जेव्हा प्रेमी असेल पैशांची उधळपट्टी करणारा

* प्राची भारद्वाज

‘डेटिंग’ हा शब्द मनात प्रेमाची कोमल भावना जगवण्यासाठी पुरेसा आहे. आपला प्रेमी आपल्यासोबत असतो. त्याच्यात आपण आपल्या भावी जोडीदाराला पाहत असतो. त्याच्यासोबत वेळ घालवणे, भविष्याची सुखद स्वप्ने रंगवणे खूपच सुंदर, हवेहवेसे वाटणारे असते. आपल्या जीवनातील जोडीदार कसा असेल, हा विचार सतत मनामध्ये घोळत असतो. आपण सर्वच आपल्या मनात त्याची प्रतिमा आणि डोक्यात एक यादी तयार करून ठेवतो, जसे की, माझ्या जोडीदारामध्ये अमुक गुण असतील, तो हुशार असेल, खूप काळजी घेणारा असेल, मला समजून घेईल इत्यादी.

पण या यादीत एक गोष्ट राहून जाते, ती म्हणजे जोडीदाराची जास्त किंवा कमी खर्च करण्याची सवय. तुमचा जोडीदार पैसे कसे खर्च करतो त्याचा थेट प्रभाव तुमच्या नात्यावर पडतो. एरिजोना विद्यापीठाने सुमारे ५०० जणांची माहिती गोळा केली. सर्व २० वर्षांचे होते आणि आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीसोबत भावनात्मकरित्या गुंतलेले होते. या संशोधनाचा निष्कर्ष असा निघाला की, ज्यांचे प्रेमी पैसे जबाबदारीने, जपून वापरणारे होते त्यांच्यात आंनद आणि ताळमेळ जास्त असतो.

या उलट ज्यांच्यामध्ये पैसे कसेही उधळण्याची सवय होती त्यांचा एकमेकांवर कमी विश्वास असल्याचे निदर्शनास आले. मिशिगन विद्यापीठातही एक संशोधन झाले जिथे असा निष्कर्ष निघाला की, सुरुवातीला खर्च करण्याबाबतचे भिन्न विचार एकमेकांबद्दल आकर्षण वाढण्यास कारणीभूत ठरले. त्यानंतर मात्र विचारातल्या याच तफावतीमुळे दोघांमध्ये वाद होऊन चिंता वाढत गेली.

धोक्याची घंटा

याचा सरळ सोपा अर्थ असा की, जसे रंगरूप, व्यक्तिमत्त्व, वागणूक इत्यादी एखाद्या नात्यासाठी खूपच महत्त्वाचे असते तसेच पैशांबद्दल विचार करण्याचा आणि ते खर्च करण्याचा दृष्टिकोन हा आपापसात ताळमेळ वाढवण्यासाठी गरजेचा असतो. तुमचा प्रेमी खूप उधळपट्टी करणारा असेल तर सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला आनंदच होईल. त्याने दिलेल्या महागडया भेटवस्तू आणि महागड्या हॉटेलमध्येल घेऊन जाणे यामुळे तुम्ही हुरळून जाल. पण जसे दिवस जातील तसा हा त्याचा चांगला गुण नसून अवगुण असल्यासारखे वाटायला वेळ लागणार नाही.

फिनसेफ कंपनीचे संस्थापक, संचालक मृण अग्रवाल यांनी सांगितले की, एखादे नाते टिकवून ठेवण्यासाठी हे गरजेचे असते की, आर्थिक बाबतीत दोघांमध्ये एकमत असावे. कमावणे, बचत करणे, गुंतवणूक आणि कर्ज घेण्याबद्दल दोघांनी एकसारखा विचार केला तर हे शक्य होते. यामुळे जीवनातील चढ-उतारांना सामोरे जाणे सोपे होते. पण हो, पैशांसंदर्भातील गोष्टी दोघांनी तेव्हाच बोलायला हव्यात जेव्हा त्यांनी नात्याला पुरेसा वेळ दिलेला असेल.

सुरुवातीलाच पैशांबद्दल बोलणे योग्य नसते, असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. यात ६० टक्के लोकांनी मान्य केले की, कमीत कमी ६ महिन्यांनंतर दोघांनी आपापल्या आर्थिक स्थितीबद्दल एकमेकांना सांगायला हवे. पण जर त्यावेळी तुमचा प्रेमी त्याची आर्थिक स्थिती तुमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा त्याबाबत बोलणे टाळत असेल तर ही धोक्याची घंटा आहे, हे समजून जावे.

सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर तारेश भाटिया यांनी सांगितले की, तुमचा प्रेमी मागील ४-५ वर्षांपासून नोकरी करत असेल आणि तरीही घर, गाडी, बँक बॅलन्स, म्युच्युअल फंड किंवा फिक्स डिपॉझिट यापैकी त्याच्याकडे काहीही नसेल तर समजून जावे की, त्याचे कुठलेही आर्थिक ध्येय निश्चित नाही. याकडे गांभीर्याने पाहायला हवे, कारण हे एक प्रकारचे आर्थिक बेजबाबदारपणाचे लक्षण असते. त्याचा दुष्परिणाम तुमच्या भविष्यावर नक्कीच होऊ शकतो.

तारेश यांच्या सल्ल्यानुसार, भरमसाठ पगार नसतानाही तुमचा प्रेमी तुम्हाला महागडया ठिकाणी जेवायला घेऊन जात असेल किंवा फिरायला गेल्यावर भरपूर खर्च करत असेल तर तुम्ही त्याला वेळीच रोखायला हवे. कदाचित मिळकतीपेक्षा जास्त खर्च करायची त्याला सवय असू शकते. तुम्हाला याबाबत जितक्या लवकर समजेल तितके चांगले असते, कारण लग्नानंतर अशा सवयी मोडणे कठीण असते.

तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीला पैशांची कदर नाही हे कसे ओळखाल?

किमतीबद्दल बिनधास्त

वर्षाने सांगितले, ‘‘रेहानसोबत फिरायला जाणे म्हणजे भरपूर खरेदी करणे. त्याला खरेदी करायला प्रचंड आवडते. त्याला सर्व काही खरेदी करायचे असते. अत्याधुनिक गोष्टी त्याला खूप आवडतात. ब्रँडेड कपडे, शूज असोत किंवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, रेहानला सर्व हवे असते. काहीही खरेदी करताना त्याला किमतीशी काहीही देणेघेणे नसते. जेवणाचे बिल देताना, घरासाठी नवीन भांडी घेताना किंवा वेटरला टीप देताना तो पैशांकडे कधीच बघत नाही. असे कधीपर्यंत चालणार? आम्ही दोघेही खासगी कंपनीत कामाला आहोत. पैशांची उधळपट्टी करायला आम्हाला एखादा खजिना सापडलेला नाही.’’

मागील ३ वर्षांपासून प्रेमसंबंध असलेले रेहान आणि वर्षा आता लग्नाचा विचार करत आहेत. त्यामुळेच वर्षाला भविष्याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे.

‘हाऊ टू बी हॅप्पी पार्टनर्स’च्या लेखिका डॉक्टर टीना टेसिना यांनी सांगितले की, ‘‘नात्यात आर्थिक बेईमानी तेव्हा जन्माला येते जेव्हा आपापसात संवादाचा अभाव असेल किंवा तुम्ही मतभेद जाणूनबुजून टाळत असाल. वेळ हातून निघून जाण्याआधीच पैशांबाबत एकमेकांशी स्पष्टपणे बोलणे गरजेचे असते. उधळपट्टीची सवय असलेल्या माणसासोबत आयुष्य काढणे सोपे नसते. भविष्यात तो कर्जाच्या ओझ्याखाली दबून जाण्याची शक्यता अधिक असते. खोटा दिखावा करणाऱ्यापेक्षा जीवनमूल्ये जाणारा प्रेमी अधिक चांगला ठरतो.’’

चादरीपेक्षा पाय मोठे

शिखाचा मित्र पाहून तिच्या मैत्रिणींना तिचा हेवा वाटायचा. त्याने बीएमडब्ल्यू कारने येणे, शिखाला महागडया भेटवस्तू देणे, महागडया हॉटेलमध्ये पार्टी देणे, यामुळे शिखा खूप खुश होती, पण तरी तिच्या मनात अधूनमधून एक विचार येत असे की, एका साध्या कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक या पदावर असूनही त्याला इतका जास्त खर्च करणे कसे परवडते? सोपी गोष्ट आहे, तो क्रेडिट कार्ड आणि कर्ज काढून असे ऐशोआरामी जीवन जगत आहे.

तरेश भाटिया यांनी सांगितले की, तुमचा प्रेमी कोणते कपडे घालतो, त्याची जीवनशैली कशी आहे, तो कोणती गाडी चालवतो, या सर्व प्रश्नांमध्ये तुम्हाला त्याची जीवन जगण्याची पद्धत ही त्याच्या मिळकतीच्या तुलनेत बेजबाबदारपणाची आहे की नाही, याचे उत्तर सापडेल. जर तो बचतीऐवजी खर्चबद्दलच अधिक बोलत असेल तर समजून जावे की, लवकरच त्याचे क्रेडिट बिल त्याच्या आनंदी जीवनावर ताबा मिळवेल. म्हणूनच या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. उलट शक्य तितक्या लवकर त्याच्याशी या विषयावर बोला.

जर उगाचच तो पैशांची उधळपट्टी करत असेल तर समजून जा की, त्याचे तुमच्यापेक्षा जास्त प्रेम पैसे खर्च करण्यावर आहे आणि तेच त्याला जास्त प्रिय आहे.

टिना टेसिना याकडे वाईट सवय नव्हे तर विश्वासघात म्हणून पाहातात.

यश आणि निवेदिता दोघे ३० वर्षांचे आहेत आणि लवकरच लग्न करणार आहेत. लग्नापूर्वी दोघेही एकमेकांशी बचत आणि गुंतवणुकीबाबत मनमोकळेपणाने बोलले. त्यांनी सांगितले की, ‘‘मागील ५ वर्षांपासून आमचे प्रेमसंबंध आहेत. लग्नापूर्वी एकमेकांबाबत सर्व गोष्टी आम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. घर, गाडी इतकेच नाही तर कॅमेरा आणि लॅपटॉपलाही आम्ही मालमत्ता समजतो.’’

निवेदिताने सांगितले की, ‘‘यश मार्केटिंग मॅनेजर आहे. गरजेपेक्षा जास्त खर्च करण्याची त्याला सवय होती. मी बँकेत काम करते. बचत करणे आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे माझ्या नोकरीचा एक भाग आहे. यशच्या जास्त खर्च करण्याच्या सवयीमुळे एकदा आमचे ब्रेकअप झाले होते. अडचण अशी होती की, पैसे कुठे खर्च झाले, हेच आम्हाला समजत नव्हते. यशला नेहमी बाहेर खायची सवय होती. मात्र चांगल्या हॉटेलमध्ये खाणे महाग पडते.

मी यशला विचारले की, त्याला बाहेरचे नेमके काय आवडते? चव, तिथले वातावरण की घरात जेवण बनवण्याचा आळस? त्यानंतर आम्ही दोघांनी खूप विचार करून महिन्याच्या किराणा मालात ‘रेडी टू कूक’ पदार्थांचा समावेश केला, जेणेकरून घरातल्या जेवणाची चव बदलेल आणि जेवण बनवणेही सोपे होईल. एकत्र विचार केल्यामुळे लवकर निष्कर्षापर्यंत पोहोचणे सोपे झाले. जेव्हापासून भांडण विसरून आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत तेव्हापासून वर्तमान आणि भविष्यातील आर्थिक गरजांकडे आम्ही जास्त लक्ष केंद्रित केले आहे.’’

मानसशास्त्रीय दृष्टिकोन?

मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर प्रीती यांनी सांगितले की, आपल्यातील काही गुण सामान्यपणे बाहेर येत नाहीत, पण आर्थिक देवाण-घेवाणीवेळी ते अगदी सहज समोर येतात. म्हणून प्रेमसंबंध पुढे घेऊन जाण्यापूर्वी हे माहिती करून घेणे गरजेचे आहे की, जोडीदाराची जास्त खर्च करण्याची सवय धोक्याची घंटा तर नाही? जसे की, अशा वेळी तुमचा प्रेमी तुमच्या आर्थिक व्यवहारांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करेल किंवा तुमच्या खर्च करण्याच्या किंवा न करण्याच्या प्रवृत्तीवरून तुमचा अपमान करेल.

या सर्वांमागे त्याच्या स्वत:च्या मनोग्रंथी असू शकतात. जेव्हा आपण प्रेमात वेडे होतो तेव्हा आपला स्वत:चा झालेला अपमान आणि योग्य विचार करण्याची क्षमता गमावून बसतो.

‘‘जेव्हा आपण प्रेमात पडतो तेव्हा जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि त्याच्या दोषांकडे दुर्लक्ष करतो.’’ असे डॉक्टर प्रीती यांनी सांगितले.

विरुद्ध आकर्षण

असे म्हणतात की, आपण अशा माणसांकडे आकर्षित होतो जे आपल्यापेक्षा खूप वेगळे असतात किंवा वेगळा स्वभाव, वेगळया विचारांचे असतात. अंतर्मुख लोक बहिर्मुख लोकांकडे आकर्षित होतात, पण जर तुम्ही पैसे वाचवण्यासाठी कामावर घरचा डबा घेऊन जात असेल आणि तुमचा प्रेमी मात्र रोज बाहेरून जेवण मागवून जेवत असेल तर तुमच्या दोघांची बचत कशी होणार?

सुमनच्या प्रियकराला स्वत:चेच लाड करायला आवडतात. त्यामुळे दर महिन्याला चांगल्या पार्लरमध्ये जाऊन फेशियल, पॅडिक्युअर आणि हेअर स्पा करायची त्याला सवय होती. एवढा मोठा खर्च तो तेव्हाच करू शकत होता जेव्हा तो दर महिन्याला त्याच्या क्रेडिट कार्डचे कमीत कमी बिल भरायचा आणि बाकीचे सर्व वाढत जायचे. पण असे कधीपर्यंत चालणार होते? सुमनने हजारदा सांगूनही त्याने स्वत:च्या अशा राहणीमानात बदल न केल्यामुळे अखेर नाईलाजाने सुमनला हे नाते तोडावे लागले.

अशा परिस्थितीचा सामना कसा कराल?

स्टुडंट लोन एक्स्पर्ट शशी मोहन यांना असे वाटते की, जे प्रेमी आपल्या आर्थिक स्थितीबाबत मनमोकळेपणाने बोलतात ते चांगल्या गुंतवणुकीचा पर्याय शोधण्यासाठी सक्षम असतात.

मिळून बनवा अर्थसंकल्प : एकमेकांचे ऐकून, एकमेकांच्या गरजा ओळखून दोघांनी मिळून बजेट तयार करायला हवे. यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. खर्च मर्यादित राहतील आणि तुम्ही भविष्यासाठी बचतही करू शकाल. बजेट बनवण्याची एक चांगली पद्धत आहे ५०/३०/२० बजेट. याचा अर्थ कर कापून गेल्यानंतर उरलेल्या आपल्या कमाईतील ५० टक्के पेक्षा जास्त भाग तुम्ही तुमच्या गरजांसाठी खर्च करणार नाही. ३० टक्के पेक्षा जास्त भाग स्वत:च्या इच्छांसाठी खर्च करणार नाही आणि कमीत कमी २० टक्के भाग वाचवाल.

आर्थिक आराखडा तयार करा : कोणालाही दोष न देता एक असा आराखडा तयार करा जिथे तुम्हाला दोघांना पुढच्या ५-१०-१५-२० वर्षांपर्यंत पोहोचायचे असेल. भविष्यातले तुमचे टप्पे ठरवा आणि त्यानुसार आतापासूनच बचत योजना तयार करा.

मासिक खर्च : काही लोक स्वत:च्या खर्चांवर नियंत्रण ठेवूच शकत नाहीत. मग तो ब्रँडेड घड्याळासाठीचा खर्च असो, किमती पर्ससाठी असो किंवा एखादा महागडा छंद अथवा खेळावर केलेला खर्च असो. अशा वेळी तुम्हाला तुमच्या जोडीदाराला या गोष्टीसाठी तयार करायला हवे की, दर महिन्याला तुमच्या दोघांच्या बँक खात्यात बचत केलेली काही रक्कम जमा व्हायलाच हवी.

तुम्ही ही जमा रक्कम तुमच्या मर्जीप्रमाणे खर्च करा, पण त्यापेक्षा अधिक पैसे तुम्ही खर्च करायचे नाहीत. आईवडील किशोरवयीन मुलाला दरमहा खर्चासाठी काही रक्कम देतात, त्याचप्रमाणे एक ठराविक रक्कम लिफाफ्यात भरून तुमच्या जोडीदाराला द्या. त्यानंतर ते पैसे तो कसा खर्च करतो याकडे अजिबात लक्ष देऊ नका.

याचे ३ फायदे होतील. पहिला फायदा म्हणजे तुम्ही दोघे तेवढी बचत करू शकाल ज्याबद्दल तुम्ही ठरवले होते. तुमच्या खर्चावर नियंत्रण येईल. दुसरा फायदा म्हणजे कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय स्वत:च्या इच्छेनुसार काहीतरी खर्च करता आल्याचे समाधान तुमच्या जोडीदाराला मिळेल. तिसरा फायदा म्हणजे केलेल्या या अतिरिक्त खर्चानंतरही तुमच्या दोघांपैकी कोणालाही काहीच खटकणार नाही किंवा मनात अपराधीपणाची भावना येणार नाही.

पैशांची उधळपट्टी करणारा प्रेमी तुमच्यावर जास्त खर्च करत असल्यामुळे असे करून तो सुरुवातीला तुम्हाला आकर्षित करेल. तुमच्यावर प्रभाव पाडेल. पण जर तुम्ही लग्न करायच्या विचारात असाल तर भविष्यातील चांगल्या जीवनशैलीसाठी तुमच्या बँक खात्यात पैसे असणे गरजेचे असते आणि त्यासाठी खर्चाला थोडासा लगाम लावण्याची गरज असते.

पैशांचं व्यवस्थापन आयुष्याच्या आनंदाची चावी

* धीरज कुमार

आभाचे पती आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करत होते. तिच्या पतींचा कार अपघात झाला. अचानकपणे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. हॉस्पिटलमध्ये सर्वात अगोदर पैशाची गरज लागली. तिने पैसे तसे कधी स्वत:जवळ ठेवलेच नव्हते. सर्व गरजेचं सामान पतीच आणत असत. पैसा पतीच्या बँक खात्यामध्ये होते. तेच सर्व व्यवहार करत होते. परंतु त्यांच्या ऑपरेशनसाठी गरज लागली तेव्हा स्वत: जवळ पैसे असूनदेखील अनेक नातेवाईकांच्या पुढे हात पसरावे लागले.

आभा स्वत:च्या पतीवर एवढी अवलंबून असायची की पतीचा एटीएम कार्डचा पिन क्रमांकदेखील तिला माहीत नव्हता. त्या दिवसात जेव्हा पैशाची खरोखरंच गरज होती,  तेव्हा फोन करून नातेवाईकांना विनंती करून हात पसरावे लागले होते. कसबसं करून पैशांची व्यवस्था झाली आणि त्यानंतर पतींचे ऑपरेशन झालं.

मेहुल सरकारी कंपनीत कंम्प्यूटर इंजिनियर (आऊटसोर्सिंग) या पदावर कार्यरत होते. जवळजवळ ८ वर्षे नोकरी करत होता. अचानक तपासणी केल्यानंतर समजलं की पत्नीला कॅन्सर झाला आहे. घाईगडबडीत पत्नीला इस्पितळात दाखल करावं लागलं. नोकरीच्या दरम्यान कधी बचतीबद्दल विचारच केला नव्हता. जेव्हादेखील पगार मिळत असे पत्नी,  मुलं,  भाऊ,  भाचे आणि आपल्या आई-वडिलांवर मोकळया हाताने पैसे उधळले होते. तसं त्यांचं आयुष्य खूपच समाधानी होतं. जेव्हा पत्नीला कॅन्सरच्या आजाराबद्दल समजलं,  तेव्हा पैसे जुळविण्यात हातपाय कापू लागले. अनेक मित्रांकडून उधार घ्यावे लागले,  काही मित्रांनी उधार देण्यास नकार दिला. जवळच्या नातेवाईकांकडून उधार पैसे घेऊन उपचार करण्यात आले. परंतु पैसे काही वेळेवर जुळवता न आल्यामुळे पत्नीला चांगल्या इस्पितळात उपचार करू शकले नाही. शेवटी तो काही त्यांच्या पत्नीला वाचवू शकला नाही.

मेहुलला या गोष्टीची कायमच रुखरुख लागून राहिली की त्याने मिळालेल्या पगारातून कधी बचतीचा विचारच केला नव्हता. तो व्यवस्थित बचत करू शकला असता. त्याच्याजवळ स्वत:च्या बचतीचे पैसे असते तर पत्नीला चांगल्या इस्पितळात आणि योग्यवेळी उपचार करू शकला असता.

