– अमृता पांडे
पर्यटन हा कोणत्याही समाजाचा आर्थिक कणा असतो. समाज जितका समृद्ध असेल तितक्या पर्यटनाच्या शक्यता वाढतात. अनेक वर्षांपूर्वीपासून भारतातील पर्यटन हे तीर्थक्षेत्रांच्या प्रवासापुरते मर्यादित होते. काही भटक्या जातीचे तरुण डोंगरावर जात. हळूहळू पर्यटनाच्या विस्तारासोबतच त्याचा अर्थही बदलत गेला. आज हा व्यवसाय खूप संपन्न आहे. अगदी कनिष्ठ मध्यमवर्गीय व्यक्तीही आपल्या कुटुंबासोबत प्रवास करण्याचा बेत त्याच्या क्षमतेनुसार आखतो. आठवड्यातून ५ दिवस काम केल्यानंतर, २ दिवस आराम करावासा वाटतो आणि त्यासाठी लोक एखाद्या शांत आणि नयनरम्य ठिकाणी जातात.
पर्यटनाचा हा ट्रेंड जोमात आहे, कारण आज तरुण जोडपी चांगली कमाई करत आहेत. पूर्वीसारखी पैशांची कमतरता नाही. माणूस पैसा वाचवण्याच्या प्रवृत्तीतून बाहेर पडला आहे आणि उपभोगावर विश्वास ठेवू लागला आहे. त्याचा असा विश्वास आहे की, पैसा हे साधन आहे ध्येय नाही. पैसा हे सुख मिळवण्याचे साधन आहे हे देखील खरं आहे.
या प्रकरणाला पुढे नेत आपण आपल्या जवळच्या शहराकडे वळूया, जे जगभरातील पर्यटकांचे आवडते आहे, ज्याला तलावांचे शहर म्हटले जाते. त्याचे नाव नैनिताल आहे. नैनिताल वर्षानुवर्षे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
मर्यादित संसाधनांमुळे ध्येयपूर्तीत अडथळा
पर्यटकांच्या वाढत्या गर्दीचा फायदा येथील व्यावसायिकांना घ्यायचा होता. पण, बांधकामाचे काम जोरात सुरू झाले आणि टेकड्यांना तडे जाऊ लागले. रस्ते जाम झाले, शहरे कचरा आणि घाणीने व्यापली गेली आणि जेव्हा हंगामात लाखो पर्यटक येऊ लागले तेव्हा पार्किंग व्यवस्था कोलमडली. सरकारी प्रयत्न झाले, पण जागा मर्यादित राहिल्याने अपयश आले. काही बेकायदेशीर अतिक्रमणेही वेळोवेळी काढली जाऊ लागली, मात्र ती तात्पुरती कारवाई होती. मुसळधार पाऊस बाजूला ठेवल्यास नैनिताल वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले असते. हिवाळ्यात होणारी बर्फवृष्टी आणि उन्हाळ्यात मैदानी भागातील कडाक्याच्या उकाड्यापासून वाचण्यासाठी लाखो पर्यटक येथे येतात, मात्र गेल्या काही वर्षांत पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्याचा संकल्प करूनही अडचणी वाढत आहेत. मर्यादित संसाधने उद्दिष्ट गाठण्यात अडथळे ठरत आहेत.
पर्यटकांच्या प्रचंड ओघळामुळे व्यावसायिक चिंतेत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील अप्पर मॉल रोड आणि लोअर मॉल रोड या दोन्ही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. इंग्रजांनी बांधलेला बनिया नालाही अडचणीत आहे. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या या शहराला आतूनच तडे जात आहेत.
टिफिन टॉप, इको केव्ह गार्डन, नैनी लेक बोटिंग, स्नो व्ह्यू पॉइंट, नैना पीक, पंडितजी बी पंत जी प्राणीसंग्रहालय, नैना देवी मंदिर अशी येथील अनेक ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात. नैनितालपासून १२ किलोमीटर अंतरावर खुरपाताल तलाव आहे, जो चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे. कधीकधी या तलावाच्या पाण्याचा रंग बदलताना दिसतो. असे म्हणतात की, डझनभर प्रकारचे शैवाळ त्याच्या आत वाढतात आणि जेव्हा त्यांच्या बिया तयार होतात, तेव्हा तलावाचा रंग बदलतो. येथे पर्यटन होत नसल्यामुळे तलावाचे पाणी स्वच्छ आणि उबदार आहे.
कडाक्याच्या थंडीतही तलावाचे पाणी कोमट राहाते. ते कधीकधी लाल, हिरवे किंवा निळे दिसते. मात्र, मानवी अपप्रवृत्तीमुळे तलावात गटाराचे पाणी वाहू लागले आहे.
सुविधांचा अभाव
विस्कळीत व्यवस्थेमध्ये पर्यटन सोपे नाही. दूरवरून येणाऱ्या पर्यटकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आगाऊ बुकिंग असूनही काही वेळा पार्किंग अवघड होते. प्रेक्षणीय स्थळे पाहाण्याच्या इच्छेने एखादी व्यक्ती इतर खर्च कमी करून पैसे वाचवते आणि चांगले पैसे खर्च करूनही अपेक्षित सुविधा मिळत नाहीत, तेव्हा त्याला नक्कीच वाईट वाटते.
नैनितालमध्ये भरपूर उपाहारगृहे आहेत, पण पार्किंगची सुविधा सर्वत्र उपलब्ध नाही. एक काळ असा होता की, रस्त्यांवरही पार्किंग होत असल्याचे पाहायला मिळायचे, परंतु वाढत्या गर्दीमुळे ‘नो पार्किंग’ धोरणाची अंमलबजावणी काही वर्षापूर्वीपासून लागू करण्यात आली आहे. अनेकदा उपाहारगृह बुकिंगच्या वेळी पार्किंगची सुविधा असल्याचे पर्यटकांना सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात ती उपलब्ध होत नाही. पर्यटकांना फसल्यासारखे वाटते. अशा स्थितीत त्यांचे उपहारगृह मालक किंवा पोलिसांशी वाद होणे, सर्रास घडते.
हंगामात मॉल रोडवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांची वाहने फ्लॅट, टॅक्सी स्टँड पार्किंग किंवा कुमाऊ मंडल विकास महामंडळाच्या पार्किंगमध्ये पार्क केली जातात. पार्किंग आणि बुकिंग नसलेल्या पर्यटकांना नैनितालच्या काही किलोमीटर आधी रशियन बायपासवर तात्पुरत्या पार्किंगमध्ये थांबवले जाते. तेथून शटल सेवेची सोय आहे, पण बहुतांश पर्यटकांना आपली वाहने बेवारस सोडायची नसतात. त्यामुळेच या प्रसिद्ध ठिकाणांबाबत पर्यटकांचा भ्रमनिरास होत असून ते पर्यटनाची नवी क्षेत्रे शोधत आहेत.
वाहतुकीत गैरसोय
रस्त्यावरील विक्रेतेही पर्यटकांसाठी त्रासदायक ठरतात. जवळपास सर्वच शहरांमध्ये ते पदपथांवर बसतात, त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते. आजकाल इतर शहरातील व्यापारी रात्रीच्या वेळी ट्रकमध्ये माल भरून आणून रस्त्याच्या कडेला कोणतीही परवानगी न घेता आपली दुकाने थाटत असल्याच्याही बातम्या येत आहेत. यामध्ये मुख्यत: चिनीमातीची भांडी आणि कुंड्या असतात.
अनेकवेळा त्यांचे सामान मनपाने जप्त केले तरी ते काही दिवसांनी परत येथे येतात. गैरसोयीच्या आणि अनागोंदीच्या अशा बातम्या ऐकूनही हे शहर कधीच ओसाड दिसत नाही तर नवनवीन पर्यटकांनी गजबजलेले राहाते.
कोणत्याही त्रासाचा नैनितालच्या प्रतिमेवर काहीही परिणाम झालेला नाही, कारण वृत्तपत्र पाहिल्यावर असे दिसून आले की नैनितालच्या उपहारगृहांमध्ये पुढील काही महिन्यांसाठी प्रचंड बुकिंग झाले आहे. १५ एप्रिल ते १५ जुलै हा इथला उन्हाळा मानला जातो. हे शहर वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले असते. यापैकी, नैनिताल न पाहिलेल्या नवीन पर्यटकांची संख्या जास्त आहे.
नैनितालच्या आजुबाजूला भीमताल, धनचुली आणि रामनगरसारखी छोटी शहरे आहेत, जी वेगाने पर्यटन स्थळे म्हणून उदयास येत आहेत. रामगडबद्दल बोलायचे झाले तर उन्हाळ्यात पीच, जर्दाळू आणि नाशपाती यांनी बहरलेली झाडे पाहून मन मोहून जाते. महादेवी वर्माजी अनेक वर्षांपूर्वी रामगढ येथे आले होते, त्यामुळे या ठिकाणाला साहित्यिक नकाशावर महत्त्वाचे स्थान आहे. येथे महादेवी पीठाचीही स्थापना करण्यात आली असून, तेथे वेळोवेळी साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
आता छोट्या शहरांमध्येही पर्यटन व्यवसाय फोफावत आहे. धनचुली हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले एक छोटेसे गाव मुक्तेश्वरच्या वाटेवर असले तरी आज देशाच्या नकाशात त्याला महत्तवाचे स्थान आहे. कुमाऊँ लिटरेचर फेस्टिव्हलचे सत्रही येथे आयोजित करण्यात येते. ही सर्व ठिकाणे कॉटेज लाउंज आणि उपहारगृहांनी भरलेली आहेत, जिथे पर्यटक शांत वातावरणात निसर्गाचे जवळून निरीक्षण करू शकतात. मैदानी प्रदेशातून येणाऱ्या बहुतांश पर्यटकांची पसंती ही आयुष्यातील काही दिवस गर्दीपासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात, थंडगार आल्हाददायक वाऱ्यांचा आनंद घेत घालवण्याला असते.
नवीन ठिकाणे शोधणारे पर्यटक
पर्यटनाला चालना देण्यासाठी नैनिताल व्यतिरिक्त भवाली आणि आजूबाजूची छोटी शहरे कुमाऊनी शैलीत सजवली जात आहेत, जेणेकरून ती पर्यटकांना आकर्षित करू शकतील. छोट्या शहरांकडे पर्यटकांना आकर्षित करणे मोठ्या शहरांमधील लोकसंख्येचा दबाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल, याशिवाय छोट्या शहरांनाही पर्यटनाचा फायदा होईल.
२८ ते ३० मार्च २०२३ या कालावधीतील जी २० प्रतिनिधींच्या तीन दिवसीय परिषदेमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधलेले नैनिताल जिल्ह्यातील रामनगर हे छोटे शहर पर्यटकांमध्ये आधीच खूप लोकप्रिय आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे येथील कॉर्बेट टायगर रिझर्व्ह पार्क, जिथे पर्यटक खुल्या जीपमधून फिरण्याचा आनंद घेऊ शकतात, त्यासोबतच हत्तीवरून फिरण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. पर्यटकांचा कल लक्षात घेऊन रामनगरच्या ढिकुली परिसरात अनेक उत्कृष्ट उपहारगृहे बांधण्यात आली आहेत.
पर्यटक आता नवनवीन ठिकाणे पाहाण्यासाठी उत्सुक आहेत, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकेकाळी आकर्षणाचे केंद्र असलेले हे शहर सुविधांपासून वंचित झाले आहे आणि दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे आज इंटरनेटच्या विस्तारामुळे त्या ठिकाणांची माहिती घेणे सोपे झाले आहे, शिवाय अनेक व्हिडीओ आणि माहितीही उपलब्ध झाली आहे, ज्याच्या मदतीने पर्यटक येथे पोहोचत आहेत. अलीकडे, हरयाणातील काही व्यावसायिक पर्यटक, जे नैनितालमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये थांबले होते, ते गर्दीच्या शहरांपासून दूर शांत ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची माहिती शोधत होते. डोंगरावर येऊन इथली जीवनशैली, राहणीमान, खाद्यपदार्थ जाणून घेणे हे त्यांचे प्राधान्य होते.
