भरलं घर की राजाराणीचा संसार

कथा * पौर्णिमा अत्रे

‘‘हे स्थळ मला सर्वार्थानं योग्य वाटतंय. एकदा तनूला विचारून घेतो अन् मग फायनल करून टाकू,’’ गिरीशनं आपल्या बायकोला, सुधाला म्हटलं.

‘‘हो, पण तिनं आधी होकार तर द्यायला हवा ना? त्रस्त झालेय या मुलीपायी. इतकी छान छान स्थळं येताहेत पण काही तरी खुसपट काढून नाकारतेय ती सगळ्यांना. त्यातून एकत्र कुटुंब म्हटलं की संतापतेच! आता मात्र मी तिचं अजिबात ऐकून घेणार नाही. आता खरं म्हणजे हे स्थळ तिच्या अपेक्षेनुरूपच आहे, पण एकच डोक्यात घेऊन बसलीय की एकत्र कुटुंबात सून म्हणून जाणार नाही…काही तरी एकेक खुळं या मुलींची!’’ सुधानं म्हटलं.

तुला माहीत आहे ना, हे सगळं त्या तिच्या लाडक्या मैत्रिणीमुळे झालंय. अशी पूर्वी नव्हती आपली तनु, पण हल्ली त्यांच्यावर आई वडिलांपेक्षा मित्र मैत्रिणींचाच प्रभाव जास्त असतो.

नवरा बायको सचिंत चेहऱ्यानं बोलत असतानाच तनु ऑफिसातून घरी परतली. आईवडिलांचे चेहरे बघून तिनं हसून विचारलं, ‘‘आज पुन्हा एखादं स्थळ आलेलं दिसतंय?’’

तिचा हसरा चेहरा अन् विचारण्याची पद्धत यामुळे आईवडिलांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. तिघांनी एकत्र बसून चहा घेतला. मग सुधानं म्हटलं, ‘‘हे स्थळ खरंच छान आहे. इथं लखनौमध्येच मुलाचे आईवडिल त्यांच्या थोरल्या लेकसुनेसह राहताहेत. धाकटा मुंबईला असतो. तो एका औषधांच्या कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर आहे.’’

तनुनं क्षणभर विचार केला. मग हसून म्हणाली, ‘‘म्हणजे, तो तिथं एकटा राहतो?’’

‘‘होय.’’

‘‘तर मग हरकत नाही…फक्त त्याच्या आईवडिलांनी वारंवार मुंबईला येऊन धडकू नये…’’

‘‘कसं गं बोलतेस तनु? अगं त्याचे आईवडिल आहेत. ते काय आपल्या मुलाकडे येऊन राहू शकत नाहीत? अशी, इतकी तुसडी अन् माणूसघाणी कशी गं झालीस तू? हे काय नवीनच फॅड तुझं? आम्हाला आजही वाटतं, घरात कुणी वडिलधारं असावं…पण सगळेच खूष आणि निवर्तले अन् तुला घरात फक्त नवरा हवाय…अगं सासरच्या घरात किती तरी नाती असतात. नातलग असतात…ते ही सगळं महत्त्वाचंच असतं…’’ जरा चिडूनच सुधानं म्हटलं.

‘‘नाही…नाही आई, मला भीती वाटते…रिया सांगत होती.’’

सुधा तडकन् उठून उभी राहिली. संतापून म्हणाली, ‘‘नाव नको घेऊस तिचं, आचरट पोरगी…त्या पोरीमुळे आमची चांगली गुणाची पोर बिघडली आहे. बुद्धीभेद केलाय तिनं तुझा. अगं, आपलं फक्त तीन माणसांचं कुटुंब. तुला तर भरल्या घराची, मोठ्या कुटुंबाची किती हौस होती. पण या रियानं निगेटिव्ह गोष्टी सांगून तुझं डोकं बिघडवलंय.’’

तनुला पण राग आला. ती ही रागाने धुमसत आपल्या खोलीत निघून गेली. गिरीश अन् सुधा प्रश्नार्थक मुद्रेनं एकमेकांकडे बघत होती.

