* सोमा घोष

मराठी टीव्ही इंडस्ट्रीत काम करणारी महाराष्ट्रीयन अभिनेत्री रश्मी अनपटला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिच्या कुटुंबातील कोणीही अभिनय क्षेत्रात नसले तरी तिला मात्र प्रेक्षकांसमोर एखादी भूमिका साकारायला खूप आवडायचे. पुण्याची असलेल्या रश्मीची कामादरम्यान अभिनेता आणि पती अमित खेडेकरशी ओळख झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर २ वर्षांनी लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांनी मुलगा अभीर झाला. तो वर्षाचा झाल्यानंतरच तिने अभिनयातील कारकिर्दीला पुन्हा सुरुवात केली. तिच्या कामात संपूर्ण कुटुंब तिला पूर्ण सहकार्य करते. त्यामुळे तिचा कुटुंबासोबत कामाचा चांगला ताळमेळ बसला आहे. सुंदर आणि हसतमुख रश्मी सध्या सन मराठीवरील ‘शाब्बास सुनबाई’ या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. चित्रिकरणाचा व्यस्त दिनक्रम असूनही तिने वेळात वेळ काढून ‘गृहशोभिका’साठी गप्पा मारल्या. चला, तिच्याच तोंडून तिच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

माझ्या कुटुंबातील कोणीही अभिनयाच्या क्षेत्रात नव्हते. मी वयाच्या १० व्या वर्षांपासून व्यावसायिक नाटकात काम करायला सुरुवात केली. एक ऐतिहासिक नाटक होते, त्यात मी ५ वर्षांपर्यंत राजाराम महाराजांची भूमिका केली. त्यानंतर दोन वर्षे काहीही केले नाही. बारावीनंतर पुन्हा व्यावसायिक नाटक करू लागले. ग्रॅज्युएशननंतर मुंबईत येऊन मराठी टीव्ही इंडस्ट्रीसाठी काम करू लागले. ८ वर्षांपर्यंत मी अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीकडे वळले.

आता या मालिकेत काय काम करत आहेस? त्यात तुझी भूमिका काय आहे?

यामध्ये मी एका महाविद्यालयात जाणाऱ्या मुलीची भूमिका साकारत आहे, जिथे तिच्याबद्दलचे सर्व निर्णय तिचे वडील घेतात. तिच्या जेवणापासून ते रात्री झोपण्यापर्यंतचा दिनक्रम वडिलांनीच ठरवलेला असतो आणि ती आनंदाने त्याचे पालन करते. ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कथा आहे, ज्यात एक वडील मुलीची काळजी घेणारे, तिच्या सुरक्षिततेची काळजी घेणारे आणि मुलीबद्दल मोठे स्वप्न पाहणारे आहेत.

तुझ्या अभिनय कारकिर्दीत कुटुंबाचे सहकार्य किती मिळाले?

सगळयांनी खूप साथ दिली. अनेकदा रात्री जेव्हा मी नाटक संपवून घरी परतायचे किंवा एखाद्या नाटकात काम करायला जायचे तेव्हा माझे वडील मला नाट्यगृहातून घ्यायला यायचे. लग्नानंतर सासू-सासऱ्यांचेही मला चांगले सहकार्य मिळत आहे. माझे पतीही मला खूप पाठिंबा देतात. त्यामुळे कामात कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.

टीव्ही इंडस्ट्रीत पहिला ब्रेक मिळण्यासाठी तुला किती वेळ लागला?

पुण्यात राहून मी टीव्हीवरील मालिकांसाठी दोन ते तीन वेळा ऑडिशन दिले होते. नंतर मला प्रोडक्शन हाऊसचा फोन आला. मला नकारात्मक भूमिका मिळाली होती, त्यावेळी मी मास्टर डिग्री घेण्यासाठी रांगेत उभी राहून शुल्क भरणार होते. तितक्याच प्रोडक्शन हाऊसचा फोन आल्यामुळे मी गोंधळून गेले. मी काय करू? अभिनय की शिक्षण? शुल्क भरण्याची रांग सोडून मी सर्वात आधी वडिलांना भेटून त्यांचे मत विचारले. त्यांनी मला जे आवडेल ते करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी मुंबईत अभिनयासाठी आले.

मुंबईत आल्यानंतरचा तुझा प्रवास कसा होता?

मी अनेक मोठया मराठी कलाकारांसोबत काम केले. त्यातून मला खूप काही शिकायला मिळाले. माझा हा प्रवास जवळपास १३ वर्षांचा आहे. मला या काळात कोणताही वाईट अनुभव आला नाही. लोक मनोरंजन क्षेत्राबद्दल खूप काही बोलतात, पण मला कधीच तसे काही जाणवले नाही. मुळात प्रत्येक व्यक्तीसाठी या इंडस्ट्रीचा अनुभव वेगळा असतो. करिअर म्हणून हे क्षेत्र निवडल्याचा मला आनंद आहे.

पती अमित खेडेकरशी तुझी कशी ओळख झाली?

मी जे पहिले मराठी नाटक केले त्यात माझा पतीही अभिनय करत होता. नाटकादरम्यान आम्ही दोघे भेटलो आणि दोन वर्षांनी मैत्रीचे रुपांतर लग्नात झाले. माझा मुलगा ४ वर्षांचा आहे.

मुलासोबत काम करण्यासाठी तू कसे जुळवून घेतलेस?

गरोदर राहिल्यानंतर काही दिवसांनी मी कामातून ब्रेक घेतला. त्यानंतर मुलगा एक वर्षाचा झाल्यावर, पुन्हा काम सुरू केले. माझे आई-वडील आणि सासू-सासरे मिळून त्याची काळजी घेत होते. त्यामुळे काम करणे माझ्यासाठी अवघड नव्हते. माझा मुलगा अजिबात त्रास देत नाही. त्याला दोन्ही घरातल्या आजी-आजोबांसोबत राहायची सवय झाली आहे.

तू आतापर्यंत कोणकोणत्या भूमिका साकारल्या आहेस? कोणती भूमिका तुझी सर्वात आवडती आहे? कोणत्या भूमिकेने तुला ओळख मिळवून दिली?

माझ्या पहिल्या मालिकेत मला नकारात्मक भूमिका साकारायची होती. त्यावेळी मी माझ्या मित्र-मैत्रिणींना विचारले होते की, मला अशी भूमिका का मिळाली, मी नकारात्मक दिसते का? त्यांनी हसून मला समजावले की, स्वत:च्या स्वभावापेक्षा वेगळी भूमिका साकारणे हे सर्वात मोठे आव्हान असते. पहिल्याच मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणार असल्यामुळे मला खूपच निराश झाल्यासारखे वाटत होते. स्वत:पेक्षा वेगळी भूमिका साकारणे माझ्यासाठी अवघड होते, पण हळूहळू सवय झाली. दिग्दर्शकांनी खूप मदत केली. या मालिकेनंतर मी अनेक सकारात्मक भूमिकाही साकारल्या. प्रत्येक भूमिकेत काही ना काही आव्हान असतेच. भूमिका कुठलीही असो ती कलाकारासाठी खूप खास असते आणि ती साकारण्यासाठी तो जीव तोडून मेहनत करतो.

‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेत मी ‘ईश्वरी’च्या मुख्य भूमिकेत होते. या मालिकेने एक हजार भाग पूर्ण केले. त्या मालिकेमुळे माझी ओळख मिळाली. त्यादरम्यान बाहेर गेल्यावर लोक माझे कौतुक करायचे. एका महिलेने तिच्या मुलीचे नाव इश्वरी ठेवले होते, माझ्यासाठी हे खूपच हृदयस्पर्शी होते. एकदा मी पुण्याला गेले होते, तिथे बाईकवरील एक काका-काकूने मला ओळखले. गाडी थांबवून ते माझ्याशी बोलले आणि रडू लागले. मी घाबरले, विचारल्यावर समजले की, मालिकेत एके दिवशी माझ्या सासूने माझ्या कानाखाली मारले होते. ते पाहून खूप वाईट वाटले, असे काकूंनी रडत सांगितले. ती जखम बरी झाली आहे की नाही, हे मी पाहातेय, असे त्या म्हणाल्या. दैनंदिन मालिकांशी प्रेक्षकांचे घट्ट नाते असते. ते अनुभव खूप वेगळे असतात. प्रेक्षकांची आवड हेच तिथे मी काम करण्यामागचे कारण आहे. त्यातून मला खूप आनंद मिळतो.

तुला कधी नकाराचा सामना करावा लागला का? त्यावेळी तू त्याला कशी सामोरी गेलीस?

रिजेक्शन किंवा नकार हा अभिनयाचा एक भाग आहे. कधीकधी त्याला सामोरे जावे लागतेच, कारण कधीकधी चेहरा हा व्यक्तिरेखेला साजेसा नसतो. मी यावर जास्त विचार न करता पुढे जाते. यामुळे अनेकदा तणाव येतो. अशावेळी मी माझ्या पतीने सांगितलेले आठवते. तो म्हणतो की, एक काम झाले नाही तर तर दुसरे खूप जास्त छान होईल. तो तणाव येऊ देत नाही, मीही त्याने सांगितल्याप्रमाणेच वागते. मी नेहमी सकारात्मक विचार करते.

हिवाळयात सौंदर्याची काळजी कशी घेतेस?

मी नेहमीच माझ्या आहाराकडे जास्त लक्ष देते. मध्येच भूक लागल्यावर सुका मेवा, फळे खाते, पण मला वडापाव खायला खूप आवडतो. तो मी कधीतरी खाते. मी खवय्यी आहे. मी साधारण डाएट करते. सकाळी उठून गरम पाणी, ब्राऊन ब्रेड, लोणी, पोहे, उपमा इत्यादी खाते. माझ्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात चपाती, हिरव्या पालेभाज्या, डाळ इत्यादी असते. पुरेसे पाणी पिते.

आरोग्याची काळजी कशी घेतेस? काही संदेश द्यायचा आहे का?

मी योगासने, व्यायाम करते. प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट्स इत्यादींचा माझ्या आहारात समावेश असतो. या सर्व गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. मी जंक फूड खाणे टाळते. मी सर्व महिलांना नैसर्गिक अन्न, तूप, पाणी, हिरव्या भाज्या इत्यादींचे सेवन करण्याचा सल्ला देईन.

आवडता रंग – लाल.

आवडते वस्त्र – पारंपरिक साडी.

आवडते पुस्तक – स्वामी, रणजीत देसाई.

वेळ मिळाल्यावर – कुटुंबासोबत वेळ घालवणे.

आवडता परफ्यूम – जाराचे सिक्रेट.

पर्यटन स्थळ – जम्मू आणि काश्मीर, लंडन.

जीवनातील आदर्श – गरजूंना मदत करणे.

सामाजिक कार्य – अनाथ आणि वृद्धांसाठी काम करणे.

स्वप्न – समाजासाठी काहीतरी करायचेय.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...