जेव्हा मैत्रीण करेल महागड्या मागण्या

* पारुल भटनागर 

कोणत्या वयात मैत्री करावी हे सांगता येत नाही आणि मग त्या क्षणापासून आयुष्य इतके सुंदर होऊन जाते की, आपल्या या मित्रासाठी आपण चंद्र-तारे तोडण्याच्या गप्पा मारू लागतो, कारण विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण वाढते.

या नात्यात तुम्ही एकमेकांना समजून घेता, एकमेकांसोबत चांगले क्षण घालवता, एकमेकांच्या भावनांचा आदर करता. प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर करता, एकमेकांना मदत करता.

पण जेव्हा तुमचा जोडीदार या नात्याच्या आडून हळूहळू तुमच्याकडून महागडया भेटवस्तूंची मागणी करू लागतो तेव्हा तुम्ही थोडे सावध राहणे गरजेचे असते, जेणेकरून ही मैत्री तुमच्या खिशाला जड होणार नाही आणि तुमच्या जोडीदाराचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल.

चला तर मग, जाणून घेऊया प्रेयसीने मागणी केल्यावर काय करावे आणि काय लक्षात ठेवावे…?

फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्रीदिनी

अंगठीची मागणी

भेटवस्तू मोठी असो किंवा छोटी, तीच चांगली असते जी मागून घेतलेली नसते तर मनापासून दिली जाते. नुकतेच तुम्ही त्याला ब्रँडेड शॉपिंग करून दिले असेल, पण आता जर तो पुन्हा येत्या फ्रेंडशिप डेला तुमच्याकडे अंगठीची मागणी करत असेल तर त्याला सांगा की, यावेळी मी अंगठी तेव्हाच देईन जेव्हा तूसुद्धा या खास दिवशी मला अंगठी देशील आणि ती स्वत:च्या हातांनी माझ्या बोटात घालशील.

त्याने होकार दिला तरच त्याला अंगठी भेट द्या, कारण यात कोणतेही नुकसान नाही, पण जर त्याने स्पष्टपणे नकार दिला तर तुम्हीही लाज न बाळगता नकार द्या, कारण मैत्री एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूंनी असावी लागते.

आयफोनचा हट्ट

तुम्ही दोघांनी खरेदीला जायचे ठरवले असेल आणि ही योजना आखण्याचे संपूर्ण श्रेय तुमच्या मैत्रिणीला जात असेल, कारण तिनेच तुम्हाला खरेदीला जाण्यासाठी भाग पाडले असेल तर थोडे सावध व्हा, कारण खरेदी म्हणजे तुमच्या खिशावर भार पडणे.

मी पैसे आणि कार्ड आणायला विसरले, त्यामुळे आता तू तुझ्या कार्डने पैसे दे, मी नंतर पैसे देईन, असे सांगून तिने तुमच्याकडून आयफोन घेण्याचा आग्रह धरला तर वेळीच हुशारीने वागा. मीही कार्ड आणले नाही, त्यामुळे स्मार्टफोन घेऊन देऊ शकत नाही, असे तिला स्पष्टपणे सांगा. तुम्ही पैसे भरलेत तर समजून जा की, तुमच्या खिशाला अळा बसायला सुरुवात झाली आहे. भलेही तुमचा नकार ऐकल्यावर ती तुमच्यावर थोडीशी नाराज होईल, पण तरीही तिच्या नाराजीकडे फारसे लक्ष देऊ नका, कारण पैशांच्या जोरावर कोणतेही नाते फार काळ टिकू शकत नाही.

सर्व गरजांसाठी तुमच्यावरच अवलंबून

मैत्री  झाल्यापासून प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी ती जर तुमच्यावर अवलंबून असेल तर समजून जा की, तुमच्यासोबत तिने केवळ पैशांसाठी नाते जोडले आहे. जसे की, कधी फोन रिचार्ज, कधी कॅबचे बिल, कधी महागड्या उपहारगृहात जाण्याची हौस, अगदी प्रेमाच्या जोरावर दरमहा तुमच्याकडून खर्चासाठी मोठी रक्कम वसूल करणे.

जर तुमच्या मैत्रिणीची ही सवय झाली असेल तर आधी तिला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करा. तरीही तिला समजत नसेल तर हे नाते तोडणेच योग्य ठरेल, अन्यथा तुमच्या पैशांची लूट होईल, कारण हा तिचा स्वार्थ असेल प्रेम नसेल.

लक्ष द्या

शोऑफ टाळा : बरीच मुले मैत्रिणीवर रुबाब झाडण्यासाठी कधी तिला स्वत:कडील पैसे दाखवतात तर कधी महागड्या उपहारगृहात घेऊन जातात. त्यामुळे ती प्रियकराला श्रीमंत समजून लुटायला लागते, पण हेच पुढे त्याच्या त्रासाचे कारण ठरते, कारण तिच्या रोजच्या अवास्तव मागण्या पूर्ण करणे शक्य नसते. त्यामुळे सुरुवातीपासूनच नात्यात शोऑफला थारा देऊ नका, जेणेकरून भविष्यात हे नाते ओझे बनणार नाही.

तिलाही संधी द्या : प्रेम खरे आहे की, हा सगळा पैशांचा खेळ आहे, याची परीक्षा घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीलाही खर्च करण्याची संधी द्या. प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन ती पैसे देत असेल तर तिला रोखू नका, कारण यामुळे तिचे खरे रूप तुमच्या समोर येणार नाही. त्यासाठी तुम्ही उपहारगृहात जाऊ शकता. बिल आल्यावर घाईत पर्स आणायला विसरलो, असे सांगून तिच्याकडून बिलाचे पैसे काढू शकता.

मी पैसे दिले तर बिघडते कुठे? असे विचारत तिने आनंदाने पैसे दिले तर समजून जा, तुमचे नाते थोडे तरी खरे आहे. याउलट बिल भरल्यावर ती काहीशी नाराजीने तुमच्याशी बोलली तर समजून जा की, तिला फक्त तुमच्या पैशांवर मजा मारायची आहे.

तुमची कमाई फक्त तुमची आहे : कदाचित तुमचे कुटुंब सधन असेल आणि तुम्हीही चांगली नोकरी करत असाल तर याचा अर्थ असा नाही की, तुमच्या मैत्रिणीने विचार न करता फक्त तुमची कमाई वाया घालवावी. कधी, कुठे आणि किती खर्च करायचा, हे तुम्हीच ठरवायला हवे. चांगला कमावतोस तरीही इतका कंजूषपणा कशाला? असे तुमची मैत्रीण विचारत असेल तर तिला सांगा की, हा कष्टाचा पैसा आहे आणि जेव्हा गरज असते तेव्हाच मी तो खर्च करतो. मी जे कमावले आहे ते उडवून दिले तर माझ्या भविष्याचे काय? असा थेट प्रश्न विचारून स्वत:ची भूमिका मांडा. यामुळे तिच्या लक्षात येईल की, तुम्हाला तिच्यावर पैसे खर्च करायला लावणे तितकेसे सोपे नाही.

गरज समजून घ्या : मैत्रीण म्हटले म्हणजे ती पैसे उकळणारच किंवा प्रत्येकवेळी तुमच्याकडून पैसे उकळण्यासाठीच ती एखादी मागणी करत असेल, असा समज करून घेणे चुकीचे आहे. कधी-कधी गरजेपोटी तिला तुमच्याकडून काहीतरी मागावे लागू शकते. अशावेळी तुम्ही त्याबद्दल तिला लगेच बोलू नका, तर तिचे म्हणणे ऐकून घ्या आणि गरज समजून घ्या. हीदेखील तुमची जबाबदारी आहे.

तुम्हाला वाटत असेल की, तिची मागणी न्याय्य आहे आणि ती तुमच्या खिशाला परवडणारी असेल तर तिला मदत करा, कारण गरजेच्यावेळी तुम्ही तिच्याकडे पाठ फिरवलीत तर मजबूत नात्यासाठी ते योग्य ठरणार नाही.

माहेरच्या माणसांच्या मूर्खपणामुळे मोडणारे मुलींचे संसार

* प्रतिभा अग्निहोत्री

‘‘आई, मी धड इकडची होऊ शकणार नाही की धड तिकडची, हे जर मला माहीत असते तर मी कधीच इकडे आले नसते.’ तुझ्याकडून मी नेहमीच असे ऐकत आले की, मुलीला लग्नानंतर सासरी आपले महत्त्व टिकवून ठेवायचे असेल तर काहीही झाले तरी पतीला आईचा लाडका होण्यापासून दूर ठेवायला हवे. इतकेच नव्हे तर आपल्या घरातही कधी आई मी तुला वडिलांच्या नातेवाईकांचा मान राखताना पाहिले नाही. तू दिलेला हाच धडा गिरवत लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच रवीने मला विचारूनच सर्व काही करावे, असे मला वाटू लागले होते. मात्र रवीचे आईवडिलांशिवाय पानही हलत नव्हते. जेव्हा कधी मी तुला माझ्या सासरच्या समस्या सांगायची तेव्हा तू हेच सांगायचीस की, तू कमावती आहेत. त्यामुळे दडपणाखाली राहण्याची गरज नाही. त्यांना तुझी किंमत नसेल तर कधीही परत ये, माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे आहेत. तुझ्याच पावलावर पाऊल ठेवून मी सासरी क्षुल्लक कारणांवरुन भांडण करू लागले. रवीदेखील किती काळ माझे असे वागणे सहन करणार होता, अखेर आमच्यामध्ये वाद होऊ लागले. माहेरहून मिळालेल्या चुकीच्या शिकवणीमुळे मी स्वत:हून माझ्या पायावर दगड मारुन घेतला,’’ एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेली सुवर्णा रडतच आईशी तावातावाने बोलत होती.

‘‘तूच तर सांगायचीस की, रवी तुझे नाही तर त्याच्या आईचेच सर्व काही ऐकतो. ज्या घरात तुझ्या शब्दाला किंमत नाही तिथे राहण्यात काय अर्थ आहे. ही तर सुरुवात आहे, पुढे परिस्थिती आणखी बिघडत गेली असती. आम्ही तुला लाडाने वाढवले. तुला काहीच किंमत नाही, हे पाहून आम्हाला वाईट वाटणार नाही का?’’ सुवर्णाच्या आईने स्वत:ची बाजू मांडत सांगितले.

‘‘पण इकडे तरी कुठे मला महत्त्व आहे. तुम्ही सर्व शुल्लक कारणावरुन मला सतत बोलता. तिकडे रवीला माझ्या पगाराबद्दल काही देणेघेणे नव्हते. इकडे मात्र सर्व माझ्या पैशांवरच लक्ष ठेवून असतात. आई, मी मूर्ख होते पण तू तुला तर सर्व समजत होते ना, मग हळूहळू सर्व काही ठीक होईल, असे तू मला समजावून सांगायला हवे होते.’’

सुवर्णा आणि तिच्या आईमध्ये अशाप्रकारे वाद होणे ही सामान्य गोष्ट आहे. आई आणि बहिणीच्या सल्ल्यानुसार वागून सुवर्णा लग्नाला १ वर्ष पूर्ण होण्याआधीच प्राध्यापक असलेला नवरा आणि सासूला सोडून माहेरी आली होती. आता ४ वर्षांनंतर तिला असे वाटते की, आईचे ऐकून तिने मोठी चूक केली. ती सासरी परत जाण्याचा विचार करत आहे.

४० वर्षीय सवितासोबतही काहीसे असेच घडले. तिने सांगितले की, ‘‘मी घरातली एकुलती एक मुलगी आहे. आईने माझ्याकडून घरातले कुठलेच काम कधी करुन घेतले नाही. सासरी मी थोरली सून होते. अचानक खांद्यावर जबाबदारी आल्याने मी घाबरले. माझी अडचण जेव्हा आईला सांगायचे तेव्हा ती म्हणायची, ‘‘जास्त काम करायची काही गरज नाही. एकदा केलेस की रोजच करावे लागेल. तू त्या घरातली नोकर आहेस का?’’

आईने माझ्या मनात सासरच्या लोकांबद्दल इतके विष भरले होते की मी त्यांना कधीच आपले मानू शकले नाही. त्यामुळेच माझे नवऱ्यासोबत वाद होऊ लागले. सासरी कशीबशी ३ वर्षे राहिल्यानंतर आईवडिलांच्या सल्ल्यानुसार, मी माहेरी परत आले.

सुरुवातीला, जेव्हा पतीने मला परत नेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आईवडील आणि भावाने त्याला चांगलेच सुनावले. अनेक अटी घातल्या. मी वयाने लहान होती. वहिनी संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर सोडून ऑफिसला जायची. मी मात्र स्वत:ला त्या घरची राणी समजायचे. त्यामुळे मला हे सर्व पटायचे नाही. आता वय होत चालले आहे. आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत ठीक आहे. मी भाऊ, वहिनी, भाच्यांसाठी एखाद्या नोकराप्रमाणे आहे. जो तो स्वत:च्या मनानुसार मला वागवू इच्छितो. मूर्खपणे आणि भावनेच्या आहारी जाऊन घेतलेल्या त्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे, पण आता हे सर्व सहन नाईलाजाने करावे लागत आहे.

अशा प्रकारच्या घटना अनेकदा पाहायला मिळतात, जिथे मुलीच्या माहेरच्यांच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे मुलीचा हसताखेळता संसार उद्ध्वस्त होतो. आश्चर्याची गोष्ट अशी की, आपल्या मुलीचे सर्वाधिक हित इच्छिणाऱ्या आईवडिलांच्या मुलीच्या संसारातील हस्तक्षेपामुळेच असे घडते. लग्नानंतर मुलगी सासरी जाते तेव्हा ते खूपच भावूक होतात. लाडाने वाढलेली मुलगी त्यांच्यापासून खूप दूर जाणार असते. त्यामुळेच त्यांना तिची काळजी वाटू लागते. याच अतिकाळजीतून ते तिला चुकीचे सल्ले देऊ लागतात आणि स्वत:पेक्षा आईवडिलांवर जास्त विश्वास ठेवणारी मुलगी कसलाही विचार न करता त्या सल्लायांनुसारच वागू लागते.

मुलीने काय करावे

कोणताही पूर्वग्रह नसावा : लग्नाआधी मैत्रिणींवर किंवा ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून सासरच्यांविषयी कोणताही पूर्वग्रह करुन घेऊ नये. आस्थाचेच उदाहरण घ्या, तिने रोमिलशी प्रेमविवाह केला. लग्नापूर्वी मैत्रिणी आणि आईवडिलांनी समजावले की, ‘‘कायस्थ मुलगी ब्राह्मण कुटुंबात जात आहे. हे ब्राह्मण धर्माबाबत खूपच कट्टर असतात. पूजाविधीवर विश्वास ठेवतात. त्यामुळे तुझे काय होईल?

चांगल्या गोष्टीच सर्वांना सांगा : लग्नानंतर सुरुवातीच्या काळात नववधू सासरच्यांबद्दलची प्रत्येक लहानसहान, चांगली-वाईट गोष्ट माहेरच्यांना सांगते. असे करणे चुकीचे आहे. कारण तुम्ही जे सांगता त्यावरुनच माहेरच्या माणसांचे तुमच्या सासरच्यांबद्दल मत तयार होत असते.

सासर आणि माहेरच्यांचे भरभरुन प्रेम मिळालेल्या माझ्या एका मैत्रिणीने सांगितले की, ‘‘लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच मी माहेरच्यांना नेहमी सासरच्यांबद्दल चांगल्याच गोष्टी सांगितल्या. त्याचा असा परिणाम झाला की, लग्नाच्या ५ वर्षांनंतर माझ्या सासरची आणि माहेरची माणसे ही एकमेकांचे चांगले मित्र बनली आहेत आणि मी स्वत: एक सुखी कौटुंबिक जीवन जगत आहे. चुका प्रत्येकाकडून होतात. पण, मी त्याकडे दुर्लक्ष करुन फक्त चांगल्या गोष्टींकडे लक्ष दिले.’’

फोनचा मर्यादित वापर करा : तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात सुखी कुटुंबांना विभक्त करण्यात मोबाईलही कारणीभूत ठरत आहे. कारण आजकाल, दिवसभरातून १० वेळा तरी आई-मुलगी एकमेकींशी फोनवरुन बोलतात. यामुळे मुलीच्या घरात घडणारी प्रत्येक लहानसहान गोष्ट त्यांना माहीत होते. यामुळे प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणे आणि सल्ला देणे हा ते स्वत:चा अधिकार  समजू लागतात.

एके दिवशी रवी आणि नमितामध्ये शुल्लक कारणावरुन भांडण झाले. त्याचवेळी नमिताच्या आईचा फोन आला. नमिताने रागाने, रडतच सर्व सांगितले. ते ऐकल्यानंतर आईला वाटले की जावई आपल्या मुलीवर अन्याय करत आहे. काहीही विचार न करता त्यांनी रवीला फोन करुन चांगलेच सुनावले. यामुळे नमिता आणि रवीमधले नाते घटस्फोटापर्यंत गेले. शेवटी नमिताने बऱ्याच प्रयत्नांनी हे नाते जोडून ठेवले. म्हणूनच, राग आणि भावनेच्या भरात माहेरच्यांशी बोलणे टाळा, जेणेकरून घरातला वाद घरातच राहील आणि तुम्ही तो तुमच्या पद्धतीने सोडवाल. कारण एकदा सुटलेला बाण पुन्हा परत येत नाही.

समजूतदारपणे वागा : आई-वडिलांचा सल्ला किंवा त्यांच्या मताला विरोध करुन त्यांचा अपमान करण्याऐवजी त्यांचे म्हणणे ऐका, पण ते अमलात आणण्यापूर्वी दहादा विचार करा की याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर किंवा पतीच्या कुटुंबावर काय परिणाम होईल. असा कोणताच सल्ला ऐकू नका ज्यामुळे तुमच्या पतीच्या कुटुंबाच्या आत्मसन्माला तडा जाईल.

अनिताने सांगितले, ‘‘आजारी नणंदेवर उपचार करण्यासाठी मी तिला घरी घेऊन आले. लहान मुलांची काळजी घेताना तिच्याकडे लक्ष देणे त्रासदायक होते. दरम्यान, माझ्या आईने मला सल्ला दिला की, तुझे घर तुझ्या नणंदेसाठी नवीन जागा आहे. त्यामुळे तिला तिच्या नवऱ्याकडेच सोडून ये आणि उपचारासाठी दरमहा पैसे पाठव. तू नोकरी कर आणि तुझे कुटुंब सांभाळ.’’

अनिताला आईचा सल्ला अजिबात आवडला नाही. तिने आईला सांगितले की, ‘‘जरा विचार कर, आज जर नणंदेच्या जागी माझी बहीण असती तर तू हाच सल्ला दिला असता का?’’

अनिताचे म्हणणे ऐकल्यानंतर तिची आई निरुत्तर झाली. त्या दिवसापासून तिने तिच्या सासरच्या गोष्टीत हस्तक्षेप करणे थांबवले.

पारदर्शकता ठेवा : पतीपासून लपून माहेरच्यांसाठी काहीच करू नका. प्रतिमाचे माहेर गरीब आहे. ती पतीपासून लपवून आई आणि भावाला पैशांची मदत करीत असे. जेव्हा तिच्या पतीला हे समजले तेव्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यामुळे तिचे माहेर आणि नवरा दोघांसोबतचे संबंध बिघडू लागले. म्हणूनच, आपल्या माहेरच्यांना आर्थिक मदत करण्यापूर्वी पतीला विश्वासात घेऊन सर्व सांगा. लक्षात ठेवा, पती-पत्नीच्या नात्यात पारदर्शकता असणे खूप गरजेचे आहे. एकमेकांपासून लपूनछपून केलेल्या व्यवहारांमुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.

सीमा निश्चित करा : सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या संसारात कोणी किती हस्तक्षेप करावा, याची सीमा तुम्ही निश्चित करायला हवी. त्या व्यक्तीने याचे उल्लंघन केल्यास त्याला वेळीच रोखा. कारण तुमच्या कुटुंबातील समस्या तुम्ही आणि तुमचा पतीच चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. सासरच्या आणि माहेरच्या माणसांशी सारखेच प्रेमाने वागा.

आईवडिलांनी काय करावे : हे मान्य की, आजकाल बहुतेक पालक मुला-मुलीमध्ये फरक करत नाहीत. माहेरी लाडात वाढलेल्या मुलीच्या आयुष्यात दु:खाची सावली जरी आली तरी ते अस्वस्थ होतात. पण त्यांनी हेदेखील लक्षात ठेवायला हवे की, आता त्यांची मुलगी ही कुणाची तरी सून, पत्नी आहे. तिच्या पतीच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या मुलाला तितक्याच प्रेमाने वाढवले आहे. त्यामुळे सासरच्या अडचणी तिला स्वत:ला सोडवू द्या. एखाद्या वळणावर सल्ला देणे गरजेचे असल्यास तो तटस्थपणे द्या.

मुलीच्या सासरच्या गोष्टीत अनावश्यक हस्तक्षेप टाळा. तिला कोणत्याही विषयावर सल्ला देताना आधी हा विचार करा की, जर हाच सल्ला तुमच्या सुनेला तिच्या माहेरच्यांनी दिला तर त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल?

व्हिडिओ कॉलिंग, मोबाइल फोन यासारख्या आधुनिक तंत्राचा वापर मुलगी कशी आहे, हे पाहण्यासाठी करा. तिच्या सासरच्यांना नावे ठेवण्यासाठी याचा वापर करु नका.

तुमची आर्थिक स्थिती भलेही मुलीच्या सासरच्यांपेक्षा जास्त चांगली असेल पण तरीही त्यांना तुमच्यापेक्षा कमी लेखण्याचा प्रयत्न कधीच करु नका. लक्षात ठेवा, तुम्ही त्यांचा मान ठेवला तरच तुमची मुलगीही त्यांचा आदर करायला शिकेल.

मुलीला केवळ पतीचाच नव्हे तर संपूण सासरच्या मंडळींचा प्रेमाने आदरसन्मान करायला, त्यांच्यासोबत जमवून घ्यायला शिकवा. कुटुंबाशी नाते तोडून पतीसोबत वेगळे राहण्याची शिकवण तिला देऊ नका.

अनुजाने लग्नाच्या दोन दिवस आधी आपल्या मुलीला तिचे दागिने दाखवून सांगितले की, तुझे दागिने तुझ्या सासूकडे चूकुनही देऊ नकोस. एकदा दिलेस तर ते परत कधीच मिळणार नाहीत. असा अव्यवहार्य सल्ला देण्याऐवजी आपल्या मुलीच्या मनात सासरच्यांबद्दल प्रेम, आपलेपणाची भावना जागवा, जेणेकरुन तिचे वैवाहिक आयुष्य सुखाचे होईल.

लग्नानंतर सासरी गेलेल्या मुलीला थोडा वेळ द्या. ती कशी आहे, हे सतत विचारत राहून तिला त्रास देऊ नका. त्याऐवजी तिला सासरच्या मंडळींसोबत थोडा वेळ घालवू द्या, जेणेकरुन तिथल्या वातावरणात सहज रुळणे तिला शक्य होईल.

५ टीप्स सुखी वैवाहिक जीवनासाठी

* रीना जैस्वार

अरेंज्ड किंवा लव्ह, लग्न कसेही झाले तरी, सासरच्या लोकांमध्ये आपसांतील मतभेद, वैचारिक मतभेद यासारख्या तक्रारी ही घर-घरची कथा आहे, कारण आपल्या समाजात लग्न फक्त २ व्यक्तींचे नाही तर २ कुटुंबांचे असते, जिथे लोक एकमेकांच्या विचारांबद्दल आणि स्वभावाबद्दल अनभिज्ञ असतात. आजकाल मुलं-मुली लग्नाआधी एकत्र येतात आणि एकमेकांना समजून घेतात, पण कुटुंबातील बाकीच्या सदस्यांना समजून घेण्याची संधी लग्नानंतरच मिळते. ज्याप्रमाणे सून सासरचे लोक कसे असतील याबाबत संभ्रमात असते, त्याचप्रमाणे सासरचे लोकसुद्धा सूनेच्या वर्तणुकीबद्दल अनभिज्ञ असतात. सासरी पती व्यतिरिक्त, सासू-सासरा, नणंद, दीर, जेठ-जेठाणीसह अनेक महत्त्वाची नाती आहेत.

जर ४ लोक एकाच छताखाली राहत असतील, तर वैचारिक संघर्ष होणे स्वाभाविक आहे, परंतु जेव्हा तो आवश्यकतेपेक्षा जास्त वाढतो, तेव्हा संबंधांमध्ये कटुता येते.

आपापसांतील मतभेदाची कारणे

जनरेशन गॅप, कल्पना लादणे, अधिकार गाजविण्याची मानसिकता, वाढत्या अपेक्षा, पूर्वग्रह, आर्थिक समस्या, फसवणुकीला बळी पडणे, प्रेमात फूट पडण्याची भीती इत्यादी कारणांमुळे संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो. कधी-कधी स्वत: नवरासुद्धा सासू-सुनेमध्ये दुरावा निर्माण होण्याचे कारण बनतो. या सगळयांशिवाय आजकाल सासू-सुनेच्या नात्यावर आधारित टीव्ही मालिकाही आगीत तेल टाकण्याचे काम करत आहेत.

विवाहित अंजली म्हणते, ‘‘घरात पती आणि २ मुले वगळता सासू, नणंद, दीर, जेठ-जेठाणी आणि त्यांची मुले आहेत. घरात अनेकदा एकमेकांमध्ये भांडण आणि दुराव्याचे वातावरण असते, कारण सासू-नणंदेला वाटते की आम्ही सूना म्हणजे फक्त काम करणारी यंत्रे आहोत. आमचे हसणे-बोलणे त्यांना काट्यासारखे टोचत असते. परिस्थिती अशी आहे की कुटुंबातील सदस्य आपापसात बोलतही नाहीत.’’

मुंबईतील सोनम म्हणते, ‘‘माझ्या लग्नाला एक वर्ष झाले आहे. माझ्या लक्षात आले आहे की माझे पती एकतर आईचे ऐकतात किंवा आमच्यातील मतभेदांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, जे मला योग्य वाटत नाही. पती हा पत्नी आणि घरातील इतर सदस्यांमधील दुवा आहे, जो दोन्ही पक्षांना जोडतो. तो जरी कोणत्याही एका बाजूचे समर्थन करत नसेल, परंतु योग्य-अयोग्यबद्दल एकदा त्याने अवश्य विचार केला पाहिजे.’’

त्याचप्रमाणे ५० वर्षीय निर्मला म्हणते, ‘‘घरात सून तर आहे पण ती फक्त माझ्या मुलाची पत्नी आहे. तिला पती आणि मुलांव्यतिरिक्त घरात इतर कोणीही दिसत नाही. त्या लोकांमध्ये ती इतकी व्यस्त असते की ती आमच्या जवळ येऊन तासभरही बसत नाही, ना आमच्या तब्येतीची चौकशीही करते. आम्ही तिच्या वागण्याने किंवा जीवनशैलीने कधीही आनंदी नसतो, ज्याचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. मुलींचा संदर्भ देत ती अनेकदा उलट उत्तर देते. अशा परिस्थितीत तिच्या असण्याने किंवा नसल्याने आम्हाला काही फरक पडत नाही.’’

लग्नानंतर नात्यांमध्ये आलेल्या अशा काही कटुता कशा दूर कराव्यात की जेणेकरून लग्नानंतरही नेहमी आनंदी राहता येईल, त्यासाठी येथे काही टीप्स दिल्या आहेत :

अंतर कसे मिटवायचे : मानसोपचारतज्ज्ञ डॉ वृषाली तारे सांगतात की संयुक्त कुटुंबात आपापसात गोडवा असणे फार महत्वाचे आहे. नातेसंबंधांमध्ये गोडवा राखण्याची जबाबदारी कोणत्याही एका व्यक्तीची नाही, तर घरातील सर्व सदस्यांची असते. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने समान प्रयत्न केले पाहिजेत.

विचारांमध्ये पारदर्शकता आणा : डॉ. वृषालीच्या मते, कुटुंबात एकमेकांमध्ये जास्तीत जास्त संवाद असावा, जो समोरासमोर असावा, डिजिटल नसावा. दुसरी गोष्ट एकमेकांच्या मतांमध्ये पारदर्शकता असावी जी कोणत्याही मजबूत नात्याचा पाया असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही लग्नानंतरही काम करत असाल किंवा कुठेतरी बाहेर जात असाल, तर घरी पोहोचताच लवकर किंवा उशिरा येण्याचे कारण, कार्यालयातील दिवस कसा राहिला यासारख्या छोटया-छोटया गोष्टी कुटुंबातील सदस्यांसह शेअर करा. यामुळे घराचे वातावरण हलके होईल तसेच एकमेकांवरील विश्वास वाढेल.

मेंटल प्रोटेस्ट टाळा : आजकालची सर्वात मोठी समस्या अशी आहे की आपण आधीच आपल्या मनात अशी धारणा बनवून चुकलो असतो की सून कधीही मुलगी होऊ शकत नाही, सासू कधीच आई होऊ शकत नाही. अशा नकारात्मक विचारांना मेंटल प्रोटेस्ट म्हणतात. असे अनेकदा दिसून येते की सुनांची मानसिकता अशी असते की घरी त्यांच्या वाट्याचे काम पडले असेल. सासू, नणंद नक्कीच काहीतरी बोलतील. अशा विचारसरणीचा संबंधांवर वाईट परिणाम होतो आणि याच विचारसरणीसह लोक संबंध सुधारण्याचा प्रयत्नही करत नाहीत. त्यामुळे अशा नकारात्मक विचारांच्या वर्तुळातून बाहेर पडणे आणि एकमेकांमधील वाढते अंतर कमी करणे आवश्यक आहे.

समुपदेशकाची मदत घ्या : डॉ. वृषाली तारे म्हणतात की संयुक्त कुटुंबात किरकोळ वाद, वैचारिक मतभेद सामान्य गोष्ट आहे, जे संवाद, प्रेम आणि संयमाने सोडवता येतात आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमचे शरीर आणि मन निरोगी असेल. पण जर प्रकरण गंभीर असेल तर घरातील सर्व लोकांनी संकोच न करता समुपदेशकाची मदत घ्यावी. बहुतेक नात्यांमध्ये कटुतेचे कारण मानसिक अस्वस्थता असते, जी लोकांना समजत नाही.

रूढीवादी मानसिकतेतून बाहेर पडा : विज्ञान आणि आधुनिकतेच्या काळात रूढीवादी चालीरीतींमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. घरातील सदस्यांच्या राहणीमानात आणि जीवनशैलीत झालेले बदल स्वीकारा, कारण एकमेकांवर विचार लादण्याने कधीही नात्यात गोडवा येऊ शकत नाही. सहिष्णुता आणि आदर देणे ही केवळ तरुणांची जबाबदारी नाही, तर वडिलधाऱ्यांमध्येदेखील ही भावना असली पाहिजे, अधिकार गाजविण्याऐवजी किंवा कल्पना लादण्याऐवजी व्यक्तीला नात्यापेक्षा अधिक महत्त्व द्याल तर संबंध आपोआप सुंदर होतील.

हे उघड आहे की नातेसंबंधांमध्ये मोकळेपणा आणि आपलेपणा यायला वेळ लागतो, परंतु नातेसंबंध असेच बनत नाहीत. यासाठी संस्कार आणि संगोपन महत्वाचे मानले जातात, कधीकधी योग्यवेळी योग्य विचार करणेदेखील खूप महत्वाचे असते.

लग्नानंतरही रहाल रोमँटिक

* मिनी सिंह

‘प्रेम करणे आणि निभावणे सोपे नसते’ हे सर्वांनाच माहिती आहे. आईवडील, नातेवाईक, समाज, जातीधर्माच्या सर्व भिंती लांघून एक होणे अवघड असते. तरीही या सर्व सीमा ओलांडून जे एकत्र येतात त्यांना सहजीवनाचा मार्ग सापडतोच. त्यावेळी त्यांना असे वाटते की, त्यांना ते सर्व काही मिळाले जे त्यांना हवे होते.

परंतु, संसाराची जबाबदारी खांद्यावर येऊन पडताच त्यांना लग्न म्हणजे एखादे कंटाळवाणे बंधन वाटू लागते. लग्नाआधीचेच जीवन बरे होते, उगाचच लग्नाच्या बेडीत अडकलो, अशी भावना त्यांच्या मनात घर करू लागते.

लग्नापूर्वीचे रुसवे-फुगवे, एकमेकांची समजूत काढणे हे नाटकी होते असे वाटू लागते. लग्नाच्या अवघ्या २-३ वर्षांतच त्यांच्या वैवाहिक नात्यातील गोडवा कमी होऊ लागतो. त्यामुळे मनात नसतानाही अखेर हे प्रेमी युगुल सर्वसामान्य पती-पत्नीसारखे जगू लागतात आणि अगदी लहानसहान गोष्टींवरूनही त्यांच्यात भांडणे सुरू होतात. पाहायला गेल्यास भांडण हेही प्रेमाचेच एक रूप असते आणि छोटे-मोठे वाद तर प्रत्येक नात्यात होतातच, पण जेव्हा ते विकोपाला पोहोचतात तेव्हा घटस्फोट घेण्याची वेळ येते आणि सर्व काही संपून जाते.

प्रिया आणि समीरसोबतही काहीसे असेच घडले. कुटुंब आणि समाजाचे वाईटपण स्वीकारून त्यांनी लग्न केले. वैवाहिक जीवनात प्रेमाचे रंग भरले, पण हळूहळू हे रंग फिकट होऊ लागले. त्यांना हे नाते कंटाळवाणे वाटू लागले. प्रेम वगैरे सर्व खोटे असते, असे वाटू लागले.

नात्यामध्ये जागवा रोमान्स

लग्नापूर्वी प्रेमी युगुल जीवाला जीव देतात. त्यांना एकमेकांची प्रत्येक गोष्ट बरोबर वाटते. लग्नानंतर मात्र त्याच सर्व गोष्टी त्यांना कंटाळवाण्या वाटू लागतात. याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही भांडण करून विभक्त व्हावे आणि त्यानंतर तुम्हाला याचा पश्चात्ताप व्हावा.

* पतीपत्नीत प्रेमाची नवी ऊर्जा जागवणे कठीण नाही, फक्त थोडासा बदल आणि समजूतदारपणा गरजेचा असतो. यामुळे तुमचा जोडीदार आनंदी होईल, सोबतच तुमच्या नात्यातही नवेपणा येईल. प्रेमाची बाग पुन्हा सुगंधित होईल. नाती निभावण्यासाठी असतात, छोटयाछोटया कारणांमुळे रागावून तोडण्यासाठी नसतात, ही गोष्ट पतीपत्नी दोघांनीही समजून घेणे गरजेचे असते.

* लग्नानंतर प्रत्येक पतीपत्नीची जबाबदारी वाढते, तुमचे प्रेम जेवढे खरे आहे तेवढीच ही गोष्टही खरी आहे. कामाचा व्याप जास्त वाढल्यामुळे दोघे एकमेकांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत आणि त्यामुळेच आपला जोडीदार पहिल्यासारखा राहिला नाही, असे वाटणे स्वाभाविक असते. पण असे मुळीच नाही, हे तुमच्या मनाला माहीत असते. पण हो, कामाचा कितीही व्याप असला तरी त्यातून आपल्या जोडीदारासाठी थोडासा तरी वेळ नक्की काढा. नेहमी शक्य नसले तरी आठवडयातून एकदा दोघांनी फिरायला गेलेच पाहिजे. आलिंगन देणे, वागण्यातील लडिवाळपणा, चुंबन, नजरेतून बोलणे, शारीरिक स्पर्श, या सर्वांमुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल आणि दिवसेंदिवस तुमच्यातील प्रेमही जास्तीत जास्त खुलत जाईल.

* पूर्वी तुम्ही प्रियकर-प्रेयसी होता, पण आता पतीपत्नी आहात. त्यामुळेच जीवनात थोडाफार बदल होणे स्वाभाविक आहे, याचा कधीच विसर पडू देऊ नका. छोटयाछोटया गोष्टींवरून रुसणे, समजूत काढणे यात काही गैर नाही, पण पराचा कावळा करू नका. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होईल आणि या नात्याचे ओझे वाटू लागेल. लग्नाआधी ज्या कुटुंबाचा विचार न करताच दोघे एकत्र येतात त्याच कुटुंबाचा विचार करून लग्नानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागतात.

* सकाळची सुरुवात जोडीदाराला चुंबन देऊन करा. मग पाहा, संपूर्ण दिवस तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि जोपर्यंत आपल्या जोडीदाराला पुन्हा पाहत नाही तोपर्यंत ही प्रसन्नता कायम राहील. एक चुंबन घ्यायला फक्त ६ सेकंद लागतात, पण तीच तुमच्या नात्यात नवा उत्साह जागवतील.

* पतीपत्नीसाठी घरात स्वतंत्र खोली असायला हवी. जोडीदाराला खुश करण्यासाठी बेडरूम सजवा. बिछान्यावर फुले असलेली चादर घाला. छोटया सुगंधित मेणबत्त्या लावा, जेणेकरून प्रेम जागवणारे वातावरण तयार होईल आणि तुमचा जोडीदार तुमच्या मिठीत येण्यासाठी आतुर होईल.

* जोडीदाराला मिठीत घेऊन जुन्या प्रेमळ गोष्टींना उजाळा द्या. लग्नाआधी एखाद्या दिवशी भेटता न आल्यास तुम्ही दोघेही कसे अस्वस्थ होत होता, त्याची आठवण जागवा. घरातले सर्व गाढ झोपल्यानंतर फोनवर एकमेकांशी हळू आवाजात बोलणे, तासनतास चॅटिंग करणे, फिरायला जाणे, भेटीसाठी आतुर होणे, अशा पूर्वीच्या सर्व गोष्टींना नव्याने उजाळा द्या.

* बिछान्यावर जाण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराचा मूड पाहा. त्यानंतर चुंबन, हलकासा स्पर्श करून एकमेकांच्या डोळयात पाहा. यामुळे तुमच्या प्रेमाला नवी उभारी मिळेल.

* परमसुख मिळाल्यानंतर अनेकदा पतीपत्नी एकमेकांकडे पाठ करून झोपतात. असे करू नका. परमसुख मिळाल्यानंतर जोडीदारापासून वेगळे होऊन झोपू नका तर त्याला मिठीत घेऊन चुंबन द्या. प्रेमाने गप्पा मारा. दुसऱ्या दिवशी काय आणि कसे करायचे आहे, याचे नियोजन करा.

* शक्य तेवढा वेळ एकत्र घालवा. सकाळी एकत्र फिरायला जा. सकाळचा चहादेखील सोबतच बसून प्या. जसे लग्नापूर्वी जात होता तसेच हातात हात घालून सिनेमा पाहायला जा. रात्रीचे जेवण जेवतानाही पूर्वीप्रमाणेच नजरेच्या इशाऱ्याने एकमेकांशी बोला. एकत्र घालवलेले क्षण आठवून चेहऱ्यावर हास्य उमलू द्या. मग पाहा, आजही तुमच्या जोडीदाराचा चेहरा लाजून गुलाबी होईल.

सेक्स तज्ज्ञांच्या मते, पतीपत्नीसाठी बेडचे एक वेगळे महत्त्व असते. पण तोच वेगळा होतो तेव्हा नात्याचा अर्थ पुरता बदलतो. म्हणूनच कितीही मतभेद असले तरी बेड वेगळा होऊ न देणे गरजेचे आहे, ही गोष्ट दोघांनीही कायम लक्षात ठेवायला हवी.

लिव्ह इन रिलेशनशिपचे राहण्यापूर्वी नियम

* प्रतिनिधी

लिव्ह-इन मध्ये राहणे हा खूप वेगळा अनुभव आहे. ज्यात तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवता आणि तुमच्या भविष्याचा विचार करता. हा एक मोठा निर्णय आहे ज्यामध्ये तुम्हाला वचनबद्धता, प्रेम, योजना आखायची आहे.

लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी, आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, म्हणून आपल्याला अनेक नियमांचे पालन करावे लागेल. ज्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यावी त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगू.

घरातील कामे वाटून घ्या

जेव्हा तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकत्र राहण्यास सुरुवात करता तेव्हा सर्वप्रथम तुम्ही दोघांनीही तुमचे काम शेअर करणे आवश्यक आहे जेणेकरून तुमच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण होऊ नये. कारण फक्त छोट्या गोष्टीच तुमचे नाते बिघडवू शकतात. जेव्हा तुम्ही कामाचे विभाजन करता तेव्हा तुम्ही एकमेकांना अधिक वेळ देऊ शकाल आणि त्याच वेळी आनंदी व्हाल.

खर्च सामायिक करा

जर तुम्ही दोघेही काम करत असाल तर तुमच्यासाठी हे सर्वात महत्वाचे आहे की तुम्ही दोघांनी तुमचे सर्व खर्च शेअर केले पाहिजेत जेणेकरून नंतर पैशासंदर्भात तुमच्यामध्ये कोणतीही समस्या किंवा गैरसमज होणार नाहीत. खर्च लहान असो वा मोठा, तुम्ही दोघांनी मिळून केले पाहिजे. यासह, पैशावरून तुमच्या दोघांमध्ये कधीही भांडण होणार नाही आणि पैशाच्या कमतरतेची भावनाही होणार नाही. अनावश्यक खर्च न करण्याचा प्रयत्न करा आणि भविष्यासाठी पैसे वाचवा.

घर स्वच्छ ठेवा

असे होऊ शकते की तुमच्या दोघांना स्वच्छता करायला आवडत नाही, पण तरीही तुम्ही घरातील गोष्टी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करता. प्रत्येक व्यक्तीची निवड वेगळी असते, म्हणून तुम्ही अशा गोष्टी खरेदी कराव्यात ज्या तुमच्या दोघांना आवडतील जेणेकरून तुमचे घर चांगले दिसेल आणि या गोष्टींमुळे तुमच्यात भांडण होणार नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें