* शैलेंद्र सिंह

लनानंतर प्रिया पहिल्यांदाच पतीसोबत दुसऱ्या शहरात आली होती. तिच्या पतीचा ‘दृष्टी रेसिडेन्सी’मध्ये खूपच सुंदर फ्लॅट होता. स्वत:च्या शहरात प्रियाचे छानसे कुटुंब होते. सण-उत्सवांवेळी सर्व जण मिळून मिसळून आनंद साजरा करायचे. त्यामुळेच जसजशी दिवाळी जवळ येत होती तसा या नवीन घरात तिला जास्तच एकटेपणा जाणवू लागला होता. काय करावे, तिला काहीच समजत नव्हते. पती प्रकाशशी बोलल्यानंतर तिच्या लक्षात आले की त्याचे बहुतेक मित्र बाहेरून कामासाठी येथे आलेले आहेत. दिवाळीला घरी परत जाण्यासाठी त्यांनी आधीच तिकीट काढून ठेवले आहे.

यातील काही जण होते जे प्रियाच्या या नव्या घरापासून दूर राहत होते. प्रियाने तिच्या निवासी संकुलात राहणाऱ्या काही कुटुंबांशी अल्पावधीतच चांगली ओळख करून घेतली होती. त्या सर्वांशी बोलल्यानंतर प्रियाला समजले की, या संकुलातील काही जण दिवाळी साजरी करतात. पण ती घराच्या चार भिंतींआडच साजरी केली जाते. अगदी खूपच काही वाटले तर एखाद्या मित्राला भेटवस्तू देऊन सण साजरा केल्याचा आनंद घेतला जातो. हे ऐकल्यावर प्रियाने ठरवले की, यंदा दिवाळी नव्या पद्धतीने साजरी करायची. दृष्टी रेसिडेन्सी खूपच चांगल्या ठिकाणी बांधण्यात आली होती. संकुलाजवळ हिरवेगार उद्यान होते. प्रियाने उद्यानाची देखभाल करणाऱ्याला सांगून उद्यानाची साफसफाई करून घेतली.

त्यानंतर तिने एक सुंदरसे दिवाळी कार्ड तयार केले. त्याच्या काही रंगीत छायांकित प्रती काढल्या आणि आपल्या निवासी संकुलात राहणाऱ्यांसाठी चहा, दिवाळीचे पदार्थ, मिठाईची व्यवस्था केली. तिने दृष्टी रेसिडेन्सीमधील सर्वच ५० फ्लॅटमधील लोकांना निमंत्रण दिले होते. बहुतेक सर्व जण येतील, असा विश्वास तिला होता. संध्याकाळी पती प्रकाश कामावरून आल्यानंतर प्रियाने त्याला याबाबत सर्व सांगितले. सुरुवातीला प्रकाशचा यावर विश्वासच बसत नव्हता, पण प्रियाने यासाठी केलेली सर्व तयारी पाहून तो खूपच आनंदित झाला. प्रकाशने प्रियाला पाठिंबा देत दिवाळी कार्यक्रमाचा आनंद अधिक वाढविण्यासाठी प्रदूषणमुक्त फटाके आणले. गीत-संगीताची मजा घेण्यासाठी डीजेचीही व्यवस्था केली.

रात्री ८ वाजता प्रकाश आणि प्रिया नटूनथटून उद्यानात आले. थोडया वेळानंतर एकेक करून सर्व येऊ लागले. दिवाळीचे एक नवीनच रूप पाहायला मिळत होते. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होता. नाचगाणे, मौजमजा, असे सर्वच उत्साह वाढवणारे होते. त्यानंतर फुलबाज्या, फटाके फोडण्यात आले. दिवाळीनिमित्त इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांनी प्रियाचे मनापासून आभार मानले. प्रियाने जी सुरुवात केली त्याचा कित्ता दरवर्षी गिरवण्यात येऊ लागला. आता अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सर्व कुटुंबं मिळून मिसळून काम करू लागली. यासाठी होणारा खर्चही आपापसात वाटून घेण्यात येऊ लागला. लोक वाढू लागले तसा कार्यक्रमातील आनंदही वाढू लागला. दिवाळी हा रात्रीचा उत्सव आहे. अशा वेळी दिवे आणि फटाक्यांची मजा खूपच वेगळी असते. दिवाळीचा फराळ आणि मिठाईमुळे हा आनंद द्विगुणित होतो.

