* रेणू गुप्ता

मुंबईतील एका पीजीमध्ये राहणारी सोनम तिच्या रूममेट मोहनाला म्हणाली, ‘‘अगं, जेव्हापासून पप्पांनी मला निर्वाणीचे सांगितले आहे की, या वर्षाच्या अखेरीस तुला सजलसोबत लग्न करावे लागेल तेव्हापासून मी खूप गोंधळून गेले आहे. सजल आणि मी डेटिंग करत आहोत, पण मला अजूनही १०० टक्के खात्री नाही की, मी त्याच्यासोबत आनंदी राहीन.’’

‘‘माझी पण अशीच अवस्था आहे. काल, आई मला सांगत होती की, तू आता २७ वर्षांची झाली आहेस. चांगली कमावती आहेस, एकदा का तू लग्न केलेस की, मी माझ्या जबाबदारीतून मोकळी होईन.’’

‘‘लग्नाचा नुसता विषय निघाला तरी मला भीती वाटते. मी कधीकधी मनुजसोबत डेटवर जाते, पण सध्या आमच्यात लग्नाबद्दल काहीही बोलणी सुरू नाहीत. मला कळत नाही की, काय करावे,’’ मोहना म्हणाली.

लग्नानंतर, पती-पत्नीच्या आयुष्यात खोलवर बदल होतात. ‘मी’ ही विवाहपूर्व संकल्पना ‘आपण’ मध्ये रूपांतरित होते, पण, लग्न करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ‘मी’ ते ‘आपण’ असा प्रवास सोपा नसतो. विशेषत: जे बराच काळ एकटे राहातात त्यांच्यासाठी तो अधिक अवघड असतो. जर वैवाहिक नातेसंबंधात प्रवेश करणाऱ्या अविवाहित मुलींनी लग्नापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले तर मात्र त्या नि:संशयपणे यशस्वी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या वैवाहिक जीवनाचा पाया रचण्यात यशस्वी होतील.

डेटिंग

लग्नापूर्वी तरुणीने तिच्या भावी पतीला अनेकदा भेटले पाहिजे. त्याच्यासोबत भरपूर वेळ घालवला पाहिजे. जर तो लांब राहात असेल आणि हे शक्य नसेल तर फोन किंवा चॅटद्वारे त्याला पूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ती हे समजून घेऊ शकेल की, तो पती म्हणून तिच्या सुयोग्य, तार्किक अपेक्षा पूर्ण करू शकेल का?

मुलीला त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, स्वभावाबद्दल आणि चारित्र्याबद्दल खात्री असली पाहिजे की, तो तिच्या अपेक्षेनुसार खरोखरच तिचा सुयोग्य पती ठरेल.

भावना

यशस्वी वैवाहिक जीवनासाठी जोडप्यांमधील परस्पर प्रेम ही पहिली अट आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला, त्याच्या सर्व क्षमता आणि कमकुवतपणासह, तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणून स्वीकारण्यास तयार आहात का? तुम्हाला त्याच्यावर इतके प्रेम आहे का, की तुम्ही त्याच्याशिवाय आनंदी जीवनाची कल्पनाही करू शकत नाही? तुमचे हृदय त्याच्यासाठी धडधडते का? त्याच्याशिवाय तुम्हाला अस्वस्थ वाटते का? जेव्हा तो तुमच्या नजरेआड होतो तेव्हा तुम्हाला एक अवर्णनीय शून्यता जाणवते का?

जर या प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी ‘हो’ असतील तर तुम्ही तुमच्या नात्यातील या सर्वात महत्त्वाच्या भावनेबद्दल आत्मविश्वास बाळगू शकता आणि त्या व्यक्तीशी लग्न करू शकता.

विश्वास

एकमेकांवर अढळ विश्वास, ही यशस्वी लग्नाची गुरुकिल्ली आहे. म्हणून, लग्नाचे पाऊल उचलण्यापूर्वी, तुमच्या दोघांमध्ये विश्वास आहे, याची खात्री करा. एकमेकांवरील विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया आहे. यामुळे नाते मजबूत होते. केवळ परस्पर विश्वासच जोडप्यामध्ये एक मजबूत नाते निर्माण करू शकतो. त्याशिवाय हे नाते फुलू शकत नाही. वैवाहिक नात्यात या भावनेची उपस्थिती खोली गाठू शकत नाही, त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या जोडीदारावर आंधळेपणाने अवलंबून राहू शकता.

चांगल्या समन्वयासाठी आणि परस्पर आदरासाठी परस्पर विश्वास आवश्यक आहे. तो नसल्यास असुरक्षितता आणि संशयाची भावना निर्माण होऊ शकते, जी तुमच्या नात्यासाठी नुकसानदायक ठरू शकते.

जवळीक

आनंदी आणि समाधानकारक नातेसंबंधासाठी जवळीक, ही एक पूर्वअट आहे. वैवाहिक नातेसंबंधातील जवळीक जोडीदारांमधील भावनिक संबंध मजबूत करते. जोडप्यांमधील जवळीक एकमेकांवरील विश्वास वाढवते, ज्यामुळे परस्पर समज वाढते आणि पती-पत्नी जवळ येतात.

जवळीक मजबूत आणि निरोगी लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देते, जे एका परिपूर्ण विवाहाचा पाया रचते. परस्पर जवळीक निर्माण करण्यासाठी दोन्ही जोडीदारांकडून नियमित प्रयत्नांची आवश्यकता असते. जवळीकता ऋणानुबंध मजबूत करते आणि संघर्ष चांगल्या प्रकारे हाताळण्यास दोघांनाही मदत करते. म्हणून, लग्न करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या जोडीदाराशी अगदी सहजतेने निरोगी जवळीक निर्माण करू शकता का, याची खात्री करा.

वचनबद्धता

कमिटमेंट अर्थात वचनबद्धता म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सर्व परिस्थितीत त्याच्या पाठीशी उभे राहाल. सुख असो किंवा दु:ख, तुम्ही त्याला कधीही सोडणार नाही. वचनबद्धता म्हणजे आयुष्यभर एकमेकांवरील प्रेम टिकवून ठेवण्याचे वचन म्हणजे वचनबद्धता.

तुम्ही आयुष्यभर मानसिक, शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिकरित्या तुमच्या जोडीदाराशी वचनबद्ध राहू शकाल का, हे पाहाण्यासाठी लग्न करण्यापूर्वी तुम्ही थोडे आत्म-विश्लेषण करा.

थोडे ऐका, थोडे बोला

निरोगी वैवाहिक जीवनासाठी संवाद महत्त्वाचा आहे. जर एखाद्या वादग्रस्त विषयावर तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही तुमचा राग रोखू शकता. मन दुखावले जाण्यापासून वाचू शकता.

वैवाहिक नात्यात, जोडीदाराने त्यांच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करताना संकोच बाळगू नये, कारण जोपर्यंत तुम्ही जोडीदाराला तुमच्या मनात काय आहे, ते सांगत नाही तोपर्यंत त्याला तुमच्या गरजा, वेदना, विचार किंवा दृष्टिकोन समजणार नाही. यामुळे तुमच्यात मतभेद निर्माण होतील. याउलट संवादामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या दृष्टिकोनातून कोणतीही समस्या हाताळण्यास मदत होईल.

संयम आणि क्षमा

वैवाहिक जीवनात, संघर्ष, मतभेद, भांडणे आणि वाद स्वाभाविक आहे, कारण दोन्ही जोडीदारांच्या संगोपनाच्या पद्धती, मूल्ये, तत्त्वे आणि कौटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळ्या असतात. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये हे संघर्ष आणि मतभेद सोडवण्यासाठी आवश्यक असलेला संयम आणि सहनशीलता आहे का, याचा विचार लग्नापूर्वीच केला पाहिजे. तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये एकमेकांच्या किरकोळ चुका आणि कमतरता सहन करण्याची आणि त्याकडे दुर्लक्ष करण्याची क्षमता आहे की नाही, हे जाणून घेतले पाहिजे, कारण सहिष्णुतेच्या अभावामुळे, किरकोळ वाददेखील हिंसक वळण घेतात, ज्यामुळे वैवाहिक नात्यासारख्या गोड नात्याचे नुकसान होते.

तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांच्या छोट्या-मोठ्या चुका माफ करण्याची संधी मिळाली पाहिजे, जर असे नसेल तर नात्यात कटुता आणि राग वाढतो आणि दोन्ही जोडीदारांमध्ये अंतर येऊ लागते. म्हणूनच, तुमच्यामध्ये आणि तुमच्या जोडीदारामध्ये एकमेकांप्रती संयम आणि क्षमाशीलता आहे की नाही, हे जाणून घ्या.

परस्पर आदर

वैवाहिक जीवनात प्रवेश करणाऱ्या दोन्ही जोडीदारांमधील परस्पर आदर, ही यशस्वी लग्नासाठी एक महत्त्वाची अट आहे. म्हणूनच, जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम ही भावना तुमच्या नात्यात प्रबळ आहे की नाही, हे जाणून घ्या. तुमच्या जोडीदाराबद्दलचा आदर तुम्हाला आयुष्यातील कोणत्याही संघर्ष, मतभेद किंवा वादावर सहज मात करण्यास मदत करेल.

जर नात्यात गैरवापर किंवा अनादर असेल तर तुम्ही नात्याला लग्नात रूपांतरित करण्यापासून दूरच राहिले पाहिजे.

मैत्री

लग्नातील स्थिरतेसाठी पती-पत्नीमध्ये मैत्री आवश्यक आहे. यशस्वी वैवाहिक जीवनासाठी ती एक महत्त्वाची अट आहे. वैवाहिक नात्यात मैत्रीचा सुगंध नि:संशयपणे नात्यात गोडवा आणि ताजेपणा आणतो, नाते कंटाळवाणे किंवा नीरस होण्यापासून रोखतो आणि बंध मजबूत करतो.

म्हणूनच, लग्नापूर्वी, तुमच्या नात्यात मैत्री आहे की नाही, याचे आत्मपरीक्षण करा. जर मैत्री असेल तर ती तुमच्या वैवाहिक जीवनात प्रवेश करण्यासाठीचा हिरवा कंदील समजा आणि जर ती तुमच्या नात्यात हरवली असेल तर तुम्हाला ती तुमच्या नात्यात घेऊन येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी तुमच्या नात्याला आणखी थोडा वेळ द्यावा लागेल. लक्षात ठेवा, जर लग्नाचा पाया निरोगी मैत्रीवर रचला गेला असेल तर त्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...