* गरिमा पंकज

प्रत्येक व्यक्तीला जीवनात अनेकदा रिजेक्शन म्हणजेच नकाराचा सामना करावा लागतो. कारण काहीही असू शकते. कधी चांगल्या शाळा-महाविद्यालयात प्रवेश न मिळणे, कधी परीक्षेत चांगले गुण न मिळणे, कधी नोकरीत अपयश किंवा प्रेमभंग. अशा अनेक प्रकारचे रिजेक्शन व्यक्तीला आयुष्यातील विविध टप्प्यांवर सहन करावे लागू शकते.

जरा या घटनांकडे पहा :

जुलै ०४, २०१९

एकतर्फी प्रेमात वेडया झालेल्या तरुणाचा तरुणीवर हल्ला आणि त्यानंतर आत्महत्या.

पानीपतमध्ये एका तरुणाने एकतर्फी प्रेमात अपयश आल्याने तरुणीवर चाकूहल्ला करून तिला जखमी केले. त्यानंतर आत्महत्या केली. तरुण (राहुल) व तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. त्यानंतर तरुणीने आपल्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार राहुलसोबतचे संबंध तोडले. यामुळे नाराज झालेल्या राहुलने तरुणीला मारहाण केली. २५ मे, २०१९ ला तरुणीने राहुलची पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर दोघांमधील वाद सामंजस्याने मिटला. पण राहुलने बदला घ्यायचे ठरवले होते.

४ जुलैच्या सकाळी तरुणी आपल्या २ मैत्रिणींसोबत बागेत फिरायला गेली होती. राहुलही तेथे आला आणि त्याने ब्लेडने तरुणीच्या गळयावर वार केले. ती रस्त्यावर कोसळली. बागेत आलेल्या लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याच ब्लेडने स्वत:च्या गळयावर वार करून आत्महत्या केली.

एप्रिल ३०, २०२०, नवी दिल्ली

जेईई मेनच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

जेईई मेन २०१९च्या परीक्षेत अपयश आल्याने तेलंगणातील एका १७ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. स्वत:वर गोळी झाडली. या परीक्षेत सुमारे १२ लाख उमेदवार सहभागी झाले होते.

मृत मुलाचे नाव सोहेल होते. तो जेईई मेन परीक्षेसोबतच तेलंगणा स्टेट इंटरमीडिएट परीक्षेतही नापास झाला होता. सोहेलने वडिलांच्या पिस्तूलमधून घरातच स्वत:वर गोळी झाडली. त्याचे वडील निवृत्त सैनिक आहेत. सोहेलने इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आकाश कोचिंग इन्स्टिट्यूटमधून अभ्यास केला होता. पण परीक्षेत यशस्वी होऊ शकला नाही. नापास झाल्याने वडील त्याला ओरडले. निराश झाल्याने तसेच वडील ओरडल्याने त्याने स्वत:वर गोळी झाडली.

अनेकदा रिजेक्शनमुळे व्यक्ती खूपच जास्त मानसिक तणावाखाली येऊन एवढी निराश होते की आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग निवडते.

सत्य तर हेच आहे की आपण सर्व कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर रिजेक्शनचे शिकार झालेले असतो किंवा होत असतो. आज ज्यांना आपण यशाच्या शिखरावर पाहतो त्यांनीही कधीतरी रिजेक्शनचा सामना केलेला असतो. अशी कोणती यशस्वी व्यक्ती आहे जिने कधीच अपयश किंवा तिरस्काराचा सामना केलेला नाही? सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचेच उदाहरण घ्या. सिनेक्षेत्रात येण्यासाठी त्यांना अथक परिश्रम करावे लागले. दिसायला बरा चेहरा नसल्याने त्यांना अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला.

अमिताभ बच्चन यांचा आवाज रेडिओसाठी अपात्र ठरला होता. त्यांना रेडिओ स्टेशनवर रिजेक्ट केले होते. अशाच प्रकारे प्रतिभावंत गायक कैलाश खेर यांचा आवाज सुरुवातीला चित्रपटातील गाण्यांसाठी योग्य नसल्याचे सांगण्यात आले. मोहम्मद रफी यांनाही अनेक रात्री स्टेशनवर काढाव्या लागल्या. अब्राहम लिंकन यांच्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोहियाजी यांच्यापर्यंत प्रत्येकानेच रिजेक्शनचा सामना केला आणि आपला संघर्ष सुरूच ठेवला.

जोहान्स हौसोफोर प्रिंसटोन हे युनिर्व्हसिटीत मानसशास्त्र आणि पब्लिक अफेअर्सचे (सार्वजनिक व्यवहार) प्राध्यापक आहेत. त्यांनी स्वत:च्या पदरी पडलेल्या अपयशाची तुलना मिळालेल्या यशाशी केली. त्यांचा ‘सीवी’ आणि त्यातील अपयशाची बरीच चर्चा झाली.

जिया जियांग एक मोटिव्हेशनल स्पीकर आणि रिजेक्शन थेरपी वेबसाईटचे मालकही आहेत. त्यांनी रिजेक्शनंतरचे १०० दिवस आणि अन्य अनुभवांच्या आधारे ‘हाऊ टू बीट फिअर एंड बिकम इनव्हिजिबल’ या नावाचे पुस्तक लिहिले.

यासंदर्भात क्वीन ब्रिगेडच्या संस्थापिका हिना एस. खेरा यांनी मांडलेल्या मतानुससार, आपल्या मनाला काही अशा प्रकारे समजवा :

स्वत:लाच प्रश्न विचारा : सर्वात आधी स्वत:ला विचारा की, तुम्हाला ती गोष्ट का हवी होती? जसे की, नोकरी, नाते, प्रेम, चांगले गुण इत्यादी. याचे कुठे ना कुठे तुम्हाला असेच उत्तर मिळेल की, त्यामुळे समाजात तुमची स्थिती उत्तम झाली असती. तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकला असता. असे उत्तर मिळाल्यानंतर विचार करा की, स्वत:ला सिद्ध न करू शकल्यामुळे स्वत:चाच जीव घेणे योग्य आहे का? हा मुर्खपणा ठरणार नाही का? म्हणूनच तणावात राहणे बंद करा आणि यश मिळवण्यासाठी आणखी जोमाने तयारीला लागा.

स्वत:ला त्रास करुन घेऊ नका : जीवनात चढउतार येतच राहतात. जीवनातील एखाद्या वळणावर आपल्याला रिजेक्ट केले म्हणून त्याचा दुष्परिणाम आपल्या जीवनावर पडू देऊ नका. आपण हे समजून घेतले पाहिजे की, ती गोष्ट आपल्यासाठी नव्हतीच. नकारात्मक विचार आणि कमीपणाची भावना मनात निर्माण होऊ देऊ नका. यामुळे तुम्ही दु:खी होऊन नैराश्यग्रस्त होऊ शकता.

परिस्थितीकडे वेगळया नजरेतून पहा : तुम्ही हे पाहण्याचा प्रयत्न करा की, तुम्हाला जे हवे होते त्यासाठी तुम्हाला रिजेक्ट करणे ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट ठरू शकते. कदाचित तुम्हाला ती नोकरी मिळाली नाही किंवा तुमचे नाते तुटले याचा अर्थ तुम्ही वास्तविक जीवनात काहीतरी वेगळे आणि अधिक चांगले मिळवण्यासाठी लायक आहात.

स्वत:वर नियंत्रण ठेवा : सर्वसाधारणपणे आपल्याला जे हवे आहे ते मिळत नसेल तर ते मिळवण्यासाठी आपण चुकीच्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करतो. नव्याने नियोजन करू लागतो किंवा कटकारस्थान करू लागतो. त्यावेळी डोक्यात फक्त एवढाच विचार असतो की, काहीही करुन ती गोष्ट मिळवायचीच आहे.

अपयशातून मिळते प्रेरणा : यशाप्रमाणेच अपयश हादेखील जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा आपण खूप जास्त निराश होतो तेव्हा असा विचार करतो की, हे सर्व आपल्या बाबतीतच घडले आहे. पण असे मुळीच नसते. तुम्ही इतरांच्या आयुष्यात डोकावून पहा. जे लोक तुमच्यापेक्षा जास्त आनंदात असतात त्यांच्याशी बोलल्यानंतर  लक्षात येईल की, त्यांनी त्यासाठी किती कष्ट केले आहेत.

रिजेक्शन आपल्याला जास्त रचनात्मक, ऊर्जावान बनवते आणि मोठया कॅनव्हासवर काम करण्याची प्रेरणा देते. ज्यांनी अपयश अनुभवले आहे आणि जे रिजेक्शन कायम लक्षात ठेवतात ते नेहमीच दुसऱ्याचा मान ठेवून त्यांना मदत करतात. दुसऱ्यांना दु:ख सांगण्यापेक्षा त्यांचे दु:ख समजून घेतात. सर्व ठीक होईल, असे सांगून त्यांना धीर देतात. मुळात प्रत्येक गोष्टीत काहीतरी सकारात्मक शोधल्यामुळेच नकारात्मकतेपासून वाचणे शक्य होते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...