– रितू बावा

विभक्त कुटुंबामध्ये आईवडील दोघेही नोकरदार असतात. तिथे मुलं आपल्या समस्येचं समाधान स्वत:च करण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा यामध्ये त्यांना यश मिळत नाही तेव्हा अनेक वेळा ते आत्महत्येसारखं पाऊलही उचलतात.

रंजना एक सिंगल पॅरेंट म्हणजे एकटी पालक आहे. आपली मुलगी श्रेयाच्या बाबतीत ती खूपच महत्त्वाकांक्षी होती. तिला श्रेयाला डॉक्टर बनवायचं होतं, पण श्रेयाला सायन्समध्ये अजिबात रस नव्हता. मात्र, ही गोष्ट तिने कधीच मोकळेपणाने रंजनाला सांगितली नाही. हळूहळू ती कुंठित होत गेली. तासन्तास ती खोलीमध्ये कोंडून राहू लागली आणि मग ती हळूहळू डिप्रेशनमध्ये गेली.

अलीकडेच एका तरुण आणि तरुणीने मेट्रोपुढे उडी मारून आत्महत्या केली. कारण तरुणीचं लग्न मोडलं होतं आणि बऱ्याच दिवसांपासून ती मानसिक तणावाने ग्रस्त होती.

तरुणाच्या आत्महत्येचं कारण बेरोजगारी होती. त्याच्या कुटुंबियांच्या मते नोकरी न मिळाल्यामुळे तो बऱ्याच दिवसांपासून नैराश्याने ग्रस्त होता.

या दोन्ही प्रकरणांत माहीत होतं की त्यांना मानसिक ताण आहे. अशात कुटुंबियांची भूमिका महत्त्वाची ठरली असती. ते त्यांची समजूत काढू शकले असते, की लग्न मोडणं किंवा बेरोजगार होणं म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे. पण बऱ्याचदा कुटुंबीय त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून देतात आणि परिणाम समोरच आहे.

असे कितीतरी लोक आहेत जे मानसिक तणावाने ग्रस्त असतात आणि कुटुंबापासून अलिप्त राहातात.

अशात कुटुंबियांचं हे कर्तव्य ठरतं की त्यांनी अशा लोकांना मनोरुग्ण तज्ज्ञाकडे नेऊन त्यांच्यावर योग्य ते उपचार करून घ्यावेत.

मानसिक अस्वस्थतेवर उपचार आहे

अलीकडेच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्यसभेत जे आकडे सादर केले, त्यानुसार देशातील सहा टक्केहूनही जास्त जनता मानसिक असमतोलपणाला बळी पडलेली आहे.

साधारणपणे २ कोटी लोक सीद्ब्रोफ्रेनिया आणि ५ कोटी लोक डिप्रेशन, चिंता आणि तणावाने ग्रस्त आहेत. हे आकडे फारच काळजी करायला लावणारे आहेत.

आपल्या समाजात विभक्त कुटुंब वाढल्यामुळे माणसांचा एकाकीपणा वाढला आहे. तरुणवर्गापासून वयोवृद्धापर्यंत सगळेच मानसिक तणावाने ग्रस्त आहेत.

सर्व वयोगटातील लोकांना काही ना काही समस्या आहे. त्यांच्या समस्या कठीण आहेत पण इतक्याही कठीण नाहीत की त्यावर तोडगा निघणार नाही. विकास ही एक सततची प्रक्रिया असून त्यामध्ये भाग घेणारे लोक त्याचे मोहरे आहेत. मग ती लहान मुलं असो, तरुण असो वा वयोवृद्ध असो.

वयोवृद्धांमध्ये वाढता एकाकीपणा

आपल्या देशात एकीकडे सामाजिक आणि आर्थिक वातावरण वेगाने बदलत आहे, तर दुसरीकडे एका पिढीचं दुसऱ्या पिढीबरोबर ताळमेळ न बसल्यामुळे त्यांच्या संबंधात कडवटपणा निर्माण होत आहे. यामुळे आपल्या वयोवृद्ध लोकांमध्ये एकाकीपणा वाढत चालला आहे. त्यांची उपेक्षा होत असल्याने मुलांच्या आणि त्यांच्या संबंधांमध्ये तडा जाऊ लागली आहे.

गल्लीबोळ किंवा नाक्यांवर आनंदाने हसणारे वयोवृद्ध आता गायब होत चालले आहेत. त्यांनी स्वत:ला चार भिंतीच्या आतमध्ये कोंडून घेतलं आहे.

अशात कोणीतरी त्यांना समजवण्याची फार गरज आहे, जेणेकरून ते डिप्रेशनमध्ये जाणार नाहीत. आपल्या समाजात आजही असा समज आहे की केवळ वेडसर व्यक्तीच मनोरुग्ण तज्ज्ञाकडे जातात.

तनूच्या सासूच्या मृत्युनंतर तिचे सासरे एकटे पडले. तनू आणि तिचा पती दोघेही दिवसभर ऑफिसात असायचे आणि घरात तिचे सासरे दिवसभर एकटे असायचे.

हळूहळू ते चिडचिडे होऊ लागले. तेव्हा तनूने आपल्या पतींना त्यांना मनोरुग्ण तज्ज्ञांकडे न्यायचा सल्ला दिला. यावर तिचे पती भडकले. त्यांचं म्हणणं होतं की वडील उदास आहेत आणि काही दिवसांत बरे होतील.

वयोवृद्ध स्त्रिया तर घरातील कामं करून आपला वेळ घालवतात पण पुरुषांसाठी घरात राहून वेळ घालवणं कठीण जातं. शिवाय एक जोडीदार गेल्यावर तर एकटेपणामुळे ते डिप्रेशनमध्ये जातात.

डिप्रेशन थांबवण्याचे उपाय

बऱ्याचदा डिप्रेशनने ग्रस्त असलेल्या लोकांना लोक ओळखत नाहीत. ते सर्वांसोबत राहून वेगळी वर्तणूकही करतात पण त्यांचा आजार कोणाच्याच लक्षात येत नाही. जोपर्यंत ते कोणाला अपाय करत नाहीत, त्यांना मनोरुग्ण तज्ज्ञाकडे नेलं जात नाही. यासाठी हे फार गरजेचं ठरतं की कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा राहावा आणि त्यांची सामाजिक मर्यादाही मजबूत राहावी. शिवाय समाजात मानसिक आजारांच्या बाबतीत जागरुकतेचा जो अभाव आहे, त्यामुळेदेखील वेळीच त्यांच्यावर उपचार होत नाहीत.

क्रूर व्यवहार

गेल्या वर्षी तेलंगणामध्ये डिप्रेशनने ग्रस्त असलेल्या २६ वर्षांच्या सॉफ्टवेअर इंजिनीअरने २२ लोकांना तलवारीने जखमी केलं होतं, ज्यामध्ये त्याचे आईवडीलही होते.

सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत अपयश मिळाल्याने तो डिप्रेशनमध्ये गेला होता. तो कायम अभ्यासात टॉपर होता, म्हणून हे अपयश त्याला सहन झाले नाही.

जर वेळीच त्याच्यावर उपचार झाला असता तर त्याच्यावर ही वेळच आली नसती. पण नंतर तो पोलिसांच्या फायरिंगमध्ये मारला गेला.

कुटुंबाची भूमिका

आपल्या देशात पूर्वापारपासून संयुक्त कुटुंबाची रीत चालत आली आहे. त्यावेळी घरातील एकही सदस्य घरात एकटा नसायचा. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. विभक्त कुटुंब आणि आर्थिक दबावामुळे आयुष्यात ताण वाढला आहे आणि म्हणूनच या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी कुटुंबात एकमेकांविषयी आपुलकी फार गरजेची आहे.

जर घरातील एखादा सदस्य तणावाखाली असेल तर त्याच्यावर योग्य उपचार करा. त्याची विशेष काळजी घ्या. त्याची आवडनावड या सर्व गोष्टींची काळजी घ्या म्हणजे तो स्वत:ला उपेक्षित समजणार नाही. लहान असो वा मोठा, त्याच्या गरजेसाठी आणि कामासाठी वेळ काढा.

सामान्यपणे लोक मनोरुग्ण तज्ज्ञाकडे जाणं चांगलं समजत नाहीत. पण आपण हा भ्रम तोडायला हवाय. ज्याप्रकारे औषधोपचाराने इतर आजार बरे होतात त्याचप्रकारे मानसिकरित्या अस्वस्थ्य असलेल्या माणसावर उपचारही औषधाने शक्य आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...