– कथा प्राच भारद्वाज

रचना वरकरणी शांतपणे घरकाम आटोपत असली तरी मनात प्रचंड वादळ घोंघावत होतं. तिला शारीरिकदृष्ट्या काहीच त्रास नव्हता, पण मन मात्र रक्तबबांळ झालं होतं. ओठांवर नेहमीचं स्निग्ध हसू ठेऊनच ती वावरत होती, पण एकुलता एक लाडक्या लेकीच्या, त्यातून अगदी एवढ्यातच लग्न झालेल्या लेकीच्या आयुष्यात आलेल्या या भूकंपानं मनातून तीसुद्धा हादरलीच होती. फक्त नवरा अन् लेक यांना काही कळू नये म्हणून हास्याचा मुखवटा घालून होती.

रचनानं अलीकडेच पेपरला वाचलं होतं, ‘‘हनीमूनहून परतल्याबरोबर नवविवाहित जोडपी सरळ घटस्फोटाचीच मागणी करतात. अशा तऱ्हेच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते आहे.

खरं तर हनीमूनला गेल्यावर जेव्हा दोघंच सतत एकमेकांबरोबर असतात, तेव्हा त्यांना एकमेकांच्या गुणदोषांची जाणीव होते. मुलांमध्ये तशीही सहनशीलता कमी असते. पण समाजानं ते गृहीत धरलंय. समजूतीची, तडजोडीची अपेक्षा अर्थात्च वधूकडून जास्त असते. पण आता बदललेल्या काळात मुलीही तेवढ्याच असहिष्णू अन् तापटपणे वागू लागल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषांची बरोबरी करतात, प्रसंगी अधिक चांगला परफॉर्मन्स देतात तर मग त्यांनी तडजोड का म्हणून करायची?

पेपरला असं वाचणं अन् आपल्याच घरात असं काही घडणं यात फार फरक असतो. रचनाला त्यामुळेच धक्का बसला होता.

तिनं अन् सुधीरनं खूप थाटात अन् धूमधडाक्यानं आपल्या एकुलत्या एका मुलीचं लग्न करून दिलं होतं. सगळं अगदी रीतसर, विधीवत केलं होतं. किती पाहुणे, नातलग, इष्टमित्र, परिचित लग्नाला आले होते. व्याहीदेखील तोलामोलाचे होते. लतिका अन् मोहन जवळजवळ एक वर्ष कोर्टशिपमध्ये होते. त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली गेली होती. संगीत, मेंहदी, प्रत्येक प्रसंगाला नामवंत बॅण्ड अन् गाणारी मंडळी बोलावलेली. लग्नालाही प्रत्येक क्षेत्रातली बडी बडी मंडळी हजेरी लावून गेली होती. लतिका अन् मोहित खूप आनंदात होते. लेटेस्ट डिझाइनचे पोषाख, दागिने, जेवायला पारंपरिक अन् परदेशी असे मिळून शंभर एक पदार्थ…काही म्हणता काही उणीव नव्हती त्या समारंभात.

हनीमूनचा कार्यक्रमही चांगला वीस दिवसांचा होता. एकविसाव्या दिवशी लेक अन् जावयाला घ्यायला सुधीर अन् रचना भला मोठा फुलांचा गुच्छ घेऊन एयरपोर्टला पोहोचले. विवाहसौख्याच्या तेजानं उजळलेले लेक-जावयाचे चेहरे बघायला ती दोघं आतूर होती. हनीमूनच्या पहिल्या काही दिवसात फेसबुक अन् व्हॉट्सअॅपवर त्यांचे दोघांचे प्रेमसागरात डुंबत असणारे सेल्फी अन् फोटो बघून आई बाप सुखावले होते. पण एयरपोर्टवर आईबाबांना मिठी मारून झाल्यावर लतिकानं ड्रायव्हरला सांगितलं की तिची बॅग आईप्पांच्या गाडीत ठेव. मोहित बिचारा सासूसासऱ्यांना न भेटताच दुसऱ्या वाटेनं निघून गेला.

चकित झालेल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून लतिका सरळ कारमध्ये जाऊन बसली. हळूहळू सगळी परिस्थिती रचना अन् सुधीरच्याही ध्यानात आली. रचनानं एकूणच परिस्थितीची सूत्रं आपल्या ताब्यात घेऊन सुधीरला शांत राहण्यास सांगितलं. घरातलं वातावरण आनंदी व प्रसन्न राहील याकडे ती विशेष लक्ष देत होती. पूर्वीच्या काळी एकदा सासरी गेलेली मुलगी प्राण गेला तरी परतून माहेरी येत नसे, पण आजचा काळ तसा नसला तरी लग्नसंबंध म्हणजे धक्का लागताच कोलमडून पडेल असं तकलादू नातं नसतंच. लतिका मोकळेपणानं काहीच सांगत बोलत नव्हती. गप्प गप्प बसून असायची. रचनाला फारच वाईट वाटायचं.

‘‘लतिका, मोहितचा फोन आहे तुझ्यासाठी…तो विचारतोय तुझा मोबाइल बंद आहे का?’’ रचनानं सांगितलल्यावरही लतिका हप्पच होती. फोनपाशी गेली काही तरी बोलली, फोन जागेवर ठेवला अन् पुन्हा येऊन आपलं पुस्तक घेऊन बसली. रचनानं ठरवलं आज लेकीशी मोकळेपणाने बोलायचं. सगळं नाही तरी थोडं बहुत तरी कळायलाच हवं काय बिनसलंय दोघांमध्ये. असेल काहीतरी फुसकंच कारण ज्याचा तिच्या हट्टी, लाडोबा लेकीने उगीचच ‘इश्यू’ केलाय.

‘‘काय झालंय लतिका? तू का नाराज आहेस मोहितवर? अगं आता नवा संसार सुरू करायचाय तुम्हाला अन् हनीमून संपताच तुम्ही दोघं वेगवेगळी झालात?’’

‘‘ममा, खरं सांगते, अगं मी अन् मोहित ना अजिबातच कंपॅटिबल नाही आहोत. त्याला माझ्या भावनांची किंमतच नाही. मी तरी त्याची बेपर्वाई का सहन करू? अगं बारीकसारीक विनोदही त्याला कळत नाहीत. एकदम चिडतो. मी माझ्या मित्रांबद्दल बोललेलं त्याला आवडत नाही. लग्नापूर्वी मला वाटायचं तो माझ्या बाबतीत फार पद्ब्रोसिव्ह आहे म्हणून तो असं वागतो. पण आता लग्न झालंय माझा त्याच्याशी अन् तो आता आला माझ्या आयुष्यात तर मी माझे जुने मित्र त्याच्यासाठी सोडून द्यायचे का? त्याला फक्त त्याच्या कुटुंबाचीच काळजी आहे. हनीमून कसला? त्याच्या कुटुंबात मी सेटल होण्यासाठी कसं वागावं याचं टे्निंगच दिलं त्यानं…आता? फोनवरही म्हणाला, ‘‘मी समजून घ्यायला हवं. थोडी तडजोड करायला हवी.’’

लतिकाच्या बोलण्यातून एक गोष्ट तर अगदी स्पष्टपणे कळत होती की मोहितला हे लग्न टिकवायचं होतं. त्याला लतिका त्याच्याजवळ हवी होती. खरं तर लतिका अन् तिची आई रचना या दोघी मायलेकीच्या नात्यापेक्षाही मैत्रिणी अधिक होत्या. म्हणूनच तर लतिकानं आपलं मन तिच्यापाशी मोकळं केलं होतं. आता आई म्हणून रचनानं आपली जबाबदारी सिद्ध करायची होती. एकुलत्या एका लाडक्या लेकीला सासरच्या घरी नांदायला पाठवायचं अन् तिचं वैवाहिक आयुष्य सुखी होईल असं काही करायला हवं.

खरं तर वर्षभराच्या कोर्टशिपच्या काळात लतिका अन् मोहित एकमेकांसोबत खूपच खुशीत होते. याचा अर्थ एवढाच की आता जे काही घडतंय ते खूपच तात्पुरत्या वेळेसाठी आहे…कुठलंही नातं स्थिर होण्याआधी अशा उचक्या लागतातच.

नातं नेहमी विश्वासावर टिकून असतं. विश्वासाचं पाणी मिळालं की या उचक्या थांबतातच. अनुभवानं परिपक्व झालेल्या रचनाला एवढं माहिती होतं की नात्यातला दुरावा पटकन् मिटवायला हवा नाहीतर नातं दुभंगतच जातं अन् ते काम दोघांनी मिळून करायचं असतं. तक्रारी किरकोळ आहेत तोवरच हा विषय संपायला हवा.

रचनानं लतिकाला समजावण्याचा प्रयत्न केला, ‘‘हे बघ बाळा, लग्न म्हणजे बाहुला बाहुलीचा खेळ नाही. तुझ्या बाहुली घेऊन तू मैत्रीणींकडे गेलीस. तिच्या बाहुल्यासोबत तुझ्या बाहुलीचं लग्नं झालं. खेळ संपला, पार्टी संपली अन् तू तुझ्या बाहुली घेऊन घरी परतलीस असं खऱ्या आयष्यात घडत नाही. एकदा लग्न झालं की मुलीला सासरीच राहावं लागतं. तिथल्या माणसांमध्ये मिळून मिसळून त्यांना आपलंसं करावं लागतं. प्रत्येक विवाहित मुलीला या संक्रमणातून जावंच लागतं.’’

‘‘प्लीज ममा, हे असलं काहीतरी भंकस तुझ्या तोंडी शोभत नाही. तू इतकी जुनाट विचारांची कधीपासून झालीस? मी काही शोभेची बाहुली नाही. जिवंत मुलगी आहे. मला माझ्या भावना आहेत की नाहीत?’’ लतिका काही समजून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हती. तेव्हा रचनानं ठरवलं आधी मोहितला भेटून त्याच्याशी नीट मोकळेपणानं बोलूयात.

प्रथम दोघांनाही अवघडल्यासारखं झालंच होतं, पण रचनानंच पुढाकार घेत कोंडी फोडली, ‘‘हे बघ मोहित, नात्यानं तरी तू आमचा जावई असलास तरी आमच्या मुलासारखाच आहेस…सध्या तू अन् लतिका दोघंही ताणात आहात…या परिस्थितीतून आपल्याला लवकर बाहेर पडलं पाहिजे. मी अजून फक्त लतिकाचीच बाजू ऐकली आहे, तुझ्या बाजूही मला समजून घ्यायची आहे. तेव्हा तू हातचं काहीही न राखता तुझं मन मोकळं कर. तुझा प्रॉब्लेम कळला तर सोल्युशन शोधणं सोपं होईल.’’

‘‘ममा, तुम्हीच सांगा, ज्या गोष्टी मी पूर्वीच लतिकाला स्पष्टपणे सांगितल्या होत्या, त्याच पुन्हा पुन्हा विचारण्यात काही अर्थ आहे का? लतिकाला ठाऊक आहे आमच्या घरात तुमच्याएवढं पार्टी कल्चर नाहीए. आधीपासून मी तिला याची कल्पना दिली होती. अजून आमच्या घरात जेमतेम आठ दिवस लग्नानंतर राहिली ती तरी तेवढ्या वेळात आपण या पार्टीला जाणार नाही त्या पार्टीलाही जाणार नाही यावरून चिडचिड. आमच्या घरात अजूनही थोडं जुनं वातावरण आहे. घरात आजी आहे. आई, बाबा, दोघं भाऊ, दोघी वहिनी असं एकत्र कुटुंब आहे. हे सगळंही तिला कोर्टशिपच्या काळात ठाऊक होतंच ना? लग्नानंतर काही दिवस तुला आजी अन् आईला सांभाळून घ्यावं लागेल. नंतर तर मी यूएसएसाठी प्रयत्न करतोय, आपण तिकडंच जाऊ बहुधा हेही तिला सांगून झालं होतं. तेव्हा तिनं होकार दिला अन् आता मी माझ्या मर्जीनंच जगणार असा ताठर पवित्रा घेतेय. बरं, घरात असं काय करायचंय सकाळी उठल्यावर मोठ्यांच्या पाया पडायचं, स्वयंपाक काय करायचा याबाबतीत फक्त सल्ला घ्यायचा. बाहेर जायचं झालं तर त्यांना आधी सांगून ठेवायचं. यात जगावेगळं किंवा टॉर्चर होईल असं काय आहे? हे तर अगदी साधे संस्कार आहेत. कुठल्याही मुलीला ते माहीत असावेत किंवा सून म्हणून तिनं ते स्वीकारावेत. माझ्या घरातल्या माझ्या दोघी मोठ्या वहिनीही उच्चशिक्षित अन् समाजात प्रतिष्ठा असलेल्या श्रीमंत कुटुंबातून आलेल्या आहेत. त्याही हे सगळं करतात. मग लतिकाला त्यात काय कमीपणा वाटतो तेच मला कळत नाही.’’

रचना विचारात पडली. मोहितही म्हणतोय, लतिकाही म्हणतेय, आम्ही कंपॅटिबेल नाही म्हणजे नेमकं काय? ‘कंपॅटिबिलिटी’ काय असते? प्रत्येक लग्नात तडजोड करावीच लागते. थोडाफार त्यागही करावाच लागतो. एकाच घरात जन्माला आलेल्या बहीणभावातही मतभेद, विचार भिन्नता असतेच. त्यांच्यात भांडणंही होतात. पण त्या नात्यात घटस्फोट नसतो. पतीपत्नी मात्र फटाकदिशी घटस्फोट घेऊन नातं संपवायला बघतात. मोहितच्या एकूण बोलण्यावरून त्याचं लतिकाविषयीचं प्रेम कळतंय.

‘‘खरं सांगतो ममा, लतिका खूप चांगली मुलगी आहे. माझ्या आईबाबानांही ती खूप आवडते. पण तिचा हट्टीपणा अन् अहंकार फार जास्त आहे. मला मान्य आहे की ती एकुलती एक आहे. फार श्रीमंतीत अन् लाडात वाढलीय. पण लग्नानंतर ती एक जबाबदार पत्नी अन् चांगली सून होईल असं मला वाटलं होतं. तिथंच चूक झाली. मी ही तिला समजून घ्यायला कदाचित कमी पडत असेन, पण आपसात मोकळेपणानं बोलल्याशिवाय सुसंवाद कसा स्थापित होणार?’’ मोहितच्या बोलण्यातला समंजसपणा अन् प्रामाणिकपणा रचनाला खूपच भावला.

रचना घरी पोहोचली, तेव्हा लतिका सोफ्यावर लोळत फोनवर मैत्रिणीशी बोलत होती. वेफर्सचं भलंमोठं पाकिट तिनं निम्म्याहून अधिक संपवलेलं होतं. एरवी स्वत:च्या फिगरबद्दल जागरूक असणारी लतिका टेन्शन आलं की बकाबका खात सुटते. तडस लागेपर्यंत खाल्लं की मग ती थोडी रिलॅक्स होते म्हणजे मोहितही टेन्स आहे अन् त्याच्यापासून दूर राहून लतिकाही टेन्स आहेच. दोघांमधल्या अहंकाराच्या भिंतीला भगदाड पाडायची जबाबदारी आई म्हणून रचनानं घेतलीय. प्रत्येक लढाई जिंकलीच पाहिजे असं नसतं तर हरण्यातून धडा घेणं महत्त्वाचं असतं. नातं तुटण्यातून निर्माण झालेला निराशेचा अंधार घर किंवा कुटुंबच नाही तर संपूर्ण आयुष्याला ग्रासून टाकतो. रचना असं होऊ देणार नाही. तिला तिच्या लेकीचं आयुष्य, प्रेम अन् समंजसपणानं उजळलेलं बघायचं आहे.

‘‘अगं, आम्ही भांडलो अन् मी आईच्याच घरी आलेय…काय? तुला ही बातमी सोनलनं दिली? तिला कुणी सांगितलं? अगं, मी तसा विचार करतेय…मोहितशी लग्न करण्याचा माझा निर्णय मला वाटतं चुकलाच.’’

फोनवर बोलण्यात गर्क असलेल्या लतिकाला आई आल्याचं कळलंच नाही. ती बोलतच होती. रचनाच्या मनात आलं, आपणही मुलीला सासरी पाठवायचं आहे यादृष्टीनं तिला पुरेसे संस्कार दिले नाहीत. कदाचित ती निभवून घेईल असंही आपल्याला वाटलं असावं. लग्नाच्या सुरूवातीला मुली खूपच हळव्या असतात. अगदी नव्या वातावरणात, नवी माणसं, नवे आचार विचार यात रूळायला त्यांना वेळ हवाच असतो. खरं तर मुलीच्या आईनं मुलीला हे सगळं समजावणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच मुलाच्या आईनंही मुलाला समजावून सांगायला हवं की बाबारे, वेगळ्या वातावरणातून आलेली मुलगी हळूहळू घरात रूळेल तोवर तूही तिला सांभाळून घे. प्रत्येक गोष्टीची सक्ती करू नकोस. ती अधिकाधिक कंफर्टेबल कशी राहील ते बघ. अशा प्रयत्नांनीच पतीपत्नीतलं नातं दृढ होतं. त्यांच्यात अधिक सलोखा निर्माण होतो. पतीनं दिलेलं सहकार्य पत्नी कायम लक्षात ठेवते.

‘‘नाही गं, माझी आई खूप समजून घेते मला. मला वाटतं की ती याबाबतीतही माझीच बाजू उचलून धरेल,’’ लतिकानं अगदी आत्मविश्वासानं मैत्रिणीला सांगितलं.

शांतपणे लेकीजवळ सोफ्यावर बसत रचनानं म्हटलं, ‘‘बाळा, तू जो काही निर्णय घेशील त्याला माझा पाठिंबाच असेल. इतकी वर्षं प्रत्येक गोष्ट तुझ्या मर्जीनं तुझ्या आवडीनुसार झाली आहे, तशीच पुढेही होईल. तुझं लग्न आम्ही आधुनिक पद्धतीनं केलं तर पुढेही सगळं त्याच इतमामानं करू. तुला मोहितशी लग्न केल्याचा पश्चात्ताप होतोय ना? तर मग घे घटस्फोट अन् हो मोकळी.’’

रचना मायेनं बोलत होती अन् बारकाईनं लतिकाच्या एकूण प्रतिक्रियेकडेही बघत होती. तिच्या या सडेतोड बोलण्यावर लतिकाची जी प्रतिक्रिया होती ती तिला अपेक्षित अशीच होती.

लतिकाचे डोळे विस्फारले अन् तोंडाचा ‘आ’ वासला. ‘‘अं?’’ तिनं बावचळून विचारलं, ‘‘मोहितला सोडू?’’

‘‘हो गं बाळा, सोड मोहितला. नको असलेल्या नात्याचं ओझं वाहू नये. माझ्या माहितीतला एक मुलगा आहे चांगला फॅशनेबल, श्रीमंत, एकुलता एक, सतत पार्ट्या, पिकनिक म्हणजे तुला हवं तसंच सगळं. खरं तर आम्ही तोच तुझ्यासाठी बघितला होता. पण तू मोहितच्या प्रेमात होतीस म्हणून विषयच काढला नाही,’’ रचना प्रेमळपणे म्हणाली.

रचनाचं बोलणं ऐकून आनंदीत होण्याऐवजी ती दुखावल्यासारखी झाली. चकित नजरेनं आईकडे बघत काही बोलणार त्या आधीच रचनानं पुढला बॉम्बगोळा टाकला. ‘‘म्युच्युअल डायव्होर्समध्ये फार वेळ लागत नाही, लग्न टिकलं त्यापेक्षाही कमी वेळात तुला डायव्होर्स मिळेल. तरी मला कळंत नव्हतं वर्षभर तू कोर्टशिप कशी केलीस मोहितबरोबर…चला तर, तुझा एक महत्त्वाचा निर्णय घेऊन झालाय…मला एका पार्टीला जायचंय…आधीच उशिर झालाय… सी यू लेटर…बाय…’’ रचना पर्स उचलून निघूनही गेली.

आईचं असं निघून जाणं लतिकाला फारच खटकलं. आपल्या लेकीची या क्षणाची मन:स्थिती काय आईला कळत नव्हती? अशावेळी पार्टीला जाणं गरजेचं होतं का? पार्ट्यांना जायला तर लतिकालाही आवडतं. लग्नानंतर तिच्या सासरच्या घरी सत्यनारायण होता. लग्नाचे सगळे विधी, रिसेप्शन अन् पूजेत तीन तास बसून नाजुक लतिका अगदी थकून गेली होती. तिचं डोकं सडकून दुखत होतं. घरी प्रसादाला अन् नव्या सुनेला बघायला इतके लोक आले होते.

सासूबाई मात्र शांतपणे खंबीर आवाजात म्हणाल्या, ‘‘आमच्या लतिकाचं डोकं दुखतंय. फार दगदग झालीय गेले दोन दिवस. ती झोपलीय आता. तुम्ही राग मानू नका. समजून घ्या. तीर्थ प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. लग्नाचा व्हिडिओ स्क्रीनवर येतोच आहे. फोटोतलीच सून आता बघा. लतिकाच्यावतीनं मी तुमची क्षमा मागते.’’ लोकांनीही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. प्रसाद व इतर अनेक पदार्थ मनापासून खाऊन लोक घरी गेले. लतिकाची सासू तिच्या खोलीत तिची काळजी घेत बसून होती.

रात्री उशीरा झोपलेली लतिका सकाळी अर्थात्च उशिरा उठली. आई त्यावेळी घरात नव्हती. लतिकानं तिला फोन केला. आईनं फोन उचललाच नाही. नंतर काही वेळानं तिचा मेसेज आला. ‘‘तुझे पपा कामासाठी दुबईला गेलेत म्हणून आज मी माझ्या भावाकडे म्हणजे तुझ्या मामाकडे आलेय. चार दिवस इथंच राहणार आहे.’’ लतिकाला कळेना आईला आत्ताच मामाकडे कशाला रहायला हवंय?

तिनं आईला मेसेज पाठवला. ‘‘लगेच घरी परत ये.’’ त्यावर आईनं उलट मेसेज दिला, ‘‘प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीनं जगण्याचा हक्क आहे बेबी, तुझ्या घटस्फोटाच्या निर्णयात मी भक्कम तुझ्या पाठीशी आहे. मी चार दिवस माझ्या भावाकडे राहिले तर तुला काय त्रास होतोय? धिज इज नॉट फेयर. घरी सखुआजी आहेत, मीना ताई आहेत, सगळे लोक तुझ्या खाण्यापिण्याची, कपड्याची काळजी घेताहेत. तू आनंदात राहा. तुझ्या मित्रमैत्रीणींकडे जा.’’

त्या चार दिवसात लतिका वैतागली. तिच्या सगळ्याच मित्र मैत्रीणींमध्ये तिच्या डिव्होर्सची चर्चा होती. त्यातून विशेष म्हणजे वर्षभर कोर्टशिप झाल्यावर यांच्या हनिमूनमध्ये असं काय घडलं की एकदम डिव्होर्सचीच वेळ आली. तिला पार्टीत तोच अनुभव आला. सिनेमाला यायला मित्राला वेळ नव्हता. शॉपिंगला जायला मैत्रीण मोकळी नव्हती.

लतिकाला लक्षात आलं की खरंच लग्नानंतर मुलीचं आयुष्य बदलतं, नाती बदलतात, मित्रमैत्रींणीचाही दृष्टीकोन बदलतो, त्यांच्या प्रतिक्रियाही बदलतात. लग्न म्हणजे गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे. तो पोरखोळ नाही. विचारपूर्वक पाऊल उचलायला हवं.

तिनं मोहितचा नंबर फिरवला अन् पलिकडून तो उत्साहानं म्हणाला, ‘‘हं बोल, कशी आहेस?’’

‘‘कसा आहेस तू?’’

त्याच्या मनातलं प्रेम एकदम उफाळून आलं. ‘‘फार दिवस झाले…तुझी खूप आठवण येतेय. आपण भेटूयात?’’

तिलाही ते जाणवलं. एकदम मोकळेपणानं म्हणाली, ‘‘मी आज पाच वाजता तुला तिथंच भेटते.’’

‘‘लग्नाआधी नेहमी आपण जिथं भेटत असू तिथंच हं!’’ मोहितनं म्हटलं.

मोहितनं आपण होऊन पुढाकार घेतल्यानं लताला खूप बरं वाटलं. आज कितीतरी दिवसांनी तिला असं प्रसन्न अन् हलकं हलकं वाटत होतं. मधल्या काही दिवसांत मनावर सतत ताण जाणवायचा. विनाकारण चिडचिड व्हायची. आज मात्र मनात फक्त प्रेम आणि प्रेमच होतं. याक्षणी तिचा कुणावर राग नव्हता. कुणाविषयी तक्रार नव्हती.

वेळेवर कॅफेत पोहोचण्यासाठी ती आवरू लागली. तेवढ्यात माहेरी गेलेली तिची आई घरी परतली. ती खूपच आनंदात होती. ‘‘लतिका एक छान बातमी आहे. मी ज्या मुलाबद्दल तुला बोलले होते ना, तो आजच रात्री जेवायला आपल्याकडे येतोय. तू घरीच राहा. तुला आवडेल तो. तुम्ही एकमेकांना पसंत केलं की आपण मोहितच्या डायव्होर्सचंही बघू अन् मग हे लग्न आणखी धूमधडाक्यात करू? ओ. के. बेबी?’’

रचनाचं बोलणं ऐकून लतिका हतबुद्ध झाली. मोहितवर ती रूसली होती…वैतागून तिनं डिव्होर्सबद्दल म्हटलंही असेल, पण मनातून तिला मोहित हवाच होता. डिव्होर्स तिच्या जिभेनं म्हटलं होतं पण मन अन् मेंदू त्यासाठी कधीच तयार नव्हते. याक्षणी तिला फार प्रकर्षानं याची जाणीव झाली होती. आता तर ती मोहितलाच भेटायला निघाली आहे?

पण आईची चूक नाहीए. ती तर लतिकाच्याच निर्णयाला पाठिंबा देते आहे.

‘‘आई, इतकी घाई का करते आहेस? जेव्हा घटस्फोट घ्यायचं नक्की होईल, तेव्हा मी सांगेन तुला. आता मी बाहेर निघालेय…जरा घाईत आहे,’’ लतिकानं म्हटलं.

‘‘हे बघ बेटू, प्रत्येक वेळी तुझ्या इच्छेनं सर्व गोष्टी घडतील, सगळ्यांनी तुझंच ऐकायचं असं नाही चालणार.’’ नेहमीच्या प्रेमळ आवाजात बोलत नव्हती रचना. चांगलाच कडक आवाज होता तिचा. ‘‘तुला मोहितशी लग्न करायचं होतं, आम्ही करून दिलं. ज्या पद्धतीनं, जे जे हवं तसंच लग्न झालं. तुझ्या इच्छेप्रमाणे वीस दिवसांचा हनीमून प्रोग्रॅम तुला गिफ्ट केला. आता तिथून परत आल्यावर तूच डिव्होर्सबद्दल बोललीस, चला ते ही आम्ही समजून घेतलं. आता डिव्होर्स घे, दुसरं लग्न कर अन् संसार थाट. आम्हालाही किती लोकांच्या किती प्रश्नांना उत्तरं द्यायची असतात.’’

लेकीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव बघत होती रचना…अपेक्षित तो परिणाम होतोय हे तिच्या लक्षात आलं.

लतिकाही समजून चुकली की जो काही निर्णय घ्यायचाय तो तिला आजच घ्यायला हवा. आता थोड्या वेळात मोहित भेटतोय अन् रात्री तो दुसरा मुलगा भेटायला येतोय. आई नक्कीच लग्नाचा विषय काढेल, त्यापूर्वी लतिकानं आपला निर्णय आईला सांगायला हवा.

अगदी वेळेवर लतिका कॅफेत पोहोचली. त्यांच्या नेहमीच्याच टेबलवर मोहित तिची वाट बघत होता. त्यानं लगेच दोघांच्या पसंतीचे जिन्नस ऑर्डर केलं. दोघंही थोडी अवघडलेलीच होती.

मोहितनं पटकन् म्हटलं, ‘‘लतिका, प्लीज घरी चल, घरातली सगळी माणसं तुला मिस करताहेत. तुझी आठवण काढताहेत. आई तर रोज विचारते…अगं, कशीबशी मी तिला थोपवून धरलीय नाहीतर ती कधीची तुझ् घरी येऊन तुला घेऊन गेली असती.’’ बोलता बोलता तो भावनाविवश झाला.

पुढे तो काही बोलण्याआधीच भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत लतिकानं विचारलं, ‘‘कधी येतोस मला घ्यायला?’’

दोघंही हसली. एकमेकांचे हात हातात घेऊन घट्ट धरले. न बोलताच त्यांना एकमेकांचे विचार कळले. दोघांनाही एक वर्षाच्या कोर्टशिपमधले प्रेमाचे सगळे क्षण जसेच्या तसे आठवले. ती दोघं एकमेकांसाठीच आहेत. याचा पुन्हा एकदा साक्षात्कार झाला. फक्त प्रेम परिपक्व व्हायला थोडा वेळ हवाय… आता त्यांना सगळं कळलंय.

लग्न कधीच एकतर्फी नसतं. लग्न टिकवणं ही दोघांची अन् दोन्ही पक्षांची जबाबदारी असते. त्या सायंकाळी उशिरा माहेरून सासरी निघालेल्या लतिकाला मोहितबरोबर खुशीत असलेली बघून रचनाला हसू येत होते. ‘दिल्या घरी तू सुखी राहा,’ तिचं मन आशिर्वाद देत होतं.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...