*  मदन कोथुनिया

गेल्या काही वर्षांपासून स्त्रियांमध्ये पिण्याची फॅशन वेगाने वाढू लागलीए, ज्याचं एक खास कारण म्हणजे दारूच्या कंपन्यांनी दारू पिणाऱ्या स्त्रियांना आधुनिक, स्वतंत्र व पुरुषांच्या बरोबरीच्या म्हणून प्रचलित करणं आहे. बिअर, शँपेन इत्यादी गोष्टी जुन्या झाल्या आहेत. आता तर दारूचे विविध ब्रॅण्ड बाजारात सहजपणे उपलब्ध आहेत. व्होडका, वाइन, व्हिस्की इत्यादींचे कॉकटेल महाविद्यालयीन तरुणी व गृहिणींमध्ये खूपच प्रचलित झालेत. त्या किट्टी पार्ट्या, लग्नाचा वाढदिवस इत्यादी प्रसंगी पिण्यास व पाजण्यास अजिबात संकोचत नाहीत.

दारू सेवनाच्या जुन्या परंपरांमध्ये पूर्वी दारू पिणाऱ्या स्त्रिया २ विपरीत वर्गांशी संबंधित होत्या. पहिल्या वर्गात झोपडपट्टयांमध्ये राहाणारे दलित, वेश्या येतात, ज्यांच्यासाठी नशा हे उपजीविकेचं साधन राहिलंय, तर दुसऱ्या वर्गात पाश्चिमात्य सभ्यतेने प्रेरित आणि भौतिक सुखवस्तूंच्या मुबलकतेमुळे व्यावसायिक समाजातील स्त्रिया येतात, ज्या लेट नाइट पार्ट्या अथवा पतीसोबत एक्झिक्यूटिव्ह पार्ट्यांमध्ये पिण्याला स्टेट्स सिंबल समजतात. आता एक तिसरा नवीन वर्ग महाविद्यालयीन तरुणींचा आहे, ज्या रात्री उशिरापर्यंत डान्स फ्लोअरवर थिरकण्यासाठी नशेच्या अधीन होतात.

या विषयाबाबत जेष्ठ मानसोपचार डॉ. शकुंतला यादव सांगतात, ‘‘व्यावसायिक वर्गातील स्त्रियांमध्ये पिणं एक स्टेट्स सिंबल झालंय. त्या पिण्याने स्वत:ला पुरुषांच्या बरोबरीने समजतात. भौतिक सुखाच्या प्रचुरतेमुळे पुरुष पिऊ शकतो, तर त्या का नाही? हिच धारणा त्यांना पिण्यासाठी प्रेरित करते.’’

अलीकडेच जयपूरच्या बिडला सभागृहात सिकोईडिकोन संस्थेद्वारे ‘स्त्रिया आणि नशा’ विषयावर आयोजित विचार परिसंवादाच्या अहवालानुसार नशेबाज महिलांची चकित करणारी आकडेवारी समोर आली. यानुसार सर्वाधिक दारूचं सेवन करणाऱ्या स्त्रियांचं वय २१ ते ३५ वर्षांच्या दरम्यान आढळलंय. ४२ टक्के नोकरदार स्त्रिया, ३१ टक्के एकेकट्या राहाणाऱ्या स्त्रिया, ३२ टक्के घटस्फोटित आणि ८० टक्के देहव्यापाराशी संबंधित स्त्रिया दारूबरोबरच इतर व्यसनांच्या अधीन आहेत.

आता प्रश्न असा निर्माण होतो की शेवटी असं कोणतं कारण आहे की विभिन्न वर्गातील स्त्रिया कळतनकळत स्वत:ला यामध्ये का गुंतवून घेत आहेत?

सिकोईडिकोन संस्थेच्या विचार संवादानुसार, दलित, वेश्या, श्रमजीवी व मजूर वर्गातील स्त्रिया आपलं अज्ञान, अशिक्षा, आर्थिक व सामाजिक स्तरानुसार घरातच स्वस्त देशी दारू, ताडीमाडी इत्यादी पितात. असुरक्षित भविष्यामुळे पलायनवादी विचारसरणी यांना या दलदलीत ढकलते.

तर व्यावसायिक कुटुंबातील स्त्रिया दारूचे २-३ घोट घशातून जाताच आत्मविश्वासू, चपळ, स्मार्ट, स्वत:ला अधिक शिष्ट व संयमी समजू लागतात. याबरोबरच मनात अनेक संभ्रम साठवून ठेवत असल्यामुळेदेखील नशेकडे आकर्षित होतात. जसं दारूमुळे सेक्स व फोरप्लेमध्ये अधिक उत्तेजना आणि अधिक वेळ स्टॅमिना राहाणं वगैरे. स्वत:ला अधिक अॅडव्हान्स, वेस्टर्न आणि सेक्स अपीलिंग बनविण्यासाठीदेखील कॉकटेलचा ग्लास ओठांना लावल्यानेदेखील व्यावसायिक स्त्रियांना फरक पडत नाही.

कॉलेजची पार्टी असो वा लेडीज पार्ट्या, फ्रूट ज्यूस, कोला इत्यादीसोबत कॉकटेल वा बिअरची प्रथा आधुनिक काळात जोरात सुरू आहे. एवढंच नाही तर, मोठमोठे केकशॉप्स असो वा फ्रूट ज्यूस कॉर्नर कुठेही फ्रूट बिअर मिळणं सर्वसामान्य झालंय. या कारणामुळेच चव चांगली असल्यामुळे एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला आग्रह करते. नंतर एकदा का चव लागली की पार्ट्यांमध्ये दारूच्या ग्लासाकडे हात स्वत:हून वळतो.

मुलांवर वाढतंय दुष्परिणाम

मुलं आपले वडील दारुडे असल्याचं सत्य कबूल करतात, परंतु आईला बिअर, दारू पिताना पाहू शकत नाहीत. ज्या कुटुंबातील मुलं आपल्या आईला असं करताना पाहातात, ती लहानपणापासून किशोरावस्थेच्या पायरीपर्यंत पोहोचता पोहाचता आपल्या १७व्या, १८व्या बर्थ डे पार्टीत बिअर, शॅम्पेनच्या बाटल्या खोलायला घाबरत नाहीत.

खरं म्हणजे, मूल आपल्या आईकडून अधिक अपेक्षा ठेवतं. याच कारणामुळे त्यांच्या मनात आईची बनलेली छबी आईच्या जरादेखील चुकीच्या वागणुकीचे शितोंडे सहन करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत ते आईकडे उपेक्षित नजरेने पाहातात.

या प्रकरणात एसएमएस मेडिकल कॉलेज व इस्पितळात कार्यरत असणारे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शिव गौतम सांगतात, ‘‘माणूस दारू पितो ती क्षणभराच्या आनंदासाठी आणि त्याबदल्यात त्याला आयुष्यभराचा त्रास मिळतो. जर आपण दारू कायमची नाकारली तरच आपण तणाव दूर करण्याचे सार्थक उपाय शोधू शकतो. तेव्हा आपल्याला आयुष्यभराचं सुख मिळू शकेल.’’

दारू देई अनारोग्य

दारू पिण्याच्या क्षणभराच्या आनंदाचे वाईट परिणाम समोर येतात, याचा पुरुषांपेक्षा स्त्रियांवर अधिक वाईट परिणाम होतो. इंग्लंडमधील रॉयल मेडिकल कॉलेजच्या अहवालानुसार स्त्रियांना दारूमुळे पुरुषांपेक्षा अधिक गंभीर आजार होतात. स्त्री आणि पुरुष समप्रमाणात दारू पीत असले तरी स्त्रीच्या रक्तात दारूचं घट्ट प्रमाण एकत्र होतं आणि रक्ताभिसरणाची प्रक्रिया हळूहळू होऊ लागते. परिणामी कॅन्सर, हृदयरोग इत्यादी रूपात आजार समोर येऊ लागतात.

‘अल्कोहोल अॅण्ड फर्टिलिटी अमंग वूमन’ पुस्तकानुसार १९९६ मध्ये ८५ हजार नर्सेसच्या मदतीने एक जागतिक शोध पूर्ण करण्यात आला. अभ्यासानंतर परिणाम असा निघाला की ५० वर्षं वा त्यापेक्षा अधिक वयाच्या स्त्रियांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो आणि आनुवंशिकरित्या हृदयरोगाच्या आजाराचा त्रास होतो. या आजारामुळे मरणाऱ्या स्त्रियांमध्ये अजून एक बाब समोर आली ती म्हणजे त्या आठवड्यातून २-३ वेळा दारू प्यायच्या. ३४ ते ३९ वयातील स्त्रियांना रक्तवाहिन्यांचा त्रास होता. याव्यतिरिक्त ज्या स्त्रिया दररोज दारू पित होत्या, त्यांच्यामध्ये स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता १०० टक्के आढळली.

महिला आणि पुरुषांनी समप्रमाणात दारूचं सेवन केले तरी दोघांमध्ये विभिन्न परिणाम दिसून येतात, महिलांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक चरबी असते ज्यामुळे अनेक प्रकारचे आजार शरीराला घेरून टाकतात.

अधिक मद्यापान केल्यामुळे महिलांच्या प्रसूतीवर परिणाम होतो. कोल्ड जेनसनने लिहिलेल्या पुस्तकात ‘डज मॉडरेट अल्कोहोल कंजेप्शन अफेट फर्टिलिटी’मध्ये शोधानुसार काही प्रमाणातील दारूचं सेवनदेखील महिलांच्या प्रजननशक्तीसाठी घातक ठरतं.

गर्भवती महिलांना दारूच्या सेवनामुळे अधिक त्रास होतो. प्रसूतीनंतर बाळाची मंदबुद्धी व अपंगत्वाबद्दल समजतं, परंतु प्रसूतीच्या अगोदर भ्रूण परीक्षणांच्या दरम्यान डॉक्टरांना अल्कोहोल रिलेट मल्टीपल कोजीनेटल अॅबनॉर्मलीचं खूपच संशोधन केल्यानंतरच समजू शकतं.

पाजणारं आणि त्यावर कमावणारं सरकार

भारतीय घटनेच्या कलम ४९ नुसार राज्याने आपल्या जनतेस पोषक अन्न आणि जीवनस्तर उंचावणं व जनस्वास्थ्यासारख्या सुधारणेला आपलं प्रारंभिक कर्तव्य समजावं आणि मादक पेय आणि नशेची औषधं, जी आरोग्यासाठी घातक आहेत त्यावर बंदी घालावी.

कायदा बनल्यानंतर अनेक राज्यांत दारूबंदी अधिक प्रमाणात झाली होती, परंतु काळाबरोबर मद्यनिषेधसंबंधी नीती व कार्यक्रमात हळूहळू शिथिलता आली. काही राज्यांमध्येच हा कायदा राहिला. आंध्र प्रदेशात दारूबंदी होती, परंतु लोक चोरीने शेजारच्या राज्यांतून मागवू लागले. परिणामी शेजारच्या राज्यांतून महसूल वाढू लागला. त्यामुळे दिवाळखोरी होताच दारूबंदी हटविण्यात आली. आता जरी गुजरातमध्ये दारूबंदी असली तरी, तिथलेच लोक अधिक दारू पितात.

खरंतर पूर्णपणे दारूबंदी लागू करण्याच्या मार्गात दोन गंभीर अडचणी आहेत. ती लागू करण्यात अडचणी आणि दारू पिण्याची तळमळ. परंतु ही गोष्ट कधीही नाकारू शकत नाही की दारूने सरकारला सर्वाधिक महसूल मिळतो. खरंतर पाणी, वीज यातूनदेखील महसूल मिळतो, परंतु जेवढ्या सहजतेने नशेचे कर वसूल केले जातात, तसे इतर केले जात नाहीत.

खरंतर फॅशन आणि आधुनिकता दाखविण्याच्या विविध पद्धती आहेत. फॅशन दाखविण्यासाठी गरजेचं नाहीए की दारूचे दोन घोट गळ्यातून उतरायला हवेत आणि वाईट सवयींचा स्वीकार करावा. प्रतिभा आणि व्यक्तिमत्त्व उजळल्यास नक्कीच तुम्हाला फॅशनेबल म्हणून मान्यता मिळेल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...