तनूची पक्की मैत्रीण रियाचं लग्न सहा महिन्यांपूर्वी दिल्लीतल्याच एका कुटुंबात झालं होतं. घरी सासूसासरे अन् नवरा अनुज अशी मंडळी होती. एक मोठा दिर वेगळा राहत होता अन् नणंदेचं लग्नही वर्षभरापूर्वीच झालं होतं. चांगलं नामांकित, समृद्ध कुटुंब होतं. रियाही नोकरी करत होती. तनुकडूनच रियाची बातमी सुधाला कळायची. दिवसा दोघी व्हॉटसअॅपवर चॅटिंग करायच्या. सुट्टीच्या दिवशी एकमेकींशी भरपूर गप्पा व्हायच्या. जे काही बोलणं कानांवर पडायचं त्यावरून सुधाला एवढं जाणवलं होतं की रिया सतत सासूसासरे अन् नवऱ्याबद्दल तक्रारी सांगत असते. ती तनुची लाडकी मैत्रीण होती. तिच्याबद्दल काहीही म्हटलेलं तनुला आवडत नसे. पण तनु आईला मात्र सगळं सांगायची. त्यामुळेही सुधाला रियाबद्दल बरंच काही कळत असे.

एकदा तनुनं म्हटलं, ‘‘आज सकाळी रियाला जास्त वेळ झोपायचं होतं, पण नवऱ्यानं तिला रोजच्याप्रमाणे लवकर उठवलं. ती दोघं मॉर्निंगवॉकला एकत्रच जातात ना? पण बिच्चारी रिया, तिला मनाप्रमाणे झोपायलाही मिळत नाही. आज रियाचा मूड त्यामुळेच फारच वाईट आहे.’’

एकदा पुन्हा तनूनं सांगितलं, ‘‘रियाची सासू खूपच हेल्थकाँशस आहे. घरातल्या सर्वांच्या तब्येती त्यांच्यामुळेच चांगल्या आहेत. पण त्यामुळे रियाला रोजच ‘हेल्दी फूड’ खावं लागतं.’’

सुधानं विचारलं, ‘‘स्वयंपाक, ऑफिसचे, शाळेचे डबे सगळं सासूबाईच करतात का?’’

‘‘हो ना, रियाला जॉबवर जावं लागतं. सगळं घर त्याच सांभाळतात. स्वयंपाकाला बाई आहे, पण सासू सगळं स्वत:च्या देखरेखीखाली करवून घेतात.’’

‘‘मग हे तर खूपच छान आहे. आयता डबा मिळतो रियाला. यात तक्रार कशाला करायची? रियानं तर आनंदातच राहायला हवं.’’

‘‘कसली डोंबलाची आनंदात राहणार? तिला ते जेवण मुळीच आवडत नाही. ती तिच्या मैत्रीणीला आपला डबा देते अन् स्वत:साठी हॉटेलमधून लंच मागवते. बिच्चारी रिया…!’’

‘‘बिच्चारी…कशानं झाली? चांगला आयता घरच्या चांगल्या जेवणाचा डबा मिळतोय तर हॉटेलचं महागडं अन्  कुणीतरी केलेलं, कसलंतरी जेवण कशला मागवायचं?’’

तनूला राग आला, ‘‘तुला रियाची बाजू समजून का घेता येत नाही?’’

‘‘काही गरज नाहीए. काहीतरी खुसपटं काढून स्वत:चं अन् तुझं डोकं बिथरवून टाकतेय ती.’’

दोन दिवस तनू गप्प होती. मग पुन्हा तिचं सुरू झालं. ‘‘रियाच्या सासरची सगळीच माणसं दिल्लीला असतात. कुणा ना कुणाकडे सतत काही ना काही होतंच असतं. दीर, नणंदा, आत्या, काका, मावशी, मामा…कोण न् कोण सतत ते तिच्या घरी येतात नाही तर तर हिला तरी त्यांच्या घरी बोलावतात. रिया बिच्चारी कंटाळून जाते.’’

सुधाला कळतंच नव्हतं, रियाला त्रास काय होता. तिची नोकरी तशी आरामाची होती. शनिवार रविवार सुट्टी असायची. घरात अगदी कपाटं आवरून देण्यापासून सगळ्या कामांना गडी मोलकरीण होत्या. जायला यायला शोफर सकट गाड्या होत्या. तरीही तिला सगळ्याचा त्रासच व्हायचा. तनूची विचारसरणी बदलते आहे अन् ती रियाची नकारात्मक वृत्ती स्वीकारते आहे एवढंच सुधाला कळत होतं, खटकत होतं.

काही दिवस मध्ये गेले मग रजतचं स्थळ नक्की केलं गेलं. तनू आणि रजत भेटले. दोघांनी मोकळेपणानं गप्पा मारल्या अन् मग दोघांच्या पसंतीनुसार लग्न ठरलं. साखरपुडा वेगळ्यानं न करता लग्नच करणं जास्त सोयिस्कर होतं. कारण रजत मुंबईला एकटाच राहत होता. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना लग्नाची घाई होती.

लग्न थाटात पार पडलं. रिया नवऱ्याबरोबर लग्नाला आली होती. परत जाताना म्हणाली, ‘‘तनू तुझी मजाच मजा आहे गं! मुंबईला एकटी राहशील…मी तर भरल्या घरात अशी अडकले आहे ना?’’

सुधाला रियाचा राग आला. पण तो न दाखवता तिनं आहेर देऊन रियाला व अनुजला निरोप दिला. तनूनं लग्न ठरताच मुंबईला बदली व्हावी म्हणून अर्ज केला होता. तो मंजूर झाला आणि तिला मुंबईला बदलीही मिळाली. रजतची सुट्टी होती तेवढे दिवस तनू सासरच्या घरीच होती. थोरला दीर, जाऊ, त्यांची दोन मुलं, सासू सासरे सगळ्यांच्या संगतीत वेळ खूप छान गेला. भटकणं, हास्यविनोद, मनसोक्त खाणंपिणं अन् भरभरून प्रेम आणि कौतुक करणारी सासरची माणसं यांच्यात वेळ कसा गेला कळलंच नाही.

दोघांचीही रजा संपली तशी बॅगा भरल्या गेल्या. दोन्ही घरातली मंडळी निरोप द्यायला एयरपोर्टवर गेली होती. रियाही भेटायला आली होती. तनूला बाजूला घेऊन म्हणाली, ‘‘उगीच सर्वांना मुंबईला या, मुंबईला या म्हणू नकोस. येतील सगळेच्या सगळे अन् तुझ्याकडे मुक्काम ठोकतील.’’ तनूनं फक्त हसून विषय टाळला.

मुंबईला रजतबरोबर तनूचा नवा संसार सूरू झाला. रजतबरोबर ती अगदी मजेत होती. दोघंही सकाळी कामावर जायची ती रात्रीच घरी परतायची. वीकएन्डला थोडा निवांतपणा असायचा.

सकाळी लताबाई यायची अन् स्वयंपाकासकट सर्व आटोपून जायची. तनूही डबे करून घ्यायची. घर नीट आहे ना खात्री करून लॉक करून निघायची. तसं दोघांचं काम असं फारसं नसे. पण दमून आल्यावर नाश्ता रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा यायचा

रजतनं अनेकदा म्हटलं, ‘‘रात्रीच्या स्वयंपाकालाही बाई ठेवून घेऊयात.’’

‘‘पण आपली यायची वेळही रोजची ठरलेली नसते. बाईला किल्ली देऊन ठेवायला मला आवडत नाही.’’

‘‘ठीक आहे. रात्रीचा स्वयंपाक आपण दोघं मिळून करत जाऊ,’’ रजतनं सुचवलं. रियाशी रोजच तनुचं चॅटिंग चालायचं. तनुच्या स्वातंत्र्याचा रियाला हेवा वाटायचा. ती सतत आपल्या एकत्र कुटुंबाला नावं ठेवायची. लग्नाला सहा महिने झाले होते. रजतला ऑफिसकडून एक आठवडा सिंगापूरला ट्रेनिंगसाठी जायला लागणार होतं. त्यानं म्हटलं, ‘‘मी इथं नसताना तू एकटी पडशील, लखनैहून आईबाबांना बोलावून घेऊ का? नाही तरी अजून इथं आलेच नाहीएत ती दोघं.’’

‘‘आत्ता नको, आत्ता रियाला इथं येण्याची फार इच्छा आहे. तिला यावेळी येऊन जाऊ दे. पुढल्या वेळी आईबाबांना बोलावून घेऊ. चालेल?’’ तनूनं म्हटलं. रजतला काहीच हरकत नव्हती.

तनूनं लगेच रियाला फोन केला, ‘‘प्रोग्रॅम नक्की ठरला आहे. आता बदल करू नकोस. कुठलीही सबब सांगू नकोस.’’

‘‘नक्की येतेय…या गर्दीतून बाहेर पडायला आसुरलेले आहे मी. अगदी शांत, निवांत राहायचं आहे मला तुझ्याकडे.’’

ज्यादिवशी सकाळी रजत गेला त्याच दिवशी दुपारपर्यंत रियाही मुंबईत पोहोचली. एकमेकींच्या गळ्यात पडून दोघींनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या गप्पा अखंड सुरू होत्या. रात्री उशीरापर्यंत रिया बोलतच असायची. सासूसासरे, दिर नणंदा सगळ्यांबद्दल सांगायची. एकत्र होणारे सणवार, उत्सव, गेट टूगेदर काय अन् काय. दुसऱ्या दिवशी तनूनं रजा घेतली होती. सकाळपासूनच दोघी भटकायला बाहेर पडल्या. भरपूर फिरल्या. सिनेमा बघितला, शॉपिंग झालं. बाहेरचं खादाडी केली. रात्री उशीरा घरी परतल्या.

‘‘वॉव! असं वाटतंय दुसऱ्या जगात आलेय मी…! किती शांत अन् छान वाटतंय गं तुझ्या घरात. व्वा! खूपच मज्जा आली हं!’’ रिया म्हणाली.

तनू फक्त हसली…‘‘दमलोय आपण, आता झोपूयात. उद्या मला कामावर जायला लागेल. सकाळी लताबाई येईल अन् सगळं काम करून जाईल. तू आरामात ऊठ. लताबाई तुझ्यासाठी ब्रेकफास्ट अन् जेवणही करून ठेवेल.’’

दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे सर्व आवरून तनु ऑफिसला निघून गेली. बारा वाजता रियाचा फोन आला. ‘‘तनू अगं, काय सांगू, इतकी मज्जा येतेय, इतक्यात झोपून उठलेय. किती शांती आहे गं तुझ्या घरात, कुठला आवाज नाही, कुणी माणूस नाही…वॉव!’’

सुधाला, रिया मुंबईला आठ दिवसांसाठी आली आहे हे तनुकडूनच समजलं होतं, तिनं तनुला म्हटलं, ‘‘बघ, रियाच्या सासरची माणसं किती चांगली आहेत. आठ दिवस सुनेला पाठवून दिलीय मैत्रीणीकडे…रियाला चांगल्या माणसांची किंमत नाहीए.’’

रियानं आरामात उठून आवरलं. ब्रेकफास्ट घेतला. थोडावेळ टीव्ही बघितला. काही वेळ बाल्कनीत बसून रस्त्यावरच्या रहदारीची गंमत बघितली. मग मजेत अंघोळ ओटापून, जेवण करून पुन्हा मस्त ताणून दिली. सायंकाळी तनू घरी आल्यावर दोघींनी चहा घेतला, गप्पा चालूच होत्या. रिया म्हणाली, ‘‘तू सांग ना तुझं काही…मीच एकटी माझं सांगतेय.’’

‘‘माझेयाकडे सांगायला काहीच नाहीए, काय सांगू? आम्ही दोघंच ना इथे. सकाळी जातो ते रात्रीच येतो. आठवडा असा धावपळीत संपतो. त्यातल्या त्यात वीकएन्डला जरा आराम मिळतो. घरी बोलायलाही कुणी तिसरं माणूस नाहीए.’’

‘‘हो गं! पण किती शांतता आहे इथं. तिथं घरातून निघताना सासूबाईंच्या सूचना अन् घरात शिरताच त्यांचं चहा घेतेस ना? तुझ्या आवडीची थालपिठं केली आहेत. असं काही बाही बोलायला लागतात. मला तर दमायला झालंय माणसांच्या गराड्यात. रोजच काही ना काही चालू असतं.’’

तनुला आज प्रथमच रियाचं बोलणं खटकलं. तिला मनांतून एकाएकी फार उदास वाटलं. तिनं रात्रीचा स्वयंपाक केला. रिया बोलतच होती. मधून मधून तिच्या नवऱ्याचा अन् सासू सासऱ्यांचाही फोन येऊन गेला.

दोघी झोपायला बेडरूममध्ये आल्या. दोघींच्या मनात वेगवेगळे विचार होते. रिया मनांत म्हणत होती, ‘‘किती छान आयुष्य आहे तनुचं. घरात फक्त दोघंच. किती शांतता असते घरात. कुठलेच आवाज नाहीत. उगीचच बांलणं, सल्ले, विचारपूस नाहीए, कुठं जाते, काय खाल्लं, कोणी विचारणार नाही. आपल्या मनात येईल ते करावं…इकडे तनुच्या मनांत येत होतं, रिया म्हणते मज्जा आहे तुझी…एकटीच राहतेस…पण मला तर एकट्यानं राहण्यात काय मज्जा आहे तेच कळत नाही. इथं आमच्या दोघांखेरीज कुणी तिसरं माणूस नाही. सकाळी मेड सर्व्हंट येते मशीनप्रमाणे कामं उरकते अन् निघून जाते. आमची काळजी करणारं, प्रेमानं विचारपूस करणारं कुणीही नाही. माहेरी तीनच माणसं…मला तर केवढी हौस होती भरल्या घराची एकत्र कुटुंबाची. तिथं किती तऱ्हेची नाती मिळतात…सून, जाऊ, मामी, काकी, वहिनी…प्रत्येक नात्याची वीण वेगळी, मजा वेगळी. इथं वीकएन्डला एखादा सिनेमा बघतो, घरी आल्यावर दमलेलो असतो. विचारणांरही कुणी नाही. रियाला काय असं एकटं राहण्यात सुख वाटतं कुणास ठाऊक…दीरनणंदेची थट्टा चेष्टा मस्करी नाही. जावेची प्रेमळ कुरकुर नाही, सासूसासऱ्यांची प्रेमळ देखरेख अन् काळजी नाही…हे काय आयुष्य म्हणायचं?’’

दोघी एकमेकींच्या आयुष्याबद्दल विचार करत होत्या. तनुनं ठरवलं, उद्या सकाळी लखनौला फोन करायचा अन् सासरच्या माणसांना इथं यायचा आग्रह करायचा. तिकडची सगळी माणसं इथं यायला हवीत. आयुष्यात प्रत्येक नात्याचा आनंद उपभोगायला हवा ना? सहजच तिचं लक्ष रियाकडे गेलं. रियानंही त्याचवेळी तिच्याकडे बघितलं. दोघीही हसल्या.

रियानं विचारलं, ‘‘कसला विचार करते आहेस?’’

‘‘तुझ्याबद्दल अन् तू कसला विचार करत होती?’’

‘‘तुझ्याबद्दल विचार करत होते?’’

दोघीही हसल्या, तनुच्या हसण्यात सामावलेलं गूढ रियाला कळणारच नव्हतं.

एक मित्र आहे माझा

कथा * पूनम अहमद

मी बेडरूमच्या खिडकीपाशी उभी राहून बाहेरचा पाऊस बघत होते. अमित अजून अंथरूणातच होते. जागे होते पण मोबाइलवर गर्क होते. मी खिडकीतून हात बाहेर काढून हलवला. नेमकं तेव्हाच त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं.

‘‘कोण आहे?’’ त्यांनी विचारलं.

‘‘मला माहीत नाही…’’ मी उत्तरले.

‘‘तर मग हात कुणाला बघून हलवलास?’’

‘‘मला त्याचं नांव ठाऊक नाही…’’

‘‘रिया, काय बोलतेस हे कळतंय का तुला? ज्याचं नांव माहीत नाही, त्याला बघून हात हलवतेस?’’

मी गप्प बसले. त्यांनीच चेष्टेच्या सुरात विचारलं, ‘‘आहे कोण? स्त्री की पुरूष?’’

‘‘पुरूष…’’

‘‘अरेच्चा? कमालच आहे…अगं, सांग तरी कोण आहे?’’

‘‘मित्र आहे माझा…’’

ताडकन अमित उठले. रविवारी सकाळी इतकी स्फूर्ती? मला कौतुकच वाटलं. मी बोलूनही दाखवलं, ‘‘अरे व्वा? इतक्या चपळाईनं उठलात? काय झालं?’’

‘‘काही नाही, बघायचं होतं कुणाला बघून तू हात हलवंत होतीस ते…सांगत का नाहीस कोण होता तो?’’

एव्हाना अमित थोडे नाराज झाले होते अन् खूपच बैचेनही दिसंत होते. मी त्यांच्या गळयात हात घातले. अगदी प्रामाणिकपणे म्हणाले, ‘‘खरंच सांगत, मला त्याचं नांव ठाऊक नाही. तो काय करतो, कुठला आहे, मला काहीही ठाऊक नाही.’’

‘‘मग त्याला हात का केलास?’’

‘‘तेवढीच ओळख आहे…’’

अमितला काही समजलं नाही. माझे हात गळ्यातून काढत म्हणाले, ‘‘काय बोलतेस काही कळंत नाहीए…ओळख ना पारख…अन् हात हलवला.’’

‘अहो, त्याचं नावं नाही ठाऊक पण ओळख आहे ना?’’

‘‘म्हणजे काय?’’

‘‘असाच जाता येता दिसतो कधीमधी. एकाच सोसायटीत राहतो…किती तरी लोकांशी हाय, हॅलो होतंच ना? त्या सर्वांची नांवं गावं ठाऊक असायला हवीत असं कुठं लिहिलंय?’’

‘‘ठीक आहे…मी वॉशरूममधून येतो तोवर चहा, नाश्ता काय करतेस ते बघ.’’ अमितनं विषय तिथंच संपवला.

रविवार असल्यानं मुलंही उशीरा उठणार होती. मी सर्वांच्या आवडीचा ब्रेकफास्ट करायला घेतला.

कांदा चिरताना सहज माझी नजर खिडकी बाहेर गेली. तो नेमका बाहेरून काहीतरी पार्सल पॅक करून घेऊन येताना दिसला. आज रविवार…त्याची बायकोही आज आराम करत असणारर. त्याची माझी नजरानजर झाली. तो हसला अन् निघून गेला.

दहा वर्षांपूर्वी आम्ही अंधेरीतल्या या सोसायटीत फ्लॅट घेतला. सुंदर अन् मोठी सोसायटी आहे. बऱ्याच बिल्डिंगा आहेत. आमच्या बिल्डिंगच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये त्याचा फ्लॅट आहे. मी तिसऱ्या माळ्यावर राहते. तो पाचव्या. सुरूवातीपासूनच मी त्याला बघतेय. कधी ‘हॅलो’ म्हणायला लागले ते आठवंत नाही पण आजतागायत ते सुरू आहे.

या दहा वर्षांच्या काळातही मला त्याचं नांव नाही कळलेलं. त्यालाही माझं नांव ठाऊक नसेल. खरं तर आमच्यात असं काही नातंही नाहीए की नांवं माहीत असावीत. पण इतक्या वर्षांत एवढं मात्र झालं आहे की आता आम्ही सहज म्हणून नाही तर जाणून बुजून एकमेकांकडे बघतो. त्याचा एकुलता एक मुलगा आता बारा वर्षांचा होतोय. नकळंतच मला त्याचं सगळं रूटीन माहीत झालंय.

माझ्या बेडरूमच्या खिडकीतून त्याची कोणत्या तरी खोलीची खिडकी दिसते. साधारण वर्षभरापूर्वीच तो त्या खिडकीपाश उभा असलेला अवचित दिसला तेव्हा मला कळलं की तो तिथं राहतो. मात्र तो खिडकीपाशी उभा आहे हे जाणवलं की मी तिकडं बघंतही नाही. आपण त्याच्या खिडकीकडे बघावं हे मला पटलंही नाही.

हो,पण एक खरं, तो रस्त्यावरून जाताना आवर्जून माझ्या खिडकीकडे बघंत जातो. जर मी तिथं असले तर आम्ही एकमेकांना हात हलवून अभिवादन करतो. कधीकधी मी सोसायटीच्या बागेत वॉक घ्यायला जाते तेव्हा तो त्याच्या बायको मुलासोबत बागेत आला तर बायकोच्या लक्षात येणार नाही अशा बेतानं हसून हॅलो म्हणतो. मला गंमत वाटते अन् हसायला येतं.

मला त्याचं सगळं रूटीन लक्षात आलंय. सकाळी सात वाजता तो मुलाला शाळेच्या बसवर सोडायला येतो. मग त्याची नजर माझ्या किचनच्या खिडकीवर रेंगाळते. नजरानजर झाली की तो गोड हसतो. साडे नऊला त्याची सुंदर बायको ऑफिसला जाते. दहाच्या सुमाराला तो निघतो. चारपर्यंत परत येतो अन् सोसायटीच्या डेकेअर सेंटरमधून मुलाला घेतो. सातपर्यंत त्याची बायको परत येते.

माझ्या बेडरूम अन् किचनच्या खिडकीतून आमच्या सोसायटीचा मेनरोड दिसतो. घरातले सगळे माझी चेष्टा करतात…अमित आणि मुलं म्हणतात, ‘‘सगळ्यांची बित्तबातमी असते तुला?’’

‘‘ममा, किती मस्त टाइमपास असतो तुझा. तुला घराबाहेर पडावंही लागत नाही. मनोरंजन अन् बातम्या तुला घर बसल्या मिळतात.’’ मुलांची कमेंट असते.

‘‘रिया, माझं आटोपलं आहे…’’ अमितनं हाक दिली.

‘‘हो आलेच,’’ आम्ही दोघं डायनिंग टेबलवर येतोय तोवर मुलंही आलीच. मोठी तनुश्री वीस वर्षांची. धाकटा राहुल १७ वर्षांचा.

रविवारची निवांत सकाळ. मनाजोगता नाश्ता सगळेच प्रसन्न मूडमध्ये होते. तनुनं म्हटलं, ‘‘आज आम्ही सगळे उमाच्या घरी पिक्चर बघणार आहोत. तिची आई आम्हाला लंच देते आहे.’’

‘‘कोण कोण आहेत?’’ मी विचारलं.

‘‘आमचा संपूर्ण ग्रुप आहे. मी, पल्लवी, निशा, टीना, रिद्धी, नीरज, विनय आणि संजय.’’

अमित म्हणाले, ‘‘नीरज, विनयला तर मी ओळखतो पण संजय कोण आहे?’’

‘‘आमचा नवा मित्र.’’

मला चिडवण्यासाठी अमितनं म्हटलं. ‘‘ठीक आहे, पण मुलांनो, तुम्हाला मम्मीचा मित्र ठाऊक आहे का?’’

राहुलनं दचकून विचारलं, ‘‘काय?’’

‘‘हो ना, तुझ्या मम्मीचाही एक मित्र आहे.’’

‘‘पप्पा, उगीच का चिडवताय मम्मीला?’’ तनु गुरगुरली.

‘‘आईचा कसा मित्र असेल?’’ राहुलनं म्हटलं.

अत्यंत भाबडा चेहरा करून अमितनं म्हटलं, ‘‘विचार तिलाच! मी खोटं कशाला बोलू?’’

आमच्या घरातलं वातावरण मोकळं आहे. मुलांशीही आम्ही मित्रत्त्वानं वागतो. एकमेकांची चेष्टामस्करी, एकमेकांची खेचणं असं सतत चालतं. त्यामुळे घरात हास्याची कारंजी सतत उसळंत असतात अन् वातावरण प्रसन्न राहतं.

तनुनं जरा गंभीरपणे विचारलं, ‘‘मम्मा, बाबा खोटं बोलताहेत ना?’’

का कुणास ठाऊक पण मी जरा बैचेन झाले. ‘‘नाही, खोटं तर नाहीए…’’

‘‘मॉम, काय चेष्टा करतेस? कोण आहे? काय नांव?’’

मी हळूच म्हणाले, ‘‘नांव मला नाही माहीत.’’ त्यावर तिघंही मोठ्यांदा हसले.

राहुलनं विचारलं, ‘‘मम्मा, तुझा मित्र राहतो कुठं?’’

‘‘नाही माहीत.’’ नकळंत मी खोटं बोलले. यावर तिघंही इतके हसले, इतके हसले की सांगता सोय नाही. तो समोरच्या फ्लॅटमध्ये राहतो हे मी मुद्दामच नाही सांगितलं. अमितचं सगळं लक्ष मग कायम त्या बिल्डिंगकडे असेल. उगाचच स्वत:च्या जिवाला घोर लावून घेतील.

तनु म्हणाली, ‘‘बाबा तुम्ही उगीचच मस्करी करताय हं! मम्मीला तर काहीच ठाऊक नाहीए…मग कुणी तिचा मित्र कसा असेल?’’

‘‘अगं पोरी, तुझी आई त्याची मैत्रीण आहे. म्हणून तर त्याच्या हॅलोला हात हलवून उत्तर देत होती.’’

मी म्हटलं, ‘‘तुम्ही तिघांचे मित्र असू शकतात तर माझा मित्र असायला हरकत का असावी? आज तुमच्या बाबानं मला हात हलवताना बघितलं तेव्हापासून त्यांचा जीव थाऱ्यावर नाहीए. संशय घेताहेत ते…’’

‘‘अगं, पण आम्हाला आमच्या मित्रांची नांव अन् ठावठिकाणा माहीत असतो…’’ तिघं पुन्हा जोरात हसली.

यावर माझ्याकडे उत्तर नव्हतं…मग मी ही त्यांच्या हास्यात सामिल झाले. तेवढ्यात मोलकरीण आली आणि मी तिथून उठून स्वयंपाकघरात आले. तिला घासायची भांडी काढून द्यायला लागले. मुलं अन् अमित त्यांच्या कामाला लागले.

माझे हात कामं उरकंत होते पण मन मात्र विचार करत होतं. मला त्याचं नावं माहीत नाहीए पण त्याला जाता येताना बघणं हा माझ्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता. काहीही न सांगता बोलता मला इतकं जाणवलंय की बायकोबरोबर असली तर तो हात हलवंत नाही. फक्त एक स्माइल देतो. मुलाला स्कूलबसमध्ये बसवलं की तो माझ्या किचनकडे नक्कीच बघतो. मला आता त्याच्या कारचा नंबर पाठ झालाय. मी दुरूनही त्याची कार ओळखू शकते.

त्याच्या पार्किंगची जागा मला ठाऊक आहे. खरं तर हे सगळं जरा विचित्र आहे पण हे जे काही ‘जरा’ आहे ना ते मला आवडतं. सार दिवस मला एक एनर्जी मिळते. हे ‘जरा’ कुणाचं नुकसानही करत नाहीए.

माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. हे ‘जरा’ त्या प्रेमात बाधा आणंत नाही…म्हणजे या ‘जरा’मुळे तसा काहीच त्रास किंवा प्रॉब्लेम नाहीए. अमित आणि मुलांच्या बरोबर असताना या ‘जरा’चा अजिबात त्रास नसतो. आमचं आयुष्य मजेत जातंय.

तो फार देखणा आहे असं नाही. अमित खरोखरंच देखणे आहेत. त्याची बायको माझ्यापेक्षा सुंदर आहे तरीही हे जे काही ‘जरा’ आहे ते मला एक आनंद, एक आत्मविश्वास देतं की मला एक मित्र आहे. भलेही मला त्याचं किंवा मला त्याचं नांव माहीत नाही…पण म्हणून काय झालं? जे आहे ते खूप छान आहे…छानच आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें