काट्यानं काटा निघाला

कथा * दीपा थोरात

‘‘ऐकतेस ना? ती पॉलिसीवाली ब्रीफकेस जरा आणून दे ना रीमा…’’ बैठकीच्याखोलीतून विवेकनं हाक मारली.

रीमा ओले हात पुसत पुसत बाहेर आली, ‘‘मला आत नीट ऐकायला आलं नाही, काय म्हणताय?’’

‘‘अगं, ती विम्याच्या फायलींची सूटकेस हवी आहे.’’ विवेक म्हणाला. तेवढ्यात आतून कुकरच्या दोन शिट्या पाठोपाठ ऐकायला आल्या. ‘‘बघ, बघ, तुला तुझा मित्र बोलावतोय…शिट्या वाजवतोय…’’ विवेकनं हसून मस्करी केली.

‘‘भलत्या वेळी कसली चेष्टा? माझं कामं संपेनात अन् तुम्ही मध्येच हाक मारता.’’

‘‘अगं, हे कामही महत्त्वाचंच आहे. पॉलीसी मॅच्युअर झाली की क्लेम करता येईल.’’

‘‘खरंच? मग कुठं तरी फिरायला जाऊयात का?’’ खूपच उत्सुकतेनं रीमानं विचारलं.

‘‘आणि ऋचालीच्या लग्नाचं काय?’’ विवेकनं विचारलं.

‘‘अजून लहान आहे ती. दोन तीन वर्षं तरी अजून तिचं लग्न नाही करणार.’’

‘‘पण त्यानंतर तरी कोणती लॉटरी लागणार आहे? हाच पैसा तिच्या लग्नासाठी जपून ठेवावा लागेल. लगेच पुढे दोन तीन वर्षांत लेकाचंही लग्न करावंच लागेल ना? आता पोरांची लग्नं की आपला दुसरा हनीमून तूच ठरव.’’ ब्रीफकेस उघडून फायलींमधले कागद बघत विवेकनं म्हटलं.

रीमा काही न बोलता आपल्या कामाला लागली. खरंच दिवस किती भराभर संपतात, वर्षांमागून वर्षं सरतात. रीमाच्या लग्नाला पंचवीस वर्षं झालीत. लग्न झालं तेव्हा ती फक्त एकोणीस वर्षांची होती. साखरपुडा ते लग्न यात सहा महिने वेळ होता. लग्नाला होकार द्यावा की नकार हेच तिला ठरवता येत नव्हतं. विवेकचं आकर्षक व्यक्तिमत्त्व, त्याची चांगली नोकरी भुरळ घालत होती. पण तिचं आत्तापर्यंतचं आयुष्य लखनौसारख्या शहरात, चांगल्या वस्तीत, मोकळ्या वातावरणात गेलं होतं. लग्नानंतर तिला कानपूरपासून बऱ्याच आत असलेल्या एका छोट्याशा गावात, जुनाट वळणाच्या घरातल्या एकत्र कुटुंबात राहावं लागणार होतं. ते तिला पचनी पडत नव्हतं. स्वप्नं सोनेरी होतं. पण त्यावर विद्रुप डागही होते.

शेवटी एकदाची लग्न होऊन ती सासरी आली. अजून तिचं पदवीचं एक वर्ष शिल्लक होतं. इथल्या त्या कोंदट वातावरणात तिचा जीव घाबरा व्हायचा. तिनं विवेककडे शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी मागितली. या निमित्तानं तिला माहेरी जायला मिळायचं. डिग्री पूर्ण झाली मग तिनं कॉम्प्युटरचा डिप्लोमाही करून टाकला. विवेक तिला भरपूर पाठिंबा देत होता. बालवाडीचाही एक कोर्स तिनं तेवढ्यात उरकून घेतला. लग्नाला पाच वर्षं झाली तोवर पदवी डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स, बालवाडीचं सर्टिफिकेट अन् ऋचा अन् रोहन अशी दोन बाळं तिच्या पदरात होती. सासरच्या घरात सासू, सासरे, दोघं दीर, दोन जावा, त्यांची चार मुलं अन् एक सतत घरात असणारी मोलकरीण अशी चौदा माणसं होती. घर एकत्र होतं. स्वयंपाक एकत्रच असायचा. शेतातून धान्य, भाज्या मिळायच्या. वरकड खर्चाला सासऱ्यांची पेंशन अन् तिन्ही भावांकडून आईला दर महिन्याला खर्चाची रक्कम मिळायची. दोन्ही जावांचं कामावरून भांडण व्हायचं. रीमा न बोलता चटचट कामं उरकायची. तिचं सुंदर रूप, कामाचा उरक, शिक्षण, येणाऱ्यांशी चांगलं वागणं, बोलणं यामुळे थोडक्या काळात ती सर्वांची लाडकी झाली होती. पण तिच्या एकूणच बुद्धिनं, रूपानं सुमार असलेल्या जावा तिचा सतत दुस्वास करायच्या. त्या दोघी कायम एक असायच्या. पण रीमा हसून साऱ्या फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करायची. दरम्यानच्या काळात विवेकला दिल्लीला नोकरी लागली. रीमाला वाटलं, बरं झालं, या जंजाळातून मुक्ती मिळाली. पण विवेकनं तिला दिल्लीला घर करणं आता जमणार नाही हे समजावून सांगितलं. तिनंही ते समजून घेतलं.

विवेक औषधांच्या कंपनीत एरिया मॅनेजर होता. रीमाला दिलासा देणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या गावात हल्ली बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या. तालुक्याचा दर्जा गावाला मिळाला होता. नवीन शाळाही उघडली होती. दोन्ही मुलांचे एडमिशन्स तिथं झाले अन् रीमालाही तिथं कॉम्प्युटर टीचर म्हणून नोकरी मिळाली. विवेकनं तिला आईवडिलांकडून नोकरीची परवानगी मिळवून दिली. दोन्ही जावांचा जळफळाट झाला. त्यांनी सासूचे कान भरायचा प्रयत्न केला. पण सासूला दोन्ही वेळा वेळेवर चहा अन् जेवण मिळण्याशी काम होतं. त्या वेळा रीमानं कधीच चुकवल्या नाहीत. पण घरातल्या एकूण वातावरणात तिचा जीव गुदमरायचा. अशात छोटूचं विनोदी बोलणं, त्याची तत्पर मदत यामुळे तिला ताज्या वाऱ्याची झुळुक मिळाल्याचा भास व्हायचा.

नाव छोटू असलं तरी तो लहान नव्हता. चांगला उंचबिंच लांबरूंद तरूण होता. त्याच्या बलवीर या नावानं त्याला कधीच कुणी हाक मारली नाही. अभ्यासात त्याचं लक्ष नव्हतं. कसा बसा मॅट्रिक झाला अन् मग समाज सेवेतच गुंतला. कुणाला इस्पितळात पोहोचव, कुणाचा गॅस सिलिंडर आणून दे, लग्नकार्यात स्वत: उभं राहून मांडव घालून दे, वांजत्रीवाला ठरवून दे अशी घरातली बाहेरची कामं सतत करायचा. घरची कार सतत तो दामटायचा. थोरले दोघं भाऊ कार चालवायला शिकलेच नाहीत. हक्काचा छोटू हाताशी होताच. छोटू त्याच्या आईवडिलांना उतार वयात झालेला. त्यामुळे त्यांचा छोटूवर फार जीव अन् आईबापांची संपत्ती आपलीच आहे हे छोटूनं ठरवूनच टाकलं होतं.

बोलणं वागणं अगदी नम्र होतं छोटूचं. हात जोडून उभा राहिला की समोरच्याला भरूनच यायचं. रीमाच्या सासऱ्यांच्या बॉसचा तो मुलगा. त्यांचाही छोटूवर जीव होता. दिवसभरात एक दोन फेऱ्या त्याच्या सहजच व्हायच्या.

रीमाला म्हणायचा, ‘‘वहिनी, तुमचं माझं वय जवळजवळ सारखंच असेल पण तुम्ही कधी रिकाम्या नसता अन् मी कायम रिकामाच असतो.’’

‘‘तर मग कर ना काही काम. निदान शाळेत जा. अकरावी, बारावी करून टाक.’’

‘‘नाही जमणार मला.’’

‘‘कॉम्प्युटरचा कोर्स कर. चांगली नोकरी मिळेल.’’

‘‘बरं बघतो. पण वहिनी तुम्ही खरंच खूप स्वीट आहात.’’

रीमाला हसायला आलं.

‘‘तुम्हाला ठाऊक आहे का? तुमचं हसणं वेड लावतं मला. तुम्हाला हसताना बघितलं की चेहऱ्यावरून नजर हलत नाही. मला तर विवेकदादाचा हेवाच वाटतो.’’

‘‘असं काही तरी बोलू नकोस.’’ रीमा रागावून म्हणाली.

‘‘खरंच सांगतोय मी. तुमचे डोळे. तुमचं हसणं एकदा कुणी बघेल, ऐकेल तर जन्मभर विसरणार नाही.’’

‘‘तू आता निघ अन् काहीतरी अभ्यास सुरू करशील तेव्हाच भेटायला ये.’’ रीमा त्याला हाकलायला बघत होती.

‘‘तुम्हाला ही सगळी चेष्टा वाटतेय? मी खरं सांगतो. काय सुंदर फिगर आहे तुमची. दोन मुलांची आई तर वाटतंच नाही तुम्ही. लोकांना अजूनही वाटतंय तुम्ही लग्नाची मुलगी आहात म्हणून!’’

‘‘आता पुरे. तू निघ. मला संताप अनावर होईल असं काही बोलूही नकोस.’’ पटकन् तोडून टाकत रीमानं म्हटलं अन् ती सरळ आपल्या खोलीत निघून आली.

स्वत:च्या खोलीतल्या डे्सिंग टेबलसमोर उभी राहून तिनं आपल्या प्रतिबिंबाकडे बघितलं. ती खरोखर सुंदरच होती. लग्न झालं नसतं तर इतर मैत्रिणींप्रमाणे युनिव्हर्सिटीत किंवा कॉलेजातच पीएचडी करत असती. पण कॉलेजचं आयुष्य फारच लवकर संपलं. संसाराच्या रामरगाड्यात कसंबसं शिक्षण पूर्ण करू शकली. एक मात्र खरं की नवरा सतत तिच्या पाठीशी होता. त्यानं तिच्या शिक्षणाला प्रतिबंध केला नाही. संसार, मुलं सांभाळून अभ्यास करणं, परीक्षा देणं सोपं नक्कीच नव्हतं. पण ते तिनं जिद्दीनं केलं.

जुन्या आठवणी कशाला अन् किती काढायच्या म्हणत ती आरशासमोरून बाजूला झाली. पण मन मात्र भूतकाळातून बाहेर यायला तयार नव्हतं.

तिच्या माहेरी चुलत बहिणीचं लग्न होतं. विवेकपाशी खूप हट्ट करून त्याच्यासह ती मुलांना घेऊन माहेरी आली होती. स्वत:च्या लग्नातही ती ब्युटी पार्लरला गेली नव्हती. यावेळी मात्र नवरीच्या जोडीनं तिनंही सगळे सोपस्कार करून घेतले होते. नटूनथटून ती विवेकसमोर येऊन उभी राहिली, तेव्हा क्षणभर तो बघतच राहिला. मग जरा करडेपणानं म्हणाला, ‘‘इतकं नटायची काय गरज होती? लग्न तुझं नाहीए…’’

‘‘माझ्या बहिणीचं आहे. अन् आईबाबा, बाकीचे कुठं गेले? मुलं…?’’

‘‘सगळे टॅक्सीनं पुढे गेलेत. तुझं नटणं संपेना…घर लॉक करून या म्हणून सांगितलंय…दादाने त्याची बाईक ठेवलीय…आपण बाईकनं जाऊयात.’’ विवेकनं म्हटलं.

‘‘तर मग चला नं लवकर,’’ ती उतावळेपणानं म्हणाली.

‘‘बाइकची किल्ली तर आण. ती वर बेडरूममध्येच आहे.’’

माहेरच्या घरातली रीमाची खोली अजूनही तिच्यासाठीच राखून ठेवलेली असते.

‘‘प्लीज अहो, तुम्हीच आणा ना वरून? हा लेहंगा घालून जिना चढणं, उतरणं फार त्रासदायक होतं.’’ तिनं म्हटलं.

‘‘तर मग बसा घरीच.’’ विवेक म्हणाला.

रागानं रीमा उठली अन् जिना चढून खोलीत आली. पलंगावरच किल्ली होती. किल्ली उचलून ती वळतेय तोवर विवेकनं तिला मिठीत घेतली अन् दोघंही बेडवर कोसळली. विवेकच्या प्रेमाला उधाण आलं होतं.

‘‘अहो असं काय करताय? माझा सगळा मेकअप बिघडला ना? कसंबसं स्वत:ला सोडवून घेत रीमानं म्हटलं, लवकर निघायला हवं. सगळे तिथं वाट बघत असतील?’’

‘‘बघू देत वाट! मला आता धीर निघत नाहीए…’’

‘‘प्लीज, आपण लवकर घरी येऊ…पण आता चला ना?’’

‘‘तू तिथे गेलीस की रमशील आपल्याच लोकांमध्ये,’’ विवेकनं मिठी अधिकच घट्ट केली. एक चुंबन घेतलं.

‘‘प्रॉमिस! लवकर घरी येऊ. पण आता चला.’’ विवेकनं किल्ली घेतली अन् जिना उतरू लागला. पटकन् स्वत:चा अवतार ठिकठाक करून ती ही निघाली.

लग्नाच्या हॉलमध्ये विवेक सतत तिच्याजवळ होता. नातलग मैत्रिणी सर्वांनी किती चेष्टा केली तिची. विवेकला तिच्या नटण्यावर एवढ्यासाठीच आक्षेप होता की तिचं सौंदर्य आणखी कुणी बघावं हे त्याला आवडत नव्हतं. आपण होऊन तो कधी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत नसे, पण त्याचा स्वभाव आता तिला कळला होता.

विवेक नसताना तिला किती उदास वाटतं. ते दुसऱ्याला समजणार नव्हतं. दिवसा घरकाम, मुलं, शाळा या सगळ्यात वेळ जायचा. पण रात्री मात्र फार लांबलचक अन् कंटाळवाण्या वाटायच्या. घरात लॅन्डलाइन फोन होता. विवेकचा फोन बरेचदा सासू, सासरे किंवा दिर उचलायचे. रीमाला कधी तरी बोलायला मिळायचं.

त्या दिवशी मात्र फोन तिनंच उचलला. विवेक म्हणाला तो मंगळवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान घरी पोहोचतोय. त्यानं तिला अर्ध्या दिवसाची सुट्टी घे म्हणूनही बजावलं. मुलांना रिक्शा करून घरी येऊ दे, हेही सांगितलं. ‘‘दुपारी तू मला हवी आहेस.’’ तो म्हणाला.

‘‘अहो पण रात्री घरीच आहात ना?’’

विवेक एकदम रागावला, ‘‘मग मी सुट्टी कॅन्सल करतो?’’

‘‘बरं बर, मी घेते सुट्टी…रागावू नका,’’ तिनं हॉलमध्ये नजर फिरवली. सुर्दैवानं तिथं कुणी नव्हतं. एक तर फोन अगदी भर चौकात असावा अश्या जागी अन् यांना रोमान्स सुचतोय…

तिनं घरात सकाळीच सांगितलं लंच टाइमपर्यंत विवेक येतोय. शाळेत मंथली टेस्ट चालू होत्या. शाळेत प्रिसिंपलच्या परवानगीनं कॉम्प्युटरचे पेपर्स सकाळीच आटोपून घेतले. घरी एक समारंभ आहे म्हणून हाफ डे घेतेय सांगून वेळ मारू नेली.

ती शाळेच्या गेटपाशी पोहोचतेय तोवर छोटू मोटरसायकल घेऊन समोर आला.

‘‘वहिनी, घरी जायचंय?’’

‘‘चला, मी सोडतो.’’

खरं तर रिक्शा मिळाली असती तर बरं झालं असतं. पण रिक्शा लवकर मिळेलच याची खात्री नाही. उशीर झाला तर पुन्हा विवेक चिडेल.

‘‘कसला विचार करताय वहिनी? आज लवकर कशा काय निघालात?’’

‘‘जरा बरं वाटत नाहीए…’’

‘‘वहिनी, थोडं स्वत:कडेही लक्ष द्या. तुम्ही ना, फारच भोळ्या आहात. दादा तिकडे मजा करतोय अन् तुम्ही मात्र इथं सतत खपताय.’’

‘‘कसली मजा अन् कसलं काय? एकटे राहतात, घरचं जेवण नाही, सतत प्रवास. हे सगळं ते आमच्यासाठीच करताहेत. मुलांच्या भवितव्यालाठीच सगळं चाललंय.’’

‘‘या गोष्टी फक्त बोलायच्या असतात. तिथं तर नाइट क्लब, दारू, पोरी सगळंच असतं. कोण बायकोची आठवण काढतंय?’’

तिला वाटलं सांगावं छोटूला की विवेक आताही घरी तिची वाट बघत तळमळतोय. पण ती काही बोलली नाही. घरापाशी मोटर सायकलवरून उतरल्यावर कोरडेपणानंच म्हणाली, ‘‘चहा घेऊन जा.’’

‘‘नको…तुम्हाला बरं नाहीए. पण नंतर येतो. जरा काही कॉम्प्युटरबद्दल विचारायचं आहे.’’

‘‘बराय, पुढल्या पंधरवड्यात ये. आता मुलांच्या टेस्ट चालू आहेत.’’

‘‘तुमची आज्ञा शिरसावंद्य स्वीट वहिनी.’’ झटक्यात बाइक वळवून तो निघून गेला अन् रीमानं सुटकेचा नि:श्वास सोडला.

सासूसासरे व्हरांड्यातच बसलेले होते. ‘‘आज लवकर कशी आलीस? विवेक आलाय म्हणून का? त्याचं जेवणखाणं झालंय..तू काळजी कशाला करतेस?’’ सासूनं म्हटलं.

काही न बोलता खाली मान घालून ती खोलीकडे निघाली. ‘‘अगं तो झोपला असेल, तू आमच्यासाठी चहा कर बरं!’’ सासरे म्हणाले.

खोलीत विवेक उतावीळपणे तिची वाट बघत होता. त्यानं जणू झडपच घातली तिच्यावर. ‘‘किती दिवस झाले तुला भेटून.’’

‘‘फक्त एकच महिना.’’ तिनं हसून म्हटलं. त्याच्या प्रेमवर्षावात ती चिंब भिजली. विवेकनं तृप्त चेहऱ्यानं तिच्याकडे बघत म्हटलं, ‘‘मी आता झोपणार आहे. तू काय करणार आहेस?’’

‘‘मला आधी जरा तोंड हातपाय धुवून कपडे बदलून घेऊ देत. सासूबाईंना चहा हवा होता. मुलंही येतच असतील. अजून जेवण व्हायचंय माझं…तुम्हाला काय? झोपा आता मुकाट्यानं.’’ तिनं त्याचे केस विस्कटून टाकत हसून म्हटलं.

त्या दिवशी सासूसासऱ्यांशी, दोघी जावांशी अगदी मुलांशीही तिला खोटं बोलावं लागलं होतं.

विवेक रजा संपवून निघून गेला होता. तिनं कपाट आवरायला घेतलं होतं. सुट्टीचा दिवस होता. पुस्तक काखोटीला मारून छोटूनं घरात प्रवेश केला. सरळ तो तिच्या बेडरूममध्येच आला. ती दचकली. सावरून म्हणाली, ‘‘चल बाहेर, व्हरांड्यातच बसूयात.’’

‘‘चालेल ना.’’ पलंगावर बसत तो म्हणाला, ‘‘तुमचा बेड खूपच छान आहे हं! पण एकटीला तुम्हाला यावर झोप येत नसेल ना?’’

काही उत्तर न देता रीमा खोलीबाहेर पडली. मागोमाग छोटूही आला.

‘‘वहिनी, मी मस्करी करत होतो. तुम्ही तर रागावलात.’’

रीमाला जाणवत होतं, विवेक इथं नसताना छोटूची मस्करी मर्यादा ओलांडते. ती जितकी त्याला टाळायला बघते तेवढी त्याच्याकडून मदत घ्यावी लागते. मध्ये ऋचा पायऱ्यांवरून पडली. भरपूर रक्त आलं. छोटूंनच ओळखीच्या डॉक्टरकडे नेऊन जखमेला टाके घातले. पुढेही दोन दिवस फॉलोअपसाठी त्याच्याच गाडीतून तो रीमाला व तिला नेत होता.

खेळताना मुलाचा पाय मुरगळला. छोटूचीच मदत होती. सासूबाईंचं ब्लडप्रेशर शूट झालं. छोटूनं धावपळ केली. त्याचे उपकार घेतले म्हणताना तिला त्याला तोडूनही टाकता येत नव्हतं.

एक दिवस आला अन् म्हणाला, ‘‘मी हल्ली विमा एजंट झालोय. एक पॉलिसी तर तुम्हाला घ्यावीच लागेल.’’

रीमानं ऋचाच्या नावानं एक पॉलिसी घेतली. कारण घेतली नसती तर तो घरातून हलणार नाही हे तिला ठाऊक होतं.

‘‘याला म्हणतात समजूतदारपणा. यू आर रीयली स्वीट वहिनी.’’ छोटूनं म्हटलं.

‘‘दादा कधी येणार आहेत?’’

‘‘तुला का आठवण येतेय त्यांची?’’ रीमानं रागानं विचारलं.

‘‘तुमचा एकटेपणा बघवत नाहीए मला. हे इतकं तरूण वय काय असं एकट्यानं झुरण्याचं वय आहे का?’’

‘‘असतात काही काळासाठी तसे योग.’’

‘‘पण तुम्ही असं विरक्त का राहायंच…छान मौजमजा करायची.’’

‘‘म्हणजे काय?’’ तिनं मुद्दामच विचारलं.

‘‘वहिनी, तुमच्याकडे तर डबल लायसेन्स आहे.’’

छोटू मर्यादा ओलांडतो आहे हे लक्षात आलंच होतं. एकदा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकावा म्हणून तिनं विचारलं, ‘‘मौजमजा करायला लायसेन्स लागतं?’’

‘‘म्हणजे एक तर तुम्ही विवाहित आहात, त्यातून तुमचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशनही झालंय. आता तर मुक्त पक्ष्यांप्रमाणे आकाशात भरारी घ्यायची.’’

‘‘म्हणजे काय? मला काहीच कळलं नाही.’’

‘‘वहिनी, अगं तुझा हा भाबडेपणाचं मला वेड लावतो. अगं, दादा दिल्लीला दुसऱ्या कुणा स्त्रीबरोबर मजा करतो. तसं तूही इथे कुणा दुसऱ्याबरोबर मजा करायची.’’

इतका संताप आला रीमाला, पण तसं न दाखवता तिनं म्हटलं, ‘‘हा तर माझ्या पतीचा विश्वासघात ठरेल.’’

‘‘नाही, अजिबात नाही. हा तर फक्त थोडासा टाइमपास असतो. समजायचं एक सिनेमा बघितला. सिनेमा संपला की तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी.’’

‘‘अजून लग्न झालं नाहीए तुझं, म्हणूनच तुला या नात्याचं पावित्र्य, त्याच्या मर्यादा, त्याचं महत्त्व कळत नाहीए. तुझं लग्न होऊ दे. मग मी सांगेन तुला की एक सिनेमा तुझ्या बायकोचा विवेकनाही दाखव, मग कसं वाटेल तुला.’’

‘‘मला काही वाटणार नाही. मी संकुचित विचारांचा नाही. मोकळ्या विचारांचा आहे. माझी बायको काय करते यानं मला फरक पडणार नाही.’’ छोटू वरवर बेपर्वाइनं बोलला पण त्याचा चेहरा पडला होता.

रीमानं जणू त्याला आव्हानच दिलं. ‘‘ठिक आहे, तू आपल्या बायकोला खरोखर एवढं स्वातंत्र्य देतोस का? ते मी ही बघेनच! मग कळेल की बोलतो तो खरंच करतो का की फुकटचीच वटवट असते.’’

वर्षभरातच विवेकबरोबर ती कानपूरला गेली. बिऱ्हाड मांडलं. खूप आनंदात होती रीमा, एक दिवस अचानक छोटूचा फोन आला.

‘‘बऱ्याच दिवसांनी आठवण आली आमची? कसा काय फोन केलास?’’ आश्चर्यानं रीमानं विचारलं.

‘‘काय वहिनी, माझ्या लग्नाला आला नाहीत तुम्ही?’’ जरा नाराजीनं त्यानं म्हटलं.

‘‘तू आम्हाला पत्रिकाच पाठवली नाहीस. तिथल्या घरी दिली असशील. त्यांनी तर लग्न झाल्यावरच आम्हाला कळवलं…असू दे, काही हरकत नाही. तुला अन् तुझ्या वधूला खूप खूप शुभेच्छा…’’

‘‘वहिनी, एक काम होतं, म्हणून फोन केला. माझ्या बायकोला बी.एडसाठी कानपूरच्या कॉलेजात एडमिशन मिळालं आहे. तिला राहाण्यासाठी एखादी जागा बघाल का?’’

‘‘अरे व्वा! ही तर आनंदाची बातमी आहे. घराची काळजी करू नकोस. इथं आमचा थ्री बेडरूम फ्लॅट आहे. दोन आम्ही वापरतो. एक तर बंदच असतो. तुम्ही तिथं राहू शकता. काहीच त्रास होणार नाही. तू तर म्हणालाच होतास ना की तुझी बायको फिल्मपण दाखवेल, तर दादाही इथं आहेत. ते तिची काळजी घेतील. तू येच बायकोला घेऊन.’’

खाट्कन फोन बंद झाला. याचा अर्थ छोटूची बायको त्यांच्याकडे येणार नाही.

रीमाला हसायला आलं. ती तर चेष्टा करत होती अन् छोटू घाबरला होता.

विवेक पाणी पिण्यासाठी आत आला होता. रीमाला हसताना बघून त्यानं विचारलं, ‘‘काय झालं?’’

‘‘काही नाही,…मला एक सांगा, छोटूकडून घेतलेल्या पॉलिसीची मुदत कधी पूर्ण होतेय?’’

‘‘पुढच्याच वर्षी. दोन लाख मिळतील. लेकीच्या लग्नाची सोय झालीय…पण तू का विचारते आहेस?’’

‘‘सहजच! एक तरी काम चांगलं केलं छोटूनं.’’

‘‘त्यानं वाईट काम काय केलं होतं? मला ही कळू देत.’’ विवेकनं म्हटलं.

‘‘त्यानं वाईट काम केलं असं मी कधी म्हटलं.’’

‘‘तुम्हां बायकांशी वाद कुणी घालायचे? जाऊ दे झालं.’’

‘‘हे मात्र बरोबर बोललात.’’ रीमा हसत म्हणाली.

मनात म्हणाली, ‘‘काट्यानं काटा निघाला.’’

स्वस्ती

कथा * शकुंतला साठे

‘‘सुकेतु, स्वाती ताई अन् नकुल भावजी येताहेत उद्या. तू त्यांना एअरपोर्टवरून घरी आणशील का? माझ्या ऑफिसात बाहेरून एक डेलीगेशन येतंय, मला उद्या रजा घेता येणार नाही,’’ स्वस्तीनं नवऱ्याला म्हटलं.

‘‘मला नाही जमणार. तू फोन कर त्यांना, टॅक्सी करून येतील ते.’’ सुकेतु लॅपटॉपवरची नजर न हटवता म्हणाला.

‘‘आपल्या लग्नानंतर प्रथमच येताहेत ते दोघं. त्यांना काय वाटेल? तुझी बहीण आली होती, तेव्हा तू आठवडाभर घरून काम केलं होतंस, आता एक दिवसही जमणार नाही?’’

‘‘माझी बहीण आपला सुखी संसार बघायला आली होती. आपण किती सुखी दिसलो कुणास ठाऊक, पण ती मात्र फारच नर्व्हस अन् उदास झाली होती. तेव्हाच मी ठरवलं होतं की आपला पैसा वेगळा, आपले मित्र वेगळे, तू तुझं, मी माझं काम करतो तसेच नातेवाईकही वेगळेच ठेवायचे. काय?’’ सुकेतुनं असं म्हटल्यावर स्वस्तीचा जळफळाट झाला.

सहा वर्षं त्यांचं प्रेमप्रकरण चाललं होतं, त्यानंतर दोघांचं लग्न झालं. अजून लग्नाला वर्षही झालं नव्हतं, पण त्यांच्यातलं प्रेम पार आटलं होतं. अगदी कोरडं ठाक पडलं होतं. दोघंही एकमेकांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नसत. लग्नानंतर ती दोघं मधुचंद्राला गेली त्याच रात्री त्यांचं इतकं कडाक्याचं भांडण झालं की त्या पंचतारांकित हॉटेलच्या मॅनेजरनं त्यांना अत्यंत नम्रपणे, शालीनपणे हॉटेल सोडून जायला सांगितलं.

‘‘आम्ही आठवडाभराचे सर्व पैसे आगाऊ भरले आहेत,’’ स्वस्ती संतापून किंचाळली. सुकेतु मात्र शांत होता.

‘‘मॅडम, तुम्ही बरोबर म्हणताय, पण आम्ही आमच्या इतर कस्टमरला नाराज नाही करू शकत. एडव्हान्स भरलाय, पण तुम्ही आमच्या कपप्लेट्स, चादरी, उशा अन् फर्निचरची जी अवस्था केली आहे, त्याचा भुर्दंड द्यावाच लागेल. जे काही उरेल ते आम्ही परत करू.’’ अत्यंत नम्रपणे मॅनेजरनं सांगितलं.

मुकाट्यानं दोघंही आपल्या सूटमध्ये गेले. आता पुढे काय करायचं यावर संवाद व्हायला हवा होता. पण दोघांमध्ये अबोला होता, मग बोलणार कसं?

सुकेतु सोफ्यावरच आडवा झाला. मऊ गुबगुबीत किंगसाइज डबलबेडवर स्वस्ती रात्रभर कूस बदलत तळमळत होती. दोघांमध्ये एका शब्दाचंही संभाषण नव्हतं.

दुसऱ्या दिवशी नव्या जोडप्याची ख्याली खुशाली जाणून घेण्यासाठी दोघांच्या घरून फोन आले तेव्हा आपसूकच बोलणं सुरू झालं. कसा बसा तो काळ दोघांनी काढला. कारण परतीचं रिझर्वेशन होतं, त्या आधी घरी जाणं शक्यच नव्हतं.

सुकेतुच्या घरी काही औपचरीकतांसाठी त्यांना थांबावं लागलं. दोघांचे उतरलेले चेहरे बघून सुकेतुच्या आईला काहीतरी शंका आली.

‘‘काय झालंय? तुम्ही दोघंही ताणांत दिसताय. सुखी, आनंदी वाटत नाही आहात…’’ मुलाला खोलीत एकट्याला बघून आईनं विचारलंच.

‘‘आई, काय बोलू तेच कळत नाहीए. खरं तर मला काहीच समजत नाहीए. स्वस्तीशी लग्न करून मी आयुष्यातली फार मोठी चूक केली आहे असं मला वाटतंय. आम्ही दोघं एकत्र राहू शकणार नाही.’’

‘‘अरे, भलंतच काय बोलतोस? गेली सहा वर्षं तू तिच्या प्रेमात आहेस. आम्ही तर तुला म्हणत होतो की धाकट्या बहिणीचं लग्न आधी होऊन जाऊ दे, मग तुम्ही लग्न करा, पण तू मुळीच ऐकायला तयार नव्हतास…’’

‘‘खरंय आई, त्या वेळी मी तिच्या प्रेमात वेडा झालो होतो. पण तिचं पितळ आता उघडं पडलंय. आता तर वाटतंय की असा वेडेपणा मी कसा काय केला? कधी काळी आम्ही प्रेमात होतो हेच खरं वाटत नाहीए.’’ थकलेल्या आवाजातलं दु:ख लपवता येत नव्हतं सुकेतुला.

‘‘हे तर फारच विचित्र होऊन बसलंय…आम्हाला वाटलं होतं, या लग्नामुळे तू खूप आनंदात राहशील. तुझ्या आनंदातच आमचाही आनंद होता. इथं तर तुलाच सुख नाहीए. मला वाईट एवढंच वाटतंय की सहा वर्षांच्या सहवासातूनही तुला स्वस्तीची ओळख पटली नाही…’’

‘‘सोड गं तो विषय…उगीच काळजी करू नकोस. थोडे दिवस वाट बघतो…नाहीच जुळणार वाटलं तर सरळ घटस्फोट घेऊन वेगळा होईन…’’

‘‘छे रे, भलंतच काय बोलतोस? अरे, आपल्या घराण्यात असं कधी घडलेलं नाहीए. आता कुठं लग्नाला चार दिवस होताहेत. नव्या नवरीला रूळायलाही थोडा वेळ लागतोच! लगेच घटस्फोटाच्या गोष्टी कशाला?’’ आई अगदी रडकुंडीलाच आली होती.

‘‘अगं, मी तरी कुठं उद्याच वेगळा होतोय? सहा वर्षं जुनं प्रेम आहे. लग्न निदान सहा महिने तरी चाललं पाहिजे. अन् कोणत्याही कुटुंबात एखादी घटना पहिल्यांदा घडतेच! अन् लग्न म्हणजे आयुष्यभर सक्तमजुरीची शिक्षा थोडीच आहे…मरेपर्यंत भोगायची असं काही नाहीए…’’ सुकेतु उदासपणे बोलला. पण आईचं दु:ख त्याला फारच बोचत राहिलं. पलिकडच्या खोलीत स्वस्तीनं सगळं ऐकलं होतं.

आज स्वस्तीशी भांडण झाल्यावर त्याला आईची प्रकर्षानं आठवण आली. त्यानं आईला फोन लावला.

‘‘काय झालं रे सुकेतु? आज एकदम माझी आठवण कशी काय आली?’’

‘‘असं का म्हणतेस आई? अगं ज्याला विसरतो त्याची आठवण काढावी लागते. तू तर सतत मनातच असतेस ना?’’

‘‘अरे व्वा! बरं वाटलं ऐकून. कसा आहेस तू?’’

‘‘अगं, उद्या स्वस्तीची ताई आणि भावजी येताहेत. त्यामुळे ती खूपच खुषीत आहे. मला म्हणाली, ‘‘त्यांना एअरपोर्टवरून घरी आणशील का? तिला उद्या खूपच महत्त्वाची मिटिंग आहे ऑफिसमध्ये.’’

‘‘मग?’’

‘‘मग काय? मी म्हटलं मला ही खूप कामं आहेत. तू अन् तुझी ताई काय ते बघून घ्या.’’ सुकेतु हसत म्हणाला.

‘‘सुकेतु, अरे काय हे? तू असा वागलास? तू तर अगदी अनोळखी माणसांसाठीसुद्धा मदतीला धावून जाणारा मुलगा अन् बायकोच्या बहिणीसाठी असं म्हणालास? अरे पाहुणे म्हणजे अतिथी…ते माझे तुझे नसतात. सगळ्यांचे असतात. आपले असतात.’’ आईनं समजावून सांगितलं.

‘‘आई, सोनमदीदी अन् भावजी आले होते ना, तेव्हा स्वस्तीसुद्धा त्यांच्याशी अगदी परकेपणानं, दुराव्यानंच वागली होती. ती गोष्ट मी कशी विसरेन?’’

‘‘संसारात असं वागायचं नसतं, कुणी ढेकूळ घेऊन मारलं म्हणून आपण दगड मारायचा का? तुम्ही नवराबायको आहात, सगळं आयुष्य एकत्र काढायचं, अशावेळी थोडा समजूतदारपणा दाखवला, मैत्रीचा, मदतीचा हात पुढे केला तर गोष्टी खूपच सोप्या होतात.’’

‘‘आई, तुला नेहमी माझीच चूक का दिसते? स्वस्तीच्या वागणुकीला तसंच उत्तर नाही दिलं तर त्याचा अर्थ मी पराजय स्वीकारला असा होईल अन् हरणं, पराजय मला मान्य नाही हे तुलाही ठाऊक आहे.’’

‘‘खरं सांगू बाळा, हरणं, जिकणं, जय पराजय असा विचार मी केला नाही, करत नाही. संसार म्हणजे रणक्षेत्र नाही…मला वाटतं, तू उद्या स्वातीला आणायला जा…बरं, ते जाऊ दे…बाकी कसं काय?’’

‘‘तसं बरं चाललंय, तू अन् बाबा इथं या ना, काही दिवस…आलात तर मला बरं वाटेल.’’

‘‘बघूयात…नंदिताचं लग्न ठरतंय, बहुधा तुम्हालाच इकडं यायला लागेल.’’

पॅरेलल लाइनवरून स्वस्ती हे सगळं संभाषण ऐकत होती. तिला तिची आई आठवली. आईनं तिच्या मनावर हे बिंबवलं होतं की लग्नानंतर सासरच्या घरात आपली वागणूक अशी हवी की सगळ्यांनी घाबरूनच रहायला हवं. नाही तर सासू, नणंदा धारेवरंच धरतील. कमी जास्त कुणी बोललं तर पोलिसांत जाईन अशी धमकीही द्यायची. आईनं तिला स्वत:चं उदाहरण दिलं होतं, ‘‘अगं, तुझे बाबा अन् त्यांच्या कुटुंबीयांनी माझ्या आयुष्याचा सत्यानाश केला. मीच म्हणून टिकून राहिले. अन् आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. खूप सोसलंय मी. तुम्हा दोघींना मोठं करताना किती त्रास झाला माझं मलाच ठाऊक!’’

स्वस्तीसाठी आईचं प्रत्येक वाक्य काळ्या दगडावरची रेघ असायची. आईच्या परवानगीनंतरच तिनं सुकेतुशी प्रेमसंबंध वाढवले होते.

स्वस्तीला आठवलं, हनीमूनच्या भांडणानंतर जेव्हा ती सुकेतुच्या घरी गेली होती, तेव्हाही तिच्या सासूनं सुकेतुलाच समजावलं होतं. स्वस्तीला एका अक्षरानंही दोष दिला नव्हता… स्वस्ती विचार करत होती. पण स्वत:ची चूक कबूल करता येत नव्हती. अहंकार आडवा येत होता. मनात एक आशा निर्माण झाली होती की आईनं म्हटलंय तर कदाचित सुकेतु एअरपोर्टवर जाईलही. पण सुकेतु मख्खच होता. त्यानं काहीच म्हटलं नाही. शेवटी रात्री तिनं स्वातीला फोन केला की आम्ही एअरपोर्टवर रिसीव्ह करायला येऊ शकत नाहीए. तेव्हा प्लीज तुम्ही टॅक्सी करून घरी पोहोचा. स्वस्तीनं मोलकरणीलाही सगळ्या सूचना देऊन ठेवल्या होत्या की आलेल्या पाहुण्यांची सरबराई नीट व्हायला हवी.

तिची एकुलती एक बहीण प्रथमच नवऱ्याबरोबर स्वस्तीकडे येत होती. स्वस्ती जेव्हा मुंबईला शिकत होती. तेव्हा दर रविवारी ती अगदी हक्कानं स्वातीताईच्या घरी जायची. स्वाती आणि नकुल तिचं किती कौतुक करायचे. स्वातीला स्वयंपाकाची आवड होती. तिच्या हाताला उत्तम चव होती.

स्वस्तीला मात्र स्वयंपाकाचा आणि एकूणच घर कामाचा प्रचंड तिटकारा अन् कंटाळा होता. पण नकुलला बाहेरचं जेवण आवडत नाही म्हणून तिनं फ्रीजमध्ये भरपूर भाज्या, फळं वगैरे आणून ठेवली होती.

ऑफिसमधून स्वस्ती घरी परतली तेव्हा ड्रॉइंगरूममधून हसण्याखिदळण्याचे आवाज ऐकू येत होते. अभावितपणे तिचाही चेहरा हसरा झाला. स्वाती जिथं असेल तिथलं वातावरण नेहमीच आल्हाददायक असतं.

‘‘काय झालं? तुम्ही सगळे इतके का खिदळताय? मलाही कळू दे ना? भावजी, ताई, मला क्षमा करा. मी खूप प्रयत्न करूनही सुट्टी नाही घेऊ शकले. मला माझ्या बॉसचा इतका राग आला होता ना? खडूस आहे अगदी. ताई, मला सांग, आपण नोकरी कशासाठी करतो? आपल्याला अन् आपल्या माणसांना चांगलं आयुष्य जगायला यावं म्हणूनच ना?’’ स्वस्तीनं अपराधी आवाजात विचारलं.

‘‘स्वस्ती, अगं इतकी दु:खी होऊ नकोस. आमची क्षमा कसली मागतेस? आम्ही परके का आहोत? आणि बरं का, सुकेतुनं आमचं स्वागत, सत्कार, सरबराई इतकी छान केलीय की आम्हाला तुझी आठवणही आली नाही.’’ नकुलनं हसत हसत म्हटलं.

‘‘नकुल, नको चिडवूस तिला. बिचारी दमून भागून घरी आली आहे.’’ स्वातीनं म्हटलं.

‘‘हे बघा आता! मी तुझ्या लाडक्या बहिणीला कशाला चिडवू? मी तर केवळ हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की आमच्यासाठी स्वस्तीनं अपराधी वाटून घेण्याची गरज नाहीए. आम्ही एकदम मज्जेत आहोत.’’

‘‘ठाऊक आहे मला. मी नसताना सगळे मज्जेतच असतात. मला वाटतं माझा चेहराच असा आहे. माझा चेहरा बघितला की लोकांना त्रासच व्हायला लागतो.’’ स्वस्ती रडवेली होत म्हणाली.

‘‘आता हे तर सुकेतुच सांगू शकेल. आम्ही आजच आलोय अन् तुझा चेहरा आताच बघतोय,’’ थट्टेखोर न कुलला स्वस्तीला चिडवायला मजा वाटत होती.

‘‘बाय दे वे, तू नसताना आम्ही आनंदात राहू असं तुला का वाटलं? काय रे सुकेतु?’’

‘‘मी अशा प्रश्नांची उत्तरं देणं कधीच बंद केलंय?’’ सुकेतु शांतपणे म्हणाला. ‘‘एका कानानं ऐकायचं, दुसरीकडून काढून टाकायचं.’’

‘‘अरे व्वा! फारच लवकर ही कला आत्मसात केलीस की? मला अजून नाही जमलं?’’ नकुल खिदळत म्हणाला.

‘‘ऐकलंस ना ताई! जो माणूस माझं बोलणं एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं बाहेर टाकतो, त्याच्याशी संवाद कसा साधायचा?’’ स्वस्ती रागावून जरा कर्कश्शपणे म्हणाली.

‘‘स्वस्ती, तू तर एकदम रागावलीस, अगं ही सगळी गंमत चाललीय. ती अशा गोष्टी गंभीरपणे घेऊ नकोस.’’ स्वातीनं तिला समजावलं.

‘‘ताई, मी तर कधीचंच बोलणं बंद केलंय. मला मॉमनं आधीच सावध केलं होतं की आपल्या आणि सुकेतुच्या कुटुंबात कल्चरलचा फरक मोठा आहे. पण मी लक्ष दिलं नव्हतं.’’

‘‘असं आहे तर! म्हणजे सध्या तू मॉमच्या सल्ल्यानं चालते आहेस.’’ स्वातीनं हसून म्हटलं.

‘‘त्यात आश्चर्य कसलं? आईपेक्षा जास्त माझ्या आयुष्याची काळजी कोण करणार? खरं सांगायचं तर ती माझी मॉम आहेच, माझा मित्रही आहे, मार्गदर्शकही आहे.’’

‘‘अरे व्वा! ऐकून बरं वाटलं. आपल्याला भाऊ नाही म्हणून तू श्रावण बाळ व्हायचं ठरवलं आहेस का?’’ स्वातीनं हसून म्हटलं.

मोलकरीण सायंकाळचा स्वयंपाक करून गेली होती. गप्पा टप्पा करत जेवणं झाली. दोन्ही पुरूष हॉलमध्ये गप्पा मारत टीव्ही बघत होते अन् दोघी बहिणी पुन्हा गेस्टरूममधल्या पलंगावर बसून गोष्टी करू लागल्या.

‘‘ताई, मॉमबद्दल माझ्या मनांत खूपच सन्मान आणि आदर आहे. तिच्यासाठी मी काहीही करू शकते. पण आता प्रश्न तो नाहीए. सध्या ती माझं लग्न वाचवण्याच्या प्रयत्नांत आहे. ताई, तुला खोटं वाटेल, पण लग्नानंतर सुकेतु खूपच बदलला आहे. माझं काहीही ऐकून घेत नाही. प्रत्येक गोष्ट त्याच्याच इच्छेनं व्हायला हवी. मॉमने सांगितलंय मला, आतापासून वेसण घट्ट धरून ठेवली नाहीस, तर तो आयुष्यभर तुला पायताणासारखीच वागवेल. आताच सावध हो, सावधानी हटी दुर्घटना घट्टी.’’ स्वस्ती म्हणाली.

‘‘काय सांगतेस? हे सगळं तुला मॉमनं शिकवलंय? माझा विश्वास बसत नाहीए…पण तुला सुकेतुच्या तक्रारी आईकडे करायची काय गरज होती?’’

‘‘मी तक्रार नव्हती केली गं! पण तिनंच अगदी खोदून खोदून विचारलं. अन् शेवटी आईला आपल्या मुलीची काळजी वाटतेच ना?’’

‘‘स्वस्ती, मी आईला नावं नाही ठेवत, तिची तुझ्याविषयीची काळजी बरोबरच आहे, पण नवराबायकोचं नातं खूप नाजूक असतं. त्यात कुणा तिसऱ्याचा हस्तक्षेप फारच घातक ठरू शकतो…आणि आता तूही कुक्कुलं बाळ नाहीस, स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला शिक.’’

‘‘सोड गं ते, मला सांग, घरी कशी पोचलीस? घरी काही त्रास तर नाही ना झाला?’’

‘‘छे गं! काहीही त्रास झाला नाही. सुकेतु आम्हाला घ्यायला एअरपोर्टवर आलाच होता. घरी आल्यावरही आमचं खूप छान आतिथ्य केलं. स्वयंपाक बाई करून गेली होती, पण व्यवस्थित सर्व अन्न गरम करून वाढलं. दिवस अगदी मजेत गेला आमचा. फक्त तुझी उणीव भासत होती. सुकेतुच्या जोडीला तूही असतीस तर अजून मजा आली असती…’’

‘‘ताई, फक्त आजचा दिवसच फार महत्त्वाचा होता. उद्यापासून मी पाच दिवस रजा घेतलीय. खूप भटकूयात. खूप छान छान रेस्टॉरंट्स बघून ठेवलीत मी. छान छान पदार्थ मिळतात तिथे.’’

‘‘ए…, रेस्टॉरंट्स नकोत हं! नकुलला तर बाहेरचं जेवण अजिबात आवडत नाही. मलाही छान छान पदार्थ घरीच करायला आवडतात. आमचं या बाबतीत खूपच छान जमतं.’’

‘‘हाच तर प्रॉब्लेम आहे ना? बहुतेक पुरूषांना वाटतं, बायकोनं अख्खा दिवस स्वयंपाकघरात काढावा. मला तर मॉमनं आधीच सावध केलं होतं. तिला तुझं सतत स्वयंपाकघरात असणं मुळीच आवडत नाही…मीही तसंच करू नये म्हणून तिनं मला बजावलं होतं. आम्ही दोघं आपापलं जेवण, ब्रेकफास्ट स्वत:चा स्वत:च बनवतो.’’

‘‘सुकेतुलाही स्वयंपाकाची आवड आहे वाटतं?’’

‘‘खूप! खूपच आवडतं त्याला, पण मीच प्रोत्साहन देत नाही. कारण अगं, एक तर सतत सामान आणावं लागतं. स्वयंपाकघर खराब होतं मग गॅसची शेगडी, ओटा सगळं धुवा, स्वच्छ करा. म्हणूनच मॉमनं सांगितलं होतं… नवऱ्याची सवय बिघडवू नकोस, सर्व आयुष्य पश्चात्ताप करण्यातच संपेल. ताई, तुला एक गंमत सांगू?’’

‘‘बोल.’’

‘‘अगं, गेल्या वर्षांपासून आमचा गॅससिलेंडर संपलाच नाहीए. गॅस एजन्सीवाल्यांना वाटलं, आम्ही इथं राहतच नाही, म्हणून त्यांनी आमचं कनेक्शन काढून टाकलं होतं.’’ दोघी बहिणी खळखळून हसल्या.

‘‘हे पण मॉमनंच शिकवलं होतं का?’’

‘‘तसंही समज. लग्नानंतरचं आयुष्य कसं असतं याची मला कल्पनाच नव्हती. सासरी कसं वागायचं हे ही मॉमनंच शिकवलं. ती तर असंही म्हणते, नवऱ्याचं वजन आटोक्यात ठेवायचं असेल तर बायकोनं किचनमध्ये जाऊच नये. नवऱ्यालाही जाऊ देऊ नाही. खूप खाऊन उगीचच जाड, बेढब होतात नवरे.’’

‘‘म्हणूनच मॉमनं बाबांना घरातून अन् आयुष्यातून हाकलून लावलं.’’ स्वातीचा स्वर एकाएकी कडू जहर आणि तिरस्कारानं आतप्रोत होता. स्वस्ती दचकलीच!

‘‘काय सांगतेस ताई, माझा तर विश्वास बसत नाहीए.’’

‘‘नाही, काही नाही,’’ स्वत:ला सावरत स्वातीनं म्हटलं.

‘‘माझ्या तोंडून अवचित शब्द निघून गेले…’’

‘‘नाही ताई तू माझ्यापासून काहीतरी लपवते आहेस…तुला सांगावंच लागेल…काय लपवते आहेस?’’

‘‘अगं, त्यात लपवण्यासारखं काहीच नाहीए. मॉमनं जसं तुला वागायला शिकवलंय ना, ती स्वत: तशीच वागली, तिच्या आयुष्यात. तू खूप लहान होतीस, पण मला सगळं आठवतंय. पप्पांना भरपूर पगार होता. घरात स्वयंपाकी होता, पण आई स्वत: स्वयंपाक करत नसे, त्यालाही करू देत नसे. विचित्र हेकटपणा करायची. शेवटी बाबांनी त्याला काढून टाकलं. माझं बालपण तर केक, ब्रेड, पिझ्झा, बाहेरून मागवलेले खाद्यपदार्थ खातच सरलं. कधी कधी पप्पा स्वत: स्वयंपाक करायचे. मीही त्यांना मदत करायचे…कदाचित तेव्हापासूनच मला स्वयंपाक करणं आवडायला लागलं असावं…’’

‘‘मला तर बाबांचा चेहराही नीटसा आठवत नाहीए.’’ स्वस्ती विचारात गढली होती.

‘‘तुला नाही आठवणार…खूप लहान होतीस तू. आईबाबा वेगळे झाले, तेव्हा मीच दहा वर्षांची होते. मी कितीतरी दिवस रडत होते. पण मॉमला माझी दया आली नाही. मला खरं तर पप्पांजवळ राहायचं होतं. पण मॉमने परवानगी दिली नाही. काही दिवस पप्पा मला शाळेत भेटायला यायचे. कधी मला पैसे देऊन जायचे, कधी खाऊ, कधी खेळणी घेऊन यायचे. आईला हे कळलं तर तिनं शाळेत येऊन बाबांनी मला भेटू नये असं मुख्याध्यापकांना बजावलं. तिला भीती वाटत होती बाबा मला पळवून नेऊन त्यांच्याजवळ ठेवतील, तेव्हापासून माझ्या मनात आईविषयी राग आहे. मी तिच्यावर प्रेम करू शकले नाही. हे आईलाही कळत होतं. म्हणून तिनं मला होस्टेलला ठेवलं अन् आपलं कर्तव्य पूर्ण केलं.’’

‘‘मला आठवतंय, तू फक्त सुट्ट्यांमध्ये घरी यायचीस…किती मज्जा करायचो आपण…खूप छान वाटायचं.’’

‘‘मी फक्त तुझ्यासाठीच येत होते. आईला आपल्याकडे बघायला वेळ कुठं होता?’’

‘‘मला वाटतं, मॉमनं म्हणूनच मलाही होस्टेलला पाठवून दिलं होतं. पण तुझं कॉलेज सुरू झाल्यावर तर मला कुठंच करमत नव्हतं. घरी नाही, होस्टेलला नाही, शाळेतही नाही.’’

‘‘हो गं! खरं तर आपलं लहानपण एकाकीच होतं. अन् मॉमला तरी काय मिळालं? ज्यांना ती मित्र म्हणत होती ते सर्व लोक एक एक करून तिला सोडून गेले…मला तर वाटतं, एक रतन अंकल सोडले तर, कुणीच तिला विचारत नाहीए.’’ उदासपणे स्वाती म्हणाली.

‘‘नाव घेऊ नकोस त्या माणसाचं…त्यानंच आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलंय.’’ स्वस्ती एकदम रागानं म्हणाली.

‘‘आपल्या प्रॉब्लेमसाठी दुसऱ्यांना दोष देणं सोडून दे गं स्वस्ती, याक्षणी फक्त तू तुझा संसार बघ, तुझं घर विस्कटलेलं मला नाही सहन होणार,’’ अत्यंत मायेनं अन् कळकळीनं स्वातीनं म्हटलं.

‘‘तुला काय वाटतं, सगळा दोष माझाच आहे?’’

‘‘तुझी बहीण आहे मी. खोटं बोलणार नाही. दोष कुणाचा आहे असंही सांगणार नाही, पण तुझा संसार, तुझं घर फक्त तूच सांभाळू शकतेस, एवढं मात्र नक्की सांगेन.’’ स्वस्तीला जवळ घेत मायेनं स्वाती बोलली.

दारावर टकटकचा आवाज आला आणि नकुलनं हसत हसत खोलीत प्रवेश केला. ‘‘दोघी बहिणी खूप वर्षांनी भेटताहेत मान्य आहे मला, पण आज काय जागरणाचा बेत आहे का?’’

‘‘तुम्ही तर टीव्हीवर सुकेतुसोबत सिनेमा बघत होता, तुम्हाला आमची आठवण तरी होती का?’’ स्वातीनं हसून टोला मारला.

‘‘सिनेमा कधीच संपला…आता झोप येतेय.’’ नकुलनं म्हटलं.

‘‘खरंच. स्वस्तीही दमलेली आहे. आता झोपायलाच हवं, चलो, गुडनाइट.’’

स्वस्ती आपल्या खोलीत आली…पण डोळ्यात झोप नव्हती. स्वातीचे शब्द मनांत रूतून बसले होते.

ताज्या, गार वाऱ्याची झुळुक यावी तसे नकुल-स्वाती आले होते. चार-पाच दिवस राहून निघून गेले. गप्पा-टप्पा, हसणंखिदळणं यानं दुमदुमणारं घर पुन्हा शांत अबोल झालं.

त्यादिवशी सुकेतु आपल्या लॅपटॉपवर नेहमीप्रमाणे काम करत होता. तेवढ्यात स्वस्तीनं हळूच येऊन त्याच्या गळ्यात हात टाकले. सुकेतुला आश्चर्यच वाटलं. असा प्रेमळ स्पर्श अलिकडे तो विसरलाच होता.

‘‘साडेआठ वाजलेत, आपण जेवून घेऊयात. अन्न गार होतंय.’’

सुंदर मांडलेलं डायनिंग टेबल अन् येणारे खमंग वास यामुळे सुकेतु गडबडलाच!

‘‘कुठुन मागवलंय?’’ त्यानं विचारलं.

‘‘मी स्वत: स्वयंपाक केलाय.’’ स्वस्तीनं हसत म्हटलं.

मंद आवाजातलं वाद्य संगीत, उदबत्तीचा सुंदर वास ‘‘व्वा!’’ अभावितपणे सुकेतु उद्गारला. ‘‘स्वातीताई थोडी आधीच यायला हवी होती नाही का?’’ स्वस्ती फक्त हसली पण स्वातीताई विषयीची कृतज्ञता तिच्या चेहऱ्यावरून ओसंडत होती.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें