातील कामात आईला मदत करतात. स्वयंपाकघरात काहीतरी नवीन पदार्थ बनवतात. कविता लिहितात.

सोना चौधरी यांच्या २ मुलांपैकी मोठा मुलगा सुजल १५ वर्षांचा असून अकरावीत शिकतो. तर, १२ वर्षांच्या लहान मुलाचे नाव व्योम आहे आणि तो आठवीत शिकतो. दोघांनाही पुस्तक लिहिण्याची आवड आहे आणि त्यांनी प्रत्येकी २ पुस्तके लिहिली आहेत.

सोना चौधरी यांनी सांगितले की, ‘‘मी दोघांकडून घराच्या साफसफाईसारखी कामे करून घेते. मीही त्यांच्या बरोबरीने हे काम करते. त्यांना स्वयंपाकघरात माझ्या सोबत ठेवते, शिवाय मोकळा वेळ मिळताच त्याच्यांबरोबर खेळते.’’

सोना चौधरी यांच्या मते, ‘‘सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मुलांच्या वागणुकीत बदल झाला आहे. म्हणूनच पालक आणि शिक्षकांनी मुलांकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी मुले शाळेसोबतच आपल्या आजूबाजूच्या परिसराकडूनही खूप काही शिकत असत. घरातील कामातून शिकत असत.

‘‘सध्याच्या कोरोना काळात मुलांना घरातच प्रात्यक्षिक करून शिकण्याची संधी मिळाली आहे. ऑनलाइन शिकवणी चांगली आहे, परंतु मुलांना चांगल्या प्रकारे जगायची शिकवण मिळावी यासाठी वडीलधाऱ्यांनी त्यांना स्वत:सोबत ठेवायला हवे. ते जे काही करतात ते मुलांना दाखवायला हवे, शिकवायला हवे. यालाच कौशल्यांचा सराव असे म्हणतात. चीनसारख्या देशात लहान वयातच मुलांकडून कौशल्यांचा सराव करून घेतला जातो.

महिला काँग्रेसशी संबंधित आणि आया नगर प्रभागातील उपाध्यक्षा मधु गुप्ता यांना २ मुले आहेत. १० वर्षांची अग्रिमा आणि ७ वर्षांचा समन्वय. मधु गुप्ता यांनी सांगितले की, ‘‘एकीकडे ऑनलाइन वर्गामुळे त्यांचा स्क्रीनकडे पाहण्याचा वेळ वाढत आहे. ती आळसावत असून त्यांची शारीरिक हालचालही कमी होत असल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. पण, दुसरीकडे कोरोना कालावधीत मुले घरीच असल्यामुळे मी या वेळेचा सकारात्मक उपयोग करून घेत आहे. मी त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवते आणि त्यांनी घरातील इतर कामे शिकावीत यासाठी त्यांना मदत करते. जसे की, डायनिंग टेबल मांडणे, खाण्याची भांडी स्वयंपाकघरात ठेवणे, कपाटात स्वत:चे कपडे नीट लावून ठेवणे, खोली स्वच्छ करणे इत्यादी.

‘‘राजकारणात असण्यासोबात मीसुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता आहे, म्हणूनच दररोज मला घराबाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत, मुश्किलीने मिळणारा थोडासा वेळही योग्य प्रकारे वापरून त्यावेळेत मुलांना चांगल्या सवयी, घरकाम शिकवून मी माझा दिनक्रमही सहजसोपा करून घेतला आहे.’’

पण प्रत्येक घरात असे घडत नाही. कोरोनामुळे बऱ्याच लोकांचा रोजगार गेला आहे. याचा त्यांच्या कौटुंबिक जीवनावर वाईट परिणाम होत आहे. मुलेही याला अपवाद नाहीत. परंतु काही खबरदारी घेतल्यास मुलांचा ताण कमी होऊ शकतो. याव्यतिरिक्त जर तुमचा मुलगा असामान्यपणे वागत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

हिरवी बुरशी आणि मंकीपॉक्स व्हायरस काय आहे?

* अनामिका पांडे

कोरोनाचे आणखी बरेच प्रकार एक-एक करून समोर येत आहेत….एक संसर्ग संपत नाही की दुसरा संकट बनून समोर येतो. अशा स्थितीत देश या संसर्गातून कधी बाहेर येऊ शकेल यावर काहीच सांगता येत नाही. डेल्टा प्लससारखे रूप समोर आले आहेतच, परंतु त्याबरोबरच काळी बुरशी, पांढरी बुरशी आणि पिवळ्या बुरशी नंतर आता हिरव्या बुरशीचा एक रुग्ण इंदूरमध्ये आढळला आहे. देशातील हिरव्या बुरशीचे हे पहिलेच प्रकरण आहे. याबरोबरच मंकीपॉक्स बुरशीचे प्रकरण ही समोर आले आहे. खरं तर, इंदूरमध्ये ग्रीन फंगस ग्रस्त रूग्णाची पुष्टी झाली होती. त्याला इंदूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण आता त्या रूग्णाला चांगल्या उपचारासाठी विमान सेवेने मुंबईत दाखल करण्यात आले आहे.

खरं तर, हा रुग्ण माणिकबाग परिसरात राहणारा 34 वर्षीय रुग्ण आहे, जो कोरोनाने संक्रमित झाला होता, त्याच्या फुफ्फुसांमध्ये 90 टक्के संसर्ग पसरला होता… पण दोन महिन्यांच्या उपचारानंतर रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. असे सांगून की आता तो ठीक आहे आणि त्याच बरोबर त्यालाही बरे वाटू लागले होते. पण 10 दिवसानंतर रुग्णाची प्रकृती पुन्हा खालावू लागली. त्याच्या उजव्या फुफ्फुसामध्ये पू भरला होता ज्यामध्ये, त्याच्या फुफ्फुसांना आणि सायनसला एस्परगिलस बुरशीचा संसर्ग झाला होता, त्या कारणास्तव

त्याला मुंबईला पाठवण्यात आले. तज्ञांच्या मते हिरवी बुरशी हा काळ्या बुरशीपेक्षा जास्त धोकादायक आजार आहे. ते फुफ्फुसात हिरव्या रंगाचे दिसते, ज्यामुळे त्याला हिरव्या बुरशीचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णाची स्थिती सतत खालावत जाते. कोरोनाची गती तर कमी झाली आहे. परंतु काळ्या बुरशीच्या रूग्णांची संख्या मात्र कमी होत नाही आणि त्यात हिरवी बुरशी उदयास येणे चिंताजनक आहे… तथापि त्या रूग्णाला निश्चितच चांगल्या उपचारासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे पण तो बरा होऊ शकेल की नाही हे सांगता येत नाही.

हिरव्या बुरशीची लक्षणे काहीशी अशी असतात...

रुग्णाला खाखरण्यातून आणि गुदाशयातून रक्तस्त्राव होण्यास सुरवात झाली आहे, ताप देखील 103 अंशांपर्यंत वाढतो, तर हिरव्या बुरशीवर अँफोटेरेसिन बी इंजेक्शन देखील कार्य करत नाही. राज्यातील हिरव्या बुरशीचे हे पहिलेच प्रकरण आहे. कोव्हिड पोस्ट रुग्णांमध्ये हे दिसून आले आहे.

आता मुद्दा येतो मँकीपॉक्स विषाणूचा. शास्त्रज्ञांसमोर कोरानावर रामबाण उपचार शोधणे अजूनही शक्य झाले नाही. ते अद्याप प्रयत्न करीत आहेत. त्यात आता एक नवीन विषाणू दाखल झाला आहे आणि या अत्यंत धोकादायक नवीन विषाणूचे नाव आहे मँकीपॉक्स. ब्रिटनच्या वेल्समध्ये मँकीपॉक्सची दोन प्रकरणे आढळली आहेत. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हा विषाणू बहुधा आफ्रिकेत आढळतो. खास गोष्ट म्हणजे ज्या लोकांमध्ये हा नवीन विषाणू ओळखला गेला आहे, ते दोघेही घरीच राहत होते. ते घराबाहेर कुठेही जात-येत नव्हते, असे असूनही ते या विषाणूच्या विळख्यात अडकले. कोरोनाच्या कहरात मँकीपॉक्स विषाणूच्या प्रवेशामुळे देश अजून जास्त धोक्यात आला आहे.

मंकीपॉक्स म्हणजे काय?

एका अहवालानुसार मंकीपॉक्स हा एक विषाणू आहे, जो प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो.

सर्वप्रथम आफ्रिकन देश कॉंगोमध्ये त्याची ओळख 1970 मध्ये झाली होती. त्यानंतर 2003 मध्ये मध्य व पश्चिम आफ्रिकेतील देश, अमेरिका आणि इतर देशांतही त्याची बरीच प्रकरणे समोर आली होती आणि मंकीपॉक्समधील मृत्यूचे प्रमाण ११ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. चेचकवरील लस मंकीपॉक्सविरूद्धदेखील प्रभावी ठरू शकते.

मंकीपॉक्सची लक्षणे कोणती आहेत?

त्याची लक्षणे स्मॉलपॉक्स म्हणजेच चेचक सारखीच आहेत, शरीरावर लाल चकत्ते [पुरळ] उठणे सुरू होते आणि नंतर ते चकत्ते जखमा बनतात.

ताप येणे, डोकेदुखी सुरू होणे, कंबरदुखी, स्नायू आकसणे आणि अशक्तपणा जाणवू लागतो.

कोरोना या ७ गोष्टींकडे द्या लक्ष

* प्राची भारद्वाज

कोरोनाचा कहर संपूर्ण जगावर झाला आहे. जवळपास सर्वच देश याच्या फेऱ्यात अडकले आहेत. लोक घरात नाईलाजाने बंदिस्त झाले आहेत. काय करणार? कोरोनापासून स्वत:चे रक्षण करणेही गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाता येणार नाही. साफसफाईकडे लक्ष द्यायचे आहे आणि संसर्गापासून दूर रहायचे आहे. अशावेळी काय होईल, जेव्हा पतीपत्नी किंवा लिवइन जोडप्याला एका घरात पूर्ण वेळ सोबत रहावे लागेल? कशी असेल ती परिस्थिती जिथे पतीपत्नीला जबरस्तीने एकमेकांसमोर रहावे लागेल? लक्षात घ्या, हा हनिमून नाही. संशोधनानुसार असा निष्कर्ष निघाला आहे की, अशा परिस्थितीत लोकांना प्रचंड हताशा, कंटाळा, एकाकीपण, राग आणि तणावासारख्या भावनांचा सामना करावा लागतो.

जगभरात पतीपत्नीवर केलेल्या विनोदांची कमी नाही. सर्वांना माहिती आहे की, भलेही हे नाते जीवनभराचे असले तरी थोडासा स्वत:साठी वेळ प्रत्येकालाच हवा असतो. म्हणून हेच चांगले असते की, पतीने सकाळी कामाला जावे, पत्नी गृहिणी असेल किंवा नोकरीला जात असेल आणि रात्री उशिरा दोघे एकमेकांना भेटत असतील. यामुळे दोघांना आपापले जीवन जगता येते. शिवाय भेटल्यानंतर कितीतरी नवीन गोष्टी सांगण्यासारख्या असतात, ज्या या नात्यात नव्याने गोडवा आणतात. पण कोरोनामुळे अशी गोड हवेची झळूकही हरवून गेली आहे. ज्या जोडप्यांच्या घरी मुले आहेत तिथे लक्ष दुसऱ्या गोष्टीत वळवणारे इतरही सदस्य आहेत. पण ज्या जोडप्यांना मुले नाहीत तिथे एकमेकांशिवाय दुसरे असणारच कोण?

अशावेळी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे :

  1. दिनक्रम बिघडू देऊ नका

जेव्हा आपल्या सर्वांसमोर घरात राहण्यावाचून पर्याय उरलेला नाही, अशावेळी आळशीपणाने प्रत्येक काम टाळू नका. ज्याप्रमाणे यापूर्वी सकाळी उठत होता, तसेच उठा. अंघोळ करुन तयार व्हा. त्यानंतर घरातील कामे उरका. ऑफिसची वेळ होईल तेव्हा जागा निश्चित करून तेथे टेबल आणि खुर्ची घेऊन बसा. लक्षात ठेवा, कोरोनामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर खूपच वाईट परिणाम होत आहे. म्हणूनच आपले काम प्रामाणिकपणे करा.

  1. घरातली कामे आपापसात वाटून घ्या
  • या काळात घरकाम करणाऱ्या महिला, ड्रायव्हर, कार धुणारे, स्वयंपाकी सर्वांनाच सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आता घरातली सर्व कामे आपल्यालाच करायची आहेत. अशावेळी कोणा एकावर सर्व कामांची जबाबदारी अली तर त्याची चिडचिड होणे स्वाभाविक आहे. अशी वेळ येऊ नये म्हणून घरातल्या कामांची एक यादीच तयार करा. आपली क्षमता आणि आवडीनुसार कामाचे वाटप करा. जसे की, भांडी पतीने घासली तर साफसफाई पत्नीने करावी. जेवण पत्नीने बनवले तर सर्व पुसून घेणे, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणे, ही कामे पतीने करावीत.
  1. जवळ येऊ नका, दूरही जाऊ नका
  • आज परिस्थिती अशी आहे की, जवळही जाता येत नाही आणि फार दूरही राहता येणार नाही. एकाच घरात एकत्र बंद झाल्यामुळे तरुण जोडप्यांमध्ये एकमेकांप्रती शारीरिक आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे. जेव्हा तरुण पती किंवा पत्नी समोर असते तेव्हा मनावर नियंत्रण ठेवणे कठीण असते. पण सोबतच या गोष्टींकडेही लक्ष द्यायला हवे की, कोरोना विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतो. म्हणूनच जर जवळ आलात तर त्यानंतर स्वत:च्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. अंघोळ करा. तसे तर शॉवरखालीही तुम्ही एकमेकांजवळ येण्याच्या संधीचा फायदा घेऊ शकता. म्हणजे प्रेम आणि स्वछता दोन्ही साधता येईल. पण एकत्र राहिल्यामुळे फक्त प्रेम फुलेल, असेही अजिबात नाही. याचे दुष्परिणामही होऊ शकतात.
  1. ओव्हर एक्सपोजरचा धोका
  • सतत सोबत राहिल्यामुळे तरुण जोडप्यात केवळ प्रेमच बहरेल असे नाही तर मतभेदही वाढू शकतात. आकडेवारीनुसार चीनमध्ये कोरोना काळात एकमेकांसोबत राहण्यावाचून पर्याय नसलेल्या जोडप्यांवर घटस्फोटाची वेळ आली आहे. चीनचा दक्षिण-पश्चिम भाग सिशुआनमध्ये 24 फेब्रुवारीनंतर ३०० हून अधिक घटस्फोटाचे अर्ज आले आहेत. दक्षिण चीनमधील फुजीआन प्रांतात तर एका दिवसात घटस्फोटाच्या १० अर्जांवर सुनावणी ठेवण्यात आली. असे यामुळे होत आहे की, तरुण जोडपी गरजेपेक्षा जास्त वेळ नाईलाजाने एकमेकांसोबत घालवत आहेत. त्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसल्यामुळे गरजेपेक्षा जास्त काळसोबत राहून अनेकदा त्यांच्यात वाद होतात आणि शेवटी स्वत:चा अहंकार, राग किंवा जिद्दी स्वभावामुळे ते घटस्फोटाचा निर्णय घेतात.
  1. घरात राहूनही अंतर ठेवणे आहे शक्य
  • स्वत:साठी थोडा वेळ असायला हवा असे प्रत्येकालाच वाटते. आपली स्पेस, आपला वेळ. पण सतत सोबत राहिल्यामुळे जोडीदाराची नजर सर्वकाळ आपल्यावरच खिळून राहिल्यासारखे वाटते. हे टाळण्यासाठी तुम्हाला दोघांची स्वत:साठीची वेळ आणि जागा ठरवून घ्यायला हवी. तुम्ही दोघेही वर्किंग असाल तर सोबत असूनही एकमेकांपासून थोडे अंतर सहज ठेवू शकता. शिवाय एकमेकांचा कंटाळा येणार नाही.
  1. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून
  • अनेकदा तुमच्या मनात काहीतरी वेगळे असते पण प्रत्यक्षात त्यापेक्षा वेगळे वागण्याची कारणे अनेक असतात. जसे की, तुम्हाला राग आला कारण तुमच्या जोडीदाराने त्याची भांडी धुतली नाहीत. जेव्हा की तुम्ही नुकतेच किचन स्वच्छ करून आला असाल. प्रत्यक्षात तुमच्या रागावण्यामागचे खरे कारण असे असते की, तुमच्या जोडीदाराने तुम्हाला होणार त्रास आणि तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले.

 मानसशास्त्रज्ञ डॉक्टर प्रियांका सांगतात की, तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी बोलायला हवे आणि तुमच्या रागामागचे जे खरे कारण आहे ते सांगायला हवे.

जेव्हा तुम्हाला वाटेल की, तुमच्या दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून भांडण होऊ शकेल अशावेळी खोलीतून बाहेर जा. कुठले तरी दुसरे काम करायला घ्या, जेणेकरून भांडणाचा विषय तुमच्या डोक्यातून निघून जाईल. सतत सोबत राहिल्यामुळे असेही होऊ शकते की, तुम्हाला तुमच्या जोडोदारामधील थोडे जास्तीच दोष दिसू लागतील. पण तुम्हाला स्वत:वर लक्ष द्यायचे आहे. सकारात्मक रहायचे आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घालवलेले चांगले क्षण, चांगल्या गोष्टी आठवा. त्याच्यातील केवळ चांगल्याच गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला त्यांच्या काही त्रासदायक सवयींकडे दुर्लक्ष करावे लागेल.

  1. क्वॉलिटी टाइम घालवा
  • ही वेळ केवळ अडचणींची आहे असे मुळीच नाही. तुम्ही दोघे मिळून या क्षणांना सोनेरी क्षण बनवू शकता. त्यासाठी आपल्या जोडीदारासोबत आवडीची पुस्तके वाचा. जुने चित्रपट पहा. आवडीचे गेम खेळा. चित्र काढा. सोबतच व्यायाम करून स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्या. पण या गोष्टीकडे लक्ष द्या की, एकमेकांच्या इतकेही जवळ येऊ नका की, कंटाळा येऊ लागेल. बाहेरच्या जगासोबचे संबंध तोडू नका. तुम्ही घराबाहेर पडू शकत नसाल म्हणून काय झाले, व्हर्च्युअल वर्ल्ड तर आहेच. त्याच्याद्वारे तुमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, शेजाऱ्यांशी कायम संवाद साधा. सोशल मीडियावरही काही वेळ घालवता येऊ शकेल.

अभिनेता स्वप्नील जोशी व सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नोरोनहा यांनी जपली सामाजिक बांधिलकी

*सोमा घोष

भारतात कोरोना व्हायरसचे प्रमाण वाढले असल्यामुळे बऱ्याच सिनेमांचे-मालिकांचे चित्रीकरण थांबले. त्यामुळे या क्षेत्रात स्पॉटबॉय म्हणून कार्यरत असणाऱ्या लोकांना अभिनेता स्वप्नील जोशी व सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नरोन्हा या दोघांनी मिळून मदतीचा हात दिला आहे. स्वप्नील व मॉरिस यांनी मीडिया बझ या मीडिया कंपनीच्या साहाय्याने सिनेक्षेत्रात स्पॉटबॉयचे काम करणाऱ्या लोकांना शंभरहून अधिक रेशन किटचे वाटप केले आहे. मॉरिस नरोन्हा यांनी कोरोना काळात उत्तर मुंबईतील झोपडपट्टी भागातील गरजू लोकांना गॅस सिलिंडर, रेशन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Mauris Noronha (@maurisbhai)

मॉरिस यांनी कोरोना काळात आतापर्यंत केलेल्या कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होते आहे. स्वप्नील व मॉरिस यांनी एक योजना आखून बोरिवली आणि दहिसर विभागातील झोपडपट्ट्यांमध्येही गरजूंना रेशन किटचे वाटप केले. कोरोना काळात गरजू व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन स्वप्नीलने आपल्या चाहत्यांना केले आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें