दांपत्य जीवनातील ९ वचनं

* डॉ. नीरजा श्रीवास्तव

बदलत्या काळाबरोबर बदलही आवश्यक आहे. आजच्या युगात दांपत्य विशेषकरून नवविवाहित जोडप्यांना आपल्या वैवाहिक जीवनाच्या आनंदासाठी आपल्या भावना आणि विचारांचा अंदाज थोडा बदलायलाच हवा. पूर्वी विवाहाचा अर्थ फक्त प्रेम आणि त्याग होता, ज्यात बहुतेकदा स्त्रियाच पती आणि त्याच्या घर-कुटुंबासाठी समर्पित राहण्यात आपल्या जीवनाची धन्यता मानत असत आणि त्याग व कर्तव्याची मूर्ती बनून सारे जीवन आनंदाने व्यतित करायच्या. घरकुटुंबात यामुळेच त्यांना सन्मानही मिळत असे.

पुरुष पण अशी पत्नी मिळाल्याने आनंदीत व्हायचे. त्यांची मानसिकताही स्त्रियांप्रति हीच होती. पण आज परिस्थिती बदललेली आहे. स्त्री-पुरुष दोघांनाही ही गोष्ट समजली आहे. आज स्त्रियाही पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत, प्रगती साधत आहेत.

वर-वधू लग्नाच्या वेळेस रीती-रिवाजाच्या नावावर ७ वचने घेतात आणि बहुतेक खूप लवकर विसरूनही जातात. परंतु दांपत्य सर्वेक्षणाच्या आधारावर निष्कर्षाच्या रूपातील या वचनांचा विवाहानंतरही स्विकार करा, यांना लक्षात ठेवा आणि निभवासुद्धा. दोघांनाही एकमेकांच्या कामात सहकार्याच्या रूपाने ताळमेळ बसवून चालण्याची आवश्यकता आहे, ज्यातून सगळयांच्या विचार-विमर्शातून निघालेली ही खालील वचने मोठया कामाची आहेत :

जे माझे आहे ते तुझेही : लखनौऊचे आर्किटेक्ट सुहास आणि त्यांची पत्नी सीमामध्ये सुरुवातीला छोटया-छोटया गोष्टींवरून नेहमी भांडणे होत. सीमा म्हणते, ‘‘जसे माहेरून मिळालेल्या महाग बेड कव्हर, क्रॉकरी इत्यादीचा जेव्हा सुहास आपल्या मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी उपयोग करायचे, तेव्हा मला अजिबात आवडायचे नाही. त्याचप्रमाणे त्यांनाही माझे नातेवाईक, मैत्रिणींद्वारे त्यांचे म्युझिक सिस्टम किंवा पुस्तके हाताळणे एकदम असह्य व्हायचे. नंतर एके दिवशी आम्ही ठरवले की जर आपण एक आहोत तर एकमेकांच्या वस्तूंचा उपयोग का नाही करायचा. त्यादिवसापासून सगळा परकेपणा दूर झाला.

जसे मला आपले आई-बाबा, भाऊ-बहिण, मित्र-नातेवाईक प्रिय आहेत, तसेच तुम्हालाही आपले :

जयपुरचे डॉ. राजेश आणि त्यांची होममेकर पत्नी इशाने या गोष्टीचा खुलासा केला की पती-पत्नी दोघांच्या कुटुंबाचा, नातेवाईकांचा घरात समान आदर होणे आवश्यक आहे. राजेशने आपली बहिण रिमाच्या घरी आपली व आपल्या आई-बाबांची पुन्हा-पुन्हा अपमानित होण्याची घटना सांगितली. बहिण आपल्या पतिकडून होणाऱ्या अपमानजनक व्यवहारामुळे दु:खी असायची. यामुळे त्यांचे आपसातील नाते कधी गोड झाले नाही. ही तर चुकीची अपेक्षा आहे की फक्त पत्नीने पतिच्या घरच्यांचे प्रेमाने स्वागत करायचे आणि पतिने तिच्या माहेरच्या लोकांचा आदर न करता जेव्हा-तेव्हा अपमान करायचा. पतिचेही तेवढेच कर्तव्य आहे. पत्नी अर्धांगिनी आहे, जीवनसाथी आहे, गुलाम नाही.

जशा माझ्या गरजा आवश्यक तशाच तुमच्याही : सुजाता एका कॉर्पोरेट ऑफिसात काम करते. नेहमी तिला घरी येण्यास उशीर होतो. घरी असतानाही तिला कधी-कधी ऑफिसचे काम करावे लागते. यावर पती विशाल चिडचिड करत असे. एके दिवशी सुजाताने त्याला बसवून चांगल्याप्रकारे समजावले की विशाल मी लग्नाच्या अगोदरच तुम्हाला सांगितले होते, तेव्हा तर तुम्हाला माझ्या चांगल्या पॅकेजपुढे सर्व स्वीकार होते. जेव्हा तुम्ही आपल्या बिझनेस मीटिंगमधून उशिरा येता तेव्हा तर माझी काही हरकत नसते. तर मग तुम्ही का समजून घेत नाही? मी नोकरी सोडू शकत नाही. आईचे प्रत्येक महिन्याला ब्लड ट्रान्सफ्युजन मी थांबवू शकत नाही. नि:संदेह तुम्ही मला सोडू शकता. माझी यालाही काही हरकत नाही. मी डिवोर्ससाठी तयार आहे. मी उद्याच दुसरीकडे कोठे शिप्ट होईल.

आपल्या सवयी, छंद, संस्कार जसे माझे तसेच तुमचे : पती-पत्नी वेगवेगळया परिवारातून, वेगवेगळया वातावरणातून येतात पण दुसऱ्याकडून आपल्यासारखे आचरण व राहणीमानाची अपेक्षा करतात किंवा वेगळे पाहून टर उडवतात तर हे योग्य नाही, त्यापेक्षा याचे समाधान शोधणे योग्य असते. स्कूल टीचर दीप्ती आपल्या बँक मैनेजर पती शिखरला अनवाणी पायांनी घरात फिरल्यानंतर अंथरुणात घुसण्याने वैतागत असे. तर शिखर तिचे बाहेरून कोठून आल्यावर कपडे चेंज करून अंथरुणावर टाकणे पसंत नव्हते. शेवटी एके दिवशी बसून दोघांनी समस्येचे समाधान शोधले. आता पायांच्या अस्वच्छतेपासून वाचण्यासाठी शेखरने कार्पेट अंथरले तर दीप्तीनेही शिखरचे बघून कपडे व्यवस्थित हँग करायला सुरूवात केली. त्यांचे जीवन पुन्हा सुरेल सुरावट बनली.

दुसऱ्यांच्या समोर एकमेकांचे दोष किंवा टर उडवायची नाही : दिल्लीच्या ग्रेटर कैलाश येथील माला पहिल्यांदा विवाहानंतर विमानयात्रा करत होती. पती अंश व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होता. त्याचा एक मित्रही पत्नीसहित त्यांच्याबरोबर होता. सर्व एका तिसऱ्या मित्राच्या लग्नाला जात होते. बेल्ट बांधण्याची सूचना झाली तर मालाने घाईत जवळच्या सीटचा बेल्ट उचलला आणि लावण्याचा प्रयत्न करू लागली. हे पाहून अंश हसू लागला, ‘‘अक्कल चरायला गेली आहे काय? एवढेपण कळत नाही.’’ हे बघून सर्व हसू लागले. तेव्हा मालाला खूप वाईट वाटले. मग ती म्हणाली, ‘‘तुम्हाला हसण्याऐवजी माझी मदत करायला हवी होती किंवा यांच्यासारखी श्रीमंत घरातील पत्नी आणयला हवी होती.’’

अंशला आपली चुक कळाली की त्याने असे बोलायला नको होते. अशाचप्रकारे बरेली निवासी गीताचे भाऊ-वहिनी तिला भेटण्यासाठी आले. तेव्हा पती दिपक बाटलीनेच पाणी पित होता. त्याने गीताच्या भावालाही तीच पाण्याची बाटली ऑफर केली.

‘‘थांबा, मी ग्लास आणते. आमच्या येथे कोणी अडाण्यासारखे पाणी पित नाही,’’ गीता म्हणाली.

दिपकला तिचे म्हणणे खटकले. म्हणाला, ‘‘आणि आमच्या येथेही पतिशी असे कोणी बोलत नाही.’’

भावाने गीताला टोकले व विषय सांभाळला, नंतर दोघांनी एकमेकांना सॉरी म्हटले आणि दुसऱ्यांच्या समोर एकमेकांची टर न उडवण्याचे आणि दोष न काढायचे वचन दिले.

जशी माझी सामाजिक बांधिलकी तशीच तुमचीही : दीपांकरची पत्नी जया लग्नाच्या आधीपासूनच फार सामाजिक होती. सर्वांच्या सुखदु:खात, सणासुदीच्या प्रसंगी सामील होत आली होती. ऑफिस असो किंवा शेजारी, नातेवाईक सगळयांशी मिळून-मिसळून राहायची. आणि अजूनही राहत आहे. दीपांकरही तिला सहकार्य करतो, त्यामुळे जयासुद्धा दीपांकरच्या सामजिक नातेबंधांची काळजी घेते.

जशी मला काही स्पेस हवी तशीच तुम्हालाही : पारुलने सांगितले संपूर्ण दिवस तर ती पती रवीमागे हात धुवून लागत नाही. काही वेळ त्याला एकटे सोडते, जेणेकरून तो आपले काही काम करू शकेल. पतिसुद्धा या गोष्टीची काळजी घेतो की मला स्पेस मिळावी.

दोघांमध्ये या गोष्टीवरून वाद होत नाही. दुसऱ्या दिवसाचा होमवर्कही सहज होतो. सोबत असल्यावर छान पटतं.

जसे माझे काही सिक्रेट्स न सांगण्यासारखे, माझी इच्छा तशीच तुझीही : लग्नाच्या आधी काय झाले होते पतीबरोबर किंवा पत्नीबरोबर वा त्यांच्या घर-कुटुंबात. जर ही गोष्ट कोणी सांगू इच्छित नसेल तर ठीक आहे, खोदून-खोदून का विचारावे? शंकेत वा संभ्रमात राहणे व्यर्थ आहे. कॉलेजचे इंग्रजीचे प्रोफेसर डॉ. नगेंद्र आणि त्यांची हिंदीची प्रोफेसर पत्नी नीलमचे हेच मत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नात्याच्या वाढीसाठी हे आवश्यक आहे. वर्तमान बघावे, एकमेकांचा आत्मसन्मान टिकवून ठेवावा.

पॉकेटमनीच्या खर्चावर अडवणूक नको : ‘‘आमच्या दोघांच्या छान जीवनाचा हाच तर सरळ फंडा आहे. घरखर्च आम्ही सहमतीने सारखा शेअर करतो आणि पॉकेटमनीवर एकमेकांना रोखत नाही,’’ स्टेट बँक कर्मचारी प्रिया आणि तिच्या असिस्टंट मॅनेजर पती करणने आपल्या गमतीशीर गोष्टीने अजून एक महत्वाचे वचनही सांगून टाकले.

तर मग आता विलंब कशाचा. लग्नाच्या वेळेस ७ वचने घेतली होती, तर लग्नानंतरही पती-पत्नी दोघांनी ही वचनं आत्मसात करावी आणि प्रेमाने हे नाते निभवावे.

तात्काळ घटस्फोट का नाही

* गरिमा पंकज

दिल्लीच्या विशालने १९९५ मध्ये आशाबरोबर प्रेमविवाह केला. सुरूवातीला तर सगळे छान होते. त्यांना एक मुलगीही झाली. पण नंतर अनेक समस्या समोर येऊ लागल्या.

एका दुर्घटनेत आशाच्या भावाचा मृत्यू झाला. तिचे आईवडिल एकटे पडले. मुलाच्या दु:खात आशाच्या वडिलांची तब्येत ढासळू लागली. यामुळे वडिलांची सेवा करता यावी या उद्देशाने ती सतत माहेरी जाऊ लागली. विशालने आशाला सांगितले की तिने आईवडिलांना येथे बोलावून घ्यावे, मात्र आशाच्या आईला हे पटेना. आशा माहेरी येत जात राहिली. या गोष्टीवरून त्यांच्यातील तणाव वाढला व २०१० मध्ये दोघेही वेगळे झाले.

महिला मदत कक्षातर्फे आशाने तिच्या पतिला नोटिस पाठवली व घरगुती हिंसेची केस केली व पोटगीचीही मागणी केली.

२०११ मध्ये विशालने दिल्लीच्या साकेत कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली. तेव्हापासून आज २०१७ पर्यंत कोर्टात हे प्रकरण सुरू आहे. पण कुठलाही निकाल लागलेला नाही. या दरम्यान पोटगीचे प्रकरणही सोबत सुरू होते.

२०१३ मध्ये न्यायालयाने विशालला आदेश दिला की त्याने आशाला दर महिन्याला २५ हजार रुपये पोटगी म्हणून द्यावेत. हा निर्णय याचिका दाखल केलेल्या तारखेपासून लागू होणार होता.

विशालने याविरोधात कोर्टात अपील केले. पण उच्च न्यायालयानेही हा आदेश मानला व ३ महिन्यांच्या आत सर्व रक्कम परत करण्याचा निर्णय सुनावला. या निर्णयालाही आव्हान देण्यासाठी विशालने सुप्रीम कोर्टात याचिका केली. पण तिथेही त्याच्या पदरी निराशाच पडली. सुप्रिम कोर्टाने कुठलीही दखल घेतली नाही. शेवटी विशालला पूर्ण पैसे द्यावे लागले.

मागील ७ वर्षांत विशालचे १६-१७ लाख रुपयांहूनही जास्त खर्च झाले आहेत. रोजची धावपळ व मानसिक ताण सहन करावा लागतो ते वेगळेच. तो आता ४५ वर्षांचा आहे. हे प्रकरण अजून काही दिवस लांबले तर दुसरे लग्न करणेही शक्य होणार नाही.

विशालचे म्हणणे आहे, ‘‘एका वर्षांत मोठ्या मुश्किलीने दोन तारखा मिळतात. त्यातही कधी न्यायाधिश हजर नसतात तर कधी वकीलच सुट्टीवर असतात. कधीकधी दोन्हींपैकी एखादी पार्टी येतच नाही. कधीकधी वकील मुद्दामच प्रकरण पुढे ढकलतात म्हणजे त्यांना त्यांची फी मिळत राहते. मी आत्तापर्यंत ४ वकिल बदलले आहेत. पण कुठलाही निकाल अजून लागलेला नाही.’’

घटस्फोट प्रलंबित असल्याने त्रस्त असलेले लोक

भारतात वर्षानुवर्ष चालणाऱ्या अशा प्रकरणांची संख्या हजारातही नाही करोडोंमध्ये आहे. १ जुलै, २०१५ ते ३० जून, २०१६ च्या कालावधीत एकूण २,८१,२५,०६६ सिव्हिल व गुन्हेगारी प्रकरणे प्रलंबित होती.

दिल्लीला राहाणाऱ्या रविबरोबरही असेच काहीसे झाले. त्यांचा विवाह श्रुतीबरोबर २००१मध्ये झाला. रविची आई सरकारी शाळेत शिक्षिका व वडिल एमसीडीमध्ये विजिलेंस ऑफिसर होते. रवि सांगतात, ‘‘लग्नाच्या तीन महिन्यांनंतरच आमचे वाद होऊ लागले. श्रुतिला माझ्या आईवडिलांसोबत राहायचे नव्हते व ती सतत माहेरी जात असे. तिच्या म्हणण्यानुसार मी घरात वाटण्याही केल्या, पण भावाच्या साखरपुड्याला ती माहेरी गेली व परतून आलीच नाही.

‘‘वूमेन्स सेलच्या वतीने श्रुतीने आम्हाला नोटिस पाठवली व आमच्याबरोबर भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ अ, ४०६ व ३४ अंतर्गत आरोप लावले.’’

‘‘३० मे, २००२ला मी पटियाला हाउस न्यायालयात जामीन अर्ज केला. काही काळानंतर आम्हाला जामिन मिळाला. पण यादरम्यान श्रुतीने तीसहजारी कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दिला. घटस्फोट व पोटगीचे प्रकरण सुरू राहिले. अनेक वर्षं हे प्रकरण निकालात निघेना त्यामुळे परस्पर सामंजस्याने हे सोडवण्याचे आम्ही ठरवले. २००९मध्ये रोख २ लाख रुपये देऊन मी माझ्या पत्नीशी परस्पर सामंजस्याने घटस्फोट घेतला.

‘‘इतका काळ चालणाऱ्या या खटल्याच्या धावपळीत माझे १५-१६ ला लाख रुपये खर्च झाले. मानसिक दृष्ट्याही मी त्रासून गेलो आहे. घटस्फोट घेतल्याला आता ८ वर्ष पूर्ण झाली आहेत, पण तरीही माझे पुन्हा लग्न होऊ शकलेले नाही. माझे आईवडिलही या दु:खामुळे निधन पावले.’’

अनेकदा न्यायालयाची कामे इतकी प्रलंबित असतात की माणसाचा धीर सुटू लागतो आणि त्यातही अनेक वर्षं खटला चालल्यानंतरही निकाल आपल्या बाजूने लागला नाही तर त्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीचं काय होत असेल याचा अंदाज आपल्यालाच येईल.

२६ फेब्रुवारी, १९९९ला दिल्ली येथे संजयचे सुमनशी लग्न द्ब्राले. संजय दिल्ली प्रशासनात केअर टेकर या पदावर कार्यरत आहे व सुमन गृहिणी आहे. २००२ मध्ये पहिल्या मुलीचा आणि २००६ मध्ये दुसऱ्या मुलीचा जन्म झाला. लग्नानंतरच त्यांच्यात वाद व्हायला सुरूवात झाली होती. ११ जुलै, २०१०ला संजयने रोहिणी यांच्या कौटुंबिक न्यायालयात हिंदू विवाह कायदा, १९९५च्या कलम १३ अंतर्गत क्रुरतेच्या आधारावर लग्न संपवण्यासाठी याचिका दाखल केली. यामध्ये संजयने सुमनकडून केल्या गेलेल्या अशा ९ कृतींचा उल्लेख केला ज्या क्रुरतेअंतर्गत येतात.

सुमनने लिखित जबाब देत हे सर्व आरोप फेटाळून लावले व भारतीय दंड संहिता कलम ९ अंतर्गत आपले लग्न वाचवण्याची व वैवाहिक हक्क अबाधित राहण्यासाठी याचिका दाखल केली.

१४ फेब्रुवारी, २०१२ला कौटुंबिक न्यायालयाने मानसिक क्रूरतेच्या आधारे या घटस्फोटाला मंजुरी दिली.

सुमनने या निकालाला आव्हान देत उच्च न्यायालयात अपील केले. पण उच्च न्यायालयानेही ट्रायल कोर्टाचा निकाल कायम ठेवत सुमनचा अर्ज फेटाळला. यानंतर सुमन सुप्रीम कोर्टात गेली.

सुप्रीम कोर्टाने मार्च, २०१७ला अंतिम निर्णय देत सुनावले की घटस्फोटासाठी याचिका दाखल करण्याच्या ८-१० वर्षांपूर्वी घडलेल्या काही घटना, ज्या पुन्हा घडल्या नाहीत, त्यांच्या आधारावर ही याचिका मानसिक क्रूरतेअंतर्गत येत नाही. सुमनच्या बाजूने हा निकाल देत सुप्रीम कोर्टाने हे लग्न पत्नी म्हणून सुमनचा वैवाहिक हक्क अबाधित ठेवला.

कस्टडीच्या लढाईत भरडले जाणारे बालपण

वैशाली एक १५ वर्षांची मुलगी आहे. सध्या ती तिच्या वडिलांबरोबर रहात आहे. तिची आई वडिलांपासून वेगळी झाली आहे व इंग्लंडमध्ये राहात आहे. तिला तिच्या मुलीला इंग्लंडला घेऊन जायचे आहे. पण वैशालीला वडिलांबरोबर भारतात रहायचे आहे. जवळपास ८ वर्षं हा खटला चालल्यानंतर फेब्रुवारी, २०१७ला सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणी करत वैशालीचा ताबा तिच्या वडिलांकडे सोपवला.

घटस्फोटानंतर नेहमीच मुलांची कस्टडी या प्रश्नावर उपस्थित प्रकरणे दिसून येतात. भारतात ५ वर्षांपेक्षा छोट्या मुलांचा ताबा आईकडे देण्यात येतो व मोठ्या मुलांचा ताबा देताना त्यांच्या उज्जवळ भविष्य, आयुष्य व इच्छेचाही विचार केला जातो. मुलांचा कस्टडी देताना त्यांची सुरक्षा, इच्छा व त्याबरोबरीनेच त्यांची मानसिक शांतता व उत्तम आयुष्य याकडे लक्ष देऊन निर्णय का घेतले जात नाहीत? मुलांच्या ताब्यासंदर्भातील न्यायालयीन निकाल एका नियमित वेळेच्या आत घेतला जावा असा नियम नको का?

उदाहरणादाखल वैशालीचेच प्रकरण पाहा. १९९९ मध्ये वैशालीच्या आईवडिलांचे लग्न फरीदाबाद येथे झाले. वर्ष २००० पर्यंत दोघेही तिथेच राहिले. मग मार्च, २००० मध्ये ते यु.के.ला शिफ्ट झाले. जानेवारी, २००२ या वर्षांत वैशालीचा जन्म दिल्ली येथे झाला. जन्माच्या काही महिन्यांनंतरच हे उभयता पुन्हा यु.के.ला परतले. २००७ मध्ये वैशालीला लहान बहिण झाली. या दरम्यान वैशालीच्या आईवडिलांच्या नात्यात कडवटपणा येऊ लागला. दोघांच्यात इतकी दरी निर्माण झाली की नोव्हेंबर, २००९मध्ये तिच्या आईने यु.के.च्या एका कोर्टात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली.  तेव्हा तिचे वडील तिल भारतात घेऊन आले. २०१० मध्ये वैशालीच्या आईने पंजाबच्या एका कोर्टात मुलीच्या कस्टडीची याचिका दाखल केली. त्याच आधारावर उच्च न्यायालयाने आदेश दिले होते की वैशालीला आईकडे सोपवण्यात यावे. या आदेशाविरूद्ध वैशालीच्या वडिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्टे ऑर्डर आणली आणि वैशालीला तिच्या वडिलांसोबत राहण्याची परवानगी दिली. याउलट तिच्या आईला वेळोवेळी मुलीला भेटण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट केलं. तिच्या आईने अनेकदा समजावूनही वैशाली यु.के.ला जाण्यासाठी तयार झाली नाही.

८ वर्षांच्या मुलीची ७ वर्षं आईवडिलांमध्ये भरडली गेली. आई अधूनमधून मुलीला भेटायला येत राहिली व तिचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करू लागली. पण हे शक्य झाले नाही. तिकडे कोर्ट वैशालीच्या इच्छेविरूद्ध तिला परदेशात पाठवण्याचा धोका पत्करू इच्छित नव्हते. या पूर्ण घटनाक्रमात एका लांबलचक काळापर्यंत गैरसमज कायम राहिला. ७ वर्षांची वैशाली आता १५ वर्षांची झाली आहे. ती मानसिकदृष्ट्या आता इतकी परिपक्व आहे की स्वत:चं चांगलं वाईट तिला कळू शकेल. ३ वर्षांनंतर ती सज्ञान होईल व कस्टडीचे प्रकरण तसेही निकालात निघेल.

प्रश्न हा आहे की अंतिम निकाल येण्यासाठी इतका वेळ का लागतो?

परिणाम मुलांच्या मनावर

साधारण १० टक्के प्रकरणांत घटस्फोट घेणारे दांपत्य एकमेकांशी इतक्या वाईट प्रकारे भांडतात, एकमेकांबद्दल इतकी गरळ ओकतात की मुलांच्या मनावर याचे दूरगामी परिणाम होतात. मेसाचुसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार, गंभीर वादविवाद असणाऱ्या कस्टडी प्रकरणात समावेश्शित ६५ टक्के मुलांमध्ये काळजी, राग, अनिद्रा, अंथरूण ओले करणे, नैराश्य, वेळेआधीच सेक्शुअली अॅक्टिव्ह होणे यांसारख्या समस्या दिसून येतात.

इतकेच नाही तर ५६ टक्के गंभीर कस्टडी प्रकरणांमध्ये अडकलेल्या मुलांमध्ये अॅटॅचमेंट डिसऑर्डर आढळते. यामुळेच त्यांच्या मनात आपल्या प्रिय व्यक्तींचा सहवास साथ सुटण्याची भिति इतक्या मोठ्या प्रमाणात असते की ते कोणाशी मैत्री करायलाही घाबरतात.

घटस्फोट व कस्टडी याचा परिणाम सर्वच मुलांवर एकसारखा होत नाही. जास्त संवेदनशील मुलांवर जास्त प्रभाव पडतो. शाळेत अभ्यासावर परिणाम होतो. कुठल्याच कामात त्यांना रस वाटत नाही. मित्र-मैत्रिणींपासूनही ते दूर होऊ लागतात.

यादरम्यान हे दोन्ही फिर्यादी मुलांकडे एकमेकांची उणीदुणी काढतात. परस्परांची वाईट प्रतिमा मुलांसमोर उभी करतात.

घटस्फोटाची प्रकरणे जास्त प्रलंबित असण्यासंदर्भात दिल्लीचे वरिष्ठ वकिल ऋषी अवस्थी म्हणतात, ‘‘न्यायालयाची हीच इच्छा असते की घटस्फोटाचे प्रकरण संपुष्टात यावे, कारण लग्न ही एक संस्था आहे असे न्यायालय मानते व त्यांना असे वाटत नाही की हे नाते तुटावे. इतकेच नाही तर, घटस्फोटाबरोबरच पोटगी, हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार, ४९८ अ यासारखी अनेक प्रकरणे एकत्र सुरू असतात. यामुळेही अंतिम निकाल लागण्यास वेळ लागतो.’’

कारणं जी काही असोत, सामान्यत: जनतेचा त्रास लक्षात घेता, लवकरात लवकर प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. जास्त संख्येत न्यायाधिशांची नियुक्ती त्याबरोबरच कार्यव्यवस्थेमध्ये सुधारणा आणि लोकांच्या मानसिकतेत बदल होणे ही आवश्यक आहे. परस्पर सामंजस्य हा ही घटस्फोटात एक पर्याय असू शकतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें