* पूनम अहमद

नेहा कार्यालयातून बाहेर पडली. कपिल बाहेरच बाईकवर तिची वाट पाहत होता. ती तोऱ्यात त्याच्या कमरेला हातांनी धरत मागे बसली. त्यानंतर चेहऱ्यावर स्कार्फ बांधला.

कपिलने स्मितहास्य करीत बाईक सुरू केली. वाहतूक कोंडीतून पुढे गेल्यानंतर जेव्हा बाईक कमी गर्दीच्या रस्त्यावर आली तेव्हा नेहाने कपिलच्या गळयाचे चुंबन घेतले. त्यानंतर कपिलने निर्जन रस्ता पाहून बाईक रस्त्याच्या कडेला उभी केली. नेहा हसतच बाईकवरून उतरली. कपिलने हेल्मेट काढताच नेहाने तिचे हात कपिलच्या गळयाभोवती नेले. कपिलनेही तिच्या कमरेभोवती हात नेत तिला आपल्या जवळ ओढले. दोघेही बराच वेळ एकमेकांमध्ये गुंतून गेले होते.

वाढणाऱ्या तर कधी मंदावणाऱ्या श्वासांवर नियंत्रण ठेवत नेहा म्हणाली, ‘‘ऐक ना, आता लगेचच माझ्या घरी यायला तुला आवडेल का?’’

‘‘काय?’’ कपिलला आश्चर्य वाटले.

‘‘होय, घरी कोणीच नाही. चल ना.’’

‘‘तुझे आईवडील कुठे गेले आहेत?’’

‘‘कुठले तरी नातेवाईक वारल्यामुळे त्यांच्या घरी भेटायला गेले आहेत. रात्री उशिरा येतील.’’

‘‘तर मग चल, आपण वेळ का वाया घालवतोय? अगं, मी खूपच अधीर झालो आहे, कारण आपण आता तेच करायला चाललोय जे मागील १५ दिवसांपासून करू शकलो नव्हतो. काय करणार? रुडकीत जागाच मिळत नाही. मागच्या वेळेस माझ्या घरी कोणी नव्हते तेव्हा आपल्याला संधी मिळाली होती.’’

‘‘चल, आता गप्पा मारायची नाही तर काही वेगळेच करायची इच्छा आहे.’’

कपिलने मोठया उत्साहात बाईक नेहाच्या घराकडे वळविली. संपूर्ण रस्ता नेहा चेहरा स्कार्फने झाकून कपिलच्या कमरेभोवती हातांची मिठी घालून त्याला चिकटून बसली होती. दोघे तरुण प्रेमी वेगळयाच धुंदीत होते.

दोघांचे अफेअर २ वर्षांपासून सुरू होते. दोघांची कार्यालये एकाच इमारतीत होती. याच इमारतीत कधी कॅफेटेरिया तर कधी लिफ्टमध्ये भेट होत असल्याने त्यांची ओळख झाली होती. पाहताक्षणीच एकमेकांना ते आवडले होते. नेहाचा धाडसी स्वभाव कपिलला आवडला होता, तर कपिलच्या शांत, सौम्य स्वभावावर नेहा भाळली होती. या २ वर्षांत दोघे अनेकदा शरीरानेही एकमेकांच्या जवळ आले होते.

नेहाला मोकळेपणाने आयुष्य जगायचे होते. कधी कधी तर कपिलला तिच्या जीवनाकडे पाहण्याच्या या बिनधास्त दृष्टिकोनाचे आश्चर्य वाटायचे. नेहाच्या घरी तिचे आईवडील होते. दोघेही कामाला जायचे. छोटा भाऊ महाविद्यालयात शिकत होता. कपिल त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याची आई गृहिणी होती. वडील बांधकाम व्यावसायिक होते. त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली होती. कपिलने नेहाबाबत घरी सांगितले होते. नेहाला सून करून घेण्यास दोघेही तयार होते. नेहा कपिलच्या घरी जात असे, पण नेहाच्या घरच्यांना कपिलबाबत काहीच माहीत नव्हते.

नेहमीप्रमाणे कपिलने नेहाच्या घरापासून दूर असलेल्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्समधील पार्किंगमध्ये बाईक पार्क केली. आधी नेहा तिच्या घरी गेली. त्यानंतर थोडया वेळाने कपिल गेला. याआधीही घरी कोणी नसताना दोघांनी अनेकदा अशा संधीचा चांगलाच फायदा घेतला होता. घरात येताच आपली बॅग एका ठिकाणी ठेवून कपिलने नेहाला मिठीत घेतले. तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव केला. नेहाने त्या वर्षावात स्वत:ला चिंब भिजू दिले. नेहाच्या पलंगावरील हा प्रेमाचा पाऊस काही वेळानंतर थांबला. कपिलने सांगितले, ‘‘प्रिये आता तुझ्याशिवाय राहणे अशक्य झाले आहे. चल ना, लग्न करूया. उशीर कशासाठी करत आहेस?’’

नेहाने त्याकडे दुर्लक्ष करत म्हटले, ‘‘लग्नासाठी इतका अस्वस्थ का होत आहेस? जे नंतर करायचे ते आपण आधीच करत आहोत ना?’’

‘‘अगं, तसं नाही. आता लपूनछपून नाही तर जगजाहिरपणे तुझ्यासोबत मला माझ्या घरात रहायचे आहे.’’

‘‘पण, सध्या लग्न करायची माझी इच्छा नाही, कपिल.’’

‘‘आणखी किती वाट बघायला लावणार आहेस?’’

‘‘पण, मी असे कधीच सांगितले नाही की, मी तुझ्याशी लवकरात लवकर लग्न करेन.’’

‘‘मला मात्र तुझ्याशीच लग्न करायचे आहे. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. नेहा, मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले.’’

‘‘अरे कपिल,’’ असे म्हणत नेहाने पुन्हा आपले हात कपिलच्या गळयाभोवती गुंफले. त्यानंतर म्हणाली, ‘‘चल, तुझ्यासाठी पुन्हा कॉफी आणते. दोघांनी रोमान्स करतच कॉफीचे घोट घेतले. त्यानंतर थोडया वेळाने कपिल निघून गेला. प्रत्येक क्षणाला एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप होताच.

हा दोघांमधील नियमच होता की, कपिलच नेहाला तिच्या घरी सोडायला जात असे. घरी गेल्यानंतर कपिलने स्पष्टपणे सांगितले की, तो नेहासोबत होता. त्याची आई सुधाने सांगितले, ‘‘बाळा, तुम्ही दोघे लग्न का करीत नाही? दोघेही चांगले कमावते आहात, मग उशीर कशासाठी करत आहात?’’

‘‘आई, इतक्या लवकर नेहाला लग्न करायचे नाही.’’

‘‘तर मग कधी करायचे आहे. तिच्या आईवडिलांचे काय म्हणणे आहे?’’

‘‘काही नाही आई, अजूनपर्यंत तिने तिच्या घरी आमच्याबाबत काहीही सांगितले नाही.’’

‘‘अरे, असं कसं?’’

‘‘जाऊ दे आई, जसे नेहाला योग्य वाटेल. कदाचित तिला आमच्या नात्याला आणखी वेळ द्यायचा असेल.’’

‘‘बाळा, माझ्या मनात आणखी एक विचार घोळत आहे. तुझे खरेच तिच्याशी पटेल का? ती खूपच बोल्ड आहे आणि तू अतिशय साधा आहेस.’’

‘‘अगं आई, ती आजच्या जमान्यातील मुलगी आहे ना? आजकालच्या मुली या तुझ्या काळातील मुलींपेक्षा थोडया वेगळया आहेत. नेहा बोल्ड आहे, पण चुकीची नाही. तू काळजी करू नकोस. कदाचित तिला आणखी काही वेळ हवा असेल.’’

‘‘पण, मला असे वाटते की, आता तू लग्नाचा गांभीर्याने विचार करायला हवा.‘‘

‘‘बरं, ठीक आहे आई. तिच्याशी बोलतो.’’

२ दिवसांनंतरच नेहाने कपिलला सांगितले की, ‘‘अरे मित्रा, आपली लॉटरी लागली आहे. माझा भाऊ मित्रांसोबत सहलीला जात आहे आणि माझ्या काकांची तब्येत बरी नाही. त्यामुळे माझे आईवडील त्यांना पाहण्यासाठी दिल्लीला जात आहेत. चल, आता तूही तुझ्या घरी सांग की, तू सहलीला जात आहेस. दोघांनीही सुट्टी घेऊया आणि घरात खूप मजा करूया.

‘‘खरंच?’’

‘‘जीवनाचा मस्त आंनद घेऊया. लवकर ये. जेवण बाहेरून मागवू. भरपूर मजा करू.’’

कपिल नेहावर मनापासून प्रेम करत होता. जसे नेहाने सांगितले होते तसेच त्याने केले. सहलीला जातोय असे घरी सांगून कपडे वगैरे घेऊन नेहाच्या घरी आला. दोघांनी मनसोक्त रोमान्स केला. जेव्हा मनाला वाटत होते तेव्हा ते जवळ येत होते. एकमेकांमध्ये हरवून गेले होते.

कपिलने सांगितले, ‘‘प्रिये, तूझ्यासोबतचे हे क्षण म्हणजेच माझे जीवन आहे. तू माझ्या आयुष्यात लवकरच कायमची ये. आता मी अजून थांबू शकत नाही. सांग, तुझ्या आईवडिलांशी माझी भेट कधी घडवून आणणार आहेस?’’

नेहाने प्रेमाने त्याला धक्का दिला. ‘‘तू सतत लग्नाचा विषय का काढतोस? एवढी काय घाई आहे? आणि मी किती वेळा सांगितले आहे की, सध्या माझी लग्न करण्याची इच्छा नाही.’’

आता कपिल गंभीर झाला होता. ‘‘नेहा, असे काय बोलतेस? माझी आई लग्नासाठी माझ्या मागे लागली आहे. शिवाय आता आपण आणखी वाट का पाहत आहोत?’’

नेहाने शांतपणे, पण गंभीर स्वरात सांगितले, ‘‘हे बघ, मला आणखी काही वर्षे लग्नाच्या फंदात पडायचे नाही. मी फक्त २६ वर्षांची आहे आणि जीवनाचा आनंद घेत आहे.’’

‘‘पण, मी ३० वर्षांचा होईन. आज नाही तर उद्या, आपल्याला लग्न करावेच लागेल. एकमेकांच्या इतक्या जवळ आलो आहोत तर मग असे लपूनछपून का आणि कधीपर्यंत भेटत रहायचे?’’

‘‘असे मी कधी म्हटले की, आज नाही तर उद्या आपण लग्न करणारच आहोत म्हणून?’’

‘‘म्हणजे?’’

‘‘हे बघ कपिल, आतापर्यंत मी तुझ्या माझ्या आईवडिलांशी भेट घडवून आणली नाही, कारण आपले ठरवून लग्न होऊच शकत नाही. आपण वेगवेगळया जातीचे आहोत. या वयात जातीवरून मला कुठलाच त्रास करून घ्यायचा नाही. आपण प्रेम, रोमान्स, सेक्स अशी सर्व मजा तर घेतच आहोत. तू लग्नासाठी मागे का लागला आहेस? लग्न तर माझ्यासाठी सध्या खूप दूरची गोष्ट आहे.’’

‘‘तुझे माझ्यावर प्रेम नाही का?’’

‘‘आहे ना?’’

‘‘मग तुझ्या मनाला असे वाटत नाही का की, एकमेकांसोबत राहण्यासाठी आपल्याला लग्न करायला हवे?’’

‘‘नाही, माझ्या मनाला असे काहीच वाटत नाही.‘‘

‘‘बरं सांग, कधीपर्यंत थांबायचे आहे तुला? मी वाट पाहीन.’’

‘‘मला नाही माहीत,’’ कपिलला खूपच गंभीर झालेले पाहून लडिवाळपणे त्याची छेड काढत नेहा म्हणाली, ‘‘मी तुला पुन्हा सांगते. लग्नाचा विचार सोडून दे, जीवनाची मजा घे.’’

‘‘म्हणजे तू माझ्याशी लग्न करणार नाहीस?’’

‘‘नाही.’’

‘‘नेहा, मला काहीच समजत नाहीए. हे सर्व काय आहे?’’ तू २ वर्षांपासून माझ्यासोबत आहेस. हे माहितीही नाही की, आपण किती वेळा शरीराने एक झालो आहोत. तरीही तुझे म्हणणे आहे की, तुला माझ्याशी लग्न करायचे नाही.’’

‘‘आपले शारीरिक संबंध आहेत तर त्यात आपण कोणता गुन्हा केला? आपण एकमेकांना आवडत होतो म्हणून इतके जवळ आलो. यात लग्नाचा काय संबंध?’’

‘‘तर मग लग्न कधी आणि कोणाशी करणार आहेस?’’

‘‘सध्या तरी मला काहीच माहीत नाही. तुझ्याशी लग्न करेन, असा विचार करून मी तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. कपिल, आता ते युग गेले जेव्हा लग्न करण्यासाठी मुली शारीरिक संबंधाला परवानगी देत असत. निदान मी तरी असा विचार करत नाही. मला फक्त जीवनाचा आंनद उपभोगायचा आहे. घर, संसारात सध्या तरी मला अडकायचे नाही. तूही लग्नाच्या मागे न लागता जीवनाचा आंनद घे.’’

‘‘नाही नेहा, मला आपल्या नात्याला नाव द्यायचे आहे.’’

आता नेहा रागावली होती. ‘‘अरे, मग अशी मुलगी शोध जी तुझ्याशी आताच्या आता लग्न करेल.’’

कपिलने भावूक होऊन तिचा हात धरला. ‘‘नेहा, असे कधीच म्हणू नकोस. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.’’

‘‘अरे, या सर्व गोष्टी बोलण्यापुरत्या असतात. रोज हजारो मन जुळतात आणि तूटतातही. हे सुरूच राहते.’’

कपिलचे डोळे पाणावले. नकळतच अश्रू गालांवर ओघळले. हे पाहून नेहा हसली. ‘‘हे काय कपिल? इतका भावनिक का होतोस? शांत हो.’’

‘‘माझ्यापासून कधीच दूर जाऊ नकोस नेहा. खरंच माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, असे सांगत तिला मिठीत घेऊन कपिलने तिचे चुंबन घेतले. नेहाही त्याच्या मिठीत विसावली. थोडा वेळ रोमान्स सुरू राहिला. बराच वेळ दोघांनी एकत्र घालवला. दुसऱ्या दिवशी कपिल घरी जायला निघाला तेव्हा नेहा म्हणाली, ‘‘प्रॅक्टिकल रहायला शिक.‘‘

कपिलने तिच्याकडे रोखून पाहताच ती हसली आणि म्हणाली, ‘‘प्रॅक्टिकल राहण्यातच शहाणपण आहे. भावनिक होऊन मला अपराधीपणाच्या सहलीला पाठवून द्यायचा प्रयत्न करू नकोस.’’

त्यानंतर काही दिवस नेहमी प्रमाणेच गेले, पण नंतर कपिलच्या लक्षात आले की, नेहा त्याला टाळत आहे. कधी फोनवर सांगायची, ‘‘तू जा, माझी मीटिंग आहे. उशीर होईल. कधी भेटलीच तरी घाईत असायची. बाईकवरून आलीच तरी शांतपणे बसायची. पूर्वीसारखा बाईकवरील रोमान्स संपला होता. अंतर ठेवून अनोळखी असल्यासारखी बसत असे. कपिलने कारण विचारल्यास कामाचा ताण आहे, असे सांगायची. कपिलच्या हे लक्षात आले होते की, ती त्याच्यापासून दूर जात आहे. फोन केला तरी ती अनेकदा तो उचलत नसे. काहीतरी कारण सांगत असे.’’

एके दिवशी कपिलने बाईक रस्त्यावर एका निर्जन ठिकाणी थांबवली. विचारले, ‘‘नेहा मला स्पष्टपणे सांग, तू माझ्यापासून दूर का जात आहेस? तुझे असे अनोळखी असल्यासारखे वागणे मला आता सहन होत नाही.’’

नेहानेही आपले मन मोकळे केले. ‘‘कपिल, तू खूपच भावनाप्रधान आहेस. आपल्या आतापर्यंतच्या संबंधांना तुला लग्नात बांधायचे आहे. पण, माझा लग्नाचा विचार नाही. मला माझ्या करियरवर लक्ष द्यायचे आहे. सध्या तरी मला लग्नाच्या भानगडीत पडायचे नाही. तू सतत लग्नाचा तगादा लावत असल्याने मला कंटाळा आला आहे. शिवाय तुझ्यासारख्या भावनाप्रधान माणसाशी माझे फार काळ पटणार नाही. म्हणून असे समज की, मी आपले   संबंध तोडत आहे. मला तुला हेच सांगायचे होते.’’

कपिलचा कंठ दाटून आला. ‘‘असे म्हणू नकोस. नेहा, मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नाही.’’

‘‘अरे, हे सर्व संवाद चित्रपटासाठी ठीक आहेत. कुणावाचून कोणी मरत नाही. चल, आज मला शेवटचे घरी सोड. आता संपले आपले संबंध. तुला तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा. एक चांगली मुलगी बघून लग्न कर आणि हो, मलाही लग्नाला बोलाव. मी येईन. माझ्या मनात अपराधीपणाची कोणतीही भावना नाही. शिवाय मी त्या मुलींसारखी नाही ज्या आपल्या प्रियकराला दुसऱ्या मुलीसोबत पाहू शकत नाहीत,’’ असे म्हणून नेहा जोरात हसली. कपिलने जड अंतकरणाने तिला घरापर्यंत सोडले.

‘‘बाय कपिल, असे म्हणत तोऱ्यातच नेहा तिच्या घराच्या दिशेने निघाली. तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही. कपिल मात्र ती नजरेआड होईपर्यंत तेथेच उभा राहून तिला पाठमोरा पाहत होता. त्यानंतर पाणावलेल्या डोळयांनीच तो बाईकवरून माघारी परतला. त्याचे नेहावर खरे प्रेम होते. तिच्याशिवाय तो जगण्याचा विचार करू शकत नव्हता. कसाबसा तो घरी गेला. त्याचा असा उतरलेला चेहरा पाहून आईवडील घाबरले. तब्येत बरी नाही असे सांगून तो २ दिवस घरातच झोपून होता. त्यामुळे आईवडिलांना काळजी वाटू लागली. तो काहीच खात नव्हता. काही बोलतही नव्हता.

आईने त्याचा जीवलग मित्र सुदीपला बोलावले. सुदीपला कपिल आणि नेहाबाबत माहीत होते. तो खूप वेळ कपिलसोबत बसला होता. पण, कपिल काहीच बोलत नव्हता. एखाद्या दगडासारखा बसला होता. खूप वेळानंतर सुदीपच्या काही प्रश्नांची उत्तरे त्याने रडत दिली आणि सांगितले की, नेहाने त्याच्यासोबतचे नाते तोडले आहे. सुदीप बराच वेळ त्याची समजूत काढत होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीची सकाळ घरात दुखवटा घेऊन आली. कपिलने रात्रीच हाताची नस कापून आत्महत्या केली होती. त्यापूर्वी एका कागदावर लिहून ठेवले होते की, आई मला माफ कर. नेहा मला सोडून गेली आहे. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. बाबा, मला माफ करा.’’ आईवडिलांनी हंबरडा फोडला. सुदीपही  माहिती मिळताच हताशपणे धावत आला. जोरजोरात रडू लागला. प्रसंग बाका होता. कपिलची आई जोरजोरात रडत सतत हेच बोलत होती की, ‘‘एका मुलीच्या प्रेमापायी तू आम्हाला कसा विसरलास? आता आमचे कोण आहे?’’

शेजारी, नातेवाईक सर्व गोळा होऊ लागले. कपिलच्या आईवडिलांना सावरणे सर्वांसाठी अवघड झाले होते. दोघांनाही अश्रू अनावर झाले होते.

सुदीपला नेहाचा खूपच राग आला होता. एके दिवशी तो तिच्या कार्यालयाच्या इमारतीबाहेर उभा राहून तिची वाट बघू लागला. ती येताच त्याने स्वत:ची ओळख करून दिली आणि कपिलच्या आत्महत्येबाबत सांगितले. नेहा एक दीर्घ श्वास टाकत म्हणाली, ‘‘ऐकून वाईट वाटले, पण यासाठी माझ्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करू नकोस. तोच कमकुवत मनाचा होता. माझे खरे बोलणे आणि इतर अनेक गोष्टी सहन करू शकला नाही. यात माझी काहीही चूक नाही. त्याच्या आत्महत्येसाठी मी  स्वत:ला अजिबातच दोषी मानणार नाही. नो गिल्ट ट्रिप. मला अपराधीपणाच्यासहलीसाठी पाठवू नकोस, समजले?’’ असे म्हणत ती भराभर चालत पुढे निघून गेली.  सुदीप आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...