अपूर्ण

कथा * अर्चना पाटील

धारीणी आज प्रथमच नोकरीसाठी बाहेर पडली होती. रूद्र गेल्यापासून ती खूपच एकटी पडली होती. समीराची जबाबदारी पार पाडताना तिची दमछाक होत होती. समीराच्या आयुष्यातील वडील म्हणून रूद्रची रिकामी झालेली जागा धारीणीलाच भरून काढावी लागत होती. नोकरीमुळे तर धारीणीचे प्रश्न अजुनच वाढले. पण घरात बसुन किती दिवस निघतील? त्यामुळे धारीणीसाठी नोकरी ही गरज बनली होती. एका हॉटेलमध्ये रिसेप्शनीस्ट म्हणून तिला जॉब मिळाला. पण रोजच रेल्वेने अपडाऊन हा सर्वात मोठा प्रश्न होता तिच्यासाठी, कारण सवय नव्हती त्या गोष्टींची. पहिल्या दिवशी धारीणी तिचा भाऊ सारंगसोबत आली. सारंगने त्याच्या मित्रांशी तिची ओळख करून दिली.

‘‘ताई, हे सर्वजण तुला मदत करतील. कोणालाही हाक मार.’’

‘‘नक्कीच, टेन्शन नका घेऊ मॅडम तुम्ही.’’ घोळक्यातून एक आश्वासक आवाज आला.

‘‘ताई, हा मंदार शेटे. हा आणि तू सोबतच उतरणार आहात. संध्याकाळीही हा तिकडून तुझ्यासोबत असेल. तर मग मी निघू आता.’’

‘‘हो, निघ,’’ धारीणी नाराज होऊनच म्हणाली.

दोनच मिनिटात ट्रेन आली. धारीणी लेडीज डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होती. सारंगचे सर्व मित्रही त्याच डब्यात चढले.

‘‘अहो, हा लेडीज डबा आहे ना. मग तुम्ही सगळे याच डब्यात कसे?’’

‘‘अहो मॅडम, आम्ही रोज इथेच असतो. आपल्या गावाकडच्या ट्रेनमध्ये सगळं चालतं. ही काय मुंबई थोडीच आहे.’’ मंदारच परत बोलला.

धारीणी आता गप्पच बसली. मनातल्या मनात तिचा दिवस चांगला जावा असा विचार करू लागली. सावरगाव येताच धारीणी आणि मंदार ट्रेनमधून उतरले.

‘‘चला मॅडम, मी सोडतो तुम्हाला हॉटेलला.’’

‘‘नाही, नको उगाच तुम्हाला कशाला त्रास…’’

‘‘अहो, त्यात कसला त्रास. तुम्ही सारंगच्या बहीण…. सारंग माझा चांगला मित्र…सोडतो मी तुम्हाला…’’

धारीणीचाही पहिलाच दिवस होता. तीसुद्धा घाबरलेली होती. मंदारमुळे थोडसं हलकं वाटत होतं…म्हणून तीसुद्धा मंदारच्या गाडीवर बसून गेली. दिवस चांगलाच गेला. संध्याकाळी रेल्वेत पुन्हा ती मंदारला भेटली.

‘‘काय मग, कसा गेला आजचा दिवस धारीणी….सॉरी हं, मी जरा पटकनच एकेरीवर आलो.’’

‘‘नाही, नाही. इट्स ओके. तुम्ही बोला. काहीही बोला. बिनधास्त बोला. मला राग येणार नाही.’’

दोघेही घरी पोहोचले. दुसऱ्या दिवशी परत तोच किस्सा. हळूहळू मंदार आणि धारीणी चांगले मित्र बनले. सकाळ संध्याकाळ मंदार आणि धारीणी रेल्वेत भेटत होते. अधून मधून मंदार धारीणीला हॉटेलमध्ये सोडतही असे. कधीतरी घ्यायलाही येत असे. रात्री अपरात्री व्हॉट्सअॅप चँटींगही होत असे. धारीणी तिचे सगळेच प्रश्न मंदारशी शेअर करत असे.

‘‘जाउ दे गं, काही होत नाही…’’ या शब्दात मंदार धारीणीला समजावून सांगत असे.

धारीणीसाठी मंदार म्हणजे तिचं स्ट्रेस रीलीफ औषध होतं. समीरा, आईबाबा, सारंग हे सर्वजण रूद्रची कमतरता भरून काढू शकत नव्हते, पण मंदार रूद्रसारखा मानसिक आधार देत होता. मंदारमुळे धारीणी पुन्हा नटायला शिकली, हसायला शिकली. चांगले कपडे घालून मिरवायला शिकली. तिच्यासाठी तो नक्कीच तिचा एक चांगला मित्र होता. बाईकवर ती कधीतरी पटकन त्याच्या खांद्यावरही हात ठेवत असे. बोलताना पट्कन त्याच्या पाठीवर एखादी चापटही मारत असे. पण या हालचाली तिच्याकडून केवळ एक चांगला मित्र म्हणूनच होत असत. एके दिवशी सकाळी नऊला सावरगावला उतरताच दोघांनी चहा घेतला.

‘‘तू खुपच बोलतेस माझ्याशी, का गं?’’

‘‘तू आवडतोस खुप मला. तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायला आवडतं मला. तुझी पर्सनॅलिटीही खूप छान आहे. रेल्वेत बोलता येत नाहीत या गोष्टी सगळयांसमोर. आता आपण दोघंच आहोत म्हणून बोलते आहे.’’

‘‘ओ बापरे, काय खाऊन आलीस आज घरून?’’

‘‘काही नाही, खरं तेच सांगते आहे. तुझ्याशी जी मुलगी लग्न करेल ती खुपच लकी असेल.’’

‘‘हो का, इथून पुढे पस्तीस किलोमीटरवर लेण्या आहेत. येतेस का पहायला?’’

‘‘वेडा आहेस का तू, मी घरी काहीच सांगितले नाहीए. उशीर झाला तर आईबाबा चिंता करतील.’’

‘‘उशीर होणार नाही, ट्रेनने तू रात्री नऊला पोहोचतेस घरी. मीसुद्धा तुला शार्प नऊ वाजताच तुझ्या घरासमोर उभं करेन.’’

‘‘काहीही सांगतोस तू, आईबाबा काय म्हणतील?’’

‘‘तू माझ्यासोबत लेण्या पहायला येते आहेस हे सांगूच नकोस ना त्यांना. एक दिवस खोटं बोललीस तर काय फरक पडणार आहे तुला. सहा महिन्यात कधी काही मागितलं का मी तुझ्याजवळ? फिरून येऊ ना. तेवढाच तुलाही चेंज मिळेल. तुझ्याचसाठी सांगतो आहे. मी तर हजारवेळा जाऊन आलोय लेण्यांमध्ये.’’

‘‘नाही, मी जाते कामावर.’’

‘‘निघ, आत्ता थोड्या वेळापूर्वी बोलत होतीस की म्हणे मला तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायला आवडतं. प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ आली तर घाबरते आहेस.’’

‘‘अरे, मला आवडतं. म्हणून काय मी तुझ्यासोबत गावभर कुठेही फिरायचं का?’’

‘‘बरं, इथे माझा आणि सारंगचा मित्र आहे. संध्याकाळी त्याच्या बाळाला पहायला येशील का?’’

‘‘ट्रेन निघून जाईल ना मग?’’

‘‘मी सोडेन तुला घरी, माझे आई. त्याचा विचार मी अगोदरच केलेला आहे.’’

‘‘ठीक आहे, जाऊ सोबत.’’

धारीणीने केवळ मंदार नाराज होऊ नये म्हणून होकार दिला.

‘‘जरा एक तास लवकर निघ आज, म्हणजे घरी जायला उशीर होणार नाही तुला,’’

‘‘हो रे बाबा, प्रयत्न करेन. मालकाने सोडायला हवं ना.’’

‘‘एक दिवसही माझ्यासाठी लवकर येऊ शकत नाहीस का तू?’’

‘‘संध्याकाळी येते ना मी तुझ्यासोबत. अजून काय पाहिजे. निघते मी. उशीर होतोय.’’

संध्याकाळी धारीणी तिच्या रोजच्याच वेळेल म्हणजे साडेपाचला हॉटेलबाहेर येऊन उभी राहिली. मंदार पाचपासुनच तिची वाट पाहत होता. धारीणी बाइकवर बसताच बाईक निघाली.

‘‘कुठे राहतो तुझा मित्र?’’

‘‘नेतो आहे ना मी तुला. कशाला हव्यात चौकश्या.’’

टुव्हीलर गावाच्या बाहेरच जात होती. धारीणीला समजत होते, पण मंदार बोलूही देत नव्हता. शेवटी गावाबाहेर एका घराजवळ गाडी थांबली. घराला कुलूप होते. आजुबाजुला शेत होते. त्याठिकाणी लोकांची वस्ती नव्हती आणि फारशी वर्दळही नव्हती.

‘‘या घराला कुलूप का आहे मंदार?’’

‘‘चावी माझ्याकडे आहे, चल आत जाऊ.’’

‘‘पण का? तू मला घरी सोड.’’

‘‘बावळट आहेस का तू? कधी नव्हे तो निवांत वेळ मिळाला आहे आपल्याला. अर्धा तास बसू आणि लगेच निघू.’’

‘‘मी नाही येणार आत.’’

‘‘हे बघ, तू फक्त डोळे बंद करून उभी रहा. मी फक्त एक मनसोक्त कीस करणार आहे आणि आपण लगेच निघू. तुझा माझ्यावर विश्वास नाही का?’’

‘‘हे बघ मंदार, तू मला मित्र म्हणून आवडतोस. पण या गोष्टींसाठी माझी लॉयल्टी रूद्रशी होती आणि मरेपर्यंत त्याच्याशीच राहील.’’

‘‘पण मलाही तू आवडतेस आणि मला जर तुला स्पर्श करावासा वाटत असेल तर त्यात काय चुकीचं आहे.’’

‘‘कदाचित माझं चुकलं असेल. मी तुझ्यापासुन दूर रहायला हवं होतं.’’

‘‘अगं ऐक ना, अर्धाच तास आहे आपल्याकडे. कशाला वेळ वाया घालवते आहे? मी कोणती तुझ्याकडे एवढी धनदौलत मागतो आहे.’’

‘‘मला फसवलंस मंदार तू. पुरूषांना मोहाचा शाप असतो हेच खरं. मी माफी मागते तुझी. मी मर्यादेत राहिले असते तर तुझा गैरसमज झाला नसता आपल्या रीलेशनशीपबाबत. आता माझी ट्रेनही गेली असेल. सारंगची बहीण म्हणून तरी मला सुखरुप घरी सोड.‘‘

‘‘अगं ए बये, तू टेन्शन नको घेऊस. तु?झ्या संमतीशिवाय मी काहीही करणार नाही.’’

मंदारने पटकन बाईकला किक मारली आणि साडेआठलाच गाडी धारीणीच्या घरासमोर आणून सोडली. बाईकचा वेग आणि मंदारचा राग हे दोन्ही सोबतीला होतेच, पण रस्त्यात दोघंही एकमेकांशी एक चकार शब्दही बोलले नाहीत. घर येताच धारीणी पटपट चालू लागली.

‘‘अहो मॅडम, तुम्हाला सुखरूप कोठेही हात न लावता तुमच्या घरी सोडलंय बरं का मी? तुम्ही जिंकलात, माझी एक इच्छा पुर्ण केली असती तर काय बिघडलं असतं तुमचं? मी काही झोपायला सांगत नव्हतो तुम्हाला माझ्यासोबत. मलाही माझ्या मर्यादा समजतात, मॅडम.’’

‘‘हे बघ मंदार,प्लीज तू या अॅटीट्युडने माझ्याशी बोलु नकोस. संस्कार नावाचीही काही गोष्ट असते की नाही? या गोष्टींसाठी माझं  मन कधीच तयार होणार नाही. तुझ्यामुळे मी रूद्र गेल्यानंतर पुन्हा जगायला शिकले, पण तुला जर माझा स्पर्शच हवा असेल तर मला कधीच भेटू नको.’’

‘‘एकीकडे म्हणतेस तू मला आवडतोस. अगं वेडे, स्पर्शातूनही प्रेमच व्यक्त होतं ना.‘‘

‘‘मंदार, एकमेकांबद्दल फील करणं वेगळं आणि स्पर्श करणं वेगळं. माझ्या शरीरावर रूद्र्चाच हक्क होता आणि राहणार. तू जे सांगतोस, ते माझ्या नीतिमत्तेत बसत नाही. माझी विचारसरणी अशीच आहे.’’

‘‘पुन्हा विचार कर माझ्या बोलण्यावर. मी वाट पाहेन तुझी.’’

‘‘मंदार, अरे यावर्षी तुझं लग्न होणार आहे. तुझ्या बायकोला कोणत्या तोंडाने   भेटणार आहे मी? तू माझा मित्र आहेस आणि कदाचित मित्रापेक्षाही जास्त आहेस. पण प्रत्येक गोष्ट पूर्ण व्हायलाच पाहिजे असं नसतं मित्रा, त्यामुळे आजपासुन मी तुला कधीच त्रास देणार नाही. आपण यापुढे कधीच भेटायचं नाही. माझ्यामुळे तुझं मन दुखावलं गेलं म्हणून मला माफ कर.’’

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें