कथा * अर्चना पाटील

‘‘बाबा, मिठाई वाटा.’’

‘‘का, काय झालं?’’

‘‘मला शिक्षिकेचा जॉब मिळालाय जवळच्याच गावात.’’

‘‘ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. शेवटी माझी मुलगी जीवनात काहीतरी बनलीच.’’

आज शाळेचा पहिला दिवस होता. मी खूप खूश आहे. माझे बाबाही माझ्यासोबत शाळेत आले आहेत. पहिला दिवस तर बरा होता. दुसऱ्या दिवशी आम्ही प्रार्थनेसाठी उभे होतो. इतक्यात हेडमास्तर जवळ आले आणि सांगू लागले, ‘‘मॅडम, नोकरी मिळालीय, तर चहा तरी पाजा स्टाफला.’’

‘‘अं.. अजून मला पहिला पगारही मिळाला नाही. नंतर सर्वांना चहा पाजेन.’’

‘‘अहो मॅडम, एक कप चहासाठी महिनाभर वाट पाहायला लावणार का?’’

‘‘सर, मी सांगितलं ना, पहिला पगार झाल्यावर देणार. मला माफ करा.’’

अजित सर बाजूलाच उभे होते. हेडमास्तर निघून गेले.

‘‘मी काही बोलू का?’’ अजित सर हळू आवाजात म्हणाले.

‘‘बोला…’’

‘‘चहा पाजा, जर पैसे नसतील, तर मी देतो. पगार झाल्यावर परत करा.’’

‘‘मला उधार घ्यायला आवडत नाही.’’

सर्वजण वर्गात गेले. माझ्या वर्गात २० विद्यार्थी होते. १० मुले व्यवस्थित शिकत होती. १० मुलांना वेगळं शिकवावं लागत होतं. मी जशी ऑफिसमध्ये जायचे, तसे स्टाफचे लोक कोणत्या ना कोणत्या बहाण्याने चहावरच येऊन थांबत असत आणि माझी मस्करी करत असत. एके दिवशी माझं डोकं गरम झालं व मी बोलून गेले, ‘‘एक कप चहासाठी एवढे का मरत आहात, आता तर पहिल्या पगाराचा चहाही पाजणार नाही मी तुम्हाला.’’

शाळेचे मिश्रा, गुप्ता, शर्मा आणि हेडमास्तर माझं उत्तर ऐकून क्रोधित झाले, पण कोणी काही बोलले नाही. पण माझ्या रोखठोक उत्तराने शाळेत माझ्या विरोधात राजकारण सुरू झाले.

एके दिवशी मोठे साहेब अग्रवाल सर शाळेत आले. साहेबांसाठी मिश्राजी पटकन नाश्ता घेऊन आले. मलाही ऑफिसमध्ये बोलावण्यात आले. मीही सर्वांसोबत एक समोसा खाल्ला. अग्रवाल सर जाताच हेडमास्तर २० रुपये मागू लागले.

‘‘एका समोशाचे २० रुपये?’’

‘‘मॅडम, गाडीला पेट्रोल नाही लागले का?’’ गुप्ताजी म्हणाले. मी पटकन वीस रुपये काढून त्यांच्या तोंडावर फेकले आणि माझ्या वर्गात गेले. माझ्यामागून अजित सरही माझ्या वर्गात आले.

‘‘तुम्हाला पैशांचा प्रॉब्लेम आहे का?’’

‘‘नाही, का बरं?’’

‘‘तर मग वीस रुपयांसाठी एवढा राग का?’’

‘‘पाच रुपयांच्या समोशासाठी वीस रुपये का?’’

‘‘कारण मिश्रा, गुप्ता आणि शर्मा पैसे देणार नाहीत, ते आपल्याकडून वसूल करण्यात आले. हेडमास्तर व अग्रवाल सरांचे पैसे मी दिले.’’

‘‘हा तर अन्याय आहे ना…’’

‘‘इथे असंच चालतं. कोणत्याही सरकारी शाळेत असंच होतं. सीनिअर लोक जसं सांगतात, तसं करावं लागतं. तुम्ही अजून नवीन आहात.’’

एका आठवड्यानंतर ऑफिसमधून ट्रेनिंगसाठी पत्र आलं. मला माहीत होतं, मलाच पाठवलं जाणार. दुसऱ्या आठवड्यात पुन्हा ट्रेनिंगसाठी पत्र आलं. पुन्हा मलाच पाठवण्यात आलं. कधी एखादी मिटिंग असली की मलाच जावं लागायचं. वर्गात वीस मुले होती, परंतु केवळ १२ विद्यार्थीच शाळेत येत होते. मी खूप वेळा त्यांच्या घरी जाऊन आले, परंतु जोपर्यंत त्यांना बोलावण्यासाठी कोणी जात नसे, तोपर्यंत ते शाळेत येत नसत. ही रोजचीच गोष्ट होती. दर दिवशी त्या विद्यार्थ्यांना बोलवावं लागत असे.

एके दिवशी माझ्या बाजूला राहणाऱ्या राजूची जुनी स्कूल बॅग मी एका विद्यार्थिनीला दिली. पहिली आणि दुसरीच्या वर्गात ती शाळेत बसतच नव्हती. आपली पुस्तकांची पिशवी वर्गात ठेवून पळून जात असे. परंतु जुनी का होईना, स्कूल बॅग मिळाल्यानंतर ती रोज शाळेत येऊ लागली. एका स्कूल बॅगमुळे ती रोज शाळेत येऊ लागली, तेव्हा मला जरा बरं वाटू लागलं. आता या शाळेत मला ३ वर्षे झाली होती. गुप्ता, मिश्रा, शर्मा आणि हेडमास्तर रोज एखादी गोष्ट तर वाकडी बोलतच असत.  परंतु अजित सर आपल्या शांत आणि विनोदी स्वभावाने मला शांत करत असत. अजित सरांचे माझ्याशी प्रेमळ वागणे स्टाफला आवडत नसे. एके दिवशी अजित सर आणि ते चार सैतान ऑफिसमध्ये एकत्र बसले होते.

‘‘काय मग लग्न करायचा विचार आहे का मॅडमशी?’’

‘‘नाही तर?’’

‘‘करूही नका. मॅडम आपल्या समाजाच्या नाहीत आणि शिवाय शाळेत लव्ह मॅरेजच्या नादात सस्पेंड व्हाल. टीचर लोकांना लव्ह मॅरेज करणे अलाऊड नसते, माहीत आहे ना…’’

अजित सर काहीच बोलले नाहीत. कारण मनातल्या मनात ते माझ्याशी लग्न करण्याची स्वप्न पाहात होते. एके दिवशी अग्रवाल सर वर्गात आले. वर्गात मुले कमी होती.

‘‘वीसमधील फक्त १५ विद्यार्थी?’’

‘‘अं.. रोज तर येतात.’’

‘‘आज मी आलोय, म्हणून आली नाहीत का?’’

‘‘हो…’’ काय उत्तर द्यावे मला कळत नव्हते.

‘‘उठ बाळा, तुझं नाव काय आहे?’’

‘‘निखिल.’’

‘‘फळ्यावर आपल्या मित्राचं नाव लिही.’’

निखिलने फळ्यावर आपल्या मित्राचं नाव पियूषच्या ऐवजी पिउष लिहिलं.

‘‘मॅडम, काय शिकवता तुम्ही मुलांना. तू उठ, तुझं नाव काय आहे?’’

‘‘स्नेहल.’’

‘‘सूर्योदय आणि सूर्यास्त कोणत्या दिशेला होतो?’’

‘‘सूर्योदय पूर्वेला होतो आणि सूर्यास्त…’’

स्नेहलने उत्तर दिलं नाही. अग्रवाल सर ओरडू लागले, ‘‘तुम्हाला नोटीस देऊ का, देऊ का नोटीस?’’

मी नजर झाकवून उभी होते. हेडमास्तर हसत होते. अग्रवाल सर वर्गातून निघून गेले. मी स्वत: अजित सरांच्या वर्गात गेले.

‘‘मला माहीत आहे, हेडमास्तर जाणीवपूर्वक अग्रवाल सरांना माझ्या वर्गात घेऊन आले. सर मला ओरडले, तेव्हा त्यांचा जीव शांत झाला असेल.’’

‘‘जर तुम्ही एक चहा दिला असता तर…’’

‘‘माझ्यापेक्षा जास्त पगार तर हे लोक घेतात आणि सर्व कामे माझ्याकडूनच करून घेतात. मिश्रा, गुप्ता आणि शर्माजींना का नाही ट्रेनिंगला पाठवत? कारण ते अग्रवाल सर आणि त्यांच्या बायको-मुलांना मोठमोठी गिफ्टस् देतात.’’

‘‘जर तुम्ही कधीतरी काही गिफ्ट दिलं असतं तर…’’

मला माहीत होतं, अजितसरांकडे माझं मन शांत होणार नाही. मी पुन्हा माझ्या वर्गात गेले. संध्याकाळी घरात भांड्यांचा जोरजोरात आवाज येत होता. बाबांनी हाक मारली.

‘‘एवढा आवाज का करतेस?’’

‘‘मोठे साहेब आले होते शाळेत. सांगत होते नोटीस देणार.’’

‘‘मग देऊ दे ना, सरकारी नोकरीत तर ही नेहमीची गोष्ट आहे.’’

‘‘सांगत होता, जर मी शिकवत नाही, तर पगार का घेते? मी तर रोज शिकवते, मुले शिकत नाही, तर मी काय करू? मिश्रा, गुप्ता आणि शर्माच्या वर्गात गेले नाहीत. माझ्याच वर्गात तोंड वर करून येतात. रोज येणारी मुले आज घरी राहिली होती. मी काय करणार?’’

‘‘अगं बेटा, एवढी उदास होऊ नकोस. एके दिवशी सर्व नीट होईल.’’

पण तरीही मुलांनी अग्रवाल सरांच्या समोर उत्तर का नाही दिले? नोटीस देईन, हे शब्द कानाला टोचत होते आणि मिश्रा, गुप्ता, शर्माचे हसणारे चेहरे डोळ्यांसमोरून जात नव्हते. जे होते, ते चांगल्यासाठी होते, असा विचार करून नवीन सुरुवात केली. बहुतेक माझ्या शिकवण्यातच काहीतरी कमतरता आहे, असा विचार करून नवीन उत्साहाने शिकवायला सुरुवात केली आणि एके दिवशी ट्रान्सफरची ऑर्डर आली. अग्रवाल सरांनी ऑफिसमधून ऑर्डर पाठवली होती.

आज या शाळेतील शेवटचा दिवस होता.

हेडमास्तर बोलू लागले, ‘‘तुमच्या ट्रान्सफरमध्ये माझा काही हात नाहीए. मी अग्रवाल सरांना सांगितलं होतं, मुलगी आहे, जाऊ द्या. पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही.’’

‘‘५०० रुपये हातावर ठेवले असतेस, तर ही पाळी आली नसती,’’ मिश्राजी म्हणाले.

‘‘अग्रवाल एवढा स्वस्त आहे मला माहीत नव्हतं.’’

‘‘जा आता जंगलात, प्राण्यांमध्ये. रोज एक तास बसने जावे लागेल. त्याच्यापुढे ५ किलोमीटर चालत जावे लागेल. रात्री घरी यायला ८ वाजतील. माझ्या मुलीसारखी आहेस, म्हणून सांगतोय, दुनियादारी शिक. लाच देणे सामान्य गोष्ट आहे,’’ शर्माजी म्हणाले.

‘‘तुमच्यासारख्या माणसांमध्ये राहण्यापेक्षा उत्तम आहे, मी प्राण्यांसोबत राहीन. जर तुम्ही पहिल्या दिवशीच मुलगी म्हणाला असता, तर आज ही पाळी आली नसती, शर्माजी.’’

ऑफिसच्या बाहेर अजित सर माझी वाट पाहात होते.

‘‘कधी काही समस्या असेल, तर मला फोन जरूर करा.’’

‘‘हो नक्कीच. या शाळेत फक्त तुम्हीच माझी आठवण काढाल असं वाटतंय.’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...