कथा * रमा अवस्थी

संध्याकाळ होत आली होती. पर्वताच्या मार्गावर संध्याकाळ अधिकच गडद होत चालली होती. शैलेन गाडीत बसून विचार करीत होता की, कुठे मुंबईतील गर्दी आणि कुठे ही डोंगरांमधील शुद्ध हवा. आज कितीतरी वर्षांनंतर तो आपल्या घरी आपल्या आईवडिलांना भेटायला निघाला होता. त्याचे घर कुर्ग येथे होते. कुर्ग निसर्ग सौंदर्य आणि कॉफीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. त्याची बहीण इरा, जी त्याची बहीण कमी आणि मैत्रीण जास्त होती ती अमेरिकेहून आली होती. जास्त करून त्याचे आईवडिल त्याच्यासोबत मुंबईत राहत, कारण आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या शैलेनकडे वेळ नव्हता. तो आपल्या कुटुंबासह मुंबईत राहत होता. परंतु यावेळी इरा आली होती आणि तिला यावेळेस आपला वेळ कुर्गमध्ये घालवायचा होता. तिला भेटण्यासाठी आणि आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शैलेन ३ दिवसांसाठी आपल्या घरी निघाला होता. मायसोरच्या पुढे असलेली तांदळाची शेती आणि स्वच्छ, सुंदर गावांना मागे टाकत त्याची गाडी पुढे निघाली होती. त्याच्या घरापर्यंत जाणारा रस्ता नयनरम्य होता.

सहजच शैलेनला आठवण झाली की, इराला तिच्या बालपणीच्या मैत्रिणींना भेटून त्यांच्यासह शाळेत जाण्याची इच्छा आहे. यावेळेस तिच्याकडे वेळेची कमतरता नव्हती. इरा आणि तिच्या सर्व मैत्रिणी एकाच शाळेत शिकल्या होत्या. त्यांना पुन्हा एकत्र मिळून शाळेत जायचे होते आणि खूप वर्षांनंतर अखेर ती संधी मिळाली होती.

‘‘मला, बरेच झाले,’’ शैलेनने मनातल्या मनात विचार केला. तोही त्याच शाळेत शिकला होता. इरा आणि तिच्या मैत्रिणींपेक्षा तो ३ वर्षांनी मोठा होता. भाऊबहीण एकमेकांच्या सुखदु:खाचे वाटेकरी तर होतेच, पण सोबतच सर्व गुपिते एकमेकांना सांगत असत. एकमेकांची रहस्ये सर्वांपासून लपवून ठेवत. याची आठवण होताच शैलेनला हसू आले. त्याला इराच्या मैत्रिणी आठवल्या. त्या सर्व इराप्रमाणेच खोडकर होत्या. अनेकदा तो इराच्या मैत्रिणींना सोडायला त्यांच्या घरी जात असे. त्याने इराच्या बऱ्याच मैत्रीणींना सायकल चालवायला शिकविली होती.

या वेळेस तो इराला विचारणार होता की, तिच्या सर्व खोडकर मैत्रिणी कुठे आहेत व कशा आहेत? तसे तर फेसबूक आणि व्हॉट्सअपमुळे सर्व एकमेकांच्या संपर्कात होत्या. शैलेनला इराच्या मैत्रिणींची नावे आणि चेहरे आठवू लागले. हे चेहरे आणि नावे त्याच्या आयुष्यासाठी विशेष महत्त्वाची नव्हती, पण या सर्वांसोबत त्याच्या बालपणीच्या आठवणी जोडल्या गेल्या होत्या. शैलेनला आठवले की, जेव्हा त्याचे लग्न मुंबईत होणार, असे पक्के झाले होते तेव्हा इराच्या सर्व मैत्रिणी खूपच निराश झाल्या होत्या. त्या सर्वांना त्याच्या लग्नात सहभागी व्हायचे होते, कारण त्यांच्यासाठी भरपूर मजा करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी मिळणार नव्हती. नंतर जेव्हा रिसेप्शन कुर्गमध्ये होणार, असे ठरले तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद परतला.