आज तरुण पर्यटकांची संख्या खूप जास्त आहे आणि एक नवीन संज्ञा उदयास आली आहे, ज्याला हेरिटेज वॉक असे नाव देण्यात आले आहे. दुर्गम भाग जाणून घेण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी लोक तिथे जातात. त्यामुळे तिथे घरातील वास्तव्याचा कल वाढला आहे. दुर्गम खेड्यांमध्ये लोकांनी आपली घरे पर्यटकांसाठी सोयीस्कर निवासस्थानात रूपांतरित करून घरासारखी सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्कृतीला ‘घरापासून दूर घर’ असे नाव देण्यात आले आहे. पर्यटकांनाही येथे भरपूर वैविध्य पाहायला मिळते. त्यांना पहाडी जेवण दिले जाते. ज्यामध्ये मडूवे रोटी, झिंगोरे खीर, कुलथ डाळ, लाल तांदळाचा भात, काकडीचे झिलमल आणि मोहरी रायता दिला जातो.
संरक्षण आणि संवर्धनाची गरज
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज पर्यटक शांत आणि गूढ अशी थोडी वेगळी ठिकाणे निवडत आहेत. विशेषत: तरुण पर्यटकांचा या दिशेने कल वाढत आहे. पर्यटनाबरोबरच संशोधन करणारे काही रिसर्च स्कॉलरही आहेत. डोंगराळ ग्रामीण भागात पाताळ म्हणजेच दगडी छतावरील घरांचाही समावेश होतो, ज्यांची संख्या आता फारच कमी आहे आणि त्यांच्या संरक्षण तसेच संवर्धनाची गरज भासू लागली आहे.
दरवर्षी उत्तराखंडच्या सर्व हिल स्टेशन्समध्ये क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक आल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते, याची येथील रहिवाशांनाही तीव्र जाणीव आहे. यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्याचाही ऱ्हास होत आहे. पर्यटनाचा आराखडा तयार होऊन त्याचे योग्य मूल्यमापन झालेले नाही. इंग्रजांनी हिल स्टेशन्स बांधली खरी, पण आम्ही नरकाचे दरवाजे उघडले.
तीर्थयात्रेच्या नावाखाली पर्वतांचे पावित्र्य आणि स्वच्छता नष्ट केली गेली आहे. आदरातिथ्य आणि पर्यावरण रक्षणाच्या भावनेच्या पलीकडे जेव्हा पर्यटन हा निखळ व्यवसाय बनतो, तेव्हा ते कोणत्याही ठिकाणाचे भाग्य ठरते. पर्यटन सुरळीत चालू ठेवण्यासाठी पर्यटनाची आकडेवारी आणि पर्यटन आराखडा बनवण्याची गरज फार पूर्वीपासून जाणवत होती.
या क्रमाने, नैनितालजवळील टाकुला गावात सुमारे २ कोटी रुपये खर्चून अॅस्ट्रो व्हिलेज बनवण्याची योजना आहे. स्टार गेझिंगच्या सुविधेशिवाय, कुमाऊनी सांस्कृतिक शैलीदेखील त्याच्या बांधकामात भाग आहे. खगोल पर्यटन हे वैज्ञानिक पर्यटनाच्या श्रेणीत येते आणि जर एखाद्याला अवकाशाविषयी प्राथमिक माहिती असेल तर त्याचा आनंद द्विगुणित होणार आहे.
येथून पर्यटकांना उघड्या डोळ्यांनी शुक्र, मंगळ यांसारखे ग्रह पाहाता येतील. देशाव्यतिरिक्त विदेशी पर्यटकांसाठीही ते आकर्षणाचे केंद्र बनेल, अशी अपेक्षा आहे, आर्यभट्ट निरीक्षण विज्ञान संशोधन संस्था, एरिजच्या सहकार्याने बनवले जाणारे हे विशेष प्रकारचे मॉडेल असेल, ज्याच्या छतामध्ये आरसा असेल, जेणेकरुन हिवाळ्यात खोलीच्या आतून आकाश पाहाता येईल.
पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या भवनांसमोर हिरवेगार डोंगर आहेत. येथे एक अत्याधुनिक दुर्बीणही बसवण्यात आली आहे, हे ग्रह आणि नक्षत्र पाहाण्यासाठी अतिशय योग्य ठिकाण आहे. आगामी काळात अशी ठिकाणे पर्यटकांना आवडतील, अशी अपेक्षा आहे.





