चार हात लांबच बरी

कथा * शालू गुप्ते

शॉपिंग करून बाहेर आले तेव्हा मी उकाड्यानं हैराण झाले होते. समोरच्या शॉपिंग मॉलच्या कॉफी हाऊसमध्ये जाऊन कॉफी घ्यावी अन् काही तरी खावं असा विचार करून मोर्चा तिकडे वळवला. आज मुलांची शाळेची ट्रिप गेली होती अन् माझ्याकडे रिकामा वेळही होता.

पती शशांक सध्या त्यांच्या नव्या बिझनेसमुळे खूपच बिझी आहेत. त्यामुळे मुलं, घरातल्या जबाबदाऱ्या, सासूसासऱ्यांची काळजी घेणं यातच माझा सगळा वेळ संपतो. कित्येकदा वाटतं, स्वत:च्या मनाप्रमाणेही कधी तरी करावं पण जमत नाही. आज मात्र तशी संधी मिळाली होती.

मी ऑर्डर देऊन जरा रिलॅक्स होतेय तोवर फोन वाजला. फोनवर शशांक होते.

‘‘कुठं आहेस?’’ त्यांनी घाईनं विचारलं.

‘‘थोड्याच वेळात घरी पोहोचेन,’’ मी म्हटलं.

‘‘बरं, असं बघ, चार वाजता शिपायाला पाठवतोय, मी टेबलवर जी फाइल विसरून आलोय, ती त्याच्या हाती पाठव,’’ त्यांनी फोन कट केला.

शशांकचं ते कोरडं बोलणं खरं तर मला खटकलं. पण मी स्वत:ची समजूत घातली. ते नक्कीच खूप घाईत असतील. पण तरीही प्रेमाचे दोन शब्द बोलायला तर काहीच हरकत नव्हती.

एके काळी शशांक प्रेमवीराप्रमाणे सतत माझ्याभोवती असायचे. पण नव्या बिझनेसच्या कामाच्या व्यापात बिचारे अगदी कोरडे झाले आहेत. अजून किती दिवस असे जातील कुणास ठाऊक…मी विचार करत होते तेवढ्यात वेटर कॉफी अन् ग्रिल्ड सॅन्डविच टेबलवर ठेवून गेला. मी आपलं लक्ष आता त्यावर केंद्रित केलं.

कॉफीचे दोन घोट घेतेय तोवर ओळखीचं हसू कानावर आलं. वळून बघितलं तर चकित झाले. एका पोक्तशा गृहस्थाबरोबर मानवी बसली होती. आम्ही दोघी कॉलेजात सोबत शिकत होतो.

मानवीला बघून माझं मन एकदम उल्हसित झालं. कॉलेजचे ते फुलपाखरी दिवस पुन्हा आठवले.

खरंच कसले बिनधास्त दिवस होते. आम्ही मुली निर्धास्तपणे कॉलेजात वावरत असू. आमचा एक ग्रुप होता. आम्ही अभ्यासाला कायम महत्त्व दिलं. त्या बरोबरच कॉलेजातल्या इतर अॅक्टीव्हिटीजमध्येही सहभागी होत असू. पण मानवीला मात्र अभ्यासात अजिबात गती नव्हती. तिला फक्त गप्पा, कॅन्टीन, भटकणं, सिनेमा, शॉपिंग एवढंच आवडायचं.

कॉलेजमधले अभ्यासाचे महत्त्वाचे तासही ती सहजपणे बंक करून मुलांबरोबर सिनेमाला निघून जायची. मला ते पटत नसे. आईवडिल आपल्या शिक्षणावर एवढा पैसा खर्च करतात, तर आपण अभ्यास करायला हवा. मानवीला मात्र मुलांना आपल्या नादी लावून झुलवत ठेवायला आवडायचं. एकाच वेळी तिची दोन दोन प्रकरणं सुरू असायची. तिचा हा बिनधास्तपणा मला मानवणारा नव्हता. त्यामुळे मी तिच्यापासून थोडं अंतर ठेवूनच राहायचे.

कधीही तिच्या घरी गेलं तरी ती तोंडाला फेसपॅक लावलेल्या अवस्थेतच सामोरी यायची.

‘‘परीक्षा डोक्यावर आलीए अन् तुला बरे फेसपॅक लावावेसे वाटतात?’’ मी वैतागून म्हणायचे.

‘‘मॅडम, तुमच्यात माझ्यात हाच तर फरक आहे,’’ जोरात हसून म्हणायची,

‘‘विचारांचा मूलभूत फरक…म्हणजे तू अभ्यासासाठी कॉलेजात येतेस, मी मुलांना गटवायला कॉलेज जॉईन केलंय. माझं तर ठाम मत आहे, माया हवी तर, काया म्हणजे देहाची काळजी घ्यावीच लागेल.’’

तिचं हे तत्त्वज्ञान माझ्या मेंदूत शिरत नसे. ज्यावेळी मी अभ्यासासाठी लायब्ररीत बसायचे तेव्हा ती कुणा मुलाबरोबर कॅन्टीनमध्ये असायची.

कॉलेजचे दिवस भराभर संपत होते. आमचा अभ्यास चालू होता. मानवीची प्रेमप्रकरणं रंगत होती. वाहत्या नदीसारखी मानवी सुसाट निघाली होती. कुणीच तिला अडवू शकत नव्हतं. खूप श्रीमंत कुटुंबातली लाडावलेली लेक होती. तिचं वेगळं विश्व होतं. ती नेहमी श्रीमंत मुलांच्याच मागे असायची.

मानवीभोवती मुलामुलींचा चमचेगिरी करणाराही गोतावाळा असायचा. त्यांना फुकटात सिनेमा बघायला मिळायचा. हॉटेलात ट्रीट मिळायची. कधी आलीशान मोटार गाडीतून लिफ्ट मिळायची. ती सर्व तिला त्यावेळी खूप नावाजत असत. आपली प्रशंसा ऐकून मानवीला धन्य धन्य वाटायचं.

शेवटी कॉलेजचे दिवसही संपले अन् सगळ्याच मैत्रीणी इकडे तिकडे पांगल्या. तरीही मानवीची बातमी म्हणजे एखादं नवं प्रेमप्रकरण कधी तरी कानावर यायचंच.

मग तिचं लग्न झाल्याचं कळलं. आता तरी ती थोडं स्थिर आणि चांगलं आयुष्य जगेल असं मला वाटलं. इतकी वर्षं तिचं ते अस्थिर आयुष्य, नवी नवी प्रेमप्रकरणं हे सगळं सभ्य सुसंस्कृत कुटुंबातल्या आम्हा मुलींना विचित्रच वाटायचं.

सगळ्यांचीच लग्न झाली. सासरचं घर. तिथल्या चालीरिती समजून घेणं, माणसांची ओळख होणं, मुलंबाळं वगैरे सर्व रहाटगाडग्यातून फिरताना मी मानवीला साफ विसरले होते.

आज तिला बघून मला वाटलं तिच्यामुळे अजूनही काही जुन्या मैत्रीणींची खबरबात कळू शकते. मी तर इतकी घरगुती गृहिणी झाले होते की जुन्या मैत्रीणींपैकी कुणाचाही संपर्क उरला नव्हता. मानवीच्या मदतीनं मला माझ्या काही जुन्या मैत्रीणींचा ग्रुप पुन्हा तयार करता येईल.

तेवढ्यात मला तो माणूस उठून निघून जाताना दिसला. मानवीही उठून उभी राहिली. मी तिला हाक मारण्याआधीच ती सरळ माझ्याकडे आली, ‘‘अगं, सुमी, तू इथं कशी?’’ तिनं विचारलं.

मी जवळची खुर्ची तिच्याकडे सरकवत म्हटलं, ‘‘थोडी खरेदी करायची होती. ती झाली, आता कॉफी घेतेय.’’

‘‘बाप रे! केवढी लठ्ठ झाली आहेत तू?’’ ती हसत हसत म्हणाली, तेव्हा मलाही जरा ओशाळल्यासारखं झालं. कारण मानवी अजूनही तशीच सुंदर दिसत होती.

‘‘अगं, आता दोन मुलांची आई झालेय…फरक तर पडणारच ना? अन् तुझं कसं चाललंय?’’

‘‘अगं, माझं तर अजून आयुष्यच सेट नाही झालेलं…मुलंबाळं तर फार दूरचा पल्ला आहे.’’

‘‘अगं, तुझं तर लग्न झालं होतं…’’

‘‘छे छे, त्या लग्नाचं नावही काढू नकोस. ते लग्न नाही, एक भूंकप होता माझ्या आयुष्यातला.’’ मानवीनं म्हटलं.

‘‘म्हणजे? नेमकं काय घडलं? नीट सांग तरी.,’’ मी म्हटलं.

‘‘लग्नापूर्वी माझा नवरा विरेंद्र फार मोठमोठ्या बाता मारायचा. मला वाटलं चांगला पैसेवाला आहे म्हणून मी लग्नाला हो म्हटलं. मी आधीपासूनच स्वतंत्र निर्णय घेणारी, मनात येईल ते करणारी, बिनधास्त मुलगी होते, हे तुला ठाऊकच आहे. पण विरेंद्र माझ्यावर खूपच बंधनं घालू लागला. पैसे कमी खर्च कर, क्लबमध्ये जाऊ नकोस…आता क्लबमध्ये रमी खेळताना कधी तरी हरणं, कधी तरी जिंकणं असतंच ना? त्याला म्हणे बिझनेसमध्ये एकदम खूप लॉस आला होता. पण त्याचा माझ्या खर्चाशी काय संबंध? मला त्यानं ठराविक रक्कम द्यायलाच हवी ना? माझ्या पार्लरचाच खर्च महिन्याला २५ हजार असायचा. तोही सासूला खटकायचा,’’ बोलताना ती खूपच उत्तेजित झाली होती.

मी पाण्याचा ग्लास तिच्यापुढे केला. तिनं घटाघटा पाणी पिऊन ग्लास रिकामा केला.

पाणी प्यायलावर ती थोडी शांत झाली. पुन्हा आपली रामकहाणी ऐकवू लागली, ‘‘माझ्या खर्चावरून रोजच कटकट व्हायची. मला ते सहन होईना, शेवटी मी सरळ एका वकील मित्राची मदत घेतली अन् त्याच्यावर सरळ ५० लाख रूपयांचा हुंड्यासाठी छळ करतात म्हणून दावा ठोकला.

‘‘आता त्याला कळेल मानवी म्हणजे काय चीज आहे ते. मी कोर्टात केस करताना त्याच्यावर जी कलमं लावली आहेत ना की बिचारा वर्षांनुवर्षं कोर्टात खेटे घालत राहिल. कर म्हणावं आता खर्च कोर्टाचा,’’ बोलता बोलता मानवीच्या चेहऱ्यावर विकृत हास्य उमटलं.

मानवीच्या स्वभावाचा हा पैलू मला अगदीच नवा होता. मी चकित झाले होते. पण ती मात्र मजेत होती. एखादी शौर्यकथा सांगावी तशी ती आपली कहाणी सांगत होती.

‘‘मानवी, क्लबला जाणं वाईट आहे मी म्हणत नाही, पण नवऱ्याची आर्थिक परिस्थिती जर तेवढीशी चांगली नसेल, तर बायकोनं ते समजून घ्यायला नको का?’’ मी तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला.

‘‘झालीस का तू ही सुरू? जो उठतो तो मलाच सगळं सांगायला बघतो. हे बघ, हे माझं आयुष्य आहे अन् ते कसं जगायचं हे मीच ठरवणार. त्यात कुणाची लुडबुड नकोय,’’ मानवी एकदम आक्रमक झाली, ‘‘खरं तर माझी आईच मला समजून घेऊ शकली नाही…इतरांचं काय म्हणायचं? मला एक सांग, इकडे एकीकडे आपण महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतोय अन् इथं मी माझ्या अधिकारासाठी लढा देतेय तर माझेच पाय मागे ओढताहेत माझीच माणसं,’’ तावातावानं मानवी बोलत होती अन् मी मुकाट ऐकून घेत होते.

मला एवढंच कळलं होतं की मानवी चुकीचं वागतेय. ती तिच्या आईचंच ऐकत नाही तर माझं काय ऐकणार? मी पटकन् तिच्यासाठी एक कप कॉफी मागवली.

कॉफी पिऊन जरा ताजीतवानी झाली ती अन् मग म्हणाली, ‘‘मघा माझ्यासोबत होता ना, त्याचं नाव निकुंज. तो एक अत्यंत प्रसिद्ध वकील आहे,’’ अन् मग डोळा मारून पुढे बोलली, अन् तो बावळा माझ्या एका शब्दावर लाखो रूपये उधळायला तयार आहे.’’

एकदा बोलण्याच्या ओघात त्याला समजलं की माझा नवरा पैशासाठी माझी अडवणूक करतोय तर पटक्न म्हणाला, ‘‘मानवी डियर, नवऱ्याची ही हुकूमशाही कशाला खपवून घेतेस? अगं, तू तर उधाण आलेली नदी आहेस, तुला कोण अडवू शकेल? तुझ्या नवऱ्याची तर तेवढी ऐपतच नाहीए…तो लागतो कोण?’’

‘‘खरं तर मला घटस्फोट हवा होता म्हणून मी या निकुंजला भेटले होते, पण माझं दु:ख ऐकून तो व्यथित झाला. स्वत:हून म्हणाला, ‘‘तुझ्या नवऱ्याला असा स्वस्तात सोडू नकोस. त्याला चांगला कायद्याच्या कचाट्यात अडकवतो. मग बघ, कसा वठणीवर येईल.’’

त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी नवऱ्यावर व सासू सासऱ्यांवर केस केलीए, ‘‘माझी सासू आता गयावया करतेय. पूर्वी तिला माझं पार्लर अन् रमी खेळणं खटकायचं. आता गरीब बापुडवाणी झाली आहे. मला फार मजा येतेय त्यांना छळायला.’’

मानवीचं बोलणं ऐकून मी खरोखर हतबुद्ध झाले. मला तिच्या न बघितलेल्या नवऱ्याची अन् सासूसासऱ्यांची दया आली. त्या निकुंजचा रागही आला.

‘‘बराय, मी निघते, मला उशीर झालाय…’’ मी म्हटलं. सामान घेऊन मी उठले.

‘‘चल, निघूयात, मला आता ब्यूटी पार्लरला जायचंय. रात्री निकुंजबरोबर डिनर ठरलाय,’’ पुन्हा मला डोळा मारत ती म्हणाली, ‘‘आज निकुंजनं फाइव्ह स्टार हॉटेलात रूम बुक केली आहे. तो मला इतकं मिळवून देतोय तर मीही त्याला काही द्यायला हवं ना? पण हो, मी तुझ्याकडे परवा येते. तुझ्या मुलांना भेटते. मी त्यांची मावशी आहे ना?’’ तिनं आपला मोबाइल काढला.

मी चक्क खोटं बोलले, ‘‘माझा मोबाइल हरवलाय. तो नंबरही आम्ही ब्लॉक केलाय. नवा फोन आला की भेटूयात,’’ मी घाई घाईनं तिथून बाहेर पडले.

छे गं बाई यापुढे कधीच मी मानवीला भेटणार नाहीए. अशी विकृत स्वार्थी अन् नीतिहीन माणसं काहीही करू शकतात. ती चार हात लांबच असलेली बरी…

समोरून आलेल्या पहिल्याच रिक्षाला हात करून मी आत बसले. मानवीपासून लवकरात लवकर मला दूर जायचं होतं.

आजी बदलली आहे

कथा * ऋतुजा सोनटक्के

गेली पंधरा वर्ष आम्ही अमेरिकेत राहतोय. इथल्या नोकरीमुळे आम्ही जणू इथलेच झालो आहोत. तीनचार वर्षांनी एकदा आम्ही आईबाबांना भेटायला भारतात जात असू. मुलंही आता इथंच रूळलीत. अनेकदा मी नवऱ्याला म्हटलं, ‘‘आपण आता कधीच भारतात जाऊन राहणार नाही का?’’ तो म्हणाला ‘‘अशी नोकरी तिथं मिळत नाही अन् तिथली नोकरी आपल्याला आवडत नाही, म्हणजे शेवटी आपल्याला इथंच राहणं आलं,’’ तर आम्ही दोघं आपापल्या नोकऱ्या करतोय.

मला आईवडिल नाहीत. नवऱ्याच्या म्हणजे आकाशच्या आईबाबांना मी आईबाबाच म्हणते. ती दोघं भारतात असतात. माझी एकुलती एक नणंद आशूही मुंबईत असते. तिचा नवरा मर्चंट नेव्हीत असतो. तिच्या दोघी मुलींसह ती आईबाबांच्या फ्लॅटच्या शेजारीच असते. ती त्यांची काळजी घेते. यामुळे आम्हीही निर्धास्त असतो. पण आम्हाला असं वाटतं की आता आईबाबांनी तिथं एकटं राहण्यापेक्षा आमच्याकडे येऊन राहावं.

पण त्यांचं एकच म्हणणं आहे की इथल्या घराचे बंध तुटत नाहीत. अन् अमेरिकेत आम्हाला आवडणार नाही. तिथं फारसे भारतीय नाहीत, भाषेचा एक मोठा अडसर आहेच. पण आशूताईनं त्यांना समजावलं की अमेरिकेत आता खूप भारतीय राहतात. शिवाय थोडे दिवस राहिलात तर भाषाही समजते, बोलता येते. मग ती दोघं आमच्याकडे यायला तयार झाली. आकाश भारतात गेला, आईबाबांचा फ्लॅट विकायला काढला. नाही म्हटलं तरी तो फ्लॅट विकताना आईबाबांना वाईट वाटलं. तिथल्या एकेका वस्तूवर त्यांचा जीव होता. अत्यंत कष्टानं त्यांनी संसार जमवला होता.

पण त्याचवेळी आयुष्याचे उरलेले दिवस आपण नातवंडांसोबत घालवू ही गोष्ट उमेद देत होती. दोनच महिन्यात सगळं काही मार्गी लावून आशुताईचा निरोप घेऊन आईबाबा आमच्याकडे अमेरिकेत आले. आशुताईलाही फार वाईट वाटत होतं. कारण आता भारतात तिलाही कुणाचा आधार नव्हता. मनातलं सांगायला आईएवढं हक्काचे कोण असतं?

माझी मुलं अक्षय आणि अंशिका यांना भेटून आईबाबा सुखावले. मुलंही आपल्या परीनं त्यांच्याशी जुळवून घेत होती. आईंना मुलांचे इंग्रजी एक्सेंट समजत नसत, पण खाणाखुणा करून त्यांचं संभाषण चालायचं. त्यांना इथं बरं वाटावं म्हणून मी बरीच मराठी, हिंदी पुस्तकं व मासिकं ऑनलाइन मागवून घेत होते. हळूहळू इथल्या वेळापत्रकाप्रमाणे त्यांनाही जमवून घेता आलं.

एक दिवस मी म्हटलं, ‘‘आई, इथं संध्याकाळी काही भारतीय बायका एकत्र जमतात. आपल्याकडे कसा कट्टा असतो, कट्टयावरच्या गप्पा असतात, तसंच! काही तर तुमच्या वयाच्या अन् मुंबईत राहून आलेल्याही आहेत. आज सायंकाळी आपण तिकडे जाऊ, तुमची ओळख करून देते मी. काही मैत्रीणी मिळाल्या की तुमचीही संध्याकाळ मजेत जाईल.’’

आई कबूल झाल्या. मग मी सायंकाळी त्यांना घेऊन कट्टयावर गेले. रूपा मावशी, विनिता मावशी, कमल मावशी अन् लीला मावशींशी ओळख करून दिली. त्या सर्व आईंच्याच वयाच्या होत्या. त्यांनी आनंदानं, प्रेमानं आईंचं स्वागत केले. रूपा मावशी म्हणाल्या, ‘‘आमच्या या कट्टयावर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता आपण रोज भेटूयात. कट्टयावरच्या गप्पांमध्ये, आपल्या वयाच्या आणखी एक सभासद आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे.’’

त्यानंतर आई रोजच त्या सर्वांसह बागेत जाऊ लागल्या. तिथं त्यांचे दोन तास अगदी मजेत जायचे. आता त्यांना इथं राहणंही आवडू लागलं. बाबांनाही इथं मित्र भेटले होते. त्यांनाही इथं आवडत होतं. सकाळी पायी फिरून येणं, सायंकाळी कट्टा, दुपारी वाचन वामकुक्षी व मला स्वयंपाकात मदत करण्यात आईंचा दिवस भर्रकन् संपायचा. रोज सायंकाळी घरी आल्यावर त्या मला तिथं काय काय गप्पा झाल्या ते सांगायच्या. एक दिवस मात्र त्यांचा मूड जरा नीट नव्हता. वालाच्या शेंगा मोडता म्हणाल्या, ‘‘आज रूपा सांगत होती इथं एक भारतीय जोडपं आहे. त्यातला पुरूष नपुंसक आहे. त्याच्या बायकोचं तिच्या ऑफिसमधल्या कुणाशी तरी सूत आहे म्हणे.’’

‘‘आई, इथं अशा गोष्टी सर्रास घडतात. फार कुणी त्यावर चर्चा करत नाही. मी ओळखते त्या दोघांना…दोघंही सज्जन आहेत.’’ मी म्हटलं.

‘‘डोंबलाचे सज्जन, अगं नवरा असताना बाईनं दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवायचे हे काय सज्जनपणाचं लक्षण म्हणायचं का?’’ आई चिडून बोलल्या.

मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते. त्यांच्या पिढीला अन् भारतात तर हे सगळं भलतंच, अपवित्र किंवा पाप वाटणार. अर्थात् भारतात लपूनछपून अशा गोष्टी घडत असतातच. उघड झालं तर मात्र कठीण असतं. पण आपल्याकडेही रखेल, देवदासी, अंगवस्त्र बाळगणारे लोक होतेच की! श्रीमंत लोक तर उघड उघड हे करायचे. श्रीमंतांना अनेक गोष्टींची मुभा असते. एरवी लपून छपूनही लोक भानगडी करतात. इथं मात्र (म्हणजे अमेरिकेत) सगळं उघड असतं. लोक मोकळेपणानं अशी नाती स्वीकारतात. पण हे आईंना कुणी समजवायचं? मी गप्प बसले. त्यांच्यासोबत शेंगा मोडू लागले. विषय बदलला अन् वेगळ्याच विषयावर आम्ही बोलू लागलो.

आता आईंनाही बऱ्यापैकी इंग्रजीत बोलता येऊ लागलं. त्यामुळे मुलांशी त्या खूप गप्पा मारायच्या. मुलांनाही त्यांच्याकडून भारतातल्या गमतीजमती ऐकायला आवडायचं. आईची मला घरकामात खूप मदत व्हायची. इथं नोकरचाकर हा प्रकारच नसतो. सगळं स्वत:च करायला लागतं. आईंची घरकामतली मदत मला मोलाची वाटायची.

आता त्या इथं छानच रूळल्या होत्या. दर महिन्याला एकदा सगळ्या मैत्रिणी मिळून रेस्टारंण्टमध्ये जायच्या. एकत्र जमायच्या. तेव्हाही प्रत्येकीनं काहीतरी नवा पदार्थ करून आणायचा. आईंना ही कल्पना आवडली. त्या सुरगण होत्या. त्यांनी केलेला पदार्थ नेहमीच भरपूर प्रशंसा मिळवायचा. आता त्या सलवार सूट वापरायला लागल्या होत्या. नवी पर्स, मॅचिंग चप्पल वगैरेची त्यांना मजा वाटत होती. लिपस्टिकही लावायच्या. कधी कधी पत्ते नाही तर एखादा वेगळाच खेळ असायचा. एकूण त्यांचं छान चाललं होतं.

एकदा मी ऑफिसातून परतले, तेव्हा त्या ही त्यांच्या कट्टयावरून घरी परतल्या होत्या. माझी वाट बघत होत्या. त्यांना काहीतरी मला सांगायचं होतं. मी घरात आले तशी पटकन् दोन कप चहा करून त्या माझ्याजवळ येऊन बसल्या.

‘‘काय म्हणतोय तुमचा कट्टा?’’

‘‘बाकी सगळं छानच आहे गं, पण काही गोष्टी मात्र फारच विचित्र असतात इथं. आज तर स्पर्म डोनेशनचा विषय होता चर्चेला. जर एखाद्या पुरुषाला शुक्राणू (स्पर्म) पुरेसे किंवा सशक्त नसल्यामुळे मूल होत नसेल तर त्याच्या बायकोच्या गर्भाशयात दुसऱ्या कुणाचे तरी शुक्राणु ठेवून गर्भ तयार करतात किंवा एखाद्या स्त्रीला गर्भाशयाच्या दोषामुळे पोटात मूल वाढवता आलं नाही तर ती आपलं मूल भाड्याचं गर्भाशय घेऊन (दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ ठेवून) मूल जन्माला घालू शकते. शी शी काय हा अधर्म? घोर कलियुग गं बाई!!’’

मी शांतपणे म्हटलं, ‘‘पण जर मूल हवं म्हणून अशी मदत घेतली तर त्यात वाईट काय आहे?’’

‘‘पण ज्या मातेच्या गर्भात ते मूल वाढेल, तिचेच गुणधर्म, दोष वगैरे घेऊन बाळ जन्माला येईल ना? मग ते मूल स्वत:चं कसं म्हणायचं?’’

यावेळी वाद वाढवण्यात अर्थ नव्हता. मी बोलण्याचा विषय बदलायचा प्रयत्न केला, पण आई अजूनही तणतणत होत्या. ‘‘कसला देश आहे…अन् कसली माणसं आहेत. काही संस्कृती, संस्कार यांना नाहीतच जणू. यापुढची पिढी अजून काय काय करेल, कुणास ठाऊक?’’

माझ्या अमेरिकन झालेल्या मुलांना आजीचं हे वागणं, बोलणं फारच मागासलेलं, बुरसटलेलं वाटत होतं. ‘‘ममा, आजी असं का बोलते? जो तो आपला स्वतंत्र आहे ना आपल्या पद्धतीनं वागायला?’’ लेकीनं मला हळूच म्हटलं.

‘‘हो गं! पण आजी आताच भारतातून आली आहे ना, तिला हे सगळं विचित्र वाटतंय.’’ मी लेकीची समजूत घातली.

बघता बघता तीन वर्षं उलटलीसुद्धा. आईंना एकदा भारतात जाऊन आशाताईंना भेटायची फार इच्छा झाली होती. मुलांनाही सुट्या होत्या. मी त्यांची तिकिटं काढून दिली. बाबांना इथंच त्यांच्या मित्रांचे वाढदिवस असल्यामुळे मुंबईला जायचं नव्हतं. ते इथंच राहणार होते.

आई आणि मुलं आल्यामुळे आशुताईला खूप आनंद झाला. गेली तीन वर्षं ती ही फार एकटी पडली होती. आशुताईनं मुलांसाठी, आईसाठी खूप कार्यक्रम ठरवून ठेवले होते. रोज सगळी मिळून कुठं तरी भटकायला जायची. रोज घरात नवे पदार्थ केले जायचे. मुलांच्या आवडीनिवडी, कोडकौतुक पुरवताना आशुताईला खूप आनंद वाटायचा. निशांत म्हणजे माझे मेव्हुणे, आशुताईचा नवरा शिपवरच असायचा. आपल्या दोन मुलींना तर आशुताईनं एकटीनंच वाढवलं होतं. अर्थात निशांत पूर्ण क्रेडिट आशुताईना द्यायचा.

एकदा रात्री आईंना थोडं बेचैन वाटायला लागलं म्हणून त्या आपल्या खोलीतून बाहेरच्या हॉलमध्ये सोफ्यावर येऊन लवंडल्या. रात्री माझी व आशुताईची मुलं एकाच बेडरूममध्ये झोपत होती. एक खोली आईंना दिली होती. एक खोली आशुताईची होती. आईंना झोप येत नव्हती.

तेवढ्यात आशुताईच्या खोलीचं दार उघडलं. एक तरूण पुरुष खोलीतून बाहेर पडला. त्याला सोडायला गाऊनमध्येच असलेली आशुताईही खोलीबाहेर पडली. जाता जाता त्यानं आशुताईना पुन्हा मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं अन् बाय करून तो निघून गेला.

आपली आई सोफ्यावर बसली आहे हे आशुताईला ठाऊकच नव्हतं. तो पुरुष निघून गेला अन् आईंनी ड्रॉइंगरूमचा दिवा लावून जोरानं विचारलं, ‘‘कोण आहे हा? तुला असं वागणं शोभतं का? तुझा नवरा इथं नाही, तुझ्या मुली मोठ्या होताहेत…’’

‘‘आई, जाऊ दे…तुला कळायचं नाही,’’ आशुताईनं म्हटलं.

आईचा पारा चढलेलाच होता. ‘‘मला कळायंचं नाही का? तुझी अक्कल शेण खायला गेली आहे, माझी नाही,’’ आईनं ताबडतोब फोन लावून अमेरिकेत माझ्या नवऱ्याला ही बातमी दिली.

क्षणभर तर आकाशही भांबवला. मग म्हणाला, ‘‘आई, तू आशुताईला काही बोलू नकोस, मला आधी सगळं प्रकरण समजून घेऊ दे.’’

‘‘तुम्ही ताबडतोब इथं या. मी काय म्हणते ते कळेल तुम्हाला.’’ आईंनी रागानं फोन आपटला.

दुसऱ्याचदिवशीची तिकिटं मिळवून आम्ही दोघं भारतात आलो. आम्हाला बघून आशुताई खूपच घाबरली. त्या दिवशी आम्ही काहीच बोललो नाही. मग दुसऱ्या दिवशी आम्ही तिच्यापाशी हा विषय काढला. ती जे सांगत होती ते फार विचित्र होतं. ती सांगत होती,

‘‘दादा, तुला ठाऊक आहे. आमचं लग्नं आम्हा दोघांनाही न विचारता ठरवलं गेलं. मर्चंट नेव्हीच्या नोकरीमुळे निशांत सहा महिने बोटीवर असतो. त्या काळात त्याचे अनेक मुलींशी संबंध येतात. इथं तो येतो तेव्हाही त्याला माझ्यात फारसा इंटरेस्ट नसतो. तो घरातला कर्ता पुरुष म्हणून कर्तव्य पार पाडतो. आमच्या दोन मुलींसाठी खरं तर आम्ही एकत्र आहोत. हा फ्लॅट मला घेऊन दिलाय. घर खर्चाला भरपूर पैसाही देतो. मुलींना काही कमी पडू देत नाही, पण आमच्यात पतिपत्नी म्हणून तसा संबंध नाही.

मी त्याला या बाबतीत विचारलं तर तो म्हणतो तू पूर्णपणे स्वतंत्र आहेस, तुला हवं तर तू घटस्फोट घे. इतर कुणाशी संबंध ठेवायचे तर ठेव. फक्त बाहेर या गोष्टीची चर्चा व्हायला नको. बाहेरच्या जगात आम्ही पतिपत्नी आहोत. पण तशी मी एकटी आहे. मुलींना सोडून कुठं जाऊ? डिव्होर्स घेतला तर मुलींच्या लग्नात अडचण येऊ शकते. पण मलाही प्रेम हवंय. शरीराची ओढ काय फक्त पुरुषालाच असते? स्त्रीला शरीरसुख नको असतं?’’

आशुताई एवढं बोलतेय तोवर आईंनी तिच्या थोबाडीत मारलं. ‘‘लाज नाही वाटत असं बोलायला,’’ त्या ओरडल्या.

आकाशनं आईचा हात धरून तिला बाजूला घेतलं. ‘‘आई, शांत हो, मला आशुशी एकट्याला बोलू दे,’’ आकाश शांतपणे म्हणाला. त्यानं आईला तिच्या खोलीत नेलं.

आता आशुच्या खोलीत आम्ही तिघंच होतो. आशु सांगत होती, ‘‘इथं ही आकाशचे दोन तीन मुलींशी संबंध आहेत. त्यातली एक तर विवाहित आहे. तिच्या नवऱ्यालाही हे माहीत आहे. काल माझ्याकडे आलेला तरूण डायव्होर्सी आहे. एकटाच राहतो. आम्ही दोघं एकटेपणातून एकमेकांच्या जवळ आलो. निशांतला हे ठाऊक आहे. त्याला याबद्दल ऑब्जेक्शन नाही. फक्त हे सगळं चोरून घडतं. बाहेर कुणालाही काहीही ठाऊक नाही. तसं मुंबईतही कुणाला कुणाशी काही देणंघेणं नसतं. वेळही नसतो, तरीही समाजाची भीती असतेच,’’ बोलता बोलता आशुताई रडायला लागली.

मी तिला जवळ घेत म्हटलं, ‘‘ताई, तुम्ही, काळजी करू नका, आपण यावर नक्की तोडगा काढू. फक्त विचार करायला थोडा वेळ द्या.’’

आम्ही दोघं तिथून उठलो अन् बागेतल्या बाकावर येऊन बसलो. ‘‘आशुताई सांगते आहे ते जर खरं असेल तर यात तिचा काय दोष? पुरुषानं हवं तिथून शरीरसुख मिळवायचं अन् त्याच्या बायकोनं मात्र घुसमट सहन करायची हा कुठला न्याय?’’ मी म्हटलं.

आकाशनं मान हलवून संमती दर्शवली. तो म्हणाला, ‘‘तुझं म्हणणं खरंय, पण आईला कसं पटवून द्यायचं? ती तर आशुलाच दोष देणार?’’

मीही विचार करत होते ताई म्हणाली ते खरंय, स्त्रीच्याही शारीरिक गरजा असतातच ना? जर नवरा तिची शारीरिक भूक भागवू शकत नसेल तर तिनं काय करावं? खरं तर यात आशुची काहीच चूक नाही. समाजानं पुरुषाला झुकतं माप दिलंय म्हणून तो हवंय ते करेल का? जर तो शेजारी अन् आशू स्वखुषीनं एकत्र येताहेत तर हरकत काय आहे? जगात असे किती तरी लोक असतील.

‘‘आकाश, आपण आईंना समजावून बघूयात. प्रयत्न तर करायलाच हवा,’’ मी म्हटलं. तोही कबूल झाला.

शेवटी आम्ही आई व मुलांना घेऊन परत अमेरिकेत आलो आणि निशांत बोटीवरून घरी परतल्यावर पुन्हा लगेच मुंबईला आलो. आकाशनं निशांतला एकूण परिस्थितीबद्दल विचारलं, तेव्हा त्यानं खरेपणानं आपल्या इतर संबंधांबद्दल कबूली दिली. ‘‘मी आशुपासून काहीही लपवलेलं नाही अन् तिलाही मी पूर्ण मोकळीक दिली आहे. फक्त आम्ही या गोष्टी आमच्यातच ठेवल्या आहेत. बाहेर हे कुणाला माहीत नाही. आकाश, तू अमेरिकेत राहतो आहेस, तुलाही यात काही प्रॉब्लेम वाटतो का?’’

‘‘प्रश्न माझा नाहीए. आईचा आहे. तिला कसं पटवून द्यायचं?’’

‘‘मी बोलेन त्यांच्याशी, उद्याच बोलतो.’’ निशांत म्हणाला.

दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट आटोपल्यावर निशांत आईजवळ बसले, ‘‘आई, मला ठाऊक आहे तुम्ही माझ्यावर अन् आशुवर फार चिडला आहात. तुमचा रागही बरोबरच आहे. पण तुम्हीही जाणता की आमचं लग्न आमची संमती न घेताच तुम्ही मोठ्यांनी ठरवलंत. समाजाच्या रिवाजानुसार लग्न झालं, पण आम्ही दोघंही एकमेकांना अनुरूप नव्हतो, पुरक नव्हतो. आम्ही प्रयत्नही केला. पण कुठंतरी काही तरी बिनसलं हे खरं. निसर्ग नियमानुसार आम्हाला मुलंही झाली. म्हणजे संतानोत्पत्ती हा लग्नाचा उद्देश तर सफल झाला. पण आम्ही दोघंही संतुष्ट नव्हतो. पतिपत्नी म्हणून जी एकरूपता असावी ती आमच्यात नव्हती. कदाचित माझी भूक जास्तच असेल…त्यातून नोकरीमुळे मी सहा महिने घराबाहेर असतो. अशावेळी शरीराची गरज भागवायला मला दुसरा आधार शोधावा लागला. आशुलाही त्याच भावना आहेत. मी सुख भोगणार अन् माझी पत्नी इथं तळमळणार हे मला मान्य नाही. मीच तिला पूर्ण मोकळीक दिली आहे. तिला पूर्णपणे सुखावू शकेल अशा पुरुषाशी तिनं संबंध ठेवायला माझी हरकत नाही. त्यामुळे आम्ही दोघंही सुखी होतो अन् आमचे आपसातले संबंधही चांगले राहतात. एकमेकांविषयी आमच्या मनांत राग, द्वेष, संताप नाही…’’

आई अजूनही रागातच होती. निशांतलाही ते समजलं. त्यानं अत्यंत प्रेमानं अन् आदरानं आईचा हात आपल्या हातात घेतला, ‘‘आई, मला कळंतय, या गोष्टींमुळे तुम्ही खूप दुखावला आहात. तुम्हाला खूप रागही आला आहे. पण मला एक सांगा, एखाद्या जिवंत माणसाच्या आनंदापेक्षा निर्जीव रीतीरिवाज किंवा नियम कायदे महत्त्वाचे आहेत का? अन् या गोष्टी पूर्वीही घडतंच होत्या. अगदी आपल्या महाभारतातही असे दाखले आहेतच ना?’’

एवढं बोलून निशांतने इंटरनेटमधून डाऊनलोड केलेले महाभारतातले प्रसंग सांगायला सुरूवात केली. ‘‘पांडूला एका ऋषीनं शाप दिल्यामुळे तो पत्नीशी रत होऊ शकत नव्हता. पण त्याला पुत्र हवा होता, तेव्हा त्याची पत्नी कुंतीनं तिला मिळालेल्या वराचा उपयोग करून वेगवेगळ्या देवांकडून पुत्रप्राप्ती करून घेतली. महाभारतातली पांडवांच्या जन्माची कथा काय सांगते? तिथंही नवऱ्याखेरीज इतर पुरुषांची मदत घेतली गेली ना?’’

महाभारतातच द्रौपदीची कथा आहे. द्रौपदीला पाच पती होते. कारण आईनंच पाचही भावांना तिला वाटून घ्यायला सांगितलं होतं. अर्जुनाला सुभद्रा आवडली अन् तो तिला पत्नी म्हणून घेऊन आला. भीमाला हिंडिंबेपासून घटोत्कच नावाचा मुलगा होता. धृतराष्ट्र राजाचा मुलगा युयुत्सु तर म्हणे एका वेश्येपासून झाला होता.

आता तुम्हीच बघा, तुम्ही रोज महाभारत वाचता, अगदी श्रद्धेनं वाचता. त्यातला खरा अर्थ तुम्हाला लक्षात आलाय का? आयुष्य स्वेच्छेनं, आनंदात घालवा. हसतखेळत घालवा. फक्त एकच लक्षात ठेवा की तुमच्या सुखासाठी दुसऱ्याला त्रास होता कामा नये, तुमचं सुख दुसऱ्याला दु:ख देऊन मिळवलेलं नसावं आणि कुणी कुणावर बळजबरी करू नये. असा साधा संदेश हे ग्रंथ देतात ना?

मग आज आम्ही, म्हणजे मी आणि आशु जर परस्पर सहमतीनं आमचं सुख मिळवतो आहोत तर त्यात गैर काय आहे? मी इथं नसताना तिनं मुलींना उत्तमरित्या एकटीनं वाढवलं, याचं मला कौतुक आहे, तिच्याविषयी अभिमान आहे. मी बोटीवर अत्यंत धोकादायक परिस्थितीत राहतो. मुबलक पैसा मिळवताना मला सतत धोक्यांना सामोरं जावं लागतं. याबद्दल आशुच्या मनात माझ्याबद्दल कौतुक आणि आदर आहे. आम्ही पतिपत्नी म्हणून नाही तर चांगले मित्र म्हणून राहतोय. यात चुकीचं काय आहे? आता तुम्ही समाजाचे नियम म्हणाला तर हे नियम केले कुणी? ज्यांनी कुणी हे नियम केले त्यांना समाजातला वेश्या व्यवसाय दिसत नाही? राजरोसपणे चालणारा शरीराच्या सौदेबाजार त्यांना खटकत नाही? हे नियम करणारे पुरुष असतात, स्वत:साठी पळवाटा काढतात अन् स्त्रियांना मात्र दु:खाच्या खाईत लोटतात. स्त्रियांना का हक्क नसावा हवं ते सुख मिळवण्याचा? नियम सर्वांसाठी सारखे असावेत. त्यात स्त्री पुरूष असा भेदभाव कशासाठी? अन् मी तर म्हणतो त्रासदायक ठरतील असे नियम, कायदे, कानून नसावेतच म्हणजे माणूस मुक्तपणे जगेल. नाहीतर मग चोरून लपवून काम करेल.’’

आई आपल्या जावयाचं बोलणं ऐकून स्तब्ध झाल्या होत्या. नि:शब्द बसून होत्या. तिथंच बसलेली आशूताई गदगदून रडत होती. निशांतने उठून तिला मिठीत घेतलं. थोपटून  शांत शांत करत म्हणाला, ‘‘आशू, रडू नकोस, तुझं काहीही चुकलेलं नाहीए. माझ्याकडून  तुला पूर्ण मोकळीक आहे. तू तुझा आनंद मिळव.’’

खरं तर आईंना हे सगळं पचवायला जडच जात होतं पण निशांत आणि आशुताईंचे उजळलेले चेहरे बघून आम्ही ही सुखावलो होतो. वातावरणातला ताण कमी झाला होता.

आईंनी आशुताईला म्हटलं, ‘‘पोरी, मला क्षमा कर, फार वाईट वागले मी तुझ्याशी,’’ आशुनं आईला मिठीच मारली.

निशांतनं ज्या धीरगंभीरपणे अन् हुषारीने सर्व परिस्थिती हाताळली, त्याला तोड नव्हती. त्याच्या स्वच्छ मनाचं, प्रामाणिकपणाचं अन् समजावून सांगण्याच्या कसबाचं आम्हाला कौतुक वाटलं.

आकाश म्हणाला, ‘‘मला आता भूक लागलीये. आज आपण जेवण बाहेरूनच मागवू, निशांत जेवण ऑर्डर करतोस का?’’

निशांतनं लगेच विचारलं, ‘‘आई, पहिला पदार्थ तुम्ही सांगा?’’

वातावरण निवळलं. आम्ही आईंना घेऊन अमेरिकेत परत आलो. आता आईंना अमेरिकेतल्या गोष्टी विचित्र वाटत नव्हत्या. त्यांनी इथलं कल्चर समजून घेतलं होतं. मुलंही म्हणत होती, ‘‘आजी, आता बदलली आहे बरं का!’’

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें