* मोनिका अग्रवाल
आजच्या काळात पत्नीने नोकरी केली पाहिजे तरच घर नीट चालेल, असा समज वाढत आहे. महागाईसोबतच याचे एक कारण हेही आहे की, गृहिणींचे काम नोकरदारांच्या बरोबरीचे मानले जात नाही. अलीकडेच एका प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, गृहिणीचे काम पगार मिळवणाऱ्या जोडीदारापेक्षा कमी नसते. न्यायालयाने गृहिणीच्या योगदानाचे वर्णन ‘अमूल्य’ असे केले आहे. तुम्ही तुमचे काम पैशात तोलू शकत नाही
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, कुटुंबाची काळजी घेणाऱ्या महिलेला विशेष महत्त्व आहे. कुटुंबासाठी त्यांच्या योगदानाचे मूल्यमापन पैशांत करता येत नाही. मोटार अपघात प्रकरणातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधिकरणाने ही टिप्पणी केली.
असे आहे प्रकरण
खरं तर २००६ मध्ये उत्तराखंडमधील एका महिलेचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. ती ज्या गाडीतून प्रवास करत होती तिचा विमा उतरवला नव्हता. जेव्हा कुटुंबाने विम्यासाठी दावा केला तेव्हा न्यायाधिकरणाने महिलेच्या पती आणि अल्पवयीन मुलाला अडीच लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, न्यायाधिकरणाने महिलेला दिलेल्या विम्याची रक्कम कमी होती.
कुटुंबाने आणखी भरपाई मागितली. न्यायाधिकरणाच्या या निर्णयाला उत्तराखंड उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. उच्च न्यायालयाने न्यायाधिकरणाचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. महिला गृहिणी होती, त्यामुळे आयुर्मान आणि किमान अंदाजित उत्पन्नाच्या आधारे नुकसान भरपाईचा निर्णय घेण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या दृष्टिकोनावर नाराजी व्यक्त केली, ज्यामध्ये महिलेचे अंदाजे उत्पन्न इतर नोकरदार व्यक्तींच्या तुलनेत कमी मानले गेले. न्यायालयाने असे म्हटले की, गृहिणीचे उत्पन्न हे नोकरदार व्यक्तीपेक्षा कमी कसे मानले जाऊ शकते? आम्ही हा दृष्टिकोन योग्य मानत नाही. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ६ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही गृहिणीचे अंदाजे उत्पन्न तिची मेहनत, परिश्रम आणि त्यागाच्या आधारे मोजले गेले पाहिजे. जर गृहिणीच्या कामाची गणना केली तर हे योगदान अमूल्य आहे. सुप्रीम कोर्टाने ६ आठवड्यांच्या आत कुटुंबाला पैसे देण्याचे निर्देश देताना म्हटले की, गृहिणीचे मूल्य कधीही कमी लेखू नये.
करोडो गृहिणींना मिळाला सन्मान
सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आणि टिप्पणी म्हणजे भारतातील त्या करोडो महिलांना सन्मान देण्यासारखेच आहे, ज्या आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात रात्रंदिवस निस्वार्थपणे मग्न आहेत, अशा गृहिणी ज्या स्वत:च्या आरोग्याची काळजी न करता संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतात, ज्यांना वर्षभरात सुट्टी मिळत नाही. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतातील सुमारे १५९.८५ दशलक्ष महिलांनी सांगितले की घरगुती काम हे त्यांचे प्राधान्य आहे. तर यासाठी पुरुषांची संख्या केवळ ५.७९ दशलक्ष होती.
रोज ७ तास करतात घरातील काम
आयआयएम अहमदाबादच्या अभ्यासानुसार, भारतातील महिला आणि पुरुष यांच्यात कामाच्या वेळेत फार मोठा फरक आहे. देशातील १५ ते ६० वर्षे वयोगटातील महिला दररोज सरासरी ७.२ तास घरातील कामांमध्ये घालवतात. या कामासाठी त्यांना कोणतेही मानधन दिले जात नाही तर पुरुष अशा कामात दिवसाचे २.८ तास घालवतात.





