* बीरेंद्र बरियार ज्योती

योगासनं करून माझा शुगर लेव्हल अगदी नॉर्मलला राहाते. गेली दोन वर्षं मी एलोपथी औषधं बंद केलेली आहेत. टीव्हीवर पाहून योगासनं स्वत:च करतो व मनसोक्त मिठाईसुद्धा यखातो, तरीही माझा शुगर लेव्हल नॉर्मलच राहाते.’

‘मी तर गेली चार वर्षं ब्लड प्रेशरची औषधंच बंद केली आहेत, किती दिवस औषधं घेत राहाणार. डौक्टर उगीचच औषधं देत राहतात. स्वत:च पुस्तकं वाचून होमिओपथिक औषधं घेत आहे. अजूनपर्यंत तरी कोणतीच अडचण आलेली नाही. डॉक्टरांनी तर अगदी हैराण करून सोडलं होतं की हे खाऊ नका ते खाऊ नका!’

‘खरंच जर डॉक्टरांनी औषधं सुचविली नाहीत, तर त्यांचा धंदा कसा काय चालणार? मी तर सांधेदुखीमुळे इतका हैराण झालो होतो की विचारूच नका. जेव्हा जेव्हा दुखणं वाढत असे तेव्हा डॉक्टर डझनभर औषधं खाण्यास सांगत. दुखण्यापेक्षा औषधं घेण्याचाच त्रास अधिक होता. एका आयुर्वेदिक तज्ज्ञाने अशी जडीबुटी दिली की गेले पाच महिने माझं दुखणं पार नाहीसं झालेलं आहे.’

‘‘अरे, सर्दीखोकला झाल्यावरसुद्धा डॉक्टर अॅण्टीबायोटिक्स, कफ सिरप व एलर्जीची औषधं देतात. याउलट होमिओपथीत काही अशी औषधं आहेत की ज्यांनी सर्दीखोकला झटपट ठीक केला जातो. मला असा काही त्रास होतो त्यावेळी पाच रुपयांत होमिओपथिक औषधं घेऊन मी स्वत:वर इलाज करतो. माझी मुलं व सुना व्यर्थ पैसे खर्च करत राहातात. साधी सर्दी व ताप आला तरी डॉक्टरचं औषध, कित्येक तपासण्या व औषधपाण्यावर हजारो रुपये खर्च करतात.’’

आयुष्य धोक्यात घालणारी वडीलमाणसं

बागांमध्ये, चौकाचौकांत जमलेले ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारे चर्चा करताना आढळून येतात. सकाळी अथवा संध्याकाळी फेरफटका मारताना अथवा आपल्या बैठकांमध्ये आपले आजार व त्यावर आपण स्वत:च केलेले उपचार याविषयी ते बोलत असतात. आपापल्या तोकड्या अनुभवांतून योग, आयुर्वेद व होमिओपथीविषयी गैरसमज पसरवत असतात. असं करून ते आपलं उर्वरित आयुष्य तर धोक्यात घालतातच परंतु आप्तस्वकियांनाही अडचणीत आणतात. आपल्या अर्धवट वैद्यकीय ज्ञानाने कित्येक वृद्ध लोक आपल्या शरीरस्वास्थ्याशी खेळत आहेत.

अशा वृद्धांच्या नातेवाइकांशी चर्चा केल्यावर अशा कित्येक क्लेशदायक घटना समोर येतात. ठाण्यातील एक चार्टर्ड अकाउंटंट रामभाऊ जोशी सांगतात की, त्यांचे वडील गेली वीस वर्षं हाय ब्लडप्रेशरने त्रस्त आहेत. अनेक वेळा होमिओपथिक औषधांच्या नादाने औषधं खाणं बंद करतात व यामुळे दर सहा महिन्यांनी अथवा वर्षाने त्यांची तब्येत इतकी बिघडते की त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. गेल्या वर्षी तर ते कोमामध्ये जाता जाता वाचले.

इंडियन मेडिकल एसोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजयकुमार सांगतात की, असे ज्येष्ठ नागरिक जर वेळीच सावध झाले नाहीत, तर मोठ्या अडचणींत येऊ शकतात. शुगर आणि उच्च रक्तदाबाची औषधं अशी मध्ये मध्ये सोडल्यास त्याचे दुष्परिणाम किडनी, यकृत इत्यादी अवयवांवर दिसून येतात व ते अवयव आपलं काम सोडून देण्याची शक्यता वाढते. हा परिणाम हळूहळू दिसून येतो. ज्येष्ठ नागरिक हे लक्षात घेत नाहीत व स्वत:च मृत्युला निमंत्रण देतात.

जेव्हा योग कमी पडतो

योग व आयुर्वेद एलोपथीपुढे तोकडे पडल्याचं ताजं उदाहरण म्हणजे स्वत:ला योगाचे महागुरू समजणारे रामदेव बाबा यांचंच आहे. उपोषणास बसलेल्या रामदेव बाबांची तब्येत जेव्हा अत्यंत खालावली तेव्हा त्यांना एलोपथिक उपचारांना शरण जावं लागलं. का नाही त्यांनी डीहायड्रेशनपासून योगाच्या सहाय्याने आपली सुटका करून घेतली? त्यांना ग्लुकोज का द्यावं लागलं व एलोपथिक हॉस्पिटलमध्ये का भरती व्हावं लागलं? उपवासाच्या वेळी ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासाठी त्यांनी जडीबुटी का नाही खाल्ली? हॉस्पिटलला नेण्यास त्यांनी का मज्जाव नाही केला? तेथे जाऊन तेथील उपचारांनी माझी तब्येत अधिकच बिघडेल असं का सांगितलं नाही? याचा अर्थ सरळ आहे की ते जाणत होते की अशा परिस्थितीत एलोपथिक उपचारांशिवाय पर्याय नाही.

ठाण्यातील एक डॉक्टर तेजस्वी सांगतात, काही ज्येष्ठ नागरिक असा दावा करतात की त्यांचा होमिओपथी व आयुर्वेदावर पूर्ण विश्वास आहे, पण मग जेव्हा तब्येत फारच बिघडते तेव्हा ते एलोपथिक डॉक्टरकडे कशाला जातात? खरं तर असे लोक टीव्हीवर योग पाहून आणि स्वस्त होमिओपथिक व आयुर्वेदिक पुस्तकं वाचून पूर्णपणे गोंधळलेले असतात.

आता एका ज्येष्ठ नागरिकाचाच अनुभव ऐका. साहेब निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. एके दिवशी डायबिटिसची गोळी खाल्ल्यावरसुद्धा त्यांना असं वाटलं की अजूनही आपणास चक्कर येत आहे. त्यांनी पटकन कुठलंसं होमिओपथिक औषध खाल्लं. त्यानंतरही आराम न पडल्याने त्यांनी एलोपथीची आणखी एक गोळी खाल्ली. यामुळे त्यांची तब्येत अधिक बिघडली व ते बेशुद्ध पडले. घरच्यांना वाटलं की त्यांची शुगर कमी झाल्याने त्यांना चक्कर आली आहे म्हणून त्यांनी त्यांना शुद्धीवर आणून सरबत पाजलं. मग त्यांना ताबडतोब डॉक्टरकडे नेण्यात आलं. शुगर लेव्हल चेक केल्यावर साखरेचं प्रमाण ४० आढळल्याने डॉक्टर म्हणाले की त्यांना वेळेवर साखर देण्यात आली नसती व येथे आणण्यात आलं नसतं तर त्यांचं जगणं अशक्य होतं.

आपल्या जीवाशी खेळू नका

डोंबिवलीचे डॉ. राजीव कुमार सांगतात की, स्वत:च डॉक्टर बनणाऱ्याचं हेच दु:ख असतं. वाईट एवढंच आहे की, शिकलेसवरलेले लोकसुद्धा असं मान्य करतात की आयुर्वेदिक अथवा होमिओपथिक औषधांचे दुष्परिणाम होत नाहीत. या भ्रमातून लोकांनी बाहेर पडण्याची गरज आहे अन्यथा  स्वत:च आपल्या प्राणावर बेतून घेतील.

ठाण्यातील होमिओपथिक डॉक्टर उपेंद्रकुमार वर्मा सांगतात की, टोकाला जाऊन तुम्ही होमिओपथीला नकार देऊ शकत नाही. होमिओपथिकपासून मिळणारा आराम खूपच प्रभावी आहे. परंतु लोक जेव्हा एलोपथीची औषधं खाऊन कंटाळतात तेव्हा ते इकडे वळतात. जर एखाद्या शिकलेल्या तज्ज्ञ होमिओपथीकडून वेळेवर इलाज करून घेतला तर कोणत्याही रोगावर फायदाच दिसून येईल. आपल्या ज्येष्ठांना अर्धवट ज्ञानातून आपल्या कमजोर व आजारी शरीरावर उपाययोजना स्वत:च करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. तसंच आपल्या आजारावर आपणच केलेल्या अपुऱ्या उपायांचा फैलाव करणंही बंद केलं पाहिजे. ज्या गोष्टीची योग्य व पूर्ण माहिती नाही तिचा उपयोग आपल्यावर प्रयोग करण्यासाठी करू नये. हे त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियासाठी योग्य ठरेल व आपल्या आयुष्यातील शेवटचा टप्पा ते यामुळे स्वस्थपणे व शांतपणे पार करू शकतील.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...