खर्च कमी करा आणि मजा वाढवा

मिळून मिसळून सण-उत्सव साजरे केल्यामुळे या सण-उत्सवांसाठी येणारा खर्च कमी होतो आणि आंनद वाढतो. आपले घर, कुटुंबापासून दूर राहूनही घराइतकाच आंनद साजरा करता येऊ शकतो. आजकाल बहुसंख्य लोक नोकरीनिमित्त, कमाईसाठी आपले शहर आणि घरापासून दूर दुसऱ्या शहरात राहतात. त्यांना सणांसाठी घरी जायला सुट्टी घ्यावी लागते. आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वे, बस, विमानाचे महागडे तिकीट काढावे लागते. अनेक अडचणी येत असल्यामुळे आपल्या घरी जाणे अनेकदा त्यांच्यासाठी त्रासदायक होते. अशावेळी सण-उत्सवांचे असे वेगळया प्रकारे करण्यात येणारे आयोजन उत्साह वाढवणारे ठरते. मिळून मिसळून आयोजन करण्यात येत असल्यामुळे सर्व लोक एकत्र येतात. एकत्र मिळून सर्व कामे करतात. त्यामुळे कोणी कोणावर ओझे ठरत नाही. कमी खर्चात उत्सवाचे उत्साहात आयोजन करता येते. कुटुंब सोबत असल्यामुळे पती आपल्या मित्रांसोबत दारू पिणे, पत्ते खेळणे अशा व्यसनांपासून दूरच राहणे पसंत करतो.

गवसेल प्रत्येक नाते

सण-उत्सवांसाठी एकत्रितपणे करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे दूर गेलेले प्रत्येक नाते गवसते. ज्यांचे आईवडील सोबत नसतात त्यांना इतरांच्या कुटुंबात राहणाऱ्या आईवडिलांची सोबत मिळते. कोणाला दादा-वहिनी, काका-काकी, भावोजी-भावजय, मुलगा-मुलगी आणि बहिणीसारखे प्रत्येक नाते कोणत्या ना कोणत्या कुटुंबातून मिळतेच. आपापसात जी मैत्री आधीपासूनच होती ती अधिकच घट्ट होते. सणांवेळी एकत्र आल्यामुळे मिळून मिसळून आनंद साजरा केला जातो, सोबतच गरज पडल्यास दु:खही समजून घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. धर्म, रूढी-परंपरा आणि संकुचित चालीरीती या माणसांचे विभाजन करण्याचे काम करतात. पण, सण-उत्सवांचा आधार घेऊन माणसांमध्ये जात, बुरसटलेल्या विचारांमुळे निर्माण झालेली दरी दूर करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो.

आज त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब पद्धती पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुले विविध नाती आणि त्यांच्यामध्ये दडलेला प्रेमाचा ओलावा, आपलेपणा यापासून दुरावत आहेत. जर अशा प्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तर त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबात राहूनही काही प्रमाणात का होईना, पण मोठया, एकत्र कुटुंबातील मजा अनुभवता येईल.

मजेदार ठरतील कार्यक्रमातील खेळ

अशा कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी काही खेळांचेही आयोजन करता येऊ शकते. मात्र प्रत्येक वयोगटातील माणसांना नजरेसमोर ठेवूनच अशा खेळांचे आयोजन करायला हवे. यामुळे उत्सवातील उत्साह अधिकच वाढेल. वेळ मजेत जाईल. गीत-संगीताचेही आयोजन करायला हवे. यात सर्वांनी सहभागी व्हायला हवे. प्रत्येकामध्ये एखादे तरी कौशल्य असतेच. सर्वाना त्यांच्या कौशल्यानुसार काम द्यायला हवे. अशावेळी मुलांकडेही दुर्लक्ष होता कामा नये. त्यांनाही त्यांची आवड लक्षात घेऊन एखादे छोटेमोठे काम द्यायला हवे. कार्यक्रमाच्या एकत्रितपणे केलेल्या आयोजनामुळे दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषणही कमी करण्यास मदत होते.

कार्यक्रमाच्या अशा प्रकारे मिळून मिसळून केलेल्या आयोजनामुळे सण-उत्सवांतील आनंद द्विगुणित होतो. अनेक धर्माचे लोक एकाच सोसायटीत राहत असल्यामुळे तेही या सणांचा एक भाग बनतात. यामुळे विविध ठिकाणची संस्कृती आणि खाद्यपदार्थांचीही देवाण-घेवाण होते. आजकाल ज्या प्रकारे आपापसातील दरी वाढत आहे ती कमी करण्याचे एक माध्यम म्हणजे सण-उत्सवांतील आनंद मिळून मिसळून साजरा करणे हे आहे. फक्त निवासी  संकुलातच नव्हे तर छोटया वसाहती, चाळी, विविध शहरांमध्ये तसेच गावागावांमध्येही दिवाळी उत्सवाचे आयोजन सर्वांनी एकत्र येऊन करायला हवे. यामुळे समाजात नव्याने प्रेम आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...