मेहुलला महिन्याला पगारा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नव्हती. अगदी त्याचा पीएफदेखील कापला जात नव्हता. त्यामुळे कर्जदेखील मिळू शकत नव्हतं, कारण कंपनी महिन्याच्या पगाराव्यतिरिक्त कोणतीही इतर सुविधा देत नव्हती. तो भविष्याच्या चिंतापासून दूर राहिला आणि कधी कल्पनादेखील केली नव्हती की भविष्यात अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. आजदेखील अशा प्रकारची अनेक जोडपी आहेत, जी आपल्या नकारात्मक स्थितीकडे कानडोळा करून मनी मॅनेजमेंट म्हणजेच पैशाचं व्यवस्थापन करत नाही आहेत. ते कधी विपरीत परिस्थितीबद्दल विचारच करत नाहीत. ते विचारच करत नाहीत की आयुष्यात एकसारखं कधीच काही चालत नाही. आयुष्यात कधीही उतार-चढाव येऊ शकतात. अशा या काळासाठी तयार राहायला हवं. आपण आयुष्य तर बदलू शकत नाही परंतु सावधानता नक्कीच बाळगू शकतो. पैशाची भविष्यासाठी योग्य व्यवस्था तसेच त्यांच अगोदरच प्लॅनिंग करून जीवन सरळ बनवू शकतो.

आपल्या पार्टनरला आर्थिक माहिती नक्की द्या

पती असो वा पत्नी जर तुम्ही नोकरी करत असाल तर आपल्या साथीदाराला घरची आर्थिक माहिती नक्की द्या. काही चेक एकमेकांसाठी सहीदेखील करून ठेवायला हवे. एकमेकांच्या एटीएमच्या पिन इत्यादीची माहिती पती-पत्नीना नक्कीच असायला हवी. फक्त पतीपत्नीच नाही तर आपल्या मोठया होणाऱ्या मुलांनादेखील याची माहिती द्यायला हवी,  म्हणजे कोणत्याही संकटाच्या दिवसात मुलं येतील त्या संकटाचा सामना सहजपणे करू शकतील. अशा प्रकारे परिवारातील सर्व सदस्यांनी तयार राहायला हवं. शक्य असल्यास पतीपत्नी व मुलांचे जॉइंट अकाउंटदेखील उघडायला हवं,  म्हणजे गरज लागल्यास कोणीही पैसे काढू शकतात.

बचतीची सवय ठेवा

तुम्ही भलेही कितीही कमावत असाल व खर्च करत असाल, तर तेदेखील कमी पडू शकतं. परंतु जर तुम्हाला बचत करायची असेल तर थोडयाशा कमाईतदेखील बचत करता येऊ शकते. थोडे थोडे पैसे साठवून भविष्यासाठी जमा करता येतात. माणसाला आपल्या भविष्याबद्दल काहीच माहिती नसतं, की ते पुढे काय होईल. संकटं काही सांगून येत नाही ती अचानकपणे येतात. म्हणून जसं तुमचं इन्कम आहे तशीच बचत असायला हवी. बचत भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी,  घर बनविण्यासाठी, भविष्यात मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी,  मुलांचं लग्न करण्यासाठी अगोदरपासूनच विचारपूर्वक करायला हवी. या व्यतिरिक्त काही पैसे आकस्मिक खर्चासाठीदेखील ठेवायला हवेत. बचतीची अजूनदेखील अनेक कारणं असू शकतात.

जीवन विमा आवश्यकता

तुम्ही नोकरदार आहात, गृहिणी आहात, शिक्षक आहात वा तुम्ही एखाद्या पदावर कार्यरत असाल तेव्हा तुमचा जीवन विमा नक्कीच काढा. जीवन विमा आयुष्याच्यासोबत आणि आयुष्याच्यानंतरदेखील तुमच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा देतं. जर तुमच्या दरवाजावर विमा विकणारी व्यक्ती आली तर त्यांना फालतू समजून टाळू नका, उलट त्यांच्याजवळ तुमच्या ऐपतीनुसार विमा घेण्याबद्दल बोलणं करा. विमा हा तुम्ही नसताना तुमच्या आश्रित कुटुंबाला सुरक्षा प्रदान करतं. एवढंच नाही तर  आता अनेक प्रकारचे विमादेखील उपलब्ध आहेत. जसं घर, गाडी, आरोग्य इत्यादींसाठी तुमच्या गरज आणि सुविधेनुसार नक्कीच घ्यायला हवं.

तुमच्या गरजा थोडया कमी ठेवा

घरातील जेष्ठ जेव्हा सांगतात की मोकळया हाताने पैसे खर्च करु नका. भविष्यासाठी थोडी बचत करत जा. आताच्या तरुणांना हे आवडत नाही. परंतु त्यांचं असं म्हणणं अगदी शंभर टक्के खरं आहे. भविष्यासाठी पैसे साठवणं खूपच गरजेचे आहे. तुम्ही व्यापारी असा वा नोकरदार व्यक्ती, तुमचा व्यापार वा तुमची नोकरी ज्या दिवशी सुरू होते त्याच दिवसापासून बचतीचादेखील विचार करायला हवा. तुमच्या गरजांना थोडी आवर घाला. तुमच्याकडे जर दोन-चार चांगले कपडे असतील तर विनाकारण डझनभर कपडे ठेवल्याने काय फायदा. जर १-२ खोल्याच्या भाडयाच्या घरात तुमचं चालू शकतं तर उगाच दिखाव्यासाठी मोठा फ्लॅट घेऊन समाजात तुम्ही काय दिखावा करणार आहात.

इन्वेस्टमेंट गरजेची आहे

आजकाल अनेक कंपन्या इन्वेस्टमेंटसाठी काम करत आहेत. शेअर मार्केट, इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंड, ईपीएफ, नॅशनल पेन्शन सिस्टम, रियल इस्टेट, गोल्ड इत्यादींमध्ये इन्वेस्टमेंट तुमच्या सुविधानुसार केली जाऊ शकते. इन्वेस्टमेंटमध्ये चांगला परतवा मिळतो. इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराकडून योग्य माहिती घ्यायला हवी. इन्व्हेस्टमेंट अशी असायला हवी की बचत इत्यादीवर त्याचा कोणताही परिणाम होता कामा नये.

तुमच्या गरजा प्राथमिकता द्या

शेवटी  एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपली जशी गरज आहे त्यानुसार बचत आणि खरेदीसाठी प्राथमिकता द्यायला हवी. जर तुम्ही भाडयाने राहात असाल तर गरजेचं आहे की तुम्ही फ्लॅट घेण्याबाबत विचार करा. जर नोकरी व बिझनेससाठी येण्या जाण्याचा त्रास होत असेल, तर तुम्ही कार खरेदी करण्याबद्दल विचार करत असाल तर घर आणि काम ज्याची पहिली गरज आहे त्यालाच प्राथमिकता द्यायला हवी. समजा मुलाचं लग्न करायचं आहे आणि घरदेखील घ्यायचं असेल तर अगोदर मुला-मुलींचे लग्न करण्याला प्राथमिकता द्यायला हवी. घर बनविणे या गोष्टी नंतर होतील. प्राथमिकता आपल्या गरजेनुसार व्हायला हवी.

फायनान्शियल अॅडव्हायरचा सल्ला

इन्शुरन्स अॅडव्हायझर राजेश कुमार सिंह सांगतात की मनी मॅनेजमेंट खूपच हुशारीने करायला हवं. यामध्ये लहान मोठी चूकदेखील खूप मोठे नुकसान करू शकते. दुसरीकडे हुशारीने पैशाची बचत होईल आणि तेदेखील योग्य जागी इन्वेस्टमेंट केलं तर चांगला लाभदेखील मिळू शकेल. मनी मॅनेजमेंटमध्ये खूपच हुशारीची गरज असते. योग्य प्रकारे केलेलं मनी मॅनेजमेंट कुटुंब आणि स्वत:च्या आयुष्याला आर्थिक सुरक्षेची हमी देतं. मनी मॅनेजमेंट म्हणजे आर्थिक व्यवस्थेसाठी आर्थिक सल्लागाराची मदत नक्कीच घ्यायला हवी. मनी मॅनेजमेंट खूपच विचारपूर्वक करायला हवं, म्हणजे भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. हे सुखद भविष्यासाठी खूपच गरजेचं आहे. जर याचं प्लॅनिंग योग्यप्रकारे केलं तर भविष्याची आधारशीला मजबूत राहील. कुटुंब तसेच स्वत:चे भविष्य सुरक्षित राहील.

जबाबदारी तुमची छंद आमचे

* ऋतू वर्मा

अतुल एका खाजगी रुग्णालयात डॉक्टर होता. महानगरातील राहणीमानाच्या तऱ्हा इतक्या महाग होत्या की त्याला इच्छा असूनही काही बचत करता येत नव्हती. जेव्हा घरच्यांनी लग्नासाठी आग्रह धरायला सुरुवात केली तेव्हा त्याची एकच इच्छा होती की त्याची पत्नीदेखील आर्थिकदृष्टया स्वावलंबी असावी जेणेकरून पुढील आयुष्य सुरळीत चालू शकेल. बघता बघता शोध संपला आणि प्रीती त्याच्या प्रेमाच्या नात्यात बांधली गेली.

प्रीती आल्यावर घर-गृहस्थीचा खर्चही वाढला, पण प्रीतीने घरखर्च किंवा इतर कोणत्याही प्रकारचा खर्च वाटून घेण्यात अजिबात रस दाखवला नाही, परिणामी वाढलेले अनेक खर्च अतुलच्या डोक्यावर आले.

अतुलने प्रीतीला घर-गृहस्थीत हातभार लावण्यास सांगितल्यावर ती रडू लागली. म्हणाली, ‘‘बायकोच्या कमाईवर गृहस्थीचा गाडा चालवणारा तू कसा पुरुष आहेस?’’ प्रितीच्या या वागण्याने अतुलला धक्काच बसला.

पल्लवी आणि सौरभच्या घरचीही अशीच परिस्थिती होती. कर्जाचा हप्ता, मुलांचे शिक्षण आणि घरखर्च ही सगळी जबाबदारी

सौरभची होती, इतकेच काय तर कधी-कधी जर इतर काही खर्च अजून आला तर सौरभला मित्रांकडे कर्ज मागावे लागत असे, पण याचा पल्लवीवर काहीही परिणाम होत नसे. प्रत्येक बायकोचा दृष्टिकोन असाच असेल असे नाही. नितीन आणि ऋचाच्या बाबतीत गोष्ट जरा वेगळीच आहे.

ऋचाच्या नोकरीच्या जोरावर नितीनने पैसे उलट-सुलट व्यवसायात गुंतवले आणि मग ठणठण गोपाल. असे अनेकवेळा घडले. मग ऋचाला वाटू लागले की लग्नानंतर नवऱ्याला बळ देण्यासाठी नोकरी करणे ही तिची सर्वात मोठी चूक होती.

दोघांच्या कमाईवरच गाडी चालणार

आता काळ बदलला आहे आणि जगण्याची पद्धतही बदलली आहे. ती पूर्वीच्या काळाची गोष्ट होती जेव्हा नवरा नोकरी करायचा आणि बायको घर आणि मुलं सांभाळायची. आता महानगरांमध्ये महागाईच्या राक्षसाने इतके भयंकर रूप धारण केले आहे की २ जणांच्या कमाई शिवाय घर-गृहस्थीचा गाडा ओढणे अशक्य आहे.

जबाबदारी अशी वाटून घ्या

तुम्ही आणि तुमचा नवरा दोघेही नोकरी करत असाल तर या गोष्टी जरूर लक्षात ठेवा :

* घर तुम्हा दोघांचे आहे, त्यामुळे जबाबदारी समान वाटून घ्या. संपूर्ण महिन्याचे बजेट बनवा आणि समान योगदान द्या, तुमच्या कमाईवर तुमचा हक्क आहे, पण तुमच्या पगाराची वारंवार धमकी देऊन तुमच्या पतीला कमीपणाची जाणीव करून देऊ नका, घराप्रती त्यांची जितकी जबाबदारी आहे तितकीच ती तुमचीही आहे.

* ज्याप्रमाणे तुम्ही तुमचे छंद पूर्ण करता, त्याचप्रमाणे तुमच्या जोडीदारालाही छंद असतात. पगाराचा किती भाग हा छंद पूर्ण करण्यासाठी खर्च करायचा आणि किती भाग इतर महत्त्वाच्या कामांवर खर्च करायचा हे तुम्ही दोघांनी परस्पर संमतीने ठरविले जाण्याची आवश्यकता आहे.

* आजच्या काळाची मागणी आहे की पती-पत्नीमध्ये आर्थिक पारदर्शकताही असावी, अनेक वेळा पत्नी पतीला आपल्या पगाराबाबत चुकीची माहिती देते असेही दिसून येते. यामागचे मुख्य कारण हे असते की जर पत्नीने आपल्या पगारातून घर चालवले तर पती त्याची सर्व कमाई मित्रांवर किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर उधळेल, जे प्रत्येकवेळी योग्यही नसते.

* अनेक वेळा असेही पाहायला मिळते की पत्नी तिच्या मैत्रिणींचे बघून तिच्या पगाराच्या बाबतीत असुरक्षित राहते, भविष्यासाठी आपला पगार वाचवून ठेवावा असे तिला वाटते. कारण नवऱ्याचा काही भरवसा नसतो, पण जर नवराही असाच विचार करू लागला तर तुम्ही काय कराल? जर नात्यात विश्वासच नसेल तर अशा वैवाहिक जीवनाचा काही उपयोग नाही.

* तुम्ही आजच्या स्त्री आहात जी कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकते. मग जबाबदाऱ्यांना खंबीरपणे सामोरे जा, ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून आधीपासूनच तुमच्या जीवनसाथीबद्दल कोणतेही गृहितक बांधू नका

* तुमचा नवरा कंजूष असो वा शाही खर्च करणारा, पण तुम्ही लग्नाच्या पहिल्या महिन्यात हे ठरवून घ्या की तुम्ही दोघेही पगाराची किती टक्के बचत करणार.

कार्ड हॅकिंगबद्दल सावधगिरी बाळगा

* ममता सिंह

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हजार आणि पाचशेच्या नोटा बंद झाल्यावर लोकांना एटीएम आणि बँकांच्या बाहेर रांगा लावाव्या लागल्या. रोख रकमेच्या कमतरतेमुळे दैनंदिन आयुष्यातील गरजा भागवणं कठीण झालं. अशावेळी ऑनलाइन बँकिंग आणि कार्डद्वारे होणारे व्यवहार वरदान ठरले. पेट्रोल पंपपासून किराणा मालाच्या खरेदीपर्यंत दुकानदारांनी कार्डद्वारे खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. बिल भरण्यासाठी ऑनलाइन बँकिंगची मदत झाली. या कॅशलेस व्यवहारांमध्ये जितका फायदा असतो, तितकीच जोखीमही असते. कारण यावर कार्ड आणि बँक अकाउंट हॅकिंगची टांगती तलवार कायम असेल. त्यामुळे कॅशलेस व्यवहारांमध्ये थोडा जरी हलगर्जीपणा झाला तर त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

हॅकिंग म्हणजे काय?

ऑनलाइन किंवा कार्डने करण्यात येणाऱ्या व्यवहारांमध्ये बऱ्याचदा हॅकर्स फेक वेब पेज आणि कम्प्युटर व्हायरसद्वारे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड डिटेल किंवा ऑनलाइन पासवर्ड चोरतात. याला हॅकिंग म्हणतात. अकाउंट आणि कार्ड डिटेलचं हॅकिंग करून हॅकर्स लोकांच्या बँक खात्यांमधून ऑनलाइन चोरी करतात.

नजर ठेवून असतात हॅकर्स

२०१६ मध्ये देशात बऱ्याच प्रमुख बँकांचे ३२ लाख कार्ड डिटेल्स हॅक झाले होते. यावर तात्काळ पावलं उचलत बँकेने सर्व ग्राहकांचे एटीएम कार्ड्स ब्लॉक केले. दोन आठवड्यांच्या आत सर्व ग्राहकांना नवीन एटीएम कार्ड्स देण्यात आले. पिन बदलेपर्यंत बँकांनी या खात्यांमधून पैसे काढण्याची मर्यादा प्रतिदिन ५००० रुपये केली होती. देशविदेशातील हॅकर्स कायम यावरच लक्ष ठेवून असतात की, कधी ग्राहकांच्या हातून चूक होतेय आणि त्यांना याचा फायदा करून घेता येतोय. यामुळेच नेटबँकिंग आणि कार्डद्वारे करण्यात येणाऱ्या व्यवहारांमध्ये सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

कार्ड किंवा अकाउंट हॅक झालं तर काय कराल?

सायबर लॉ एक्सपर्ट पवन दुग्गल यांच्या सांगण्यानुसार कॅशलेस व्यवहाराच्या वाढत्या प्रमाणासोबतच हॅकिंगच्या घटनाही खूप सामान्य झाल्या आहेत. त्यामुळे अकाउंट किंवा कार्ड हॅक झाल्यास तात्काळ काळजी घ्या आणि पुढील गोष्टी करा.

* हॅकिंगची माहिती तात्काळ बँकेला द्या आणि कार्ड ब्लॉक करण्यास सांगा.

* तुम्ही बाहेर असाल तर संबंधित बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून आपले कार्ड ब्लॉक करण्यास सांगा.

* बँकेला सूचना देऊन आपले कार्ड आणि नेटबँकिंग बंद करा.

* पोलिसांना याची लेखी तक्रार द्या.

* यादरम्यान स्वत: व्यवहार करण्यासाठी चेकचा वापर करा.

* ज्या बँक खात्याचा वापर तुम्ही नेटबँकिंग किंवा कार्डद्वारे व्यवहार करण्यासाठी करता त्यामध्ये जास्त पैसे ठेवू नका.

* क्रेडिट कार्ड होल्डर असाल तर क्रेडिट लिमिट कमी ठेवा, जेणेकरून हॅकिंगच्यावेळी कमीत कमी नुकसान होईल.

बँक करेल भरपाई

हॅकिंगमुळे झालेलं ग्राहकाचं नुकसान भरून काढण्याची जबाबदारी बँकेची असते. जर हॅकिंगमुळे ग्राहकाचं दहा हजार रुपयांचं नुकसान झालं असेल तर ग्राहक बँकेकडे तेवढ्याच रकमेची मागणी करू शकतो. पण त्यासाठी तुमच्याकडे बँकेच्या निष्काळजीपणामुळेच नुकसान झालं हे सिद्ध करणारे पुरेसे साक्षीदार असावे लागतील. बऱ्याचदा ग्राहकांना याची माहिती नसते. त्यामुळे ते हॅकिंगमुळे झालेलं नुकसान भरून देण्याची मागणी बँकेकडे करत नाहीत.

सावधगिरी बाळगा

कार्ड किंवा नेटबँकिंगचा वापर करताना सावधगिरी बाळगा. तुम्ही चुकूनही कधी आपले नेट बँकिंग डिटेल, १६ अंकी कार्ड नंबर, कार्ड व्हॅलिडिटी अवधी आणि कार्डच्या मागे असलेला ३ अंकी सीव्हीव्ही नंबर कोणाला सांगितला तर ती व्यक्ती तुमची सगळी कमाई लुटू शकते.

* आपला एटीएम पिन वेळोवेळी बदलत राहा. हे काम तुम्ही कोणत्याही एटीएममध्ये जाऊन करू शकता.

* कोणत्याही कस्टमर केअरमधून फोन करून कोणीही कार्ड डिटेल विचारत असेल तर त्या व्यक्तिला डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे डिटेल्स सांगू नका.

* लक्षात ठेवा बँक कधीही कोणत्याही ग्राहकाकडून कार्ड डिटेल किंवा पासवर्ड मागत नाही.

* आपला मोबाइल नंबर आपल्या खात्याशी जोडा. त्यामुळे तुमच्या खात्यातून पैसे काढल्यास तुम्हाला तात्काळ मेसेज येईल.

* दर ३ दिवसांनी आपले बँक स्टेटमेंट तपासा. आजकाल या सर्व सेवा ऑनलाइन असल्यामुळे तुम्ही कधीही माहिती मिळवू शकता.

* केवळ आपल्या कार्यालयातील किंवा खासगी संगणकाद्वारेच आर्थिक व्यवहार करा. या दोन्ही ठिकाणी अॅन्टीव्हायरस असेल. दोन्ही सर्व्हर सुरक्षित असतील.

* सायबरमध्ये जाऊन नेट बँकिंग किंवा कार्डद्वारे व्यवहार करणं टाळा. अशा ठिकाणी हॅकिंगचा धोका अधिक असतो.

* आपला नेटबँकिंग पासवर्डही २-३ महिन्यांनी बदलत राहा.

* तुम्ही न केलेल्या व्यवहाराचा मेसेज जर तुमच्या मोबाइलवर आला तर तात्काळ बँकेला कळवा.

* अशावेळी आपल्या कार्डाद्वारे किंवा नेटबँकिंगद्वारे होणारी देवाणघेवाण थांबवा.

* बऱ्याचदा तुम्हाला लॉटरी लागल्याचे इमेल्स येतात. ते पैसे तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी तुमच्या खात्याची माहिती मागितली जाते. असा इमेल्सना उत्तर न देता ते डिलीट करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें