* प्रियंका यादव
प्रत्येकाला वयाच्या २४व्या वर्षी चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, असे वाटत असते. पण, तुम्ही पलंगावर लोळत पडला असाल तर तुम्हाला चांगला पगार मिळणार नाही. चांगला पगार तर दूरच, तुम्हाला चांगली नोकरीही मिळणार नाही. त्यामुळे अंथरूण सोडून ध्येयाच्या दिशेने धाव घ्या, तरच तुम्ही भरघोस उत्पन्नाचे मोठे, ऐशीआरामी आयुष्य जगू शकाल.
याउलट, आळसामुळे तुम्ही अंथरुणावर पडून राहिलात तर तुम्हाला कधीही ऐशोआराआमाचे जीवन जगता येणार नाही. तुमच्या मित्रांना असे आयुष्य जगताना पाहून तुम्ही तुमचे डोकं खाजवत बसाल आणि स्वत:ला दोष देत बसाल की, आपणही वेळीच अशी मेहनत करायला हवी होती. त्यामुळे झालेल्या चुकीबद्दल पश्चात्ताप करण्याची वेळ येण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला वेळेत कठोर परिश्रम करण्याचा सल्ला देतो. जर तुम्ही ध्येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम केले तर तुम्ही तुमची स्वप्नं तर पूर्ण करालच सोबतच प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे खरेदी करण्यास देखील सक्षम असाल.
जर तुम्ही मेहनत करत असाल तर यश नक्कीच तुमच्या पायांवर लोळण घेईल. मधुरिमा चतुर्वेदी ही याचेच ज्वलंत उदाहरण आहे. मधुरिमा ३६ वर्षांची आहे. ती व्यवसायाने डेटा विश्लेषक असून गाझियाबादच्या इंदिरापूरम सोसायटीत राहाते. आज मधुरिमाकडे स्वत:च्या कमाईतून घेतलेली २ घरं आहेत. तिने स्वकमाईतून एक मर्सिडीजही घेतली आहे. पैसे कसे कमवायचे, हे तिला माहीत आहे, म्हणूनच तिने शेअर बाजारातही गुंतवणूक केली आहे.
मेहनत तर करावीच लागेल
मधुरिमा जन्मजात श्रीमंत होती, असे मुळीच नाही. तिने लहानपणी खूप संघर्ष केला. मधुरिमाच्या लहानपणीच तिच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले. आईने कशीबशी छोटी-मोठी नोकरी करून मधुरिमाला वाढवले. सरकारी शाळेत शिकलेली मधुरिमा अभ्यासात खूप हुशार होती. तिला हे चांगलंच माहीत होतं की, स्वत:ला बदलायचं असेल तर खूप मेहनत करावी लागेल.
मधुरिमाने तिच्या संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक बनवले होते. दहावीपासूनच तिने करिअरच्या नियोजनाला सुरुवात केली. तिला माहीत होते की, भविष्य घडवायचे असेल तर तिला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे लागेल.
१२वी उत्तीर्ण होताच मधुरिमाने इंटर्नशिप सुरू केली. समाजातील लोक तिच्याबद्दल वेड्यावाकड्या गोष्टी करू लागले. पण, ती थांबली नाही. तिने आपल्या स्वप्नांची भरारी सुरूच ठेवली आणि आज चांगल्या पदावर आहे. त्यामुळेच तर तिचे आयुष्य बदलले.
स्वप्नांची सोबत सोडली नाही
एक काळ असा होता की, मधुरिमादेखील सणासुदीला जुने कपडे घालायची, पण आता ती प्रसिद्ध ब्रँडचे कपडे घालते. त्यासाठी तिने तिच्या सप्नांचा पाठलाग सोडला नाही आणि स्वत:वर विश्वास कायम ठेवला. तेव्हा कुठे हे शक्य झाले. त्यामुळेच तर आज मधुरिमा ऐशोआरामी आयुष्याचा आनंद घेत आहे.
मधुरिमा म्हणते, ‘‘जर तुम्हाला आयुष्यात काही मोठं करायचं असेल, तर आराम, आळस सोडून मेहनत करावी लागेल. तुमची आवड आणि मेहनतच तुम्हाला तुमची जीवनशैली बदलण्याची हिंमत देते. पैशाशिवाय काहीही नाही. पैसे कमवायचे असतील तर लहानपणापासूनच करिअरचे नियोजन करा. लोक काय म्हणतात, याकडे लक्ष देऊ नका, फक्त स्वत:चा आणि तुमच्या भविष्याचा विचार करा. भ्रमात जगू नका. धार्मिक ढोंगी तुम्हाला धर्माच्या जाळ्यात अडकवतील आणि त्यांच्यासोबत बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्या बोलण्याला फसू नका. विशेषत: मुलींनी हे लक्षात ठेवायला हवे, कारण धार्मिक ढोंगी मुलींना घरात बंदिस्त ठेवू इच्छितात.’’
मधुरिमा पुढे सांगते, ‘‘तुमचे भविष्य घडवण्यात इतकेही व्यस्त होऊ नका की, तुम्हाला तुमच्या वर्तमानाचा आनंद घेता येणार नाही. त्यामुळे तुमच्या करिअरची चिंता करत असतानाच, आयुष्याचा आनंद घेत राहा.’’
महिलांसाठी प्रेरणास्थान
केवळ मधुरिमाच नाही तर जिवामीची सहसंस्थापक आणि सीईओ ऋचा कर हिनेही तिच्या मेहनतीने रुपये ७०० कोटींची कंपनी स्थापन केली. तिची कंपनी जिवामी हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे, जो महिलांसाठी अंतर्वस्त्र बनवतो. ऋचा करने लोकांची आणि समाजाची पर्वा न करता यशाची नवी शिखरे गाठली. तिची यशोगाथा सर्व तरुणांसाठी, विशेषत: महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
अंडरवेअर म्हणजेच अंतर्वस्त्र खरेदी करताना मुलींना लाजल्यासारखे वाटत असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. रिचाने मुलींची ही समस्या समजून घेतली आणि त्यावर काम केले. आज जिवामीने ५ हजारांहून अधिक रेंज, ५० हून अधिक बँड आणि १ हजाराहून अधिक आकारांच्या अंतर्वस्त्रांचा समावेश केला आहे. त्यांच्या वेबसाइटवर दर महिन्याला २.५ दशलक्ष व्हिजीटर्स म्हणजेच अभ्यागत असतात. अनेक बड्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या या कंपनीत निधी गुंतवला आहे.
आज जिवामी लाखो महिलांना उत्तम दर्जाची उत्पादने पुरवणारी कंपनी बनली आहे. ऋचाने तिच्या हिंमतीने आणि परिश्रमाने ते साध्य केले जे कधीच शक्य झाले नसते.
मेहनतीचे फळ
रिचा आज ज्या स्थानावर आहे ते तिच्या मेहनतीचे फळ आहे. आज ती मर्सिडीजमध्ये प्रवास करत असेल तर त्यामागे तिची अहोरात्र मेहनत आहे. अशाच प्रकारे, शुगर कॉस्मेटिक्सची सहसंस्थापक आणि सीईओ विनीता सिंग देखील आहे, जिने तिची रुपये १ कोटीची कॉर्पोरेट नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. याचाच परिणाम म्हणजे आज ती कोट्यवधींच्या कंपनीची मालकीण आहे. विनीताचा सल्ला आहे की, ‘‘जर तुम्हाला जागतिक दर्जाचे काहीतरी करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या कामात सातत्य ठेवावे लागेल आणि त्याचे फळ मिळवण्यासाठी धीर धरावा लागेल.’’
तिच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर, विनीताने २०१५ मध्ये शुगर कॉस्मेटिक्स सुरू केले. आज शुगर कॉस्मेटिक्सचे १३० हून अधिक शहरांमध्ये २,५००हून अधिक आउटलेट आहेत. तिच्या कंपनीचे मूल्य रुपये ७५० कोटी आहे. २०१९-२० मध्ये तिच्या कंपनीचे उत्पन्न १०५ कोटी रुपये होते. विनीताची कंपनी दिवसाला २ कोटी रुपये कमावते.
प्रचंड मेहनत आणि कधीही हार न मानण्याची जिद्द यामुळेच आज विनीता आयुष्यात स्थिरस्थावर झाली आहे. तिच्या या वृत्तीमुळेच तर आज यश तिच्या पायावर लोळण घेत आहे. आज शुगर कॉस्मेटिक्स हा प्रत्येक महिलेच्या ओठावर असलेला बँड आहे, हे तिच्याच मेहनतीला मिळालेले फळ आहे.
हार मानली नाही
पण, एक वेळ अशी होती जेव्हा विनीताने महिन्याला १० हजार रुपयांची नोकरी केली. तरीही स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहाणे तिने कधीच थांबवले नाही, पराभव स्वीकारला नाही आणि शेवटी यश संपादन केले.
आजकाल सौंदर्य उद्योग आणि शेअर बाजारात एक नवीन नाव लोकप्रिय आहे. हे नाव दुसरे तिसरे कुठलेच नसून नायका आहे. नायकाची संस्थापक एक महिला आहे, जिचा समावेश अब्जाधीश महिलांच्या यादीत आहे. फाल्गुनी नायर असे तिचे नाव आहे. तिला ही कंपनी वारसा हक्काने मिळालेली नाही तर तिने स्वत:ची कंपनी सुरू केली आणि आभाळाएवढे उत्तुंग यश मिळवले. फाल्गुनीला वाटले असते तर ती कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेंट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर राहिली असती, पण तिने कोटक सोडण्याचा निर्णय घेतला.
इथूनच फाल्गुनी नायरने तिच्या आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू केला. फाल्गुनीने २०१२ मध्ये नायका सुरू केले. नायका एक सौंदर्य आणि त्यासंदर्भातील काळजी घेणारी कंपनी आहे. त्यांची ३५ दुकानं आहेत. एवढेच नाही तर नायका फॅशनमध्ये ड्रेस, अॅक्सेसरीज आणि फॅशनशी संबंधित उत्पादने आहेत. याशिवाय यात ४ हजारांहून अधिक ब्युटी, पर्सनल केअर आणि फॅशन ब्रँडचा समावेश आहे.
यशोगाथा
नायकाअंतर्गत फाल्गुनी १६शेहून अधिक लोकांच्या समूहाचे नेतृत्व करते. सध्या फाल्गुनी नायरची संपत्ती ६.५ अब्ज डॉलर्सच्यावर गेली आहे. यामुळे फाल्गुनी नायर भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजिका बनली आहे. तिची कंपनी नायका ही स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल झालेली भारतातील पहिली महिला नेतृत्व असलेली कंपनी ठरली आहे.
चित्रपट ‘12वी फेल’ची कथा आयपीएस मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. एक मुलगा आपल्या स्वप्नांच्या मागे धावत एक दिवस ध्येयपूर्तीच्या शिखरापर्यंत कसा पोहोचतो, हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण, त्याचा प्रवास सोपा नव्हता. एखाद्याला ध्येयपूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी जीवनात जो संघर्ष करावा लागतो, तो संघर्ष हीच या चित्रपटाची कथा आहे.
याचा अर्थ असा की, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आळस आणि नशिबावर विश्वास ठेवायचे सोडून तुमच्या मेहनतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. ऐशोआरामी जीवन जगायचे असेल तर आजपासूनच तुमच्या करिअरचे नियोजन सुरू करा. लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील त्या सर्व गोष्टी विकत घेऊ शकणार नाही, ज्या कधीतरी आपल्याकडेही असतील, असा विचार तुम्ही चित्रपट कलाकारांकडे पाहून नेहमी करत असता.
स्वावलंबी व्हा
शालेय जीवनात जर तुम्ही तुमच्या करिअरचे नियोजन केले नाही तर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. आज विधी सिंहलाही अशीच खंत आहे. ती गृहिणी आहे. गृहिणी असणं वाईट नाही, पण अनेकदा घरकाम करणाऱ्या गृहिणींना पैशांवरून पतीचं ऐकावं लागतं. तिचा पती रोज टोमणे मारतो की, ‘‘तू काही कमावत नाहीस, त्यामुळे जास्त बोलू नकोस.’’
विधीच्या शेजारी रहाणारी अनू एक बुटीक चालवते. बुटीकमधून ती महिन्याला ३०-३५ हजार रुपये कमावते. अशा प्रकारे ती घरबसल्या पैसे कमावते. तिचा पती मोहितही तिला पैशांवरून टोमणे मारत नाही. एवढेच नाही तर बुटीकमुळे अनूमध्ये विधीपेक्षा जास्त आत्मविश्वास आहे.
तुम्हालाही आत्मविश्वासाने परिपूर्ण ऐशोआरामी जीवन जगायचे असेल तर लहानपणापासूनच तुमच्या करिअरचे नियोजन करा. तुम्हालाही गुचीच्या बॅग, जाराचे टॉप, लिवाइस, पँटलून जीन्स, अॅप्पलचा मोबाईल आणि बीएमडब्ल्यू कार हवी असेल तर तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा. याची सुरुवात शालेय जीवनापासूनच करा. तुम्ही असे करिअर निवडा, जे ट्रेंडमध्ये असेल आणि करिअरसाठीचा कालावधी जास्त असेल, अतिरिक्त काम आणि अतिरिक्त अभ्यासदेखील करा, हे तुमच्या सीव्हीमध्ये अर्थात स्वपरिचयपत्रात प्लस पॉइंट्स म्हणजेच जमेची बाजू ठरेल.