गाडी कॉफीच्या बागांमधून पुढे चालली होती आणि शैलेनला इराच्या मैत्रिणींची नावे आठवू लागली होती. या चेहऱ्यांमधील एक वेगळा चेहराही होता ज्याची आठवण होताच शैलेनचा जीवनातील उत्साह अधिकच वाढल्यासारखे वाटायचे. तो चेहरा वेदाचा होता. वेदा ही इराच्या खास मैत्रिणींपैकी एक होती. वेदात असे वैशिष्ट्य होते की, ती तिच्या चेहऱ्यावरील खोडकरपणाला निरागसतेत सहज बदलू शकत होती. तसा तर शैलेन इराच्या सर्व मैत्रिणींना भेटत असे. पण एका रविवारच्या संध्याकाळी असे काही घडले की, त्यानंतर त्याला वेदाला भेटताना अवघडल्यासारखे वाटू लागले होते.

शैलेन वेदाला शेवटचे भेटला त्या गोष्टीलाही आता १६ वर्षांहून अधिक काळ लोटला होता. ती शैलेनच्या रिसेप्शनलाही येऊ शकली नव्हती. त्या रविवारच्या संध्याकाळी असे काही घडले होते की, जे आजही शैलेनला जगण्याची प्रेरणा देत असे. तसे तर एक सुखी आयुष्य जगण्यासाठी जे काही हवे ते सर्व त्याच्याकडे होते, पण तरीही रविवारची ती संध्याकाळ नसती तर सर्व अधुरे राहिले असते. १६ वर्षांपूर्वी सोशल मीडिया नव्हता. त्यावेळेस चिठ्ठी म्हणजे प्रेमपत्र लिहिली जायची. त्या रविवारच्या संध्याकाळी अशीच एक चिठ्ठी शैलेनला मिळाली होती. त्या चिठ्ठीत त्याचे खूप कौतुक करण्यात आले होते आणि त्याने केलेल्या प्रत्येक मदतीसाठी (सायकल शिकविणे, गृहपाठासाठी मदत करणे इत्यादी) धन्यवाद देण्यासह शेवटी असे लिहिले होते की, शैलेनने त्या रात्री ८ वाजता फोनची वाट पाहा. पत्राच्या शेवटी वेदाचे नाव लिहिले होते.

शैलेन ती चिठ्ठी हातात घेऊन तिथेच बसून राहिला. तसे तर त्या चिठ्ठीत त्याच्यावर प्रेम असल्याबाबत कुठलाच उल्लेख उघडपणे केलेला नव्हता, पण चिठ्ठी लिहिणारी मुलगी वेदाच होती, हे स्पष्ट झाले होते. तिला तो आवडत असे. पहिल्या आणि कदाचित शेवटच्या वेळेस असे घडले होते की, एखाद्या मुलीने त्याचे कौतुक केले होते. महानगरांमध्ये आणि त्याच्या परदेशातील प्रवासात अनेक महिला मैत्रिणींनी आणि महिला सहकर्मचाऱ्यांनी त्याचे कौतुक केले होते, पण त्या सर्वंमध्ये नाटकीपणा जास्त होता. ही चिठ्ठी आणि त्यातील भावना शैलेनला दवबिंदूच्या थेंबाप्रमाणे सुखावह वाटत असे.

त्या काळात भावनांमध्ये खरेपणाची ऊब होती, आजच्याप्रमाणे त्या वरवरच्या, थंड नव्हत्या. आजही ती चिठ्ठी शैलेनने जपून ठेवली होती. जेव्हा कधी शैलेनला ती चिठ्ठी आणि त्यात लिहिलेले शब्द आठवायचे तेव्हा त्याचा थकवा बऱ्याच अंशी निघून जायचा.

तो त्या रविवारच्या संध्याकाळी फोनची वाट पाहत होता. पण वेदाने ८ वाजताची चुकीची वेळ निवडली होती. रविवारच्या रात्री शैलेनचे वडील सर्वांसोबत जेवत आणि फोनही त्याच खोलीत होता. वेदा फोन करण्यासाठी वेगळा एखादा दिवस निवडू शकत होती.

शैलेन रात्रीचे ८ वाजण्याची वाट पाहात होता. चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे फोन आला आणि तोही ८ वाजताच. फोन वडिलांनी घेतला. जेव्हा ते घरी असायचे तेव्हा तेच फोन घ्यायचे. पण फोन कट झाला आणि पुन्हा आलाच नाही. पुढचे काही दिवस शैलेनने वेदाचा विचार करण्यात घालवले. त्यानंतर तो वेदाला भेटला, पण तेव्हा परिस्थिती अशी नव्हती की, तो तिला चिठ्ठीबाबत विचारू शकला असता. त्यानंतर हळूळू सर्व आपापल्या आयुष्यात पुढे गेले.

शैलेन मुंबईला आला. इरा अमेरिकेला आणि वेदा बंगळुरुला गेली. त्यानंतर असे ऐकायला मिळाले होते की, वेदाचे लग्न बंगळुरुलाच झाले होते. पण शैलेन ती चिठ्ठी विसरू शकला नाही. आजही रविवरचीच संध्याकाळ होती आणि शैलेन आपल्या घरी कुटुंबियांना भेटायला चालला होता. आता त्याची गाडी वळणदार रस्यावरून घराच्या दिशेने निघाली होती. अचानक मोबाईल वाजला. इराने फोन केला होता.

‘‘आणखी किती वेळ लागेल?’’ इराने उतावीळपणे विचारले.

‘‘बस आणखी अर्धा तास… कॉफी तयार ठेव… मी पोहोचतोच आहे,’’ शैलेनने उत्तर दिले.

तेवढयात इराने विचारले, ‘‘ओळख कोण आहे माझ्यासोबत?’’

तिने अचानक विचारलेल्या या प्रश्नामुळे शैलेन गोंधळला. कोण असेल बरं?

तितक्यात इरा म्हणाली, ‘‘अरे माझी सर्वात प्रिय मैत्रीण वेदा.’’

शैलेनचे हृदय धडधडू लागले. त्याला पुन्हा एकदा ती चिठ्ठी आणि रविवारची संध्याकाळ आठवली. तो स्वत:शीच हसला. वेदा आली होती, या गोष्टीचा त्याला आनंद झाला. संध्याकाळ गडद होत चालली होती. शैलेन घरी पोहोचला. तेथे पोहोचताच आईवडिलांच्या पाया पडला.

तेवढयात मागून आवाज आला, ‘‘हॅलो, कसा आहेस?’’

शैलेनने मागे वळून पाहिले असता वेदा समोर उभी होती.

‘‘हॅलो वेदा, कशी आहेस?’’

शैलेनने तिच्याकडे पाहात हसत विचारले.

‘‘मजेत,’’ वेदाने उत्तर दिले.

शैलेनने पाहिले की, वेदात फारसा बदल झाला नव्हता. तेच डोळे, तसाच चेहरा, तोच निरागसपणा आणि या सर्वांमागे तोच खोडकर स्वभाव. काही औपचारिक गोष्टी आणि एकमेकांच्या कुटुंबाची विचारपूस केल्यानंतर त्यांनी कॉफी प्यायला सुरुवात केली. शैलेन मनोमन विचार करू लागला की, वेदा रविवारची ती संध्याकाळ विसरली असेल का? तसे पाहायला गेल्यास आठवणीत ठेवण्यासारखे होते तरी काय? एका चिठ्ठीचा विसर पडणे सोपे होते. पण शेवटी काहीही झाले तरी ती चिठ्ठी वेदाने स्वत:च्या हाताने लिहिली होती. स्वत: लिहिलेल्या चिठ्ठीला ती कशी काय विसरली? तसेही आजच्या फेसबूकच्या युगात एका छोटयाशा चिठ्ठीचे महत्त्व तरी कितीसे असणार? पण त्या काळात चिठ्ठीमुळेच दोन हृदये जोडली जात होती.

त्या चिठ्ठीने शैलेनला एक जाणीव करून दिली होती. कोणाला तरी आपण आवडत असल्याची सुखद जाणीव.

ही जाणीव जीवनात अत्यावश्यक असलेल्या हवा आणि पाण्याइतकी महत्त्वाची नसली तरी तिचे असणे जीवन आणखी सुंदर बनविते. पण आश्चर्य म्हणजे वेदाला हे काहीच आठवत नव्हते. वेदा आणि शैलेन, दोघेही आपापल्या आयुष्यात गर्क होते, हे खरे असले तरी भूतकाळात जगलेल्या काही क्षणांची आठवण नव्याने जागी करायला काहीच हरकत नव्हती. म्हणूनच वेदाने ज्या भावना एके दिवशी पत्राच्या रुपात शब्दबद्ध केल्या होत्या त्या भावना शैलेनच्या नसतानाही त्याला आठवत होत्या, पण असे वाटत होते की, वेदा विसरून गेली होती.

शैलेनला या सर्वांची जाणीव होताच अस्वस्थ झाल्यासारखे वाटले. रात्रीचे १० वाजले होते. तो बाल्कनीत बसला होता. तेवढयात इरा कॉफी घेऊन आली. शैलेन तसे तर इरापासून काहीच लपवित नसे, पण न जाणो कोणता विचार करून वेदाच्या चिठ्ठीबाबत त्याने इराला काहीच सांगितले नव्हते. आज अनेक वर्षांनंतर शैलेनला असे वाटू लागले की, वेदाच्या चिठ्ठीबद्दल इराला सांगायला हवे. इरा तेथेच बसून कॉफी पीत होती आणि आपल्या मोबाईलवर काहीतरी पाहात होती.

‘‘वेदा कुठे कामाला जाते का?’’ शैलेनने विषयाला हात घातला.

‘‘हो’’, मोघम उत्तर देऊन इरा पुन्हा मोबाईल पाहू लागली.

‘‘कुठे?’’ शैलेनने विचारले.

‘‘तिचे बंगळुरूमध्ये एनजीओ आहे.’’ इराचे लक्ष अजूनही मोबाईलमध्येच होते.

शैलेन पुढे बोलण्यासाठी उगाचच गळा खाकरत म्हणाला, ‘‘तुला माहीत आहे का, वेदाने मला एक चिठ्ठी लिहिली होती. खूप आधी, जेव्हा तुम्ही महाविद्यालयात शिकत होता. मी त्या चिठ्ठीला कोणतेच उत्तर दिले नव्हते.’’

आता मात्र इराने मोबाईल बाजूला सारत भावाकडे पाहिले. ‘‘कोणती चिठ्ठी, तीच का, जी छोटूच्या हातून पाठविण्यात आली होती?’’ इराने हसून विचारले.

‘‘हो, हो, तीच… तुला माहीत आहे का?’’ शैलेनला इराने त्या चिठ्ठीचा विषय हसण्यावारी घेतल्याचा राग आला होता. तो सोडून त्या चिठ्ठीशी जोडले गेलेले इतर सर्वच ही गोष्ट एवढी हसण्यावारी का घेत होते?

‘‘ती चिठ्ठी वेदाने लिहिली नव्हती. मधू आणि चंदाने लिहिली होती,’’ इराने जांभई देत सांगितले.

‘‘याचा अर्थ काय? मधू आणि चंदाने लिहिली होती, कशासाठी?’’ शैलेनने विचारले. मधू आणि चंदाही इराच्या मैत्रिणी होत्या आणि त्याही खूपच खोडकर होत्या.

शैलेनने विचारलेला प्रश्न ऐकून इरा हसू लागली. ‘‘अरे भावा, तू विसरून गेलास का? तो दिवस एप्रिल फूलचा होता.’’

मधू आणि चंदाचा चेहरा शैलेनच्या डोळयांसमोर आला.

‘‘पण चिठ्ठीखाली नाव वेदाचे होते.’’ शैलेनने सांगितले.

‘‘आता कोणाचे तरी नाव लिहावेच लागणार होते, त्यामुळे वेदाचे नाव लिहिले,’’ इराने उत्तर दिले.

‘‘वेदाला ही गोष्ट माहिती होती का?’’ शैलेनने आश्चर्यचकित होत विचारले.

‘‘कोणती गोष्ट? चिठ्ठीची का? सुरुवातीला काहीच माहीत नव्हते, पण नंतर त्यांनी मला आणि वेदाला सांगितले होते की, त्यांनी १ एप्रिल असल्याने तुला वेदाच्या नावाने मूर्ख बनवले होते,’’ इराने आळसावत सांगितले.

‘‘पण त्यांनी वेदाचे नाव लिहायला नको होते,’’ शैलेन पुटपुटला.

‘‘हो, लिहायला तर नको होते, पण त्यामुळे काही फरक पडणार नव्हता, कारण त्यांना माहीत होते की, तू एक सज्जन मुलगा आहेस,’’ डोळयांवर प्रचंड झोप असतानाही इराने उत्तर दिले.

शैलेन मनोनम हसत असा विचार करू लागला की, तो १ एप्रिल संपूर्ण १६ वर्षे साजरा झाला, असे कदाचित पहिल्यांदाच घडले असेल. पण काही का असेना, भलेही तो त्याला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न असला तरी त्या घटनेने त्याच्या जीवनातील आनंदात भर घातली होती. अजाणतेपणी का होईना, पण त्या मुलींनी असे काही केले होते ज्यामुळे शैलेनच्या जीवनातील आनंद वाढला होता.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...