* गरिमा पंकज

पालक आधीच पालकत्वाबद्दल खूपच त्रासलेले होते आणि आता तर मुले आणि पालक कोरोनाच्या भीतिचा योग्य फायदा घेऊ शकतात आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करु शकतात की मूल काय विचार करते किंवा त्याच्या आचरणात येणाऱ्या बदलांचे कारण काय आहे. आजच्या मुलांमध्ये संताप आणि चिडचिडेपणा वाढत असल्याचे बऱ्याच अहवालात समोर आले आहे.

मुलांबरोबर काहीतरी चुकीचे होतेय. मुलांच्या जीवनात कुठेतरी काहीतरी अत्यंत महत्वाच्या गोष्टी हरवल्या आहेत आणि त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबियांप्रति घटलेला जिव्हाळा आणि सोशल मिडियाचा वाढता संपर्क.

पूर्वी संयुक्त कुटुंबं असताना लोक त्यांचे विचार गुंतवण्यासाठी, माहिती मिळविण्यासाठी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही गॅझेटवर अवलंबून नसत गोष्टी समोरासमोर बसून गप्पा गोष्टी व्हायच्या. त्यात वेगवेगळया प्रकारची नाती-गोती असत आणि त्यांच्यात प्रेमाचे बंध होते. पण आज मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन एकाकी खोलीत बसलेला एखादा मुलगा त्याच्या पोस्ट कुणाला आवडल्या का? त्याच्या छायाचित्रांची स्तुती केली का? कुणाला त्याची आठवण आली का? हे पाहण्यासाठी दर तासाला मोबाइल पाहत राहतो?

आज मुलांना त्यांची स्वत:ची स्वतंत्र खोली मिळते, जिथे ते आपल्या इच्छेने कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय जगू इच्छितात. ते पालकांऐवजी मित्र किंवा सोशल मिडियावर त्यांच्या मनात उद्भवणारे प्रश्न किंवा भावना शेयर करतात. जेव्हा पालक काळजी करतात की आपली मुले मोबाइल किंवा लॅपटॉपचा जास्त वापर तर करीत नाहीत ना, तेव्हा ते त्यांच्यावर नाराज होतात.

केवळ एकटेपणा किंवा सोशल मिडियाचा हस्तक्षेप हेच मुलांच्या नैराश्याचे किंवा पालकांपासून दूर होण्याचे कारण नाही. असे होण्याची अनेक कारणे आहेत :

जीवनशैली : फॅशन, जीवनशैली, करिअर, शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये आजच्या तरूणाईची गती खूप वेगवान आहे. सत्य हे आहे की त्यांना हा वेग कसा नियंत्रित करावा हे माहीत नाही. तरुणांचे रस्त्यावरुन फर्राटेदार दुचाकी चालवणे आणि अपघातांचे भयानक चित्र हेच सत्य सांगतात. ‘मला ते करायचे आहे म्हणजे करायचेच आहे. मग भलेही त्यासाठी काहीही किंमत द्यावी लागो’ या धर्तीवर जीवन जगणाऱ्या तरुणांमध्ये विचारांचा झंझावात इतका तीव्र आहे की ते कधीही एका गोष्टीवर लक्ष देऊ शकत नाहीत. त्यांच्या मनात एक संघर्ष चालू असतो, इतरांच्या पुढे जाण्याची स्पर्धा असते. अशा परिस्थितीत पालकांचे एखाद्या गोष्टीसाठी नाकारणे किंवा समझावणे त्यांना आवडत नाही. पालकांच्या गोष्टी त्यांना उपदेश वाटतात.

अपेक्षांचे ओझे : बऱ्याचदा पालक त्यांच्या स्वप्नांचे ओझे त्यांच्या मुलांवर टाकतात. जेव्हा ते आयुष्यात स्वत:ला जे व्हायचे होते ते बनत नाहीत, तेव्हा आपल्या मुलांना ते बनवण्याचा प्रयत्न करू लागतात, खरे तर प्रत्येक व्यक्तिची स्वत:ची क्षमता आणि आवड असते. अशा परिस्थितीत जेव्हा पालक विशिष्ट अभ्यास किंवा करिअरसाठी मुलांवर दबाव आणतात, तेव्हा मुले गोंधळतात. ते भावनिक आणि मानसिकरीत्या विखुरले जातात आणि हेच विखुरलेपण त्यांना गोंधळात टाकते. आपल्या मुलाची क्षमता किती आहे हे पालकांना समजत नाही. जर मुलाकडे गायक होण्याची क्षमता आणि इच्छा असेल तर ते त्याला डॉक्टर बनवण्याचा प्रयत्न करतात.

वेळेचा अभाव : आजकाल बऱ्याच घरातील आई-वडील दोघे नोकरदार असतात. मुलेही १ किंवा २ पेक्षा जास्त नसतात. दिवसभर मूल एकटयाने लॅपटॉपवर वेळ व्यतित करते. अशा परिस्थितीत त्याच्या पालकांनी त्याच्याबरोबर वेळ घालवावा अशी त्याची इच्छा असते. पण त्यासाठी पालकांना वेळ नसतो.

मित्रांचे समर्थन : या अवस्थेत मुले सगळयात जास्त त्यांच्या मित्रांच्या जवळ असतात. त्यांचे निर्णयदेखील त्यांच्या मित्रांनी प्रभावित असतात. ते मित्रांसह अधिक वेळ घालवतात, त्यांच्याबरोबरच सर्व रहस्ये शेयर करतात आणि त्यांच्याशी भावनिक संबंधही ठेवतात. अशा परिस्थितीत जर पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या मित्रांपासून अंतर ठेवण्यास सांगितले तर मुले पालकांवर नाराज होतात. पालकानीं कितीही रोखले तरी ते आपल्या मित्रांना सोडण्यास तयार नसतात. उलटपक्षी पालकांना सोडण्यास तयार होतात.

गर्ल/बॉयफ्रेंडचे प्रकरण : या वयात विपरीत लिंगाकडे खूप आकर्षण असते. तसेही गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असणे ही आजच्या किशोरवयीन मुले आणि तरुण मुलांसाठी स्टेटस इशू बनला आहे. हे स्पष्ट आहे की तरुण मुले त्यांच्या नात्यांबद्दल खूपच संवेदनशील असतात आणि जेव्हा पालक त्यांना आपल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला भेटण्या किंवा बोलण्यापासून रोखतात तेव्हा ते पालकांना शत्रू समजू लागतात.

प्रेमभंग झाल्यास पालकांचे वागणे : या वयात अनेकदा प्रेमभंग होतो आणि त्या दरम्यान ते मानसिकरित्या खूप अस्वस्थ राहू लागतात. अशा परिस्थितीत त्यांना पालकांचे टोकणे अजिबात सहन होत नाही आणि ते डिप्रेशनमध्ये जातात. आईवडिलांवर नाराज राहू लागतात. दुसरीकडे पालकांना असे वाटते की जेव्हा ते मुलांच्या भल्यासाठी सांगत आहेत, तर मुले अशी का वागत आहेत? अशाप्रकारे पालक आणि मुलांमधील अंतर वाढत जाते.

थरार : तरुण मुले जीवनात थरार शोधत असतात. मित्रांची सोबत त्यांना असे करण्यास अजून जास्त प्रवृत्त करते. अशा मुलांना आघाडीवर रहायचे असते. यामुळे ते बहुतेक वेळा मद्यपान, रॅश ड्रायव्हिंग, कायदेभंग, पालकांचा अपमान करणे, सर्वोत्तम गॅझेट मिळविण्याचा प्रयत्न करणे इत्यादी गोष्टी करतात. तरुण मन आपले स्वतंत्र अस्तित्व शोधत असते. त्याला सर्व गोष्टींवर नियंत्रण हवे असते, परंतु पालक त्याला तसे करू देत नाही. मग तरुण मुलांना आपल्या पालकांचे विचार पटत नाहीत.

काहीही करेन, माझी इच्छा : तरुणांमध्ये एक गोष्ट सामान्यपणे बघितली जाते, ती म्हणजे स्वत:ची इच्छा चालवण्याची सवय. आज जीवनशैली खूप बदलली आहे. जे पालक करतात, ते त्यांच्यादृष्टीने योग्य असते आणि जे मुले करतात, ते त्यांच्या जनरेशननुसार योग्य असते. अशा परिस्थितीत दोघांमध्ये विरोध होणे स्वाभाविक आहे.

ग्लॅमर आणि फॅशन : सध्याच्या युगात फॅशनबाबत पालक आणि तरुणांमध्ये तणाव आहे. तसंही फॅशनबाबत मुलींना सूट देण्यास पालक सहमत नाहीत. हळूहळू त्यांच्यात संवादाचा अभावदेखील दिसून येतो. मुलांना वाटते की पालक त्यांना मागील युगात ढकळत आहेत.

स्पर्धा : आजच्या काळात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. लहानपणापासूनच मुलांना स्पर्धेच्या आगीत लोटले जाते. मुलांनी नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये प्रथम यावे अशी पालकांची अपेक्षा असते. त्यांचा हाच दबाव मुलांच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका ठरतो.

असा बसवा उत्तम समन्वय

आपल्या मुलाच्या मनात काय चालले आहे हे आपल्याला माहिती असल्यास ही परिस्थिती हाताळणे तुम्हाला सोपे जाईल. मुलाशी चांगल्याप्रकारे समन्वय ठेवण्यासाठी पालकांनी या गोष्टींची काळजी घ्यावी :

चांगल्या सवयी शिकवा : घरी एकमेकांशी कसे वागावे, जीवनात कोणत्या आदर्शांना महत्व द्यायचे, चांगुळपणा कसा स्वीकारला पाहिजे आणि वाईटापासून अंतर कसे ठेवायचे यासारख्या गोष्टींचे ज्ञान म्हणजेच संस्कार. एक कुटुंब हा त्याचा पाया आहे. पालकच मुलांमध्ये हे संस्कार पेरत असतात.

थोडेसे स्वातंत्र्यदेखील द्या : घरात स्वातंत्र्याचे वातावरण तयार करा. मुलाला बळजबरीने एखाद्या गोष्टीसाठी तयार करणे योग्य नाही. परंतु जेव्हा आपण योग्य आणि अयोग्य यांच्यातील फरक स्पष्ट करून निर्णय त्याच्यावर सोडाल तेव्हा तर तो योग्य मार्ग निवडेल. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे दबाव टाकण्याचे टाळा. मुलाला जितके जास्त दडपल्यासारखे वाटेल तितकेच त्याचे वागणे तीव्र असेल.

स्वत: एक उदाहरण बना : मुलासाठी एक उदाहरण व्हा. मुलाकडून आपण जे काही शिकण्याची किंवा न शिकण्याची अपेक्षा करता ते आधी स्वत: अंमलात आणा. हे लक्षात ठेवा की मुले पालकांच्या पदचिन्हांचे अनुसरण करतात. आपण यशासाठी त्यांना कष्ट करताना पाहू इच्छित असाल तर प्रथम आपल्या कार्यासाठी समर्पित व्हा. जर तुम्हाला मुलांकडून सत्य बोलणे हवे असेल तर स्वत: कधीही खोटे बोलू नका.

शिक्षेबरोबर बक्षीसदेखील द्या : मुलांनी वाईट कृत्य केले म्हणून त्यांना ओरडणे गरजेचे आहे, तसेच ते काहीतरी चांगले करतात, तेव्हा त्यांचे कौतुक करण्यासही विसरू नका. तुम्ही त्यांना शिक्षाही करा आणि त्यांना बक्षीसही द्या. आपण असे केल्यास मुलास त्याचा निश्चितच फायदा होईल. त्याला वाईट वागण्याची भीती वाटेल आणि चांगले काम करून बक्षीस मिळविण्यास तो उत्सुक असेल. येथे शिक्षा म्हणजे शारीरिक कष्ट देणे नव्हे तर त्याला दिली जाणारी सूट कमी करूनही दिली जाऊ शकते. जसे टीव्ही पाहण्याची वेळ कमी करून वा घर काम करायला लावून.

शिस्तीबाबत संतुलित दृष्टीकोन : जेव्हा आपण शिस्तीबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगता तेव्हा आपल्या मुलांना हे समजते की त्यांना काही नियम पाळावे लागतील. परंतु काहीवेळा गरज पडल्यास ते थोडे-फार बदललेही जाऊ शकतात. याउलट जर तुम्ही हिटलरप्रमाणे त्यांच्यावर सदैव कठोर शिस्तीची तलवार टांगती ठेवली तर त्याच्यात बंडखोरीची भावना जागृत होण्याची शक्यता असते.

घरगुती कामेही करवून घ्या : लहान मुलांना सुरुवातीपासूनच स्वत:ची कामे करण्याची सवय लावा. उदाहरणार्थ आपली खोली, अंथरूण, कपडे इत्यादी व्यवस्थित करण्यापासून त्यांवर इतर किरकोळ जबाबदाऱ्यांचे ओझे टाका. प्रारंभ करणे कदाचित अवघड जाईल, परंतु सरत्या काळाबरोबर आपल्याला दिलासा वाटेल आणि नंतर आयुष्यामध्ये ते अव्यवस्थित दिसल्यास राग येण्याची शक्यता संपेल.

चांगली सोबत : सुरुवातीपासूनच काळजी घ्या आणि प्रयत्न करा की आपल्या मुलाचे सोबती चांगले असावेत. जर आपल्या मुलाने एखाद्या खास मित्रासह बंद खोलीत तासन् तास घालवले तर समजून घ्या की ही धोक्याची घंटा आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा बंद दाराचा खेळ त्वरित थांबवा. मूल चुकीच्या मार्गावर जाण्यापूर्वीच आपण थोडे कठोर आणि दृढतेने कार्य केले पाहिजे.

सर्वांसमोर कधी ओरडू नका : मुलाला इतरांसमोर ओरडणे योग्य नाही. लक्षात ठेवा जेव्हा आपण एकांतात स्पष्टीकरण देत, कारणे सांगत मुलाला कुठल्या कामापासून थांबवता, तेव्हा त्याचा परिणाम सकारात्मक होईल. उलट सर्वांसमोर चिडल्याने, मूल हट्टी आणि बंडखोर होऊ लागते.

त्याच्या निवडीचा देखील सन्मान करा : आपले मूल तरूण होत आहे आणि गोष्टींना पसंत नापसंत करण्याचा त्याचा आपला दृष्टीकोन आहे, हे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यावर आपल्या इच्छा आणि निवड लादण्याचा प्रयत्न करू नका. जोपर्यंत आपल्याकडे योग्य कारण नाही तोपर्यंत मुलावर कोणत्याही गोष्टीसाठी दबाव आणू नका.

हे खरे आहे की किशोरवयीन मुले/तरुण होत असलेली मुले आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक गोष्ट पालकांशी शेयर करणे टाळतात. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्नच करू नये. प्रयत्न करण्याचा अर्थ असा नाही की आपण सक्ती करावी आणि सर्व वेळ त्यांची चौकशी करत रहावी. मुलांबरोबर दर्जेदार वेळ घालवणे, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, त्यांच्याबरोबर चित्रपट पाहाणे, खाण्यासाठी बाहेर जाणे, त्यांच्याबरोबर मोकळया जागेत काही मनोरंजक खेळ खेळणे इत्यादिंची आवश्यकता आहे. यामुळे मुलाला आपल्याशी कनेक्टेड फिल होईल आणि सर्वकाही आपल्याबरोबर शेयर करण्यास सुरवात करेल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...