कथा * भावना गोरे

‘‘हॅलो,’’ फोनवर विद्याचा परिचित आवाज ऐकून स्नेहा खुशीत आली.

‘‘आणि काय विशेष? सगळं सरोगाद आहे ना?’’ वगैरे औपचारिक गप्पा झाल्यावर दोघीही आपापल्या नवऱ्याबद्दल बोलू लागल्या.

‘‘प्रखरला तर घराची, संसाराची काही काळजीच नाहीए. काल मी त्याला म्हटलं होतं, घरी जरा लवकर ये. चिंटूचे शाळेचे बूट अन् अजून थोडंफार सामान घ्यायचं आहे. पण तो इतका उशिरा आला की काय सांगू?’’ विद्या म्हणाली.

स्नेहानं म्हटलं, ‘‘रूपेश पण असंच करतो. अगं, शुक्रवारी नवा सिनेमा बघायचा प्लॅन होता आमचा. पण हा इतक्या उशिरा आला की आम्ही पोहोचेपर्यंत तिथं मध्यांतर व्हायला आलं होतं.’’

विद्या आणि स्नेहा दोघीही गृहिणी होत्या. दोघींचे नवरे एकाच कंपनीत काम करत होते. मुलंही साधारण एकाच वयाची होती. कंपनीच्या एका पार्टीत दोघी प्रथम भेटल्या. दोघींच्याही लक्षात आलं की त्यांचे स्वभाव, त्यांच्या समस्या साधारण सारख्याच आहेत. प्रथम त्या मुलं, त्यांचे अभ्यास, महागाई वगैरेवर बोलायच्या. नंतर मात्र नवऱ्याला सतत नावं ठेवणं हाच त्यांच्या गप्पांचा विषय झाला.

तेवढ्यात स्नेहाच्या घराची डोअरबेल वाजली. तिनं म्हटलं, ‘‘विद्या, बहुतेक मोलकरीण आलेली आहे. मी फोन ठेवते.’’ फोन ठेवून तिनं दार उघडलं अन् रखमा आत आली. आली तशी मुकाट्यानं भराभरा कामं आटोपू लागली.

‘‘काय झालंय गं रखमा? आज एवढी गप्प का? फार घाईत दिसतेस?’’ स्नेहानं विचारलं तशी ती रडू लागली.

‘‘काय झालं?’’ घाबरून काळजीनं स्नेहानं विचारलं.

‘‘काय सांगू बाई, माझा धनी एका शाळेच्या बसचा ड्रायव्हर म्हणून काम करतो. काल चुकून एका मुलाला शाळेतून घरी न्यायला विसरले तर शाळेनं त्याला ड्यूटीवरून काढून टाकलंय.’’ रखमानं रडत रडत सांगितलं.

‘‘हे तर वाईट झालं,’’ स्नेहानं सहानुभूती दाखवली.

रखमा काम आटोपून गेली अन् स्नेहाला आठवलं आज भाजी नाहीए घरात. लव आणि कूश शाळेतून घरी येण्याआधी तिला भाजीबाजार गाठायला हवा. घाईघाईनं आवरून ती भाजीच्या मोहिमेवर निघाली. मनातून रूपेशला भाजीही आणून टाकायला जमत नाही म्हणून चिडचिड चाललेलीच होती. घरी येऊन स्नेहानं स्वयंपाकाला सुरूवात केली. मुलं शाळेतून आल्यावर त्यांची जेवणं, थोड्या गप्पा, त्यानंतर शाळेचं होमवर्क, त्यानंतर पार्कात खेळायला घेऊन जाणं, आल्यावर उरलेला अभ्यास की लगेच रात्रीचा स्वयंपाक. तेवढ्यात रूपेश येतो, जेवतो की लगेच झोपतो. हीच त्यांची दिनचर्या होती.

कधीकधी स्नेहाला या सगळ्याचा वैताग यायचा. मग ती रूपेशशी भांडायची. ‘‘माझ्यासाठी नाही तर निदान, मुलांसाठी तरी थोडा वेळ काढता येत नाही का तुला?’’

रूपेशही चिडून म्हणायचा, ‘‘अख्खा दिवस घरात असतेस तू. काय करतेस बसून? बाहेर मला किती गोष्टींना तोंड द्यावं लागतं. ते तुला कुठं माहीत आहे?

विद्याला विचार, प्रखरही माझ्याबरोबर थांबून काम करत होता. सध्या आमच्या कंपनीची परिस्थिती वाईट आहे. एक नवी कंपनी आल्यामुळे आमचा बिझनेस एकदम डाऊन झाला आहे.’’

‘‘पुरे हो तुमचं! तुमच्या कंपनीत रोजच काहीतरी प्रॉब्लेम निघतो. इतकी कंपनीची अवस्था वाईट आहे तर सोडून द्या ही नोकरी,’’ स्नेहा रागानं फणफणत असते.

दुसऱ्या दिवशी फोनवर हा सगळा मसाला विद्याला पोहोचवला जातो.

एकदा मात्र विद्या अन् स्नेहानं बराच प्रयत्न करून एका रविवारी पिकनिकचा बेत जमवला. गप्पा, खादाडी, हसणं, मुलांचे खेळ यातही प्रखर अन् रूपेश मात्र त्यांच्या कंपनीच्याच कामांबद्दल बोलत होते.

शेवटी वैतागून स्नेहानं म्हटलं, ‘‘तुम्ही दोघं ही कंपनी सोडून स्वत:चा बिझनेस का सुरू करत नाही?’’

‘‘बिझनेस?’’ तिघांनी एकदमच विचारलं.

‘‘हो ना. थोडं लोन घेऊ, थोडा पैसा आपलं सोनंनाणं गहाण ठेवून उभा करता येईल. छोटासा बिझनेस छोट्याशा भांडवलावर उभा करता येईल की?’’

स्नेहाची कल्पना सर्वांना पसंत तर पडली. पण व्यवसाय म्हणजे काही पोरखेळ नसतो. प्रखरनं तर स्पष्टच नाही म्हटलं, ‘‘बिझनेसमध्ये फार रिस्क असते. आपला व्यवसाय चालेल, न चालेल, कुणी खात्री द्यायची? नको रे बाबा…मी नाही करणार बिझनेस…’’

विद्याला मात्र कल्पना आवडली. ‘‘स्नेहा बरोबर म्हणते आहे. स्वत:चा बिझनेस म्हणजे कुणाचं बॉसिंग नाही, मनांत येईल तेव्हा सुट्टी घ्यावी. बॉसच्या मिनतवाऱ्या करायला नकोत.’’ ती म्हणाली.

‘‘पण व्यवसाय म्हणजे एक प्रकारचा जुगारच आहे. सगळं काही डावावर लावलं तरी जिंकूच याची खात्री नसेल.’’ प्रखर म्हणाला. मग तो विषय तिथंच संपला.

रूपेशचं खरं तर बायको, मुलांवर, संसारावर खरोखर खूप प्रेम होतं. त्यांना फिरायला न्यावं, त्यांना वेळ द्यावा असं त्यालाही वाटायचं. पण बॉसच्या धाकानं तो कधी मोकळेपणानं वागू शकत नव्हता. स्नेहाच्या म्हणण्यावर तो गंभीरपणे विचार करू लागला.

दुसऱ्या दिवशी स्नेहानं विद्याला फोन करायला म्हणून रिसीव्हर हातात घेतला अन् डोअरबेल वाजली. रखमा आली वाटतं. असं पुटपुटतं तिनं दार उघडलं तर समोर रूपेश उभा. तिला नवलच वाटलं.

‘‘तुम्ही एवढ्यात तर ऑफिसला गेला होता, मग इतक्या लवकर परत कसे आलात?’’

‘‘मी आता ऑफिसला जाणारच नाही. नोकरी सोडून आलोय मी,’’ हसत हसत रूपेशनं सांगितलं.

स्नेहाला काहीच कळेना. ‘‘बॉसशी भांडण झालं का? अशी कशी नोकरी सोडलीत?’’

‘‘अगं बाई, यापुढे स्वत:चा व्यवसाय करायचा आहे ना? बिझनेस?’’

रूपेशच्या बोलण्यावर स्नेहा हसली खरी. पण मनातून खरं तर ती घाबरली होती. तिच्या मनात होतं प्रखरही धंद्यात राहिला तर दोघांच्या मदतीने व्यवसाय करता येईल. एकावर एक अकरा होतातच ना? प्रखरनं स्पष्टच नकार दिल्यावर मग तिनंही त्यावर विचार केला नाही. पण रूपेश आता जॉबच सोडून आलाय म्हटल्यावर…स्नेहा काही बोलणार तेवढ्यात रखमा आली. स्नेहा तिच्याकडून स्वयंपाकघराची स्वच्छता करून घेऊ लागली.

‘‘रूपेश, मी भाजी घेऊन येते,’’ म्हणून स्नेहा निघाली. तसा रूपेश म्हणाला, ‘‘मी पण चलतो.’’

भाजीवाल्यानं रुपेशला बघितलं तर हसून म्हणाला, ‘‘साहेब, आज तुम्ही कसे? कामावर नाही जायचं का?’’

‘‘मी नोकरी सोडलीय,’’ हसून रुपेशनं म्हटलं.

‘‘काय?’’ दचकून भाजीवाल्यानं विचारलं अन् रूपेशकडे अशा नजरेनं पाहिलं जणू तो रखमाचा नवरा आहे, ज्याला कामावरून काढून टाकण्यात आलंय.

स्नेहा बिचारी गप्प बसली. घरी येऊन तिनं भाजी केली. कोथिंबीर, उसळ केली. कणिक भिजवून वरणाला फोडणी घातली. भराभरा कामं आटोपून तिनं रूपेशला म्हटलं, ‘‘मी भाताचा कुकर लावून जाते. तीन शिट्या झाल्या की गॅस बंद कर.’’

‘‘मी चलतो तुझ्यासोबत, आल्यावर कुकर लाव.’’ म्हणत रूपेशही तिच्याबरोबर निघाला.

बाबांना बघून मुलांनाही आश्चर्य वाटलं.

‘‘बाबा, आज तर ‘रेनी डे’ नाहीए. तुम्ही कसे सुट्टीवर?’’ धाकट्यानं निरागसपणे विचारलं.

घरी आल्यावर स्नेहानं कुकर लावला. जेवायला वाढेपर्यंत पोरांनी ‘भूक भूक’ करत भंडावून सोडलं.

जेवणं झाल्यावर रुपेश म्हणाला, ‘‘चल, जरा निवांत बिझनेस प्लॅनिंग करूयात.’’

पण स्नेहाला स्वयंपाकघर, ओटा स्वच्छ करायचा होता. अजून धुणं व्हायचं होतं. ती म्हणाली, ‘‘तुम्ही जरा मुलांचं होमवर्क आटोपून घ्या. मी कपडे धुवून येते. मग प्लॅन करू.’’

मुलांचं होमवर्क घेणं रूपेशला जमेना. त्याला त्यातलं काहीच ठाऊक नव्हतं.

धाकट्यानं विचारलं, ‘‘भोपळा अन् वांग यात काय अन् कसा फरक आहे?’’

रूपेशनं म्हटलं, ‘‘लिहि ना, भोपळा पिवळा आणि वांग जांभळं काळं असतं,’’ हे ऐकून दोघं मुलं हसायला लागली. धाकटा तर टाळ्या वाजवू लागला.

दंगा ऐकून बाथरूममधून स्नेहा बाहेर आली. ‘‘हे काय अभ्यास का करत नाहीए?’’ मुलानं तोच प्रश्न आईला विचारला.

‘‘भोपळा हा वेलावर लागतो. क्रीपर म्हणजे वेल. वांगं रोपावरझाडावर लागतं. श्रब असा शब्द आहे.’’

मुलं वडिलांकडे बघून पुन्हा हसू लागली. त्यांना नीट अभ्यास करण्याची तंबी देऊन स्नेहा कपडे धुवायला गेली.

रूपेश डोळे बंद करू आडव झाला. मुलांनी काहीतरी विचारलं, पण त्यानं उत्तर दिलं नाही. त्याला झोप लालगी आहे असं समजून मुलं खेळायला निघून गेली.

रूपेशला खरंच झोप लागली. जागा झाला तेव्हा सायंकाळ झाली होती.

स्नेहा मुलांना रागवत होती, ‘‘तुम्ही अभ्यास पूर्ण केला नाहीत, खेळायला निघून गेलात. आता आपण आधी अभ्यास, करूयात.’’

तेवढ्यात रूपेश उठलेला बघून तिनं त्यांचा दोघांचा चहा केला. मुलांना दूध दिलं अन् चहा घेऊन ती मुलांचा अभ्यास घ्यायला लागली.

रूपेशच्या मनात आलं, सकाळपासून स्नेहा कामं करतेय. ती बिझनेससाठी वेळ कसा अन् कधी काढेल?

पुन्हा रात्रीचा स्वयंपाक…ओटा धुणं, अन्नाची झाकपाक, मुलांची उद्याची तयारी…

दुसऱ्या दिवशी रूपेश कामावर गेला नाही. रखमा कामावर आली. काम करता करता म्हणाली, ‘‘बाई, तुम्ही माझ्या नवऱ्याला कामावर ठेवून घ्यायला साहेबांना सांगा ना? त्याला काम नाही लागलं तर माझ्या मुलांची शाळा बंद होईल.’’

स्नेहाच्या सांगण्यावरून रखमानं मुलांना चांगल्या शाळेत घातलं होतं. आता स्नेहा तिला काय सांगणार की तिचाच नवरा नोकरी सोडून आलाय म्हणून. तो रखमाच्या नवऱ्याला कुठून काम देणार?

रखमा गेली अन् रूपेशनं म्हटलं, ‘‘स्नेहा, जरा तुझे दागिने आण बघू. बघूयात त्यात किती पैशाची सोय होऊ शकतेय.’’

स्नेहानं कपाटाच्या लॉकरमधून दागिन्यांचा डबा काढून आणला. रूपेशच्या हातात डबा देताना तिचे हात थरथरत होते.

तेवढ्यात विद्याचा फोन आला. ‘‘आज ऑफिसची पार्टी आहे, तू येणार आहेस ना?’’

‘‘बघते,’’ तिनं कसंबसं म्हटलं अन् फोन ठेवला. दागिने नाहीत म्हटल्यावर आता यापुढे पार्ट्यांना कसं जायचं?

ती रूपेशकडे येऊन म्हणाली, ‘‘दागिने दोन तीन दिवसांनी विकले किंवा गहाण ठेवले तर चालेल का?’’

‘‘चालेल ना!’’ रूपेशनं डबा तिला देत म्हटलं.

त्या निर्जीव दागिन्यांबद्दल स्नेहाल इतका प्रेमाचा उमाळा दाटून आला. या पाटल्या माझ्या आईनं दिलेल्या. या बांगड्या आजी अन् मामाकडची भेट. ही अंगठी ताईनं दिलेली, हा नेकलेस अन् सेट रूपेशने किती प्रेमानं माझ्यासाठी आणला होता. तिचे डोळे भरून आले. एकेका दागिन्याचा ती मुका घेऊ लागली.

तेवढ्यात फोन वाजला. विद्या विचारत होती, ‘‘अगं, तू येते आहेस की नाहीस पार्टीला? काहीच कळवलं नाहीस?’’

‘‘हो, हो, अगं राहिलंच ते. पण एक सांग, पार्टी आहे कशासाठी?’’

‘‘बॉसचा वाढदिवस आहे. म्हणूनच ऑफिसला दोन दिवस सुट्टी दिलीय ना?’’

‘‘बरं, मी येतेय पार्टीला,’’ तिनं फोन ठेवला अन् सरळ रूपेशपाशी गेली.

‘‘मला बुद्धु बनवलंत तुम्ही, म्हणे नोकरी सोडून आलोय, खरं तर बॉसच्या वाढदिवसाची सुट्टी आहे तुम्हाला.’’

‘‘हो गं! ऑफिसला सुट्टी आहे हे खरंय. पण मी खरंच विचार करतोय की नोकरी सोडावी म्हणून. मी आजच्या पार्टीतच माझा राजीनामा देणार होतो. हे बघ, लिहून तयारच आहे.’’

दोन दिवसांपूर्वी लिहिलेला राजीनामा त्यानं तिला दाखवला. म्हणजे रूपेश खरोखर नोकरी सोडतोय तर!

सायंकाळी पार्टीसाठी तयार होत असताना स्नेहाला सारखं भरून येत होतं. आता हे दागिने तिला परत कधीच बघायला मिळणार नाहीत किंवा काही वर्षांनंतर जेव्हा व्यवसाय छान चालेल, भरपूर पैसा हातात येईल तेव्हा नवे दागिने घेता येतील. पण निदान सध्या काही वर्षं तरी दागिन्यांशिवाय राहावं लागेल.

गाडीतून पार्टीला जाताना तिच्या मनात आलं जर रूपेशनं नोकरी सोडली नाही तर रखमाच्या नवऱ्याला ते लोक ड्रायव्हर म्हणून ठेवून घेऊ शकतील.

रूपेशही काळजीतच होता. स्नेहानं धंद्यात मदत करायची म्हटलं तर तिच्याकडं जास्तीचा वेळ कुठं होता? मुलं अजून पुरेशी मोठी झालेली नव्हती. सासर माहेर कुठूनच कुणी वडिलधारं येऊन राहील अशी परिस्थिती नव्हती. सगळा वेळ तर घरकामात अन् मुलांमध्ये जातो. मग धंदा कसा होणार?

ती पोहोचली तेव्हा पार्टी सुरू झाली होती. प्रखर आणि विद्या त्यांची वाटच बघत होते. पार्टीच्या शेवटी बॉस बोलायला उभे राहिले. सगळ्या स्टाफला उद्देशून ते म्हणाले, ‘‘आजची पार्टी माझ्या ऑफिसमधल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या पत्नींना समर्पित आहे. त्या सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे सांभाळतात आणि ऑफिसच्या कामासाठी आपल्या नवऱ्यांना पूर्ण मोकळीक देतात म्हणूनच आमचं ऑफिस व्यवस्थित चाललंय. झोकून देऊन ऑफिसचं काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या पत्नींचा मी आभारी आहे. आज की शाम…बीबीयों के नाम…’’’

स्नेहाला भीती वाटत होती की रूपेश आता त्याचा राजीनामा सादर करतो आहे की काय? हृदय धडधडत होतं. नोकरी सुटली तर पार्ट्या वगैरे बंदच होतील.

घरी परतताना रूपेशनं म्हटलं, ‘‘स्नेहा, तू माझ्यासाठी, आपल्या मुलांसाठी, संसारासाठी खरोखर खूप राबतेस. बॉस बरोबर बोलले. तू घर सांभाळतेस म्हणूनच मी ऑफिसची जबाबदारी सांभाळू शकतो. मी उगीचच तुझ्याशी भांडलो, ओरडलो…सॉरी, माझं चुकलंच!’’

‘‘नाही रूपेश, माझंच चुकलं. मी तुमच्या नोकरीला दीडदमडीची ठरवत होते. पण ती किती महत्त्वाची आहे, हे मला आता कळतंय. आज जो काही संसार आहे तो तुमच्या नोकरीमुळेच आहे. तुमच्या कष्टाचं फळ आहे. पण मला त्याची सवय झालीय ना, म्हणून मी उगीचच चिडचिड करत बसते. जर हे सगळं नसलं तर मी कशी राहीन? काय काय करीन? बरं झालं तुम्ही राजीनामा दिला नाहीत ते.’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...